Friday, November 22, 2019

अस्पर्शित निसर्ग

क्वेरीन नावाची माझी बेल्जियम मध्ये सहकारी आहे. नेदरलँड्सची नागरिक. ती भारतात, विशेषतः दक्षिण भारतात कामानिमित्त काही वेळा जाऊन आलेली आहे. शिवाय भारतीय कंपनीत काम करते म्हटल्यावर तिने भारताची बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिच्याशी गप्पा चालल्या होत्या. त्यात ती म्हणाली की, "दक्षिणेत प्रचंड मोठी मंदिरं आहेत, भारतात इथल्या ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम सारखी मोठी शहरं आहेत आणि शिवाय हत्ती, वाघ, सिंह सुद्धा आहेत. या बहुविधतेचं मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं."

खरंच या भागात कोणतेच वन्यजीव अस्तित्वात नाहीत. मुळात वनेच अस्तित्वात नाहीत. नेदरलँड्स, बेल्जियम आणि कदाचित अजून अनेक देश असे असतील जिथे नैसर्गिक वनराई शिल्लकच नसेल आणि अर्थातच वन्यजीव सुद्धा.

इथे जवळच मोठं प्राणी संग्रहालय आहे. त्यात हत्ती, वाघ, सिंह, गेंडे, जिराफ... खूप प्राणी आहेत. त्यांची प्रचंड काळजी घेण्यात येते. एखाद्या हत्तीणीला बाळ झालं की टीव्हीवर कौतुकाच्या बातम्या येतात. पण हे सगळं होतं मानवाच्या देखरेखीत, नियंत्रणात!

आमची टीना नावाची वयस्क मैत्रीण आहे. तिलाही भारताबद्दल कोण कौतुक. तिच्याशी एकदा अशाच गप्पा चालू होत्या. जवळच एक खूप मोठं उद्यान आहे - व्रैब्रूक पार्क. छान रांगेत लावलेली झाडं, मध्ये तयार केलेलं तळं, लहान मोठी खेळण्यासाठीची मैदानं, पळायला मातीचा उत्तम रस्ता, फक्त गुलाबाचं उद्यान आणि भरपूर गर्दीवाली झाडं. असं सगळं काही त्या उद्यानात आहे. मला तिथे फिरायला, सायकल चालवायला आवडतं. मी त्याचं कौतुक करत होतो. त्यावर टीनाने एका वाक्यात बोळा फिरवला. ती म्हणाली, "कितीही सुंदर असलं ना तरी ते मानवनिर्मित आहे." पुढे म्हणाली, "भारतात जशी जंगलं मानवी हस्तक्षेपाशिवाय आहेत तशी इथे नाहीतच. एकूणच आम्हा युरोपियनांना आहे ते नष्ट करून, मग आमच्या देखरेखीत, नियंत्रणात निसर्ग असलेला आवडतो."


खूप वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंचं "दुस्तर हा घाट" वाचलं होतं. युरोपात पहिल्यांदा येण्याआधी. त्यात नमू आणि वनमाळी लग्न होऊन आम्सटरडॅमला येतात आणि तिथला वनमाळीचा मित्र अलिस्टरशी नमूचीही छान मैत्री होते. वनमाळी पुढे कुठे कुठे फिरत राहतो पण नमू भारतात परतते. तिला भेटायला अलिस्टर येतो. मग ते शेताजवळच्या एका टेकडीवर जातात. तिथे एका दगडावर बसून अलिस्टर भोवताली बघत नमूला म्हणतो, "तुमच्या भारतात मानवी स्पर्शाशिवाय असलेला निसर्ग आहे. आमच्याकडे नाही." जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा, या वाक्यातील भावना १००% कळाली नव्हती. आज कळतीये.

पण भारतात खरोखरीच असा निसर्ग मानव नावाच्या अत्यंत हीन, स्वार्थी, जैवसाखळीत कुठेच नसलेल्या प्राण्याकडून अस्पर्शित राहील? आपला स्वार्थ, आपल्याला जंगलं, नद्या, वन्यजीव यांना आहे तसे - किमान काही भागात राहू द्यायला तयार होईल. याचे उत्तर आत्तातरी नकारार्थी आहे. काही वर्षांनी भारतातला एखादा अलिस्टर, टीना, क्वेरीन परग्रहावरच्या एखाद्याला सांगेल की, "तुमच्याकडे जसा अस्पर्शीत निसर्ग आहे तसा आमच्या पृथ्वीवर नाही..."

असं होऊ नये ही प्रार्थना 🙏🏼

No comments:

Post a Comment