Friday, July 29, 2022

धुरंधर - नानासाहेब पेशवे!

 आपल्या पाठ्यपुस्तकांनी मोगल इतिहास भरभरून सांगितला. शिवरायांचा इतिहास मोडून सांगितला. पुढे संभाजी महाराज ते दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे हार मानली हा कालखंड पूर्ण वगळला. मग हा इतिहास आपल्यापुढे अनेक इतिहासकारांनी तर मांडलाच पण कादंबरी रूपात लेखकांनी तो सोपा करून आपल्यापुढे आणला. त्यात छावा, राऊ, पानिपत आणि स्वामी ही पुस्तके विशेष गाजली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अंगार चेतवला, त्याचा वणवा केला बाजीरावांनी. त्यात मोगल पूर्ण भरडले गेले. पण दुर्दैवाने बाजीराव वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवर्तले. नंतर नानासाहेबांनी पेशवाई सांभाळली, पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात पानिपत झालं. तरीही पुढे माधवरावांच्या कारकिर्दीत केवळ दहा वर्षांत संबंध भारतभर मराठेशाही नांदू लागली. आजोबा बाजीराव आणि नातू माधवराव यांचं कार्य अतुलनीय होतं. त्या कार्याला सामान्यांच्या मनात पोहोचवलं राऊ आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांनी. पण या दोघांच्या मधला वीस वर्षांचा कालखंड कुणी कादंबरी रूपात कधी मांडला नव्हता. ते काम तरूण इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे याने केलं आहे.
कौस्तुभचं हे पुस्तक जाहीर झालं आणि लगेच मागवलं. पण माझ्या हाती येऊन वाचून पूर्ण व्हायला जरा वेळ लागला.
अगदी खरं सांगतो - मला नानासाहेब हे याआधी केवळ पानिपत पुरते ठाऊक होते. त्यातही त्यांनी पानिपतच्या धामधुमीत केवळ ९ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आणि गोविंदपंत बुंदेल्यांना नाटकशाळा पाठवा म्हणून पत्र पाठवलं (दोन्ही गोष्टी पानिपत कादंबरीत वाचल्या) एवढं माहित होतं. याशिवाय त्यांनी कसं मराठा आरमार बुडवलं वगैरे गोष्टी ऐकीव माहित होत्या. पण त्यांच्यावर खूपच कमी लेखन झालं आहे आणि जे झालंय ते त्यांच्यावर अन्याय करणारं आहे... वाईट गोष्ट अशी की ज्या राघोबाने पानिपतची जबाबदारी टाळली, कोवळ्या माधवरावांना पेशवाई मिळाल्यापासून त्रासच दिला, नारायणरावांना मारेकरी घालून मारलं, अश्या माणसावर "राघोभरारी" ही ऐतिहासिक कादंबरी अनेक वर्षांपूर्वीच निघाली. पण नानासाहेबांवर एकही कादंबरी निघू नये हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता. 
मागच्या वर्षी नानासाहेबांच्या कार्यावर श्री उदय कुलकर्णी यांचा इंग्रजीतून शोधग्रंथ आला आहे, त्याचं मराठी भाषांतरही अशात आलं आहे. खाली मध्ये दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स आहेत.
असं असलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा कादंबरीतून लवकर कळतं. हे काम कौस्तुभने केलं आहे. 

नानासाहेबांना पेशवे म्हणून काम करताना सुरुवातीपासून अनेक प्रकारची संकटे/आव्हाने आली. त्यांनी ती आपल्या अतुल्य राजकीय आणि सामरिक बुद्धीने लीलया पेलली आणि परतवली. सुरुवातीला बाजीरावांना पेशवाई मिळताना जी राजकारणं झाली ती नानासाहेबांनाही चुकली नाहीत. उत्तरेत मोठी स्वारी झाली. ज्या माळव्याच्या सनदा बाजीरावांच्या वेळेपासून मिळायच्या बाकी होत्या त्या नानासाहेबांनी मिळवल्या. त्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मुलुखगिरी केली. त्यातही रघुजींच्या विरोधात सेना उतरवली म्हणून अनेक प्रवाद निर्माण झाले. ते सगळे छत्रपती शाहूंच्या समोर खासगीत संपुष्टातही आणले. पुढे राजपुतांच्या गादीवरून शिंदे आणि होळकर यांच्यात सुद्धा काही काळ वितुष्ट आले. तेही राजपूत आणि शिंदे-होळकर यांना समजुतीत घेऊन संपवले. शाहू महाराजांनी अचानक पेशवाई काढून घेतली तेव्हा काही महिने नानासाहेब सातारच्या बाहेर राहुट्यांमध्ये राहिले. जोवर महाराजांचा पूर्ण विश्वास पूर्ववत होत नाही तोवर शांतपणे वाट पहिली आणि शाहूंनी घेतलेली परीक्षा उत्तीर्ण झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या न राहता एकच गादी असावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कोल्हापूरचे संभाजी राजे बाजीरावांच्या काळात निजामाला जाऊन मिळाले होते. तरीही तो राग न धरता या दोन गाद्या एकत्र होऊन एक मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी दत्तक विधान करताना संभाजी महाराजांना दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पण ते झालं नाही. नंतर सदाशिवरावांना कोल्हापूरची पेशवाई देऊन किमान या दोन गाद्यांमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही ही तजवीज करून ठेवली. आपण छत्रपतींचे सेवक आहोत आणि थोरल्या शिवप्रभूंचे अनुयायी आहोत हे सतत दाखवून दिलं. त्यासाठी काशी, मथुरा आणि अयोध्या ही क्षेत्रे सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही प्रयत्न आपल्याच लोकांच्या घाबरण्यामुळे मागे पडले तर काही वेळा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र "काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधू मुक्त करा" हे महाराजांचे शब्द कधीच विसरले नाहीत. 
राज्यकारभारात आणि एकूण महसूल, मोजणी या सगळ्यात सुसूत्रता आणली. जे करायला बाजीरावांना कधी वेळ मिळाला नाही अश्या अनेक गोष्टी केल्या. शनिवारवाडा बिना तटबंदीचा होता. त्याची तटबंदी पूर्ण केली. दरवाजा मुद्दाम उत्तरेला ठेऊन दिल्लीवर आमची नजर आणि सत्ता दोन्ही आहे हे दाखवून दिले. कात्रजच्या तलावातून पुण्यात सर्व मोठ्या घरांमध्ये पाणी फिरतं ठेवलं. आजही तो नळ सुरु आहे.
कुटुंबात सदाशिवरावभाऊंना राज्यशिक्षणासाठी सातारला ठेवलं. गुरूंना सतत सन्मान दिला. बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेबांचा मुलगा कृष्णा - समशेर बहाद्दर - याला कधीच अंतर दिलं नाही. त्याची वाढ आणि शिक्षण याकडेही लक्ष पुरवलं. विक्षिप्त राघोबांना सांभाळलं. विश्वासराव आणि माधवरावांवरही सतत लक्ष ठेऊन त्यांचंही शिक्षण सुरू राहील हे बघितलं. 

एक ना अनेक कित्येक गोष्टींनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. अब्दाली पहिल्यांदा आला तेव्हा मराठा सैन्य तिथे पोहोचण्याच्या आधीच तो परत फिरला होता. दुसऱ्यांदा आल्यावर मात्र तो पुन्हा जिवंत जाऊ नये यासाठी पेशव्यांच्या घरातून कुणी जबाबदारी घ्यावी यावर ते ठाम राहिले. त्यांची स्वतःची तब्येत साथ देती तर तेच रणांगणावर असते. परंतु ते व्हायचे नव्हते. त्यांच्या जागी राघोबा जावेत म्हणून प्रयत्न झाला. मात्र राघोबा गेले नाहीत. ती जबाबदारी घेतली त्याच्या लाडक्या सदोबाने. पानिपत हारूनही अब्दालीने हिंदुस्थान मराठ्यांच्या हवाली केला. ही मराठ्यांची ताकद होती. ती कमावली बाजीरावांनी तर वाढवली नानासाहेबांनी. भाऊ आणि नाना ही जोडी अगदी चिमाजी आणि बाजीरावांचीच असावी अशी होती. त्यामुळे विश्वासराव गेले त्याहूनही अधिक दुःख त्यांना भाऊ गेल्याचं झालं. स्वतः विश्वासरावसुद्धा पत्रात म्हणाले होते की, "आमच्या सारखे पुत्र तुम्हाला पुन्हा मिळतील पण भाऊंसारखा भाऊ मिळणार नाही" भाऊ गेल्याने नानासाहेब खचले आणि त्यातच त्याची अखेर झाली.

कादंबरी रसाळ आहे. भाषा ओघवती आहे. त्यात सनावळ्या नाहीयेत. मात्र कौस्तुभ "पुराव्यानिशी शाबीत" करण्याजोगे नसेल तर लिहीत नाही. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. कित्येक ऐतिहासिक कागदपत्रे वाचून, समजून घेऊन, त्यांची संगती लावून ही कादंबरी लिहिली गेली आहे. केवळ तिशीत असताना कौस्तुभ ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. त्याच्या अनेक कादंबऱ्या याव्यात, पुस्तके यावीत आणि आम्हाला वाचायला मिळावीत ही प्रार्थना. 

आज बाबासाहेब पुरंदरेंची जयंती! कौस्तुभला त्यांचे आशीर्वाद सतत मिळाले आहेत. बाबासाहेबांचं बोट धरून तो त्यांच्या वाटेवरून चालतोय. खूप शुभेच्छा!

- ज्ञानेश 

धुरंधर - पेशवा नानासाहेब
लेखक - कौस्तुभ कस्तुरे 
प्रकाशक - कौस्तुभ कस्तुरे बुक्स 
पाने - ४४०
किंमत - र ४५०

धुरंधर: https://www.amazon.in/Dhurandhar-Peshwa-Nanasaheb-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/dp/9355932235/ref=sr_1_4?qid=1659104818&refinements=p_27%3AKaustubh+Kasture&s=books&sr=1-4

The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa - https://www.amazon.com/Extraordinary-Epoch-Nanasaheb-Peshwa/dp/8192108058
भाषांतर - https://www.amazon.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-Nanasaheb/dp/8192076911/ref=sr_1_1?qid=1659097948&refinements=p_27%3AUday+S.+Kulkarni&s=books&sr=1-1

Wednesday, July 27, 2022

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

जाणाऱ्यांचा वाटा साऱ्या मोजताना दिसं सारा
रिती अशी मातोश्री उते
अदू कसा हसू हसू राऊताला कसे पिसू
खोल खोल मी आता रुते
तरी नाही अळिमिळी
तुझीमाझी निष्ठा काळी
कुंथताना दुखावून रडशील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कुणी नाही भवनातून सगळीकडे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा
अजून काही जातीलच आणि "पुन्हा येईन"च
तिकडून नाथा आणि देवा
वाझियाचे कोटी शत
थैल्यांचे लाखो थाट
रोज रोज आठवत राहतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

इथे वांद्र्याशी माझ्या वेड्या राऊताच्या पाशी
रोजरोज गप्पा झाडा
माझं माझं माझ्या माझ्या माझी माझी माझे माझे
सारा सारा माझा-माझा राडा
पडे माझ्या वाटेतून
आणि मग फुलांतून
जातानाही पायभर चिख्खल ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

आता फक्त बोलायाचे टोमणेच मारायाचे
धरूनिया माईकाचा दांडू
सामन्यात येऊ देत बाकी कॉपी करतात
राऊताच्या ष्टायलीत भांडू
जरा कोर्ट खुलू दे ना
धनुष्यही जाऊ दे ना
मग सेना बंद करून झोपूया ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

Thursday, July 7, 2022

जमिनीखालील अद्भुत नेटवर्क

आम्ही ४ वर्षांपूर्वी आमचं पाहिलं मियावाकी जंगल लावलं. तेव्हा संभाजीनगर मधील सर्वात जुन्या नर्सरीचे तरुण संचालक सागर साकला यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. ते म्हणाले होते की, "झाडांना कळतं!". त्यावर अर्थातच आम्ही विश्वास ठेवला आणि तीनच वर्षात स्वयंपूर्ण असं छोटंसं जंगल तयार झालं. पण झाडांना कळतं कसं? एकमेकांना काय हवं, नको ते समजून कसं घेतात? जंगलातील एखाद्या झाडावर रोग पडला तर तो जंगलभर न पसरता कसा थांबतो? एका झाडाला काय हवं आहे हे त्याच्या शेजाऱ्याला कसं कळतं? त्याच्यातील संवाद कसा चालतो?

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचण्यात आला. जमिनीखालील अद्भुत नेटवर्क! मग त्यावरील अजून काही लेख बघितले. झाडांना एकमेकांची सुखदुःखे कशी कळतात ते उलगडण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. हे आहे झाडांचं www म्हणजे Woodwide Web. हे माती, जमिनीवर पडलेली पाने, झाडाच्या काटक्या आणि मोठ्या प्रमाणातील कार्बन मॉसच्या खाली विकसित होत राहतं. जंगलाच्या वर दिसणाऱ्या मातीच्या थराखाली, झाडांच्या मुळांशी गुंफलेले, विविध बुरशीचे हे एक जाळे आहे. याद्वारे झाडं एकमेकांशी बोलतात. आपल्या अडीअडचणी एकमेकांना सांगतात. 

आपण जेव्हा बुरशी म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त मशरूम दिसतात. पण मशरूम म्हणजे बुरशीचे "फळ" आहे. बुरशीजन्य मायसेलियमचे (Mycelium) एक विशाल नेटवर्क झाडांच्या मुळांशी मातीत असतं. मायसेलियम म्हणजे बुरशीजन्य अतिशय लहान "धागे" असतात जे झाडाच्या मुळांभोवती गुंडाळलेले असतात. हे धागे एकमेकांना जोडलेले असतात. या मायसेलियमने विणलेल्या जाळ्याला "मायकोरायझल (Mycorrhizal) नेटवर्क" म्हणतात. या नेटवर्क मधून कोणत्या झाडाला पाणी, नायट्रोजन, कार्बन आणि इतर खनिजे हवी आहेत ते अन्य झाडांना कळतं आणि ते एकमेकांना मदत करतात. जर्मन वनमाळी (फॉरेस्टर) पीटर वोहलेबेन (Peter Wohlleben) यांनी या विशाल जाळ्याला "वुडवाईड वेब" असे नाव दिले. पीटर वोहलेबेन यांनी आपल्या "The Hidden Life of Trees" पुस्तकात या संशोधनाबद्दल लिहिलेलं आहे. एकूणच झाडांच्या सहजीवनाबद्दल आपल्याला जे काही ज्ञान आहे त्यात ही मोठी क्रांती आहे. झाडं सजीव असतात ही अशीच एक क्रांती जगदीश चंद्र बसूंनी केली होती. त्याच क्रांतीची ही बहुदा पुढची पावलं आहेत. वोहलेबेन यांनी झाडे आपल्याला वाटतात त्याहून कितीतरी अधिक सतर्क, सामाजिक, अत्याधुनिक आणि अतिशय हुशार असतात हे दाखवून दिलं आहे. लवकरच पुस्तक वाचेन तेव्हा कदाचित अजून माहिती लिहू शकेन.

निरोगी जंगलांमध्ये, प्रत्येक झाड या नेटवर्कद्वारे इतरांशी जोडलेले असते, ज्यामुळे झाडांना पाणी आणि पोषक तत्वे वाटून घेता येतात. विशेषतः सावलीच्या भागात वाढणाऱ्या रोपांपर्यंत प्रकाश संश्लेषण करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही. पण महाजन सर सांगतात त्याप्रमाणे हे "सूर्यप्रकाश संश्लेषण" नसून, "प्रकाश संश्लेषण" आहे. तरीही जर प्रकाश कमी पडला तर जगण्यासाठी, रोपटे मायकोरायझल नेटवर्कद्वारे आपली गरज उंच झाडांना सांगतात आणि उंच झाडांनी पाठवलेल्या पोषक द्रव्यांवर अवलंबून असतात. याशिवाय झाडे त्यांच्या नातेवाईकांची, म्हणजे आपल्या प्रजातीची, मुळं ओळखतात आणि बुरशीजन्य नेटवर्कद्वारे कार्बन आणि पोषक द्रव्ये पाठवताना ती आपल्या नातेवाईकांना जास्त अनुकूल कशी राहतील हेही बघतात.

अर्थात यात बुरशीचाही फायदा असतोच. या संदेशांचा देवाणघेवाणीत बुरशी पोषक द्रव्यातील ३०% कर्ब (साखर) स्वतः ठेवून घेते. फॉस्फरस आणि इतर खनिज पोषक द्रव्ये मायसेलियममध्ये जमा होतात, जी नंतर झाडांकडे सुपूर्द केली जातात आणि वापरली जातात. या नेटवर्कमध्ये अर्थातच जुनी-जाणती वृक्ष मंडळी जास्त मदत करतात. यांना mother-tree, मातृवृक्ष म्हटले जाते. अगदी आई बाळांना दूध पाजते, सांभाळते तशी ही मोठी झाडं रोपट्यांची काळजी घेतात. या अनुभवी झाडांची मुळं मातीत अतिशय खोल जातात. तेथील पाण्याचे स्रोत शोधतात आणि ते पाणी वर घेऊन येतात. त्यातीलच काही पाणी पोषकद्रव्यांसह जमिनीच्या वरच्या भागात पाठवतात. उंबराच्या मुळांतून पाणी येतं हे आपल्याला माहित आहेच. ते औषधी असतं. पण ते येतं कारण उंबरासारख्या भरपूर आयुष्य असलेल्या झाडाला अन्य झाडांना मदत करायची असते. झाडांच्या या मायकोरायझल नेटवर्कद्वारे, ही झाडे त्यांच्या शेजाऱ्यांना आजार झाला असेल तर ते संकेतांद्वारे ओळखतात आणि त्यांना औषधेही पाठवतात. आपण कधी पूर्ण तोडलेला वृक्ष बघतो. त्याचा बुंधाच उरलेला असतो. त्यावर प्रकाशसंश्लेषण करणारी पानं नसतात. पण तरीही तो जिवंत असतो, कारण त्या भागातील अन्य झाडं त्याला पोषक द्रव्य पुरवत राहतात. मग मधूनच त्याच्या वठलेल्या बुंध्यावर एक नाजूक गाठ येते आणि नवीन फांदी तयार होते. 

बऱ्याचदा ही झाडं एकमेकांवर खूप अवलंबून असतात. जर दोन झाडं एकमेकांसोबत वाढलेली असतील तर प्रकाश, पोषक द्रव्य हे एकमेकांचा विचार करत वाटून घेतात. त्यात जर दोघांपैकी एक झाड गेलं, तर बहुतेक वेळा दुसरं झाडसुद्धा काही काळात मरण पावतं असं निरीक्षण वोहलेबेन यांनी केलं आहे. डार्विनच्या काळापासून, आपल्याला असंच सांगितलं गेलंय की प्रत्येक सजीव प्रजातीमध्ये आणि म्हणूनच झाडांमध्येही स्पर्धा असते. झाडं पाणी, पोषक द्रव्य आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारे असतात. मग त्यात जे जिंकतात ते उंच होत जातात. हरलेले बिचारे सावलीत जातात आणि मरतात. आता त्या कल्पनेचे खंडन करणारे वैज्ञानिक पुरावे समोर येत आहेत. यातून हेच दिसून येतं की समान प्रजातींची झाडे तर एकमेकांना मदत करतातच शिवाय बहुतेकदा इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. जंगलातील झाडं सहकार्य करत, परस्परावलंबी नातेसंबंधात राहण्यासाठी विकसित झाली आहेत. कीटकांच्या वसाहतीप्रमाणे एकत्रित बुद्धिमत्ता राखून आहेत. उंचच उंच झाडांच्या शेंड्याकडे आपली नजर खेचली जाते, पण खरं काम सुरु आहे ते जमिनीखाली, आपल्या पायाच्या काही इंच खाली.

झाडे पोषक द्रव्य वाटून घेतात. इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. मग डार्विनचा नियम त्यांनी स्पर्धा करावी असे सुचवत नाही का? खरं तर त्या नियमाप्रमाणे, झाडांनी सगळी संसाधने स्वतः वा आपल्याच प्रजातींना मिळतील असा प्रयत्न केला पाहिजे. पण ते तसं करत नाहीत. खरंतर म्हणूनच जास्त काळ जगतात, शेजाऱ्यांना मदत करत निरोगी स्थिर जंगल जिवंत ठेवतात. शेजारची झाडं मरत राहिल्यास जंगल उघडं पडतं. वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे, उरलेली झाडं अधिक प्रकाशसंश्लेषण करू शकतात आणि वेगात वाढू शकतात. परंतु ते असुरक्षित आणि अल्पायुषी ठरतं. कारण उन्हाळ्यात, अधिक सूर्यप्रकाश जमिनीवर येईल आणि जमीन कोरडी करेल. जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडत गेला तर मायकोरायझल नेटवर्क कमकुवत होते. शिवाय वादळवाऱ्यामुळे जंगलाचा विध्वंस होईल. यातील काहीच होऊ नये म्हणून जंगलात झाडं केवळ स्पर्धा करत नाहीत तर सहजीवन जगतात.

रासायनिक आणि हार्मोनल संपर्कयंत्रणेशिवाय झाडं इलेट्रीकल सिग्नल, high frequency चा आवाज सुद्धा काढतात आणि त्याद्वारे संभाषण करतात. अर्थात यावरील संशोधन अजून सुरू आहे. हळूहळू झाडांचं हे संभाषण मानवाला कळेलही... त्याचा वापर माणूस कसा करेल हे मात्र सांगता येणार नाही... :( 

"एका काडातील क्रांती" मध्ये फुकुओका म्हणतात की पाश्चिमात्य संशोधक एका वेळी एक प्रक्रिया घेऊन अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना जे ज्ञान मिळतं ते पृथक असतं. अगदी तेच या संशोधनांमधून पुढे येत आहे. हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात की या प्रक्रिया एकेकट्या होत नाहीत. जेव्हा ते जंगलात फिरतात, तेव्हा त्यांना संपूर्ण गोष्टीचा एक आत्मा जाणवतो, सर्वकाही एकसंधपणे कार्य करते, परंतु त्यांच्याकडे हे मोजण्याचा कोणताही मार्ग नाही. ते मायकोरायझल नेटवर्क देखील मोजू शकत नाहीत. कारण समृद्ध जंगलातील एक चमचा मातीमध्ये अनेक किलोमीटर लांब बुरशीजन्य तंतू असतात.

झाडांनी त्यांच्यासाठी अतिशय सुंदर, समृद्ध असं सहजीवन विकसित केले आहे. मायकोरायझल नेटवर्क हा या सहजीवनाचा अविभाज्य भाग आहे. बुरशी आपल्या स्वतःच्या हितासाठी तर काम करतेच, ते करत असताना, लहान रोपट्यांपासून ते अगदी मोठ्या झाडांचे आरोग्य आणि जगण्याचीही सोय करते. माणसांमध्ये जशी संपर्कातून एकमेकांच्या गरजा पूर्ण करणारी, आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी काम करणारी यंत्रणा आहे तशीच, किंबहुना त्याहून अधिक सक्षम आणि परोपकारी यंत्रणा जंगलात झाडांनी आणि बुरशीने एकत्र येऊन, मायकोरायझल नेटवर्कने तयार केलेली आहे. ही यंत्रणा पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी महत्वाची आहे त्याद्वारेच जंगल निरोगी राहते. आता तुम्ही पुन्हा जेव्हा जंगलात जाल तेव्हा झाडांमधून फिरत असताना, तुम्ही चालताय त्या जमिनीखालच्या विकसित संपर्क यंत्रणेचा विचार नक्की करा. 

- ज्ञानेश

संदर्भ:
https://www.nationalforests.org/blog/underground-mycorrhizal-network
https://www.smithsonianmag.com/science-nature/the-whispering-trees-180968084/