Monday, October 5, 2020

पुस्तक परिचय - उत्तरकांड

पुस्तक परिचय - उत्तरकांड

अगदी खरं सांगतो, आधी हे पुस्तक वाचायची इच्छा नव्हती. कारण हे पुस्तक जेव्हा कळालं तेव्हा, अनुवादाचा प्रकाशन सोहळा आणि त्यावेळी भैरप्पांनी केलेलं मोदीस्तुतीगान हे कळालं होतं. त्यामुळे या पुस्तकात आजच्या संदर्भाने अनावश्यक ओढाताण असेल असं वाटलं होतं. ओढाताण आहे, रामायणातील अनेक प्रसंग गाळले आहेत, किंवा बदलले आहेत. पण ती ओढाताण मोदींना महान ठरवण्यासाठी नक्कीच नाहीये.

एक तर "पर्व" प्रमाणे भैरप्पांनी सर्व व्यक्तिरेखा मानवी पातळीवर आणल्या आहेत. त्यामुळे कोणेतेही चमत्कार नाहीत. असं वाचायला खरंच चांगलं वाटतं. दुसरं म्हणजे सगळी कथा सीता सांगत आहे. त्यामुळे सीतेला झालेले त्रास अगदी थेट दाखवून दिलेले आहेत.

ओढाताण केलेले अथवा बदललेले प्रसंग
- दशरथावर आणि राण्यांवर उपचार केले असं सांगितलेलं आहे. यज्ञही नाही किंवा नियोगही नाही
- सीतेचं स्वयंवर न दाखवता, "ज्यांना पण जिंकायचा त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यावे आणि धनुष्य उचलावा", असं दाखवलं आहे
- कैकयीला दिलेली वचने ही, तिच्या वडिलांना दिलेली आहेत असं दाखवलेलं आहे
- रामाला वनवासासाठी लागणारे एकही हस्तकौशल्य येत नाही ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे. एवढी की जर लक्ष्मण सोबत नसता तर राम आणि सीता जिवंतच राहू शकले नसते
- जटायू आणि रावण युद्ध पूर्णपणे गाळून टाकलंय. मुळात रावणाने सीताहरण न करता त्याच्या सैनिकांनी ते केलंय असाच प्रसंग घेतला आहे
- तारा, वाली, सुग्रीव यांची कथा वेगळीच वाटते
- हनुमान रामापेक्षा सुमारे १५ वर्ष मोठा दाखवलाय ("पर्व" लिहिताना प्रमुख प्रसंग आणि प्रमुख पात्रे यांचे कोष्टक करून त्यांची वये काय असतील त्याचा अभ्यास भैरप्पांनी केला होता. इथे हनुमान १५ वर्षे मोठा दाखवल्याने अचानक भैरप्पांनी हे काय केलंय असं वाटून जातं)
- रावण सीतेवर बळजबरी न करता तिची मनधरणी का करतो, याचे कोणतेही कारण मिळत नाही
- राम सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावतो याचे कारण, सीतेने "हरणाची मागणी केल्याने हे सगळं घडलं" असा विचार करतो, चिडतो हे दाखवलं आहे
- राम अयोध्येला परत येताना अयोध्या कशी दरिद्री झाली ते दाखवलंय. राम येतोय म्हणून गुढ्या-तोरणे उभारली वगैरे काहीच नाही
- जंबुक हत्या ही रामायणातही प्रक्षिप्त असलेली कथा यात येते (यानंतर तर पुस्तक पुढे वाचूच नये असं वाटत होतं. निव्वळ भैरप्पा या नावामुळे पुढे वाचत राहिलो)
- शेवटी राम लव-कुशांची जबाबदारी लक्ष्मणाच्या खांद्यावर टाकून जलप्रवेश करतो. वास्तविक लक्ष्मण हा रामाच्या आधी जलप्रवेश करतो असं मी वाचलेलं आहे

एवढे बदल, एवढी ओढाताण असली तरी पुस्तक का वाचायचे...
१. सीतेच्या तोंडून आलेलं हे रामायण आहे. संपूर्ण मानवीकरण आणि स्त्रीमनाच्या गाभ्यातून आलेलं रामायण नक्कीच वेगळं वाटतं
२. रामाच्या दृष्टीने त्याने शेवटी दिलेली उत्तरे पूर्णपणे पटत नाहीत, तरीही प्रामाणिक वाटतात. त्यातून राजा आणि त्याची कर्तव्ये, त्याही पुढे कर्तव्यांशिवाय काहीच नाही... हे दिसतं आणि त्याचा अर्थातच त्रासही होतो
३. कथेच्या शेवटी बृहदारण्यक उपनिषद आणि त्यातील तत्त्वांवर भाष्य आहे. मुळात माणूस प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच करत असतो. साहित्य, कला तर स्वानंदासाठीच असते असं म्हणतात. मी धर्माचरण केलं तर मला स्वर्ग मिळेल, म्हणून मी धर्माचरण करतो. इतकंच नाही तर, मी प्रेम केल्याने मला समाधान मिळतं, म्हणून मी प्रेम करतो. प्रेम, भक्ती, त्याग, समर्पण या सगळ्या बाबी या केवळ 'आत्म'च्या आनंदाशी जोडल्या गेल्या आहेत. तो आनंद मिळतो, म्हणून लोक हे सगळं करतात. बृहदारण्यक उपनिषदात कोणतीही गोष्ट, "स्व" अथवा "आत्म"साठी प्रत्येकजण करत असतो हे सांगितलं आहे. त्यावर पुस्तकातील काही भाग - "तुझा आनंद तूच शोधला पाहिजेस, असं याज्ञवल्क्य महर्षींनी आपल्या पत्नीला थेटच सांगितलं होतं. संसाराचा त्याग करून परिव्राजकाच्या जीवनाला प्रारंभ करताना त्यांनी सांगितलेला 'आनंद' कोणता? आत्मतत्त्व हेच सगळ्याचं अंतिम सत्य आहे आणि त्यामुळे लौकिक गोष्टी, पुत्र-पौत्र यांच्यापेक्षा प्रिय असतं. त्यामुळे ‘आत्म’च प्रिय असतं हे जाणून त्या ‘आत्म’चीच उपासना केली पाहिजे. ‘आत्म’ हेच आनंदाचं मूळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे! पती-पत्नी-मुलं हे संबंध मर्यादित आहेत, असं सांगतात."
शेवटच्या प्रकरणातील उपनिषदावरील भाष्य या पुस्तकाला प्रचंड मूल्य प्रदान करतं.
४. याशिवाय रामाचा आणि सीतेचा शेवट अतिशय भावपूर्ण रेखाटलेला आहे. वनवासाच्या मध्यापर्यंत एकतानता असलेली राम-सीतेची जोडी वनवासाच्या अखेरच्या पर्वापासून एकमेकांना समांतर चालत जाते. तिचा शेवटही समांतर होतो. अगदी शेवटी महर्षी वाल्मिकी म्हणतात - ‘‘तारका, काय सांगू? पक्ष्यांच्या जोडीतल्या एकाला मारून त्यांच्यामध्ये विरह निर्माण झाल्यानंतर मनात निर्माण झालेली वेदना व्यक्त करण्यासाठी मी राम-सीतेच्या जीवनाचा आधार घेतला. निदान हे काव्य तरी सुखान्त करायची माझी आस होती; पण ते शक्य झालं नाही. कवीला काहीही शक्य आहे, हे खरं नाही बघ! याचंच वैफल्य मनाला ग्रासून टाकत आहे.’’

असा दुःखांत असलेलं हे पुस्तक... "उत्तरकांड"

पुस्तक - उत्तरकांड
लेखक - एस् एल् भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने - ३०४
मूल्य - ₹३९५

No comments:

Post a Comment