Tuesday, December 10, 2019

भीती कायद्याची की पोलिसांची

शीर्षटीप - बलात्काऱ्यांना कायद्यात असलेली सर्वात मोठी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. शक्य असेल तर कायद्यात बदल करून गुन्हेगाराला लिंग कापून, चौरंगा करावं असं माझं मत आहे.

हैदराबाद येथील घटनेने मन सुन्न झालं होतं. अशा घटना घडल्या की त्रास होतोच. या केसमध्ये आरोपी लवकर पकडले गेले आणि ते पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना पोलिसांना नाईलाजाने त्यांना मारावं लागलं.

घटना घडल्यानंतर आणि आज एन्काऊंटर ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण सगळे एक समाज म्हणून किती खालच्या इयत्तेत आहोत हे अधोरेखित करतात. सुरुवात आजच्या एन्काऊंटरवरून करूया.

मुद्दा १:
कायदा भारतात नाहीच अशा पद्धतीने कित्येक लोक (ह्यात अनेक मोठे नेते, कलाकार, खेळाडू - एकूण जनमानसावर प्रभाव टाकणारे सुद्धा आहेत) व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा माणसांमुळे आधीच व्यवस्थेवर कमी विश्वास असलेल्या आपल्या समाजाला व्यवस्थेपासून आपण दूर नेत आहोत हे यांच्या लक्षात येत नाहीये. सरकार, GOD FATHER, अब तक छप्पन सारखी समांतर व्यवस्था आपल्याला उभी करायची नसून मूळ व्यवस्थेला सक्षम करायचे आहे. व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नक्षलवादी आहेच. जर असा न्याय आपण स्वीकारत असू तर नक्षलवादही स्वीकारू. आपली निवड सक्षम व्यवस्था असली पाहिजे, सक्षम अधिकारी आपोआप तयार होतील. पण जर व्यवस्थेपेक्षा अधिकारी मोठे ठरत असतील तर व्यवस्था कधीच सक्षम होणार नाही.

या एन्काऊंटरच्या अनेक शक्यता असू शकतात.
१. खरंच आरोपी हल्ला करून पळणार होते, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला.
२. मृतदेह जाळल्यामुळे न्यायवैद्यक चाचणीत बलात्काराचा पुरावा मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले असू शकते.
३. आरोपींमधील बहुदा दोन आरोपी स्वतःला "बाल" म्हणवून घेत असावेत. दिल्लीतील आरोपीप्रमाणे हेही सुटतील असं वाटल्याने पोलिसांनी त्यांना मारलं असावं.
४. कुणीतरी वेगळीच माणसे या केस मध्ये गुंतलेली असावीत. (एका ऐकीव माहितीनुसार पीडित स्वतः पशुवैद्य असल्याने अवैध कत्तलखान्याविरोधात होती. त्यामुळे तिची सुपारी दिलेली असू शकते) अशी नावं बाहेर येतील आणि ते पोलिसांना आणि प्रशासनाला परवडणारे नसेल. यांना मारलं तर सगळी केसच बंद करता येईल.
यापैकी यापुढे केवळ पहिली शक्यता गृहीत धरण्यात येईल आणि फाईल बंद होईल...


 आपल्याला या एन्काऊंटरचा आनंद का होतो -
दिल्लीतील केसमध्ये येत्या काही दिवसात फाशीचा दिवस ठरेल पण तिथे शिक्षा द्यायला जल्लाद उपलब्ध नाही. कठुआ केस अजूनही तपासातच आहे. उन्नाव केस मध्ये आरोपींनी पीडितेसह तिचे कुटुंबच मारून टाकले आहे. कोपर्डी केसमध्ये शिक्षा जाहीर झाली पण अजून त्यापुढील कोणतीच कारवाई नाहीये. केरळमधील ननची तर केस पुढेच गेलेली नाही. तो बिशप सुखेनैव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतोय. या फक्त माहित असलेल्या केसेस आहेत. माहित नसलेल्या हजारो केसेस असतील आणि न नोंदलेल्या तर त्याच्या कित्येक पट...! न्याय देण्यात आणि त्याची अंमलबजावणी होण्यात कित्येक वर्षं निघून जातात. यामुळे अशी एखादी घटना घडली कि त्याचा आनंद होतो.
पण हे लक्षात येत नाही की यातून आपली आधीच कमकुवत असलेली व्यवस्था अधिक कमकुवत होत जाते. गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेची भीती वाटली पाहिजे, पोलिसांची नाही.





मुद्दा २:
आपण एक समाज म्हणून खरंच चांगले आहोत का? कारण हैदराबाद पीडितेवर केवळ याच चार नराधमांनी बलात्कार केला नाही. त्यांच्याशिवाय अजून ८० लाख लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. ८० लाख लोकांनी तिचं नाव पॉर्न साईटवर शोधलं. हे सगळे आपल्याच समाजातील लोक आहेत. अजून किती अधःपतन व्हायचं आहे. जर एन्काऊंटर करणे हाच न्याय असेल तर या ८० लाखांनासुद्धा मारले पाहिजे. एखादीवर बलात्कार होतोय आणि तो पाहावा वाटतो ही कसली विकृती आहे. हे लोक संधी मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष कृती करत नाहीयेत. यांनाही जर संधी मिळाली तर ते नक्कीच बलात्कार करतील.
मुळात बलात्कार हा रोग (disease) नाहीये, ते लक्षण (symptom) आहे. रोग वेगळाच आहे. अजूनही रोग काय आहे ते कळालं नाहीये. काही लोक जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यापासून रोखलं जातं. या गुन्हेगारांना भेटून ही मानसिकता आली कुठून हा शोध घेतला गेला पाहिजे. पण प्रशासन भेटच होऊ देत नाहीत असे अनुभव आहेत.

मुद्दा ३:
सरसकटीकरण आणि धार्मिक/जातीय विभाजन - कठुआ केसच्या वेळी अनेकांनी सरसकट हिंदूंना, देवालयांना आणि देवतांना पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याबद्दल लिहिताना मी लिहिलं होतं ( http://dnyanamhane.blogspot.com/…/i-am-not-ashamed-to-be-hi… )

- लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)
हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

हे टिपिकल फुर्रोगामी लोकांबद्दल होतं. ते असतात सिलेक्टिव्ह. पण त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणारे स्वतःच किती सिलेक्टिव्ह होताहेत हे गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आणि त्याचं वाईट वाटलंय.

Quint सारख्या नाठाळ मीडियावीर त्या पाशाची गरिबी दाखवतात आणि मग विरोधी सूर अधिक भेसूरपणे असा न्याय मागतो.

दिल्ली केस मध्ये मोहम्मद अफरोज "नाबालिक" असल्याने ३ वर्षात सुटला त्याबद्दल हिरीरीने लिहिलं जातं. पण उर्वरित ३ गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही. उन्नाव केसमध्ये कुणी फार बोलत नाही. आत्ताही चार पैकी दोन आरोपी हिंदू आणि दोन मुस्लिम होते. त्यातील फक्त मोहम्मद पाशा बद्दल बोललं जात होतं. पण जे "नाबालिक" म्हणून सुटण्याची शक्यता होती, त्यातील एक हिंदू होता. त्याचं नावही कोणत्या "पोष्टी"त दिसलं नाही. शिवाय "त्यांच्यात" हे "जायज" असतं अशाही पोस्ट्स दिसल्या / whatsapp वर फिरल्या. हा दुतोंडीपणा फुर्रोगाम्यांचा आहे, तो आता या स्वघोषित हिंदुत्ववाद्यांमध्येही येत आहे ही वाईट बाब आहे.

आज संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे व्यक्ती असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. पोलिसांनी खरंच नाईलाज म्हणून गोळीबार केला असेल तरी दुर्दैवाने आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून समाज म्हणून आपण अपयशी होत आहोत हेच अधोरेखित होत आहे.

आपल्या देशाच्या व्यवस्था सक्षम होणं आणि त्यावर सर्व समाजाचा विश्वास असणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.

No comments:

Post a Comment