Tuesday, February 26, 2019

वंशवृक्ष - एस् एल् भैरप्पा

श्रीनिवास श्रोत्री - व्यासंगी, वेदशास्त्रसंपन्न, श्रीमंत कुटुंबातील अत्यंत साधेपणाने पण धर्माच्या कसोटीवर घासून जीवन उन्नत करणारा पन्नाशीतला मनुष्य. याचा मुलगा नदीच्या पुरात वाहून जातो. बायको भागीरथी, घरी काम करणारी पण घरचीच असणारी लक्ष्मी, सून कात्यायनी आणि नातू चिनी यांना सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा निवृत्त जीवनातून गृहस्थी जीवनात येतो.

यांचे एक विद्यार्थी असतात - सदाशिवराव. विद्वान! सदाशिवरावांना भारतीय इतिहासावर मोठा ग्रंथ लिहायचा आहे. त्यासाठी ते श्रोत्रींचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांची एक पत्नी आहे - नागलक्ष्मी, मुलगा पृथ्वी आणि भाऊ राज.

नागलक्ष्मी साधी गृहिणी आहे. पतीवर प्रेम, निष्ठा आहे पण त्याच्या व्यासंगापासून ती खूप दूर आहे. सदाशिवरावांना अजिंठ्याला एक सिंहली मुलगी भेटते - करुणा रत्ने. करुणा हुशार असते आणि सदाशिवरावांचा विषय - इतिहासाची - विद्यार्थिनी असते. ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करायला मैसूरला येते. PhD करताना सदाशिवरावांच्या खंडप्राय ग्रंथाच्या पहिल्या खंडासाठी त्यांना मदत करते. त्यानंतर ती परत जाते पण ते दोघेही एकमेकांशिवाय आपण अपूर्ण आहोत. त्यानंतर करुणा पुन्हा मैसूरला येते. पण यावेळी सदाशिवराव तिला लग्नाची मागणी घालतात. दोघे लग्न करतात पण नागलक्ष्मी आणि करुणा एका घरात राहत नाहीत. सदाशिवरावांची दोन बिऱ्हाडे होतात.

राज इंग्रजीचा प्राध्यापक आणि नाट्यकलेवर प्रेम करणारा आहे. कात्यायनी पतीची ग्रॅज्युएशनची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते. राजला ती आवडते आणि कात्यायनीही राजला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न होते. कात्यायनीला श्रोत्री विरोध करत नाहीत पण एक गोष्ट सांगतात की उन्नतीची एक पायरी चढल्यावर पुन्हा त्याच पायरीवर येणे ही अवनती आहे. लग्न करून मातृत्व मिळाल्यावर पुन्हा लग्न करणे त्यांच्या दृष्टीने एक पायरी खाली येणे आहे. ती जेव्हा तिच्या मुलाला न्यायला येते तेव्हा त्याला न्यायचे की नाही ही गोष्ट ते तिच्या न्यायबुद्धीवर सोडतात आणि कोणतीही बळजबरी करत नाहीत. पण कात्यायनी मुलाला श्रोत्रींंकडेच राहू देते आणि नवा संसार सुरू करते.

श्रोत्री-भागीरथी-लक्ष्मी-चिनी, सदाशिवराव-नागलक्ष्मी-करुणा, राज-कात्यायनी-पृथ्वी यांचा प्रवास सुरु राहतो. सुमारे वीस वर्षांचा प्रवास दाखवलाय. त्यात अनेक वळणे येतात. प्रत्येक परीक्षेच्या प्रसंगी सदाशिवराव-करुणा बुद्धीला, राज-कात्यायनी प्राकृतिक स्वभावाला आणि श्रोत्री धर्माला (कर्तव्याला) प्रमाण मानून निर्णय घेतात.
पुढील कथा तुम्ही प्रत्यक्षच वाचावी!

यातील प्रत्येक परीक्षा ही प्रत्येकासाठी अवघडच असते आणि प्रत्येकजण आपापल्या समजुतीने पुढे जातो. भैरप्पांचे वैशिष्ट्य हे की आपल्याला कुणीच "खल" वाटत नाही. पण सर्वात उठून दिसतात श्रोत्री. ते कधीच कुणावर रागावत नाहीत, त्यांच्या धर्म-कर्तव्याच्या कसोटीवर घासून निर्णय घेतात आणि कात्यायनीला सांगितलं वाक्य - एकदा उन्नतीच्या वरच्या पायरीवर आल्यावर पुन्हा खालच्या पायरीवर कधीच जात नाहीत. त्यांच्या काही गोष्टी आजच्या युगात आपल्याला पटत नाहीत पण काळ आणि धार्मिक बाजू लक्षात घेतली तर निश्चितच आपण श्रोत्रींंपुढे नतमस्तक होतो.

मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद

शस्त्रात ताकद नसते, ताकद असते ते शस्त्र धारण करणाऱ्या हातात. पण खरंतर हातातही ताकद नसते, ती असते कणखर मनात. जेव्हा मन कणखर नसते तेव्हा संत तुकारामांनी सांगितलेल्या रडक्या माणसाप्रमाणे हाल होतात.

ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी जुंझार कैसा झुंजो ।।
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ।।
बैसविले मला येथे अश्वावरी । धावू पळू तरी कैसे आता ।।
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ।।
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ।।

माझे हात ढाल आणि तलवार यांना धरण्यात गुतंले आहेत, मी लढू कसा असा त्याला प्रश्न पडतो. पायाला पोटीस बांधलंय आणि डोक्यावर सिले टोप आहे, त्याचं मला ओझंच होतंय. मला घोड्यावर बसवलेलं असल्याने मला पळणेही शक्य नाहीये. असा विचार करणारा जे उपाय आहेत त्यालाच अपाय समजतोय आणि हाय हाय करत काहीही करू शकत नाही.

२६-११ ला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला किंवा त्या दरम्यान जेवढे घातपाती हल्ले झाले तेव्हाही आपली सेना हीच होती, एवढीच सक्षम होती. म्हणजे ढाल-तलवार-पोटी-पडदाळे आणि घोडा होताच. म्हणजे शस्त्रे होती, विमाने होती. ती धरणारा हात म्हणजे प्रत्यक्ष सैनिक सुद्धा होते. ते आज जेवढे सक्षम आहेत तेवढेच सक्षम होते. पण "कडी निंदा" करण्यापलीकडे काहीच झालं नाही. कारण या शस्त्रामागे - हातामागे जे मन होतं ते कमकुवत होतं. उरी नंतरचा सर्जिकल स्ट्राईक असो की आज झालेला एअर स्ट्राईक यात सेनादलाचे श्रेय आहेच. ते असलंच पाहिजे. पण त्या बलदंड सेनेमागे जे कणखर मन आहे ते सध्याच्या सरकारचे आहे.

मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद ।
या ओळीचा अर्थ आज पुन्हा एकदा भारतीय वायुसेनेने आणि भारतीय सरकारने दाखवून दिला!!!

शतशः नमन _/\_

#SurgicalStrike2