९०च्या दशकाने आम्हाला खूप काही भरभरून दिलं. नरसिंह राव / मनमोहन सिंह यांची खुली अर्थव्यवस्था, हर्षद मेहताने बिग बुल बनून चालवलेलं शेअर मार्केट, ए आर रेहमानचं वेगळंच संगीत, सचिन-सौरभ-राहुल-कुंबळे-लक्ष्मण सारखे क्रिकेटमधील हिरे, रगरग हिंदू मेरा परिचय म्हणणारे पंतप्रधान - अटलजी... यात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे जुन्या जोखडाला फेकून देण्याची वृत्ती, इतिहासाचं ओझं न बाळगण्याची वृत्ती.
असंच एक फार जुनं नसलेलं जोखड १९८६ पासून क्रिकेटप्रेमींच्या मनावर होतं. श्रीकांत, गावस्कर, वेंगसरकर यांच्या अर्धशतकांसह भारताने पन्नास षटकात २४५ धावा केल्या होत्या. त्या काळात एवढ्या धावा म्हणजे जवळपास जिंकण्याची खात्रीच. गोलंदाजांनी देखील कमाल करत पाकिस्तानच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. मात्र जावेद मियाँदादच्या मनात वेगळंच चालू होतं. शेवटचं षटक टाकायला चेतन शर्मा आला. एक बळी घेत त्यानेही सुरुवात चांगली केली. नऊ गडी बाद, शेवटच्या चेंडूवर ४ धावांची आवश्यकता होती. आता केवळ चेंडू सीमापार जाणार नाही हे पाहायचं. आपलीच मॅच! पण समोर जावेद होता. त्याने चेतन शर्माचं मन वाचलं, पण चेतनला त्याचं मन वाचता आलं नाही. जावेदने चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला! हे जोखड जे क्रिकेटपटूंच्या आणि शौकिनांच्या डोक्यावर होतं ते काही लवकर खाली उतरलं नाही.
शारजामध्ये सामना म्हणजे हरणार, पाकिस्तान विरुद्ध आणि तोही शुक्रवारी... नक्कीच हरणार. पुढे '९२च्या विश्वचषकात जावेदने माकडउड्या मारल्या तरीही आपण जिंकलो. मात्र तो विश्वचषक पाकिस्तानने जिंकल्याने जोखड काही उतरलं नव्हतं. नंतर जडेजाने '९६च्या विश्वचषकात २५ चेंडूत ४५ धावा करून, वेंकटेश प्रसादने आमीर सोहेलला येडा बनवून आपण तीही मॅच जिंकलो... तरीही जोखड कायम होतं. हे जोखड कशाने उतरेल? साधारण तसाच सामना व्हावा, भारताची दुसरी फलंदाजी असावी, समोर पाकिस्तानचा खास गोलंदाज असावा आणि त्यावेळी भारतीय फलंदाजाने नेटाने चेंडू सीमापार धाडावा. हे झालं तर जोखड नक्की उतरेल!
ती संधी मिळाली '९८ला. इंडिपेडन्स कप! भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तिरंगी स्पर्धा. अपेक्षेप्रमाणे बांगलादेश अंतिम सामन्यात आला नाही. यावेळी अंतिम सामना पण तीन सामान्यांचा. पहिला अंतिम सामना भारताने तर दुसरा पाकिस्तानने एकतर्फी जिंकला. शेवटच्या सामन्यात सईद अन्वर आणि इजाज अहमदने शतकं ठोकली. त्यातही अन्वरने १४० धावा कुटल्या. ४८ षटकांत तब्बल ३१४! भारतासमोर ३१५ धावांचं लक्ष्य. सचिनने वेगवान सलामी देत ४१ धावा केल्या आणि तो बाद झाला. नंतर रॉबिन सिंगला बढती दिली. अझरची ही खेळी चांगलीच ठरली. गांगुली आणि रॉबिनने धावफलक २५० पर्यंत नेला. आता १० षटकांत केवळ ६५ धावा बाकी होत्या. अझर, जडेजा, सिद्धू सारखे कसलेले फलंदाज बाकी होते. पण या सर्वांनी एकामागे एक नंबर लावले. तरी मोंगियाने धावबाद होण्याआधी चौकार मारून शेवटच्या षटकात ९ धावा इथवर आणून ठेवलं. आता ३०६ वर ७ बाद. ६ चेंडूत ९ धावा हे समीकरण बाकी होतं. समीकरण सोडवण्यासाठी उरले होते, तुलनेने नवखा हृषीकेश कानिटकर आणि लढवैय्या श्रीनाथ. समोर पाकिस्तानचा खास गोलंदाज सकलेन मुश्ताक. पहिला चेंडू कानिटकरने लेग साईडला जोरात मारला खरा पण मिळाली केवळ एक धाव. दुसऱ्या फ्लाईटेड डिलिव्हरीवर श्रीनाथने दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूला श्रीनाथ मारायला गेला खरा, पण टॉप एज लागून चेंडू उंच उडाला. पण दैव भारताच्या बाजूने होतं. चेंडू चक्क तीन क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधे पडला आणि त्यांच्या गोंधळात श्रीनाथने अजून दोन धावा काढल्या. आता तीन चेंडूत चार धावा असं समीकरण उरलं. चौथ्या चेंडूवर मात्र श्रीनाथ केवळ एक धाव घेऊ शकला. आता दोन चेंडूत तीन धावा शिल्लक होत्या. पाचवा चेंडू कानिटकरने बरोब्बर ओळखला आणि लेग साईडला मस्त गॅपमध्ये मारला - चौकार!!! भारत जिंकला आणि बारा वर्षांपासून असलेलं जोखड उतरलं!
हे आठवण्याचं कारण म्हणजे सध्या आपल्या U19 चा मुख्य प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर आहे. याच संघाने परवा विश्वचषक जिंकला!
No comments:
Post a Comment