Monday, June 24, 2019

भारतीय जल वन संवर्धन ५ - बारव

समाजभान, धार्मिकता, तंत्रशुद्धता, जलव्यवस्थापन आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र याचा सर्वोत्तम मिलाफ म्हणजे बारव. बारव बांधून देणे हे सामाजिक - धार्मिक काम असायचे. ती बांधताना भूजल किती आणि कुठे असेल याचा अचूक अंदाज बांधला जायचा. ते भूजल कसे टिकून राहील यासाठी नियम असायचे आणि स्थापत्यशात्राने ती बारव नयनरम्य, शांत आणि भर उन्हात प्रसन्न थंडावा असायच्या.

परमार राजा भोजाने ‘समरांगण सूत्रधार’ या इ.स. १००० मधील ग्रंथात बारवांची उपयुक्तता, त्यातील पाण्याची शाश्वतता आणि बारव-रचना याबाबत नियम लिहून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत बारवांना कायमस्वरूपी पाणी राहण्यासाठी भूजलस्रोतांचे संशोधन आणि पुनर्भरण कसे करावे याबाबत चांगले मार्गदशर्न केले आहे. त्यावर काटेकोर अंमलबजावणी केल्याने बारवा या अखंड-जल-सौभाग्यवती राहत होत्या. महाराष्ट्रातील बारवांची निर्मिती ही मुख्यत्वे यादवकाळात झाली होती.





मराठवाड्यात अत्यंत जुन्या आणि सुंदर बारवा या कंधार (राष्ट्रकूट राजांची उपराजधानी), येरगी, धर्मपुरी, गणेशवाडी (चालुक्य सामंतांनी विकसित केलेली नगरे) अंबाजोगाई, चारठाणा, अंबड यांसारखी यादवकालीन जुन्या गावांमधून दिसतात.

त्या आजही वापरण्यायोग्य आहेत. यादव काळानंतर महाराष्ट्राला एका नवीन सांस्कृतिक आक्रमणाला तोंड द्यावे लागले. येथे संपूर्ण विध्वंसाची लाट आली. तेव्हा अशा स्थानांचे महत्त्व लोप पावले. मंदिरे, मूर्ती नष्ट केल्या गेल्या, पण उपयुक्ततेचे शाश्वत मूल्य असलेल्या बारवा मात्र काहीशा उपेक्षेने का होईना जतन केल्या गेल्या. त्यांचे पावित्र्य संपवले गेले, पण बारवनिर्मितीचा मूळ हेतू व नगररचनेतील त्यांचे स्थान कायम राहिले. बारवेजवळ किंवा आत मातृदेवता असतात - उदा: आसरा, चौसष्ट योगिनी. संस्कृतीच्या संदर्भात बारव स्थापत्याचे विशेष महत्त्व आहे. या बारवांच्या जवळ कुठेतरी ओढा असतो, कधी फार जुना तलाव असतो, एखादा डोंगर आणि त्यातून वाहणारा झरा असतो. हे स्रोत बारवेला जलसंपन्न करतात.

इस्लामी राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्यानंतर पुन्हा बारवांचे महत्त्व राज्यकर्त्यांना उमगले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करताना त्यासोबत बारव बनवली. शिवाय अनेक गावांमध्ये बारव उभ्या केल्या. महाराष्ट्रातून काशीकडे जाणाऱ्या रस्त्यात प्रत्येक गावात लोकांना राहता येईल अशी मंदिरे/धर्मशाळा आणि सोबत पाणीव्यवस्था म्हणून बारव बनविण्यात आली. आजही या बारवा आपल्याला उत्तमरित्या पाणी पुरवठा करू शकतात. पण आपण त्यांना केवळ उपेक्षा देत आहोत.

बहुतेक सगळ्या गावांमधून आता नळाने पाणी घरापर्यंत येते. ते टाकीत जाते कोणत्यातरी धरणातून किंवा जवळच्या तलावातून. मग उन्हाळ्यात शहराची तहान भागवायची असल्याने पाणी शहराकडे जाते आणि गावांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ज्या जुन्या बारवा आहेत त्या आपण गावकऱ्यांनी कचराकुंडीसारख्या वापरायला सुरुवात केली आहे. जी बारव कुप्रसिद्ध ७२च्या दुष्काळात सुद्धा आटली नाही ती आज कचरा, प्लास्टिक आणि माती/दगड ढासळून वापरण्यासारखी राहिली नाही. ज्या ज्या गावांमध्ये बारव आहेत, त्यांनी ठरवले आणि ती बारव पुन्हा स्वच्छ केली तर निश्चित तेथील पाणी प्रश्न संपुष्टात येईल.

आम्ही पूर्वी औरंगाबाद मध्ये सिडको एन ६ मध्ये राहत असू. तेथे सिद्धार्थ चौकातून महाराणा प्रताप चौकाकडे जाताना एक बारव होती उजव्या हाताला. तिची कचराकुंडी झालेली होती. आमच्या गावात देखील जुनी बारव आणि खोल आड आहे. पण आज दोन्ही वापरात नाहीत आणि बारवेची पडझड झालेली आहे. सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर बारव आणि आड दोन्ही नीट करता येतील.

औरंगाबाद येथे श्री किशोर शितोळे यांची जलदूत नावाची संस्था आहे. त्यांनी तेथील सातारा आणि मुकुंदवाडी येथील बारवांचे पुनरुज्जीवन घडवून आणले (खाली लिंक्स दिल्या आहेत). आज त्या बारवा भर दुष्काळात पाणी देत आहेत. गरज आहे केवळ प्रेमाने आपल्या भारतीय परंपरेला सांभाळण्याची. गरज म्हणून तरी याकडे आपण बघितले पाहिजे.

बारवांवर लोकप्रभामध्ये उत्तम लेख आले होते. त्याच्या लिंक्स
१. पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
२. बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
३. आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव

औरंगाबाद येथील जलदूतच्या काही बातम्या
१. ऐतिहासिक बारव पाण्याने ओसंडणार
२. साताऱ्यातील बारवेचे पाणी पिण्यायोग्य

No comments:

Post a Comment