Sunday, May 24, 2020

संघातले शिक्षण

संघाच्या संचलनात (संघाचे ४०-४५ मिनिटांचे मार्चिंग) घोषही (संघाचा बँड) असतो. त्याच्या तालावर सगळं संचलन होत असतं. घोषात सर्वात पुढे घोषदंड घेऊन घोषप्रमुख असतो. त्यानंतर आनक (ड्रम) पथक, मग ढोल, झांझ पथक, वंशी (बासरी) पथक आणि शेवटी शंख (बिगुल) पथक असते. आनक, वंशी आणि शंख पथकात एक एक प्रमुख असतो.

सगळे एका तालात चालत असतात. घोषाची एक रचना (ट्यून) सुरू असते. तिचं शेवटचं चरण सुरू असतं. सगळे पथक प्रमुख सतर्क असतात. शेवटच्या चारणाच्या शेवटच्या समेच्या आधी घोषप्रमुख हातातल्या घोषदंडाने पुढची रचना कोणत्या पथकाची आहे याची सूचना करतात. रचना संपल्यावर तीन पावलांसाठी (दीड सेकंड) आनक वाजतो, एका पावलासाठी (अर्धा सेकंद) शांतता असते. त्या शांततेत ज्या पथकाला पुढची रचना वाजवायची आहे त्या पथकाचा प्रमुख पुढील रचनेचं नाव सांगतो. आनक पुन्हा एकदा तीन पावलांसाठी वाजतो. लगेच ती रचना ते पथक, आनक पथक आणि ढोल पथक वाजवू लागते.

१. घोषप्रमुखाला रचना केव्हा संपते त्या वेळी सतर्क राहून बदलाची सूचना द्यायची असते.
२. कोणत्या पथकाची पुढची रचना आहे हे कळाल्यावर त्या पथकातील सर्वांनी तयार राहायचे असते.
३. त्या पथकातील प्रमुखाला विचार करून रचनेचे नाव सांगायला सगळा मिळून काही सेकंद वेळ मिळतो.
४. आपल्या पथकातील सर्वांना कोणत्या रचना येतात हे पथकप्रमुखाला माहीत असावे लागते.
५. रचनेचे नाव कळाल्यावर त्या पथकाला आणि आनक पथकाला रचना सुरू करण्यासाठी दीड सेकंद वेळ मिळतो.
६. दीड सेकंदानंतर नवीन रचना सुरू होते.
७. हे सगळं घडत असताना संपूर्ण घोषपथकाची पावले एक-दोच्या ठोक्यावर डावा-उजवा बरोबर सुरू असतात.
८. या सगळ्या तालावर संपूर्ण संचलन सुरू असतं.

सतर्कता, पथकातील सर्वांची माहिती, वेगवान निर्णयक्षमता, नियमांचे पालन, आदेशाची अंमलबजावणी, पावलासोबत जोडलेली मने... हे सगळं आम्ही सहज शिकतो, केव्हा शिकलो ते कळतही नाही...

आज जेव्हा कोविड१९ च्या साथीत संघाचं योजनाबद्ध काम बघितलं तेव्हा माझे मामा प्रकाश कुळकर्णी यांच्याशी सुमारे २२ वर्षांपूर्वी झालेला वरील संवाद आठवला!

Thursday, March 12, 2020

देवराई

लेखक डॉ उमेश मुंडल्ये (DrUmesh Mundlye)
प्रकाशक हिंदुस्थान प्रकाशन संस्था
मूल्य ₹१७५

डॉ उमेश मुंडल्येंचा परिचय फेसबुकवरचा. त्यांची कामं, त्यातून होणारं जल, मृद संवर्धन, त्यांच्या कामामुळे सुखावणारे अनेक लोक, गावं हे वाचनात येत होतंच. त्यांच्या अभ्यासाचा, डॉक्टरीचा, मूळ विषय देवराई. त्यावर त्यांचं पुस्तक येत आहे कळाल्यावर लगेच बुक केलं, पण हाती पडायला बरेच महिने गेले.

उमेशजींचा मूळ अभ्यासाचा विषय देवराई असल्याने, त्यांनी या पुस्तकात देवराई आणि त्यांची ओळख कशी झाली इथपासून ते देवराई कशी असते, तिचे संवर्धन धार्मिक आधारावर लोक कसे करतात, देवराईतील जैववैविध्य, काही प्रजाती केवळ देवराईतच का सापडतात, देवरायांपुढील समस्या आणि आव्हाने तसेच ही आव्हाने आपण परतवून कसे लावू शकतो या सर्वांबाबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे विषय अभ्यासाचा असला तरी अजिबात कंटाळवाणा न होता सहजपणे समजावून सांगितला आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती देवराईच्या अभ्यास कसा सुरु झाला इथपासून. जेव्हा हा अभ्यास सुरु झाला तेव्हा महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या देवरायांची संख्या होती साधारण ४५०. पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा केवळ सावंतवाडी या एका तालुक्यात ४०० पेक्षा अधिक देवराया आहेत हे कळालं. त्यानंतर उमेशजींनी १६०० पेक्षा अधिक देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि ३७६८ देवरायांची नोंद त्यांच्या PhDच्या अभ्यासात आहे.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ही संकल्पना भारतभर सगळीकडे आहेच, शिवाय भारताबाहेरही अनेक देवराया आहेत. संकल्पना तीच - हे वन देवाचं आहे. इथून कोणताही आर्थिक लाभ मिळवायचा नाही. इतकंच काय कित्येक ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायलाही बंदी आहे. या देवराया केवळ आदिवासी भागात आहेत असं नाही. आदिवासी भागात, खेड्यात, गावाच्या अगदी जवळ ते गावापासून दूर अंतरावर अशा सगळीकडे देवराया आजही उभ्या आहेत आणि आपल्या या परंपरेची साक्ष देत आहेत. या देवरायांमुळे अनेक गोष्टी साधल्या जातात - पर्यावरण समतोल, जैवविविधतेचे संरक्षण, गावाचं मिळून एक सांस्कृतिक केंद्र, औषधी आणि पर्यटनातून होणारा आर्थिक विकास. पण यासाठी देवराया वाचल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत.

या देवराईत विविध दैवतं असतात. ती कोपिष्टही असतात. त्या श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या भीतीने सुद्धा देवराया सुरक्षित राहतात. या देवरायांचे वय मोजण्याच्याही अनेक पद्धती असतात. नगर जिल्ह्यातील एका देवराईत दर ३० वर्षांनी एक वाघ्या देवाचा दगड बसवतात. तिथे असे १७ दगड दिसून आले, म्हणजे ती देवराई सुमारे ५०० वर्षे जुनी असावी. एका देवराईत एक प्राचीन मंदिर आहे, एका साधूने बनवून घेतलेलं. ते ४०० वर्षे जुनं आहे, म्हणजे देवराई त्याहून जुनी असणार. इतकं हे जुनं वैभव आपल्याकडे आहे. त्याची पुसटशीही ओळख आपल्यापैकी अनेकांना नसते. या पुस्तकातून ही ओळख करून दिली आहे.

देवराई जर गावाजवळील डोंगरावर किंवा उंच भागात असेल तर गावाच्या पाण्याचा प्रश्न ती सोडवते. दापोलीतील कुडावळे गावातील देवराईतून वर्षभर गावाला पाणीपुरवठा होतो. त्या पाण्याला जर नळाने बंद केलं तर पाईप/नळ फुटतात इतका त्या पाण्याला प्रवाह असतो. देवराईच्या अशा पाण्यावर आजूबाजूच्या गावात बागाईत फुलली आहे. यामुळेही लोक देवराई जपतात.

देवराईतील जैववैविध्य प्रचंड असते. अगदी छोट्या देवराईत शंभर सव्वाशे प्रकारची झाडे दिसून येतात. एका देवराईतील आंब्याच्या झाडाची पहिली फांदी चाळीस फुटांवर आहे. ते झाड आंब्याचं आहे हे लवकर ओळखूही येत नाही. देवराईतील जुने वेल इतके मोठे असतात की वेलीच्या खोडाचा व्यास एक मीटर एवढा असू शकतो. शिवाय अनेक पक्षी, दुर्मिळ होत चाललेले प्राणी (साळींदर, खवले मांजर) यात सुरक्षित वास करतात.

हे पुस्तक वाचताना वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या मराठवाड्यात एकही देवराई नाही... :-( मराठवाड्याशिवाय दुष्काळी जिल्हे सोलापूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर - यातही एकाही देवराईची नोंद नाही. पाऊस कमी असल्याने देवराई नाही की देवराई नाही म्हणून पाऊस नाही... काहीही असले तरी देवराई ही असलीच पाहिजे हे नक्की.

या सगळ्या आणि याहूनही खूप जास्त गोष्टी हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतात.

आम्ही आमच्या शेतात (जिल्हा औरंगाबाद) मियावाकी घनवन पद्धतीने देवराई तयार करत आहोत. एकूण अर्धा एकर करायचा विचार आहे. आतापर्यंत एक गुंठ्याचे दोन टप्पे लावून झाले आहेत. यात १५० स्थानिक प्रजातींची ६३० पेक्षा अधिक रोपे लावलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील झाडं आता जास्तीत जास्त २० फूट तर सरासरी ८ फूट आहेत. यात आता मुंगूस येऊन राहू लागले आहेत, अनेक पक्षी येत आहेत, घोरपडी येत आहेत. उन्हाळ्यात हरणांचे कळप सहजच वस्तीला येतात. आमच्या भागातून १० वर्षांपूर्वी गायब झालेले मोर अधून मधून इथे हजेरी लावून जातात. हे सगळं केवळ दीड वर्षांच्या जंगलात होतंय. सोबत लागवडीच्या आधीचा आणि नंतरचा गुगल मॅप वरील फोटोही आहे.







आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, देवराई समजावून घ्यावी आणि झाडं लावावीत, जगवावीत.

या परिचयावर प्रत्यक्ष लेखकाने प्रतिक्रिया दिली होती - 
पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Dnyaneshजी.
देवराई ही एक समृद्ध परंपरा आहे. यामधे माणसाचा हस्तक्षेप नसतो किंवा नसेल याची काळजी घेऊन ठेवली गेली आहे. चांगल्या जंगलात जसे जमिनीवर असणाऱ्या गवतापासून लहान झुडूपं, मोठी झुडुपं, लहान वृक्ष, मध्यम वृक्ष, मोठे वृक्ष आणि या सर्वांवर असलेल्या विविध आकाराच्या वेली यांचं उत्तम सहजीवन असतं, त्याची लहान प्रतिकृती म्हणजे देवराई असते. नवीन देवराई तयार करणं हे एका पिढीचं काम नाही. सुरूवात आपण करावी आणि दोन पिढ्यांनी ते हस्तक्षेप न करता जपावं तेव्हा देवराई काही आकाराला येईल.
मियावाकी आणि देवराई यात मात्र काहीच साम्य नाही. मुंबईच्या संदर्भात उपमा द्यायची तर मियावाकी म्हणजे सकाळच्या गर्दीच्या वेळातील मुंबईकडे जाणारी आणि डोंबिवलीला आलेली जलद लोकल आहे. प्रचंड संख्येने लावलेली झाडं म्हणजे देवराई नाही. झाडं लावताना आपण आपला हेतू साध्य करण्यासाठीच लावतो बरेचदा. त्याचे इतर परिणाम लक्षात घेत नाही आणि नंतर ते परिणाम निस्तरण्यासाठी परिश्रम करावे लागतात पुढच्या पिढ्यांना. हरितक्रांती हे एक उत्तम उदाहरण आहे याचं.
देवराई ही लोकसहभागातून चालवली जाणारी जैवविविधता, पाणी, मृदा यांचं संरक्षण आणि संवर्धन करणारी परंपरा आहे. यात माणसाचा सहभाग फक्त जपण्यासाठी आहे. मियावाकीचं तसं नाहीये. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त झाडं ही केवळ गर्दी झाली. त्यासाठी येणारा खर्च याबद्दल मी बोलत नाही. तो स्वतंत्र विषय होईल.
त्यामुळे कृपया मियावाकी म्हणजे देवराईचं एक वेगळं रूप असलेयासारखं आहे असा गैरसमज ठेवू नका ही विनंती.

या प्रतिक्रियेला मी दिलेले उत्तर -
उमेशजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला देवराई विषयातील अभ्यास आहे. मी कोणत्याही प्रकारे प्रतिवाद करत नाहीये, कारण माझा अभ्यास अथवा अनुभव तुमच्यासारखा अजिबातच नाहीये. मी देवराईची तुलना मियावाकी घनवनाशी करत नाहीये. माझ्या पोस्टमधील वाक्यांमधून तसा अर्थ निघत असेल तर ती माझी चूक आहे.
मला देवराई म्हणजे काय हे कळलंय ते खालीलप्रमाणे -
१. देवराई हे मिश्रवन असलं पाहिजे
२. त्यात माणसांचा वावर शून्य ते मर्यादित असावा
३. ते परंपरेने आणि समाजाने जपलेलं जंगल असावं
४. हे संवर्धन, संगोपन श्रद्धेने केलेलं असावं
दुर्दैवाने आमचं शेत जिथे आहे त्याच्या आजूबाजूला कुठेही अशी देवराई नाहीये. संपूर्ण गावाला सोबत घेऊन गायरानावर वा कोणत्या सामायिक जमिनीवर देवराई तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि संयम आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आमच्याच शेतात (एकूण साडेतीन एकर) मध्ये साधारण अर्धा एकर आपणच देवराई करावी असा विचार केला. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा विचार करता सर्वात आधी मियावाकी पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यावर आतापर्यंत दोन गुंठे लागवड केली आहे. पहिला टप्पा साधारण दीड वर्षांपूर्वी केला, दुसरा टप्पा मागील महिन्यात केला
मागे उपेंद्र दादांशी यावर बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलेला देवराईचा किंवा निसर्गबेटाचा आराखडा बघितला. त्यात उणीव काहीच नाहीये, पण एक अडचण आहे - ती म्हणजे त्यात मानवी वावर शून्य होणार नाही. त्यामुळे घनवन करणे सुरु ठेवले. आजच्या घडीला यात आतमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मानवी वावर हा शून्य होईल आणि आज नाही पण कदाचित शंभर वर्षांनी ही जागा जंगल म्हणून असेल.
आम्ही हे तयार करताना मिश्रवन असावे याचे भान ठेवतोय - १५० प्रजातींमध्ये झुडूप, छोटे वृक्ष, स्थानिक बांबू/वेत, मोठे वृक्ष, वड/पिंपळ/नांद्रुक सारखे पसरट वृक्ष लावत आहोत. बाकी परोपजीवी (आर्किड सारखी) यात आणण्याचं काम इथे येणारे प्राणी/पक्षी करतील अशी आमची अपेक्षा आहे. श्रद्धा तर आमची यावर आहेच. हा सामाजिक उपक्रम मात्र होत नाहीये.
असलेल्या जंगलाच्या जागी, असलेल्या देवराईला पर्याय म्हणून अथवा आहेत ती वृक्षराजी तोडून मियावकीने जंगल लावणे अयोग्य आहे. किंवा हजारो वर्षांच्या जंगलाची तुलना मियावाकीशी होऊच शकत नाही. पण जिथे झाडं, जंगल, देवराई नाही अशा ठिकाणी वन उभारणी आम्ही करत आहोत. हे वन लगेच देवराई होणार नाही. कदाचित १०० वर्षांनी तिला देवराई म्हणता येईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठीची ही पहिली पायरी असू शकेल.
काही चुकीचं बोललो असल्यास क्षमस्व...
🙏🏼🙏🏼

या उत्तरावर उमेशजींनी दिलेले उत्तर आणि सल्ला - 
चूक किंवा बरोबर असं नाही. देवराई मधे नैसर्गिक जंगल असतं. प्रत्येक जीव त्याची जागा घेत असतो. आपण मियावाकीच नव्हे तर इतर कोणत्याही पद्धतीने संवर्धन करताना हे विसरतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे (खरंतर आवडीप्रमाणे) प्रजातींची निवड करतो. स्थानिक प्रजाती असतील तर हेही ठीक. पण दोन वृक्षांमधील अंतर किती असावं आणि ते तेव्हढेच का असावं, त्यामुळे नैसर्गिक वाढीवर काही परिणाम होणार का, अशा गच्च लावलेल्या (नैसर्गिकरित्या झालेल्या नव्हे) वनस्पतींमुळे त्यातल्याच काही प्रजातींवर काय परिणाम होणार, इतर जैवविविधतेबद्दल आपण काही विचार करतोय का, जर हे मानवी वस्तीजवळ असेल तर एवढ्या गर्दीने लावलेल्या जंगलामुळे सुरक्षिततेचे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय, असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
एक करता येईल तुम्हाला. जर तुम्ही आधीच झाडं लावली असतील तर जी झाडं स्पर्धेत नाहीशी होतील त्याजागी लगेच नवीन लावू नका. म्हणजे नैसर्गिक जंगल तयार व्हायला मदत होईल.

Friday, March 6, 2020

समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन

पुस्तक परिचय -  समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
लेखक - कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक - मोरया प्रकाशन
मूल्य ₹१७०

मागील १ महिन्यात कौस्तुभ कस्तुरेंची ३ पुस्तके वाचली. "प्रतिशोध पानिपतचा"चा परिचय या आधी दिला होता. सदाशिवराव भाऊंवरील "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ" हे दुसरं (याचा परिचय नंतर देईन) आणि समर्थांवरील "समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन" हे तिसरं. अजून एक "पुरंदरे" आता वाचायला घेईन...

कौस्तुभ कस्तुरेंचं वैशिष्ट्य हे की, रामदासांनी सांगितलेलं - अभ्यासोनि प्रकटावे - हे ब्रीद ते कसोशीने पाळतात. कुठेही अतिरंजितपणा नाही. इतिहास म्हणजे इति + ह् + आस म्हणजेच - हे असे घडले. जे घडले तेच इतिहासातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच काय घडले यासाठी समकालीन कागदपत्रे हाच सर्वोत्तम पुरावा आहे. समकालीन कागदपत्रांमधून बखरी या हद्दपार होतात कारण यात अतिरंजितपणा आणि ज्याने बखर लिहून घेतली त्याचा अति उदोउदो असतो. त्यामुळे पत्रे,  सनदा आणि समकालीन व्यक्तींनी लिहिलेली चरित्रे यावरच ते अवलंबून असतात आणि विश्वास ठेवतात.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर्थ आणि महाराजांची भेट ही स्वराज्य स्थापनेच्या आधी झाली नसून ती बरीच उशिरा झाली हे सांगितलंय. महाराजांचे स्वराज्य हे जिजाऊंच्या प्रेरणेचे आणि महाराजांच्या कष्टानेच उभे राहिले आहे हे स्पष्ट केलंय. पण जेव्हा भेट झाली तेव्हापासून महाराजांचा आणि समर्थांचा स्नेह किती बळकट होता तेही सप्रमाण सिद्ध केलंय.

या पुस्तकासाठी कौस्तुभ कस्तुरे यांनी समर्थ संप्रदायातील कागदपत्रे, भीमस्वामी, गिरीधर स्वामी, दिनकर गोसावी यांनी लिहिलेली समर्थ चरित्रे अभ्यासली. शिवाय रघुनाथ पंडितांनी लिहिलेलं समर्थांचं वर्णनसुद्धा अभ्यासलं. हे सर्व समकालीन आहे. याशिवाय भीमाजी बुवांनी लिहिलेलं समर्थ चरित्रही घेतलंय, जे उत्तरकालीन आहे. या सर्वांवर लिहीत असताना एक बाब कौस्तुभ वारंवार सांगतात ती म्हणजे चमत्कार खरे नाहीत. त्यांना इतिहासात काहीही स्थान नाही. पण ही सर्व चरित्रे आपल्याला थोडक्यात यातून सहज कळतात.

या चरित्र आणि वर्णनाशिवाय समर्थांनी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म यावर जो उपदेश केला होता त्याबद्दलही लिहिले आहे.

या पुस्तकात अनेक चित्रेही आहेत. विशेषतः महाराजांचा आणि समर्थांचा संबंध दाखवणारी चाफळची सनद - तिचाही फोटो आहे. या सनदेवरून संकेत कुलकर्णी (लंडन) आणि कौस्तुभ यांनी शोधून, अभ्यासून हा संबंध "पुराव्यानिशी शाबीत" केला आहे!

Wednesday, March 4, 2020

दोन मी

थ्री इडियट्स मधलं "बहती हवा सा था वो" गाणं आठवतंय?
हम को तो राहें थी चलती
वो खुद अपनी राह बनता,
गिरता संभालता
मस्ती में चलता था वो
हमको कल की फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो
स्वानंद किरकिरेने सहज शब्दात तो आणि मी याबद्दल सांगितलंय. वास्तविक हे गाणं त्या चित्रपटात "दोन मीं"चं नाहीये. पण एकूणच असे "दोन मी" आपल्यात असतात. कधी ते दुसऱ्यात दिसतात तर कधी आपल्यातच.

ही "दोन मी"ची संकल्पना असलेल्या मराठीतल्या सुंदर कविता आहेत. पहिल्यांदा माझ्या पिढीतील संदीपची कविता -
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मला खूपदा माझा मित्र, संदीप सरदेसाई, हा दुसऱ्या मी सारखा वाटायचा. म्हणून एकदा त्याला ही कविता ऐकवली. त्यावर त्याचं म्हणणं असं की, हा कट्ट्यावर बसलेला अगदी तुझ्यासारखा आहे आणि हजार चिंतांनी डोके खाजवणारा माझ्यासारखा :-). आता हे grass is always greener at other side सारखं असू शकतं. पण खरंच हे दोन्ही मी आपल्यातच असतात. त्यातील कुणाला आपण जास्त वाव देतो, ते आपल्या हातात असतं.

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

कुसुमाग्रजांनी तर हा दुसरा मी भेटायला आलेला दाखवला. त्याच्याशी गप्पा, भांडण, जुन्या आठवणी असं सगळं बोलून झालं. मग तो गेला... पण जो गेला तो कोण "मूळचा मी" की "भेटायला आलेला मी" यावर प्रश्नचिन्ह टाकून ठेवलं. वास्तविक दोघेही पुन्हा आपल्यातच आहेत, या दोघांचा संवाद व्हावा आणि त्यातून त्या-त्या वेळी आवश्यक तो "मी" समोर असावा...

बसलो असता निवांत रात्री
टक टक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी एक व्यक्ती

बारीकतेने बघता कळले
हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती
घाबरलो मी,चाचरलो मी
पुसले तयाला ,कोण कशाला

स्मित संभावित करुनी म्हणे तो,
पिशाच्च मी तव
गत काळाच्या थडग्या मधला
निवास कोंदट असह्य झाला
म्हणुनी आलो

पिशाच्च पण ते माझे होते
आपुलकीने स्वागत केले
गप्पा झाल्या,दूर पणाचे अंतर सरले
आठवणींचे पर्व साधता काळीज कढले

वाद बखेडे कधी पेटता,क्रुद्ध शार्दुलासम गुरगुरलो
प्रेम,द्वेष ,हास्यात रंगता स्वरही चढले

अखेर होता पहाट,गेला एक आमुच्यातला निघुनी

गेला कोण अन कोण राहिला
हे मज जन्म भराचे कोडे पडले...!

आरती प्रभू यांची "दोन मी" कविता. यातील दुसरा मी हा अग्निज्वाळेसारखा नग्न आहे कारण त्याचेच कपडे विकून मी माझा चरितार्थ चालवतोय... स्वत्व विकून त्यावर गुजराण करणारे अनेक "मी" यात दिसत राहतात...
दोन मी
तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.
वाकल्याला अन् मला पाहुनीयां मोडतो,
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखितो.
अग्निजाळेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन् अजुन आहे ती खरी.
कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी,
विकित बसलो येथ हाटीं, आणि खातो भाकरी.
तो उपाशी तरिहि पोटीं लाज माझी राखतो,
राख होतांनाहि ओठीं गीतगाणी ठेवितो.
मैफ़लीला तो नि मी दोघेही जातो धावुनी;
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी.
तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो.

आरतीप्रभूंची आणखी एक याच विषयावरची कविता आहे -
कधी तो कधी मी 
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझिया चोरट्या पावुली
कधी त्याच्या पायीं उमाटे माझा ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यातून दोघेही जगतो
दारीं तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काळजाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरून
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यांतले राखितो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

इंदिरा संतांची "कात" ही अजून एक. चैतन्य दीक्षितच्या निरुपणासह -
आपल्या प्रत्येकात स्वतःचीच दोन रूपं असतात. कधी हे द्वंद्व अगदी असून नसल्यासारखे कोपऱ्यात बसलेले असते तर कधी ते अगदी प्रखरपणे पुढे येते. त्या दोन रूपांतला खरा मी कोण? याचा थांग लागणे स्वतःलाच अशक्य होऊन जाते. त्रयस्थ नजरेने पाहता, हा म्हणजे आपल्याच दोन्ही रूपांत जणू अटीतटीचा सामना असल्यासारखा! आपलं एक रूप सोशिक, इतरांना कमीत कमी दुखावणारं (त्यासाठीच सोशिक, स्वतः कष्ट सहन करणारं) तर दुसरं रूप स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणारं आणि म्हणूनच कणभरही अन्याय्य गोष्ट सहन न करणारं. या दोन रूपांतला हा सामना मात्र आपल्याला एका नव्याच 'मी' कडे नेत असतो. हीच आपली वाढ!
सोशिकपणा जात्याच काकणभर अधिक असलेल्या स्त्रियांच्याबाबतीत हे द्वंद्व कसे असेल? याचं चित्र इंदिराबाई 'कात' या कवितेत उभं करतात.
कात
येथे मी स्तब्ध अशी
स्तब्ध तशी तेथे मी ।
स्वच्छ उभी काच मधें
दाखविते मजला 'मी' !
नजरेला नजर तिच्या
भिडवाया मी न धजे
कंपित निःश्वास तिचा
काचेवर गूढ़ थिजे ।
विलगावे ओठ ज़रा
बोलावे काही तर
गिळलेल्या शब्दांची
लिपी तिच्या ओठांवर ।
स्वतःचं सोशिक रूप इतकं आंगवळणी पडलेलं असतं की त्यातून आपल्याला कुणी बाहेर काढू पाहत असेल तर तीच व्यक्ती आपल्याला दुष्ट वाटू लागते. आपल्याला त्या कोशातून बाहेर यायचंच नसतं.
"दुष्ट, अशी मजपुढती
मुळिच उभी राहु नको;
निजलेली मी कधीच:
जाग मला आणु नको.
स्वप्नांच्या भस्माचा
थर अगदी ढळवु नको."
"काय असे वेडेपण?
मी न दुजी, तूहि मीच."
----पण समोर धुकट धूर
आणि चूर चूर काच ।
स्तब्ध अशी येथे मी
नाही कुणि पण समोर
सोलिव ही कात इथे
नागिण अदृश्य दूर...

शिवाय पाडगांवकरांची "जिप्सी" काही अंशी मला अशीच "दोन मीं"ची कविता वाटते.

या दोन्ही "मीं"चा वाद-संवाद होत राहिला पाहिजे. तुकोबा म्हणतात तसा
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणासी...
आणि अखेरीस आपल्यातला रसिक, सृजनशील, तरल मी हा सहज आपल्याला गवसला पाहिजे...

Sunday, February 23, 2020

प्रभावी कौंतेय

काल कौंतेयने ज्या दिवसांची आठवण करून दिली त्या दिवसांतील कौंतेय आठवला. आम्हाला आता प्रत्यक्ष भेटून १५ वर्षे (किंवा जास्तच) झाली असतील. पण तो कौंतेय अजूनही जसाच्या तसा आठवतो.

आम्ही संभाजीनगर (देवगिरी जिल्हा) मधील स्वयंसेवक. त्याच्या आधी शहर प्रचारक होते अप्पा (दत्तात्रय गर्गे). कौंतेय शहर प्रचारक म्हणूनच आला, पण अर्ध्याच शहराचा. आमचा भाग त्याच्या कार्यक्षेत्रात नव्हता. तरी शहराच्या एकत्रीकरणात आमच्या भेटी होत होत्या. तेव्हा माझं वय १८-१९ असेल तर कौंतेय फार तर २२-२३. इतकं वयातील अंतर कमी असल्याने आमची मैत्री छान झाली. कौंतेयचा आमच्यावर खरं सांगायचं तर खूप प्रभाव पडला होता. कारण त्याने सांगितलेलंच - गाणी, कविता, उतारे संपूर्ण पाठ. याशिवाय अजून भारी म्हणजे तो स्वतः कविता करायचा आणि त्या छंदबद्ध, तालात म्हणायचा.

तो प्रचारक निघताना मनाची होत नसलेली तयारी आणि आश्वासक हात पाठीवर पडल्यावर झालेली तयारी -
घेतली भरारी तरीही
बळ येई ना पंखात
संशयो मनीचा घडवी
हृदयात एक आकांत
या कवितेतून अप्रतीम सांगितली होती.

अशीच एक कविता म्हणजे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंहांना पाठवलेले पत्र - मिर्झास
मग सडा गुलामीत वा मुक्तिस्तव गर्जा।
आवाहन अथवा समज इशारा मिर्झा।।
आलमगीर चर्येवर चिंतेचे घन सावट पडले
शिवरौद्र तांडवामध्ये रथी अन् महारथी सापडले...

याच कवितेत एका कडव्यात, महाराज स्पष्ट सांगताहेत
ती माय भवानी समर्थ तारायाला
हे राज्य श्रींचे पूर्णत्वी नेण्याला
तुज माझ्या वाचुन कार्य तिचे का अडते
पण खचित खुणावी आपुल्या कर्तव्याला

गीतेतील कर्मयोग आणि स्वधर्म (कर्तव्य) पालन किती सहज सोपं करून सांगितलं होतं याने. आणि हा माझ्यापेक्षा केवळ २-४ वर्षे मोठा असेल. सुंदर शद्ब, एक नाद आणि कौंतेयची कविता म्हणण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही सगळेच त्याच्या प्रभावात, खरं सांगायचं तर प्रेमात.

कौंतेयची कवितांची वही उतरवून घेतली होती. पण त्याची खरंतर गरज नव्हतीच. आत्ताही वरील ओळी लिहिताना वेगळ्या आठवाव्या लागल्याच नाहीत, एवढ्या त्या लक्षात राहिल्यात.

हे सगळं कालपासून आठवत होतं. आज जरा शब्दबद्ध केलं. असे प्रचारक संघाने आम्हाला दिले म्हणून आम्ही घडलो.

Thursday, February 13, 2020

पहिले उड्डाण

१७ जून २००६ रोजी आयुष्यातला पहिला विमान प्रवास केला होता. स्विस एअरने परवा त्याच रूटने येताना त्या विमान प्रवासाचे तेव्हा लिहिलेलं बाळबोध वर्णन आठवले. आता वाटते आपण किती बावळट होतो... ("आताही आहेस" असं जे लोक म्हणताहेत तेच बावळट :-) ) बावळट आणि बाळबोध असं वर्णन असलं तरी खूप innocent आहे हे नक्की...

नमस्कार,
पहिले उड्डाण. मजा आली.

आत्ता झुरिक विमानतळावर आहे. मकर रास आहे ना ठरलेले फ्लाईट कॅन्सल :-) . ९:४० ला पुढचे आहे. तुम्ही लोक म्हणताल, याने सुरूवातच काय रडून केली. सवय, दुसरे काय...

काल मुंबईत माया आणि अमोलला टाटा केला आणि (खरं सांगतो) थोडे घाबरतच आत गेलो. थोडे समोर गेलो की लगेच x-ray मशीन होते. अभिने सांगितले होते की हँड बॅग त्यात टाकायची नसते. पण टाकली. दोन्ही बॅग पॅक. आता काय करायचे असा विचार करत स्विसच्या काउंटरवर गेलो. मोठी बॅग धडपडत उचलून त्यच्यासमोर टाकली. २९.५ kg. जीव भांड्यात पडला. पण त्या माणसाचे लक्ष गेले छोट्या बॅगवर. तिचे वजन किती? ही बॅग न धडपडता काट्यावर टाकली. ७.५ kg. you have to check-in this bag, sir... डोक्यात पहिला प्रश्‍न, किती पैसे लागतील. लगेच विचारले. तं म्हंतो कसा, फुकट. दुसरा प्रश्‍न, जवळ काहीच कपडे नाहीत. काय करावे? विचारले. त्याने आश्‍वासन दिले आहे की अडचण येणार नाही. बघू काय होते ते.

मग इमिग्रेशन. फॉर्म भरला आणि मोठ्ठ्या माणसांसाठीच्या काउंटरवर जाऊ लागलो. तिथल्या माणसाने सामान्य माणसांच्या रांगेत लावले. लागलो. ते सोपस्कार झाले. मग गेट नं. ५ च्या जवळ जाऊन थांबलो. इथे पाट्या चांगल्या नाहीत म्हणून सांगितले होते. पण मस्त पाट्या होत्या. कोणाला विचारायला लागले नाही. ड्यूटी फ्री दुकाने (आणि किमती) बघितल्या. नंतर टाईम पास म्हणून दीक्षा बघायला सुरुवात केली. अस्वस्थ पिक्चर आहे. त्यानंतर मायाला फोन केला. घरी दोनदा लावण्याचा प्रयत्न केला. १७ रू झाले असताना एस्टीडी वाल्याने २५ मागितले. मग त्याच्याशी भांडण. तोवर १२:३० झाले. मग सेक्युरिटीच्या रांगेत लागलो. ते संपले २० मिनिटात. तोवर विमान लागले होते.

बोर्डिंग पास दाखवून विमानात गेलो... थोडी भिती आणि खूप कुतुहल. विंडोसीट नाही मिळाली. जरा अँडजस्ट व्हायला १० मि लागली. सीट बेल्ट लावून काढून बघणे, पांघरूण, उशी, हेडफोन, टीव्हीचा रिमोट सगळे खेळून झाले. मग घोषणा, उड्डाणाची. (आठवले “आवळा गं...” - वऱ्हाड) अंगदने फारच भीती घातली होती. हँडल पक्के पकडले. पाय रोवले. कधी बाहेर कधी आत बघत राहिलो. आणि विमान रिवर्स मध्ये सुरू झाले. ते धावपट्टीवर यायला १० मि आणखी गेली. तोवर मी रिलॅक्स झालो होतो. हळू हळू वेग पकडायला सुरुवात झाली. पुन्हा हात पाय टाईट :-) . पण कळायच्या आतच आम्ही फ्लाय झालो होतो.

मग बघितली ती मुंबापुरी. खुप दिवे. वळनदार रस्ते. त्यावरील धावणारे दिवे. मरीन ड्राईव्ह, वराळी सी फेस, समुद्र... भारत सोडून निघल्याची पहिली जाणीव. आत्ता पुन्हा डोळे भरले. ते डोळे भरून पहात राहिलो. तुम्हा सर्वाची आठवण काढत.

अंगद हृषी स्वानंद साठी: अरे एअर होस्टेस फार वयस्क होत्या. जवळपास सगळ्याच. . . बॅडलक ना?

आता बाकी नंतर. ८:४५ झालेत. बोर्डिंगला जातो.

बेल्जियमला पोहोचलो. या फ्लाईट मधली एअर होस्टेस तरूण आणि वेंधळी होती. आख्खा ट्रे पाडणार होती ती. हॉटेल चांगले मिळाले. छान सकाळ आहे.

मुंबई सोडल्यावर भोवताली, म्हणजे बाहेर अंधारच होता. काहीच दिसत नव्हते. मग बाहेर बघणे सोडून दिले. जेवणही आले होते. जेवण करून टीव्ही पहात बसलो. नंतर झोप लागली. साधारण ३ तास झोपलो होतो. जाग आली तेव्हा बाहेर लख्ख उजेड होता. सूर्य उगवला होता. स्थनिक वेळेनुसार ५ वाजले असावेत. हे काय अप्रुप म्हणून बघत राहिलो. खाली ढग दिसत होते. त्यावर सूर्याची किरणे पडून चमकत होते. नेहमी खालून वर चमकणारे ढग बघणारा मी वरून बघताना... नाही सांगता येत. एकदा फक्त कळसूबाईवरून पाहिले होते खाली ढग.

मग घोषणा झाली की आता विमान खाली उतरणार आहे. आणि लक्षात आले की कळसूबाईची तुलना नाही करता येणार. पहिला ढगांचा लेअर सोडून खाली आलो. आणि आणखी एक लेअर दिसला. त्यात मधे मधे बर्फाचे डोंगर दिसू लागले. फ्लाईटइन्फो मध्ये जाऊन नाव बघितले. आल्प्स. मग ढगांचे आणखी दोन लेअर झाल्यावर मधून मधून स्विस जमीन आणि झाडे दिसू लागली.

स्विस... नेहमी आपण पहातो पिक्चरमध्ये. तिथली वनराई, स्वच्छ रस्ते, भोवताली बर्फाचे डोंगर. वरून छान दिसत होते. जवळून पहाता नाही आले. विमान उतरायला ४० मिनिटे लागली. बाहेर आलो. एक गोरी युनिफॉर्ममधली दिसली. तिला बोर्डिंग पास दाखवला. तिने फ्लाईट नक्की कॅन्सल झाली असे सांगितले. ट्रान्सफर डेस्कवर जायला सांगितले. त्यासाठी आधी ई टर्मिनलवरून ए टर्मिनलला जायचे होते. अभि, अमोलने सांगितल्याप्रमाणे पाट्या व्यवस्थित होत्या. रेल्वेत उभा राहिलो. आपली लोकल असते तशीच. ट्राम सारखी म्हणता येईल. ए ला जाऊन ट्रान्सफर डेस्कवर गेलो. तिथे आर्धा तास रांगेत उभा राहिलो. मग नवीन बोर्डिंग पास मिळाला. सगळा एअरपोर्ट फिरून आलो.

त्यानंतर गाणारे व्हायोलीन ऐकत तुम्हाला पत्र लिहायला घेतले. खूपच छान वेळ गेला.

बोर्डिंगची वेळ झाल्यावर तिथे गेलो. एक बस आलेली होती. त्यातून विमानाजवळ गेलो. कसले भंगार विमान. छोटेसे. ३ बाय ३ सीट. त्यात मला मधली सीट मिळाली. भूक खूप लागलेली होती. स्विसमध्ये स्विसफ्रँक चालतात. त्यामुळे ट्रॅव्हलर चेक वठवले नाहीत. पाणीपण मिळाले नाही. आणि ही तरूण सुंदर बया खायला काही लवकर आणेना. आणले ते पण वेंधळेपणा करत. दोनतीन जणांना अभिषेक केला. अखेरीस खायला मिळाले. पाणीपण मिळाले.

११:१५ ला ब्रुसेल्सला उतरलो. बॅगेज कुठे आहे याचा पत्ता नाही. भिती वाटली. पण सापडले. त्याआधी पोलीसांना पासपोर्ट दाखवून बेल्जियम प्रवेश केला. त्या बॅगा घेऊन बाहेर पडायचा रस्ता शोधत राहिलो. सापडेच ना. पप्याची आठवण आली. मग कॉलिंग कार्ड घेतले. तर फोनच सापडला नाही. शेवटी बाहेर आलो. मर्सिडीज टॅक्सी... बसलो. त्या हीरोला हॉटेल काय मॅक्लीन पण कळाले नाही. त्याच्या एका मित्राने सांगितले. मग त्याने GPRS नकाशावरून मला मॅक्लीनला आणले. पण हॉटेल कुठे माहिती. माझे लक्ष मिटर कडे. त्याच्या लक्षात आले असावे. त्याने मिटर बंद करून हॉटेल शोधून दिले.

असा झाला प्रवास

Friday, February 7, 2020

प्रतिशोध पानिपतचा

कौस्तुभ कस्तुरेचं पुस्तक येणार ही बातमी कळाली - पुस्तकाचा विषय आणि नाव प्रतिशोध पानिपतचा. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा मी बेल्जियममध्ये होतो. मित्रांकडून पुस्तक मागवण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. मग भारतात पोहोचण्याआधी पुस्तक घरी पोहोचेल अशी व्यवस्था केली आणि आल्या आल्या हातात घेऊन पूर्ण केलं.

याआधी हा कालखंड स्वामी या कादंबरीत वाचलाय. पण स्वामी केवळ माधवरावांच्या पुण्यातील/थेऊर मधील वास्तव्याभोवती फिरते. त्याच काळात दिल्लीवर फडकलेला भगवा, नजीबाचा मृत्यू, त्याच्या मुलाची केलेली लांडगेतोड आणि नजीबाची फोडलेली कबर हा भाग त्यात येतच नाही. बाकी पाठ्यपुस्तकात हे कधीच येणार नाही. इंग्रजांनी भारत मोगलांकडून ताब्यात घेतला असं शिकवायचं असल्याने मोगल मराठ्यांच्या ताब्यात होते हे कसं शिकवता येईल. पण कौस्तुभने हा सगळा कालखंड पानिपतचा मराठ्यांनी कसा प्रतिशोध घेतला या परिप्रेक्षात मांडला आहे.

नारबा ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा यात आहे. हा नारबा एक सामान्य मराठी माणूस आहे. याचा भाऊ आणि वडील पानिपतात कामी येतात. हा फडावर काम सुरू करतो आणि अखेरीस उत्तरहिंदच्या स्वारीवर युद्ध जिंकून येतो. असे अनेक नारबा माधवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आणि उत्तरहिंद पुन्हा ताब्यात घेतला. हा नारबा त्या सगळ्यांचं प्रतीक आहे.

आपण कायम एक म्हण ऐकत आलो आहोत - मराठी माणसाचा विश्वास पानिपतात गेला. पण ही वस्तुस्थिती नाहीये. मराठी माणसाचा विश्वास गेला नाही. तो कायम राहिला आणि एकामागोमाग एक उत्तरेतील राज्ये मराठ्यांच्या ताब्यात आली. तीही केवळ १० वर्षात.

हे सर्व घडले ते महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांच्या हातांनी आणि त्यामागे खंबीर नेतृत्व होते माधवरावांचे. माधवरावांना रमाबाईंची साथ होती आणि नाना फडणवीसांचे आणि रामशास्त्र्यांचे सल्ले होते. अर्थातच पाय खेचणारे लोकही होतेच. राघोबासारखा घरभेदीही होता. सदाशिवरावांचा तोतया हेही एक प्रकरण होते. पण या सर्व लोकांना साम-दाम-दंड-भेदाने माधवरावांनी सरळ केलं.

हा सगळा तपशील या पुस्तकात आहे. तोही अतिशय सहज भाषेत. अस्सल ऐतिहासिक पुरावे वापरून अत्यंत सुंदर, रसाळ कादंबरी कौस्तुभने लीलया तयार केलीये.

मला खटकलेल्या काही गोष्टी आहेत. विशेषतः, रमाबाईंनी सती जावं ही इच्छा माधवराव जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्याचं कारण रमाबाईंना राघोबा वापरून राजकारण करतील हे सांगितलं आहे. वास्तविक विश्वासरावांच्या पत्नीमार्फत सुद्धा राघोबांना ते करता आलं असतं, पण ते झालं नाही. त्यामुळे हा तर्क योग्य वाटत नाही. पण याकडे कानाडोळा करून हा कालखंड सर्वांनी अनुभवावा असाच आहे.

या पुस्तकातील काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. ते दुःखाचे अश्रू नाहीत तर ते आहेत आनंदाचे, प्रतिशोधाच्या कल्पनेचे आणि प्रतिशोधाच्या पूर्णत्वाचे. त्यातील तीन विशेष उल्लेखनीय
- नारबा दिल्लीस्वारीला जाताना आईला पत्र लिहितो, ते पत्र आणि पुढचा काही भाग
- दिल्लीवर भगवा फडकतो
- नजीबाच्या थडग्याला महादजी फोडतात

कौस्तुभ, या कादंबरीसाठी खूप धन्यवाद. तुझ्याकडून अजूनही खूप काम होवो या शुभेच्छा!