Tuesday, December 24, 2024

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

नोव्हेंबर महिन्यात आम्ही अयोध्येत गेलो होतो. प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले. तिथे कारसेवक पुरम मध्ये योजना चमू (managment team) कडून मंदिराची अचंबित करणारी माहिती मिळाली. ती माहिती आपणा सर्वांसाठी देत आहे 
- ज्ञानेश

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

थोडक्यात पूर्वइतिहास
राम मंदिरासाठी हिंदू समाज गेली ५०० वर्षे लढत होता. पण निर्णायक चळवळ १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाली. १९९०च्या दशका मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बैठकी झाल्या, ज्यामध्ये चळवळ ही केवळ राजकीय नसून सामाजिक असावी असे ठरविण्यात आले. कारण ही जनसामान्यांना आपली चळवळ वाटली पाहिजे. त्यानुसार विश्व हिंदू परिषदेला चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी निवडले गेले.

यात १९८७ ला गंगा यात्रा आयोजित करण्यात आली, त्यानंतर १९८९ ला रामशिला पूजन झाले. लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपापल्या गावांतून राममंदिरासाठी भक्तिभावाने विटा पाठवल्या. १९९० ची अडवाणींची रथ यात्रा एक गेमचेंजर म्हणावी अशी घटना होती. त्याची परिणिती १९९२ ला बाबरी ढाचा पाडण्यात झाली. एक मोठा कलंक हिंदू समाजाने मिटवला. ढाचा पडल्यानंतर, त्याच ढिगावर पूजेसाठी एक तात्पुरता मंच,कापडी तंबू तयार करण्यात आला.

अलाहाबाद न्यायालय २०१० व नंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हिंदू समाजासाठी जमीन निश्चित केली. श्री रामजन्मभूमी न्यास निर्माण केला गेला (फेब्रू २०२०). मंदिराच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात झाली ती ५ ऑगस्ट २०२० रोजी. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं.

अभियांत्रिकी
इथून पुढे श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि त्यातील रोचक अभियांत्रिकी गोष्टी आहेत...

अशोकजी सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची रचना दोन मजली केली होती. पण आता जागा पुरेशी मिळाली. २०२१ जानेवारी ते मार्च, रामभक्तांनी भरभरून निधीही जमा केला. त्यामुळे मूळ २ मजली ऐवजी मंदिर ३ मजली, त्यावर शिखर करावे असा प्रस्ताव आला. तो मान्यही झाला.

मंदिराच्या भरभक्कम पायासाठी भारतातील अनेक अभियांत्रिकी संस्था, आयआयटी, NGRI  ह्यांनी मदत केली आहे. बांधकामासाठी तज्ञ संस्था L&T, TCE, Architects आहेत.

मंदिर नागर शैलीतील आर्किटेक्चरमध्ये डिझाइन केले आहे. यात परकोटा महाद्वार, मंदिर सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप, प्रार्थना मंडप आणि गर्भगृह यांसारख्या अनेक मंडपांचा समावेश आहे. प्रत्येक मंडपातील स्तंभांवर दशावतार, शिवपुराण, भागवत पुराण इ कथांतील मूर्ती चितारल्या आहेत.

तळमजला आणि श्रीरामाची मूर्ती २२ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण झाली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली. त्यानंतर पहिला मजला गेल्या दिवाळी २४ मध्ये पूर्ण झाला. दुसऱ्या मजल्याचं काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजित आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत कधीही प्रोजेक्ट प्लॅनमध्ये कमी अधिक बदल अथवा उशीर झालेला नाहीये !!! 

सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष
श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायासाठी सुमारे ५५-६० फूट खोल खोदकाम केले. या खोदकामात प्राचीन काळातील अनेक मंदिरांचे अवशेष सापडले, ज्यांचा इतिहास इसवी सन पूर्व १३०० पर्यंतचा आहे. याचं कार्बन डेटिंग केलेलं आहे आणि मंदिर कार्यालयात त्याचे सर्व पुरावेही उपलब्ध आहेत. खोदकामादरम्यान, विविध काळातील मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभाग व रामजन्मभूमी न्यास यांना सापडले आहेत. यामध्ये बाराव्या, सातव्या शतकातील व तत्पूर्वी विक्रमादित्य, तसेच मौर्याच्या काळातील मंदिराचा समावेश आहे. तसेच, याबद्दलचे विविध शिलालेख आणि पुरावे सापडले, ज्यामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख होते.

या शिलालेखांमध्ये त्या काळातील राजे आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे एक पुरातत्त्वीय महत्त्व आहे. या शोधामुळे अयोध्येत आजपासून सुमारे ३४०० वर्षांपासून श्रीरामाची पूजा होत होती. अतिशय नीटनेटकी मंदिरेही होती. म्हणजे पुरुषोत्तम श्रीराम आणि त्यांचा इतिहास, म्हणजेच भारतवर्षाचा इतिहास हा किती पुरातन आहे याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच हे अवशेष भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत.

अर्थात हे पुरावे जगासमोर येतीलच. त्यासाठी जरा वाट बघावी लागेल. कारण आधी मंदिर पूर्ण व्हायचे आहे. या प्राचीन अवशेषांचे जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी संग्रहालयाची योजना आहे. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शिक्षणाचे साधन ठरतील.

श्रीराम मंदिराचे तंत्रज्ञान
५५-६० फूट खोल खोदल्यानंतर हा सगळा खड्डा भरला. त्यावर ३ मजली दगडी मंदिर (३७०' लांब, २७०' रुंद, १६१' उंच) उभं राहणार, ते किमान १००० वर्षे टिकलं पाहिजे. त्यामुळे पायाभरणीमध्ये ग्रॅनाइट आणि विशेष काँक्रीटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मंदिराच्या दीर्घायुष्यासाठी दगडांना इंटरलॉक करण्यासारख्या विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला. त्यावर ग्रॅनाइटचे दगड ठेवले आहेत. पायाभरणीसाठी एकूण १७,५०० ग्रॅनाइट दगड वापरण्यात आले. यावरून पायाच्या वजनाचा आणि मजबुतीचा अंदाज येऊ शकेल. 

तांबडे दगड स्थिर राहावेत आणि अनेक वर्षे टिकावेत म्हणून तांब्याच्या क्लिप्सचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. त्यानंतर काँक्रीटचे ४८ थर आहेत. प्रत्येकी १ फूट जाड, त्यांना २० टन रोलरने कॉम्पॅक्ट केले गेले. यानंतर १० फूट जाड विशेष काँक्रीटचा दुसरा थर टाकण्यात आला. यावर ३५ फूट जाड काँक्रीटचा तिसरा थर टाकण्यात आला. ग्रॅनाइट दगड पिन-लॉक प्रणालीचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलं. बांधकामात वापरलेल्या प्रत्येक दगडाला टॅग केले जाते. यामुळे दगडांचे अचूक ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन शक्य होते, ज्यामुळे प्रत्येक तुकडा योग्यरित्या ठेवला जातो.

पुरातन नागर शैली, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अनोखा संगम या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो ❤️

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर यापुढील काळात श्री वाल्मिकी रामायणातील प्रसंग व मूर्ती, तसेच ब्राँझ म्युरल्स होतील.

हे मंदिर आपला सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. हे लाखो भक्त आणि पर्यटक आजही इथे येतात. रोज जवळपास १ लाख भक्त मंदिराला भेट देतात. दैनंदिन सुगम दर्शन पास आणि आरतीचे पास वेबसाईट वर उपलब्ध आहेत. फक्त वेळेत बुकिंग केलं गेलं पाहिजे. 

आपण आश्चर्यचकित व्हावं अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत. श्रीरामाची कृपा आपणा सर्वांवर व्हावी आणि लवकरात लवकर सर्वांना दर्शन व्हावे अशी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🙏

।। जय श्रीराम ।।

No comments:

Post a Comment