Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Monday, October 21, 2019

अहंकार

अहंकार ही अशी गोष्ट आहे जी, ज्याला शोभून दिसू शकते तो बाळगत नाही, ज्याची कुवत नसते तो सगळीकडे घेऊन फिरतो

Tuesday, October 8, 2019

सहज संवाद

श्यामचे वडील घरी येतात. आई पाट मांडते आणि सगळे जेवायला बसतात. आज आई भाजीत मीठ टाकायला विसरते. वडील काहीच न बोलता सगळं जेवण करतात. वडील तसंच खातात म्हटल्यावर मुलंही काहीच न बोलता जेवण करतात. सर्वांची जेवणं झाल्यावर जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे लक्षात येतं. मग तीही बिना मिठाची भाजी खाते...

ही गोष्ट लहानपणी "श्यामची आई" पुस्तकात वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला होता की, भाजीत मीठ नाहीये हे सांगायला श्यामच्या वडिलांना अडचण काय होती. सर्वांच्या ताटात एक एक चिमूट मीठ पडलं असतं आणि सर्वांना सहज चवीचं खायला मिळालं असतं. पण एकूणच यात अनावश्यक त्यागाचे उदात्तीकरण केलंय.

याचे आईवर होणारे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचारच केलेला नाहीये. जर आई निगरगट्ट असेल तर काही अडचण नाही. पण ती तशी नाहीये कारण तिनेसुद्धा भाजी बिना मिठाची खाल्ली. आपण जर चूक केली तर तिची शिक्षा असणार नाही पण कुणी काही न बोलता ते सहन करेल आणि चूक सुधारायला आपल्याला जागाच नसेल ही भावना किती भयंकर आहे. मी आपल्या घरात आपल्याच माणसात एक छोटीही चूक करू शकत नाही हे दडपण तिच्यावर पुढे जन्मभर असेल.

आपल्या माणसांत असताना आपण सहज असलो पाहिजे. आपल्यावर "माझ्याकडून एखादी चूक तर होत नाहीये ना" याचं दडपण असू नये. यासाठी सर्वांनी सहज संवाद ठेवला पाहिजे. कुणी एखादी छोटी-मोठी चूक केली तर त्यावर सोपा उपाय शोधला पाहिजे. न बोलता सहन करणंही नको आणि फाडफाड बोलून शिक्षा करणंही नको.

आजच्या दसऱ्याला अबोलतेकडून सहज संवादाकडे आपल्या सर्वांचे सीमोल्लंघन व्हावे या शुभेच्छा!!!