Monday, April 28, 2025

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, गीता आणि उपनिषदे 😀

भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुनाच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो. तो श्रीकृष्णाला विचारतो:  
बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ।।१।।
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ।।२।।

अर्जुनाला सोपे उत्तर नको, त्याला स्पष्टता हवीये, आणि आधीच्या अध्यायात श्रीकृष्णाने जे सांगितले त्यातील संशय दूर करायचा आहे.  

सहजच विचार करताना असं वाटलं की आजच्या डिजिटल जगात, जेव्हा आपण AI किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताकडून उत्तर शोधतो, तेव्हा अर्जुनासारखाच प्रश्न विचारण्याची गरज असते!  
कारण योग्य प्रश्न विचारणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे.
श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देण्याआधी त्याचा प्रश्न अधिक स्पष्ट करतो. तो सांगतो की ज्ञान आणि कर्म हे दोन्ही आवश्यक आहेत, पण योग्य पद्धतीने विचारल्याशिवाय योग्य उत्तर मिळत नाही.  
आज आपण AI शी संवाद साधताना, किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताशी विचारविनिमय करताना, जर प्रश्न अस्पष्ट आणि मोघम असेल, तर उत्तरही तसंच मोघम मिळतं.  
उदाहरणार्थ:  
❌ "मला गीतेबद्दल माहिती हवी." - हे खूपच मोघम आहे, शिवाय व्याप्तीही मोठी आहे.  
✅ "गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील कर्मयोगाची संकल्पना सोप्या शब्दात समजावून सांग." - हे स्पष्ट आणि उद्दिष्टपूर्ण आहे.  

जेवढा विचारपूर्वक, मुद्देसूद आणि तपशीलवार प्रश्न विचारला जातो, तेवढेच उत्तर अधिक सखोल आणि उपयुक्त मिळते.  

शोध नक्कीच उत्तरांचा असतो, पण सुरुवात योग्य प्रश्नांनी होते. अर्जुनाने जर फक्त विचारले असते, "मी काय करणं योग्य आहे?" तर त्याला आणि आपल्यालाही गीतेची महान शिकवण मिळालीच नसती. पण त्याने प्रश्न स्पष्ट आणि मुद्देसूद विचारले, म्हणून श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्गदर्शन दिले.  

आजच्या डिजिटल युगातही हेच लागू होते. AI, तंत्रज्ञान किंवा कोणत्याही ज्ञानस्रोताकडून चांगले उत्तर मिळवायचे असेल, तर प्रश्न अचूक आणि नीट विचारावा लागतो.  

तर मग... प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकताना, शिकवताना आपण गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानातील प्रश्नांचे संदर्भ घेऊन शिकू/शिकवू शकतो का? काय वाटतं?

Thursday, March 20, 2025

शिवाजी महाराजांचे मोठेपण

शिवाजी महाराजांचे मोठेपण दिसावे म्हणून औरंग्याचं थडगं असलं पाहिजे असं लॉजिक बरेच जण मांडत आहेत. यात हिंदुत्ववादीही आहेत. मुळात महाराज कळण्यासाठी कोण्या खलनायकाची आवश्यकता नाहीच. कुणाच्या रेषेशी महाराजांची रेष ताडून मग महाराज मोठे आहेत हे दाखवण्याची काही एक गरज नाही. On the absolute terms सुद्धा महाराज महान आहेत.

केवळ त्यांचे लोकोपयोगी कामे बघितली तरी हे सहज लक्षात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले राज्य हे स्वराज्य, न्यायप्रिय राज्य आणि लोकहितवादी प्रशासनाचा उत्तम नमुना होते. त्यांचे लोकोपयोगी कार्य समकालीन संदर्भांवर आधारित बघूया.

न्यायव्यवस्था: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेस प्राधान्य होते. त्यांचे प्रशासन अन्यायाविरुद्ध कठोर आणि पारदर्शक होते. "जेधे शकावली" आणि "शिवभारत" यांमध्ये उल्लेख आहे की महाराजांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाड्यासाठी पंचायत प्रथा सुरू केली. त्यांनी हक्कांचे रक्षण करताना निष्पक्षता कायम ठेवली, यामुळे रयतेला नवा विश्वास व आधार मिळाला.

शेती व सिंचनव्यवस्था: महाराजांनी शेती आणि सिंचनाच्या सुधारणांवर भर दिला. "बुधभूषण" या ग्रंथात शेतीसाठी तयार केलेल्या कालव्यांचा उल्लेख आहे. त्यांनी पाण्याच्या व्यवस्थित व्यवस्थापनासाठी तलाव बांधले व जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले. जमिनीचा उपयोग योग्य प्रकारे व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी जमिनीच्या मोजणीची प्रथा सुरू केली. त्यामुळे शेती उत्पादन वृद्धिंगत होऊन लोकांचे जीवनमान सुधारले.

व्यापाराला प्रोत्साहन: महाराजांनी अंतर्गत आणि परदेशी व्यापाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आरमारी ताफ्याने समुद्रमार्गे व्यापाराच्या संधी निर्माण केल्या. "शिवभारत" ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी व्यापारी बांधवांना संरक्षण दिले आणि व्यापाराच्या अडचणी दूर केल्या. त्यांनी कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून व्यापारी दृष्टिकोनातून राज्याची आर्थिक ताकद वाढवली.

कर नाही तर लोकवर्गणी: "जेधे शकावली" मध्ये असाही उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत लोकवर्गणी महत्त्वाची होती. लोकांना कररूपी बोजा न लादता गरजेनुसार वर्गणी मागितली जायची. यातून उभारलेले सगळे संपत्ती व संसाधने लोकांसाठी वापरण्यात आली. यामुळे प्रजेचा शासनावर विश्वास वाढला.

सुरक्षेचे मजबूत जाळे: महाराजांनी गडकोटांच्या माध्यमातून फक्त संरक्षण नव्हे, तर गावांमधील लोकांना आसरा आणि मदत पुरवली. "शिवभारत" ग्रंथात उल्लेख आहे की त्यांच्या गडांच्या योजनांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नसाठा आणि संकटसमयी संरक्षक उपायांची सोय असायची. गडांवरील प्रबळ व्यवस्थापनामुळे प्रजेचा सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

सांस्कृतिक / धार्मिक वारसा: शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवत ते कायम जपले. "बुधभूषण" मध्ये नमूद आहे की त्यांनी देवस्थानांची काळजी घेतली आणि मुस्लिम वा ख्रिश्चन लोकांकडून होणारे मंदिरांचे विध्वंस थांबले.

केवळ हे कार्य बघितलं तरी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजा कल्याणाच्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला होईल. त्यासाठी कुण्या औरंगजेब वा अफझलखानासोबत तुलना करण्याची गरजच नाहीये.

आपण आता मध्ययुगीन व्यवस्थेत नाही. पण औरंगजेबाला मानणारे अजूनही त्याच मध्ययुगीन मानसिक अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ "कबर नको" एवढं म्हटलं की थेट संघाच्या मुख्यालयाच्या जवळ सुनियोजित हल्ला केला.

म्हणूनच उत्तर आवश्यक आहे आणि तेही आजच्या कायद्यात. त्यामुळे अफझलखानाचं थडगं ज्याप्रमाणे वनकायद्याने हटवलं त्याचप्रमाणे औरंगजेबाचं थडगं ASI च्या कायद्यात घालून मूळ अवस्थेत तरी नेऊन ठेवलं पाहिजे.

- ज्ञानेश

Tuesday, March 18, 2025

चंद्रहार आणि पीटर व फास्टर फेणे

"आसब्लीफ" vfs च्या बेल्जियम खिडकीतून डॉक्युमेंट्स देताना बनेश उर्फ फास्टर फेणे म्हणाला.

"अरे, खिडकी बेल्जियमची असली तरी हे ऑफिस पुण्यातच आहे!" तो कागदांचा गठ्ठा आपल्या ताब्यात घेत तेथील ऑफिसर म्हणाली.

"ट्टॉक!"

"हा! आता बरं वाटलं बघ"

तर झालं असं की बन्याच्या मामाला बेल्जियममध्ये वर्षभर जायला मिळणार होतं. प्रवास दिवाळीच्या आधीच होता. मालीची सहामाही परीक्षा व्हायची असल्याने माली आणि बन्याने परीक्षा संपल्यावर जायचं असं ठरलं होतं. मग दिवाळी ते नाताळ तिकडेच राहायचं. नाताळच्या सुट्या संपायच्या आत परत यायचं.

यामुळे बन्या आणि माली मामासोबत vfs पुणे ऑफिसात आलेले होते.

"मामा, आपण अर्ध्या वाटेत जातोय. अर्ध्या वाटेत त्याला बोलावू या का?" बन्या म्हणाला.

(वाचा "सिक्रेट सेव्हनच्या सूरपारंब्या आणि फास्टर फेणे")

"पीटर!", माली उद्गारली, "मलाही त्याला आणि जेनेटला भेटायचंय"

"चालेल, तू कळव त्याला" मामाने अनुमती दिली.

घरी पोहोचल्यावर लगेचच बन्याने पीटरला इमेल लिहिला. रात्री उशिरापर्यंत प्लॅन फायनल झालासुद्धा. फक्त जेनेटला यायला जमणार नव्हतं. पीटरसुद्धा नाताळच्या काही दिवस आधी येणार होता आणि नंतर दोन आठवडे राहणार होता.

मामा आणि मामीचा व्हिसा आल्यावर ते दोघे निघाले. पाठोपाठ तीन आठवड्यांनी माली आणि बन्याही. मामाला बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपासून ३५ किमी अंतरावरील मेकेलीन नावाच्या छोट्या टुमदार गावात काम मिळालं होतं. मेकेलीन कधीकाळी राजधानी राहिलेलं गाव. गावाभोवती तटबंदी. गावातून छोटी दैलं नावाची नदीही गेलेली. त्या नदीच्या पुराने गावाला त्रास होऊ नये म्हणून नदीला एक छानसा बायपाससुद्धा दिलेला होता. या नदीचा पुढच्या मोठ्या नदीसोबत संगम आहे. त्या संगमापासून ब्रुसेल्सकडे एक कालवा काढलेला आहे. त्याच कालव्याच्या काठावर मामाचं घर होतं.

आता थंडी सुरू झाली होती. पण एखादा दिवस मस्त ऊन पडायचं. मामाने बन्या आणि मालीला छान गियरच्या सायकली घेऊन दिल्या. बाहेर ऊन असलं की नदीच्या किंवा कालव्याच्या काठाने भटकणे हा यांचा उद्योग. शिवाय जवळच मोठं पार्क होतं. त्यामुळे भटकंती आणि भटकंती चालू होती.

मामा आणि मामीला तिथे एक मावशी भेटली. म्हणजे ती होती बेल्जियन पण यांची एवढी छान मैत्री झाली की दोघे तिला मावशीच म्हणू लागले. तिचं घर दैलं नदीच्या वरच्या अंगाला रैमनम नावाच्या गावात होतं. एकदा सगळे बसने तिच्या घरी जाऊन आहे. मग तिने नकाशावर सायकलने येण्याचा नदीकाठचा रस्ता दाखवला. तो वळणावळणाचा रस्ता पाहून बन्या फार खुश झाला.

नाताळाच्या आधी आठवडाभर पीटर पोहोचला. आता तिघांची भटकंती सुरू झाली. मामाच्या मित्राने त्यांना एक सायकल काही दिवसांसाठी दिली. तिघे नदीच्या काठाने बऱ्याचदा रैमनम पर्यंत जाऊन आले. आता बन्या, माली आणि पीटरला मेकेलीनच्या २० किमी परिघातले सगळे सायकलचे रस्ते पाठ झाले होते.

मेकेलीनमध्ये एक भलं मोठं कॅथेड्रल आहे. म्हणजे चर्चच, पण खूप मोठं असलेलं. त्यांच्या राजाला त्या चर्चवरून म्हणे चंद्रावर जायचं होतं. त्यामुळे मोठा पाया घेऊन बांधत गेले. शेवटी साडेपाचशे पायऱ्या झाल्यावर राजाने नाद सोडला. त्यामुळे शिखर पूर्ण नसलेलं हे सेंट रॅम्बोस कॅथेड्रल आहे. पण राजाच्या वेडामुळे चंद्र आणि या कॅथेड्रलचा संबंध आला तो अजूनही टिकून आहे.

नाताळच्या एक दिवस आधी, म्हणजे ख्रिसमस इव्हला, कॅथेड्रलमध्ये मोठ्ठा चंद्र लावणार होते. त्याचं वैशिष्ट्य असं की अगदी खऱ्या चंद्रासारखे त्यावर खड्डे, डोंगर असं सगळं असणार होतं. जणूकाही चंद्राचं छोटं रूपच. आणि त्या चंद्राच्या बरोब्बर खाली हिऱ्यांनी सजवलेला चंद्रहार!

हे बघायला अख्खा गाव तिथे पोहोचला. चंद्रामुळे चंद्रहार चमकतोय की चंद्रहारामुळे वरील चंद्र हे कळू नये इतकी ती रचना सुरेख होती. कॅथेड्रलच्या मागच्या गल्लीत सायकली लावून बन्या, पीटर आणि माली कॅथेड्रलमध्ये आले. रात्र झालेली होती. बाहेर थंडीही चांगलीच पडली होती. बन्या नेहमीप्रमाणे इकडेतिकडे बघत होता. अचानक त्याला काळ्या कोटवाला एक माणूस दिसला. त्याने पीटरला खुणेनंच दाखवलं. पीटरलाही काहीतरी गडबड वाटली. माली मात्र चंद्र आणि हाराकडे अनिमिष नेत्रांनी बघत होती.

त्या मोठ्या हॉलमध्ये सुमारे ५०० लोक होते. एका बाजूने आत जाऊन, चंद्राला आणि हाराला गोल चक्कर मारून दुसऱ्या दरवाजाने बाहेर जात होते. बन्या, पीटर आणि माली त्या काळ्या कोटवाल्याच्या जरासे मागे होते. काळ्या कोटाच्या हातात काहीतरी छोटं यंत्र दिसत होतं. बन्याची आता खात्री पटली होती हा नक्की काहीतरी घफलेबाज माणूस आहे. काळ्या कोटाने बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ आल्यावर त्या यंत्राचे बटन दाबले. अचानक सगळीकडे अंधार झाला. इतरांना काय झालंय ते कळायच्या आत दरवाज्याजवळ बन्याला काळ्या कोटाची आकृती पळताना दिसली. बन्याने पीटर आणि मालीचा हात धरला आणि तो दरवाज्याकडे पळाला.

तेवढ्यात दिवे परत लागले आणि एकच गोंधळ ऐकू आला. चंद्रहार गायब झाला होता!

एवढ्या वेळात बन्या, पीटर आणि माली त्यांच्या सायकलजवळ पोहोचले होते. काळा कोट त्याच्या इलेक्ट्रिक सायकलवर स्वार होऊन गल्लीतून बाहेर पडत होता. तिघांनीही सायकली काढल्या आणि पाठलाग करायला सुरुवात केली. काळ्या कोटाने त्याची इलेक्ट्रिक सायकल नदीच्या काठाने पळवायला सुरुवात केली. पाठोपाठ बन्या आणि पीटर निघाले होते. हा रस्ता दगडी असल्याने इलेक्ट्रिक सायकलचा वेग फार जास्त नव्हता. पण लवकरच चांगला डांबरी रस्ता सुरू होणार होता. बन्याने जोरात ओरडला, "माले, मामाला सांग की मावशीच्या गावाकडे या" 

मालीला बरोबर कळाले, पण काळ्या कोटाला नेमकं हा काय ओरडला ते कळालं नाही. अजून त्याला आपला पाठलाग सुरू आहे हे ही नीट कळालं नव्हतं.

माली परत फिरली आणि मामाला गाठून सगळं सांगितलं. आता तिथे पोलीस आणि दुभाष्या शोधून त्यांना सांगेपर्यंत १५-२० मिनिटं गेलीच. पोलिसांनी आपल्या सायकली आणि गाड्या भरदाव काढल्या. मामाच्या मित्राच्या गाडीतून मामा, माली निघाले. मामीला आपल्या पराक्रमी भाच्याला घरी आल्यावर घोड्याएवढी भूक लागेल हे माहीत होतं, त्यामुळे ती घरी निघाली.

आता डांबरी रस्ता सुरू झाला होता. काळ्या कोटाचा वेग भन्नाट वाढला. त्याच्या आता पाठलाग लक्षात आला होता. त्यामुळे त्याचा वेग अजूनच वाढला. पण बन्याला पुण्यातल्या गर्दीत बिना गिअरच्या सायकलीला पळवायची सवय होती. इथे गर्दीही नव्हती आणि सायकलला गिअरसुद्धा होते. त्यामुळे तोही फार मागे नव्हताच. तरी फुटाफुटाने काळा कोट आणि बन्यामधील अंतर वाढत चाललं होतं.

आता ते अशा ठिकाणी आले होते की इथून मोठ्या डांबरी रस्त्याकडेही जाता येत होतं आणि नदीकाठचा डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता सुरू होत होता. बन्याने मनोमन प्रार्थना केली की काळा कोट सरळ नदीच्याच रस्त्यावर जाऊ दे.

आता त्यांच्यातील अंतर वाढत गेलं होतं. थंडीने बन्याचे हात काकडले होते. पीटरला थंडीची सवय असली तरी ती हातमोजे घालून होती. तोही काकडला होता. डावीकडे असलेल्या डांबरी रस्त्याकडून पोलीसांच्या सायरनचा आवाज आला. बन्याने हुश्श केलं. कारण आता काळ्या कोटाकडे एकच पर्याय होता तो म्हणजे नदीकाठच्या कच्च्या रस्त्याने सायकल पळवणे. आता बन्यालाही जोर चढला. त्याने जोरात सायकल दामटली. एका पुलाजवळ आल्यावर त्याने पीटरला नदीच्या दुसऱ्या बाजूने जायची खूण केली. आता काळा कोट आणि बन्या नदीच्या एका बाजूला आणि पीटर नदीच्या दुसऱ्या बाजूला होते. 

"ट्टॉक"

मावशी आजीच्या घरी चांगल्या चार चकरा सायकलने झालेल्या असल्याने हा रस्ता बन्याला तोंडपाठ झाला होता. इथून पुढे नदीच्या वळणामुळे रस्ताही नागमोडी होता. त्यामुळे इलेक्ट्रिक सायकल काय पार रेसिंगची मोटारसायकल आणली तरी बन्या तिला गाठेल याची त्याला खात्री होती.

अपेक्षेप्रमाणे काळा कोट आणि बन्यामधील अंतर कमी होत होतं. दुसऱ्या बाजूला पीटर अगदी सोबत सायकल चालवत होता. आता ती वेळ आली होती. बन्याने काळ्या कोटाच्या डावीकडे सायकल घातली आणि एक जोरदार मुसंडी मारून त्याने सायकलवरून उडीच मारली. त्याच्या पाठीवरची बॅग धरून बन्या नदीच्या उतारावर घसरला. काळा कोटसुद्धा सायकलसह त्याच्या मागे फरफटत आला. दोघेही नदीत पडले. पीटरने चपळाईने उतारावर झेप घेतली. नदीचं पाणी गोठलेलं नव्हतं पण बर्फापेक्षा जास्त थंड होतं. बन्याने बॅग पीटरकडे फेकली. त्याने ती वर सायकलकडे फेकली आणि बन्याला गार पाण्यातून ओढलं. काळा कोट मागून बन्याला ओढण्याचा प्रयत्न करत होता पण पीटरने जोर लावून एक गुद्दा त्याच्या नाकावर मारला. आधीच थंडी, त्यात पाण्यात भिजलेला असल्याने त्याला तो मार सहन झाला नाही आणि तो कळवळला. पीटर आणि बन्या रस्त्यावर पोहोचले. बन्या पीटरच्या मागे बसला. ते परत फिरले. काळ्या कोटाने पाठलाग सुरू केला, पण तो भिजलेला होता आणि पळत होता. तो मागे पडला.

एव्हाना पोलीससुद्धा तिथवर पोहोचले होते. बन्याने बॅग त्यांच्या स्वाधीन केली. काळ्या कोटाला पोलिसांनी धरलं. पोलिसांच्या गाडीमागे सगळ्या सायकली लावून पीटर व बन्या गाडीत बसले. 

सगळे सोपस्कार होईपर्यंत मामा आणि मालीसुद्धा स्टेशनवर पोहोचले. पोलिसांनी बन्या, पीटर आणि मालीला धन्यवाद दिले. 

घरी जाईपर्यंत बन्या कुडकुडत होता. घरी मामीने मावशी आजीने नव्याने सांगितलेल्या रेसिपीने केलेलं लाल भोपळ्याचं सूप तयार होतं. ते सूप, भाजी, पोळी पोटभर खाऊन सगळे झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बेल वाजली. मामाने दार उघडलं तर समोर पोलीस. ते म्हणाले, "मेरी ख्रिसमस!"

"ट्टॉक"

त्यांनी सोबत आपल्या तीन वीरांसाठी तीन इलेक्ट्रिक सायकली आणल्या होत्या!!!