Thursday, September 19, 2019

सूर्यास्त

जेव्हा एखादा सूर्य भर मध्यान्ही
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.