Thursday, April 19, 2018

पुस्तक परिचय - फिडेल, चे आणि क्रांती

फिडेल, चे आणि क्रांती हे अरुण साधू यांचे पुस्तक वाचतोय. अत्यंत सहज त्यांनी क्युबाच्या क्रांतीची गोष्ट सांगितली आहे. बलाढ्य अमेरिकेशी आणि भ्रष्टाचारी स्थानिक सरकारशी असलेला संघर्ष आणि त्याची पार्श्वभूमी या पुस्तकात आहे. अमेरिकेने क्युबा आपल्या अंकित असावा म्हणून प्रचंड प्रयत्न केले. पण अखेरीस फिडेल, चे आणि त्यांच्या साथीदारांनी अमेरिकेला पराभूत केलेच. एवढेच नाही तर स्वतःच्या देशातील मातीशी इमान राखणारी (रशिया किंवा चीनच्या अधिपत्याखाली नसलेली) साम्यवादी रचना निर्माण केली. त्याने प्रस्थापित पोथीनिष्ठ साम्यवादाला आव्हान दिले आणि नवीन साम्यवादी रचना निर्माण केली. सर्वात चांगली बाब म्हणजे ती यशस्वी करून दाखवली. क्युबात श्रीमंती मॉल आणि मल्टिप्लेक्स नसतीलही पण आरोग्य, शिक्षण, प्रशासन या गोष्टी खूप चांगल्या आहेत.

अमेरिकेशी असलेले हे वैर गेल्या काही दिवसात संपले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी मार्च 2016 मध्ये क्युबाला भेट दिली. क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये फिडेल कॅस्ट्रो वारले आणि त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो क्युबाचा अध्यक्ष झाला. क्युबाची दारे आता भांडवलशाही साठी थोडी किलकिली झाली आहेत. पुढे काय होईल ते कळेलच.

पुस्तकाविषयी:
२६ जुलै ही दिनांक आपल्यासाठी मुंबईमध्ये झालेली ढगफुटी याच्याशी निगडीत आहे. पण सुदूर, दक्षिण अमेरिकेत, २६ जुलै एक प्रचंड शक्ती आहे. जी शक्ती सामान्य भारतीयांना १९४२ या अंकातून मिळते त्याहून अधिक शक्ती २६ जुलै मधून क्यूबन लोकांना मिळते.

२६ जुलै १९५३… या दिवशी फिडेल कॅस्ट्रो या ध्येयवेड्या तरुणाने बाटिस्टा या क्युबाच्या अत्यंत भ्रष्टाचारी अध्यक्षाविरोधात सशस्त्र क्रांतीची पहिली लढाई लढली होती. क्युबाच्या अध्यक्षांच्या सैन्यापुढे काही शे तरुणांचा सहज पराभव झाला. पण सुदैवाने फिडेल त्यातून वाचला. त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि "इन्कलांब झिंदाबाद", "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा" च्या सारखे वाक्य त्या खटल्यातून फिडेलने म्हटले, "मला दोषी ठरवून ठार करा. त्याने काहीही बिघडणार नाही. इतिहास मला दोषमुक्त करील!" यातूनच History will absolve me किंवा इतिहास मला दोषमुक्त करील या ऐतिहासिक पुस्तिकेचा जन्म झाला!

१९५५ मध्ये पुन्हा अध्यक्षीय (खोट्या) निवडणुकीत बाटिस्टा पुन्हा जिंकला आणि त्याने मोठी चूक केली. लोकांच्या आणि संसदेच्या मागणीसमोर त्याने मान तुकवली आणि फिडेल तुरुंगातून सुटला. त्याने एक निःशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश येण्याची १००% खात्री झाल्यावर तो आणि त्याचे अनुयायी मेक्सिकोत गेले. तिथे २६ जुलै या संघटनेची व्याप्ती वाढवली आणि सशस्त्र क्रांतीची ज्योत पुन्हा पेटवली.

अर्नेस्ट गव्हेरा हा अर्जेन्टिनामधील एक तरूण डॉक्टर. दक्षिण अमेरिका बघण्यासाठी बाईकवरून निघाला आणि बाईक खराब झाल्याने पायी, सायकल, ट्रक मधून फिरून त्याने दक्षिण अमेरिका पहिली. त्याला दुःख दारिद्र्य दिसले आणि सहजपणे तो क्रांतिकरकांमध्ये सामील झाला. तो बोलताना मध्ये "चे" हा शब्द खूप वेळा वापरायचा. म्हणून त्याला चे हे टोपणनाव पडले. चे आणि फिडेलची भेट मेक्सिकोत झाली आणि पुढे दोघांनी क्रांती केली. चे खरेतर क्युबात क्रमांक दोनचा नेता होता पण सत्तेत न राहता त्याने उर्वरित दक्षिण अमेरिकेत क्रांती करण्यासाठी क्युबा सोडला आणि अशाच एका युद्धात तो मारला गेला. तो उत्तम लेखक आणि कवी होता. त्याची एक कविता -
उषेच्या जहाल भविष्यवेत्त्या,
चल, निघू या,
काटेरी नागमोडी वळणांच्या गुप्त रस्त्याने
तू ज्या हिरव्या भूमीवर प्रेम करतोस तिला मुक्त करण्यास.
चाल, निघू या,
अनंत अन्याय पुसून काढण्यास,
आपल्या मस्तकात फुटतात बंडखोर तारे,
मृत्यू वा विजय-शपथ घेऊन निघू या.
आणि जेव्हा पहिल्या गोळीच्या आवाजाने,
झोपेतून दचकून जागे झालेल्या तरुणीप्रमाणे,
ती भूमी खडबडून उठेल,
तेव्हा आम्ही तुझ्या साथीला असू,
निश्चयाने, हाती बंदुका घेऊन.

(ही कविता वाचल्यावर मुक्त चित्रपटातील "रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो" आठवली...)

पुढील फिडेल आणि चे यांची गाथा तुम्ही स्वतः वाचा!

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5459360203247863073?BookName=Fidel,-Che-Ani-Kranti

सिम्प्लव कुमारांचे पॉटरायण

युगाब्द १०११८ मधील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रातील बातमी :-

आपल्यात एक प्रसिद्ध इतिहास संशोधक सिम्प्लव कुमार आहेत. (ते सिम्पल आहेत आणि कुमार आहेत म्हणून त्यांना सिम्प्लव कुमार असे नामाभिदान दिले आहे.) त्यांनी नुकताच पूर्वीच्या काळी, सुमारे ५००० वर्षांपूर्वी, ज्याला ग्रेट ब्रिटन म्हटले जात होते त्या भागाचा अभ्यास दौरा केला. त्यांना या भागात राहत असलेल्या जे. के. रोलिंग या प्रसिद्ध इतिहासकाराने लिहिलेले खंडप्राय पुस्तक एका उत्खननात सापडले होते. त्यातील जुन्या काळाच्या लिपीचा आणि भाषेचा अभ्यास केल्यावर त्यांना ग्रेट ब्रिटन येथे जाऊन पुढील संशोधन करावे वाटले.

या अभ्यासदौऱ्यात त्यांनी काढलेले काही निष्कर्ष पुढील प्रमाणे
१. पूर्वी दोन फलाटांच्या मध्ये अजून ३ फलाट असायचे. म्हणजे फलाट क्र ९ आणि १० यांच्या मध्ये ९ पूर्णांक १/४, ९ पूर्णांक १/२ आणि ९ पूर्णांक ३/४ असायचे. त्या फलाटांवर जाण्यासाठी भिंतीच्या मधून एक न दिसणारे दार असायचे.
२. त्या काळी माणूस प्राणी होऊ शकायचा आणि पुन्हा माणूस होऊ शकायचा. उदा. सिरीयस ब्लॅक हा कुत्रा होऊ शकायचा, पेटीग्र्यू हा उंदीर, प्रोफेसर मॅक्गोनागल ह्या मांजर आणि प्रोफेसर लुपिन हे केवळ पौर्णिमेच्या रात्री लांडगा व्हायचे.
३. तेव्हा प्रचंड मोठ्या वाड्यात किंवा लहान किल्ल्यात जादूगारांची शाळा असायची. त्यातील एक विद्यार्थी हॅरी हा सापांची भाषा बोलू शकत होता.
४. त्याकाळी काही माणसे ६०० वर्षांपर्यंत जगत असत. उदा. डंबलडोर.
५. हार्मायानी नावाच्या एका मुलीकडे एक लहान पिशवी होती ज्यात तंबूसुद्धा मावायचे.
६. मृत माणसाची हाडे, त्याच्याच वडिलांची काही हाडे, त्याच्या विश्वासू माणसाचा हात आणि वैऱ्याचे थोडे रक्त एकत्र करून एका भांड्यात उकळले तर मृत माणूस पुन्हा जिवंत होऊ शकत असे.

हे आणि असे बरेच निष्कर्ष सिम्प्लव कुमार यांनी काढले. त्यांचे हे संशोधन आपल्याला नक्कीच ५००० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे अधिक ज्ञान देईल ही आम्हाला खात्री आहे.

ता. क.:
१. आमच्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यावर टीका केलेली चालते. यावरून मला कोणी संघातून बाहेर काढणार नाही. आम्ही सहिष्णू आहोत.
२. केवळ या पोस्टवरून फुरोगाम्यांनी मी फुरोगामी आहे असा निष्कर्ष काढू नये.

Monday, April 16, 2018

I Am Not Ashamed To Be Hindu

#IAmNotAshamedToBeHindu

नेहरूप्राणित मानसिकता भारतीयांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटावी म्हणून सतत प्रयत्नशील असते. ते स्वतः म्हणायचे की ते अपघाताने हिंदू आहेत, किंवा मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. याच मानसिकतेचा नवीन अंक या लोकांनी आशिफाच्या नावाने सुरू केला आहे.

मला याची खात्री आहे की जर संजीरामला न्यायालयाने दोषी मानले आणि त्याला फाशी झाली तर कुणीही हिंदू संजीरामला फाशी होऊ नये म्हणून मध्यरात्री न्यायालय उघडायला लावणार नाही. तो मेल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला हिंदूंची गर्दी होणार नाही. जशी याकूबच्या अंत्ययात्रेला झाली किंवा काश्मीरमध्ये मुस्लिम अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेला होते.

आजवर कोणत्याही न्यायालयाने दोषी मानलेल्या गुन्हेगाराला हिंदूंनी हिंदू म्हणून पाठीशी घातलेले नाही किंवा त्याचा उदो उदो केलेला नाही (अपवाद - नथुराम. गांधीहत्या ही राजकीय हत्या होती, तो दहशतवाद नव्हता. कारण त्या आधी वा नंतर गांधीवाद्यांवर कोणतेही हल्ले झाले नाहीत. शिवाय नथुरामचा उदो उदो बहुसंख्य हिंदूंना आवडत नाही)

हिंदू धर्माला परिवर्तनाची/विद्रोहाची मोठी परंपरा आहे. या सर्व विद्रोहींना संतत्व किंवा देवत्व या धर्मातील लोकांनी दिले आहे. हा धर्म एकमेव पोथीवर विश्वास ठेवणारा नाही. इतकी सामावून घेण्याची क्षमता असलेला, विविध पूजापद्धती (आस्तिक, नास्तिक, मूर्तिपूजक, सुर्यपूजक, निसर्गपूजक, गुरुपूजक आणि खूप) आणि परिवर्तनवादी धर्म अन्य कुठलाही नाही. त्यामुळे आधुनिक विचारांनुसार जे चांगलं ते धर्मात वाढवणारा, वाईट ते धर्मातून हद्दपार व्हावे यासाठी प्रयत्न करणारा आणि जे धर्मात आहे, त्याची उपयोगिता माहीत नाही पण अपायसुद्धा नाही अशा गोष्टी भाबडेपणाने टिकवून ठेवणारा धर्म हा हिंदू धर्म आहे. आपण राहतो त्या देशाच्या संवैधानिक चौकटीत, इतरांच्या पूजापद्धतीवर आक्षेप न घेता, स्वतःची पूजापद्धती इतरांना त्रास न होऊ देता जो पाळतो, तो हिंदू.

लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)

हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

आशिफाच्या बलात्काऱ्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि ती जेवढी जास्त शक्य असेल तेवढी व्हावी. सत्य लवकरच बाहेर येईल. आणि ते लवकर यायचे असेल तर केस लवकरात लवकर CBI कडे दिली गेली पाहिजे. त्यात होणारी टाळाटाळ अगम्य आहे.

आशिफा केसच्या निमित्ताने काही लोक हिंदूंना बलात्कारी म्हणत खालील विधाने करत आहेत
१. गर्व से कहो हम रेपिस्ट है। (गर्व से काहो हम हिंदू है च्या चालीवर)
२. आम्हाला हिंदू असल्याची लाज वाटते. (यात सेलिब्रेटी आघाडीवर. उदा : सोनम कपूर)
३. मी हिंदू आहे, पण मला मुलगा नाही याचा मला आनंद आहे. (जसं काही सगळे हिंदू मुलगे बलात्कारी असतात)
४. तुम्ही म्हणता ते इतरांचं दिसत नाही का. दिसतं. पण आधी माझं घर मी बघणार. त्याची मला लाज वाटते. (घरातला एक कोपरा घाण आहे. तो स्वच्छ करण्यासाठी मी काहीच करणार नाही. पण मी माझ्या घराकडे लक्ष देणार म्हणजे त्या कोपऱ्याचे फोटो काढणार आणि माझं घर किती घाण आहे हे फेसबुकवर पोस्ट करणार. आणि म्हणणार मला माझ्या घराची लाज वाटते)
५. एक कार्टुनिस्ट राम आणि सीतेचं चित्र काढतो आणि त्यात सीता रामाला म्हणते, बरं झालं रावण तुमचा अनुयायी नव्हता. (म्हणजे रामाचे सगळे अनुयायी बलात्कारी?)

एका केसमधून सगळ्या हिंदू पुरुषांना बलात्कारी म्हणून सरसकटीकरण (generalization) करायचं. हे राजकीय दृष्ट्या यांना सोयीचं वाटतं. हे सगळं करण्याची काँग्रेस अँड कंपनीला गरज वाटते. यातून हिंदू मते फुटतील आणि मग आपण निवडणूका जिंकू असे त्यांना वाटत असेल. पण एक गोष्ट यांनी लक्षात ठेवावी. जेव्हा जेव्हा हिंदूंवर हिंदू म्हणून आरोप होतात तेव्हा जातीपातीत विखुरलेला हिंदू एकत्र येतो. गेल्या तीस वर्षातला हा इतिहास आहे. त्यामुळे या लोकांची "गढूळाचं पाणी का रं ढवळीलं, नागाच्या पिल्ल्याला का रं खवळीलं" अशी अवस्था होईल याची शतप्रतिशत खात्री आहे.

#गर्व_से_कहो_हम_हिंदू_है।

Wednesday, April 11, 2018

चत्वार वाचा

लहानपणी मनाचे श्लोक पाठ करताना “नमूं शारदा मूळ चत्वार वाचा” ऐकलं होतं. मग मनाच्या श्लोकातच “पुढे वैखरी राम आधी वदावा” असंही ऐकलं, पाठ केलं. जेव्हा अथर्वशीर्ष पाठ केलं तेव्हा “त्वं चत्वारि वाक् पदानि” हे कानावर पडलं आणि कदाचित “चत्वार वाचा” आणि “चत्वारि वाक्” याचा संबंध असेल असं वाटलं. एकनाथांचा अभंग “गुरू परमात्मा परेशु” यातील जो परेश आहे तो पर+ईश आहे की काय आहे हा प्रश्न पडला आणि ज्ञानेश्वरीत सुरूवातीला जेव्हा शारदेला नमन आहे त्यात “आतां अभिनव वाग्विलासिनी” याने सुरूवात होऊन ते नमन आहे.
याचं उत्तर बऱ्याच वर्षांनी मिळालं. कधीतरी वाणीचे स्तर असं वाचनात आलं. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.
वैखरी हा वाणीचा चौथा स्तर. जी भाषा आपण बोलतो ती म्हणजे वैखरी. म्हणून वाणीशुद्धीसाठी रामदास सांगतात “पुढे वैखरी राम आधी वदावा”. तिसरा स्तर आहे मध्यमा. याला आपण self talk म्हणू शकतो. आपण बोलण्याआधी जो विचार करतो, ती वाणी म्हणजे मध्यमा. दुसरा स्तर येतो पश्यन्ति. केवळ जाणीवेने कळणारी वाणी म्हणजे पश्यन्ति. Conscious मनाला जाणवणारी वाणी. आणि सर्वात पहिली म्हणजे परा. ही sub-conscious अबोध मनाची वाणी आहे. परा पासून सुरूवात होऊन वैखारीला वाणी अभिव्यक्त होते. त्यामुळे शुद्धीकरण करत करत परा अत्यंत शुद्ध असणे हे योग्याचं लक्षण. म्हणून एकनाथ गुरूला परेश म्हणतात.
या चारही वाणींचा अधिपती म्हणून गणपती हा चत्वारि वाक् पदानि तर वाग्विलासिनी शारदा ही चारही वाणींची मूळ म्हणून नमूं शारदा मूळ चत्वार वाचा.

ता. क. आधुनिक मानसशास्त्र म्हणतं ते cognition, belief, self-talk, communication... - माया

Friday, April 6, 2018

माझी कथा – राजू रस्तोगी


नमस्कार! मी राजू रस्तोगी. तोच... 3 Idiots मधला... त्या सिनेमात काही गोष्टी सांगितलेल्या, दाखवलेल्या नाहीत. आता बरीच वर्षे झाली आणि मीही पुढे काही करायचं ठरवत आहे. म्हटलं तुम्हाला सांगावं...

तुम्हाला सर्वांना माझी परिस्थिती माहित आहेच. पोस्ट मास्तर वडील, गरीब घर, लग्नाळू मोठी बहिण वगैरे. ते सर्व साधारण कॉलेजच्या सुमाराचे. मला नंतर नोकरी लागली. कम्मोचं लग्न झालं, तेही बिना हुंड्याचं. चांगला नवरा मिळाला तिला. मग २ वर्षात माझंही लग्न झालं. नंतर वर्षभरातच वडील गेले. आई कधी कम्मोकडे तर कधी माझ्याजवळ असते. चतुरने जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही माझ्या बायकोला नक्कीच बघितलं असेल. फुल्ल योगावाली आहे ती. ही गोष्ट तिची आणि माझी, रँचोशी पुन्हा भेट झाल्यानंतरची.

चतुर मुळे आमची पुन्हा रँचोबरोबर भेट झाली. आणि तिथून माझी अस्वस्थता बाहेर पडू लागली जी गेली अनेक वर्षे माझ्यात मी दडवून ठेवली होती.

मी चौथीत होतो. शाळेत बेंचवर ठेका धरणं हे शाळेतलं सगळ्यात आवडतं काम. एकदा आमच्या वरच्या शाळेतल्या संगीत शिक्षकांनी ते ऐकलं आणि मला बोलावून घेतलं. मग शास्त्रोक्त तबला शिक्षण सुरू झालं. घरी फक्त एक एक्सट्रा तास शाळेत थांबतो यापेक्षा अधिक माहित नव्हतं. माझी तबल्याची आवड वाढत गेली. मी आता नववीत होतो. अचानक एक दिवस वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला आणि नोकरी गेली. आधीच पगार तुटपुंजा होता त्यात पेन्शन अजून कमी. शाळेत विज्ञानाच्या सरांनी बोलावून घेतले. सांगितले की तुझा तबला छान आहे पण आत्ताच्या परिस्थितीत तू तुझ्या कलेतून कुटुंबाची गरज भागवू शकणार नाही. तुझ्या वडिलांची पेन्शन कमी, तुझी बहिण शिकत असताना छोटी मोठी कामं करून घराला हातभार लावत आहे. अशावेळी तू शालेय शिक्षणावर अधिक लक्ष दे. पुढे जेव्हा या कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होतील तेव्हा पुन्हा तबला सुरू कर. थोडी मलाही समज आलेली होती. मला ते पटलं आणि तबला बंद झाला.

१० वीत उत्तम गुण आणि १२ वी नंतर इंजिनीयरिंग. त्यापुढे तुम्ही बघितलं आहेच. माझे घरातले लोक तर विसरले होते की कधी काळी मी तबला वाजवायचो. याच दरम्यान मला खूप त्रास झाला तो रँचो सोबत. साला काबिल बनो इतक्या वेळा सांगत होता की कित्येकदा वाटायचे इंजिनीयरिंग सोडून पुन्हा तबल्याकडे वळावे. पण मग घर दिसायचे. फरहानचं सिक्रेट काही सिक्रेट राहिलं नाही. त्याच्यावर घराची कोणती जबाबदारीही नव्हती. त्यामुळे त्याला निर्णय घेणं जमलं. माझा निर्णय मात्र पक्का होता. रँचोला काही कळूच द्यायचं नाही. हातात भरमसाठ अंगठ्या आल्यामुळे तबला बंद होताच, मी तोंडही बंद ठेवले.

जवळपास दहा वर्षांनी रँचोला भेटलो. फरहान सुद्धा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात रमला होता. मी काही फार मनाविरुद्ध करत होतो असं नाही. पण १००% मनाजोगं सुद्धा करत नव्हतो. या भेटीनंतर हे खूप तीव्रतेने वाटू लागलं. माझी अस्वस्थता बायकोने ओळखली. तिला सांगितलं. मी तबला वाजवायचो हे तिला माहीतच नव्हतं. मग तिला टेबलवर काही वाजवून दाखवलं. पुढे ती मागेच लागली की काहीही करून मी पुन्हा तबला शिकायला सुरुवात करायची. पस्तिशीत शिकावं की नाही या विचारात असताना तिने चांगल्या तबला शिक्षकाकडे माझा क्लास सुरू करून दिला.

सहा महिने शिकलो आणि मग आपली लाईफ स्टाईल आणि तिला लागणारे पैसे यावर विचार सुरू झाला. शेवटी निर्णय लागला की आताचे सेविंग्स आणि अर्धा पगार यावर नक्की घर छान चालेल आणि अर्धा वेळ तबल्याला मिळाला. पाच वर्षे अशी काढली आणि आता मी पूर्णवेळ तबल्यात करियर करायचे ठरवले आहे.

रँचोला त्यावेळी कळूच न देणं ही माझी आणि माझ्या कुटुंबाची गरज होती. सगळ्यांच्याच आयुष्यात जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे काही आवडीच्या गोष्टी मागे पडतात. जेव्हा मार्ग मिळेल तेव्हा त्यातून आवडीच्या गोष्टीला वेळ नक्की द्या. रँचो सारख्या मस्तमौलाला हे सहज जमतं, फरहान सारख्याला थोड्या संघर्षाने जमतं आणि माझ्यासारख्याला संघर्ष आणि वेळ दोन्ही देऊन मगच मिळतं. पण इच्छा असेल तर मिळतं हे नक्की.

तुमच्या शुभेच्छा नक्कीच पाठीशी असतील. धन्यवाद!

-- राजू रस्तोगी.

Tuesday, April 3, 2018

आमची आयटीवाल्यांची जात

संत सावता माळी यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. ज्यात त्यांनी कामात विठ्ठल शोधला आहे. तसा जर एखाद्या आयटीवल्याने लिहिला तर कसा असेल...
(नॉन आयटीवाल्यांना कदाचित कळणार नाही, पण ज्यांना कळेल त्यांनी एन्जॉय करा)

आमची आयटीवाल्यांची जात । कोड लिहू बगमुक्त ।।
असो जावा वा डॉटनेट । भाषा ऑब्जेक्ट ओरिएंट ।।
डीबी आधी रॅशनल । आता झाला नो-एस्क्यूएल ।।
प्रोसेस एक वॉटरफॉल । आजाईल, आयटीआय्यल ।।
गो-लाईव्हचा सोहळा । विठ्ठल देखियेला डोळा ।।

ऍप्लिकेशना क्वालिटी । देतो टेस्टर घेऊनि लाठी ।।
कधी टेस्ट प्रोग्रेशन । करू कधी रिग्रेशन ।।
स्मोक आणि सॅनिटी । टेस्ट सायकलची क्वालिटी ।।
लोड आणि एन्डयुरन्स । करू चांगला परफॉर्मन्स ।।
डिफेक्ट फ्री प्रोडक्शन । आम्हा वैकुंठा समान ।।

मूळ अभंग
आमची माळीयाची जात । शेत लावू बागाईत ।।१।।
आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुलझाडा ।।२।।
शांती शेवंती फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ।।३।।
सावताने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळा ।।४।।
- संत सावता माळी