बॉलिवूड उत्तम कथा सादर करताना माती खातात. अशीच एक उत्तम कथा, तीही सत्य घटना - सेहमत खान! त्यावरील पुस्तक Calling Sehmat आणि चित्रपट राज़ी.
जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा मला तो खूप आवडला होता (त्यावर मी लिहिलंही होतं, http://dnyanamhane.blogspot.com/2018/06/blog-post.html?m=1) रजित कपूर, जयदीप अहलावत, विकी कौशल आणि अर्थातच आलिया भट. सर्वांनी उत्तम कामे केली होती. पण अशात Calling Sehmat वाचलं. त्यानंतर मेघना गुलजारने नेमकी कुठं माती खाल्ली ते ठळक दिसून आलं. कथा जवळपास जशीच्या तशी दाखवली होती. सेहमतच्या आयुष्यातील पाहिलं प्रेम गाळलं होतं. ते एकूण वेळ कमी असल्याने गाळलं असेल असं वाटलं. त्याबद्दल फार काही चुकीचं आहे असंही वाटलं नाही. तिच्या हिंदू आई आणि वडिलांचं प्रेमप्रकरण सुद्धा महत्वाचं वाटलं नाही.
पुढे ती लग्न होऊन पाकिस्तानात जाते आणि तिथे जी हेरगिरी करते ते मात्र अगदी जसंच्या तसं सिनेमात पण दाखवलं आहे. एकच बाब जरा बदलली ती म्हणजे सेहमतचा नवरा इकबाल हा मूळ कथेत फार काही हुशार नाहीये, इथे तो मूळ कथेपेक्षा जास्त हुशार दाखवला आहे. पण तेवढंच.
सगळ्यात जास्त कथेला धक्का दिला तो शेवटच्या सीन मध्ये (ज्यावर बरेच मीम सुद्धा तयार झाले). सेहमत शेवटी मीर (जयदीप) आणि अन्य भारतीय हेर ज्या घरात आहेत तिथे जाते. मूळ कथेत सेहमत इथे अजिबात कोसळत नाही. तिला स्वतःच्या कामगिरीचा अभिमान वाटत असतो. या सगळ्यात तिला अब्दुल आणि तिच्या दिराला मारावं लागलं आणि शेवटी इकबालसुद्धा मेला याचं तिला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं, मात्र देशहितासाठी ते आवश्यक होतं हे तिला अगदी पटलेलं असतं. मात्र घरी परत आल्यावर तिला ते दुःख छळू लागतं. त्यानंतर ती अब्दुलच्या मूळ गावी घर घेऊन तिथे राहू लागते. तिला मूल होतं. पण तरीही ती त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही. ते मूल तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सांभाळतो. नंतर अचानक एक फकीर त्या गावात येतो. तिचं दुःख समजावून घेतो. तिला कृष्णभक्तीमध्ये रममाण करतो. तिची आई मूळ हिंदू आणि कृष्णभक्त असल्याने या सगळ्यात सहजपणे सोबत असतेच. तो फकीर तिला उपनिषदांवर प्रवचने देतो. त्यांच्या घरात कृष्णभक्ती नांदू लागते. घर जवळपास मंदिरच होतं. नंतर हळूहळू सेहमत त्या दुःखातून बाहेर येते.
आता हा कथाभाग मोठा आहे. सव्वादोन तासात किती आणि काय दाखवणार... अगदी बरोबर. हे दाखवणं शक्य नव्हतं तर ज्या क्षणी सेहमत कोसळली नाही त्या क्षणी तिला कोसळलेली दाखवणं हे तिच्यावर अन्यायकारक होतं. तिला ज्यावेळी स्वतःच्या कामगिरीवर अभिमान वाटत होता तिथे मेघना गुलजारने तिला कोसळलेली दाखवून देशहिताला essential evil करून टाकलं. अब्दुल, सेहमतचा दीर आणि नवरा यांना बिचारं केलं. भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुन्हेगार बनवलं. एकूणच सिनेमात आलिया भट्टने अप्रतिम काम केलंय आणि हा सीन तर तिने जबरदस्त दिलाय. त्याचा impact खोल रुतून बसतो. ज्यामुळे देशहित essential evil असतं हे मनावर बिंबवलं जातं. आणि इथेच मेघना गुलजारने भयंकर माती खाल्ली आहे!
No comments:
Post a Comment