Tuesday, March 20, 2018

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो

लहानपणी मला अरे अरे ज्ञाना झालासी पागल... असं चिडवायचे. मग मुद्दाम हा अभंग लक्ष देऊन ऐकला - 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले'. स्वतः कोण आहोत हे कळले की माणूस पावन होतो. मग या आशयाच्या अभंग, गाणी यांच्याकडे लक्ष जाऊ लागले ते अगदी 'होता है आदमी को अपना ग्यान, कहेलाए वो शक्तिमान' सुद्धा याच अर्थाने ऐकलं.
मग पुढे बायकोमुळे मोस्लॉचा त्रिकोण कळाला. त्यातील self actualization आणि 'तुझे तुज ध्यान कळो आले' यातील समानता कळू लागली ती डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकांमुळे.
त्यातच आधी वाचलेली काही पुस्तके परत वाचली गेली. त्यातील एक गोनीदांचे मृण्मयी. तिचा संघर्ष, कोकणात रमणं आणि शेवटी 'जे व्हायचे ते या झाडावेलींच्या साक्षीने होऊ दे' असं म्हणणं... हा सगळा तिचा 'स्व'च्या शोधाचा प्रवास वाटला. ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसि, अकुपार मधील नायकांचाही शोध हा 'स्व'चा शोध होता. त्यांचा संघर्ष सुंदर होता, तितकाच त्या त्या व्यक्तीला आतून उन्मळून टाकून पुन्हा उभा करणारा होता.
संतांचाही असा प्रवास अनेक अभंगांमधून दिसतो. ज्ञानेश्वरांची 'दिन तैसी रजनी' ही विरहिणी ही कदाचित पहिली पायरी, मग 'कानडा ओ विठ्ठलू' मधील पाया पडू गेले, तर पाऊल दिसत नाही. सामोरा की पाठमोरा ते कळत नाही. क्षेम (आलिंगन) देऊ गेले तर मी ची मी एकली हा अनुभव. हे सगळं त्यांच्यासाठी किती त्रासाचं असेल. पण या सोबत त्यांना जी जाणीव झाली ती एकत्वाची, अद्वैताची. मग यातून 'ध्यान कळो आले'. अद्वैतात परमेश्वर आणि भक्त हे एकरूप झाले म्हणतात पण ज्ञानेश्वरांनी त्याही पुढे 'तुझा तूचि देव, तुझा तूचि भाव' हे सांगितलंय आणि देवाच्या एकत्वासोबत भावाचेही एकत्व सांगितले.
हा प्रवास सगळ्याच संतांच्या वाट्याला आला असणार. त्याचे अत्यंत भिडणारे शब्दरूप तुकोबांनी उभे केले आहे.
'चुकलिया माये बाळ हुरुहुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी'. किती अनिवार इच्छा प्रकट केलीये. पुढे वृक्षवल्लींच्या सानिध्यात 'अपुलाची वाद आपणासी' झाला असेल. स्वतः कसे आहोत हेही अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले ते 'मन माझे चपळ, न राहे निश्चळ' या अभंगात. आणि अखेरीस 'आनंदाचे डोही आनंद तरंग'. पण या साखळीत कुठेतरी आपण हुकतोय असं वाटायचं. कारण स्व सापडतानाची जी वेदना असेल ती असलेला अभंग ऐकण्यात आला नव्हता (माझी कमतरता)
अशात एक चित्रपट पाहिला, वाय झेड. नाव ऐकून आधी बघितलाच नाही. नंतर सहज म्हणून पहिला आणि त्यात गजानन कुलकर्णी जो बदलत गेला ते भारी वाटलं. जेव्हा सगळं सोडून गजानन सुटतो तेव्हा backgroundला अभंग सुरू होतो
सावलीची आस ना, कोवळसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी
यात एक ओळ आली
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो
हे ऐकून ती साखळी पूर्ण झाली. स्वतःच स्वतःला व्यालो यापेक्षा कोणती वेदना मोठी असेल? आणि जन्मल्यावरच्या आनंदापेक्षा कोणता आनंद मोठा असेल? Just amazing!!!
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो


दि. २६ ऑगस्ट २०१७

4 comments:

  1. तुमच्या स्वशोधाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🌷

    ReplyDelete
  2. वाय झेड चित्रपटातून काय शिकले पाहिजे?

    ReplyDelete