Tuesday, November 12, 2019

परिशोध - एस् एल् भैरप्पा

भैरप्पांच्या ज्या कादंबऱ्या वाचल्या त्यात त्यांना काहीतरी ऐतिहासिक सामाजिक संदेश द्यायचा आहे असं नेहमीच वाटलं. परिशोध ही कादंबरी मात्र याला अपवाद आहे. एका अनाथ मुलाची, विश्वनाथची, वय वर्ष ९-१० पासून ते २७-२८ पर्यंतची गोष्ट यात येते. काळ साधारण १९४८ ते १९६४ आहे.

विश्वनाथ अरसीकेरे हा ९-१० वर्षांचा असताना त्याची आई आणि बहीण प्लेगने मरण पावतात. त्याची आजी (आईची आई) सुद्धा त्याच साथीत मरण पावते. वडील दुसरं लग्न करतात आणि विश्वनाथ "अनाथ" बनतो. त्याला जवळच्या गावातील एक जंगम सांभाळतो. त्याला त्या गावात समदुःखी मित्रही मिळतो. शाळा चांगली सुरू असते, पण विश्वनाथ टुरिंग टॉकीजकडे ओढला जातो आणि त्या गावातून बाहेर पडतो. त्याचे आजोबा (आईचे वडील) त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना तो सापडत नाही.

पुढे विश्वनाथ जीव देण्याचा प्रयत्न करतो पण एका अपघाताने त्यातून वाचतो. मग पुन्हा भिक्षा मागून आणि वाराने जेऊन शिक्षण सुरू होतं. पुन्हा त्यात अडचण येऊन तो एका हॉटेलात काम सुरू करतो. तिथे मिळणारी वागणूक आणि तुटपुंजा पगार याविरुद्ध आवाज उठवण्याच्या प्रयत्न करतो. हॉटेल चालक पोलिसांच्या मदतीने त्याला थर्ड डिग्री देतात पण एका नावाजलेल्या देशपांडे वकिलांची अनपेक्षित मदत मिळते आणि तो सुटतो. पुढे वकिलांकडे काही काळ काम करतो पण तिथेही एक प्रसंग असा घडतो की तो कुणालाही न सांगता तिथून बाहेर पडतो.

त्यानंतर एका संगीत नाटक कंपनीत डेप्युटी मॅनेजरचे काम सुरू करतो. अचानकच त्याला अभिनयाची संधी मिळते आणि ती तो साधतो. चांगला गायक नट म्हणून नावाजला जाऊ लागतो. तेथील अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. ती वयाने याच्यापेक्षा बरीच मोठी असल्याने ती लग्नाला नकार देते आणि त्याच रागात तो नाटक कंपनी सोडून देतो आणि मुंबईला निघतो.

मुंबईत आधी हमाल म्हणून, नंतर व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत राहतो. हे करताना अनेक बरेवाईट अनुभव येतात. शेवटी केवळ पोटापुरतं कमवायचं असं ठरवून आचाऱ्याचं काम करतो आणि उरलेल्या वेळात एका वाचनालयात पुस्तकं वाचतो. त्या वाचनात अनेक प्रश्न पडतात. विशेषतः तत्त्वज्ञान आणि अध्यात्मात त्याला गोडी आहे असं वाचनालयाच्या मालकाला वाटतं. त्यातून त्याची ओळख रंगनाथ स्वामींशी होते आणि तो चिकमंगळूर जवळच्या त्यांच्या आश्रमात येतो. तिथेही त्याला सर्वांचे पाय मातीचे हा अनुभव येतो आणि ती जागा सोडून तो पुन्हा त्याच्या बालमित्राच्या गावी पोहोचतो.

मित्र त्याला मदत करतो. शिक्षण पुन्हा सुरू होतं. लग्नही होतं पण शिक्षणाला सासरे मदत करतील या बोलीवर. सासऱ्यांच्या स्वतःचाच संसार नीट सुरू नसतो. त्यामुळे महिन्याभरात विश्वनाथ बायकोला सोडून मैसूरला जातो. याच दरम्यान त्याची बायको गरोदर राहिलेली असते. बाळाचा जन्म होतो. तरीही विश्वनाथ परतून येत नाही. संध्याकाळी काम आणि दिवसा शिक्षण सुरू ठेवतो. बायको अखेरीस जीव देण्याचा प्रयत्न करते पण त्यात ती वाचते आणि बाळ दगावतं. याचा तिच्यावर आणि जेव्हा विश्वनाथला बातमी कळते तेव्हा त्याच्यावरही खूप खोल परिणाम होतो आणि विश्वनाथ तिला भेटायला येतो. बायको भेट नाकारते आणि आयुष्य पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून जगायचं ठरवते.

विश्वनाथला शिक्षणासाठी मदत करणारे मुख्याध्यापकांना विश्वनाथचा मित्र मध्यस्ती करायला सांगतो. विश्वनाथ देशपांडे वकिलांकडून निघाल्यावर त्यांच्यासारखी डायरी लिहायला सुरूवात करतो. ती डायरी विश्वनाथ बायकोला देतो आणि तीच पुढे मुख्याध्यापकांकडे येते. त्यातून ते विश्वनाथची पूर्ण कथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्यालाच भेटून मग पुढे मध्यस्ती करायचं ठरवतात.

इथे कथा संपते. पुढे काय होतं ते भैरप्पा वाचकावर सोडून देतात.

सगळी कथा ही एक एक पात्र विश्वनाथला शोधत आहेत अशी सांगितलेली आहे. सुरूवातीला कंठीजोईस (विश्वनाथाचे आजोबा) शोध घेतात. मग देशपांडे वकील, नाटकाचे दिग्दर्शक मास्टर, रंगनाथ स्वामी आणि शेवटी मित्र गंगण्णा या पात्रांमधून कथा पुढे सरकते. या शोधामुळे किंवा विश्वनाथला स्वतःला काय करायचं आहे याच्या शोधामुळे कादंबरीचं नाव "परिशोध" असावं...

विश्वनाथ लिहीत असलेल्या डायरीतील एका विचाराचा सारांश - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." हे बहुदा या पुस्तकाचा सार असावं...

No comments:

Post a Comment