Monday, July 9, 2018

मन्वंतर

सीता स्वयंवरात राम जेव्हा शिवधनुष्याला प्रत्यंचा लावायला गेले तेव्हा जुने झालेले शिवधनुष्य कडकडाट करत मोडले. जेव्हा परशुरामांना हे कळालं तेव्हा ते क्रुद्ध झाले. साहजिक आहे, जे धनुष्य परशुरामांना शिवशंकरांनी दिले, जे धनुष्य अनेक लढायांत वापरले गेले आणि ज्याद्वारे अनेक युद्धे जिंकली गेली ते धनुष्य मोडल्यावर परशुरामांना राग येणे स्वाभाविक होते.

मग रीतसर राम परशुरामांना भेटायला गेले. तिथे आता परशुराम रामांशी युद्ध करतील किंवा शाप देतील अशी शक्यता बऱ्याच जणांना वाटत होती. पण रामांना बघितल्यावर परशुरामांना आपला अवतार संपला हे लक्षात आले, नवा अवतार राम आहेत हेही लक्षात आले आणि त्यांनी शर आणि शाप यापैकी काहीही न वापरता रामांना आशीर्वाद दिले आणि ते पुढे मार्गस्थ झाले.

१९२७ मध्ये आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्या मनुस्मृतीच्या जोरावर अनेक वर्षे भारतात कारभार चालला. बऱ्याच अंशी चांगलाही चालला असेल, पण कुठेतरी त्यातून अन्यायही झाला. म्हणून आंबेडकरांनी ती जाळली. पुढे जेव्हा त्यांनी राज्यघटना लिहिली तेव्हा त्याच मनुस्मृतीतील योग्य गोष्टी राज्यघटनेत घेतल्या. जर मनू जिवंत असते तर त्यांनी आपली स्मृती आता जुनी झाली/मोडली हे मान्य केलं असतं आणि नवा मनू जन्मला हे बघून, आनंद व्यक्त करून, आशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले असते. दुर्दैवाने मनू परशुरामांसारखे चिरंजीव नाहीत, म्हणून हे होऊ शकले नाही.

पण ज्यांना परशुराम आणि मनू, दोघेही आपले वाटतात त्यांनी परशुरामांची कथा समजावून घेऊन मनुस्मृती आता डोक्यातून पूर्ण काढून राज्यघटना आत्मसात करावी ही अपेक्षा!