Monday, December 3, 2018

सार्थ - एस् एल् भैरप्पा

भैरप्पांची पुस्तके भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान यावर विचार करायला खाद्य पुरवणारी असतात. आत्ताच "सार्थ" वाचून झाले. किंडल वर पुस्तक वाचण्याची तशी पहिलीच वेळ. त्यातही सार्थ सारखं पुस्तक मिळाल्याने किंडल सत्कारणी लागलं...

एका वेदशास्त्र शिकलेल्या ब्राह्मणाला, नागभट्टला, तारावती नगरीचा राजा सार्थाचा, म्हणजे व्यापारी तांड्यांचा, अभ्यास करण्यासाठी एका तांड्यांसोबत पाठवतो. पण मूळ हेतू नागभट्टच्या बायकोला मिळवणे हा असतो. नागभट्ट जेव्हा घरापासून दूर असतो तेव्हा त्याला हे कळतं आणि पुढे त्याचा शांती मिळवण्याचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला तो एका नाटक कंपनीत काम करतो, त्यातील नटी चंद्रिका उत्तम अभिनेत्री, गायिका असते. ती योगिनी असते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडतो पण चंद्रिका योगिनी असल्याने यम नियमांत बांधलेली असते आणि ती संबंध नाकारते. तिथून पुढे नागभट्ट सुद्धा बाहेर पडतो आणि प्रथम योगी बनण्याचा प्रयत्न करतो. त्यात बायको आणि मित्र राजा यांवरील राग कमी होत नाही. मग पुढे तो वाममार्गी-तांत्रिक होतो, योनीपूजेच्या विधीसाठी चंद्रिकेला तयार करतो. मात्र पूजेनंतर ती त्याला स्वतःच्या घरी ठेऊन घेते आणि त्यातून तो पुन्हा बाहेर पडतो. मग नालंदा विद्यापीठात बौद्ध तत्त्वज्ञान शिकायला जातो, तिथे त्रिपिटक व अन्य बौद्ध पुस्तकांसोबत त्याला बौद्ध तांत्रिक मार्गही दिसतो. पुढे बोधगयेला जातो. पण तरीही आंतरिक शांती मिळत नाही.
नालंदेत जाऊन, तिथे सांगून पुन्हा नवीन शोधण्यासाठी तो तिथे पोहोचतो पण तेव्हा त्याला कळतं की सर्वात वयोवृद्ध विद्यार्थी हे कुमारील भट्ट होते, त्याचे गुरू माहिष्मतीचे मंडनमिश्र यांचे गुरू व गुरुपत्नी भारतीदेवीचे वडीलबंधू. तो त्यांच्या मागे त्यांच्या गावी पोहोचतो. तिथे त्याला प्रथम शंकराचार्यांचे दर्शन होते. शंकराचार्य तिथे वादविवाद करण्यासाठी आलेले असतात. पण कुमारील भट्ट गुरूला फसवले आणि काही दिवस तरी वेद नाकारले म्हणून भाताच्या काड्यात स्वतःला जाळून घेणार असतात. त्यामुळे ते वादविवाद नाकारतात आणि गुर्जर प्रतिहार राजाच्या अश्वमेध यज्ञाचे प्रमुखपदही नाकारतात. दोन्हीसाठी ते मंडन मिश्र यांच्याकडे पाठवतात.
इथून पुढे ऐतिहासिक वादविवाद आणि मंडन मिश्र यांचे संन्यस्त होणे हा भाग येतो.
नागभट्ट यानंतर गुर्जर प्रतिहार राजाच्या स्नेही असलेल्या जयसिंहांच्या सोबत परत मथुरेला येतो. तिथे बातमी येते की मुस्लिम आक्रमकांनी मूलस्थानवर (मुलतान) कब्जा केला असून तिथून पुढे भारतीय व्यापाऱ्यांना माल ते सांगतील तसा व त्या भावात अरबांनी विकावा लागतोय. गुर्जर राजे मूलस्थान पुन्हा मिळवावे यासाठी कृष्ण नाटक तिथे करायचे आणि जनतेला उठाव करण्यास प्रवृत्त करायचे असा बेत आखातात आणि नाटकात नागभट्ट आणि चंद्रिका यांची प्रमुख भूमिका ठरते. आता नाटक केवळ नाटक राहिलेले नसते तर देशाप्रती कर्तव्य झालेले असते. जीवाचा धोका असूनही सगळे उत्तम नाटक करतात. पण तरीही राष्ट्रकूटांनी दक्षिणेकडून केलेला हल्ला आणि स्थानिकांकडून न मिळालेली मदत यामुळे योजना पूर्ण होत नाही. चंद्रिका आणि नागभट्ट मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात जातात. चंद्रिकेवर बलात्कार होतात आणि नागभट्टावर अमानुष अत्याचार. शेवटी ते सुटतात आणि चंद्रिकेच्या गुरूंना भेटायला जातात. नागभट्ट चंद्रिकेला पुनःपुन्हा लग्नाची मागणी घालत असतो पण यम नियम आणि आता बलात्कारामुळे असलेला गर्भ यामुळे ती नाकारत राहते. गुरू त्यांच्या मृत्यूपश्चात विवाहाचा आदेश देतात. नागभट्ट आणि चंद्रिका विवाह करतात आणि कथा संपते.

यात नागभट्ट आणि मुस्लिम सरदार यांच्यात काही संवाद आहेत. ते जसेच्या तसे इथे देत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये असलेली धर्म (Religion या अर्थी) ही संकल्पना यातून खूप छान अधोरेखित होते. काहींना जी समृद्ध अडगळ वाटते तीच व्यवस्था कशी होती हे यातून समजते.

‘‘कोणता उपाय?’’ मी विचारलं.
‘‘क्षमेची याचना करायची. पश्चात्ताप झाल्याची खूण म्हणून आमच्या धर्मात प्रवेश करायचा. संपूर्ण क्षमा कदाचित त्यानंतरही मिळणार नाही, पण मृत्युदंड खचित चुकेल. चार-दोन वर्षं कारागृहात काढायची. त्यानंतर तुझी वागणूक बघून उरलेली शिक्षाही रद्द होर्इल. बऱ्यापैकी जगण्यासाठी एखादं कामही मिळेल. तू आमचाच होऊन जाशील ना!’’ त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.
‘‘धर्म बदलायचा? एवढ्या क्षुल्लक कारणासाठी?’’
‘‘जीव वाचतोय, ही क्षुल्लक गोष्ट आहे?’’
‘‘जीव जातो की राहतो, हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. आमच्याकडेही धर्मपरिवर्तन होत असतं. दोन जिज्ञासू विद्वान शेकडो विद्धानांसमोर एकमेकांसमोर बसून तात्त्विक वादविवाद करतात. जो हरेल, त्यानं जिंकलेल्याचा धर्म स्वीकारणं बंधनकारक असतं. तुमच्यापैकी एखाद्या जिज्ञासू विद्वानाला सर्वांसमोर माझ्याशी वादविवाद घालण्यासाठी बसवा, दोघंही तर्कशुद्ध पद्धतीनं वाद घालू. मी हरलो, तर तुमच्या धर्मात येर्इल आणि जिंकलो, तर त्यानं माझ्या धर्मात यावं.’’
‘‘धर्मालाच पणाला लावून चर्चा करायची?’’ त्यानं भुवया उंचावल्या.
‘‘आमच्याकडे सगळे असंच करतात. केवळ यासाठी विद्वान मंडळी गावोगाव फिरत असतात. एखाद्याची वाद-भिक्षा नाकारणं अत्यंत अपमानास्पद मानलं जातं.’’
‘‘आम्ही धर्माला वादामध्ये ओढत नाही.’’
‘‘पण तुम्ही धर्माला तलवारीच्या पात्यावर पेलता. खरंय हे?’’
‘‘नि:संशय! ते जाऊ दे. तुमच्यामध्ये किती जाती-पंथ आहेत?’’
‘‘ते कसं सांगता येर्इल? एकेका धर्म-पंथाच्या अनेक शाखा-उपशाखा आहेत. मुख्य वैदिक धर्मच घ्या. त्यात पूर्व मीमांसक, उत्तर मीमांसक, नैयायिक, वैशेषिक, सांख्य, योगी! बौद्धांमध्ये हीनयान, महायान, हीनयानामध्ये वैभाषिक, सौतांत्रिक; महायानींमध्ये योगाचार्य, माध्यमिक; जैनांमध्ये दिगंबर-श्वेतांबर, यांशिवाय प्रत्येक जातींमध्ये तांत्रिक, पाशुपत्य –’’
त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. ‘‘असं असेल, तर तुमचा एक देश नाहीच.’’
‘‘का?’’
‘‘एवढे मत-धर्म आहेत म्हणतोस, कुठला राजा स्वत:च्या धर्मापेक्षा इतर धर्माला वाव देर्इल?’’
‘‘आमच्याकडे सगळे राजे सगळ्या मत-पंथांना वाव देतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा तो प्रश्न आहे. मी म्हणजे बुद्धी. बुद्धीचं गृहीत म्हणजे मत. जगात जितकी माणसं आहेत, तितकी गृहीतं आहेत. तेवढी मतं असतात.’’
‘‘शुद्ध अव्यवस्था ही!’’ तो गोंधळून म्हणाला.
‘‘अंहं – तीच व्यवस्था आहे! पाहिजे, तर याविषयी मी वाद घालू शकेन.’’
‘‘मला वाटतं, तू तुझ्या देशातल्या सगळ्या धर्म-पंथांचा अर्क प्यायलेला विद्वान आहेस. बरं, ते जाऊ दे. तुमच्या सगळ्या धर्म-पंथातला समान अंश कोणता?’’
‘‘धर्म!’’
‘‘धर्म म्हणजे काय? देव ना?’’
‘‘देवाला धर्माची गरज नाही. देव ही माणसाची गरज आहे. शिवाय आमच्याकडचे सगळे पंथ देवाला मानत नाहीत. जैन, बौद्ध आणि सांख्य हे तर देवाचा तिरस्कार करतात. पूर्व-मीमांसक देवाचा पुरस्कार करत असले, तरी त्यांनी देवाला मर्यादित अधिकार दिले आहेत. माणसाच्या धर्माचरणासाठी देवाची गरजही नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचीही गरज नाही, असं बरेच धर्म-पंथ सांगतात.’’

- ज्ञानेश

Monday, July 9, 2018

मन्वंतर

सीता स्वयंवरात राम जेव्हा शिवधनुष्याला प्रत्यंचा लावायला गेले तेव्हा जुने झालेले शिवधनुष्य कडकडाट करत मोडले. जेव्हा परशुरामांना हे कळालं तेव्हा ते क्रुद्ध झाले. साहजिक आहे, जे धनुष्य परशुरामांना शिवशंकरांनी दिले, जे धनुष्य अनेक लढायांत वापरले गेले आणि ज्याद्वारे अनेक युद्धे जिंकली गेली ते धनुष्य मोडल्यावर परशुरामांना राग येणे स्वाभाविक होते.

मग रीतसर राम परशुरामांना भेटायला गेले. तिथे आता परशुराम रामांशी युद्ध करतील किंवा शाप देतील अशी शक्यता बऱ्याच जणांना वाटत होती. पण रामांना बघितल्यावर परशुरामांना आपला अवतार संपला हे लक्षात आले, नवा अवतार राम आहेत हेही लक्षात आले आणि त्यांनी शर आणि शाप यापैकी काहीही न वापरता रामांना आशीर्वाद दिले आणि ते पुढे मार्गस्थ झाले.

१९२७ मध्ये आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्या मनुस्मृतीच्या जोरावर अनेक वर्षे भारतात कारभार चालला. बऱ्याच अंशी चांगलाही चालला असेल, पण कुठेतरी त्यातून अन्यायही झाला. म्हणून आंबेडकरांनी ती जाळली. पुढे जेव्हा त्यांनी राज्यघटना लिहिली तेव्हा त्याच मनुस्मृतीतील योग्य गोष्टी राज्यघटनेत घेतल्या. जर मनू जिवंत असते तर त्यांनी आपली स्मृती आता जुनी झाली/मोडली हे मान्य केलं असतं आणि नवा मनू जन्मला हे बघून, आनंद व्यक्त करून, आशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले असते. दुर्दैवाने मनू परशुरामांसारखे चिरंजीव नाहीत, म्हणून हे होऊ शकले नाही.

पण ज्यांना परशुराम आणि मनू, दोघेही आपले वाटतात त्यांनी परशुरामांची कथा समजावून घेऊन मनुस्मृती आता डोक्यातून पूर्ण काढून राज्यघटना आत्मसात करावी ही अपेक्षा!

Friday, June 8, 2018

सशक्त विरोधीपक्ष

अशक्त विरोधीपक्ष असेल तर सशक्त लोकशाही उभी राहू शकत नाही. "आग को पानी से डर बने रहेना चाहीये" हा नियम आहे. पण सध्यातरी तशी परिस्थिती पोटनिवडणूका सोडल्या तर दिसत नाही.

सध्या मोदींसमोर/भाजपासमोर कुणी एक सशक्त विरोधी नेता नाहीये. जे आहेत ते मोदींना कुठल्याही थराला जाऊन, प्रसंगी पाकिस्तानची मदत मागून हरवायला बघत आहेत. देशात राजकीय विरोधक असूच नये असा प्रयत्न काँग्रेसमुक्त भारत या घोषणेत आहे. पण विरोधक असूच नये असे झाले तर ते लोकशाहीला आणि पर्यायाने भारताला घातक असेल. मोहनजींनी यामुळेच काँग्रेसमुक्त भारत या घोषणेला विरोध प्रदर्शित केला होता. (https://m.timesofindia.com/city/pune/congress-mukt-bharat-merely-a-political-slogan-rss-chief/articleshow/63576543.cms)

विरोधक हवेत, सशक्त हवेत आणि राष्ट्रवादी हवेत. जर सध्याचे विरोधी नेते असे विरोधक बनू शकत नसतील तर एक जगातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणून संघालाच हे काम करावे लागेल.

मी मागच्या वर्षी लिहिलं होतं की
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन सर्वोच्च राजकीय पदांवर स्वयंसेवक विराजमान झाले आहेत. त्यामुळे सर्व संघ संबंधितांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अर्थात संघाचे सत्ता हे साध्य कधी नव्हते आणि असणारही नाही. पण राजकीय उद्दिष्ट म्हणून विचार केला तरीही आणखी एक महत्वाच्या पदावरही स्वयंसेवक/सेविका असायला पाहिजे, ते पद म्हणजे विरोधी पक्ष नेता!

बहुदा संघाने आता हे काम हातात घेतले असं वाटतंय. प्रणवदांचं भाषण एका राष्ट्रवादी नेत्याचं भाषण होतं.
भाषणातील प्रमुख मुद्दे:
१. २५०० वर्षांची राजकीय उथलपुथल ५००० वर्षांच्या संस्कृतीला संपवू शकली नाही.
२. लोकशाहीची व्याख्या अमेरिकेच्या "ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल"च्या कित्येक शतके आधी चाणक्याने जगाला दिली.
३. जगाचा ज्ञानाशी संबंधही नव्हता तेव्हा आमच्याकडे ७ मोठी विद्यापीठं होती.
४. आम्ही इतरांसारखे आक्रमक वा हिंसक नाही आम्ही वसुधैव कुटुंबकम्, सर्वेपि सुखिन: सन्तु या विचारांचे आहोत. भारतात सहिष्णुता आणि वैविध्यतेचा सन्मान होतो.
५. या भारतमातेसाठी त्याग करणाऱ्या आणि या भारताला वैभवशाली बनवू इच्छिणाऱ्या सर्वांचे मिळून हे राष्ट्र आहे.
६.  बुद्धाचा प्रचार हिंदू प्रभावातूनच झाला आणि या देशाला मौर्य, गुप्त, अशोक अशा थोर घराण्याचा वारसा आहे.
७. या देशात आलेल्या विदेशी विचारवंतांनीही या देशाच्या संस्कृतीचे गोडवे गायले.
८. पाश्चात्यांची राष्ट्र संकल्पना एक भूभाग, एक धर्म, एक शत्रू यावर आधारित आहे आणि ती योग्य नाही, आपली सर्वसमावेशक संस्कृती खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राष्ट्र आहे. प्रत्येक देशाचा राष्ट्रवाद हा त्या देशाची खरी ओळख असते.

हे भाषण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्याचं भाषण होतं, इंदिरा काँग्रेस किंवा इटालियन काँग्रेसच्या नेत्याचं नव्हतं. अशा नेत्यांना बळ देऊन सशक्त राष्ट्रवादी विरोधी पक्ष तयार होणे आवश्यक आहे.

जय हिंद!

राजी

राज़ी
काही लोकांना हा सिनेमा पाकिस्तानची भलामण करणारा वाटला. कारण हे की त्यात पाकिस्तानी प्रेमळ कुटुंब दाखवलंय ज्याला भारतीय गुप्तहेरांनी फसवलं. एका अर्थाने हे खरंय. पण हा खूपच एकांगी विचार आहे.
या सिनेमाचा विषय होता एका सामान्य मुलगी, सहमत, देशासाठी गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते आणि तिथून आवश्यक ती माहिती कोणताही धोका पत्करून भारतात पाठवते. त्यासाठी ती तयार होते आणि शेवटपर्यंत आपला देश आणि कर्तव्य यापुढे सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देत काम पूर्ण करते.
हा सगळा तपशील आपल्याला सहमतच्या बाजूने कळत राहतो. त्यामुळे सहजपणे "भारताने केलेल्या कारवाया किंवा कटकारस्थान" आपल्याला दिसते. पण ज्या गोष्टी सहमत पाहत नाही त्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे पाकिस्तानी सेना पंजाबी वर्चस्वासाठी बांगाल्यांवर अन्याय करते आहे, युद्ध सुरू झालेले नसताना INS विक्रांतला बुडावण्यासाठी गाझी पाणबुडीला पाठवत आहे, काश्मीर मधील मुसलमानांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे हे सहमत प्रत्यक्ष बघत नाही म्हणून आपल्याला ते प्रत्यक्ष दाखवलेही जात नाही. पण नीट बघितले तर हे सगळे संदर्भ त्यात दिसत राहतात. ते explicitly दाखवलंच पाहिजे हा अट्टाहास योग्य नाही.
जेव्हा इकबालला (सहमतचा नवरा) कळतं की सहमत हीच हेर आहे तेव्हा तो हदरतो. हे स्वाभाविक आहे पण नंतर तोच हे म्हणतो की "वतन के आगे कुछ नही". याचा अर्थ पाकिस्तानीही कट्टर दाखवले आहेतच.
या चित्रपटात जी गोष्ट महत्वाची आहे ती हीच की "वतन के आगे कुछ नही". एक अत्यंत सामान्य, साधी स्वप्न असलेली मुलगी देशासाठी मोठं दिव्य करायला तयार होते, मार्गातील अडचणी प्रसंगी जीव घेऊन दूर करते.

गुलजार यांचे सोपे शब्द, शंकर-अहेसान-लॉय यांची साधी चाल यातून साकारलेलं गाणं या चित्रपटाचं सार आहे.

ऐ वतन.. मेरे वतन..
ऐ वतन.. आबाद रहे तू
आबाद रहे तू.. आबाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू

मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन
ऐ वतन.. मेरे वतन

तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं
जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन..

ऐ वतन.. मेरे वतन
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू

ऐ वतन.. ऐ वतन.. मेरे वतन.. मेरे वतन..
आबाद रहे तू.. आबाद रहे तू..
ऐ वतन.. मेरे वतन.. आबाद रहे तू..

https://m.imdb.com/title/tt7098658/

- ज्ञानेश

Thursday, April 19, 2018

पुस्तक परिचय - फिडेल, चे आणि क्रांती

फिडेल, चे आणि क्रांती हे अरुण साधू यांचे पुस्तक वाचतोय. अत्यंत सहज त्यांनी क्युबाच्या क्रांतीची गोष्ट सांगितली आहे. बलाढ्य अमेरिकेशी आणि भ्रष्टाचारी स्थानिक सरकारशी असलेला संघर्ष आणि त्याची पार्श्वभूमी या पुस्तकात आहे. अमेरिकेने क्युबा आपल्या अंकित असावा म्हणून प्रचंड प्रयत्न केले. पण अखेरीस फिडेल, चे आणि त्यांच्या साथीदारांनी अमेरिकेला पराभूत केलेच. एवढेच नाही तर स्वतःच्या देशातील मातीशी इमान राखणारी (रशिया किंवा चीनच्या अधिपत्याखाली नसलेली) साम्यवादी रचना निर्माण केली. त्याने प्रस्थापित पोथीनिष्ठ साम्यवादाला आव्हान दिले आणि नवीन साम्यवादी रचना निर्माण केली. सर्वात चांगली बाब म्हणजे ती यशस्वी करून दाखवली. क्युबात श्रीमंती मॉल आणि मल्टिप्लेक्स नसतीलही पण आरोग्य, शिक्षण, प्रशासन या गोष्टी खूप चांगल्या आहेत.

अमेरिकेशी असलेले हे वैर गेल्या काही दिवसात संपले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी मार्च 2016 मध्ये क्युबाला भेट दिली. क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये फिडेल कॅस्ट्रो वारले आणि त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो क्युबाचा अध्यक्ष झाला. क्युबाची दारे आता भांडवलशाही साठी थोडी किलकिली झाली आहेत. पुढे काय होईल ते कळेलच.

पुस्तकाविषयी:
२६ जुलै ही दिनांक आपल्यासाठी मुंबईमध्ये झालेली ढगफुटी याच्याशी निगडीत आहे. पण सुदूर, दक्षिण अमेरिकेत, २६ जुलै एक प्रचंड शक्ती आहे. जी शक्ती सामान्य भारतीयांना १९४२ या अंकातून मिळते त्याहून अधिक शक्ती २६ जुलै मधून क्यूबन लोकांना मिळते.

२६ जुलै १९५३… या दिवशी फिडेल कॅस्ट्रो या ध्येयवेड्या तरुणाने बाटिस्टा या क्युबाच्या अत्यंत भ्रष्टाचारी अध्यक्षाविरोधात सशस्त्र क्रांतीची पहिली लढाई लढली होती. क्युबाच्या अध्यक्षांच्या सैन्यापुढे काही शे तरुणांचा सहज पराभव झाला. पण सुदैवाने फिडेल त्यातून वाचला. त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि "इन्कलांब झिंदाबाद", "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा" च्या सारखे वाक्य त्या खटल्यातून फिडेलने म्हटले, "मला दोषी ठरवून ठार करा. त्याने काहीही बिघडणार नाही. इतिहास मला दोषमुक्त करील!" यातूनच History will absolve me किंवा इतिहास मला दोषमुक्त करील या ऐतिहासिक पुस्तिकेचा जन्म झाला!

१९५५ मध्ये पुन्हा अध्यक्षीय (खोट्या) निवडणुकीत बाटिस्टा पुन्हा जिंकला आणि त्याने मोठी चूक केली. लोकांच्या आणि संसदेच्या मागणीसमोर त्याने मान तुकवली आणि फिडेल तुरुंगातून सुटला. त्याने एक निःशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश येण्याची १००% खात्री झाल्यावर तो आणि त्याचे अनुयायी मेक्सिकोत गेले. तिथे २६ जुलै या संघटनेची व्याप्ती वाढवली आणि सशस्त्र क्रांतीची ज्योत पुन्हा पेटवली.

अर्नेस्ट गव्हेरा हा अर्जेन्टिनामधील एक तरूण डॉक्टर. दक्षिण अमेरिका बघण्यासाठी बाईकवरून निघाला आणि बाईक खराब झाल्याने पायी, सायकल, ट्रक मधून फिरून त्याने दक्षिण अमेरिका पहिली. त्याला दुःख दारिद्र्य दिसले आणि सहजपणे तो क्रांतिकरकांमध्ये सामील झाला. तो बोलताना मध्ये "चे" हा शब्द खूप वेळा वापरायचा. म्हणून त्याला चे हे टोपणनाव पडले. चे आणि फिडेलची भेट मेक्सिकोत झाली आणि पुढे दोघांनी क्रांती केली. चे खरेतर क्युबात क्रमांक दोनचा नेता होता पण सत्तेत न राहता त्याने उर्वरित दक्षिण अमेरिकेत क्रांती करण्यासाठी क्युबा सोडला आणि अशाच एका युद्धात तो मारला गेला. तो उत्तम लेखक आणि कवी होता. त्याची एक कविता -
उषेच्या जहाल भविष्यवेत्त्या,
चल, निघू या,
काटेरी नागमोडी वळणांच्या गुप्त रस्त्याने
तू ज्या हिरव्या भूमीवर प्रेम करतोस तिला मुक्त करण्यास.
चाल, निघू या,
अनंत अन्याय पुसून काढण्यास,
आपल्या मस्तकात फुटतात बंडखोर तारे,
मृत्यू वा विजय-शपथ घेऊन निघू या.
आणि जेव्हा पहिल्या गोळीच्या आवाजाने,
झोपेतून दचकून जागे झालेल्या तरुणीप्रमाणे,
ती भूमी खडबडून उठेल,
तेव्हा आम्ही तुझ्या साथीला असू,
निश्चयाने, हाती बंदुका घेऊन.

(ही कविता वाचल्यावर मुक्त चित्रपटातील "रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो" आठवली...)

पुढील फिडेल आणि चे यांची गाथा तुम्ही स्वतः वाचा!

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5459360203247863073?BookName=Fidel,-Che-Ani-Kranti

सिम्प्लव कुमारांचे पॉटरायण

युगाब्द १०११८ मधील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रातील बातमी :-

आपल्यात एक प्रसिद्ध इतिहास संशोधक सिम्प्लव कुमार आहेत. (ते सिम्पल आहेत आणि कुमार आहेत म्हणून त्यांना सिम्प्लव कुमार असे नामाभिदान दिले आहे.) त्यांनी नुकताच पूर्वीच्या काळी, सुमारे ५००० वर्षांपूर्वी, ज्याला ग्रेट ब्रिटन म्हटले जात होते त्या भागाचा अभ्यास दौरा केला. त्यांना या भागात राहत असलेल्या जे. के. रोलिंग या प्रसिद्ध इतिहासकाराने लिहिलेले खंडप्राय पुस्तक एका उत्खननात सापडले होते. त्यातील जुन्या काळाच्या लिपीचा आणि भाषेचा अभ्यास केल्यावर त्यांना ग्रेट ब्रिटन येथे जाऊन पुढील संशोधन करावे वाटले.

या अभ्यासदौऱ्यात त्यांनी काढलेले काही निष्कर्ष पुढील प्रमाणे
१. पूर्वी दोन फलाटांच्या मध्ये अजून ३ फलाट असायचे. म्हणजे फलाट क्र ९ आणि १० यांच्या मध्ये ९ पूर्णांक १/४, ९ पूर्णांक १/२ आणि ९ पूर्णांक ३/४ असायचे. त्या फलाटांवर जाण्यासाठी भिंतीच्या मधून एक न दिसणारे दार असायचे.
२. त्या काळी माणूस प्राणी होऊ शकायचा आणि पुन्हा माणूस होऊ शकायचा. उदा. सिरीयस ब्लॅक हा कुत्रा होऊ शकायचा, पेटीग्र्यू हा उंदीर, प्रोफेसर मॅक्गोनागल ह्या मांजर आणि प्रोफेसर लुपिन हे केवळ पौर्णिमेच्या रात्री लांडगा व्हायचे.
३. तेव्हा प्रचंड मोठ्या वाड्यात किंवा लहान किल्ल्यात जादूगारांची शाळा असायची. त्यातील एक विद्यार्थी हॅरी हा सापांची भाषा बोलू शकत होता.
४. त्याकाळी काही माणसे ६०० वर्षांपर्यंत जगत असत. उदा. डंबलडोर.
५. हार्मायानी नावाच्या एका मुलीकडे एक लहान पिशवी होती ज्यात तंबूसुद्धा मावायचे.
६. मृत माणसाची हाडे, त्याच्याच वडिलांची काही हाडे, त्याच्या विश्वासू माणसाचा हात आणि वैऱ्याचे थोडे रक्त एकत्र करून एका भांड्यात उकळले तर मृत माणूस पुन्हा जिवंत होऊ शकत असे.

हे आणि असे बरेच निष्कर्ष सिम्प्लव कुमार यांनी काढले. त्यांचे हे संशोधन आपल्याला नक्कीच ५००० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे अधिक ज्ञान देईल ही आम्हाला खात्री आहे.

ता. क.:
१. आमच्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यावर टीका केलेली चालते. यावरून मला कोणी संघातून बाहेर काढणार नाही. आम्ही सहिष्णू आहोत.
२. केवळ या पोस्टवरून फुरोगाम्यांनी मी फुरोगामी आहे असा निष्कर्ष काढू नये.

Monday, April 16, 2018

I Am Not Ashamed To Be Hindu

#IAmNotAshamedToBeHindu

नेहरूप्राणित मानसिकता भारतीयांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटावी म्हणून सतत प्रयत्नशील असते. ते स्वतः म्हणायचे की ते अपघाताने हिंदू आहेत, किंवा मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. याच मानसिकतेचा नवीन अंक या लोकांनी आशिफाच्या नावाने सुरू केला आहे.

मला याची खात्री आहे की जर संजीरामला न्यायालयाने दोषी मानले आणि त्याला फाशी झाली तर कुणीही हिंदू संजीरामला फाशी होऊ नये म्हणून मध्यरात्री न्यायालय उघडायला लावणार नाही. तो मेल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला हिंदूंची गर्दी होणार नाही. जशी याकूबच्या अंत्ययात्रेला झाली किंवा काश्मीरमध्ये मुस्लिम अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेला होते.

आजवर कोणत्याही न्यायालयाने दोषी मानलेल्या गुन्हेगाराला हिंदूंनी हिंदू म्हणून पाठीशी घातलेले नाही किंवा त्याचा उदो उदो केलेला नाही (अपवाद - नथुराम. गांधीहत्या ही राजकीय हत्या होती, तो दहशतवाद नव्हता. कारण त्या आधी वा नंतर गांधीवाद्यांवर कोणतेही हल्ले झाले नाहीत. शिवाय नथुरामचा उदो उदो बहुसंख्य हिंदूंना आवडत नाही)

हिंदू धर्माला परिवर्तनाची/विद्रोहाची मोठी परंपरा आहे. या सर्व विद्रोहींना संतत्व किंवा देवत्व या धर्मातील लोकांनी दिले आहे. हा धर्म एकमेव पोथीवर विश्वास ठेवणारा नाही. इतकी सामावून घेण्याची क्षमता असलेला, विविध पूजापद्धती (आस्तिक, नास्तिक, मूर्तिपूजक, सुर्यपूजक, निसर्गपूजक, गुरुपूजक आणि खूप) आणि परिवर्तनवादी धर्म अन्य कुठलाही नाही. त्यामुळे आधुनिक विचारांनुसार जे चांगलं ते धर्मात वाढवणारा, वाईट ते धर्मातून हद्दपार व्हावे यासाठी प्रयत्न करणारा आणि जे धर्मात आहे, त्याची उपयोगिता माहीत नाही पण अपायसुद्धा नाही अशा गोष्टी भाबडेपणाने टिकवून ठेवणारा धर्म हा हिंदू धर्म आहे. आपण राहतो त्या देशाच्या संवैधानिक चौकटीत, इतरांच्या पूजापद्धतीवर आक्षेप न घेता, स्वतःची पूजापद्धती इतरांना त्रास न होऊ देता जो पाळतो, तो हिंदू.

लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)

हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

आशिफाच्या बलात्काऱ्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि ती जेवढी जास्त शक्य असेल तेवढी व्हावी. सत्य लवकरच बाहेर येईल. आणि ते लवकर यायचे असेल तर केस लवकरात लवकर CBI कडे दिली गेली पाहिजे. त्यात होणारी टाळाटाळ अगम्य आहे.

आशिफा केसच्या निमित्ताने काही लोक हिंदूंना बलात्कारी म्हणत खालील विधाने करत आहेत
१. गर्व से कहो हम रेपिस्ट है। (गर्व से काहो हम हिंदू है च्या चालीवर)
२. आम्हाला हिंदू असल्याची लाज वाटते. (यात सेलिब्रेटी आघाडीवर. उदा : सोनम कपूर)
३. मी हिंदू आहे, पण मला मुलगा नाही याचा मला आनंद आहे. (जसं काही सगळे हिंदू मुलगे बलात्कारी असतात)
४. तुम्ही म्हणता ते इतरांचं दिसत नाही का. दिसतं. पण आधी माझं घर मी बघणार. त्याची मला लाज वाटते. (घरातला एक कोपरा घाण आहे. तो स्वच्छ करण्यासाठी मी काहीच करणार नाही. पण मी माझ्या घराकडे लक्ष देणार म्हणजे त्या कोपऱ्याचे फोटो काढणार आणि माझं घर किती घाण आहे हे फेसबुकवर पोस्ट करणार. आणि म्हणणार मला माझ्या घराची लाज वाटते)
५. एक कार्टुनिस्ट राम आणि सीतेचं चित्र काढतो आणि त्यात सीता रामाला म्हणते, बरं झालं रावण तुमचा अनुयायी नव्हता. (म्हणजे रामाचे सगळे अनुयायी बलात्कारी?)

एका केसमधून सगळ्या हिंदू पुरुषांना बलात्कारी म्हणून सरसकटीकरण (generalization) करायचं. हे राजकीय दृष्ट्या यांना सोयीचं वाटतं. हे सगळं करण्याची काँग्रेस अँड कंपनीला गरज वाटते. यातून हिंदू मते फुटतील आणि मग आपण निवडणूका जिंकू असे त्यांना वाटत असेल. पण एक गोष्ट यांनी लक्षात ठेवावी. जेव्हा जेव्हा हिंदूंवर हिंदू म्हणून आरोप होतात तेव्हा जातीपातीत विखुरलेला हिंदू एकत्र येतो. गेल्या तीस वर्षातला हा इतिहास आहे. त्यामुळे या लोकांची "गढूळाचं पाणी का रं ढवळीलं, नागाच्या पिल्ल्याला का रं खवळीलं" अशी अवस्था होईल याची शतप्रतिशत खात्री आहे.

#गर्व_से_कहो_हम_हिंदू_है।

Wednesday, April 11, 2018

चत्वार वाचा

लहानपणी मनाचे श्लोक पाठ करताना “नमूं शारदा मूळ चत्वार वाचा” ऐकलं होतं. मग मनाच्या श्लोकातच “पुढे वैखरी राम आधी वदावा” असंही ऐकलं, पाठ केलं. जेव्हा अथर्वशीर्ष पाठ केलं तेव्हा “त्वं चत्वारि वाक् पदानि” हे कानावर पडलं आणि कदाचित “चत्वार वाचा” आणि “चत्वारि वाक्” याचा संबंध असेल असं वाटलं. एकनाथांचा अभंग “गुरू परमात्मा परेशु” यातील जो परेश आहे तो पर+ईश आहे की काय आहे हा प्रश्न पडला आणि ज्ञानेश्वरीत सुरूवातीला जेव्हा शारदेला नमन आहे त्यात “आतां अभिनव वाग्विलासिनी” याने सुरूवात होऊन ते नमन आहे.
याचं उत्तर बऱ्याच वर्षांनी मिळालं. कधीतरी वाणीचे स्तर असं वाचनात आलं. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.
वैखरी हा वाणीचा चौथा स्तर. जी भाषा आपण बोलतो ती म्हणजे वैखरी. म्हणून वाणीशुद्धीसाठी रामदास सांगतात “पुढे वैखरी राम आधी वदावा”. तिसरा स्तर आहे मध्यमा. याला आपण self talk म्हणू शकतो. आपण बोलण्याआधी जो विचार करतो, ती वाणी म्हणजे मध्यमा. दुसरा स्तर येतो पश्यन्ति. केवळ जाणीवेने कळणारी वाणी म्हणजे पश्यन्ति. Conscious मनाला जाणवणारी वाणी. आणि सर्वात पहिली म्हणजे परा. ही sub-conscious अबोध मनाची वाणी आहे. परा पासून सुरूवात होऊन वैखारीला वाणी अभिव्यक्त होते. त्यामुळे शुद्धीकरण करत करत परा अत्यंत शुद्ध असणे हे योग्याचं लक्षण. म्हणून एकनाथ गुरूला परेश म्हणतात.
या चारही वाणींचा अधिपती म्हणून गणपती हा चत्वारि वाक् पदानि तर वाग्विलासिनी शारदा ही चारही वाणींची मूळ म्हणून नमूं शारदा मूळ चत्वार वाचा.

ता. क. आधुनिक मानसशास्त्र म्हणतं ते cognition, belief, self-talk, communication... - माया

Friday, April 6, 2018

माझी कथा – राजू रस्तोगी


नमस्कार! मी राजू रस्तोगी. तोच... 3 Idiots मधला... त्या सिनेमात काही गोष्टी सांगितलेल्या, दाखवलेल्या नाहीत. आता बरीच वर्षे झाली आणि मीही पुढे काही करायचं ठरवत आहे. म्हटलं तुम्हाला सांगावं...

तुम्हाला सर्वांना माझी परिस्थिती माहित आहेच. पोस्ट मास्तर वडील, गरीब घर, लग्नाळू मोठी बहिण वगैरे. ते सर्व साधारण कॉलेजच्या सुमाराचे. मला नंतर नोकरी लागली. कम्मोचं लग्न झालं, तेही बिना हुंड्याचं. चांगला नवरा मिळाला तिला. मग २ वर्षात माझंही लग्न झालं. नंतर वर्षभरातच वडील गेले. आई कधी कम्मोकडे तर कधी माझ्याजवळ असते. चतुरने जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही माझ्या बायकोला नक्कीच बघितलं असेल. फुल्ल योगावाली आहे ती. ही गोष्ट तिची आणि माझी, रँचोशी पुन्हा भेट झाल्यानंतरची.

चतुर मुळे आमची पुन्हा रँचोबरोबर भेट झाली. आणि तिथून माझी अस्वस्थता बाहेर पडू लागली जी गेली अनेक वर्षे माझ्यात मी दडवून ठेवली होती.

मी चौथीत होतो. शाळेत बेंचवर ठेका धरणं हे शाळेतलं सगळ्यात आवडतं काम. एकदा आमच्या वरच्या शाळेतल्या संगीत शिक्षकांनी ते ऐकलं आणि मला बोलावून घेतलं. मग शास्त्रोक्त तबला शिक्षण सुरू झालं. घरी फक्त एक एक्सट्रा तास शाळेत थांबतो यापेक्षा अधिक माहित नव्हतं. माझी तबल्याची आवड वाढत गेली. मी आता नववीत होतो. अचानक एक दिवस वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला आणि नोकरी गेली. आधीच पगार तुटपुंजा होता त्यात पेन्शन अजून कमी. शाळेत विज्ञानाच्या सरांनी बोलावून घेतले. सांगितले की तुझा तबला छान आहे पण आत्ताच्या परिस्थितीत तू तुझ्या कलेतून कुटुंबाची गरज भागवू शकणार नाही. तुझ्या वडिलांची पेन्शन कमी, तुझी बहिण शिकत असताना छोटी मोठी कामं करून घराला हातभार लावत आहे. अशावेळी तू शालेय शिक्षणावर अधिक लक्ष दे. पुढे जेव्हा या कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होतील तेव्हा पुन्हा तबला सुरू कर. थोडी मलाही समज आलेली होती. मला ते पटलं आणि तबला बंद झाला.

१० वीत उत्तम गुण आणि १२ वी नंतर इंजिनीयरिंग. त्यापुढे तुम्ही बघितलं आहेच. माझे घरातले लोक तर विसरले होते की कधी काळी मी तबला वाजवायचो. याच दरम्यान मला खूप त्रास झाला तो रँचो सोबत. साला काबिल बनो इतक्या वेळा सांगत होता की कित्येकदा वाटायचे इंजिनीयरिंग सोडून पुन्हा तबल्याकडे वळावे. पण मग घर दिसायचे. फरहानचं सिक्रेट काही सिक्रेट राहिलं नाही. त्याच्यावर घराची कोणती जबाबदारीही नव्हती. त्यामुळे त्याला निर्णय घेणं जमलं. माझा निर्णय मात्र पक्का होता. रँचोला काही कळूच द्यायचं नाही. हातात भरमसाठ अंगठ्या आल्यामुळे तबला बंद होताच, मी तोंडही बंद ठेवले.

जवळपास दहा वर्षांनी रँचोला भेटलो. फरहान सुद्धा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात रमला होता. मी काही फार मनाविरुद्ध करत होतो असं नाही. पण १००% मनाजोगं सुद्धा करत नव्हतो. या भेटीनंतर हे खूप तीव्रतेने वाटू लागलं. माझी अस्वस्थता बायकोने ओळखली. तिला सांगितलं. मी तबला वाजवायचो हे तिला माहीतच नव्हतं. मग तिला टेबलवर काही वाजवून दाखवलं. पुढे ती मागेच लागली की काहीही करून मी पुन्हा तबला शिकायला सुरुवात करायची. पस्तिशीत शिकावं की नाही या विचारात असताना तिने चांगल्या तबला शिक्षकाकडे माझा क्लास सुरू करून दिला.

सहा महिने शिकलो आणि मग आपली लाईफ स्टाईल आणि तिला लागणारे पैसे यावर विचार सुरू झाला. शेवटी निर्णय लागला की आताचे सेविंग्स आणि अर्धा पगार यावर नक्की घर छान चालेल आणि अर्धा वेळ तबल्याला मिळाला. पाच वर्षे अशी काढली आणि आता मी पूर्णवेळ तबल्यात करियर करायचे ठरवले आहे.

रँचोला त्यावेळी कळूच न देणं ही माझी आणि माझ्या कुटुंबाची गरज होती. सगळ्यांच्याच आयुष्यात जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे काही आवडीच्या गोष्टी मागे पडतात. जेव्हा मार्ग मिळेल तेव्हा त्यातून आवडीच्या गोष्टीला वेळ नक्की द्या. रँचो सारख्या मस्तमौलाला हे सहज जमतं, फरहान सारख्याला थोड्या संघर्षाने जमतं आणि माझ्यासारख्याला संघर्ष आणि वेळ दोन्ही देऊन मगच मिळतं. पण इच्छा असेल तर मिळतं हे नक्की.

तुमच्या शुभेच्छा नक्कीच पाठीशी असतील. धन्यवाद!

-- राजू रस्तोगी.

Tuesday, April 3, 2018

आमची आयटीवाल्यांची जात

संत सावता माळी यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. ज्यात त्यांनी कामात विठ्ठल शोधला आहे. तसा जर एखाद्या आयटीवल्याने लिहिला तर कसा असेल...
(नॉन आयटीवाल्यांना कदाचित कळणार नाही, पण ज्यांना कळेल त्यांनी एन्जॉय करा)

आमची आयटीवाल्यांची जात । कोड लिहू बगमुक्त ।।
असो जावा वा डॉटनेट । भाषा ऑब्जेक्ट ओरिएंट ।।
डीबी आधी रॅशनल । आता झाला नो-एस्क्यूएल ।।
प्रोसेस एक वॉटरफॉल । आजाईल, आयटीआय्यल ।।
गो-लाईव्हचा सोहळा । विठ्ठल देखियेला डोळा ।।

ऍप्लिकेशना क्वालिटी । देतो टेस्टर घेऊनि लाठी ।।
कधी टेस्ट प्रोग्रेशन । करू कधी रिग्रेशन ।।
स्मोक आणि सॅनिटी । टेस्ट सायकलची क्वालिटी ।।
लोड आणि एन्डयुरन्स । करू चांगला परफॉर्मन्स ।।
डिफेक्ट फ्री प्रोडक्शन । आम्हा वैकुंठा समान ।।

मूळ अभंग
आमची माळीयाची जात । शेत लावू बागाईत ।।१।।
आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुलझाडा ।।२।।
शांती शेवंती फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ।।३।।
सावताने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळा ।।४।।
- संत सावता माळी

Tuesday, March 20, 2018

प्रतिवाद - व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो

लोकसत्तामध्ये एक पुस्तक (व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो) परिचय वाचला. त्यावरील माझे मत.
राष्ट्रवादाची मांडणी काय आहे, कशी असावी हे मुद्दे चर्चेचे असू शकतात पण राष्ट्रवादच नाकारणे के चुकीचे आहे. राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी काही प्रतीके लागतात आणि तेव्हाच देश एकत्र राहू शकतो. ही प्रतीके राष्ट्रगीत, ध्वज, महापुरुष अशी असतात, आणखीही असू शकतात.
भारत माता की जय अशा घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी विचारलं होतं की भारत माता म्हणजे काय, कोण? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं की, भारत माता म्हणजे ही जमीन, झाडं, नद्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व भारतात राहणारे. हे सगळं मिळून भारत माता होते. म्हणजे नेहरूंनासुद्धा भारत एक देश ही संकल्पना मान्य होती. इथे सांगण्याचं कारण म्हणजे चौधरींना नेहरू आवडतात.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
ब्रिटिशांपूर्वी जर भारत एक नव्हता तर पानिपतावर लाखो मराठ्यांनी आत्मबालिदान का केलं? महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला अब्दालीला कित्येक वर्षे लागली असती किंवा तो आलाही नसता. मग तरुण भावी पेशवा आणि पेशव्यांचा भाऊ तिथे जाऊन का लढले? कारण अब्दाली परकीय होता. दिल्लीचे तख्त जरी मुस्लिम असले तरी ते भारतीय होते. आणि ते वाचवणे मराठ्यांना कर्तव्य वाटले.
त्याआधी अकबराला संपूर्ण भारतावर एकछत्री अमल असावा असं का वाटलं? संपूर्ण भारत म्हणजे काय? तेव्हा तर ब्रिटिश कुठेच नव्हते. मग त्याला केवळ भूभाग त्याला ताब्यात घ्यायचा होते का? नाही, अकबराला संपूर्ण भारत जी आधीपासूनची संकल्पना होती ती एका अमलाखाली आणायची होती.
त्याही आधी चाणक्याने अलेक्झांडरला पराभूत करण्यासाठी सीमेवरील राज्यांची मोट बांधली आणि चाणक्य त्यात यशस्वी झाले. ही मोट का बांधली गेली? आणि सीमेवरील म्हणजे काय? तर भारतीय सीमेवरील. पण इंग्रजांच्या आधी तर भारत नव्हता ना... मग हे कसे झाले. चाणक्याने नंतर मगध हस्तगत करून चंद्रगुप्ताला राजा बनवले आणि अधिक समर्थ साम्राज्य निर्माण केले.
त्याही आधी, वेदात
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
भारत एक राष्ट्र आहे याचा उच्चार आहे.
अर्थात हे कितीही तर्कशुद्ध पटवण्याचा प्रयत्न केला तरीही विचारवंत केवळ आणि केवळ डावे असतात असं समाजणार्यांना ते कळणार नाही. पण ज्यांना कळेल त्यांनी ते समजून घ्यावं म्हणून हे लेखन.


दि. ४ मार्च २०१७

शिवाजी महाराजांचे मुस्लीम सरदार

सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही. ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले. संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती नेताजी पालकर होते. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.
शिवाजी महाराजांबरोबरआग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता की नाही यावर मत मतांतरे आहेत. अधिक माहितीसाठी पहा - https://m.facebook.com/dasabodh/posts/446234875521176:0
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
''काझी हैदर"
बरोबर. पण एकमेव नव्हता.
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा… "रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
बरोबर. पण वाघनख्या पाठवणारा नाही तर शस्त्र तयार करणारा एक कारागीर होता तो. त्याने केवळ अफझलखानाला मारायचे म्हणून वाघनखं बनवून दिली नव्हती
आता प्रश्न हा आहे की महाराजांच्या नावाने त्यांना बळेच मुस्लिम विरोधक नाही असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो? कारण सोपं आहे, मूळ इतिहासापासून लोकांना दूर नेलं, की स्वत्व विसरायला लावणे सोपे असते. महाराज धर्म निरपेक्ष होते पण त्यांनी मशिदी पडल्या नाहीत असं मुळीच नाही. जी मशीद मंदिर तोडून बांधली गेली ती मशीद महाराजांनी पाडली आहे. हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो.
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका

दि. ७ मार्च २०१७

नाना फडणीस

नाना फडणीस... नाव ऐकलं की आधी प्रतिमा येते ती स्त्रीलंपट, लढाईतून पळून जाणारा वगैरे वगैरे... का?
गेल्या काही दिवसांत पेशवाईवरील बरीच पुस्तके वाचली. नाना फडणीसांना पानिपतला सदाशिवरावांसोबत कारभारी म्हणून पाठवले होते. तिथे रणात अन्य लोक (पाळणाऱ्यात होळकर, विंचूरकर, महादजी शिंदे सुद्धा होते) पळाले, त्यांच्याबरोबर हे सुद्धा पळून आले. पण पळपुटा म्हटले गेले फक्त नाना फडणीसाला. असो, पळाले हे खरं...
पुढे माधवरावांच्या सोबत फड सांभाळला तो यांनीच. पानिपतवरील लढाई एक प्रचंड धक्का होता आणि त्यापाठोपाठ नानासाहेब पेशवे निवर्तले. पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव पानिपतात मारले गेले. इथे राघोबादादाला पेशवे बनण्याची संधी होती पण संपूर्ण जबाबदारी घेणं राघोबाने नेहमीच टाळलं. माधवराव 'पेशवे' झाले. हा तरुण पेशवा मात्र अनेक घरातल्या आणि बाहेरच्या झुंजी देत अतिशय लवकर निवर्तला. पण या अवधीत त्यांनी पानिपत वरील जखमा बुजवल्या आणि नाना फडणीस सारखे लोक पेशवाईच्या आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याच्या कामी लावले. पुढे नारायणराव पेशवे झाले आणि त्यांना राघोबा + आनंदीबाई यांनी मारले. रात्री गुपचूप सगळे विधीही आटोपले. सर्व पुणे झोपलेले असताना नाना फडणीस यांनी अन्य 3 कारभाऱ्यासोबत राघोबाला पेशवेपद मिळू नये अशी शपथ घेतली. तरी राघोबा पेशवे झाले. 5 महिन्यात जेव्हा नारायणरावांची पत्नी बाळांत झाली तेव्हा या कारभाऱ्यांनी राघोबा बाहेर असताना चिमुकल्या सवाई माधवराव च्या नावे पेशवाई घेतली आणि बारभाईची लढाई सुरू झाली. याला कारस्थान का म्हटले? वास्तविक व्यसनी राघोबाला पेशवाई दिली हीच चूक होती ती सुधारणे याला कारस्थान म्हटले गेले.
मग राघोबा इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजांकडून हिंदवी स्वराज्यावर हल्ला करवला. इथे नाना फडणीसांनी अतिशय धूर्तपणे हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. अर्थात या कामी होळकर आणि शिंदे यांची मदत झालीच. पण लढाई सुरू होण्याआधीच वडगावला इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली आणि राघोबाला नानांच्या हवाली करून, मोठी खंडणी देऊन ते चालते झाले. ही प्रचंड हार इंग्रजांना किमान 50 वर्ष मागे घेऊन गेली. स्वराज्याच्या या विजयाचे शिल्पकार होते नाना फडणीस.
सवाई माधवराव वयाच्या 14-15 वर्षी वारले आणि त्याजागी दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचा मुलगा आला. याने आधी नाना फडणीसांना कैदेत टाकलं आणि नंतर जेव्हा कारभार पेलला नाही तेव्हा पुन्हा फडणीस केलं. हे सगळं होऊनही नाना कायम हिंदवी स्वराज्यासाठी झटले आणि ते असेपर्यंत इंग्रजांना आपले हात पाय पसरता आले नाहीत. 13 मार्च 1800 साली नाना फडणीस वारले आणि पुढे केवळ 18 वर्षांत शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला.
मला वाटते की नाना फडणीसांत दोष असतील पण त्याचे विकृतीकरण इंग्रजांनी केले असावे. कारण नाना फडणीसांमुळे त्यांना मराठा साम्राज्य जिंकता आलं नव्हतं. मोर नाचताना इंग्रजांनी मागून फोटो काढला आणि आपल्या साहित्यिकांनी तोच मोराचा फोटो आहे असं मानून लेखन केलं आणि नानावर निव्वळ बाईलवेडा आणि विकृत असा शिक्का मारला. धोरणी आणि मुत्सद्दी नाना त्यात लोप पावले.


दि. १३ मार्च २०१७

शुगर कोटेड टीका

माधव "आपटे"... डोंबिवली फास्ट मधला एक सामान्य माणूस. व्यवस्थेवर आणि ती राबवणाऱ्यांवर चिडून कायदा हातात घेतो. तेव्हा इन्स्पेक्टर सुभाष अनासपुरे म्हणतो, "माधव 'आपटे' नावाचा कुणीही असं काही करू शकतो का?"
सगळे लोक डोंबिवली फास्ट काय भारी चित्रपट आहे म्हणतात. यात ब्राह्मण सुद्धा आहेत छान चित्रपट म्हणणारे
संदीप खरे एक गाणं लिहितो, त्याला सलील कुलकर्णी चाल लावतो. गाणं आहे, मी मोर्चा नेला नाही. यात या मोर्चा न नेणाऱ्या, संप न करणाऱ्या माणसाला जेव्हा तो दगड होऊनी पडलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायला देखील कुणी उचललेले नसते. हा माणूस कोण, याच्या "टकलावर अजून रुळत असते एक अदृश्य लांबशी शेंडी". म्हणजे कोण ते कळालं असेलच. तर या गाण्याला आणि अल्बमला देखील सर्व लै भारी म्हणतात. यात ब्राह्मणही आले.
मग एक मंत्री असलं शुगर कोटेड न बोलता म्हणतो की घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का... झालं सगळे ब्राह्मण त्याच्यावर चिडून बोलतात. तुझा बाप जो मुख्यमंत्री आहे तो ब्राह्मण आहे याची जाणीव करून देतात. का, कारण तो मंत्री डायरेक्ट बोलला म्हणून?
निशिकांत कामतने डोंबिवली फास्ट मध्ये घेतलेला संवाद, संदीप खरेने घेतलेला कवितेतला भित्रा आणि कांबळे बोलले यात अर्थात्मक काही फरक नाहीये. फरक एकच आहे तो म्हणजे कांबळे थेट बोलले. म्हणजे ब्राह्मणांना शुगर कोटेड काहीही बोललं तरी चालतं पण थेट बोललेलं खपत नाही... बरोबर ना...

दि. १७ मार्च २०१७

माझी कथा - भैरवसिंग (चित्रपट - उडान)

मी भैरवसिंग. उडान मधल्या रोहनचा बाप. मला त्यात उगाचच व्हिलन दाखवलं आहे.
माझ्याकडे वडिलोपार्जित काहीच नव्हते. माझा कारखाना मी सुरू केला. त्यात मेहेनतीने पैसा कमावला. माझा भाऊ, जिमी, त्याला शिकवलं. लग्न झाले. रोहन झाला पण त्याची आई लगेच वारली. काही दिवस रोहनला एकटं सांभाळायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही आणि खरं तर बायकोशिवाय मी राहणं मला अवघड होतं. त्याच्यावर सावत्रआईचा त्रास नको आणि त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून त्याला बोर्डिंगला पाठवलं. त्यानंतर लग्न केलं. दुर्दैवाने अर्जुन 5 वर्षांचा असताना त्याची आईही वारली. माझ्या दोन्ही बायका गेल्या पण माझं कुणी ना सांत्वन केलं ना मदत. बायकोच्या माहेरहून कोणी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
रोहनला भेटायला मी काही वेळा बोर्डिंगला गेलो होतो. पण त्याला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आणि तोही त्याच्या मित्रांमध्ये खुश दिसला. फुटबॉल छान खेळत होता. चांगलं वाटलं. परत आलो. म्हटलं मुलगा मोठा होतोय, शिकेल आणि आपल्या मेहेनतीवर कमावेल.
पण अचानक त्याने दारू पिऊन धिंगाणा केला, मास्तरांच्या खोड्या काढल्या आणि बरंच काही होऊन त्याला बोर्डिंग मधून काढून टाकल्याचं कळालं. पण तरीही त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून मी त्याला इथल्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून दिली. कठोर मेहेनत आणि करडी शिस्त त्याला पुन्हा रुळावर आणेल याची खात्री होती मला. कारण मी स्वतः तेच करून इथवर आलोय. पण हा कॉलेज मध्ये न जाता भटकत होता. माझ्या व्यायामाच्या शिस्तीला, अभ्यासाला तो त्याच्यावरचा अन्याय समजत होता. त्याला म्हणे लेखक व्हायचे होते. बेशिस्त, व्यायाम न करणारा, रात्री वडिलांचे पैसे चोरून, गाडी चोरून मित्रांबरोबर दारू पिणारा, सिगारेटी फुंकणारा हा तुम्हा प्रेक्षकांनापण अन्यायग्रस्त वाटला हे माझं दुर्दैव.
माझ्या चुका आहेत, मला मान्यही आहेत. दारू ही प्रमुख चूक. नशा जास्त झाला तर माझा कंट्रोल राहत नाही. अर्जुनला त्या दिवशी चुकून मारलं गेलं. मोठी चूक झाली. दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते. रोहन त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यावर सोपवून गेलो. ते जाणे हे जबाबदारीतून पळणे नव्हतेे तर पुढील जबाबदाऱ्या घेण्यासाठी होते. पण रोहनने ही घटना फारच विचित्र पद्धतीने घेतली. मी पुन्हा एकटा पडू लागलो. जिमीला तर माझी शिस्त कधीच आवडली नव्हती. त्याने रोहनला समजावणे तर दूर पण उलट भडकावले. माझे एकटेपण दूर करण्यासाठी मी तिसऱ्या लग्नाचं ठरवलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोहन खूप दूर गेला. त्याने लेखक बनण्यात मला काही अडचण नव्हती. पण शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पायावर आधी उभं राहावं आणि मग काय वाटेल ते करावं एवढंच माझं म्हणणं होतं.
पण कठोर मेहेनत आणि करडी शिस्त म्हणजे वाईट असं मानणाऱ्या या पिढीला हा भैरवसिंग कळाला नाही.
एका गोष्टीचं बरं वाटलं ते म्हणजे माझ्या व्यायामाच्या बळजबरीमुळे रोहन माझ्यापेक्षा वेगात पळू शकला.
पोलिसात तक्रार केल्याने मला अर्जुन पुन्हा मिळू शकला नाही. I hope both are doing good...
मी दुसरीकडे नेहमी म्हणतो, "अक्सर जो दिखता हैं वो होता नही और जो होता है वो दिखता नही"
कधीतरी अर्जुन आणि रोहनला त्यांचा बाप कळेल या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत

https://g.co/kgs/SSr4Pj

दि. २९ मार्च २०१७

जो जे वांछील तो ते 'न' लाभो

महाभारताच्या शांतीपर्वात खलील श्लोक आला आहे.
न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः।
स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥
म्हणजे एका खऱ्या प्रजाराज्याचं हे एक स्वप्न आहे. राजा नाही, राज्य नाही, दंड नाही आणि त्यामुळे दंडव्यवस्थासुद्धा नाही. राज्य आणि दंडव्यवस्था नाही, म्हणून राजकारणीही नाहीत! पण हे केव्हा होऊ शकते? जेव्हा स्वतः प्रजा ही परस्परांचे रक्षण करेल तेव्हा... आज जेव्हा आपण राजकारण आणि राजकारणी नको, किंवा राजकारण हा चिखल आहे वगैरे तेव्हा प्रजा काही परस्परांचे आणि परस्पर हिताचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेली नसताना म्हणतो. जर राजकारणी या देशातून जगातून नष्ट झाले तर प्रजाहितरक्षण कोण करेल? हे नक्की मान्य की राजकारण अत्यंत गढूळ आहे, पण आजवर त्याद्वारेच अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. त्यामुळे जर राजकारण आणि राजकारणी यांना समाजजीवनातून हद्दपार करायचे असेल तर त्याआधी परस्परांचे रक्षण करणारी प्रजा तयार झाली पाहिजे. तोवर राजकारणी हद्दपार होऊ नयेत.
म्हणूनच समर्थांनी हरिकथेनंतर (धर्मानंतर) राजकारणाला महत्व दिले आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे सावधपण । सर्वांविषयी ।
म्हणजे 'आझादी'वाल्यांना सुद्धा हेच तर पाहिजे? नाही...
इथे 'गॉड तुस्सी ग्रेट हो' या चित्रपटाचा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे ज्ञानेश्वरांचा. काय संबंध या दोघांचा??? आहे!

'गॉड तुस्सी ग्रेट हो' मध्ये सलमान देवाच्या भूमिकेत जातो आणि मग एकामागे एक लोकांच्या मागण्या त्याच्याकडे येऊ लागतात. हा काही वेळातच परेशान होतो आणि म्हणतो, ज्याला जे हवे असेल ते मिळू दे. त्यानंतर गोंधळ सुरू होतो. लूटमार, कैदी तुरुंगातून सुटणे आणि बरेच काही... शेवटी तो देवाला म्हणतो बाबारे तू ग्रेट आहेस. आता हे तूच निस्तर.
पसायदानात ज्ञानेश्वरांनी पण ज्याला जे हवे ते मिळो असंच म्हटलंय ना, जो जे वांछील तो ते लाहो... म्हणजे जे सलमानने मागितले तेच... पण
ज्ञानेश्वरांनी अनेक *अटी व शर्ती लागू या प्रमाणे हे मागणे केले आहे
पहिली अट
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला पाहिजे आणि सत्कर्मात त्यांची गोडी वाढली पाहिजे
दुसरी अट
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
सर्व प्राणिमात्रांचे, केवळ मानवांचे नाही, एकमेकांशी मैत्र झाले पाहिजे
तिसरी अट
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
वाईटाची अंधारकाजळी नष्ट होऊन, स्वधर्म सूर्य अखिल विश्वात जागृत झाला पाहिजे. इथे धर्म म्हणजे religion नाही तर धर्म म्हणजे विहित कर्त्यव्य. ते प्रत्येकाने पूर्ण केले पाहिजे.
हे सर्व झालं तरच
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
'आझादी'वाल्यांचे मागणे हे 'गॉड तुस्सी...'च्या मालिकेतील आहे. अविचारी आणि अविवेकी. पण ही चूक 'आझादी'वालेच करतात असं नाही तर आपणापैकी बरेच असे असतात जे संपूर्ण राजकारणच नाकारतात, त्याद्वारे ते राज्यव्यवस्था नाकारत आहेत याचे कदाचित त्यांना भान नसते. यातून ज्ञानेश्वरांचे 'जो जे वांछील...' साध्य होणार नसून 'गॉड तुस्सी...' मधील अराजक येईल हे समजून घेतले पाहिजे.
'रक्षन्ति स्म परस्परम्' चा नेमका अर्थ आणि कृती ही ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. ते देखील अधिक व्यापक करून. तेव्हा जोवर या अटी व शर्ती लागू होत नाहीत तोवर जो जे वांछील तो ते 'न' लाभो!
दि. ४ एप्रिल २०१७

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतात मारुती शेपटीने उडायचा, नारदाची वीणा म्हणजे रॉकेट होतं, गणपती हा क्लोन आणि प्लास्टिक सर्जरीने डोकं बसवलेला होता ही निव्वळ मिथकं आहेत. पण लोकांनी मिथकाला विज्ञान म्हणायला सुरुवात केल्याने सध्या गोंधळ झालाय आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, कालमापन, गणित हे उच्च स्तरावर होते, त्यातील काही नमुने खाली दिले आहेत.
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही 😉) ग्रंथ वाच. शिवाय पराशर मुनींचे शेतीवरील काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
हे सर्व असताना पुढील वैज्ञानिक प्रगती का होऊ शकली नाही? याचे मानसशास्त्रीय आणि दोन कालखंडात उत्तर देता येईल. पहिला इस्लामी आक्रमणपूर्व आणि इस्लामी आक्रमणापश्चात. मानसशास्त्रीय यामुळे की समाज म्हणूनही एक मन असतं.
भारतात एक विशिष्ट स्तरापर्यंत ज्ञान विज्ञान वाढलं पण ते पुढे थांबलं. असं का घडलं असावं याबद्दल हे माझं मत. एक गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयातील तज्ञ नाही. जे काही थोरांकडून ऐकले, वाचले, त्यावरून हे मांडले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
हा सगळा प्रवास का होतो तर आधीच्या गरजा पूर्ण होत जातात आणि मानवी मन पुढील गोष्टी शोधत राहतं. तसंच समाजमन सुद्धा या प्रवासाला प्रोत्साहन देत राहतं आणि मदत करतं. आहे तिथे संपन्नता मिळाल्याने भारताने दुसऱ्यावर आक्रमण कधीच केले नाही. उलट अनेक निर्वासितांना भारताने आनंदाने आश्रय दिला. यामुळे संहारक शस्त्रे, वेगवान प्रवास याची गरज भासली नाही आणि त्याची निर्मितीही झाली नाही.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
याच दरम्यान युरोपात गरजही वाढत होती आणि शोधासाठी असलेले वातावरण सुद्धा होते. या बळावर तेथे नवीन विज्ञान सिद्ध झाले आणि मग युरोपने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.

दि. ५ मे २०१७

राज्जुभैय्यांची आठवण

आमच्या वर्गात एक चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. आम्ही दहावीला असताना शाळेत एकदा त्यावेळी मा. सरकार्यवाह असलेले रज्जूभैय्या आले होते. बहुदा डिसें'९३ किंवा जाने'९४ असावा. मग चुणचुणीत मुलगा त्यांना भेटला आणि त्याने त्यांची सही घेतली. तेव्हा ते व्यस्त असल्याने मला काही सही मिळाली नाही. पण मी एक शाखेचा गणशिक्षक होतो त्यामुळे त्याच दिवशी निवासी वर्गात माझी रज्जूभैयांशी भेट होणार होती. वर्ग सुरू झाला. मी भोजनानंतर त्यांच्याकडे गेलो आणि मला सही द्या अशी विनंती केली. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, "कभी कोई अपने नानाजी या दादाजी की स्वाक्षरी लेता है भला"
या वाक्यांनी खूप छान वाटलं, पण एक हुरहूर लागून राहिलीच की आपल्याकडे सही नाही. मार्च'९४ मध्ये रज्जूभैय्या प. पू. सरसंघचालक झाले आणि चुणचुणीत मुलाने मला जरा चिडवलेच...
पुढे २ वर्षांनी १२वीची परीक्षा झाल्यावर ३ एप्रिल ९६ ला रज्जूभैयांच्या हस्ते रायगडावर रोप वे चे उद्घाटन होणार होते. आमच्या शहरातील आमच्यासारख्या माकडांचा एक वानरयुथमुख्य होता रवींद्र पूर्णपात्रे. तो घरी आला आणि माझ्या आई वडिलांची या सहलीला जाण्याची परवानगी मिळाली. तेव्हाची अशा सहलींसाठी बेष्ट गाडी म्हणजे ट्रॅक्स. आम्ही ९ स्वयंसेवक आणि एक चालक असे निघालो.
जाताना दुपारी शिवथरघळ येथे गेलो. समर्थांचं दर्शन घेतलं. संध्याकाळपर्यंत थांबून साधारण ७ च्या सुमारास तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती. त्यामुळे वाटेवर लख्ख चंद्रप्रकाश. झाडं अक्षरशः चांदणं पीत आहेत असं वाटत होतं. वळणं घेत गाडी रायगडाकडे निघाली. रात्री १० ला आम्ही पाचाडला पोहोचलो. एका घरी जेवण व निवासाची सोया झाली. भरपेट खाऊन झोपलो.
पहाटे ३:३० ला रवीच्या हाका सुरू झाल्या. आणि त्याने आम्हाला सर्वांना ४ ला गडाच्या वाटेवर आणलं. मग सर्वांचाच उत्साह वाढला. संघाच्या कोणत्याही शिबिरात सकाळी एकात्मता स्तोत्राने सुरुवात होते. मग "ॐ नम: सच्चिदानंद..." ची सुरुवात झाली आणि रवी सोबत मी आणि मागून सर्व असं स्तोत्र म्हणत आम्ही गड चढायला लागलो.
हनुमान जयंती असल्याने पूर्णाकृती चंद्र पश्चिमेला होता आणि रायगडाची चढण सगळी पश्चिमेकडून असल्याने आम्हाला सहजच रस्ता दाखवत होता. आमची वानरसेना पटापट गड चढली आणि पहाटेच्या प्रकाशात गडावरील बाजारापर्यंत आम्ही पोहोचलो. जर लगेच समाधीच्या मागच्या बाजूला गेलो तर सूर्योदय दिसेल याची खात्री असल्याने धावत तिकडे पोहोचलो.
जोर-बैठका आणि तळ्यात पोहून झाले तोवर सूर्यनारायणाने दर्शन द्यायला सुरुवात केली होती. भव्य सह्यकडे, तिथून दिसणारे किल्ले, त्यामागे सृष्टीला जागा करणारा भगवंत आणि गडावरील भारावलेलं वातावरण. आम्ही नि:शब्द होऊन तसेच उभे राहिलो.
मग जाणीवेच्या पातळीवर आल्यावर पहिली जाणीव झाली ती भुकेची. तिथल्या हॉटेलात, "प्लेटचे भाव नाही किलोचे सांगा भाऊ", असं सांगत किलोंनी पोहे खाल्ले. गड फिरलो. आणि कार्यक्रमाच्या जागी येऊन पोहोचलो.
तेवढ्यात कळाले की रज्जूभैय्या अतिथीकक्षात आलेले आहेत. सुरक्षरक्षकाला विनंती करून मी आत गेलो. त्यांना नमस्कार करून परिचय सांगितला. "स्वाक्षरी मांगने वाले तुम ही थे ना?", रज्जूभैय्यांचा प्रश्न! मी अवाक झालो, हो सांगितलं. फोटो काढू का विचारलं आणि त्यांनी हसून होकार दिला. मी फोटो काढून पुन्हा नमस्कार करून बाहेर पडलो.
मग उद्घाटन झालं. एक वारकरी महाराज आले होते. त्यांनी सांगितलं की, शिक्षणासाठी वार लावून जेवणारे, वारीला जाणारे आणि शत्रूवर वार करणारे हे सगळेच वारकरी. एक ज्ञानासाठी, एक देवासाठी आणि एक राष्ट्रासाठी! हे सगळेच वारकरी थोर काम करत असतात.
रज्जूभैया भाषणाला उभे राहिले. "आज रोप वे का उद्घाटन है। हिंदी में रोप वे को रज्जूमार्ग कहेते हैं। ये रज्जूमार्ग खाई एवं शिखर को जोडता हैं। संयोग से मेरा नाम भी रज्जू है। संघ का स्वयंसेवक हूं, और संघ का भी यही काम है की खाई और शिखर जोडनां।" अगदी सहजतेने त्यांनी संघकामाचे फलित सांगितले, कितीही अंतर असते तरी समाज जोडणे.
कार्यक्रम संपला, अन्य जिल्ह्यातील स्वयंसेवकांना भेटून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
डोक्यात विचार घुमत होते...
एका सामान्य स्वयंसेवकाच्या घरातील दादाजी किंवा नानाजी होणं, तो स्वयंसेवक 2 वर्षांनी लक्षात राहणं आणि Physics Gold Medalist राजेंद्र सिंह यांचा रज्जू होणं... सगळंच विलक्षण!!!



दि. ३१ मे २०१७

आनंद

'सुख' आणि 'दुःख' हे विरुद्धार्थी शब्द, भावना आहेत. 'आनंद' या शब्दला, भावनेला विरुद्धार्थी काहीच नाही.

#कुणीसं

दि. २८ जून २०१७

त्याचं तिचं भांडण असं वर्ल्डकपच्या दिवसात

पाऊस, सौमित्र आणि सर्व गारवाप्रेमींची माफी मागून...
तिला क्रिकेट आवडत नाही, त्याला क्रिकेट आवडतं
मॅचच्या दिवशी रिमोट त्याच्या तावडीत सापडतं
मी तुला आवडतो, पण क्रिकेट आवडत नाही
असलं तुझ गणित खरंच मला कळत नाही
क्रिकेट म्हणजे टाईमपास नुसता क्रिकेट अनरोमॅंटिक इव्ह
क्रिकेट म्हणजे चौकार-षटकार क्रिकेट सरळ बॅटचा ड्राईव्ह
क्रिकेट कान किट्ट करतं क्रिकेट आळश्यांना चान्स
क्रिकेट म्हणजे डोळ्यांचं पारणं क्रिकेट हळुवार लेग ग्लान्स
क्रिकेट कामांना हुलकावणी क्रिकेट खेळ नाहीच मुळी
क्रिकेट म्हणजे स्लोअर वन क्रिकेट म्हणजे गुगली
नेहमी वर्ल्डकप येतो नेहमीच असं होतं
नेहमी वर्ल्डकप येतो नेहमीच असं होतं
क्रिकेटवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
क्रिकेट आवडत नसलं तरी तिला तो आवडतो
क्रिकेट आवडत नसलं तरी तिला तो आवडतो
क्रिकेटसकट आवडावा तो म्हणूण तोही झगडतो
रूसून मग तो बघतो मॅच रिमोट ठेऊन हातात
रूसून मग तो बघतो मॅच रिमोट ठेऊन हातात
त्याचं तिचं भांडण असं वर्ल्डकपच्या दिवसात

दि. २८ जून २०१७

बदल आणि सवय

कोणत्याही बदलाचा त्रास सवय होईपर्यंतच होत असतो

#कुणीसं

दि. १ जुलै २०१७

सूर्य हा सूर्यच असतो

पृथ्वीवरून एकाच क्षणी सूर्य कुणाला उगवताना दिसतो, कुणाला तळपताना, कुणाला मावळताना तर कुणाला त्याचे अस्तित्वच दिसत नसते. म्हणजे सूर्य नसतो असं नाही तर बघणाऱ्याची जशी दृष्टी, जसा दृष्टिकोन, जशी वेळ तसा तो बघणाऱ्याला दिसतो. पण या प्रत्येक वेळी सूर्य हा सूर्यच असतो आणि तो जसा आहे तसाच असतो.

#कुणीसं

दि. ३ जुलै २०१७

शेतकऱ्याच्या 'अनैतिहासिक' आसूड

इतिहास हे शास्त्र आहे. एखादे 'मत' इतिहास म्हणून मांडणे किंवा इतिहास म्हणून स्वीकारणे हे दोन्ही चूक.
उदाहरण म्हणून महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातील एक परिच्छेद देत आहे. यातील एकूण एक वाक्य अनैतिहासिक आहे.
1. महंमद पैगंबरांच्या जहामर्द शिष्यांनी सोमनाथ शेतकऱ्यांची भट ब्राह्मणापासून सुटका करण्यासाठी फोडले नाही. ते फोडले लूट करण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी. त्यांना येथील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नव्हते
2. ज्ञानोबांनी भागवत बखरीतील कल्पित भाग उचलून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली गीतेवरून. गीतेत इस्लामच्या विरोधी काही असण्याची शक्यता नाही कारण गीता इस्लामच्या हजारो वर्षे आधी लिहिली गेली. गीतेशिवाय अन्य धर्मकारण/राजकारण या कशावरही ज्ञानेश्वरांनी काही लिहिले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांमुळे शेतकरी मुस्लिमांना नीच मानू लागले हे चुकीचे आहे
3. तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांत निर्माण झाला, हे धादांत खोटे वाक्य आहे. तुकाराम शेतकरी नव्हते, सावकार होते. त्यांनी सावकारी सोडल्यावर शेती केली. शिवाजी महाराज देखील 3 पिढ्यांपासून शेतकरी नव्हते तर सरदार होते.
4. पुढील वाक्यात महाराजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे. ज्यांना मराठी, संस्कृत, फार्सी या भाषा व्यवस्थित अवगत होत्या, ज्यांनी आपली राजमुद्रा संस्कृत मधून तयार करवून घेतली अशा शिवाजी राजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे
5. पेशव्यांनी शाहू आणि पुढील राजांना साताऱ्यास कैदेत ठेवले हे म्हणणे इतिहासाचे अज्ञानच दर्शवते. बाळाजी विश्वनाथांपासून, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ते अगदी ज्याला पळपुटा म्हणतात (यावर सुद्धा प्रतिवाद आहेत) त्या दुसऱ्या बाजीरावांपर्यंत सर्वांनी सातारच्या गादीशी इमान राखले आणि पूर्ण मान दिला.

हे सगळं जोतिरावांनी का लिहिलं असावं? कारणं अनेक असू शकतात. उदा:
1. त्यांचं शिक्षण इंग्रजांच्या शाळेत झालं होतं. त्यामुळे आर्य भारतात आले आणि त्यांनी मूलनिवासी लोकांवर अत्याचार केले हे त्यांच्यावर बिंबवले गेले. आर्य म्हणजे केवळ ब्राह्मण आणि इतर सर्व शेतकरी हा शोध असाच लादला असेल. (डॉ आंबेडकरांनी यावर प्रतिवाद करून हे चुकीचे आहे हे सिद्ध केले आहे)
2. जेव्हा गोविंदराव (वडील) यांनी रुढीवाद्यांना घाबरून, किंवा त्यांचं ऐकून जोतिरावांना घरातून काढलं तेव्हा फातिमा आणि उस्मान शेख या बहीण भावांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली. कदाचित त्यामुळे इस्लाम बद्दल प्रेम निर्माण झाले असावे.

कारणं काहीही असली तरी आधी निष्कर्ष आणि मग पुरावे अशा पद्धतीने हे लिखाण झालेले आहे. जोतिरावांचे कार्य महान आहे. ते महात्मा आहेतच. पण त्यामुळे त्यांनी सांगितलेली, लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के बरोबर असलीच पाहिजे असे नाही. चुकून असेल, त्यावेळची गरज असेल किंवा काहीही या महात्म्याकडून दुहीचे बी पेरले गेले. आणि आज त्या वृक्षाला फळं आली आहेत ही खेदाची बाब आहे. असो!

मुद्दा असा की इतिहास हे मत नसते, जे खरोखरीच झाले आहे तो इतिहास असतो. कधी सगळे पुरावे एकत्र मिळतात कधी सुटे सुटे. ते सगळे जोडून इतिहास सिद्ध होतो. त्यात कधी जुने सिद्धांत खोडले जातात तर कधी ते अधिक सिद्ध होतात.




दि. २६ जुलै २०१७

मैत्री आणि प्रेम

प्रेम एकतर्फी असू शकतं, मैत्री नाही. मैत्रीत सादाला प्रतिसाद देणं आवश्यक असतं. तसं नसतानादेखील जर मैत्री कायम असेल तर ती प्रेम, गरज किंवा स्वार्थ यात मोडते

#कुणीसं

दि. १ ऑगस्ट २०१७

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो

लहानपणी मला अरे अरे ज्ञाना झालासी पागल... असं चिडवायचे. मग मुद्दाम हा अभंग लक्ष देऊन ऐकला - 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले'. स्वतः कोण आहोत हे कळले की माणूस पावन होतो. मग या आशयाच्या अभंग, गाणी यांच्याकडे लक्ष जाऊ लागले ते अगदी 'होता है आदमी को अपना ग्यान, कहेलाए वो शक्तिमान' सुद्धा याच अर्थाने ऐकलं.
मग पुढे बायकोमुळे मोस्लॉचा त्रिकोण कळाला. त्यातील self actualization आणि 'तुझे तुज ध्यान कळो आले' यातील समानता कळू लागली ती डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकांमुळे.
त्यातच आधी वाचलेली काही पुस्तके परत वाचली गेली. त्यातील एक गोनीदांचे मृण्मयी. तिचा संघर्ष, कोकणात रमणं आणि शेवटी 'जे व्हायचे ते या झाडावेलींच्या साक्षीने होऊ दे' असं म्हणणं... हा सगळा तिचा 'स्व'च्या शोधाचा प्रवास वाटला. ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसि, अकुपार मधील नायकांचाही शोध हा 'स्व'चा शोध होता. त्यांचा संघर्ष सुंदर होता, तितकाच त्या त्या व्यक्तीला आतून उन्मळून टाकून पुन्हा उभा करणारा होता.
संतांचाही असा प्रवास अनेक अभंगांमधून दिसतो. ज्ञानेश्वरांची 'दिन तैसी रजनी' ही विरहिणी ही कदाचित पहिली पायरी, मग 'कानडा ओ विठ्ठलू' मधील पाया पडू गेले, तर पाऊल दिसत नाही. सामोरा की पाठमोरा ते कळत नाही. क्षेम (आलिंगन) देऊ गेले तर मी ची मी एकली हा अनुभव. हे सगळं त्यांच्यासाठी किती त्रासाचं असेल. पण या सोबत त्यांना जी जाणीव झाली ती एकत्वाची, अद्वैताची. मग यातून 'ध्यान कळो आले'. अद्वैतात परमेश्वर आणि भक्त हे एकरूप झाले म्हणतात पण ज्ञानेश्वरांनी त्याही पुढे 'तुझा तूचि देव, तुझा तूचि भाव' हे सांगितलंय आणि देवाच्या एकत्वासोबत भावाचेही एकत्व सांगितले.
हा प्रवास सगळ्याच संतांच्या वाट्याला आला असणार. त्याचे अत्यंत भिडणारे शब्दरूप तुकोबांनी उभे केले आहे.
'चुकलिया माये बाळ हुरुहुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी'. किती अनिवार इच्छा प्रकट केलीये. पुढे वृक्षवल्लींच्या सानिध्यात 'अपुलाची वाद आपणासी' झाला असेल. स्वतः कसे आहोत हेही अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले ते 'मन माझे चपळ, न राहे निश्चळ' या अभंगात. आणि अखेरीस 'आनंदाचे डोही आनंद तरंग'. पण या साखळीत कुठेतरी आपण हुकतोय असं वाटायचं. कारण स्व सापडतानाची जी वेदना असेल ती असलेला अभंग ऐकण्यात आला नव्हता (माझी कमतरता)
अशात एक चित्रपट पाहिला, वाय झेड. नाव ऐकून आधी बघितलाच नाही. नंतर सहज म्हणून पहिला आणि त्यात गजानन कुलकर्णी जो बदलत गेला ते भारी वाटलं. जेव्हा सगळं सोडून गजानन सुटतो तेव्हा backgroundला अभंग सुरू होतो
सावलीची आस ना, कोवळसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी
यात एक ओळ आली
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो
हे ऐकून ती साखळी पूर्ण झाली. स्वतःच स्वतःला व्यालो यापेक्षा कोणती वेदना मोठी असेल? आणि जन्मल्यावरच्या आनंदापेक्षा कोणता आनंद मोठा असेल? Just amazing!!!
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो


दि. २६ ऑगस्ट २०१७

अतरापी - पुस्तक परिचय

अतरापी: ध्रुव भट्टांच्या कल्पनाशक्तीतून आलेलं अजून एक अप्रतिम पुस्तक
आपण मराठीत ज्याला अत्राब म्हणतो तेच गुजराथी मध्ये अतरापी. शेतकरी मराठी बोलीत जित्राब आणि अत्राब हे शब्द येतात. शेतीसाठी उपयुक्त जनावरे म्हणजे जित्राब आणि उपयोगी नसलेले अत्राब. सरधोपट पाहिलं तर दोन कुत्र्यांची ही कथा. ते जन्मतात तिथपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. दोघे भाऊ स्वतंत्र आणि वेगवेगळ्या विचारांचे. एक, याचं नाव कौलेयक, शिकून सवरून साधक बनतो तर दुसरा, याचं नाव सारमेय, न शिकता, पण समजावून घेऊन मोक्षाप्रत जातो.
मालक आणि पृथा या दाम्पत्याकडे सद्भाविनी नावाची एक कुत्री असते तिला ही दोन मुले होतात. कौलेयक शिकवू ते शिकणारा, मोठं होऊन कुणीतरी थोर 'बनायचं' असं ध्येय असलेला बनतो तर सारमेय त्याच्या नैसर्गिक भावनांना अधिक प्रगल्भ करत सभोवताल समजावून घेत राहतो.
सारमेय घरातून पळून जातो आणि त्याला अनेक लोक भेटतात. त्यांच्यासोबत जीवनानुभव घेत तो मोठा होत जातो. यात त्याचे अनेक संवाद/प्रसंग निव्वळ अप्रतिम आहेत.
घरी पृथा व माळी, हे दोघेच त्याला काही शिकवायला जात नाहीत. फक्त भवताल समजून घेण्यासाठी मदत करतात.
घराबाहेर पडल्यावर प्रथम त्याला एक घरंदाज कुत्रा भेटतो. तो सारमेयला हाकलतो आणि हा माझा इलाखा आहे असं म्हणतो. त्यावर सारमेय म्हणतो, "जो सोडून बाहेर जाणं असुरक्षित वाटतं त्याला तुम्ही 'इलाखा' म्हणता. असंच ना?" सहजपणे आपल्याला comfort zone कसा असतो हे सांगतो.
एका नदीकिनाऱ्यावर 'नदी कुठे आहे?' हा प्रश्न नदीचं सतत प्रवाही असणं अधोरेखित करतो.
शकू नावाच्या एका छोट्या मुलीकडे काही दिवस राहतो. तिथे त्याचा सत्कार होणार असतो पण त्यात गुंतायचं नसल्याने तिथून निघतो. त्यावर शकू पृथाला सांगते की तो अजून 'बंधनाच्या भीतीपासून मुक्त' झालेला नाहीये. बंधनात न राहणे हे बंधनाच्या भीतीचे बंधन असू शकते!
एका महादेव मंदिराच्या पुजाऱ्याकडे तो काही दिवस राहतो. तिथे अकस्मात मंदिरात सुवर्णपात्रे प्रकट होतात तशीच ती चोरीलाही जातात. चोरी झाल्यावर पोलिसात रीतसर तक्रार होते. एका मुसलमानावर चोरीचा आरोप होतो, पोलीस त्याला घेऊन जातात, त्याचा कोठडीत मृत्यू होतो. तेव्हा सारमेय पुजाऱ्याला विचारतो, "एका सकाळी भांडी प्रकट झाली, एक सकाळी अदृश्य झाली. या दोन सकाळींमध्ये तुम्हाला तक्रार नोंदविण्याजोगा मोठा फरक कोणता वाटला?" आणि पुजारी ते मंदिर सोडून निघून जातो. सारमेय आपल्या प्रवासाला लागतो.
सारमेय एका श्रीमंत पण एकट्या माणसाकडे राहतो. त्याच्या मुलाचे आणि त्याचे काही वाद असतात. ते सारमेयामुळे मिटतात. तेव्हा मुलगा सारमेयाला म्हणतो, "मी शिकलो नाही, मला समजलं आहे. शिकण्यापेक्षा समजणं अधिक उचित आहे, हे मी मान्य करतो."
हे आणि असं बरंच काही या पुस्तकात आहे. ते वाचणे हे मी लिहून सांगण्यापेक्षा अधिक उचित आहे

प्रयत्नवादी - दैववादी

आयुष्यात "दुसरी संधी" असं काही नसतं. प्रयत्नवादी लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थिती स्वीकारतात, अथक परिश्रम करतात, त्यानंतर त्यांना जे मिळतं त्याला दैववादी लोक "दुसरी संधी" असं म्हणतात.

एका प्रयत्नवाद्याचे अपयश दुसऱ्या प्रयत्नवाद्यासाठी मार्गदर्शक ठरते तर दैववाद्यासाठी निराशाजनक

#कुणीसं

दि. २४ नोव्हेंबर २०१७

गंगाजमनी तहजीब

एक फुर्रोगामी मेसेज फिरतोय... त्याचे उत्तर
ताजमहाल कि तेजोमहाल हे माहित नसलेल्या लोकांसाठी ,
== ताज महाल की तेजोमहालय हे स्कॅनिंग आणि सगळे ताज मध्ये असलेले दरवाजे उघडून स्पष्ट होईल. ते काम संशोधकांचे आहे. मी त्यात पडणार नाही. आणि योगी आदित्यनाथ यांनी एक मुद्दा स्पष्ट केलाय तो म्हणजे ताज भारतीयांनी बांधला आहे. भारतीय वास्तुकलेचा (मुस्लिम प्रभाव असलेला) तो एक उत्तम नमुना आहे. एवढं कारण ताज ला आपलं मानण्यासाठी more than sufficient आहे.
पण त्याखाली शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात ते चुकीचे आहे. एका बाईच्या नवऱ्याला मारून तिच्याशी निकाह करायचा, तिला १७ वर्षांत १४ वेळा प्रसूती सहन करायला लावायची, त्यात १४व्या वेळी ती मरते, नंतर तिच्या बहिणीशी निकाह करायचा... यात मुमताज वर असलेलं प्रेम कुठे आहे? पण हे विचारणं इतिहास असला तरी सोयीचं नाही.
---
तक्रार , फिर्याद ,गुन्हा शब्द माहितेय का ? ह्या शब्दांचा वापर मराठीत सरकारी भाषेत सहजपणे केला जातो त्याच मूळ माहितेय का ? किंवा त्याचा मराठी प्रतिशब्द माहितेय का ?
== नाही माहीत. भाषा ही अन्य भाषांमधून नवे शब्द घेऊन समृद्ध होत असते. जी भाषा हे नाकारते ती मृत होते.
---
आंब्याच मूळ माहितेय का ?
गुलाबाच मूळ माहितेय का ?
== आंबा पूर्व भारत आणि म्यानमार
== गुलाब मेक्सिको आणि उत्तर आफ्रिका
याचा ताजशी काय संबंध आहे ते माहीत नाही. उगा प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून सांगितले
---
ज्या मुघल खानदानीच्या नावाने कडाकडा बोट मोडली जातात त्या अकबराच्या सेनापतीच नाव राजा मानसिंग होत हे माहितेय का ?
== माहितीये ना. म्हणून मानसिंगला आम्ही महाराणा म्हणत नाही तर केवळ प्रतापांना महाराणा म्हणतो. जे परकीय अकबराच्या विरोधात लढले होते.
---
अकबराच्या दरबारातली नवरत्न माहितेय का ? तानसेन माहितेय का ?
लहानपणी ज्याच्या गोष्टी वाचून मोठे झालोय तो बिरबल कुणाच्या पदरी काम करायचा माहितेय का ?
== अकबराच्या दरबारात होते. जेव्हा अकबराला लक्षात आले की आपण केवळ मुस्लिम म्हणून भारतात राज्य करू शकत नाही तेव्हा दीने इलाही ची सुरुवात त्याने केली. पहिल्या ६० वर्षातला अकबर आणि नंतरचा अकबर यात खूप अंतर आहे. पाहिले ६० वर्ष दडवून ठेवले जातात करण ते पुरोगाम्यांना सोयीचे नाहीत.
---
हळदीघाटी च्या लढाईत जेव्हा मानसिंग अकबराचा सेनापती होता तेव्हा राणा प्रतापाचा सेनापती कोण होता ?
हाकिम खान सुरी हा पश्तून लढवय्या राणा प्रतापाचा सेनापती होता हे माहितेय का ?
== So what?
---
हिंदू व्यापारी सुरक्षितपणे व्यापार करावेत आणि प्रवास करावेत म्हणून त्यांना संरक्षण देणारा आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावून, पाण्याची व्यवस्था करून सराया बांधणारा शेरशहा सुरी माहितेय का ?
== Good. पण हे केवळ हिंदू व्यापाऱ्यांसाठी नव्हतं तर सगळ्याच व्यापाऱ्यांसाठी होतं. आणि त्याच बरोबर केवळ हिंदूंवर औरंगजेबाने लावलेले जिझिया सारखे कर सुद्धा माहीत आहेत.
---
मुघलांच्या कबिल्यात सगळ्यात जास्त विवाहसंबंध करणाऱ्या राजपुतांचा इतिहास माहितेय का ?
== राजपुतांनी महाराणा प्रतापांनंतर मुघलांना विरोध केलाच नाही. त्यांनी मुघली पद्धत आत्मसात केली आणि विवाहसंबंध वाढवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलाही आदर बाळगण्याची गरज वाटत नाही.
---
खापरी नळाने खडकी गावाला आणि अहमदनगर शहराला पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणारा हबशी मलिक अंबर माहितेय का ?
शेतसारा , जमीन मोजणी ह्या प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून राज्यकारभार करणारा मलिक अंबर माहितेय का ?
== मलिक अंबर चांगला होता. त्याने शहाजी राजांना बरीच मदत केली होती. त्याचे अनुकरण नानासाहेब पेशव्यांनी करून कात्रज तलावातून पुण्यात पाणी व्यवस्था केली.
---
शिवाजी महाराजांना पराभूत करून तह करून आग्र्याला यायला लावणारा मिर्झा राजे जयसिंग माहितेय का ?
== माहीत आहे. पण मग शिवाजी महाराजांनी गंगा जमनी तहेजीब म्हणून औरंगजेबापुढे मान नाही झुकवली. परत येऊन २३ किल्ले परत घेतले आणि त्यापुढे पहिल्या बाजीरावाने दिल्लीला धडक दिली.
---
दिल्लीच्या बादशहाच्या बरोबर केलेल्या कराराच पालन करायला पानिपतावर प्राण देणारे सव्वा लाख मराठे माहितेय का ?
पानिपतावर खंडण्या भरून मराठा सरदारांची प्रेत ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारा सुजा माहितेय का ?
== याच सुजाला सदाशिवराव भाऊंनी अब्दाली बाहेरचा आहे आणि तू भारतीय आहे. त्यामुळे अब्दालीला मदत न करता तू आम्हला मदत अशी विनंती केली. पण नजीब खानाच्या नादी लागून सुजाने अब्दालीला केवळ मुस्लिम आहे म्हणून मदत केली आणि त्याचे सैन्य मराठ्यांच्या विरोधात लढलं, मराठ्यांना मारलं आणि मग अंत्यसंस्कार केले. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे.
---
१८५७ ला इंग्रजांच्या विरोधात लढलेली लढाई ज्याच्या नेतृत्वाखाली लढली तो बहादूरशहा माहितेय का ?
== कारण दिल्ली दरबाराशी झालेले करार मराठे १८५७ मध्ये पण पाळत होते. म्हणून दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी बहादूरशहाचे नेतृत्व पुढे ठेऊन सगळी तयारी केली.
---
आजही ग्रामीण महाराष्ट्रात गावच्या पिराला पहिली चादर आणि शेरणीचा मान हिंदू कुटुंबाला असतोय हे माहितेय का ?
== मुळात पीर ही संकल्पना मुस्लिम विरोधी आहे कारण ते प्रतीक पूजन आहे. पण काही सुफी संत आणि हिंदू संत यांनी तो केलेला एक ऐक्याचा प्रयत्न आहे. म्हणून कट्टर सुन्नी कधीही पिराला जात नाही. मुहर्रम मध्ये ताबूत नाचवत नाही. त्यामुळे प्रतीक पूजेला हिंदू असणं हे सामान्य आणि सहजमान्य आहे.
---
हि यादी लांबवत नेली तर पाच पन्नास नाही तर शेकडो पान कमी पडतील.
इतिहास कधीही सोयीचा नसतोय. इतिहासाची थडगी उकरायला गेल कि आपल्याला सोयीचे असणारे सांगाडे जसे सापडतात तसेच गैरसोयीचे सांगाडे हातात हात घालून उकरून वर येतात.
== Exactly. म्हणूनच
१. शिवाजी महाराजांनी मंदिर पाडून उभी केलेली मशीद जमीनदोस्त केली व पुन्हा मंदिर उभारले हे सांगितले जात नाही
२. हैदर अलीला नानासाहेब, माधवराव पेशव्यांनी किती वेळा हरवले हे सांगितले जात नाही
३. टिपू सुलतान किती क्रूर होता आणि त्याने हिंदूंना संपवण्याचे काय प्रयत्न केले हे समोर येत नाही. समोर येते ते त्याने आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांना विरोध केला ते, आणि त्यालाच भारतमातेसाठीचे स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते.
४. पण टिपूच्या न्यायाने दुसऱ्या बाजीरावाने त्र्यंबक डेंगळे यांच्यासोबत इंग्रजांना दिलेली लढत दाखवली जात नाही. इथे इंग्रजी सैन्याच्या महार रेजिमेंटचा पेशव्यांवरील विजय आजही साजरा होतो.
५. औरंगजेबाने काशीचे मंदिर पाडले आणि तिथे ज्ञानवापी मशीद बांधली ये ऐतिहासिक सत्य बोलायचेही नसते
६. संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना हाल हाल करून मारले हे कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात नसतं. आपल्याकडील काही मुस्लिम अजूनही औरंगजेबाला सुफी संत म्हणतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही.
हे आणि असे अनेक सांगाडे गंगा जमनी तेहजीब म्हणून गाडलेले आहेत आणि ते खरे इतिहास जाणणारे, संघ आणि हिंदुत्ववादी लोक उकरून काढत आहेत. यात सोयीचे सांगाडे असावेत म्हणून हा उद्योग सुरू नाहीये तर खरा इतिहास लोकांना माहीत असावा म्हणून सुरू आहे.
------
हि गंगा जमनी तेहजीब भारताची खरी संस्कृती आहे.
हे धागे एवढे घट्ट विणलेले आहेत कि जे उसवायला गेलात तर तुमची बोटच काय तुम्हीही उखडून पडाल.
== वर दिल्याप्रमाणे खरा इतिहास जेव्हा जनतेसमोर येईल तेव्हा जनताच खोटा इतिहास पसरवणाऱ्यांची बोटं उखडायची की त्यांना आख्खं उखडायचं ते ठरवेल. एखाद्या गोष्टीची शांतपणे वाट पाहणे यात संघवाल्यांपेक्षा अजून केवळ शास्त्रज्ञच पुढे आहेत. त्यामुळे वाट बघू.

दि. ३१ ऑक्टोबर २०१७

'ए'ग्रेडी आणि 'बी'ग्रेडी



जेव्हा सगळे भारतीय नि:संदिग्धपणे A गट निवडतील तो दिवस सोन्याचा


दि. २२ नोव्हेंबर २०१७

मराठी/हिंदू/भारतीय कालगणनेची थोडी माहिती

१. महिन्यांची नावे - आपल्या महिन्यांची नावे नक्षत्रांवरून दिलेली आहेत. जेव्हा चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात (किंवा जवळ) असतो त्या नक्षत्राच्या नावावरून महिन्याचे नाव असते.
उदा: चित्रा - चैत्र, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ, मृग - मार्गशीर्ष
२. अधिक मास - आपले महिने हे चंद्रकलेवर अवलंबून असतात. सौर आणि चांद्र मासात साधारण ०.९ दिवसाचे अंतर एका महिन्यात पडते. त्यामुळे दर ३ वर्षांनी हे अंतर match करण्यासाठी अधिक मास असतो. अधिक मास केवळ पहिल्या सात महिन्यातच असतो, म्हणजे चैत्र ते अश्विन हे महिने अधिक मास म्हणून येतात त्यापुढील नाही.
हिजरी कालगणना (मो. पैगंबरांनी जेव्हा मक्केतून मदिनेत पलायन - हिजरात केलं त्या दिवसापासूनची कालगणना) ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पण त्यात अधिक मास नसतो. म्हणून दर ३ वर्षांनी एकत्र येणारे हिंदू व मुस्लिम सण बदलतात. मात्र चिनी कालगणना चांद्र असूनही त्यात अधिक मासासारखी व्यवस्था असल्याने ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते पुन्हा जुळते.
३. तिथी निश्चिती - आपले काही सण हे चंद्र उगवताना त्याची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात तर काही सूर्य उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात. जसे संकष्टी चतुर्थी ही चंद्र उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे सकाळी तृतीया आणि त्याच दिवशी संकष्टी असं बऱ्याचदा होतं. कोजागिरी पौर्णिमा ही रात्री चंद्राची कला कोणती आहे यावर अवलंबून असते तर ज्येष्ठ पुत्र/पुत्रीला ओवळण्याची अश्विन पौर्णिमा ही सकाळी कोणती चंद्रकला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे आपण दूध एका रात्री पितो तर ओवाळण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होतो.
४. तिथी क्षय - काही वेळा एका तिथी नंतर एक skip करून त्या पुढची तिथी येते. त्याला तिथी क्षय म्हणतात. सूर्य उगवताना चंद्राची कला जी असेल ती त्या दिवशीची तिथी असते. पृथ्वीची परिवलन गती आणि चंद्राची परिभ्रमण गती वेगवेगळी असल्याने हे होते.
उदा: द्वितीयेनंतर चतुर्थी आली. या वेळी द्वितीया ही अगदीच सूर्य उगवण्याच्या नंतर संपली, तृतीया सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधी संपली आणि सूर्योदयाला चतुर्थी लागलेली होती. या उदाहरणात तृतीयेचा क्षय झाला.
५. सौर सण - भारतीय सणांमध्ये एकमेव संक्रांत हा सण आहे जो सौर स्थितीवर अवलंबून असतो. संक्रांत ही १४ जानेवारीला येत नाही तर ती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते. शिवकाळात संक्रांत १२ जानेवारीला यायची. आता १४ किंवा १५ जानेवारीला येते. याचे कारण गेल्या ३०० वर्षात पृथ्वीच्या गतीत झालेला बदल हे आहे. लोकमान्यांच्या अभ्यासानुसार मकर संक्रांत महाभारत काळात नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये येत असे.
दैनंदिन व्यावहारिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

दि. १ जानेवारी २०१८