Monday, June 17, 2019

भारतीय जल वन संवर्धन ३ - पंचवटी

पंचवटी हे नाव ऐकल्यावर सर्वप्रथम कुणाही भारतीयाला सहज रामायण आठवेल. राम, सीता आणि लक्ष्मण जिथे राहिले, जिथून रावणाने सीतेचे हरण केले, जिथे बलशाली गिधाड जटायूची रामाशी ओळख व मैत्री झाली... ती पंचवटी!

पंचवटी म्हणजे - पंचानां वटानां समाहार इति पंचवटी  - पाच वृक्षांना सामावून घेणारी.

पाच हा अंक एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी दिसतो.
पाच तत्त्व - पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
पाच ज्ञानेंद्रीय - डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा
पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष
पंचप्राण - प्राण, व्यान, समान, उदान, अपान
पंचशील - अहिंसा, अचौर्य, अव्याभिचार, सत्य, नशा न करणे
कोणत्याही बाबीची परिपूर्णता पाच या अंकाने होते. तसेच मोठ्या जंगलाचे परिपूर्ण लघुरूप म्हणजे - पंचवटी.

वड, पिंपळ, बेल, सीता अशोक आणि आवळा ही झाडे विशिष्ट पद्धतीने लावून पंचवटी वन तयार करता येते. या पाचही वनस्पतींचे औषधी गुण आहेत, या वनस्पती वातावरण शुद्ध ठेवतात, मोठ्या प्रमाणात सावली देतात, सीता अशोक हा सदा हरित असतो. या झाडांचे धार्मिक महत्त्वही आहे. बेलपत्र महादेवाचे तर पिंपळ विष्णूचे आवडते झाड आहे. अशोक म्हटले की रावणाच्या कैदेत असून मुक्त असलेल्या सीतेची आठवण होतेच. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही ही झाडे उपयुक्त आहेत. कृमी, कीटक, मुंगळे/मुंग्या, पक्षी आणि अन्य लहान मोठे प्राणी या झाडांच्या आधारे राहतात वाढतात. कारण बेलफळ उन्हाळ्यात मिळते, तर आवळा पावसाळ्याच्या शेवटापासून पूर्ण हिवाळ्यात मिळतो. त्यामुळे पंचवटीच्या भोवताली कायम पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच असतो.

पंचवटीचेही दोन प्रकार आहेत
१. पंचवटी - यात पाचही झाडे एक एक लावावीत. केंद्र स्थान निश्चित करून १० मीटरचे वर्तुळ करावे. उत्तरेला बेल, पूर्वेला पिंपळ, आग्नेयेला अशोक, दक्षिणेला आवळा तर पश्चिमेला वड लावावे.

२. बृहद् पंचवटी - यात ४ पिंपळ, २ आवळे, २५ अशोक, ४ वड आणि ४ बेल असे ३९ झाडे  लावावीत. यातही केंद्रस्थान निश्चित करून ५, १०, २०, २५ आणि ३० मीटर त्रिज्येचे वर्तुळ आखून घ्यावे. सर्वात बाहेरच्या गोलावर चार दिशांना चार पिंपळ, त्या आत दक्षिणेला दोन आवळे, त्याच्या आत सामान अंतरावर गोलाकार २५ अशोक, चार उपदिशांना (ईशान्य, आग्नेय, नैऋत्य व वायव्य) वड आणि सर्वात आतील गोलात मुख्य दिशांना चार बेलाची झाडे लावावीत.

साधारण ५ वर्षात ही झाडे स्वावलंबी होतात (पुन्हा पाणी घालण्याची वा अन्य काळजी घेण्याची गरज उरत नाही). त्यानंतर मध्यभागी आपण आपल्याला ज्यात रुची असेल ते करू शकतो - उदा: ध्यानकक्ष, मंदीर, निवांत बसायला ओटा किंवा अजून काही.

पुण्यात गोखले नगर येथे वन उद्यानात पंचवटी वनासह अनेक प्रकारचे जैववैविध्य असलेले उद्यान विकसित केलेले आहे.

No comments:

Post a Comment