सकाळी सहा सव्वासहाला शेतात जायला निघालो. भरपूर पाऊस झाल्याने कार शेतापर्यंत जाणं शक्यच नव्हतं. संतोषच्या मागे बसून मोटारसायकलवर गेलो. गेल्यागेल्या सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणांची पाखरण करत दिसू लागले. मग शेतात एक फेरी मारली. या वर्षी पावसाने मठ, तीळ, भगर आणि राळे यांची मातीच केलीये. पण तूर मात्र दिमाखात उभी होती. पाऊस थांबून केवळ तीन आठवडे झाले आहेत. आमच्या तुरील कोणतेही रासायनिक खत फवारणी नसते. त्यामुळे तुरीने पावसाच्या वेळापत्रकाप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं आणि आता तूर फुलावर येत आहे. अजून जमिनीत ओल आहे. आता उर्वरित शेतात गहू, जवस, हरबरा टाकायचा आहे. कुठे, काय आणि किती लावायचं हे ठरवत शेत फिरून झालं.
आमच्या जंगलात मुद्दाम सुरुवातीला गेलो नाही. नाहीतर कामं तशीच राहतात आणि जंगलाजवळ बसून राहणं होतं. जंगलाचा एक टप्पा आता स्वयंपूर्ण झालेला आहे. सगळीच मोठी झाडं ३० फुटांपर्यंत गेली आहेत. खाली मोठमोठी खोडं दिसतात. झाडांचं एकूण आपसात छान चालू आहे. दुसरा टप्पा अजून दीड वर्षांचाच आहे. याला स्वयंपूर्ण व्हायला अजून दीड वर्ष लागेल. या टप्प्यात एक दोन प्रयोग केले होते. काही वेली लावल्या होत्या. त्यातील एक होती समुद्रशोक. ही वेल खूप मोठी होऊ शकते. याच्या पानांची भाजी, अळूवड्यांसारख्या वड्या वगैरे करतात. वाढ बघता, ही समुद्रशोक बहुदा या जंगलातील महालता होईल. केळीची गावरान रोपं लावली होती. एकूण ५-६ घड आले. त्यातील जी केळी बाहेरच्या बाजूने होती तिचे घड खायला मिळाले. आतली केळी प्राण्यापक्षांना 🙂
जंगल झाल्यावर आमचा बंधारा बघायला गेलो. पाऊस भरपूर झालेला असल्याने पाणी असणार याची खात्री होती. तीन आठवड्यापूर्वी शेवटचा पाऊस झाला होता त्यामुळे पाणी वाहतं असेल असं वाटलं नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे खळखळ वाहणारं पाणी दिसलं. अगदी स्वित्झर्लंडला असतं तेवढं नितळ नसलं तरी बऱ्यापैकी स्वच्छ पाणी होतं. पाण्याला कोणताही वास नव्हता. तुंबाच्या दुतर्फा छान झाडं आहेत, ती पाण्यावर सावली धरून होती. याचा व्हिडीओ बघताना आवाज नक्की ऐका. मग आठवलं की, विहीर तर बघितलीच नाही.
आमची विहीर मी तुडुंब पाऊस झालेल्या वर्षीही (२००५) बघितली होती. तेव्हाही पाणी जिथून विहीर बांधलेली आहे त्या दगडी भिंतीला टेकलं नव्हतं. आमची विहीर साधारण ५०-६० फूट खोल असेल. पैकी २०-२५ फूट बांधकाम आणि खाली खडक. आम्ही कायम खडक पाहत आलोय. मात्र या वर्षी पहिल्यांदाच विहीर ३५-४० फूट भरलेली आहे. आमच्या शेजारच्या शेतात १५ वर्षांपूर्वी विहीर केली होती. तिला कधीच पाणी नव्हतं. या वर्षी तुडुंब पाणी आहे. मामांच्या शेतातल्या विहिरीला आम्ही तिसरीत असताना पाणी बघितलं होतं. मागच्या वर्षी तिचा झरा पुन्हा फुटला ते इथे सांगितलं होतं. या वर्षी त्या विहीरीला वरतून १० फुटांवर पाणी आहे. त्याच्या बाजूच्याच शेतावर तर हाताने बादली घालून घेता येईल एवढं पाणी आहे. आमच्या "जलपूजनाला" या वर्षी पावसाने भरभरून दिलं. रब्बी हंगाम आणि कदाचित उन्हाळी पिकंही छान होतील!
मग घरी आलो. आमची गुरं सांभाळणारा एकनाथ तयारच होता. त्याने गोठ्यात गायी वासरं एकत्र केली. मग आई, मी, संतोष, संतोषचा छोटा मुलगा सगळे "वसुबारस" साजरी करण्यासाठी, गोवत्स पूजनासाठी गोठ्यात गेलो. गायींना, वासरांना ओवाळलं. त्यांची पूजा केली. आणि अर्थातच फोटोसेशन सुद्धा केलं. एवढं करून छान भूक लागली होती. मग बाजरीची भाकरी, ठेचा आणि पिठलं असा बेत झाला (भुकेमुळे ताटाचा फोटो नाही काढलाय 😜)
अशी आमची वसुबारस साजरी झाली. आता पुढच्या आठवड्यात अमोहासह शेतावर चक्कर असणार आहे!!!
No comments:
Post a Comment