Thursday, June 13, 2019

भारतीय जल वन संवर्धन १

आमचं गाव औरंगाबाद जिल्ह्यातील. बिडकीन DMIC जवळ. दुष्काळ नेहमीचा म्हणावा असा झालेला. गेल्या वर्षी आमचा बंधारा पूर्ण झाला. पण एकच मोठा पाऊस पडल्याने बंधाऱ्यात साठलेलं पाणी महिनाभरात जिरून, वाहून, वाफ होऊन संपलं. सध्या विहिरी कोरड्याच आहेत. एखाद्याच विहिरीला पाणी आहे.

जिल्ह्यात आणि एकूण मराठवाड्यात पाणी फाऊंडेशनचे काम खूप झाले. सगळीकडे CCT चर केलेले असतात. पावसाळ्यात त्यात पाणी साठलेले दिसते आणि उन्हाळ्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती. कारण पाणी जमिनीत जिरण्यापेक्षा त्याचे बाष्पीभवन जास्त होते. Awareness वाढणं आणि एकत्र येऊन श्रमदान करणं याशिवाय पाणी फाऊंडेशनच्या कामातून फार काही हाती लागलेलं दिसत नाही.

पण एकूण सेलिब्रिटी काम असल्याने शासनावर या कामाचा खूप परिणाम झालेला आहे. या वर्षी आमच्या गावात शासनाने JCB पाठवले आणि सगळ्या शिवारांच्या बांधाजवळ मोठे चर खोदले. त्यात बांधाजवळ जी मोठी झाडे आहेत त्यांची मुळं उघडी पडली/तुटली. ती झाडं आता किती टिकतील हे माहीत नाही. एकूण या कामामुळे दुष्काळ कमी होण्याऐवजी वाढेल हीच शक्यता दिसते.

फेसबुकवर उपेंद्रदादा Upendra Dada, डॉ उमेश मुंडल्ये DrUmesh Mundlye यांचे लेख / दिलेली माहिती आणि त्यांचं बरंच साहित्य वाचत असतो. शिवाय नक्षत्रवन सारखी पुस्तके वाचलीत. उपेंद्र दादांशी पाणी फाउंडेशनचं काम, मियावाकी, देवराई यावर वादविवाद पण झाले. यातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एकूण सामान्य जनतेची भारतीय वनपरंपरा, जलपरंपरा यात असलेली माहिती तर कमी आहेच, शिवाय श्रद्धाही कमी होत चालली आहे.

मी पूर्वी मियावाकी वननिर्मितीची माहिती दिली होती. त्याला प्रतिसाद सुद्धा छान मिळाला होता. तो प्रयोग आम्ही आमच्या शेतावर करतोय त्यामुळे ते सांगणं सोपं होतं. आता उपेंद्रदादांच्या माहितीवर आणि माझं जे वाचन झालं आहे त्यावर आधारित भारतीय वन/जल परंपरांच्या बाबतीत लिहावं असा विचार आहे. या गोष्टी बघितलेल्या, वाचलेल्या आहेत - केलेल्या नाहीत. त्यामुळे लिहिणं अवघड असेल.



यात पंचवटीवन, देवराई, पाणंद (पांदी), नक्षत्रवन, बारव, तलाव यावर लिहिण्याची इच्छा आहे. या पावसाळ्यात यातील काही बाबी जर कुणाला प्रत्यक्षात आणता आल्या तर लिहिल्याचे सार्थक होईल.

No comments:

Post a Comment