Friday, July 29, 2022

धुरंधर - नानासाहेब पेशवे!

 आपल्या पाठ्यपुस्तकांनी मोगल इतिहास भरभरून सांगितला. शिवरायांचा इतिहास मोडून सांगितला. पुढे संभाजी महाराज ते दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे हार मानली हा कालखंड पूर्ण वगळला. मग हा इतिहास आपल्यापुढे अनेक इतिहासकारांनी तर मांडलाच पण कादंबरी रूपात लेखकांनी तो सोपा करून आपल्यापुढे आणला. त्यात छावा, राऊ, पानिपत आणि स्वामी ही पुस्तके विशेष गाजली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अंगार चेतवला, त्याचा वणवा केला बाजीरावांनी. त्यात मोगल पूर्ण भरडले गेले. पण दुर्दैवाने बाजीराव वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवर्तले. नंतर नानासाहेबांनी पेशवाई सांभाळली, पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात पानिपत झालं. तरीही पुढे माधवरावांच्या कारकिर्दीत केवळ दहा वर्षांत संबंध भारतभर मराठेशाही नांदू लागली. आजोबा बाजीराव आणि नातू माधवराव यांचं कार्य अतुलनीय होतं. त्या कार्याला सामान्यांच्या मनात पोहोचवलं राऊ आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांनी. पण या दोघांच्या मधला वीस वर्षांचा कालखंड कुणी कादंबरी रूपात कधी मांडला नव्हता. ते काम तरूण इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे याने केलं आहे.
कौस्तुभचं हे पुस्तक जाहीर झालं आणि लगेच मागवलं. पण माझ्या हाती येऊन वाचून पूर्ण व्हायला जरा वेळ लागला.
अगदी खरं सांगतो - मला नानासाहेब हे याआधी केवळ पानिपत पुरते ठाऊक होते. त्यातही त्यांनी पानिपतच्या धामधुमीत केवळ ९ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आणि गोविंदपंत बुंदेल्यांना नाटकशाळा पाठवा म्हणून पत्र पाठवलं (दोन्ही गोष्टी पानिपत कादंबरीत वाचल्या) एवढं माहित होतं. याशिवाय त्यांनी कसं मराठा आरमार बुडवलं वगैरे गोष्टी ऐकीव माहित होत्या. पण त्यांच्यावर खूपच कमी लेखन झालं आहे आणि जे झालंय ते त्यांच्यावर अन्याय करणारं आहे... वाईट गोष्ट अशी की ज्या राघोबाने पानिपतची जबाबदारी टाळली, कोवळ्या माधवरावांना पेशवाई मिळाल्यापासून त्रासच दिला, नारायणरावांना मारेकरी घालून मारलं, अश्या माणसावर "राघोभरारी" ही ऐतिहासिक कादंबरी अनेक वर्षांपूर्वीच निघाली. पण नानासाहेबांवर एकही कादंबरी निघू नये हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता. 
मागच्या वर्षी नानासाहेबांच्या कार्यावर श्री उदय कुलकर्णी यांचा इंग्रजीतून शोधग्रंथ आला आहे, त्याचं मराठी भाषांतरही अशात आलं आहे. खाली मध्ये दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स आहेत.
असं असलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा कादंबरीतून लवकर कळतं. हे काम कौस्तुभने केलं आहे. 

नानासाहेबांना पेशवे म्हणून काम करताना सुरुवातीपासून अनेक प्रकारची संकटे/आव्हाने आली. त्यांनी ती आपल्या अतुल्य राजकीय आणि सामरिक बुद्धीने लीलया पेलली आणि परतवली. सुरुवातीला बाजीरावांना पेशवाई मिळताना जी राजकारणं झाली ती नानासाहेबांनाही चुकली नाहीत. उत्तरेत मोठी स्वारी झाली. ज्या माळव्याच्या सनदा बाजीरावांच्या वेळेपासून मिळायच्या बाकी होत्या त्या नानासाहेबांनी मिळवल्या. त्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मुलुखगिरी केली. त्यातही रघुजींच्या विरोधात सेना उतरवली म्हणून अनेक प्रवाद निर्माण झाले. ते सगळे छत्रपती शाहूंच्या समोर खासगीत संपुष्टातही आणले. पुढे राजपुतांच्या गादीवरून शिंदे आणि होळकर यांच्यात सुद्धा काही काळ वितुष्ट आले. तेही राजपूत आणि शिंदे-होळकर यांना समजुतीत घेऊन संपवले. शाहू महाराजांनी अचानक पेशवाई काढून घेतली तेव्हा काही महिने नानासाहेब सातारच्या बाहेर राहुट्यांमध्ये राहिले. जोवर महाराजांचा पूर्ण विश्वास पूर्ववत होत नाही तोवर शांतपणे वाट पहिली आणि शाहूंनी घेतलेली परीक्षा उत्तीर्ण झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या न राहता एकच गादी असावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कोल्हापूरचे संभाजी राजे बाजीरावांच्या काळात निजामाला जाऊन मिळाले होते. तरीही तो राग न धरता या दोन गाद्या एकत्र होऊन एक मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी दत्तक विधान करताना संभाजी महाराजांना दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पण ते झालं नाही. नंतर सदाशिवरावांना कोल्हापूरची पेशवाई देऊन किमान या दोन गाद्यांमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही ही तजवीज करून ठेवली. आपण छत्रपतींचे सेवक आहोत आणि थोरल्या शिवप्रभूंचे अनुयायी आहोत हे सतत दाखवून दिलं. त्यासाठी काशी, मथुरा आणि अयोध्या ही क्षेत्रे सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही प्रयत्न आपल्याच लोकांच्या घाबरण्यामुळे मागे पडले तर काही वेळा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र "काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधू मुक्त करा" हे महाराजांचे शब्द कधीच विसरले नाहीत. 
राज्यकारभारात आणि एकूण महसूल, मोजणी या सगळ्यात सुसूत्रता आणली. जे करायला बाजीरावांना कधी वेळ मिळाला नाही अश्या अनेक गोष्टी केल्या. शनिवारवाडा बिना तटबंदीचा होता. त्याची तटबंदी पूर्ण केली. दरवाजा मुद्दाम उत्तरेला ठेऊन दिल्लीवर आमची नजर आणि सत्ता दोन्ही आहे हे दाखवून दिले. कात्रजच्या तलावातून पुण्यात सर्व मोठ्या घरांमध्ये पाणी फिरतं ठेवलं. आजही तो नळ सुरु आहे.
कुटुंबात सदाशिवरावभाऊंना राज्यशिक्षणासाठी सातारला ठेवलं. गुरूंना सतत सन्मान दिला. बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेबांचा मुलगा कृष्णा - समशेर बहाद्दर - याला कधीच अंतर दिलं नाही. त्याची वाढ आणि शिक्षण याकडेही लक्ष पुरवलं. विक्षिप्त राघोबांना सांभाळलं. विश्वासराव आणि माधवरावांवरही सतत लक्ष ठेऊन त्यांचंही शिक्षण सुरू राहील हे बघितलं. 

एक ना अनेक कित्येक गोष्टींनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. अब्दाली पहिल्यांदा आला तेव्हा मराठा सैन्य तिथे पोहोचण्याच्या आधीच तो परत फिरला होता. दुसऱ्यांदा आल्यावर मात्र तो पुन्हा जिवंत जाऊ नये यासाठी पेशव्यांच्या घरातून कुणी जबाबदारी घ्यावी यावर ते ठाम राहिले. त्यांची स्वतःची तब्येत साथ देती तर तेच रणांगणावर असते. परंतु ते व्हायचे नव्हते. त्यांच्या जागी राघोबा जावेत म्हणून प्रयत्न झाला. मात्र राघोबा गेले नाहीत. ती जबाबदारी घेतली त्याच्या लाडक्या सदोबाने. पानिपत हारूनही अब्दालीने हिंदुस्थान मराठ्यांच्या हवाली केला. ही मराठ्यांची ताकद होती. ती कमावली बाजीरावांनी तर वाढवली नानासाहेबांनी. भाऊ आणि नाना ही जोडी अगदी चिमाजी आणि बाजीरावांचीच असावी अशी होती. त्यामुळे विश्वासराव गेले त्याहूनही अधिक दुःख त्यांना भाऊ गेल्याचं झालं. स्वतः विश्वासरावसुद्धा पत्रात म्हणाले होते की, "आमच्या सारखे पुत्र तुम्हाला पुन्हा मिळतील पण भाऊंसारखा भाऊ मिळणार नाही" भाऊ गेल्याने नानासाहेब खचले आणि त्यातच त्याची अखेर झाली.

कादंबरी रसाळ आहे. भाषा ओघवती आहे. त्यात सनावळ्या नाहीयेत. मात्र कौस्तुभ "पुराव्यानिशी शाबीत" करण्याजोगे नसेल तर लिहीत नाही. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. कित्येक ऐतिहासिक कागदपत्रे वाचून, समजून घेऊन, त्यांची संगती लावून ही कादंबरी लिहिली गेली आहे. केवळ तिशीत असताना कौस्तुभ ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. त्याच्या अनेक कादंबऱ्या याव्यात, पुस्तके यावीत आणि आम्हाला वाचायला मिळावीत ही प्रार्थना. 

आज बाबासाहेब पुरंदरेंची जयंती! कौस्तुभला त्यांचे आशीर्वाद सतत मिळाले आहेत. बाबासाहेबांचं बोट धरून तो त्यांच्या वाटेवरून चालतोय. खूप शुभेच्छा!

- ज्ञानेश 

धुरंधर - पेशवा नानासाहेब
लेखक - कौस्तुभ कस्तुरे 
प्रकाशक - कौस्तुभ कस्तुरे बुक्स 
पाने - ४४०
किंमत - र ४५०

धुरंधर: https://www.amazon.in/Dhurandhar-Peshwa-Nanasaheb-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/dp/9355932235/ref=sr_1_4?qid=1659104818&refinements=p_27%3AKaustubh+Kasture&s=books&sr=1-4

The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa - https://www.amazon.com/Extraordinary-Epoch-Nanasaheb-Peshwa/dp/8192108058
भाषांतर - https://www.amazon.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-Nanasaheb/dp/8192076911/ref=sr_1_1?qid=1659097948&refinements=p_27%3AUday+S.+Kulkarni&s=books&sr=1-1

No comments:

Post a Comment