Thursday, March 12, 2020

देवराई

लेखक डॉ उमेश मुंडल्ये (DrUmesh Mundlye)
प्रकाशक हिंदुस्थान प्रकाशन संस्था
मूल्य ₹१७५

डॉ उमेश मुंडल्येंचा परिचय फेसबुकवरचा. त्यांची कामं, त्यातून होणारं जल, मृद संवर्धन, त्यांच्या कामामुळे सुखावणारे अनेक लोक, गावं हे वाचनात येत होतंच. त्यांच्या अभ्यासाचा, डॉक्टरीचा, मूळ विषय देवराई. त्यावर त्यांचं पुस्तक येत आहे कळाल्यावर लगेच बुक केलं, पण हाती पडायला बरेच महिने गेले.

उमेशजींचा मूळ अभ्यासाचा विषय देवराई असल्याने, त्यांनी या पुस्तकात देवराई आणि त्यांची ओळख कशी झाली इथपासून ते देवराई कशी असते, तिचे संवर्धन धार्मिक आधारावर लोक कसे करतात, देवराईतील जैववैविध्य, काही प्रजाती केवळ देवराईतच का सापडतात, देवरायांपुढील समस्या आणि आव्हाने तसेच ही आव्हाने आपण परतवून कसे लावू शकतो या सर्वांबाबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे विषय अभ्यासाचा असला तरी अजिबात कंटाळवाणा न होता सहजपणे समजावून सांगितला आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती देवराईच्या अभ्यास कसा सुरु झाला इथपासून. जेव्हा हा अभ्यास सुरु झाला तेव्हा महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या देवरायांची संख्या होती साधारण ४५०. पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा केवळ सावंतवाडी या एका तालुक्यात ४०० पेक्षा अधिक देवराया आहेत हे कळालं. त्यानंतर उमेशजींनी १६०० पेक्षा अधिक देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि ३७६८ देवरायांची नोंद त्यांच्या PhDच्या अभ्यासात आहे.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ही संकल्पना भारतभर सगळीकडे आहेच, शिवाय भारताबाहेरही अनेक देवराया आहेत. संकल्पना तीच - हे वन देवाचं आहे. इथून कोणताही आर्थिक लाभ मिळवायचा नाही. इतकंच काय कित्येक ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायलाही बंदी आहे. या देवराया केवळ आदिवासी भागात आहेत असं नाही. आदिवासी भागात, खेड्यात, गावाच्या अगदी जवळ ते गावापासून दूर अंतरावर अशा सगळीकडे देवराया आजही उभ्या आहेत आणि आपल्या या परंपरेची साक्ष देत आहेत. या देवरायांमुळे अनेक गोष्टी साधल्या जातात - पर्यावरण समतोल, जैवविविधतेचे संरक्षण, गावाचं मिळून एक सांस्कृतिक केंद्र, औषधी आणि पर्यटनातून होणारा आर्थिक विकास. पण यासाठी देवराया वाचल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत.

या देवराईत विविध दैवतं असतात. ती कोपिष्टही असतात. त्या श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या भीतीने सुद्धा देवराया सुरक्षित राहतात. या देवरायांचे वय मोजण्याच्याही अनेक पद्धती असतात. नगर जिल्ह्यातील एका देवराईत दर ३० वर्षांनी एक वाघ्या देवाचा दगड बसवतात. तिथे असे १७ दगड दिसून आले, म्हणजे ती देवराई सुमारे ५०० वर्षे जुनी असावी. एका देवराईत एक प्राचीन मंदिर आहे, एका साधूने बनवून घेतलेलं. ते ४०० वर्षे जुनं आहे, म्हणजे देवराई त्याहून जुनी असणार. इतकं हे जुनं वैभव आपल्याकडे आहे. त्याची पुसटशीही ओळख आपल्यापैकी अनेकांना नसते. या पुस्तकातून ही ओळख करून दिली आहे.

देवराई जर गावाजवळील डोंगरावर किंवा उंच भागात असेल तर गावाच्या पाण्याचा प्रश्न ती सोडवते. दापोलीतील कुडावळे गावातील देवराईतून वर्षभर गावाला पाणीपुरवठा होतो. त्या पाण्याला जर नळाने बंद केलं तर पाईप/नळ फुटतात इतका त्या पाण्याला प्रवाह असतो. देवराईच्या अशा पाण्यावर आजूबाजूच्या गावात बागाईत फुलली आहे. यामुळेही लोक देवराई जपतात.

देवराईतील जैववैविध्य प्रचंड असते. अगदी छोट्या देवराईत शंभर सव्वाशे प्रकारची झाडे दिसून येतात. एका देवराईतील आंब्याच्या झाडाची पहिली फांदी चाळीस फुटांवर आहे. ते झाड आंब्याचं आहे हे लवकर ओळखूही येत नाही. देवराईतील जुने वेल इतके मोठे असतात की वेलीच्या खोडाचा व्यास एक मीटर एवढा असू शकतो. शिवाय अनेक पक्षी, दुर्मिळ होत चाललेले प्राणी (साळींदर, खवले मांजर) यात सुरक्षित वास करतात.

हे पुस्तक वाचताना वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या मराठवाड्यात एकही देवराई नाही... :-( मराठवाड्याशिवाय दुष्काळी जिल्हे सोलापूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर - यातही एकाही देवराईची नोंद नाही. पाऊस कमी असल्याने देवराई नाही की देवराई नाही म्हणून पाऊस नाही... काहीही असले तरी देवराई ही असलीच पाहिजे हे नक्की.

या सगळ्या आणि याहूनही खूप जास्त गोष्टी हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतात.

आम्ही आमच्या शेतात (जिल्हा औरंगाबाद) मियावाकी घनवन पद्धतीने देवराई तयार करत आहोत. एकूण अर्धा एकर करायचा विचार आहे. आतापर्यंत एक गुंठ्याचे दोन टप्पे लावून झाले आहेत. यात १५० स्थानिक प्रजातींची ६३० पेक्षा अधिक रोपे लावलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील झाडं आता जास्तीत जास्त २० फूट तर सरासरी ८ फूट आहेत. यात आता मुंगूस येऊन राहू लागले आहेत, अनेक पक्षी येत आहेत, घोरपडी येत आहेत. उन्हाळ्यात हरणांचे कळप सहजच वस्तीला येतात. आमच्या भागातून १० वर्षांपूर्वी गायब झालेले मोर अधून मधून इथे हजेरी लावून जातात. हे सगळं केवळ दीड वर्षांच्या जंगलात होतंय. सोबत लागवडीच्या आधीचा आणि नंतरचा गुगल मॅप वरील फोटोही आहे.







आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, देवराई समजावून घ्यावी आणि झाडं लावावीत, जगवावीत.

या परिचयावर प्रत्यक्ष लेखकाने प्रतिक्रिया दिली होती - 
पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Dnyaneshजी.
देवराई ही एक समृद्ध परंपरा आहे. यामधे माणसाचा हस्तक्षेप नसतो किंवा नसेल याची काळजी घेऊन ठेवली गेली आहे. चांगल्या जंगलात जसे जमिनीवर असणाऱ्या गवतापासून लहान झुडूपं, मोठी झुडुपं, लहान वृक्ष, मध्यम वृक्ष, मोठे वृक्ष आणि या सर्वांवर असलेल्या विविध आकाराच्या वेली यांचं उत्तम सहजीवन असतं, त्याची लहान प्रतिकृती म्हणजे देवराई असते. नवीन देवराई तयार करणं हे एका पिढीचं काम नाही. सुरूवात आपण करावी आणि दोन पिढ्यांनी ते हस्तक्षेप न करता जपावं तेव्हा देवराई काही आकाराला येईल.
मियावाकी आणि देवराई यात मात्र काहीच साम्य नाही. मुंबईच्या संदर्भात उपमा द्यायची तर मियावाकी म्हणजे सकाळच्या गर्दीच्या वेळातील मुंबईकडे जाणारी आणि डोंबिवलीला आलेली जलद लोकल आहे. प्रचंड संख्येने लावलेली झाडं म्हणजे देवराई नाही. झाडं लावताना आपण आपला हेतू साध्य करण्यासाठीच लावतो बरेचदा. त्याचे इतर परिणाम लक्षात घेत नाही आणि नंतर ते परिणाम निस्तरण्यासाठी परिश्रम करावे लागतात पुढच्या पिढ्यांना. हरितक्रांती हे एक उत्तम उदाहरण आहे याचं.
देवराई ही लोकसहभागातून चालवली जाणारी जैवविविधता, पाणी, मृदा यांचं संरक्षण आणि संवर्धन करणारी परंपरा आहे. यात माणसाचा सहभाग फक्त जपण्यासाठी आहे. मियावाकीचं तसं नाहीये. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त झाडं ही केवळ गर्दी झाली. त्यासाठी येणारा खर्च याबद्दल मी बोलत नाही. तो स्वतंत्र विषय होईल.
त्यामुळे कृपया मियावाकी म्हणजे देवराईचं एक वेगळं रूप असलेयासारखं आहे असा गैरसमज ठेवू नका ही विनंती.

या प्रतिक्रियेला मी दिलेले उत्तर -
उमेशजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला देवराई विषयातील अभ्यास आहे. मी कोणत्याही प्रकारे प्रतिवाद करत नाहीये, कारण माझा अभ्यास अथवा अनुभव तुमच्यासारखा अजिबातच नाहीये. मी देवराईची तुलना मियावाकी घनवनाशी करत नाहीये. माझ्या पोस्टमधील वाक्यांमधून तसा अर्थ निघत असेल तर ती माझी चूक आहे.
मला देवराई म्हणजे काय हे कळलंय ते खालीलप्रमाणे -
१. देवराई हे मिश्रवन असलं पाहिजे
२. त्यात माणसांचा वावर शून्य ते मर्यादित असावा
३. ते परंपरेने आणि समाजाने जपलेलं जंगल असावं
४. हे संवर्धन, संगोपन श्रद्धेने केलेलं असावं
दुर्दैवाने आमचं शेत जिथे आहे त्याच्या आजूबाजूला कुठेही अशी देवराई नाहीये. संपूर्ण गावाला सोबत घेऊन गायरानावर वा कोणत्या सामायिक जमिनीवर देवराई तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि संयम आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आमच्याच शेतात (एकूण साडेतीन एकर) मध्ये साधारण अर्धा एकर आपणच देवराई करावी असा विचार केला. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा विचार करता सर्वात आधी मियावाकी पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यावर आतापर्यंत दोन गुंठे लागवड केली आहे. पहिला टप्पा साधारण दीड वर्षांपूर्वी केला, दुसरा टप्पा मागील महिन्यात केला
मागे उपेंद्र दादांशी यावर बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलेला देवराईचा किंवा निसर्गबेटाचा आराखडा बघितला. त्यात उणीव काहीच नाहीये, पण एक अडचण आहे - ती म्हणजे त्यात मानवी वावर शून्य होणार नाही. त्यामुळे घनवन करणे सुरु ठेवले. आजच्या घडीला यात आतमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मानवी वावर हा शून्य होईल आणि आज नाही पण कदाचित शंभर वर्षांनी ही जागा जंगल म्हणून असेल.
आम्ही हे तयार करताना मिश्रवन असावे याचे भान ठेवतोय - १५० प्रजातींमध्ये झुडूप, छोटे वृक्ष, स्थानिक बांबू/वेत, मोठे वृक्ष, वड/पिंपळ/नांद्रुक सारखे पसरट वृक्ष लावत आहोत. बाकी परोपजीवी (आर्किड सारखी) यात आणण्याचं काम इथे येणारे प्राणी/पक्षी करतील अशी आमची अपेक्षा आहे. श्रद्धा तर आमची यावर आहेच. हा सामाजिक उपक्रम मात्र होत नाहीये.
असलेल्या जंगलाच्या जागी, असलेल्या देवराईला पर्याय म्हणून अथवा आहेत ती वृक्षराजी तोडून मियावकीने जंगल लावणे अयोग्य आहे. किंवा हजारो वर्षांच्या जंगलाची तुलना मियावाकीशी होऊच शकत नाही. पण जिथे झाडं, जंगल, देवराई नाही अशा ठिकाणी वन उभारणी आम्ही करत आहोत. हे वन लगेच देवराई होणार नाही. कदाचित १०० वर्षांनी तिला देवराई म्हणता येईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठीची ही पहिली पायरी असू शकेल.
काही चुकीचं बोललो असल्यास क्षमस्व...
🙏🏼🙏🏼

या उत्तरावर उमेशजींनी दिलेले उत्तर आणि सल्ला - 
चूक किंवा बरोबर असं नाही. देवराई मधे नैसर्गिक जंगल असतं. प्रत्येक जीव त्याची जागा घेत असतो. आपण मियावाकीच नव्हे तर इतर कोणत्याही पद्धतीने संवर्धन करताना हे विसरतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे (खरंतर आवडीप्रमाणे) प्रजातींची निवड करतो. स्थानिक प्रजाती असतील तर हेही ठीक. पण दोन वृक्षांमधील अंतर किती असावं आणि ते तेव्हढेच का असावं, त्यामुळे नैसर्गिक वाढीवर काही परिणाम होणार का, अशा गच्च लावलेल्या (नैसर्गिकरित्या झालेल्या नव्हे) वनस्पतींमुळे त्यातल्याच काही प्रजातींवर काय परिणाम होणार, इतर जैवविविधतेबद्दल आपण काही विचार करतोय का, जर हे मानवी वस्तीजवळ असेल तर एवढ्या गर्दीने लावलेल्या जंगलामुळे सुरक्षिततेचे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय, असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
एक करता येईल तुम्हाला. जर तुम्ही आधीच झाडं लावली असतील तर जी झाडं स्पर्धेत नाहीशी होतील त्याजागी लगेच नवीन लावू नका. म्हणजे नैसर्गिक जंगल तयार व्हायला मदत होईल.

Friday, March 6, 2020

समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन

पुस्तक परिचय -  समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
लेखक - कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक - मोरया प्रकाशन
मूल्य ₹१७०

मागील १ महिन्यात कौस्तुभ कस्तुरेंची ३ पुस्तके वाचली. "प्रतिशोध पानिपतचा"चा परिचय या आधी दिला होता. सदाशिवराव भाऊंवरील "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ" हे दुसरं (याचा परिचय नंतर देईन) आणि समर्थांवरील "समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन" हे तिसरं. अजून एक "पुरंदरे" आता वाचायला घेईन...

कौस्तुभ कस्तुरेंचं वैशिष्ट्य हे की, रामदासांनी सांगितलेलं - अभ्यासोनि प्रकटावे - हे ब्रीद ते कसोशीने पाळतात. कुठेही अतिरंजितपणा नाही. इतिहास म्हणजे इति + ह् + आस म्हणजेच - हे असे घडले. जे घडले तेच इतिहासातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच काय घडले यासाठी समकालीन कागदपत्रे हाच सर्वोत्तम पुरावा आहे. समकालीन कागदपत्रांमधून बखरी या हद्दपार होतात कारण यात अतिरंजितपणा आणि ज्याने बखर लिहून घेतली त्याचा अति उदोउदो असतो. त्यामुळे पत्रे,  सनदा आणि समकालीन व्यक्तींनी लिहिलेली चरित्रे यावरच ते अवलंबून असतात आणि विश्वास ठेवतात.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर्थ आणि महाराजांची भेट ही स्वराज्य स्थापनेच्या आधी झाली नसून ती बरीच उशिरा झाली हे सांगितलंय. महाराजांचे स्वराज्य हे जिजाऊंच्या प्रेरणेचे आणि महाराजांच्या कष्टानेच उभे राहिले आहे हे स्पष्ट केलंय. पण जेव्हा भेट झाली तेव्हापासून महाराजांचा आणि समर्थांचा स्नेह किती बळकट होता तेही सप्रमाण सिद्ध केलंय.

या पुस्तकासाठी कौस्तुभ कस्तुरे यांनी समर्थ संप्रदायातील कागदपत्रे, भीमस्वामी, गिरीधर स्वामी, दिनकर गोसावी यांनी लिहिलेली समर्थ चरित्रे अभ्यासली. शिवाय रघुनाथ पंडितांनी लिहिलेलं समर्थांचं वर्णनसुद्धा अभ्यासलं. हे सर्व समकालीन आहे. याशिवाय भीमाजी बुवांनी लिहिलेलं समर्थ चरित्रही घेतलंय, जे उत्तरकालीन आहे. या सर्वांवर लिहीत असताना एक बाब कौस्तुभ वारंवार सांगतात ती म्हणजे चमत्कार खरे नाहीत. त्यांना इतिहासात काहीही स्थान नाही. पण ही सर्व चरित्रे आपल्याला थोडक्यात यातून सहज कळतात.

या चरित्र आणि वर्णनाशिवाय समर्थांनी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म यावर जो उपदेश केला होता त्याबद्दलही लिहिले आहे.

या पुस्तकात अनेक चित्रेही आहेत. विशेषतः महाराजांचा आणि समर्थांचा संबंध दाखवणारी चाफळची सनद - तिचाही फोटो आहे. या सनदेवरून संकेत कुलकर्णी (लंडन) आणि कौस्तुभ यांनी शोधून, अभ्यासून हा संबंध "पुराव्यानिशी शाबीत" केला आहे!

Wednesday, March 4, 2020

दोन मी

थ्री इडियट्स मधलं "बहती हवा सा था वो" गाणं आठवतंय?
हम को तो राहें थी चलती
वो खुद अपनी राह बनता,
गिरता संभालता
मस्ती में चलता था वो
हमको कल की फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो
स्वानंद किरकिरेने सहज शब्दात तो आणि मी याबद्दल सांगितलंय. वास्तविक हे गाणं त्या चित्रपटात "दोन मीं"चं नाहीये. पण एकूणच असे "दोन मी" आपल्यात असतात. कधी ते दुसऱ्यात दिसतात तर कधी आपल्यातच.

ही "दोन मी"ची संकल्पना असलेल्या मराठीतल्या सुंदर कविता आहेत. पहिल्यांदा माझ्या पिढीतील संदीपची कविता -
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मला खूपदा माझा मित्र, संदीप सरदेसाई, हा दुसऱ्या मी सारखा वाटायचा. म्हणून एकदा त्याला ही कविता ऐकवली. त्यावर त्याचं म्हणणं असं की, हा कट्ट्यावर बसलेला अगदी तुझ्यासारखा आहे आणि हजार चिंतांनी डोके खाजवणारा माझ्यासारखा :-). आता हे grass is always greener at other side सारखं असू शकतं. पण खरंच हे दोन्ही मी आपल्यातच असतात. त्यातील कुणाला आपण जास्त वाव देतो, ते आपल्या हातात असतं.

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

कुसुमाग्रजांनी तर हा दुसरा मी भेटायला आलेला दाखवला. त्याच्याशी गप्पा, भांडण, जुन्या आठवणी असं सगळं बोलून झालं. मग तो गेला... पण जो गेला तो कोण "मूळचा मी" की "भेटायला आलेला मी" यावर प्रश्नचिन्ह टाकून ठेवलं. वास्तविक दोघेही पुन्हा आपल्यातच आहेत, या दोघांचा संवाद व्हावा आणि त्यातून त्या-त्या वेळी आवश्यक तो "मी" समोर असावा...

बसलो असता निवांत रात्री
टक टक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी एक व्यक्ती

बारीकतेने बघता कळले
हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती
घाबरलो मी,चाचरलो मी
पुसले तयाला ,कोण कशाला

स्मित संभावित करुनी म्हणे तो,
पिशाच्च मी तव
गत काळाच्या थडग्या मधला
निवास कोंदट असह्य झाला
म्हणुनी आलो

पिशाच्च पण ते माझे होते
आपुलकीने स्वागत केले
गप्पा झाल्या,दूर पणाचे अंतर सरले
आठवणींचे पर्व साधता काळीज कढले

वाद बखेडे कधी पेटता,क्रुद्ध शार्दुलासम गुरगुरलो
प्रेम,द्वेष ,हास्यात रंगता स्वरही चढले

अखेर होता पहाट,गेला एक आमुच्यातला निघुनी

गेला कोण अन कोण राहिला
हे मज जन्म भराचे कोडे पडले...!

आरती प्रभू यांची "दोन मी" कविता. यातील दुसरा मी हा अग्निज्वाळेसारखा नग्न आहे कारण त्याचेच कपडे विकून मी माझा चरितार्थ चालवतोय... स्वत्व विकून त्यावर गुजराण करणारे अनेक "मी" यात दिसत राहतात...
दोन मी
तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.
वाकल्याला अन् मला पाहुनीयां मोडतो,
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखितो.
अग्निजाळेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन् अजुन आहे ती खरी.
कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी,
विकित बसलो येथ हाटीं, आणि खातो भाकरी.
तो उपाशी तरिहि पोटीं लाज माझी राखतो,
राख होतांनाहि ओठीं गीतगाणी ठेवितो.
मैफ़लीला तो नि मी दोघेही जातो धावुनी;
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी.
तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो.

आरतीप्रभूंची आणखी एक याच विषयावरची कविता आहे -
कधी तो कधी मी 
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझिया चोरट्या पावुली
कधी त्याच्या पायीं उमाटे माझा ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यातून दोघेही जगतो
दारीं तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काळजाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरून
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यांतले राखितो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

इंदिरा संतांची "कात" ही अजून एक. चैतन्य दीक्षितच्या निरुपणासह -
आपल्या प्रत्येकात स्वतःचीच दोन रूपं असतात. कधी हे द्वंद्व अगदी असून नसल्यासारखे कोपऱ्यात बसलेले असते तर कधी ते अगदी प्रखरपणे पुढे येते. त्या दोन रूपांतला खरा मी कोण? याचा थांग लागणे स्वतःलाच अशक्य होऊन जाते. त्रयस्थ नजरेने पाहता, हा म्हणजे आपल्याच दोन्ही रूपांत जणू अटीतटीचा सामना असल्यासारखा! आपलं एक रूप सोशिक, इतरांना कमीत कमी दुखावणारं (त्यासाठीच सोशिक, स्वतः कष्ट सहन करणारं) तर दुसरं रूप स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणारं आणि म्हणूनच कणभरही अन्याय्य गोष्ट सहन न करणारं. या दोन रूपांतला हा सामना मात्र आपल्याला एका नव्याच 'मी' कडे नेत असतो. हीच आपली वाढ!
सोशिकपणा जात्याच काकणभर अधिक असलेल्या स्त्रियांच्याबाबतीत हे द्वंद्व कसे असेल? याचं चित्र इंदिराबाई 'कात' या कवितेत उभं करतात.
कात
येथे मी स्तब्ध अशी
स्तब्ध तशी तेथे मी ।
स्वच्छ उभी काच मधें
दाखविते मजला 'मी' !
नजरेला नजर तिच्या
भिडवाया मी न धजे
कंपित निःश्वास तिचा
काचेवर गूढ़ थिजे ।
विलगावे ओठ ज़रा
बोलावे काही तर
गिळलेल्या शब्दांची
लिपी तिच्या ओठांवर ।
स्वतःचं सोशिक रूप इतकं आंगवळणी पडलेलं असतं की त्यातून आपल्याला कुणी बाहेर काढू पाहत असेल तर तीच व्यक्ती आपल्याला दुष्ट वाटू लागते. आपल्याला त्या कोशातून बाहेर यायचंच नसतं.
"दुष्ट, अशी मजपुढती
मुळिच उभी राहु नको;
निजलेली मी कधीच:
जाग मला आणु नको.
स्वप्नांच्या भस्माचा
थर अगदी ढळवु नको."
"काय असे वेडेपण?
मी न दुजी, तूहि मीच."
----पण समोर धुकट धूर
आणि चूर चूर काच ।
स्तब्ध अशी येथे मी
नाही कुणि पण समोर
सोलिव ही कात इथे
नागिण अदृश्य दूर...

शिवाय पाडगांवकरांची "जिप्सी" काही अंशी मला अशीच "दोन मीं"ची कविता वाटते.

या दोन्ही "मीं"चा वाद-संवाद होत राहिला पाहिजे. तुकोबा म्हणतात तसा
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणासी...
आणि अखेरीस आपल्यातला रसिक, सृजनशील, तरल मी हा सहज आपल्याला गवसला पाहिजे...