साधारण तीन चार दिवसांपूर्वी इंद्रेशजींना भाग्यनगर (हैद्राबाद)ला बोलावले होते. उस्मानिया विद्यापीठात निजामाच्या मुलासोबत त्यांचं भाषण होतं. कार्यक्रमात साहजिकच स्थानिक मुसलमान होते. पेपरमध्ये बातमी आली की इंद्रेशजींनी निजामाची स्तुती केली. निजाम हा आधुनिक शिक्षणाला महत्व देणारा होता, सेक्युलर होता वगैरे वगैरे... हे वाचून मला आश्चर्य आणि वाईट वाटलं. मग नेहमी मी जे करतो ते केलं. काही स्वयंसेवक मित्रांना ती बातमी पाठवली आणि मूळ व्हिडीओ शोधला. साधारण तासाभराचं भाषण होतं.
भाषणात कुठेही निजामाला आधुनिक शिक्षणप्रेमी वगैरे म्हटलं नव्हतं. त्याला सेक्युलर म्हणण्याचा तर प्रश्नच नव्हता. मात्र उस्मानिया विद्यापीठ स्थापन करताना निजामाने जागा आणि त्याकाळी पाच हजार रुपये दिले होते. त्यामुळे निजामाच्या उस्मानिया विद्यापीठात आलोय हा एक आणि दान दिल्याचा दुसरा एक उल्लेख सोडला तर निजामाबद्दल ते काहीही बोलले नाही. ते खरंही आहे. त्यामुळे त्यावर माझा तरी काही आक्षेप नव्हता, नाही!
मग पूर्ण भाषण कशावर होतं, तर आपली ओळख ही राष्ट्र म्हणून आहे. धर्म म्हणून नाही. यावर एकूण सगळा भर होता. कुणी जपान मधून आलाय तर जपानी आला असं म्हणतात, बौद्ध आला असं म्हणत नाहीत. अरेबियातून आला तर अरबी आला असं म्हणतात, मुसलमान आला असं म्हणत नाहीत. त्यामुळे जी काही ओळख आहे ती धर्माधिष्ठित नसून राष्ट्राधिष्ठित आहे. तीच ओळख सर्वांनी जपली पाहिजे आणि मिरवली पाहिजे यावर संपूर्ण भाषणात जोर होता. हे करताना त्यांनी कुठेही कुराणातले दाखले दिले नाहीत मात्र आपल्याला ओळख "मालिक ने दियी हैं" हे सांगत राहिले.
याशिवाय दुसरा मुद्दा होता तो म्हणजे भगवान एक आहे त्याची उपासना अनेक मार्गांनी होऊ शकते. एकं सत् विप्रा: बहुदा वदन्ति| या भारतीय / हिंदू वाक्यानुरूप त्यांनी बरंच काय सांगितलं. एकूण श्रोतेही त्यांना बऱ्यापैकी सहमत आहेत असं दिसत होतं.
यापुढे त्यांनी एक गोष्ट केली ति म्हणजे घोषणा. सुरुवात केली मादरे वतन हिंदुस्थान जिंदाबाद जिंदाबाद. मग इंग्रजी Mother India Long Live. मग हिंदी भारत माता की जय आणि शेवटी संस्कृत वंदे मातरम्. सर्व उपस्थितांनी या घोषणांमध्ये सहभाग घेतला. कुणीही काहीही आरडाओरडा केला नाही. यामुळे कुणाचं इमान दुखावलं गेलं का असा प्रश्नही त्यांनी विचारला. हा सगळा भाग छानच झाला.
अर्थात खटकणाऱ्या बाबी होत्याच -
१. त्यांनी अयोध्येत दुसरा नबी झाला असं म्हणाले. रोख प्रभू रामाकडे होता की नाही ते काही कळालं नाही. पण याची काय गरज ते समजलं नाही.
२. पैगंबर जेव्हा पुन्हा मक्केत आले तेव्हा त्यांनी समोपचाराने मक्केत जाऊ म्हटल्याचा दाखला दिला. हा संदर्भ नक्कीच चुकीचा होता
३. कोणत्याही नबीने (पैगंबराने) त्या काळातील रीतीप्रमाणे लग्ने कितीही केली असतील पण तलाक कधीच दिला नव्हता. त्यांनी आपल्या बायकांना कधी सोडलं नाही. म्हणूनच ते नबी पदाला पोहोचू शकले. त्यामुळे तुम्हीही तलाक देऊ नका वगैरे... हे असले लॉजिक का देतात काही समजत नाही
४. मुहम्मद पैगंबराचं भारतावर प्रेम होतं म्हणे. ते स्वतः कधी भारतात आले नाहीत पण भारताच्या दिशेने सुकून वाले वारे वाहतात असं कायतर बोलले
अर्थात खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरी संघाचे प्रयत्न भारतीय कोणत्याही धर्माचा असो त्याची पहिली ओळख ही भारतीय हीच असावी. धर्मनिष्ठा या राष्ट्रानिष्ठेनंतर याव्यात. धर्माचं मूळ कुठेही असलं तरी आपण सर्व हे भरतीय मूळ असलेलो आहोत हेच सर्वांनी ध्यानात ठेवावं. आणि अखेरीस मक्का किंवा व्हॅटिकन हे भारतीयांचे धार्मिक मुख्यालय न राहता ते भारतातील व्हावे या दृष्टीने प्रयत्न दिसतात. कट्टरता कमी करण्याचा हाही एक मार्ग असू शकतो. तोही संघ अजमावून बघतोय. मुळात हिंदू माणसाला कोण कशी वैयक्तिक उपासना करतोय याबद्दल आक्षेप नसतो तसा संघालाही नाही. मात्र माझाच मार्ग तो योग्य आणि बाकीचे चूक यावर आक्षेप आहे. तेच या सगळ्या प्रयत्नाचे मूळ आहे.
सर्वात आधी मी सांगितलं की, मी काही स्वयंसेवक मित्रांशी बोललो. त्यात एका मित्राचं उत्तर हे अप्रतिम उत्तर होतं. "जोवर संघाच्या दैनंदिन कामावर याचा प्रभाव पडत नाही तोवर या बातम्यांकडे लक्षही द्यावं असं मला वाटत नाही". संघटना शंभरीकडे जातानाही संघकाम वाढत आहे याचं हे प्रमुख कारण असावं!!!
आज परम पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांची जयंती आहे. त्यांनी चार - पाच लहान मुलं सोबत घेऊन सुरू केलेली शाखा, संघ असाच वाढला आहे. तो वर्धिष्णू राहिलंच आणि बलशाली भारताचं स्वप्न साकार होईल याची खात्री आहे.
भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!
इंद्रेशजींचं भाषण - https://m.youtube.com/watch?v=-k_3C2kp3gc
बातमीची लिंक - https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/rss-leader-all-praise-for-nizam-vii-rule/articleshow/90505480.cms