Monday, September 20, 2021

Resilience

 Resilience हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. Flexibility, Plasticity, Elasticity असे त्याचे बरेच अर्थ सांगितले जातात. मराठीत लवचिकता वगैरे याचे अर्थ होतात. पण या पर्यायी शब्दांतून Resilience चा नेमका अर्थ लागत नाही. मला या शब्दाची लागलेली व्याख्या म्हणजे "एखाद्याची कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता असते" तिला Resilience म्हणतात.

डेव्हिड ऍटनबरो आजोबांच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये हा शब्द आला.. आणि साक्षात्कारासारखा कळाला, त्याची ही गोष्ट!

२६ एप्रिल १९८६ ला चेर्नोबिल येथे जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात झाला. चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान भयानक स्फोट झाला आणि अण्विक गळती सुरू झाली. आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये हे प्रदूषण पसरलं. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. याशिवाय किरणोत्सर्गाच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे चार हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असावेत.

यानंतर हा पूर्ण परिसर कायमचा प्रदुषित घोषित केला गेला. एकूण साडेतीन लाख नागरिकांचे स्थलांतर केलं गेलं. या सगळ्या घटनेमुळे सुमारे ६८ अब्ज डॉलरचा खर्च झाला. या दुर्घटनेनंतर काही तासांतच तिथून आणि आजूबाजूच्या परिसरातून कर्मचारी, नागरिक यांना सुरक्षित जागेवर हलवलं. स्फोट आणि त्यानंतरचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात रशिया, युक्रेन आणि बेलारूस या देशांमध्ये पसरले. त्याहून कमी प्रमाणात प्रदूषण हे अन्य १० देशांमध्येही पसरले. एकूण १ लाख ९१ हजार वर्ग किलोमीटर्स एवढ्या भागात हे प्रदूषण पसरलं. यातील १० हजार वर्ग किलोमीटर्स एवढा भाग हा मानवी वस्तीसाठी अयोग्य ठरवला गेला. पुढील चार वर्षात या भागात जे प्राणी जन्मले त्यांच्यात जन्मतःच अनेक व्यंगे होती आणि ते लगेच मृत्यू पावले. या सर्व घटनेमुळे या मोठ्या भागातून माणूस नावाचा प्राणी दूर गेला आणि मग निसर्गाने आपलं काम सुरू केलं... Resilience!!!

या प्रदूषित जागेपैकी १० वर्ग किलोमीटर्स जागा पूर्ण जळाली होती. तेथील मोठमोठाले वृक्ष जळून सर्व भागातील जंगल संपलं होतं. त्यामुळे या जागेला रेड फॉरेस्ट असं नाव पडलं. पहिल्या २-४ वर्षांनंतर या भागातील जैवविविधता कित्येक पटींनी वाढली. १९८६ नंतर पहिल्यांदा १९९६ मध्ये BBCने इथे एक डॉक्युमेंट्री (Inside Chernobyl's Sarcophagus) तयार केली. त्यात अणुभट्टीतून लहान मोठे पक्षी आत बाहेर जाताना दिसले. तरीही हा भाग मानवी वस्तीसाठी योग्य नव्हताच. त्यामुळे माणूस या भागापासून दूरच राहिला आणि निसर्गने आपलं काम सोडलं नाही.

२०१६ला म्हणजे या अपघातानंतर ३० वर्षांनी मरीना शक्विरिया नावाची अभ्यासक आपल्या टीमसह या भागात गेली. तिथे निसर्गाने केलेल्या किमयेने आश्चर्यचकित झाली. इतक्या भयंकर अपघाताचे ठिकाण हे कित्येक वन्यजीवांच्या हक्काचे आश्रयस्थान बनले होते. हरणं, अस्वलं, बीव्हर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, घोडे, गाढवं... असे कित्येक प्राणी तिथे आहेत. तिथे त्यांची पूर्ण परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यात मानवाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने ती बहरत गेली. या भागात कॅमेरा ट्रॅप्स बसवले आहेत. त्यात दिसणारी या सर्व प्राण्यांची संख्या वन्यजीव अभ्यासकांना अक्षरशः थक्क करून सोडते. येथील किरणोत्सारी पाण्यात हंस सहज विहार करत असलेले दिसतात. येथील किरणोत्सर्गाचा वन्यजीवांच्या संख्येवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलट माणूस नसण्याचा मात्र अत्यंत अनुकूल परिणाम झाला आहे. Przewalski नावाची घोड्यांची एक लुप्त होत चाललेली प्रजाती आहे. या भागात ही प्रजाती व्यवस्थित वाढत आहे. अन्य कुठेही न दिसणारी यांची उपप्रजाती केवळ याच भागात बघायला मिळते. अशीच एक बीव्हरचीही प्रजाती इथे आनंदाने बहरत आहे. येथील बीव्हरचे महत्व हे आफ्रिकेतील हत्तींच्याएवढेच आहे. येथील प्राण्याच्या आणि वनस्पतींच्या सहचर्याने जमीनही बदलत आहे. मोठमोठाली झाडं जेव्हा पडतात तेव्हा त्यांचं होणारं विघटन हे जमिनीला अधिक सुपीक करत आहे. अभ्यासकांच्या मते १०० वर्षांपूर्वी येथील जल-जमीन-जंगल जसं होतं, तसंच ते काही वर्षात पुन्हा होईल. युक्रेन आणि बेलारुसमधील १६०० वर्ग किलोमीटर्स परिसर हा आता अभयारण्य बनला आहे. गम्मत म्हणजे युरोपातील ते सर्वात मोठे अभयारण्य आहे.

हेच ते Resilient असणं... "कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता"

हे सर्व बघता मानवी वावर हा आण्विक प्रदूषण / किरणोत्सर्जन यापेक्षा निसर्गाला अधिक घातक आहे. कधीतरी माणूसही यातून शिकेल, नाहीच शिकला तर निसर्ग समर्थ आहे. तो नक्कीच धडा शिकवेल. एखादा मोठा धक्का बसण्याआधी माणसाने जागं होऊन निसर्गात लुडबूड कमी करावी, हेच यातून शिकावे...

संदर्भ:

https://en.wikipedia.org/wiki/Chernobyl_disaster

https://www.nationalgeographic.com/.../060418-chernobyl...

https://en.wikipedia.org/wiki/Red_Forest

Few other documentaries

Monday, August 30, 2021

बिनाखर्चाचे खेळ

मी लहान असताना, म्हणजे माझ्या दुसरीपर्यंत, फुलंब्रीला राहत होतो. माझे पट्टमित्र म्हणजे स्वाती पुराणिक आणि प्रदीप निंबाळकर. मी आणि स्वाती, भराडकरांच्या वाड्यात राहायचो. प्रदीपचा वेगळा वाडा होता. आमची कुटुंबमैत्री असलेलं आणखी एक कुटुंब म्हणजे गोलटगावकर. प्रदीपच्या वाड्याच्या समोरून उजवीकडे वळालो की फर्लांगभर अंतरावर ते राहायचे. त्यांची मुलं केदार आणि योगिता. केदार माझ्यापेक्षा मोठा आणि योगिता छोटी. आमचा खेळ काय तर भराडकर वाड्यावरून निघायचं. मध्येच एखादी काडी शोधायची. प्रदीपला हाक मारायची. तिथून ते गोलटगावकरांच्या घरापर्यंत जेवढं म्हणून गाजरगवत दिसेल ते झोडपून काढायचं. एकूण अंतर फार तर १० मिनिटं. पण आम्ही किमान अर्धा पाऊण तास बाजीप्रभू आणि तानाजी आणि मुरारबाजी आणि काय काय होऊन गनिमांना झोडपत गोलटगावकरांच्या घरी पोहोचायचो.

केदार आणि प्रदीप, मी आणि स्वातीपेक्षा शूर होते. ते भिंगोटे पकडायचे. त्याला हलका दोरा बांधायचे. मग भिंगोटे सोडून, दोऱ्याचं दुसरं टोक पकडून त्या भिंगोट्यामागे पाळायचे. मी आणि स्वाती त्या दोघांच्या मागे.

कधीतरी दोन तीन कुटुंबांची एकत्र सहल  म्हैसमाळला जायची. तिथे आम्ही सगळे पोरं कधी करवंदाच्या जाळीत करवंद शोधायचो, कधी वाहता ओढा असेल तर त्या पाण्याच्या गिरक्या बघत बसायचो. देवीच्या मंदिराच्या मागे आंब्याचं मोठं झाड होतं, त्यावर चढायचो. मंदिरापासून ते वरच्या गेस्टहाऊस पर्यंत पळत जायचो आणि परत यायचो. यात स्पर्धा नसायची, उगाच पळत जायचं आणि यायचं. आमचा दिवस दिवस हे खेळ खेळण्यात जायचा.

उन्हाळ्यात २ चिंचोके घ्यायचे, ते उभे फोडायचे. मग एक पाट घ्यायचा. उलटा करून त्यावर खडूने चंफुलचे चौकोन करायचे. मग चार आकारांचे दगड किंवा काहीही घ्यायचं आणि खेळ सुरू. आख्खी दुपार या चंफुलमध्ये सहज जायची. तेवढ्या वेळात कधी पापडाच्या लाट्या तयार व्हायच्या, कधी लोणच्याचा खार तर कधी कुरडायांचा चीक व्हायचा. मग तोच खाऊ आम्हाला मिळायचा.

नंतर आम्ही संभाजीनगरला राहायला आलो. तिथे सिडकोत एन ९ - एल ५१ मध्ये राहत होतो. ५१ क्रमांकाचं घर रांगेत पाहिलं. याच्या पलीकडे एक झरा होता. तेव्हा पावसाळ्यात वाहायचा. त्यात डिंभक, लहान मासे सुळूसुळू पोहायचे. आम्ही ओंजळीत माश्यांसह पाणी घ्यायचो आणि परत सोडून द्यायचो. कधीतरी चतुरांचा मोठा थवा यायचा. त्याच्याकडे बघत बसायचो. पाण्यावर तरंगणारे कीटक असतात. ते या झऱ्याच्या डोहात (घरापासून थोडं पुढे, बळीराम पाटील शाळेकडे जाताना हा डोह होता) असायचे. त्यांच्या हालचाली, त्यामुळे पाण्यावर उठणारे तरंग आम्ही बघत असू. ते कसे तरंगतात याचं फार फार अप्रूप वाटे. 

हे आणि असे कितीतरी बिनाखर्चाचे खेळ आम्ही खेळत असू. आज याची आठवण झाली कारण मी आणि अमोहा घरातून खाली सोसायटीत गेलो. साधारण १०-१५ मिनिटं शोधल्यावर आम्हाला २-३ छान पीसं सापडले. त्यातलं एक खेळायला उत्तम होतं. ते घेऊन पुढे एक तास आम्ही खेळत होतो. मज्जा आली👨‍👧



कर्ण

हॅरी - आपण आत्ता कुठे आहोत?

प्रोफ. डम्बलडोर - तुला काय वाटतंय?

हॅरी - मला वाटतंय की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. फक्त इथे गर्दी नाहीये, स्वच्छता जास्त आहे...

प्रोफ. डम्बलडोर - अच्छा...

हॅरी - आता मला परत जावे लागेल ना?

प्रोफ. डम्बलडोर - ते तुझ्या निवडीवर अवलंबून आहे.

हॅरी - म्हणजे मला ठरवता येईल?

प्रोफ. डम्बलडोर - मी तुला खूप आधी सांगितलं होतं की तू किंवा कुणीही जे काही आहात ते निवडीवर अवलंबून आहे. कुणाचीही निवड ही क्षमतेहून अधिक महत्वाची असते. यासाठी तुला एक गोष्ट सांगतो.

तुला महाभारत माहित आहे. तुझ्या अभ्यासक्रमात होतं... त्यात एक पात्र होतं - कर्ण! तो कुंतीचा पुत्र होता. विवाहाच्या आधी झालेला होता. त्यामुळे कुंतीने त्याला त्यागले होते. त्याला वाढवले एका सारथी कुटुंबाने. राधेने त्याचा स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे सांभाळ केला. त्याची दुर्योधनाशी मैत्री झाली. जेव्हा तू, रॉन आणि हर्मायनी यांच्यातील कुणी चूक करत असेल तर अन्य दोघे, किमान एकजण ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? यालाच निवड म्हणतात. मैत्री अशीच असली पाहिजे. पण कर्णाने कधीही दुर्योधनाला वाईट वागण्यापासून थांबवले नाही. दुर्योधनाने जेव्हा भीमाला विष दिले, तेव्हा तर कर्ण आणि अर्जुन यांच्यातील तीव्र स्पर्धा सुरू व्हायची होती. भीमावर केलेल्या विषप्रयोगाला त्याने थांबवले नाही. पांडवांना जाळून मारावे म्हणून लाक्षागृहात पाठवले, चुकीच्या पद्धतीने द्यूत खेळले, द्रौपदीची विटंबना केली, विराट राजाच्या लहानश्या राज्यावर आक्रमण केलं, पांडवांकडून पाच गावांचा प्रस्ताव कृष्णाने आणला तोही नाकारला. युद्धात अभिमन्यूला अनेकांनी मारलं. तो निःशस्त्र झाला होता तरीही कर्णाने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कर्ण, जेव्हा अर्जुन त्याला निःशस्त्र असताना मारत होता तेव्हा नियमांची ग्वाही देत होता. जेव्हा मैत्री करता तेव्हा ती निभावता आली पाहिजे. निभावणे म्हणजे प्रत्येक बाबतीत सोबत असणे नव्हे, तर मित्राला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे मैत्री. हीच ती निवड.

हॅरी - बरोबर. पण किमान तो मैत्री निभावताना दुर्योधनाच्या सोबत तर राहिला ना?

प्रोफ. डम्बलडोर - नाही ना... त्याचा अहंकार मैत्रीच्या वर होता... जेव्हा रॉन जखमी होता तेव्हा त्याला तू आणि हर्मायनी सगळे निर्णय घेत आहात आणि त्याला साईडलाईन केलं जातंय असं वाटलं. त्याचा अहंकार, मैत्री आणि प्रेम दुखावलं गेलं. तो निघून गेला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे. तेव्हा तुमचा काहीही पत्ता नसताना रानोमाळ तो तुम्हाला शोधत फिरला आणि जेव्हा ते लॉकेट फोडायचे होते तेव्हा तो तुझ्यासोबत होता. पण कर्णाने काय केलं... दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई तो पहिले १० दिवस लढलाच नाही. कारण त्याला भीष्म म्हणाले की तू अर्धरथी आहेस. हा त्याला अपमान वाटला. त्यामुळे जोवर भीष्म सेनापती आहेत तोवर त्याने लढाईत भागच घेतला नाही.

हॅरी - पण त्याच्यावर लहानपणापासून अन्याय झाला. त्याला आयुष्याच्या सर्वात मोठ्या लढाईच्या वेळी वाटणारच ना, की त्याला महारथी म्हणावे...

प्रोफ. डम्बलडोर - अन्याय कुणावर झाले नाहीत... माझं आयुष्य तुला आता बरंच कळालं आहे. मी, माझा भाऊ, बहीण, आई... कितीतरी कठीण गोष्टी होत्या. त्या सर्व मागे ठेऊन योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. नियतीने तुझ्यावरही किती अन्याय केलाय. तू वर्षाचा होतास तेव्हा आईबाप गेले. मावशीने सांभाळ केला, तोही नाईलाजाने. शाळेत तुला काही चांगले, प्रेम करणारे शिक्षक भेटले तर काही सदैव भीती घालणारे, तुझा अत्यंत द्वेष करणारे भेटले. मित्र भेटले, सोबतच वैरीही भेटले. माझ्यासारखा तुला निव्वळ एक शस्त्र म्हणून तयार करणारा हेडमास्तर भेटला... हे होऊनही तू आज माझ्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने बोलत आहेस. ज्याने तुझ्याशी सदैव वैर पत्करलं, जो माझ्या मृत्यूला एका अर्थाने कारणीभूत झाला, त्या ड्रेकोला तू काही तासांपूर्वी मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलंस... या सगळ्या तुझ्या निवडी होत्या आणि त्यातूनच तुझं चारित्र्य दिसून येतं. कर्णाला तर उदाहरण म्हणून कृष्ण होता. त्याच्यावरही नियतीने कितीतरी प्रकारे अन्याय केला आणि तरीही तो न्यायाच्या, नीतीच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्यामुळे हॅरी, हे कायम लक्षात ठेव की एखाद्या व्यक्तीची क्षमता तिचं चारित्र्य ठरवत नाही तर त्या व्यक्तीची निवड तिचं चारित्र्य ठरवते. त्यामुळे तुला निवड करायची आहे. तू आता काय करणार?

हॅरी - मला ठरवावे लागेल...?

प्रोफ. डम्बलडोर - हो

हॅरी - माझ्यापुढे पर्याय काय आहेत?

प्रोफ. डम्बलडोर - तू आत्ताच म्हणाला होतास ना की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. त्यामुळे परत जाण्याचं ठरवलंस तर परत जाऊ शकशील, किंवा तू जर ठरवलं इथे थांबायचं तर असं समज की एक ट्रेन येईल आणि तुला घेऊन जाईल

हॅरी - कुठे?

प्रोफ. डम्बलडोर - पुढे...




Monday, August 2, 2021

मेकेलीन - पूर व्यवस्थापन

आमच्या मेकेलीनची दैलं (Dijle) नदी बेल्जियमच्या वालोनिया या डोंगराळ प्रांतात उगम पावते. तिथून थोडं पुढे आलं की वालोनिया आणि फ्लॅण्डर्सची सीमा होते आणि मग सपाट फ्लॅण्डर्समध्ये सावकाश वाहते. अनेक लहान मोठ्या गावातून, बाहेरून वळणं घेत घेत ल्यूवन या विद्यापीठाच्या गावाबाहेरून मेकेलीनमध्ये येते. एवढ्या सगळ्या प्रवासात सर्वात मोठं गाव मेकेलीन. सगळी मिळून नदी ८०-९० किलोमीटर. बेल्जियम मध्ये सगळ्याच नद्यांच्या काठांना उंच करून दोन्ही तीरांवर सायकल रस्ता केलेला असतो. तसा तो दैलंला पण आहे. साधारण २० मीटर खोल पात्र, दोन्ही सायकल ट्रॅकमध्ये ४०-५० मीटर अंतर, म्हणजे पात्राची जास्तीत जास्त रुंदी ५० मीटर. अशी छोटीशीच नदी. तरीही दोन्ही किनाऱ्यांवर उत्तम शेती, पशुपालन असलेली. नदी छोटी असली, तरी पाणलोट क्षेत्र डोंगरात आहे. पुढेही लहान मोठे ओहोळ या नदीला भेटतात. शिवाय बेल्जियम मध्ये एकदा पाऊस सुरू झाला की पडsssत राहतो. त्यामुळे नदीला पूर येणं फार काही विशेष नाही. पात्राची रुंदी जास्त नसल्यानेही नदीचा वेग जास्त पाऊस झाल्यास बराच वाढतो आणि सखल भागात पूर येतो. मेकेलीन हे गाव या नदीच्या किनाऱ्यावर दुतर्फा आहे.
मेकेलीनमध्ये मोठं बांधकाम आधीही झालेलं होतं. सन १२०० ते १५२० मध्ये संत रॉम्बाऊट्स कॅथेड्रल (आम्ही याला रामभाऊ म्हणतो) बांधलं गेलं. (राजाला याच्या पायऱ्यांवरून चंद्रावर जायचं होतं. पण चंद्र हळूहळू जास्त वर गेला आणि मग बांधकाम थांबवलं). नंतर २०० वर्षांनी ल्यूवन कालवा बांधला (याबद्दल पुढे लिहितो) त्यामुळे छोटासा बायपास बांधणं फार काही अवघड नव्हतं. मेकेलीनच्या थोडं आधी नदीला एका वळणावर बायपास दिला. दोन्हीकडे बंधारे घातले. बायपास चांगला खोल ठेवला. तेव्हाच्या मेकेलीनला चहूबाजूंनी भिंत होती आणि त्यापलीकडे खंदक. याच खंदकाचा उपयोग करून हा बायपास बांधला आणि जिथून अँटवर्प शहरासाठीचा जलमार्ग सुरू होतो तिथे पुन्हा मूळ नदीला जोडला. हे सगळं पूर्ण केलं १८९३ ते १९०४च्या दरम्यान. आधीपासून खंदक असल्याने कदाचित सोपं गेलं असेल. पण खंदक अधिक खोल करताना यात लोहयुगीन वस्तू आणि लाकडी होड्या सापडल्या. त्या अर्थातच जतन करून ठेवल्या आहेत. आता या भिंतीच्या आणि बायपासच्या मध्ये मेकेलीनचा रिंग रोड आहे. त्यामुळे पंधराव्या शतकापासून असलेले नकाशे आणि आत्ता गुगलमॅप वरील नकाशा यात फार फरक जाणवत नाही. हा बायपास झाल्यापासून गेल्या शंभर सव्वाशे वर्षात नदीने कधीच मेकेलीनला वाहून नेलं नाही.

पण निव्वळ बायपासने पूर थांबत नसतात. पाण्याला जशी वाहून जाण्यासाठी जागा हवी, तशी गती कमी करण्यासाठी पण जागा लागते. जर नदीचा जोर प्रचंड वाढला तर मूळ नदी आणि बायपास नदी या दोन्हीवरील बंधारे नदी सहज तोडू शकते. यासाठी इथे पाणथळ आहेत. ते आधीपासून आहेत, की नंतर तयार केले याची माहिती मिळाली नाही. त्यातील एक आहे मेकेलीन शहराच्या आधी, बायपासच्या थोडासा आधी. याचं नाव मेकल्स ब्रूक. इथे दोन तळी आहेत आणि मोठ्या भागात चर आहेत. नदीचे पाणी जास्त झाले तर नदी आणि हे पाणथळ यातील दरवाजे उघडून पाण्याला पसरायला जागा दिली जाते. पाणी पसरलं की वेग कमी होणारच. या दोन तळ्यांपैकी एकाचा पूर्ण कमर्शियल उपयोग करून दि नेकर नावाचे स्पोर्ट्स सेंटर तयार केले आहे. मात्र दुसरे तळे आणि पाणथळ यात माणसांना मज्जाव आहे. थोडेफार रस्ते आहेत, पण केवळ चालत जाता येईल असेच. तेही अत्यंत आतपर्यंत नाहीत. त्यामुळे इथे माणूस नावाच्या प्राण्याचा वावर अत्यंत मर्यादित असतो. अर्थातच अन्य प्राणी-पक्षी सुखाने नांदतात.

असंच दुसरं पाणथळ आहे जिथं झिनं आणि दैलंचा संगम होतो त्याच्या अलीकडे. ही झिनं नदी वालोनिया प्रांतात नास्त नावाच्या गावाजवळ उगम पावते आणि सुमारे १०० किमी प्रवास करून दैलंमध्ये विलीन होते. इथे नदीच्या एका बाजूला तळं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणथळ. तळं नदीला जोडलेलं नाहीये. पाणथळ मात्र ५-६ दरवाजांना जोडलेलं आहे. या पाणथळात तर माणसांना पूर्ण मज्जाव आहे. रस्ताच दिलेला नाही. जायचं असेलच तर चिखलात जावे लागेल अशी पूर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे आत राजहंस, बदकांचे अनेक प्रकार, पाणकोंबड्या, पाणकावळे आणि कितीतरी पक्षी, मासे, बेडकं... खूप असतात. हिवाळ्यात प्रवासी पक्षीही बरेच येतात. याच संगमावरून ल्यूवन कालवा सुरू होतो. इथे पाणथळ असल्यामुळे पाणी कालव्यात वाढत नाही, आणि वाहूनही जात नाही. अतिरिक्त पाणी साठते, गरज असेल तेव्हा तेच नदीत सोडता येते.

आता आमचं जे #पाण्याकाठचंघर होतं, त्या पाण्याबद्दल. दैलं आणि झिनं यांच्या संगमावरून ल्यूवनकडे जाणारा कालवा केला आहे. १७५२ मध्ये हा कालवा पूर्ण केला गेला (१७६०-६१ मध्ये मराठ्यांना यमुना वेळेत ओलांडता आली नव्हती, त्याच्या आधी ८-९ वर्षे हा कालवा तयार झाला...). ५० मीटर्स रुंद आणि भरपूर खोल असलेल्या या कालव्याने अँटवर्प - ल्यूवन - ब्रुसेल्स हा जलमार्ग तयार करून दिला आहे. हा जलमार्ग अजूनही सुरू आहे. २०-३० कंटेनर्स असलेली जहाजं इथून सहज ये-जा करतात. दिवसाला ७-८ जहाजं जात येत असतात. विशेष म्हणजे हा चढ असलेला मार्ग आहे. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर लाकडी दरवाजे आहेत (अजूनही लाकडीच आहेत). हे दरवाजे दुहेरी आहेत. म्हणजे एक दरवाजा, नंतर १०० मीटर्स जागा आणि पुन्हा दुसरा दरवाजा. जेव्हा जहाज येते तेव्हा एक दरवाजा उघडून जहाज दोन्ही दारांच्या मध्ये घेतात मग मागचं दार बंद करतात. पुढचं दार उघडलं की पाणी जहाजाला वर उचलतं. एका पातळीवर आलं कि जहाज बाहेर जातं आणि दार पुन्हा बंद. परतताना याच्या उलट. दर तीन महिन्यांनी पाणबुडे येऊन तळ तपासतात. मग यातून कधी मोडकी सायकल, मोडकी खुर्ची नाहीतर झाडाची तुटलेली फांदी असं कायकाय बाहेर येतं. मात्र ही शोधमोहीम कितीही थंडी असली किंवा कितीही ऊन असलं तरी सुरू असते. त्यामुळे हा मार्ग अजूनही सुरू आहे.

मागच्या शतकाच्या अखेरीस नदी, कालवा यात मासे जवळपास नव्हतेच. पाणी खूप घाण झालं होतं. नंतर मेकेलीनच्या नगरपालिकेने आणि राजाने पैसे खर्च करून एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. पुढील ४ वर्षात नदी आणि कालवा यांच्यात पुन्हा जीव आला. मासे आले, शेवाळ आलं, त्यामागे बदक, पाणकोंबड्या, बगळे, प्रवासी पक्षी असे सगळे आले. पाण्याचा वास गेला. आमचा घरमालक या कंपनीत कामाला होता. त्याची मुलाखत घेण्याचं या कोविडमुळे जमलं नाही ते नाहीच... कधी तीही माहिती मिळाली तर नक्की सांगेन!

दुहेरी दरवाजा 

बायपास 

बायपास आणि मेकेलीन 

दैलं  

ल्यूवन कालवा 

मेकल्स ब्रुक 

मेकल्स ब्रुक पाणथळ 

कालव्याजवळचे पाणथळ 

पशुधन 

दैलं, झिनं आणि कालवा 


शुद्ध वाण (?)

 एकदा एका वयस्क व्यक्तीशी गप्पा सुरू होत्या. आंतरजातीय विवाह आणि वर्णसंकर. त्यातून येणारी नवी पिढी... वगैरे वगैरे... हे बोलताना काका म्हणाले की, अरे तुम्ही लोक गायी, घोडे, कुत्रे यांच्या जाती बघता. त्या बघताना शुद्ध वाण ठेवण्याचा प्रयत्न करता. जेवढे अधिक शुद्ध वाण तेवढा जास्त भाव देऊन तो प्राणी विकत घेता. त्याच तुम्हाला जातीत लग्न करून शुद्ध वाण ही संकल्पना पटत कशी नाही...

काय परफेक्ट आर्ग्युमेण्ट वाटतं नाही...

आता पुढची गम्मत वाचा...

माणूस जेव्हा पृथ्वीवर तयार झाला तेव्हा माणसाचे सात वाण होते. Homo habilis (“handy” man), Homo erectus (“upright man”), Homo neanderthalensis (the Neanderthal), The Denisovans, Homo floresiensis (the “hobbit”), Homo naledi (“star man”) आणि Homo sapiens (“wise man”, or “modern humans”). यातील शेवटचं वाण म्हणजे होमो सेपियन्स, म्हणजे आपण उरलेले माणसं.

आपण होमो सेपियन्सने बाकीच्या सहा जाती - वाण (बहुदा) मारून टाकल्या आणि केवळ आपण एकच वाण (बेणं) पृथ्वीवर शिल्लक राहिलो.

जर कदाचित आपल्यासह हे सहा वाण पृथ्वीवर असले असते तर वरच्या काकांचे म्हणणे खरे ठरले असते. क्रॉस ब्रीड / वर्णसंकर नको रे बाबा. सेपियन्सनी फक्त सेपियन्स सोबतच लग्न वगैरे करावे. त्यांनी होमो इरेक्टस बरोबर संबंध ठेऊन त्यापासून अशुद्ध वाण तयार करू नये. आता एकच वाण शिल्लक असल्याने असला काही प्रकारच अस्तिवात असू शकत नाही ना!

युवान हरारी काकांचा विजय असो!

Friday, July 23, 2021

माझा प्रवास माझा वेग

सकाळी हिंजवडीला जायला तुम्ही निघता. गर्दीतून कशीबशी वाट काढत तुम्ही डोंगराच्या बाजूच्या पार्किंग मध्ये बाईक स्टॅण्डवर लावता. सगळे जसे निघालेत तसेच पायऱ्या किंवा लिफ्ट घेऊन खाली उतरता. काही पावलं चालल्यावर बदामाच्या गर्द सावलीत अचानक केकावली ऐकू येते. तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची रेष चमकते...

परत घरी जायची वेळ येते. दिवसभर भरपूर पाऊस झालेला असतो. त्यामुळे आणि एकूणच हिंजवडीच्या अत्यंत शिस्तबद्ध वाहतुकीमुळे संथपणे बस, कार्स आणि बाईक्स रस्त्यावरून वाहत वाहत जात असतात. कसेबसे विप्रो सर्कल पार होते. थोडीफार भुरभुर सुरु असते, भवताल वैतागलेला असतो. पण तुम्ही रस्त्याच्या डावीकडून मुद्दाम जाता, कारण तिथून खळाळत वाहणारं पाणी दिसत असतं...

बरीच जुनी गोष्ट आहे. असेच पावसाळी दिवस असतात. माझ्यापेक्षा दोन-चार लेव्हल वर असलेला एक मॅनेजर असतो. त्याची केबिन दूरपर्यंत आकाश दिसेल अशी असते. त्याला इंद्रधनुष्य दिसतं. त्याचा सगळ्यांना मेल येतो. अरे १० मिनिट काम सोडा आणि खिडकीतून बाहेर बघा. सुंदर इंद्रधनुष्य दिसतंय...

भराभर कुठेतरी जायचं / यायचं असतं. मध्येच एक रानजाई फुलून आलेली असते. आधी दिसत नाही, केवळ वास येतो. मग तुम्ही वासाच्या दिशेने वळून बघता. तो वास तुम्हाला दोन क्षण तरी गुंगवून ठेवतो आणि मगच तुम्ही पुढे निघता...

प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेग असतो. त्या वेगाशी जुळवून घेणारे ज्याचे त्याचे रिफ्लेक्सेस असतात. जसं काही लोक वेगात गाडी चालवताना आजूबाजूला काय सुरु आहे हे अगदी डिटेलवार बघू शकतात तसंच... पण हे रिफ्लेक्सेस ज्याचे त्याचे वेगळे असतात. त्यानुसार ज्याची त्याची गती असावी. दुसरा किती वेगात आणि कसा पळतोय त्यानुसार आपली गती कमी जास्त होऊ नये. आपल्याला या प्रवासात जे बघायचं आहे, अनुभवायचं आहे ते न सुटू देता जी गती शक्य असेल ती असावी/वाढवावी. मात्र गती वाढताना, हे अनुभव सोडून द्यावे लागत असतील तर पुन्हा विचार करावा.

आपल्याला जिवंत ठेवणारे अनुभव कोणते, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. ते आपलं आपल्याला कळतंच. तो जिवंतपणा जर कधी कमी होतोय हे दिसलं तर एक पॉज घेऊन, पुन्हा विचार करावा... नेमकं काय आणि का सुटतंय... कधीतरी अपरिहार्य असू शकतं, त्याची नोंद घ्यावी. पुढे कोणत्या टप्प्यावर दुरुस्ती शक्य आहे ते ठरवावं आणि मग पुन्हा प्रवास... तो तर सुरु राहणारच...

Wednesday, June 9, 2021

स्वयंभू भीम


महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.

संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...

तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.

पहिल्या संकटापासून सुरुवात करू या 
* लाक्षागृह - हवापालट म्हणून कुंती आणि पांडव यांना दुर्योधन आणि शकुनी नवीन महालात पाठवतात. तिथे काहीतरी दगाफटका होणार याची कुणकुण लागते. भीम विदुराच्या मदतीने अंदाज घेतो. तिथून जवळच्या गावात कुठे जाता येईल ते पाहतो. संपूर्ण भुयार एकहाती खोदतो. कौरवांनी आग लावण्याआधीच आई आणि भावंडांना सुखरूप बाहेर काढतो.
* हिडिंब - लाक्षागृहातून बाहेर पडल्यावर ते अरण्यात येतात. त्या अरण्यावर राज्य असतं हिडिंब राक्षसाचं. आपल्या भावंडांना संरक्षण म्हणून भीम प्रत्येक रात्र जागून काढतो आणि हिडिंब जेव्हा हल्ला करतो तेव्हा त्याचा वध करतो. त्याची बहीण जेव्हा मागणी घालते तेव्हा आईच्या संमतीने मोठ्या भावाच्या आधी लग्न करतो. पुढील प्रवास सुखकर करून घेतो.
* बकासूर - संपूर्ण गाव बकासुराचा दहशतीखाली असतं. कुंती विश्वासाने पाठवते केवळ भीमाला. भीम बकासुराला कोणत्याही शस्त्राविना मारतो आणि केवळ आपलं कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव सुरक्षित करतो 
* द्रौपदी स्वयंवर - अर्जुन पण जिंकतो पण त्याचवेळी अनेक राजे विरोधात उभे राहतात. भीम लढण्यासाठी त्याच सभागृहाचा खांब तोडून हातात घेतो आणि युद्ध सुरू होण्याआधीच संपतं 
* द्यूत - जेव्हा द्रौपदीची विटंबना होत असते त्यावेळी भीष्म, द्रोण, कृप आणि सगळे पांडव खाली मान घालून बसलेले असतात. तेव्हा भीम प्रतिज्ञा करतो की, दु:शासनाची छाती फोडून ते रक्त पिईन आणि त्या रक्ताने द्रौपदीला स्नान घालेन आणि दुर्योधनाची मांडी फोडून त्यास ठार करेन. या प्रतिज्ञांनी ज्येष्ठांना जाग येते आणि सुरू असलेली विटंबना थांबते, युधिष्ठिराला गेलेलं राज्य मिळतं 
* वनवास - हे होऊनही पुन्हा युधिष्ठिर द्यूत खेळतो आणि राज्य घालवतो. १२ वर्षांच्या वनवासात जयद्रथ द्रौपदीची पुन्हा विटंबना करू पाहतो. त्यावेळी त्याला पराजित करून आणि अपमानित करूनच भीम थांबतो.
* कीचकवध - अज्ञातवासात कीचक अनेकदा द्रौपदीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. हे युधिष्ठिराच्या समोर घडत असताना केवळ आपण ओळखले जाऊ आणि पुन्हा वनवास नशिबी येईल, म्हणून तो काहीच करत नाही. अखेरीस द्रौपदी भीमाला सांगते. विराट राजाचा साला आणि राज्याचा सेनापती असलेल्या महाशक्तिशाली कीचकाचा भीम केवळ हातांनी वध करतो. तोही असा की कुठेही आवाज जाणार आणि. त्याच्या शरीराचा कणिक मळल्याप्रमाणे गोळा करून भीम त्याला संपवतो. 
* विराट राजासाठी युद्ध - विराट राजाकडे पांडव असल्याची कुणकुण दुर्योधनाला लागते आणि त्याच्या गायी पळवून तो युद्धाची कुरापत काढतो. तेव्हा सर्वच पांडव पराक्रमाने विराटाच्या लहान राज्याला वाचवतात. इथे भीमाने एकट्याने कोणताही पराक्रम केलेला नाही. तरी हा प्रसंग मुद्दाम घेतला. लक्षात घ्या या युद्धाच्या वेळी कर्णाकडे कवच कुंडले होती. त्याचा रथ कुठे जमिनीत अडकला नव्हता. त्याने कुंतीला कोणतेही वचन दिलेले नव्हते. त्याचा सारथी शल्य नव्हता. भीष्म त्याला वाईट बोलले नव्हते. तरीही कर्ण असलेली बाजू हरली! एवढं लक्षात घेतलं तरी "मृत्युंजय"चं भूत मानेवरून उतरेल.
* जरासंध वध - राजसूय यज्ञ आणि त्यानंतर वाढवलेलं राज्य हा सर्वच पांडवांनी केलेला पराक्रम होता. पण याच दरम्यान ज्या जरासंधामुळे कृष्णाला मथुरा सोडून द्वारका वसवावी लागली होती (आणि त्यामुळे कृष्णाचे एक नाव रणछोड आहे) त्या जरासंधाला द्वंद्वयुद्धात भीमाने हरवलं. नुसतं हरवलं नाही तर त्याचे हातांनी दोन तुकडे केले.
* महाभारत युद्ध - 
- सुरू होताना भीमाला कोणतेही प्रश्न पडले नाहीत (अर्थात अर्जुनाला पडले त्यामुळे आपला फायदा झाला :-))
- भीम आणि हिडिंबेचा मुलगा घटोत्कच जेव्हा मारला गेला तेव्हा भीमाने कोणतीही आततायी प्रतिज्ञा घेतली नाही (अर्जुनाने अभिमन्यू मारला गेल्यावर जयद्रथाला सुर्यास्ताच्या आधी मारेन अथवा अग्निप्रवेश करेन अशी प्रतिज्ञा केली होती)
- सर्वच्या सर्व धृतराष्ट्र पुत्रांना भीमाने मारलं. हे करताना कोणतीही बाह्य मदत त्याने घेतली नाही (उदा - शिखंडी, "नरो वा कुंजरो वा", सुदर्शन चक्राने सूर्य झाकोळने...)
- युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा अश्वथाम्याने द्रौपदीच्या पाचही पुत्रांना झोपेत मारलं तेव्हा द्रौपदीचं सांत्वन करणारा पहिला आणि एकमेव भीमच होता.
- दुःशासनाची छाती फोडून त्याचे रक्त प्याला आणि त्याच रक्ताने द्रौपदीला अंघोळ घातली (त्यानंतर द्रौपदीने आपले केस पुन्हा बांधले). दुर्योधनाची मांडी फोडून त्याला मारलं. इथे नियम मोडू कि नको या विवंचनेत तो अडकला नाही. द्रौपदीचे सगळे सूड भीमाने पूर्ण केले.

असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.