Saturday, August 15, 2020

अखंड भारत संकल्प दिन

काल अनेकांनी अखंड भारत संकल्प दिनाच्या पोस्ट टाकल्या, लेख लिहिले. तर काही पक्क्या हिंदुत्ववाद्यांनी अखंड भारत ही संकल्पना १९४७ला आणि आताही कशी अव्यवहार्य आहे यावर लिहिलं. दोन्ही बाजू वाचल्यावर मला काय वाटतंय ते लिहिण्याचा हा प्रयत्न.

"गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?" या शेषराव मोरेंच्या पुस्तकात अखंड भारत असणं किती त्रासदायक झालं असतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. तेव्हाही आणि आताही एकूण मुस्लिम लोकसंख्या ही ४०% च्या आसपास असली असती. सावरकरांनी जे सुचवलं होतं, त्यानुसार तर तेवढं प्रतिनिधित्व मुस्लिमांना मिळालं असतं. ते नाही तरी एकूण मुस्लिमबहुल मतदारसंघ हे ३०%-३५% नक्कीच राहिले असते. आज खंडित भारतात जिथे २०% मुस्लिम लोकसंख्या आहे, तिथेही कट्टरतावादी सामान्य मुस्लिमाला फितवतात आणि जिहादी कारवाया, अशांत काश्मीर, अन्य भारतात बॉम्बस्फोट ते आझाद मैदान, बेंगळुरू मधील झुंडशाही हे घडत आहे. जर हीच लोकसंख्या ४०% असती तर किती नुकसान होऊ शकतं. या तर्कावर पुन्हा अखंड भारत होणं हे अव्यवहार्य आहे हे या मंडळींचं म्हणणं आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य उद्धृत केलं जातं, "आज भारताला लागलेला मोठा रोग संपला". हे सगळं तर्कनिष्ठ आहे यात वाद नाहीच. पण तर्काच्या पुढे गेलं तरच इतिहास घडत असतो.

भारतीयांनी रामजन्मभूमीचं स्वप्न गेली ५०० वर्षे पाहिलं. दोन पिढ्यांनंतर जर ते स्वप्न हे अव्यवहार्य आहे या तर्कावर सोडून दिलं असतं तर आज ते पूर्ण झालं नसतं.
बलाढ्य मोगल आणि अनेक शाह्या आजूबाजूला असताना, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहणं हे अतार्किकच होतं.
प्रचंड तोफखाना असलेल्या निजामाला केवळ घोडदळाच्या जोरावर बाजीरावांनी पालखेडला गुढग्यावर आणलं, अडीच लाखांच्या मोगल सैन्याला पंचवीस हजारांच्या मराठ्यांच्या सैन्याने शिंदे होळकर पवार यांच्या नेतृत्वात पाणी पाजलं आणि त्यामागोमाग बाजीराव थेट दिल्लीच्या दारात जाऊन आले हे सगळंच अतार्किक आणि अव्यवहार्य होतं.
गांधीजींनी मीठ उचलणं, अनेक क्रांतिकारकांनी जीवनाची आहुती देणं, सावरकरांनी जहाजातून उडी मारणं आणि नेताजींनी भारताबाहेर सैन्य उभारून भारत स्वतंत्र करण्यासाठी युद्ध करणं हे सगळंच अतार्किक होतं
हजार वर्षांहून अधिक काळ आपल्या मायभूमीपासून दूर राहून ज्यू लोक स्वतंत्र इस्राएलचं स्वप्न पाहत राहिले. ते अतार्किक, अव्यवहार्य आणि अशक्यप्राय होतं.
दोन शहरं पूर्ण बेचिराख झालेली असताना जपानने केलेली प्रगती तर्काच्या कुठल्याही कसोटीवर बसत नाही, पण ते झालंय.
प्रत्येक वेळी तर्क, व्यवहार यावरच मदार ठेवली असती तर वरील कुठलाच इतिहास घडला नसता. 

ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसीमध्ये नायक पुजाऱ्यांना विचारतो की, "या सगळ्या पूजा, व्रत यामागील तर्क, ज्ञान तुम्हाला माहीत आहे का?" 
पुजारी सांगतात, "नाही"
नायक पुन्हा विचारतो, "जर हे सगळं का करायचं माहीत नाही, तर का करता?"
पुजारी सांगतात, "मला कळालं नाही म्हणजे पुढील पिढ्यांनाही कळणार नाही असं नाही. पण जर मी हे थांबवलं तर पुढील पिढ्यांना "हे असतं" हेच माहीत असणार नाही. त्यामुळे यामागील तर्क कळण्याची शक्यताच मावळून जाईल. ते व्हायचं नसेल तर मला कळो अथवा न कळो, या गोष्टी मला पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे."

अखंड भारत हे असंच एक १९४७ला अव्यवहार्य असणारं, आज कदाचित अतार्किक असणारं स्वप्न किंवा व्रत आहे. ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आपल्या पिढीचं काम आहे. ते पोहोचवत राहिलं तर कदाचित १००, २००, ५०० वर्षांनी ते साकार होईल. पण जर त्याला अव्यवहार्य ठरवून सोडून दिलं तर पुढील पिढी यावर काम करणारच नाही.

कोणतंही मोठं काम एकाच टप्प्यात होत नसतं. त्याप्रमाणे अखंड भारत हा काही पाकिस्तानशी एक युद्ध करून सगळा पाकिस्तान भारतात विलीन करून घेणं असं असू शकत नाही. मग हे टप्पे कोणते असू शकतात -
०. भारत मजबूत बनवणं
१. गिलगिट बाल्टिस्तान, अक्षय चीन भारतात विलीन करणे
२. पाकिस्तानची अजून शकले होऊन सिंधदेश, पंजाब, पश्तुनीस्तान, बलुचिस्तान हे नवीन देश तयार होणे
३. तिबेट स्वतंत्र होणे
४. युरोपियन युनियनच्या धर्तीवर अफगाणिस्तान पासून ते इंडोनेशिया पर्यंत आर्थिक एकता साधणे
५. इथून पुढे कदाचित एक राष्ट्र ही संकल्पना मांडता येईल...

हे सगळं घडणं सहजसाध्य असणार नाहीच. हे असंच घडेल असंही नाही. पण स्वप्न अतार्किक, अव्यवहार्य आहे म्हणून सोडून देणं अयोग्य होईल. कारण त्यामुळे स्वप्नाचे अस्तित्वच संपून जाईल.

त्यामुळे दर वर्षी १४ ऑगस्ट रोजी "अखंड भारत संकल्प दिन" हा झालाच पाहिजे.

🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

No comments:

Post a Comment