Friday, February 7, 2020

प्रतिशोध पानिपतचा

कौस्तुभ कस्तुरेचं पुस्तक येणार ही बातमी कळाली - पुस्तकाचा विषय आणि नाव प्रतिशोध पानिपतचा. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा मी बेल्जियममध्ये होतो. मित्रांकडून पुस्तक मागवण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. मग भारतात पोहोचण्याआधी पुस्तक घरी पोहोचेल अशी व्यवस्था केली आणि आल्या आल्या हातात घेऊन पूर्ण केलं.

याआधी हा कालखंड स्वामी या कादंबरीत वाचलाय. पण स्वामी केवळ माधवरावांच्या पुण्यातील/थेऊर मधील वास्तव्याभोवती फिरते. त्याच काळात दिल्लीवर फडकलेला भगवा, नजीबाचा मृत्यू, त्याच्या मुलाची केलेली लांडगेतोड आणि नजीबाची फोडलेली कबर हा भाग त्यात येतच नाही. बाकी पाठ्यपुस्तकात हे कधीच येणार नाही. इंग्रजांनी भारत मोगलांकडून ताब्यात घेतला असं शिकवायचं असल्याने मोगल मराठ्यांच्या ताब्यात होते हे कसं शिकवता येईल. पण कौस्तुभने हा सगळा कालखंड पानिपतचा मराठ्यांनी कसा प्रतिशोध घेतला या परिप्रेक्षात मांडला आहे.

नारबा ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा यात आहे. हा नारबा एक सामान्य मराठी माणूस आहे. याचा भाऊ आणि वडील पानिपतात कामी येतात. हा फडावर काम सुरू करतो आणि अखेरीस उत्तरहिंदच्या स्वारीवर युद्ध जिंकून येतो. असे अनेक नारबा माधवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आणि उत्तरहिंद पुन्हा ताब्यात घेतला. हा नारबा त्या सगळ्यांचं प्रतीक आहे.

आपण कायम एक म्हण ऐकत आलो आहोत - मराठी माणसाचा विश्वास पानिपतात गेला. पण ही वस्तुस्थिती नाहीये. मराठी माणसाचा विश्वास गेला नाही. तो कायम राहिला आणि एकामागोमाग एक उत्तरेतील राज्ये मराठ्यांच्या ताब्यात आली. तीही केवळ १० वर्षात.

हे सर्व घडले ते महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांच्या हातांनी आणि त्यामागे खंबीर नेतृत्व होते माधवरावांचे. माधवरावांना रमाबाईंची साथ होती आणि नाना फडणवीसांचे आणि रामशास्त्र्यांचे सल्ले होते. अर्थातच पाय खेचणारे लोकही होतेच. राघोबासारखा घरभेदीही होता. सदाशिवरावांचा तोतया हेही एक प्रकरण होते. पण या सर्व लोकांना साम-दाम-दंड-भेदाने माधवरावांनी सरळ केलं.

हा सगळा तपशील या पुस्तकात आहे. तोही अतिशय सहज भाषेत. अस्सल ऐतिहासिक पुरावे वापरून अत्यंत सुंदर, रसाळ कादंबरी कौस्तुभने लीलया तयार केलीये.

मला खटकलेल्या काही गोष्टी आहेत. विशेषतः, रमाबाईंनी सती जावं ही इच्छा माधवराव जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्याचं कारण रमाबाईंना राघोबा वापरून राजकारण करतील हे सांगितलं आहे. वास्तविक विश्वासरावांच्या पत्नीमार्फत सुद्धा राघोबांना ते करता आलं असतं, पण ते झालं नाही. त्यामुळे हा तर्क योग्य वाटत नाही. पण याकडे कानाडोळा करून हा कालखंड सर्वांनी अनुभवावा असाच आहे.

या पुस्तकातील काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. ते दुःखाचे अश्रू नाहीत तर ते आहेत आनंदाचे, प्रतिशोधाच्या कल्पनेचे आणि प्रतिशोधाच्या पूर्णत्वाचे. त्यातील तीन विशेष उल्लेखनीय
- नारबा दिल्लीस्वारीला जाताना आईला पत्र लिहितो, ते पत्र आणि पुढचा काही भाग
- दिल्लीवर भगवा फडकतो
- नजीबाच्या थडग्याला महादजी फोडतात

कौस्तुभ, या कादंबरीसाठी खूप धन्यवाद. तुझ्याकडून अजूनही खूप काम होवो या शुभेच्छा!

1 comment:

  1. अतिशय सुंदर पुस्तक परिचय! नक्कीच वाचण्यासारखं पुस्तक! खूप धन्यवाद!

    ReplyDelete