महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.
संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...
तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.
पहिल्या संकटापासून सुरुवात करू या
* लाक्षागृह - हवापालट म्हणून कुंती आणि पांडव यांना दुर्योधन आणि शकुनी नवीन महालात पाठवतात. तिथे काहीतरी दगाफटका होणार याची कुणकुण लागते. भीम विदुराच्या मदतीने अंदाज घेतो. तिथून जवळच्या गावात कुठे जाता येईल ते पाहतो. संपूर्ण भुयार एकहाती खोदतो. कौरवांनी आग लावण्याआधीच आई आणि भावंडांना सुखरूप बाहेर काढतो.
* हिडिंब - लाक्षागृहातून बाहेर पडल्यावर ते अरण्यात येतात. त्या अरण्यावर राज्य असतं हिडिंब राक्षसाचं. आपल्या भावंडांना संरक्षण म्हणून भीम प्रत्येक रात्र जागून काढतो आणि हिडिंब जेव्हा हल्ला करतो तेव्हा त्याचा वध करतो. त्याची बहीण जेव्हा मागणी घालते तेव्हा आईच्या संमतीने मोठ्या भावाच्या आधी लग्न करतो. पुढील प्रवास सुखकर करून घेतो.
* बकासूर - संपूर्ण गाव बकासुराचा दहशतीखाली असतं. कुंती विश्वासाने पाठवते केवळ भीमाला. भीम बकासुराला कोणत्याही शस्त्राविना मारतो आणि केवळ आपलं कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव सुरक्षित करतो
* द्रौपदी स्वयंवर - अर्जुन पण जिंकतो पण त्याचवेळी अनेक राजे विरोधात उभे राहतात. भीम लढण्यासाठी त्याच सभागृहाचा खांब तोडून हातात घेतो आणि युद्ध सुरू होण्याआधीच संपतं
* द्यूत - जेव्हा द्रौपदीची विटंबना होत असते त्यावेळी भीष्म, द्रोण, कृप आणि सगळे पांडव खाली मान घालून बसलेले असतात. तेव्हा भीम प्रतिज्ञा करतो की, दु:शासनाची छाती फोडून ते रक्त पिईन आणि त्या रक्ताने द्रौपदीला स्नान घालेन आणि दुर्योधनाची मांडी फोडून त्यास ठार करेन. या प्रतिज्ञांनी ज्येष्ठांना जाग येते आणि सुरू असलेली विटंबना थांबते, युधिष्ठिराला गेलेलं राज्य मिळतं
* वनवास - हे होऊनही पुन्हा युधिष्ठिर द्यूत खेळतो आणि राज्य घालवतो. १२ वर्षांच्या वनवासात जयद्रथ द्रौपदीची पुन्हा विटंबना करू पाहतो. त्यावेळी त्याला पराजित करून आणि अपमानित करूनच भीम थांबतो.
* कीचकवध - अज्ञातवासात कीचक अनेकदा द्रौपदीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. हे युधिष्ठिराच्या समोर घडत असताना केवळ आपण ओळखले जाऊ आणि पुन्हा वनवास नशिबी येईल, म्हणून तो काहीच करत नाही. अखेरीस द्रौपदी भीमाला सांगते. विराट राजाचा साला आणि राज्याचा सेनापती असलेल्या महाशक्तिशाली कीचकाचा भीम केवळ हातांनी वध करतो. तोही असा की कुठेही आवाज जाणार आणि. त्याच्या शरीराचा कणिक मळल्याप्रमाणे गोळा करून भीम त्याला संपवतो.
* विराट राजासाठी युद्ध - विराट राजाकडे पांडव असल्याची कुणकुण दुर्योधनाला लागते आणि त्याच्या गायी पळवून तो युद्धाची कुरापत काढतो. तेव्हा सर्वच पांडव पराक्रमाने विराटाच्या लहान राज्याला वाचवतात. इथे भीमाने एकट्याने कोणताही पराक्रम केलेला नाही. तरी हा प्रसंग मुद्दाम घेतला. लक्षात घ्या या युद्धाच्या वेळी कर्णाकडे कवच कुंडले होती. त्याचा रथ कुठे जमिनीत अडकला नव्हता. त्याने कुंतीला कोणतेही वचन दिलेले नव्हते. त्याचा सारथी शल्य नव्हता. भीष्म त्याला वाईट बोलले नव्हते. तरीही कर्ण असलेली बाजू हरली! एवढं लक्षात घेतलं तरी "मृत्युंजय"चं भूत मानेवरून उतरेल.
* जरासंध वध - राजसूय यज्ञ आणि त्यानंतर वाढवलेलं राज्य हा सर्वच पांडवांनी केलेला पराक्रम होता. पण याच दरम्यान ज्या जरासंधामुळे कृष्णाला मथुरा सोडून द्वारका वसवावी लागली होती (आणि त्यामुळे कृष्णाचे एक नाव रणछोड आहे) त्या जरासंधाला द्वंद्वयुद्धात भीमाने हरवलं. नुसतं हरवलं नाही तर त्याचे हातांनी दोन तुकडे केले.
* महाभारत युद्ध -
- सुरू होताना भीमाला कोणतेही प्रश्न पडले नाहीत (अर्थात अर्जुनाला पडले त्यामुळे आपला फायदा झाला :-))
- भीम आणि हिडिंबेचा मुलगा घटोत्कच जेव्हा मारला गेला तेव्हा भीमाने कोणतीही आततायी प्रतिज्ञा घेतली नाही (अर्जुनाने अभिमन्यू मारला गेल्यावर जयद्रथाला सुर्यास्ताच्या आधी मारेन अथवा अग्निप्रवेश करेन अशी प्रतिज्ञा केली होती)
- सर्वच्या सर्व धृतराष्ट्र पुत्रांना भीमाने मारलं. हे करताना कोणतीही बाह्य मदत त्याने घेतली नाही (उदा - शिखंडी, "नरो वा कुंजरो वा", सुदर्शन चक्राने सूर्य झाकोळने...)
- युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा अश्वथाम्याने द्रौपदीच्या पाचही पुत्रांना झोपेत मारलं तेव्हा द्रौपदीचं सांत्वन करणारा पहिला आणि एकमेव भीमच होता.
- दुःशासनाची छाती फोडून त्याचे रक्त प्याला आणि त्याच रक्ताने द्रौपदीला अंघोळ घातली (त्यानंतर द्रौपदीने आपले केस पुन्हा बांधले). दुर्योधनाची मांडी फोडून त्याला मारलं. इथे नियम मोडू कि नको या विवंचनेत तो अडकला नाही. द्रौपदीचे सगळे सूड भीमाने पूर्ण केले.
असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.
No comments:
Post a Comment