मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.
राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.
मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.
राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.
विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.
1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.
- ज्ञानेश
No comments:
Post a Comment