Tuesday, July 16, 2019

गंगा माँ मंडल

आपल्याकडे महाराष्ट्रात श्री. अ. दाभोलकर यांनी १० गुंठे शेतीप्रकल्पावर खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांची अनेक पुस्तकेही आहेत. "विपुलाच सृष्टी" हे त्यापैकी एक. याच प्रकारे अन्य राज्यांमध्येही प्रयोगशील लोक आहेत. मालपाणी ट्रस्ट, मध्यप्रदेश यांनी "गंगा माँ मंडल" नावाचा एक गुंठ्यातील प्रयोग केला आहे. त्याची माहिती देत आहे.

या प्रयोगात मुख्यत्वे लक्षात घेतलेली बाब म्हणजे कोणत्याही साधारण कुटुंबात (४ ते ५ व्यक्ती) सामान्यतः जो पोषक आहार हवा असतो तो सहज भाज्या आणि फळांद्वारा मिळू शकतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यातून मिळतील. यासाठी १००० चौरस फूट एवढीच जागा लागेल. "गंगा माँ मंडल"मुळे एक कुटुंब विषमुक्त फळ-भाजी आणि घरगुती औषधे यासाठी स्वयंपूर्ण होईल.

याची रचना गोलाकार आहे. यात जाण्यासाठी ७ रस्ते असतील. जेव्हा मंडल पूर्ण होईल तेव्हा रोज सकाळी एका रस्त्याने केंद्रापर्यंत जात पाणी घालायचे (अर्थात कुणाला ठिबक सिंचन करायचे असेल तरी चालेलच). याची रचना अशी असेल की ते पाणी सगळ्या भागात पोहोचेल. पाणी देत असतानाच आपल्याला आवश्यक त्या भाज्या आणि फळे तोडून आणायची. दुसऱ्या दिवशी दुसरा रास्ता आणि नव्या, ताज्या भाज्या फळे तुमच्या जवळ! असं करत सात दिवस सात भाज्या फळे तुम्हाला मिळतील आणि आठव्या दिवशी पुन्हा पहिल्या रस्त्यावरील भाज्या तोडणीयोग्य झालेल्या असतील. हा क्रम अनेक दिवस चालेल. जेव्हा रोपे जुनी होतील तेव्हा ती काढून पुन्हा नवीन लावायची.

गंगा माँ मंडलाच्या केंद्राकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेल असलेल्या फळभाज्या लावतात. बाहेरील सात वाफ्यांमध्ये कांदा, लसूण, मुळा, रताळी आणि बटाट्यासारखी कंदमुळे तसेच टमाटे, भेंडी अश्या फळभाज्या तसेच विशेष म्हणजे अनेक औषधी वनस्पती सुद्धा लावल्या जातात. आतील सात वाफ्यांमध्ये मेथी, मिरची, कोथिंबीर असे मसाले, मूग, तूर, उडीद असे प्रोटिनयुक्त धान्ये लावली जातात. सर्वात आतील गोलात आर्द्रता जास्त असल्याने केळी, पपई लावता येते.

गंगा माँ मंडल बनवण्याची कृती खालीलप्रमाणे (आराखडा चित्रात दिला आहे)
१. जिथे हे करायचे आहे त्या १०००  चौरस फूट जागेच्या केंद्रबिंदूवर खुंटी ठोका. तिथून १५ फूट त्रिज्येचे गोल आखून घ्या. त्यावर राख/चुना घाला म्हणजे ते दिसत राहील.
२. आता दोरीची लांबी हळूहळू कमी करत क्रमाने एक एक गोल आखून घ्या १०.५, ९, ६, ४.५, ३. याही गोलांवर राख घाला.
३. सर्वात बाहेरील गोलांवर १३.५ फुटांवर खुणा करा, सात समान भाग होतील. त्यावरही राख टाकून खुणा स्पष्ट करा.
४. या खुणांपासून केंद्रबिंदूपर्यंत दोरी लावून ४.५ फुटांच्या गोलापर्यंत रेष आखून घ्या. त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना ९-९ इंच मोजून दीड फुटाची जागा रस्त्यासाठी तयार करा. हा रस्ता बाहेरून आतील ४.५ फूट त्रिज्येच्या गोलापर्यंत जाईल. रस्त्यावर हवे असल्यास दगड/फरशी लावता येईल.
५. असेच सात रस्ते करा.
६. सर्वात आतील ३ फूट गोलात एक दोन फूट खोल खड्डा करा. या खड्ड्यात विघटित व्हायला किमान सहा महिने लागतील (उदा - नारळाच्या काथ्या, तुराट्या, झाडांच्या फांद्या, उसाच्या चिवट्या) असे पदार्थ टाका. त्याच्या वर लवकर विघटित होणारे पदार्थ टाका (उदा: वाळलेली पाने, गवत, कापलेले तण). दर एक दीड महिन्यानंतर यातील खत काढून वाफ्यांमध्ये टाकता येईल.
७. सर्वात आतील खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर एक मोठा दगड ठेवता येईल. अंघोळ, कपडे किंवा भांडे धुणे यासाठी तो वापरता येऊ शकेल. याद्वारे ते पाणी वापरात येईल.
८. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बांबूचा मंडप करून त्यावर काथ्याची जाळी तयार करून, त्यावर वेल सोडा.
९. रस्ते सोडून जी जागा आहे त्यात खड्डे करून, माती, लवकर विघटित होईल असा कचरा, शक्य असल्यास तांदळाचा किंवा डाळींचा भुसा, शेणखत/गांडूळखत वापरून भुसभुशीत वाफे तयार करा. त्यावर जीवामृत टाका ज्याद्वारे जमिनीतील जीवाणू वाढतील. सर्व वाफे एकमेकांना जोडा, म्हणजे पाणी सगळीकडे जाऊ शकेल.

गंगा माँ मंडल तयार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. वेल वर्गीय भाज्यांना खूप जास्त वारं सहन होत नाही. त्यामुळे गंगा माँ मंडल वेगवान वारं नसेल तिथे तयार करावं.
२. इथे जास्तीत जास्त वेळ ऊन असले पाहिजे.
३. प्राण्यांपासून योग्य संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे शक्यतो याच्या भोवती कंपाउंड असावे.
४. घरगुती वापरातील खराब पाणी (अंघोळ, कपडे-भांडी धुणे) सहजपणे यात जाऊ शकले पाहिजे. या पाण्यात शक्यतो रसायने जाऊ नयेत. यासाठी साबण वापरावर जरा बंधन येईल.
५. वेलभाज्या या मंडपावरच वाढवाव्यात. रस्त्यात अथवा वाफ्यात नको. म्हणजे भाजीचा दर्जा चांगला राखला जाईल.
६.  गंगा माँ मंडल स्वयंपाकघराजवळ केल्यास तेथील पाणी, जैविक कचरा सहजपणे गंगा माँ मंडलात टाकणे सोपे जाईल.


चित्रातील आराखड्यात दिल्याप्रमाणे तुम्ही भाज्या आणि अन्य वनस्पती लावू शकता. पण तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार यात बदलही करता येईल. या १००० चौरस फुटात सुमारे ४० ते ५० प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत. या नवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!

ही सर्व माहिती येथून घेतली आहे
तयारीचा फोटो फेसबुकवरील पोस्ट मधून घेतले आहेत

यातील औषधी वनस्पतींची माहिती खालील दुव्यांवर मिळेल -

Monday, July 8, 2019

मशीन लर्निंग आणि समाजमन

बऱ्याचदा त्र आणि ञ मध्ये खूप लोक गडबड करतात. छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला जातो. यावर बऱ्याचदा गमतीदार टीका होते, विनोद होतात पण एकदा वापर करायला सुरुवात झाली की अनेकांनी त्र च्या जागी "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" लोकांनी छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला. त्याने झालं असं की गूगल इंडिक की-बोर्ड वर जेव्हा आपण छत्रपती हा शब्द लिहितो, तेव्हा छञपती हा शब्द देखील सुचवला जातो. याचं कारण गूगल इंडिक की-बोर्ड हा मशीन लर्निंग इनेबल्ड आहे. म्हणजे जे शब्द टाईप केले जातात ते शब्द तो लक्षात ठेवतो आणि नंतर सुचवतो. अजून तरी जास्त लोक छत्रपती वापरतात. जेव्हा जास्त लोक छञपती वापरतील तेव्हा डिफॉल्ट आपल्याला छञपती शब्द दिसेल.

अगदी असंच समाजमन काम करत असतं. कुणीतरी एखादी चूक करतो. त्याला एकूणच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" या नावाखाली फारसा विरोध होत नाही. मग तीच, तशीच चूक अजून काही लोक "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" करतात. हळूहळू समाजमन त्याला मान्यता द्यायला लागतं. मग मान्यतेनंतर त्याचा गौरव केला जातो, नंतर तेच करणारे श्रेष्ठ असाही प्रचार होतो आणि मग योग्य करणारे लोक हे प्रतिगामी वगैरे होत जातात. त्यामुळे जर चूक असेल तर ती चूक आहे हे दाखवून दिलं पाहिजे आणि ती चूक ग्लोरिफाय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उगाच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" वगैरे नावाखाली मान्यता देणे हे समाजमनाचे मशीन लर्निंग असते हे लक्षात ठेवले पाहिजे!