Tuesday, June 25, 2019

भारतीय जल वन संवर्धन ६ - समारोप

काही वर्षांपूर्वी व्हिएतनामला गेलो होतो. तिथे एका शेतकऱ्याच्या कृषी पर्यटन केंद्रावर राहिलो होतो. मग साहजिक त्या शेतकऱ्याशी गप्पा झाल्या. तेथील पाऊस हा आपल्यासारखाच ४ महिने पडतो. त्यातही जुलै ऑगस्ट मध्ये जास्त असतो. बाकी वर्षभर पाऊस पडत नाही. तरीही ते लोक वर्षभर झऱ्याचं पाणी पितात. सोबत त्या गावाच्या जवळ असलेल्या धबधब्याचा मे महिन्यातला फोटो दिलेला आहे. कारण त्या धबधब्यांच्या आणि झऱ्यांच्या भोवताली दाट जंगल टिकून आहे.



मागच्या वर्षी मे महिन्यात आमचे मित्र विशाल आणि मीनाक्षी व्यास यांच्या शेतावर गेलो होतो. शेत साताऱ्याच्या जवळ आहे. तिथे असलेल्या पांदीजवळ एक झरा भर उन्हाळ्यात वाहता होता. स्वच्छ पाण्याचा खळखळ आवाज सुखावत होता. तेथील पांदीचा (झऱ्याचा मिळाला नाही) फोटो सोबत आहे. त्यात सहज दिसेल कि भोवताली छान झाडं आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात, खुलताबादहून म्हैसमाळकडे जायला निघालो कि घाट सुरु होण्याआधी उजवीकडे लंबेश्वर नावाचे शंकराचे मंदिर (गुहा) आहे. त्या गुहेच्या बाजूला साधारण २० वर्षांपूर्वी वर्षभर वाहणारा झरा/धबधबा होता. आज दिवाळीच्या आधीच तो कोरडा असतो. कारण त्या डोंगरावर आता जे पावसाळी गवत यायचं ते आता येत नाही आणि मोठी झाडं केव्हाच तोडली गेली आहेत.

आमच्या गावाची नदी/ओढा पावसाळ्यात एवढा जोरदार वाहायचा की माझी मावशी तिच्या लहानपणी त्यात वाहून जाणार होती. नंतर मार्च/एप्रिल पर्यंत त्यातून पाणी वाहत असायचं. नंतरही वाळूत एखाद्या फुटाचा खड्डा केला तर पिण्यायोग्य पाणीसहज मिळायचे. मे महिन्यात असा खड्डा करून पाणी पिल्याचे मलाही आठवते. आईच्या लहानपणी या ओढ्याच्या आजूबाजूला एवढी झाडी होती कि तिथे दिवसाही लोक सोबत असेल तरच जायचे. बिबट्या सहजच दर्शन देऊन जायचा. आता तुकड्या तुकड्यात झाडं आहेत पण सलग झाडी कुठेच नाही. त्यामुळे आज सप्टेंबर मध्येच कोरड्या झालेल्या ओढ्यातून एखादा लहान गुराखी गुरं घेऊन फिरतो...

दुष्काळ निवारणासाठी आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. आज युरोपात सगळीकडे नद्या जोडलेल्या आहेत आणि तरीही मागील काही वर्षांत इथे सतत दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षीपासून आम्ही बेल्जियम मध्ये आहोत. इथे उन्हाळ्यात पाणी वापरावर निर्बंध असतात. पूर्वीची इथे जी जंगले होती ती तोडून फायद्यासाठी वेगात वाढणारे सूचिपर्णी वृक्ष इथे लावले गेले. त्यातून उत्पन्नही मिळायचं. पण त्याचा दुष्परिणाम मोठा झाला. या भागात मोठ्या प्रमाणात पानगळीचे वृक्ष असायचे. ती पाने जमिनीवर लवकर कुजायची आणि त्यात पाणी थांबून थांबून वाहायचं आणि जमिनीत मुरायचं. सूचिपर्णी वृक्षांची पाने जमिनीवर पडली तर ती लवकर कुजत नाहीत आणि पाणी त्यावरून वाहून जातं. इथल्या जमिनीला ते नकोय... आता येथील सरकारने नवीन वृक्ष लावताना केवळ स्थानिक पानगळीचे वृक्ष लावण्याची सक्ती केली आहे.

सोबत चित्रलेखा वैद्य यांची आकाशवाणीवरील मुलाखत आणि माहितीचा व्हिडीओ दिला आहे. त्यात त्यांनी सांगितलेली चिंताजनक बाब ही आहे की भारत हा सर्वाधिक भूजल उपसा करणारा देश आहे. इस्रायल मध्ये भूजलावर सरकारचा हक्क असतो. कुणीही विहिरीतून/बोअर मधून हवे तेवढे पाणी उपसू शकत नाही. युरोपात माझ्या एका मित्राला गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या प्लॉटवर बोअर करायचा आहे. त्याला ती परवानगी मिळत नाहीये. भारतात भूजल उपशावर नियंत्रण तर नाहीच, पण जमिनीला भोकं पाडण्यावर सुद्धा कोणते बंधन नाही. एका सोसायटीत आपण १० बोअर केलेले असतात. आपल्याकडे विहिरी ५० ते ७० फुटाच्या असतात. तेथील भूजल हे दर वर्षी पुन्हा भरते. बोअर २००-२५० फुटापेक्षा जास्त खोल असतात आणि काही भागात तर ३००-४०० फूट खोल असतात. ते पाणी गेल्या ५००-१००० वर्षात जमा झालेले आहे. ते आपण उपसून निसर्गाची नेमकी काय हानी करत आहोत हे अजून कळायचे आहे. त्या पाण्यामुळे कदाचित भूकंप होत नसतील... किंवा काहीही असू शकतं. पण आपण एवढे करंटे आहोत की याचा कोणताही विचार न करता जो बोअर वाला ५०० फूट खोल जाईल त्याला काम देतो. शिवाय बऱ्याच कंपन्या बोअर करून त्यांचे दूषित पाणी सरळ बोअरमधून टाकून देतात आणि भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात.

भारतात किंवा महाराष्ट्रात नेमकं झालंय काय... पाऊस फार कमी नाही, पण अनियमित झाला हे नक्की. जेवढा पाऊस ४ महिन्यात पडायचा तो आता दोन महिन्यात, त्यातही काही दिवसांत पडतो. म्हणजे पावसाचे प्रमाण तेवढेच आहे, पण तरीही नदी/झरा/ओढ्यातील पाणी दिवाळीच्या आधीच संपून जाते. त्याचं साधं कारण म्हणजे आपण पाण्याला वेगात जाऊ देऊन मोठ्या जलाशयात अडवत बसलो. पाणी थांबवायचं नसतं तर त्याची केवळ गती कमी करायची असते. हा साधा निसर्गनियम आपण विसरून गेलो. पाणी सावकाश वाहिलं तर ते जमिनीची तहान भागवून पुढे जातं. पाण्याची गती कमी करण्यासाठी आणि त्याचं बाष्पीभवन होऊ नये, म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. फक्त खड्डे करून काहीच होणार नाही. एकूण वृक्षतोड इतकी प्रचंड आहे की यावर आता मोठी जन चळवळ करूनच मोठी वृक्षलागवड करावी लागेल. सरकारी पातळीवरून काही होईल याची वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाहीये.

मग करायचं काय...
१. आपल्या आजूबाजूला जी नदी, ओढा, झरा किंवा पाणंद असेल तिच्या भोवती स्थानिक झाडे लावली टिकवली गेली पाहिजेत.
२. जे काही बंधाऱ्याचे कामं झाले असतील त्या बंधाऱ्याजवळ झाडं आणि अगदी पाण्याजवळ गवतवर्गीय वनस्पती लावल्या पाहिजेत. परिणिता दांडेकर यांची पोस्ट बघा.
३. आपल्या गावात, शेतात, कॉलनीत जिथे जागा मिळेल तिथे, अगदी काही गुंठे असेल तरीही, सोप्या पद्धतीने निसर्गबेट निर्माण केले पाहिजे.


काय आहे निसर्गबेट?
सध्या शब्दात - वटवृक्ष, फळझाडे, संरक्षक झाडे, फुलझाडे आणि गवतवर्ग असे पाच वनस्पती प्रकारांचे आदर्श मिश्रण. यात एकरी प्रमाण: वटवृक्ष (५), फळझाडे (२००), संरक्षक झाडे (१००), फुलझाडे (१० गुंठे) आणि गवतवर्गीय (५ गुंठे). प्रमाण एकरी दिलं असलं तरी १० गुंठ्यांपासून निसर्गबेट बनवता येतं. पाण्याची उपलब्धता आणि निसर्गबेटाच्या आकारानुसार पाणी-गरजेचा ताळेबंद ठरवून उपाययोजना जसे की, तलाव/कुंड, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, समतल चर आणि बांधबंदिस्तीने जलसंधारण. हे निसर्गबेट वैयक्तिक, सामूहिक/सहकारी, भांडवली अथवा सरकारी स्तरावर सहज करता येऊ शकेल. निसर्गबेटाचे थेट आणि अप्रत्यक्ष अनेक फायदे आहेत. थेट फायद्यांमध्ये फळे, फुले भाजीपाला व्यवसाय करता येईल. अप्रत्यक्ष फायद्यांमध्ये कीड नियंत्रण, उंदीर/घूस नियंत्रण, मित्र कीटक वाढणे, जमिनीतील ह्युमस वाढणे, जमिनीची जलधारण क्षमता वाढणे असे अनेक फायदे आहेत. निसर्गबेटाचा ढोबळ आराखडा सोबत दिला आहे. त्यात आपापल्या गरजा आणि परिसर अभ्यास करून बदल करता येऊ शकतात. तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपेंद्र दादा, डॉ उमेश मुंडल्ये किंवा अशा अभ्यासू मंडळींशी संपर्क साधावा.

हा पावसाळा खूप उशीरा सुरू होत आहे. पुढचा अजून किती वाईट असेल सांगता येत नाही. त्यामुळे ही सगळी कामे आजच सुरू केली पाहिजेत. "पुढच्या पावसाळ्यात करू" असा विचार हा अविचारच असेल.

या लेखमालेचा शेवट नलेश पाटलांच्या कवितेने करतोय... विचार तर कराच पण कृतीही लवकर करा... धन्यवाद!

माझ्या झाडांची हिरवी किती सांगू मी थोरवी
तुम्हा देऊन सावली ऊन माथ्यास मिरवी

असा निमूट सोसला ताप दिसभर जरी
सांज होताच मायेने घेती पाखरांना उरी

पाय मातीचेच तरी आकाशाला गवसणी
झाडांमुळेच ह्या माझ्या मिळे पावसाचे पाणी

ऊन पाऊस वादळ धरी भोवताली फेर
फक्त झाडांनाच नाही त्यांचे स्वतःचे घर

नाही स्वतःहून कधी त्यांनी मागितले पाणी
कधी कळलीच नाही त्यांची सळसळ वाणी

वर्षभरात एकदा फक्त ढाळतात पाने
त्या पिवळ्या आसवाने तेव्हा जळतात राने

दुःख गिळोनिया पुन्हा फुलतात फळतात
घाव कुऱ्हाडीचे तरी जन्मभर छळतात

त्यांची करुनी कत्तल तुम्ही थाटली शहरे
सुकुमार भुईवरी त्यांचे बकाल शहारे

काय पाप त्यांनी केले तुम्हा सावली देउनी 
अर्धी लाकडे त्यांचीही गेली सरण होऊनी

पुढे लागणार नाही एक थेंबसुद्धा ओठी
खेळ सरतेशेवटी मांडा वाळवंटी काठी... 

Monday, June 24, 2019

भारतीय जल वन संवर्धन ५ - बारव

समाजभान, धार्मिकता, तंत्रशुद्धता, जलव्यवस्थापन आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र याचा सर्वोत्तम मिलाफ म्हणजे बारव. बारव बांधून देणे हे सामाजिक - धार्मिक काम असायचे. ती बांधताना भूजल किती आणि कुठे असेल याचा अचूक अंदाज बांधला जायचा. ते भूजल कसे टिकून राहील यासाठी नियम असायचे आणि स्थापत्यशात्राने ती बारव नयनरम्य, शांत आणि भर उन्हात प्रसन्न थंडावा असायच्या.

परमार राजा भोजाने ‘समरांगण सूत्रधार’ या इ.स. १००० मधील ग्रंथात बारवांची उपयुक्तता, त्यातील पाण्याची शाश्वतता आणि बारव-रचना याबाबत नियम लिहून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत बारवांना कायमस्वरूपी पाणी राहण्यासाठी भूजलस्रोतांचे संशोधन आणि पुनर्भरण कसे करावे याबाबत चांगले मार्गदशर्न केले आहे. त्यावर काटेकोर अंमलबजावणी केल्याने बारवा या अखंड-जल-सौभाग्यवती राहत होत्या. महाराष्ट्रातील बारवांची निर्मिती ही मुख्यत्वे यादवकाळात झाली होती.





मराठवाड्यात अत्यंत जुन्या आणि सुंदर बारवा या कंधार (राष्ट्रकूट राजांची उपराजधानी), येरगी, धर्मपुरी, गणेशवाडी (चालुक्य सामंतांनी विकसित केलेली नगरे) अंबाजोगाई, चारठाणा, अंबड यांसारखी यादवकालीन जुन्या गावांमधून दिसतात.

त्या आजही वापरण्यायोग्य आहेत. यादव काळानंतर महाराष्ट्राला एका नवीन सांस्कृतिक आक्रमणाला तोंड द्यावे लागले. येथे संपूर्ण विध्वंसाची लाट आली. तेव्हा अशा स्थानांचे महत्त्व लोप पावले. मंदिरे, मूर्ती नष्ट केल्या गेल्या, पण उपयुक्ततेचे शाश्वत मूल्य असलेल्या बारवा मात्र काहीशा उपेक्षेने का होईना जतन केल्या गेल्या. त्यांचे पावित्र्य संपवले गेले, पण बारवनिर्मितीचा मूळ हेतू व नगररचनेतील त्यांचे स्थान कायम राहिले. बारवेजवळ किंवा आत मातृदेवता असतात - उदा: आसरा, चौसष्ट योगिनी. संस्कृतीच्या संदर्भात बारव स्थापत्याचे विशेष महत्त्व आहे. या बारवांच्या जवळ कुठेतरी ओढा असतो, कधी फार जुना तलाव असतो, एखादा डोंगर आणि त्यातून वाहणारा झरा असतो. हे स्रोत बारवेला जलसंपन्न करतात.

इस्लामी राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्यानंतर पुन्हा बारवांचे महत्त्व राज्यकर्त्यांना उमगले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करताना त्यासोबत बारव बनवली. शिवाय अनेक गावांमध्ये बारव उभ्या केल्या. महाराष्ट्रातून काशीकडे जाणाऱ्या रस्त्यात प्रत्येक गावात लोकांना राहता येईल अशी मंदिरे/धर्मशाळा आणि सोबत पाणीव्यवस्था म्हणून बारव बनविण्यात आली. आजही या बारवा आपल्याला उत्तमरित्या पाणी पुरवठा करू शकतात. पण आपण त्यांना केवळ उपेक्षा देत आहोत.

बहुतेक सगळ्या गावांमधून आता नळाने पाणी घरापर्यंत येते. ते टाकीत जाते कोणत्यातरी धरणातून किंवा जवळच्या तलावातून. मग उन्हाळ्यात शहराची तहान भागवायची असल्याने पाणी शहराकडे जाते आणि गावांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ज्या जुन्या बारवा आहेत त्या आपण गावकऱ्यांनी कचराकुंडीसारख्या वापरायला सुरुवात केली आहे. जी बारव कुप्रसिद्ध ७२च्या दुष्काळात सुद्धा आटली नाही ती आज कचरा, प्लास्टिक आणि माती/दगड ढासळून वापरण्यासारखी राहिली नाही. ज्या ज्या गावांमध्ये बारव आहेत, त्यांनी ठरवले आणि ती बारव पुन्हा स्वच्छ केली तर निश्चित तेथील पाणी प्रश्न संपुष्टात येईल.

आम्ही पूर्वी औरंगाबाद मध्ये सिडको एन ६ मध्ये राहत असू. तेथे सिद्धार्थ चौकातून महाराणा प्रताप चौकाकडे जाताना एक बारव होती उजव्या हाताला. तिची कचराकुंडी झालेली होती. आमच्या गावात देखील जुनी बारव आणि खोल आड आहे. पण आज दोन्ही वापरात नाहीत आणि बारवेची पडझड झालेली आहे. सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर बारव आणि आड दोन्ही नीट करता येतील.

औरंगाबाद येथे श्री किशोर शितोळे यांची जलदूत नावाची संस्था आहे. त्यांनी तेथील सातारा आणि मुकुंदवाडी येथील बारवांचे पुनरुज्जीवन घडवून आणले (खाली लिंक्स दिल्या आहेत). आज त्या बारवा भर दुष्काळात पाणी देत आहेत. गरज आहे केवळ प्रेमाने आपल्या भारतीय परंपरेला सांभाळण्याची. गरज म्हणून तरी याकडे आपण बघितले पाहिजे.

बारवांवर लोकप्रभामध्ये उत्तम लेख आले होते. त्याच्या लिंक्स
१. पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
२. बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
३. आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव

औरंगाबाद येथील जलदूतच्या काही बातम्या
१. ऐतिहासिक बारव पाण्याने ओसंडणार
२. साताऱ्यातील बारवेचे पाणी पिण्यायोग्य

Tuesday, June 18, 2019

राजांच्या सभेला जाऊ या

झुकूझुकू झुकूझुकू आगीनगाडी
तोंडाच्या वाफा हवेत सोडी
पडती काँग्रेस पाहूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।धृ।।

राजांच्या सभा मोठ्या
'लाव रे व्हिडीओ'चा खाक्या
भाषण एन्जॉय करू या
राजांच्या सभेला जाऊ या ।।१।।

राजांचे इंजिन धुरकट
वास येतो जळकट
चिकन सूप पिऊया
राजांच्या सभेला जाऊ या ।।२।।

सभांना नुसतीच गर्दी
नाही मतांची वर्दी
कार्यकर्ते शोधूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।३।।

काका होता तालेवार
त्याचा नुसताच मिजास फार
बारामतीत नाचूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।४।।

- ज्ञानेश

Monday, June 17, 2019

भारतीय जल वन संवर्धन ३ - पंचवटी

पंचवटी हे नाव ऐकल्यावर सर्वप्रथम कुणाही भारतीयाला सहज रामायण आठवेल. राम, सीता आणि लक्ष्मण जिथे राहिले, जिथून रावणाने सीतेचे हरण केले, जिथे बलशाली गिधाड जटायूची रामाशी ओळख व मैत्री झाली... ती पंचवटी!

पंचवटी म्हणजे - पंचानां वटानां समाहार इति पंचवटी  - पाच वृक्षांना सामावून घेणारी.

पाच हा अंक एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी दिसतो.
पाच तत्त्व - पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
पाच ज्ञानेंद्रीय - डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा
पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष
पंचप्राण - प्राण, व्यान, समान, उदान, अपान
पंचशील - अहिंसा, अचौर्य, अव्याभिचार, सत्य, नशा न करणे
कोणत्याही बाबीची परिपूर्णता पाच या अंकाने होते. तसेच मोठ्या जंगलाचे परिपूर्ण लघुरूप म्हणजे - पंचवटी.

वड, पिंपळ, बेल, सीता अशोक आणि आवळा ही झाडे विशिष्ट पद्धतीने लावून पंचवटी वन तयार करता येते. या पाचही वनस्पतींचे औषधी गुण आहेत, या वनस्पती वातावरण शुद्ध ठेवतात, मोठ्या प्रमाणात सावली देतात, सीता अशोक हा सदा हरित असतो. या झाडांचे धार्मिक महत्त्वही आहे. बेलपत्र महादेवाचे तर पिंपळ विष्णूचे आवडते झाड आहे. अशोक म्हटले की रावणाच्या कैदेत असून मुक्त असलेल्या सीतेची आठवण होतेच. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही ही झाडे उपयुक्त आहेत. कृमी, कीटक, मुंगळे/मुंग्या, पक्षी आणि अन्य लहान मोठे प्राणी या झाडांच्या आधारे राहतात वाढतात. कारण बेलफळ उन्हाळ्यात मिळते, तर आवळा पावसाळ्याच्या शेवटापासून पूर्ण हिवाळ्यात मिळतो. त्यामुळे पंचवटीच्या भोवताली कायम पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच असतो.

पंचवटीचेही दोन प्रकार आहेत
१. पंचवटी - यात पाचही झाडे एक एक लावावीत. केंद्र स्थान निश्चित करून १० मीटरचे वर्तुळ करावे. उत्तरेला बेल, पूर्वेला पिंपळ, आग्नेयेला अशोक, दक्षिणेला आवळा तर पश्चिमेला वड लावावे.

२. बृहद् पंचवटी - यात ४ पिंपळ, २ आवळे, २५ अशोक, ४ वड आणि ४ बेल असे ३९ झाडे  लावावीत. यातही केंद्रस्थान निश्चित करून ५, १०, २०, २५ आणि ३० मीटर त्रिज्येचे वर्तुळ आखून घ्यावे. सर्वात बाहेरच्या गोलावर चार दिशांना चार पिंपळ, त्या आत दक्षिणेला दोन आवळे, त्याच्या आत सामान अंतरावर गोलाकार २५ अशोक, चार उपदिशांना (ईशान्य, आग्नेय, नैऋत्य व वायव्य) वड आणि सर्वात आतील गोलात मुख्य दिशांना चार बेलाची झाडे लावावीत.

साधारण ५ वर्षात ही झाडे स्वावलंबी होतात (पुन्हा पाणी घालण्याची वा अन्य काळजी घेण्याची गरज उरत नाही). त्यानंतर मध्यभागी आपण आपल्याला ज्यात रुची असेल ते करू शकतो - उदा: ध्यानकक्ष, मंदीर, निवांत बसायला ओटा किंवा अजून काही.

पुण्यात गोखले नगर येथे वन उद्यानात पंचवटी वनासह अनेक प्रकारचे जैववैविध्य असलेले उद्यान विकसित केलेले आहे.

Thursday, June 13, 2019

भारतीय जल वन संवर्धन २ - नक्षत्रवन

सत्तावीस मधून नऊ वजा केले तर नेहमीच्या गणितात अठरा उरतात. परंतु बिरबलाने याचं उत्तर शून्य दिलं आणि ज्याने आव्हान दिलं त्याला हरवलं. कारण सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ नक्षत्रात पाऊस पडतो. जर पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य असणार आहे.

मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत पाऊस असतो. गेल्या काही वर्षात आणि याही वर्षी मृग नक्षत्र कमी पावसाचे जात आहे. महाराष्ट्रात रोहिणी नक्षत्रात (२२ मे ते ६ जून) पूर्वमौसमी पाऊस पडायचा. तेव्हा वर्तमानपत्रात "रोहिण्या बरसल्या" अशी हमखास बातमी असायची. तो आता मृग नक्षत्रात पडतो. म्हणजे सत्तावीस मधून एक वजा झालेला आहे, शून्य बाकी राहायला अजून आठच राहिलेत!

भारतीय संस्कृतीत पर्यावरणाचा विचार केलाय. राशी आणि नक्षत्र यांना वृक्षांची जोड दिली आहे. माणूस जन्मतो तेव्हा त्याची जन्मकुंडली तयार करण्याची प्रथा आहे. त्यात रास व नक्षत्र कळते. त्या व्यक्तीने त्या नक्षत्राचे जे झाड आहे ते लावावे आणि वाढवावे अशी व्यवस्था नक्षत्रवन संकल्पनेत केली आहे. यात व्यक्तिगत आपण काही झाडे लावू शकतो, किंवा संपूर्ण गाव मिळून नक्षत्रवन तयार करू शकते. नक्षत्रवनाचा संपूर्ण अभ्यास सुभाष बडवे यांनी केला आहे. त्यांच्या अभ्यासातून सिद्ध झालेले पुस्तक म्हणजे नक्षत्रवन. या पोस्टसोबत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ देत आहे.









त्याशिवाय राशी/नक्षत्रानुसार झाडे आणि पर्यायी झाडांचीही यादी आहे. इच्छूकांनी पुस्तक मिळवून वाचा.


निगडी प्राधिकरण पुणे येथे सेक्टर २८ मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. त्यात नक्षत्रवनाच्या आधारे झाडे लावली आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या उद्यानाला नक्की भेट द्या.

नक्षत्रवनाप्रमाणेच नवग्रह वाटिका सुद्धा पूजेसाठी तयार करता येते.

सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आपल्या राशीची/नक्षत्राची झाडे लावा आणि वाढवा. चांद्र आणि सौर राशी आणि जन्म नक्षत्र यावर आधारित झाडे लावायची ठरवली तर किमान पाच झाडे लावून होतील. शक्य असेल तर गावाने/कॉलनीने एकत्र येऊन त्या पुस्तकातील आराखड्यानुसार संपूर्ण नक्षत्रवन तयार करा.

पुढील भागात पंचवटीवनाबद्दल थोडी माहिती.

भारतीय जल वन संवर्धन १

आमचं गाव औरंगाबाद जिल्ह्यातील. बिडकीन DMIC जवळ. दुष्काळ नेहमीचा म्हणावा असा झालेला. गेल्या वर्षी आमचा बंधारा पूर्ण झाला. पण एकच मोठा पाऊस पडल्याने बंधाऱ्यात साठलेलं पाणी महिनाभरात जिरून, वाहून, वाफ होऊन संपलं. सध्या विहिरी कोरड्याच आहेत. एखाद्याच विहिरीला पाणी आहे.

जिल्ह्यात आणि एकूण मराठवाड्यात पाणी फाऊंडेशनचे काम खूप झाले. सगळीकडे CCT चर केलेले असतात. पावसाळ्यात त्यात पाणी साठलेले दिसते आणि उन्हाळ्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती. कारण पाणी जमिनीत जिरण्यापेक्षा त्याचे बाष्पीभवन जास्त होते. Awareness वाढणं आणि एकत्र येऊन श्रमदान करणं याशिवाय पाणी फाऊंडेशनच्या कामातून फार काही हाती लागलेलं दिसत नाही.

पण एकूण सेलिब्रिटी काम असल्याने शासनावर या कामाचा खूप परिणाम झालेला आहे. या वर्षी आमच्या गावात शासनाने JCB पाठवले आणि सगळ्या शिवारांच्या बांधाजवळ मोठे चर खोदले. त्यात बांधाजवळ जी मोठी झाडे आहेत त्यांची मुळं उघडी पडली/तुटली. ती झाडं आता किती टिकतील हे माहीत नाही. एकूण या कामामुळे दुष्काळ कमी होण्याऐवजी वाढेल हीच शक्यता दिसते.

फेसबुकवर उपेंद्रदादा Upendra Dada, डॉ उमेश मुंडल्ये DrUmesh Mundlye यांचे लेख / दिलेली माहिती आणि त्यांचं बरंच साहित्य वाचत असतो. शिवाय नक्षत्रवन सारखी पुस्तके वाचलीत. उपेंद्र दादांशी पाणी फाउंडेशनचं काम, मियावाकी, देवराई यावर वादविवाद पण झाले. यातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एकूण सामान्य जनतेची भारतीय वनपरंपरा, जलपरंपरा यात असलेली माहिती तर कमी आहेच, शिवाय श्रद्धाही कमी होत चालली आहे.

मी पूर्वी मियावाकी वननिर्मितीची माहिती दिली होती. त्याला प्रतिसाद सुद्धा छान मिळाला होता. तो प्रयोग आम्ही आमच्या शेतावर करतोय त्यामुळे ते सांगणं सोपं होतं. आता उपेंद्रदादांच्या माहितीवर आणि माझं जे वाचन झालं आहे त्यावर आधारित भारतीय वन/जल परंपरांच्या बाबतीत लिहावं असा विचार आहे. या गोष्टी बघितलेल्या, वाचलेल्या आहेत - केलेल्या नाहीत. त्यामुळे लिहिणं अवघड असेल.



यात पंचवटीवन, देवराई, पाणंद (पांदी), नक्षत्रवन, बारव, तलाव यावर लिहिण्याची इच्छा आहे. या पावसाळ्यात यातील काही बाबी जर कुणाला प्रत्यक्षात आणता आल्या तर लिहिल्याचे सार्थक होईल.