मागच्या वर्षी मे महिन्यात आमचे मित्र विशाल आणि मीनाक्षी व्यास यांच्या शेतावर गेलो होतो. शेत साताऱ्याच्या जवळ आहे. तिथे असलेल्या पांदीजवळ एक झरा भर उन्हाळ्यात वाहता होता. स्वच्छ पाण्याचा खळखळ आवाज सुखावत होता. तेथील पांदीचा (झऱ्याचा मिळाला नाही) फोटो सोबत आहे. त्यात सहज दिसेल कि भोवताली छान झाडं आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात, खुलताबादहून म्हैसमाळकडे जायला निघालो कि घाट सुरु होण्याआधी उजवीकडे लंबेश्वर नावाचे शंकराचे मंदिर (गुहा) आहे. त्या गुहेच्या बाजूला साधारण २० वर्षांपूर्वी वर्षभर वाहणारा झरा/धबधबा होता. आज दिवाळीच्या आधीच तो कोरडा असतो. कारण त्या डोंगरावर आता जे पावसाळी गवत यायचं ते आता येत नाही आणि मोठी झाडं केव्हाच तोडली गेली आहेत.
आमच्या गावाची नदी/ओढा पावसाळ्यात एवढा जोरदार वाहायचा की माझी मावशी तिच्या लहानपणी त्यात वाहून जाणार होती. नंतर मार्च/एप्रिल पर्यंत त्यातून पाणी वाहत असायचं. नंतरही वाळूत एखाद्या फुटाचा खड्डा केला तर पिण्यायोग्य पाणीसहज मिळायचे. मे महिन्यात असा खड्डा करून पाणी पिल्याचे मलाही आठवते. आईच्या लहानपणी या ओढ्याच्या आजूबाजूला एवढी झाडी होती कि तिथे दिवसाही लोक सोबत असेल तरच जायचे. बिबट्या सहजच दर्शन देऊन जायचा. आता तुकड्या तुकड्यात झाडं आहेत पण सलग झाडी कुठेच नाही. त्यामुळे आज सप्टेंबर मध्येच कोरड्या झालेल्या ओढ्यातून एखादा लहान गुराखी गुरं घेऊन फिरतो...
दुष्काळ निवारणासाठी आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. आज युरोपात सगळीकडे नद्या जोडलेल्या आहेत आणि तरीही मागील काही वर्षांत इथे सतत दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षीपासून आम्ही बेल्जियम मध्ये आहोत. इथे उन्हाळ्यात पाणी वापरावर निर्बंध असतात. पूर्वीची इथे जी जंगले होती ती तोडून फायद्यासाठी वेगात वाढणारे सूचिपर्णी वृक्ष इथे लावले गेले. त्यातून उत्पन्नही मिळायचं. पण त्याचा दुष्परिणाम मोठा झाला. या भागात मोठ्या प्रमाणात पानगळीचे वृक्ष असायचे. ती पाने जमिनीवर लवकर कुजायची आणि त्यात पाणी थांबून थांबून वाहायचं आणि जमिनीत मुरायचं. सूचिपर्णी वृक्षांची पाने जमिनीवर पडली तर ती लवकर कुजत नाहीत आणि पाणी त्यावरून वाहून जातं. इथल्या जमिनीला ते नकोय... आता येथील सरकारने नवीन वृक्ष लावताना केवळ स्थानिक पानगळीचे वृक्ष लावण्याची सक्ती केली आहे.
सोबत चित्रलेखा वैद्य यांची आकाशवाणीवरील मुलाखत आणि माहितीचा व्हिडीओ दिला आहे. त्यात त्यांनी सांगितलेली चिंताजनक बाब ही आहे की भारत हा सर्वाधिक भूजल उपसा करणारा देश आहे. इस्रायल मध्ये भूजलावर सरकारचा हक्क असतो. कुणीही विहिरीतून/बोअर मधून हवे तेवढे पाणी उपसू शकत नाही. युरोपात माझ्या एका मित्राला गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या प्लॉटवर बोअर करायचा आहे. त्याला ती परवानगी मिळत नाहीये. भारतात भूजल उपशावर नियंत्रण तर नाहीच, पण जमिनीला भोकं पाडण्यावर सुद्धा कोणते बंधन नाही. एका सोसायटीत आपण १० बोअर केलेले असतात. आपल्याकडे विहिरी ५० ते ७० फुटाच्या असतात. तेथील भूजल हे दर वर्षी पुन्हा भरते. बोअर २००-२५० फुटापेक्षा जास्त खोल असतात आणि काही भागात तर ३००-४०० फूट खोल असतात. ते पाणी गेल्या ५००-१००० वर्षात जमा झालेले आहे. ते आपण उपसून निसर्गाची नेमकी काय हानी करत आहोत हे अजून कळायचे आहे. त्या पाण्यामुळे कदाचित भूकंप होत नसतील... किंवा काहीही असू शकतं. पण आपण एवढे करंटे आहोत की याचा कोणताही विचार न करता जो बोअर वाला ५०० फूट खोल जाईल त्याला काम देतो. शिवाय बऱ्याच कंपन्या बोअर करून त्यांचे दूषित पाणी सरळ बोअरमधून टाकून देतात आणि भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात.
भारतात किंवा महाराष्ट्रात नेमकं झालंय काय... पाऊस फार कमी नाही, पण अनियमित झाला हे नक्की. जेवढा पाऊस ४ महिन्यात पडायचा तो आता दोन महिन्यात, त्यातही काही दिवसांत पडतो. म्हणजे पावसाचे प्रमाण तेवढेच आहे, पण तरीही नदी/झरा/ओढ्यातील पाणी दिवाळीच्या आधीच संपून जाते. त्याचं साधं कारण म्हणजे आपण पाण्याला वेगात जाऊ देऊन मोठ्या जलाशयात अडवत बसलो. पाणी थांबवायचं नसतं तर त्याची केवळ गती कमी करायची असते. हा साधा निसर्गनियम आपण विसरून गेलो. पाणी सावकाश वाहिलं तर ते जमिनीची तहान भागवून पुढे जातं. पाण्याची गती कमी करण्यासाठी आणि त्याचं बाष्पीभवन होऊ नये, म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. फक्त खड्डे करून काहीच होणार नाही. एकूण वृक्षतोड इतकी प्रचंड आहे की यावर आता मोठी जन चळवळ करूनच मोठी वृक्षलागवड करावी लागेल. सरकारी पातळीवरून काही होईल याची वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाहीये.
मग करायचं काय...

२. जे काही बंधाऱ्याचे कामं झाले असतील त्या बंधाऱ्याजवळ झाडं आणि अगदी पाण्याजवळ गवतवर्गीय वनस्पती लावल्या पाहिजेत. परिणिता दांडेकर यांची पोस्ट बघा.
३. आपल्या गावात, शेतात, कॉलनीत जिथे जागा मिळेल तिथे, अगदी काही गुंठे असेल तरीही, सोप्या पद्धतीने निसर्गबेट निर्माण केले पाहिजे.
काय आहे निसर्गबेट?

हा पावसाळा खूप उशीरा सुरू होत आहे. पुढचा अजून किती वाईट असेल सांगता येत नाही. त्यामुळे ही सगळी कामे आजच सुरू केली पाहिजेत. "पुढच्या पावसाळ्यात करू" असा विचार हा अविचारच असेल.
या लेखमालेचा शेवट नलेश पाटलांच्या कवितेने करतोय... विचार तर कराच पण कृतीही लवकर करा... धन्यवाद!
माझ्या झाडांची हिरवी किती सांगू मी थोरवी
तुम्हा देऊन सावली ऊन माथ्यास मिरवी
असा निमूट सोसला ताप दिसभर जरी
सांज होताच मायेने घेती पाखरांना उरी
पाय मातीचेच तरी आकाशाला गवसणी
झाडांमुळेच ह्या माझ्या मिळे पावसाचे पाणी
ऊन पाऊस वादळ धरी भोवताली फेर
फक्त झाडांनाच नाही त्यांचे स्वतःचे घर
नाही स्वतःहून कधी त्यांनी मागितले पाणी
कधी कळलीच नाही त्यांची सळसळ वाणी
वर्षभरात एकदा फक्त ढाळतात पाने
त्या पिवळ्या आसवाने तेव्हा जळतात राने
दुःख गिळोनिया पुन्हा फुलतात फळतात
घाव कुऱ्हाडीचे तरी जन्मभर छळतात
त्यांची करुनी कत्तल तुम्ही थाटली शहरे
सुकुमार भुईवरी त्यांचे बकाल शहारे
काय पाप त्यांनी केले तुम्हा सावली देउनी
अर्धी लाकडे त्यांचीही गेली सरण होऊनी
पुढे लागणार नाही एक थेंबसुद्धा ओठी
खेळ सरतेशेवटी मांडा वाळवंटी काठी...
No comments:
Post a Comment