फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा हिमवर्षाव नसायचा तर थेट गारपीटच असायची. हिवाळ्यातील तीन चार महिन्यात जर पाऊस असेल तर तो गारांचाच पाऊस. जमीन या गारांचा मार खाऊन थकून जायची...
अशीच एकदा गारपीट झाली. जमीन थकून थिजली. तिला होणाऱ्या त्रासाने गारांनाही वाईट वाटत होतं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. जमिनीला जिथे जिथे लागलं होतं, तिथे तिथे ते अश्रू हळूहळू वाहू लागले. जमिनीला पाण्याचं प्रेम कळत होतं. तिने सावकाश बोलायला सुरुवात केली.
जमीन म्हणाली, "एवढं वाईट वाटतंय, तर का रे? का अशी गारपीट करतोस? तुला दिसतंय ना, कळतंय ना मला त्रास होतोय ते?"
पाण्याने केवळ हुंकार भरला. तशी जमीन पुढे म्हणाली, "अरे आपण जिथे कुठे एकत्र असतो तिथे तिथे सृष्टी फुलते रे. तुझ्या ढगांच्या रूपात माझे डोंगर झाकून जातात आणि अचानक हलक्या वाऱ्याने पुन्हा दिसतात तेव्हा सगळे जण आवाक होऊन बघत राहतात. धुक्याच्या रूपात तू जेव्हा येतोस तेव्हा दुलई पांघरून झोपल्यासारखं वाटतं. माझ्या उंच डोंगरांवरून तू जेव्हा स्वतःला झोकून देतोस त्यातून निर्माण होणारं सौंदर्य बघत लोक कित्येक तास बसून राहतात. नदीची आणि ओढ्याची वळणं तर अनेक कलांना जन्म देतात. समुद्र तर किती रूपं दाखवतो. माझ्या पोटातून तुझ्या वाहण्याचं गूढ अजूनही कुणालाच कळलेलं नाहीये. या सगळ्यातून झाडं, वेली, पशू, पक्षी, जलचर असा केवढा मोठा सुंदर पसारा आहे. हे सगळं असताना ही गरपीट का रे? तुझा एखादा आवेग मी नक्कीच सहन करू शकते, पण सलग तीन चार महिने??? आणि यात तुलाही आनंद नाहीच! काहीतरी कर रे."
जमिनीचं बोलणं ऐकून अखेरीस पाण्यानेही बोलायला सुरुवात केली, "काय करू गं? मीही नियमात बांधलोय ना? गरम झालो की वाफ होऊन ढग व्हायचं. गारवा लागला की पाऊस होऊन बरसायचं. अजून थंड झालो की गोठायचं, गारा व्हायचं आणि पुन्हा बरसायचं. कितीही नाही म्हटलं तरी गुरुत्वाकर्षण हा तुझा नियम मला पाळावाच लागतो. मी तरी काय करू?"
जमीन म्हणाली, "अरे नियम असले तरी अपवाद असतातच. तू पौर्णिमेला मला सोडून चंद्राकडे झेप घ्यायचा प्रयत्न करतोच ना? ते कधीही शक्य नाही हे माहीत असूनही त्यात कधी खंड पडलाय का?"
पाणी म्हणालं, "अगं, तोही नियमच ना!"
जमीन पुढे म्हणाली, "काही वेळा आपल्या प्रेमाच्या लोकांसाठी काही अपवाद करावे लागतात. उष्णतेने वस्तू प्रसरण पावतात आणि थंडीने आकुंचन. पण तरीही कडक उन्हाळ्यात मी आकुंचन पावते. का माहितीये?"
पाणी म्हणालं, "सांग, ऐकतोय"
जमीन पुढे बोलू लागली, "अरे, झाडावर, जंगलात, गुहेत, थोडक्यात निवऱ्यात राहणारे जे प्राणी पक्षी आहेत त्यांना फार काही अडचण नसते. पण मुंग्या, गोगलगायी, साप, सरडे, घोरपडी कुठे जातील. कडक उन्हाळ्यात मी आकुंचन पावते, भेगाळते आणि या सगळ्यांना माझ्या पोटात जागा करून देते. तुझा गूढ प्रवाह असतोच यांना मदत करायला. मग पुन्हा तू येतोस. तेव्हा खरंतर तापमान कमी झालेलं असतं, पण मी प्रसरण पावते. अन्यांच्या अंगाची उन्हाळ्यात लाही लाही होते, पण माझी मात्र पहिल्या पावसात खुदकन लाही फुटते!"
पाणी ऐकत होतं, विचार करत होतं. गारव्यात मोठा ढग होता. विचारांमध्ये त्याचे थेंब जरा लवकरच पूर्ण आकुंचन पावले. अचानकच त्या बारीक थेंबांची लाही फुटली. थेंबाचं गारीत रूपांतर न होता, हिमकणात रूपांतर झालं. अलगद तरंगत हिमकण जमिनीवर पडू लागले. जमीन शहारली. तिने सावकाश ते पांघरूण घ्यायला सुरुवात केली. पाणी आनंदलं, जमीन आनंदली आणि नवीन रूपात दोघांनी सर्वांना पुन्हा भुरळ पाडली!!!
No comments:
Post a Comment