Monday, April 28, 2025

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, गीता आणि उपनिषदे 😀

भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुनाच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो. तो श्रीकृष्णाला विचारतो:  
बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ।।१।।
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ।।२।।

अर्जुनाला सोपे उत्तर नको, त्याला स्पष्टता हवीये, आणि आधीच्या अध्यायात श्रीकृष्णाने जे सांगितले त्यातील संशय दूर करायचा आहे.  

सहजच विचार करताना असं वाटलं की आजच्या डिजिटल जगात, जेव्हा आपण AI किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताकडून उत्तर शोधतो, तेव्हा अर्जुनासारखाच प्रश्न विचारण्याची गरज असते!  
कारण योग्य प्रश्न विचारणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे.
श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देण्याआधी त्याचा प्रश्न अधिक स्पष्ट करतो. तो सांगतो की ज्ञान आणि कर्म हे दोन्ही आवश्यक आहेत, पण योग्य पद्धतीने विचारल्याशिवाय योग्य उत्तर मिळत नाही.  
आज आपण AI शी संवाद साधताना, किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताशी विचारविनिमय करताना, जर प्रश्न अस्पष्ट आणि मोघम असेल, तर उत्तरही तसंच मोघम मिळतं.  
उदाहरणार्थ:  
❌ "मला गीतेबद्दल माहिती हवी." - हे खूपच मोघम आहे, शिवाय व्याप्तीही मोठी आहे.  
✅ "गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील कर्मयोगाची संकल्पना सोप्या शब्दात समजावून सांग." - हे स्पष्ट आणि उद्दिष्टपूर्ण आहे.  

जेवढा विचारपूर्वक, मुद्देसूद आणि तपशीलवार प्रश्न विचारला जातो, तेवढेच उत्तर अधिक सखोल आणि उपयुक्त मिळते.  

शोध नक्कीच उत्तरांचा असतो, पण सुरुवात योग्य प्रश्नांनी होते. अर्जुनाने जर फक्त विचारले असते, "मी काय करणं योग्य आहे?" तर त्याला आणि आपल्यालाही गीतेची महान शिकवण मिळालीच नसती. पण त्याने प्रश्न स्पष्ट आणि मुद्देसूद विचारले, म्हणून श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्गदर्शन दिले.  

आजच्या डिजिटल युगातही हेच लागू होते. AI, तंत्रज्ञान किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताकडून चांगले उत्तर मिळवायचे असेल, तर प्रश्न अचूक आणि नीट विचारावा लागतो.  

तर मग... प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकताना, शिकवताना आपण गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानातील प्रश्नांचे संदर्भ घेऊन शिकू/शिकवू शकतो का? काय वाटतं?

No comments:

Post a Comment