Friday, July 23, 2021

माझा प्रवास माझा वेग

सकाळी हिंजवडीला जायला तुम्ही निघता. गर्दीतून कशीबशी वाट काढत तुम्ही डोंगराच्या बाजूच्या पार्किंग मध्ये बाईक स्टॅण्डवर लावता. सगळे जसे निघालेत तसेच पायऱ्या किंवा लिफ्ट घेऊन खाली उतरता. काही पावलं चालल्यावर बदामाच्या गर्द सावलीत अचानक केकावली ऐकू येते. तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची रेष चमकते...

परत घरी जायची वेळ येते. दिवसभर भरपूर पाऊस झालेला असतो. त्यामुळे आणि एकूणच हिंजवडीच्या अत्यंत शिस्तबद्ध वाहतुकीमुळे संथपणे बस, कार्स आणि बाईक्स रस्त्यावरून वाहत वाहत जात असतात. कसेबसे विप्रो सर्कल पार होते. थोडीफार भुरभुर सुरु असते, भवताल वैतागलेला असतो. पण तुम्ही रस्त्याच्या डावीकडून मुद्दाम जाता, कारण तिथून खळाळत वाहणारं पाणी दिसत असतं...

बरीच जुनी गोष्ट आहे. असेच पावसाळी दिवस असतात. माझ्यापेक्षा दोन-चार लेव्हल वर असलेला एक मॅनेजर असतो. त्याची केबिन दूरपर्यंत आकाश दिसेल अशी असते. त्याला इंद्रधनुष्य दिसतं. त्याचा सगळ्यांना मेल येतो. अरे १० मिनिट काम सोडा आणि खिडकीतून बाहेर बघा. सुंदर इंद्रधनुष्य दिसतंय...

भराभर कुठेतरी जायचं / यायचं असतं. मध्येच एक रानजाई फुलून आलेली असते. आधी दिसत नाही, केवळ वास येतो. मग तुम्ही वासाच्या दिशेने वळून बघता. तो वास तुम्हाला दोन क्षण तरी गुंगवून ठेवतो आणि मगच तुम्ही पुढे निघता...

प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेग असतो. त्या वेगाशी जुळवून घेणारे ज्याचे त्याचे रिफ्लेक्सेस असतात. जसं काही लोक वेगात गाडी चालवताना आजूबाजूला काय सुरु आहे हे अगदी डिटेलवार बघू शकतात तसंच... पण हे रिफ्लेक्सेस ज्याचे त्याचे वेगळे असतात. त्यानुसार ज्याची त्याची गती असावी. दुसरा किती वेगात आणि कसा पळतोय त्यानुसार आपली गती कमी जास्त होऊ नये. आपल्याला या प्रवासात जे बघायचं आहे, अनुभवायचं आहे ते न सुटू देता जी गती शक्य असेल ती असावी/वाढवावी. मात्र गती वाढताना, हे अनुभव सोडून द्यावे लागत असतील तर पुन्हा विचार करावा.

आपल्याला जिवंत ठेवणारे अनुभव कोणते, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. ते आपलं आपल्याला कळतंच. तो जिवंतपणा जर कधी कमी होतोय हे दिसलं तर एक पॉज घेऊन, पुन्हा विचार करावा... नेमकं काय आणि का सुटतंय... कधीतरी अपरिहार्य असू शकतं, त्याची नोंद घ्यावी. पुढे कोणत्या टप्प्यावर दुरुस्ती शक्य आहे ते ठरवावं आणि मग पुन्हा प्रवास... तो तर सुरु राहणारच...