Sunday, February 23, 2020

प्रभावी कौंतेय

काल कौंतेयने ज्या दिवसांची आठवण करून दिली त्या दिवसांतील कौंतेय आठवला. आम्हाला आता प्रत्यक्ष भेटून १५ वर्षे (किंवा जास्तच) झाली असतील. पण तो कौंतेय अजूनही जसाच्या तसा आठवतो.

आम्ही संभाजीनगर (देवगिरी जिल्हा) मधील स्वयंसेवक. त्याच्या आधी शहर प्रचारक होते अप्पा (दत्तात्रय गर्गे). कौंतेय शहर प्रचारक म्हणूनच आला, पण अर्ध्याच शहराचा. आमचा भाग त्याच्या कार्यक्षेत्रात नव्हता. तरी शहराच्या एकत्रीकरणात आमच्या भेटी होत होत्या. तेव्हा माझं वय १८-१९ असेल तर कौंतेय फार तर २२-२३. इतकं वयातील अंतर कमी असल्याने आमची मैत्री छान झाली. कौंतेयचा आमच्यावर खरं सांगायचं तर खूप प्रभाव पडला होता. कारण त्याने सांगितलेलंच - गाणी, कविता, उतारे संपूर्ण पाठ. याशिवाय अजून भारी म्हणजे तो स्वतः कविता करायचा आणि त्या छंदबद्ध, तालात म्हणायचा.

तो प्रचारक निघताना मनाची होत नसलेली तयारी आणि आश्वासक हात पाठीवर पडल्यावर झालेली तयारी -
घेतली भरारी तरीही
बळ येई ना पंखात
संशयो मनीचा घडवी
हृदयात एक आकांत
या कवितेतून अप्रतीम सांगितली होती.

अशीच एक कविता म्हणजे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंहांना पाठवलेले पत्र - मिर्झास
मग सडा गुलामीत वा मुक्तिस्तव गर्जा।
आवाहन अथवा समज इशारा मिर्झा।।
आलमगीर चर्येवर चिंतेचे घन सावट पडले
शिवरौद्र तांडवामध्ये रथी अन् महारथी सापडले...

याच कवितेत एका कडव्यात, महाराज स्पष्ट सांगताहेत
ती माय भवानी समर्थ तारायाला
हे राज्य श्रींचे पूर्णत्वी नेण्याला
तुज माझ्या वाचुन कार्य तिचे का अडते
पण खचित खुणावी आपुल्या कर्तव्याला

गीतेतील कर्मयोग आणि स्वधर्म (कर्तव्य) पालन किती सहज सोपं करून सांगितलं होतं याने. आणि हा माझ्यापेक्षा केवळ २-४ वर्षे मोठा असेल. सुंदर शद्ब, एक नाद आणि कौंतेयची कविता म्हणण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही सगळेच त्याच्या प्रभावात, खरं सांगायचं तर प्रेमात.

कौंतेयची कवितांची वही उतरवून घेतली होती. पण त्याची खरंतर गरज नव्हतीच. आत्ताही वरील ओळी लिहिताना वेगळ्या आठवाव्या लागल्याच नाहीत, एवढ्या त्या लक्षात राहिल्यात.

हे सगळं कालपासून आठवत होतं. आज जरा शब्दबद्ध केलं. असे प्रचारक संघाने आम्हाला दिले म्हणून आम्ही घडलो.

Thursday, February 13, 2020

पहिले उड्डाण

१७ जून २००६ रोजी आयुष्यातला पहिला विमान प्रवास केला होता. स्विस एअरने परवा त्याच रूटने येताना त्या विमान प्रवासाचे तेव्हा लिहिलेलं बाळबोध वर्णन आठवले. आता वाटते आपण किती बावळट होतो... ("आताही आहेस" असं जे लोक म्हणताहेत तेच बावळट :-) ) बावळट आणि बाळबोध असं वर्णन असलं तरी खूप innocent आहे हे नक्की...

नमस्कार,
पहिले उड्डाण. मजा आली.

आत्ता झुरिक विमानतळावर आहे. मकर रास आहे ना ठरलेले फ्लाईट कॅन्सल :-) . ९:४० ला पुढचे आहे. तुम्ही लोक म्हणताल, याने सुरूवातच काय रडून केली. सवय, दुसरे काय...

काल मुंबईत माया आणि अमोलला टाटा केला आणि (खरं सांगतो) थोडे घाबरतच आत गेलो. थोडे समोर गेलो की लगेच x-ray मशीन होते. अभिने सांगितले होते की हँड बॅग त्यात टाकायची नसते. पण टाकली. दोन्ही बॅग पॅक. आता काय करायचे असा विचार करत स्विसच्या काउंटरवर गेलो. मोठी बॅग धडपडत उचलून त्यच्यासमोर टाकली. २९.५ kg. जीव भांड्यात पडला. पण त्या माणसाचे लक्ष गेले छोट्या बॅगवर. तिचे वजन किती? ही बॅग न धडपडता काट्यावर टाकली. ७.५ kg. you have to check-in this bag, sir... डोक्यात पहिला प्रश्‍न, किती पैसे लागतील. लगेच विचारले. तं म्हंतो कसा, फुकट. दुसरा प्रश्‍न, जवळ काहीच कपडे नाहीत. काय करावे? विचारले. त्याने आश्‍वासन दिले आहे की अडचण येणार नाही. बघू काय होते ते.

मग इमिग्रेशन. फॉर्म भरला आणि मोठ्ठ्या माणसांसाठीच्या काउंटरवर जाऊ लागलो. तिथल्या माणसाने सामान्य माणसांच्या रांगेत लावले. लागलो. ते सोपस्कार झाले. मग गेट नं. ५ च्या जवळ जाऊन थांबलो. इथे पाट्या चांगल्या नाहीत म्हणून सांगितले होते. पण मस्त पाट्या होत्या. कोणाला विचारायला लागले नाही. ड्यूटी फ्री दुकाने (आणि किमती) बघितल्या. नंतर टाईम पास म्हणून दीक्षा बघायला सुरुवात केली. अस्वस्थ पिक्चर आहे. त्यानंतर मायाला फोन केला. घरी दोनदा लावण्याचा प्रयत्न केला. १७ रू झाले असताना एस्टीडी वाल्याने २५ मागितले. मग त्याच्याशी भांडण. तोवर १२:३० झाले. मग सेक्युरिटीच्या रांगेत लागलो. ते संपले २० मिनिटात. तोवर विमान लागले होते.

बोर्डिंग पास दाखवून विमानात गेलो... थोडी भिती आणि खूप कुतुहल. विंडोसीट नाही मिळाली. जरा अँडजस्ट व्हायला १० मि लागली. सीट बेल्ट लावून काढून बघणे, पांघरूण, उशी, हेडफोन, टीव्हीचा रिमोट सगळे खेळून झाले. मग घोषणा, उड्डाणाची. (आठवले “आवळा गं...” - वऱ्हाड) अंगदने फारच भीती घातली होती. हँडल पक्के पकडले. पाय रोवले. कधी बाहेर कधी आत बघत राहिलो. आणि विमान रिवर्स मध्ये सुरू झाले. ते धावपट्टीवर यायला १० मि आणखी गेली. तोवर मी रिलॅक्स झालो होतो. हळू हळू वेग पकडायला सुरुवात झाली. पुन्हा हात पाय टाईट :-) . पण कळायच्या आतच आम्ही फ्लाय झालो होतो.

मग बघितली ती मुंबापुरी. खुप दिवे. वळनदार रस्ते. त्यावरील धावणारे दिवे. मरीन ड्राईव्ह, वराळी सी फेस, समुद्र... भारत सोडून निघल्याची पहिली जाणीव. आत्ता पुन्हा डोळे भरले. ते डोळे भरून पहात राहिलो. तुम्हा सर्वाची आठवण काढत.

अंगद हृषी स्वानंद साठी: अरे एअर होस्टेस फार वयस्क होत्या. जवळपास सगळ्याच. . . बॅडलक ना?

आता बाकी नंतर. ८:४५ झालेत. बोर्डिंगला जातो.

बेल्जियमला पोहोचलो. या फ्लाईट मधली एअर होस्टेस तरूण आणि वेंधळी होती. आख्खा ट्रे पाडणार होती ती. हॉटेल चांगले मिळाले. छान सकाळ आहे.

मुंबई सोडल्यावर भोवताली, म्हणजे बाहेर अंधारच होता. काहीच दिसत नव्हते. मग बाहेर बघणे सोडून दिले. जेवणही आले होते. जेवण करून टीव्ही पहात बसलो. नंतर झोप लागली. साधारण ३ तास झोपलो होतो. जाग आली तेव्हा बाहेर लख्ख उजेड होता. सूर्य उगवला होता. स्थनिक वेळेनुसार ५ वाजले असावेत. हे काय अप्रुप म्हणून बघत राहिलो. खाली ढग दिसत होते. त्यावर सूर्याची किरणे पडून चमकत होते. नेहमी खालून वर चमकणारे ढग बघणारा मी वरून बघताना... नाही सांगता येत. एकदा फक्त कळसूबाईवरून पाहिले होते खाली ढग.

मग घोषणा झाली की आता विमान खाली उतरणार आहे. आणि लक्षात आले की कळसूबाईची तुलना नाही करता येणार. पहिला ढगांचा लेअर सोडून खाली आलो. आणि आणखी एक लेअर दिसला. त्यात मधे मधे बर्फाचे डोंगर दिसू लागले. फ्लाईटइन्फो मध्ये जाऊन नाव बघितले. आल्प्स. मग ढगांचे आणखी दोन लेअर झाल्यावर मधून मधून स्विस जमीन आणि झाडे दिसू लागली.

स्विस... नेहमी आपण पहातो पिक्चरमध्ये. तिथली वनराई, स्वच्छ रस्ते, भोवताली बर्फाचे डोंगर. वरून छान दिसत होते. जवळून पहाता नाही आले. विमान उतरायला ४० मिनिटे लागली. बाहेर आलो. एक गोरी युनिफॉर्ममधली दिसली. तिला बोर्डिंग पास दाखवला. तिने फ्लाईट नक्की कॅन्सल झाली असे सांगितले. ट्रान्सफर डेस्कवर जायला सांगितले. त्यासाठी आधी ई टर्मिनलवरून ए टर्मिनलला जायचे होते. अभि, अमोलने सांगितल्याप्रमाणे पाट्या व्यवस्थित होत्या. रेल्वेत उभा राहिलो. आपली लोकल असते तशीच. ट्राम सारखी म्हणता येईल. ए ला जाऊन ट्रान्सफर डेस्कवर गेलो. तिथे आर्धा तास रांगेत उभा राहिलो. मग नवीन बोर्डिंग पास मिळाला. सगळा एअरपोर्ट फिरून आलो.

त्यानंतर गाणारे व्हायोलीन ऐकत तुम्हाला पत्र लिहायला घेतले. खूपच छान वेळ गेला.

बोर्डिंगची वेळ झाल्यावर तिथे गेलो. एक बस आलेली होती. त्यातून विमानाजवळ गेलो. कसले भंगार विमान. छोटेसे. ३ बाय ३ सीट. त्यात मला मधली सीट मिळाली. भूक खूप लागलेली होती. स्विसमध्ये स्विसफ्रँक चालतात. त्यामुळे ट्रॅव्हलर चेक वठवले नाहीत. पाणीपण मिळाले नाही. आणि ही तरूण सुंदर बया खायला काही लवकर आणेना. आणले ते पण वेंधळेपणा करत. दोनतीन जणांना अभिषेक केला. अखेरीस खायला मिळाले. पाणीपण मिळाले.

११:१५ ला ब्रुसेल्सला उतरलो. बॅगेज कुठे आहे याचा पत्ता नाही. भिती वाटली. पण सापडले. त्याआधी पोलीसांना पासपोर्ट दाखवून बेल्जियम प्रवेश केला. त्या बॅगा घेऊन बाहेर पडायचा रस्ता शोधत राहिलो. सापडेच ना. पप्याची आठवण आली. मग कॉलिंग कार्ड घेतले. तर फोनच सापडला नाही. शेवटी बाहेर आलो. मर्सिडीज टॅक्सी... बसलो. त्या हीरोला हॉटेल काय मॅक्लीन पण कळाले नाही. त्याच्या एका मित्राने सांगितले. मग त्याने GPRS नकाशावरून मला मॅक्लीनला आणले. पण हॉटेल कुठे माहिती. माझे लक्ष मिटर कडे. त्याच्या लक्षात आले असावे. त्याने मिटर बंद करून हॉटेल शोधून दिले.

असा झाला प्रवास

Friday, February 7, 2020

प्रतिशोध पानिपतचा

कौस्तुभ कस्तुरेचं पुस्तक येणार ही बातमी कळाली - पुस्तकाचा विषय आणि नाव प्रतिशोध पानिपतचा. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा मी बेल्जियममध्ये होतो. मित्रांकडून पुस्तक मागवण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. मग भारतात पोहोचण्याआधी पुस्तक घरी पोहोचेल अशी व्यवस्था केली आणि आल्या आल्या हातात घेऊन पूर्ण केलं.

याआधी हा कालखंड स्वामी या कादंबरीत वाचलाय. पण स्वामी केवळ माधवरावांच्या पुण्यातील/थेऊर मधील वास्तव्याभोवती फिरते. त्याच काळात दिल्लीवर फडकलेला भगवा, नजीबाचा मृत्यू, त्याच्या मुलाची केलेली लांडगेतोड आणि नजीबाची फोडलेली कबर हा भाग त्यात येतच नाही. बाकी पाठ्यपुस्तकात हे कधीच येणार नाही. इंग्रजांनी भारत मोगलांकडून ताब्यात घेतला असं शिकवायचं असल्याने मोगल मराठ्यांच्या ताब्यात होते हे कसं शिकवता येईल. पण कौस्तुभने हा सगळा कालखंड पानिपतचा मराठ्यांनी कसा प्रतिशोध घेतला या परिप्रेक्षात मांडला आहे.

नारबा ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा यात आहे. हा नारबा एक सामान्य मराठी माणूस आहे. याचा भाऊ आणि वडील पानिपतात कामी येतात. हा फडावर काम सुरू करतो आणि अखेरीस उत्तरहिंदच्या स्वारीवर युद्ध जिंकून येतो. असे अनेक नारबा माधवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आणि उत्तरहिंद पुन्हा ताब्यात घेतला. हा नारबा त्या सगळ्यांचं प्रतीक आहे.

आपण कायम एक म्हण ऐकत आलो आहोत - मराठी माणसाचा विश्वास पानिपतात गेला. पण ही वस्तुस्थिती नाहीये. मराठी माणसाचा विश्वास गेला नाही. तो कायम राहिला आणि एकामागोमाग एक उत्तरेतील राज्ये मराठ्यांच्या ताब्यात आली. तीही केवळ १० वर्षात.

हे सर्व घडले ते महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांच्या हातांनी आणि त्यामागे खंबीर नेतृत्व होते माधवरावांचे. माधवरावांना रमाबाईंची साथ होती आणि नाना फडणवीसांचे आणि रामशास्त्र्यांचे सल्ले होते. अर्थातच पाय खेचणारे लोकही होतेच. राघोबासारखा घरभेदीही होता. सदाशिवरावांचा तोतया हेही एक प्रकरण होते. पण या सर्व लोकांना साम-दाम-दंड-भेदाने माधवरावांनी सरळ केलं.

हा सगळा तपशील या पुस्तकात आहे. तोही अतिशय सहज भाषेत. अस्सल ऐतिहासिक पुरावे वापरून अत्यंत सुंदर, रसाळ कादंबरी कौस्तुभने लीलया तयार केलीये.

मला खटकलेल्या काही गोष्टी आहेत. विशेषतः, रमाबाईंनी सती जावं ही इच्छा माधवराव जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्याचं कारण रमाबाईंना राघोबा वापरून राजकारण करतील हे सांगितलं आहे. वास्तविक विश्वासरावांच्या पत्नीमार्फत सुद्धा राघोबांना ते करता आलं असतं, पण ते झालं नाही. त्यामुळे हा तर्क योग्य वाटत नाही. पण याकडे कानाडोळा करून हा कालखंड सर्वांनी अनुभवावा असाच आहे.

या पुस्तकातील काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. ते दुःखाचे अश्रू नाहीत तर ते आहेत आनंदाचे, प्रतिशोधाच्या कल्पनेचे आणि प्रतिशोधाच्या पूर्णत्वाचे. त्यातील तीन विशेष उल्लेखनीय
- नारबा दिल्लीस्वारीला जाताना आईला पत्र लिहितो, ते पत्र आणि पुढचा काही भाग
- दिल्लीवर भगवा फडकतो
- नजीबाच्या थडग्याला महादजी फोडतात

कौस्तुभ, या कादंबरीसाठी खूप धन्यवाद. तुझ्याकडून अजूनही खूप काम होवो या शुभेच्छा!