Tuesday, March 20, 2018

राज्जुभैय्यांची आठवण

आमच्या वर्गात एक चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. आम्ही दहावीला असताना शाळेत एकदा त्यावेळी मा. सरकार्यवाह असलेले रज्जूभैय्या आले होते. बहुदा डिसें'९३ किंवा जाने'९४ असावा. मग चुणचुणीत मुलगा त्यांना भेटला आणि त्याने त्यांची सही घेतली. तेव्हा ते व्यस्त असल्याने मला काही सही मिळाली नाही. पण मी एक शाखेचा गणशिक्षक होतो त्यामुळे त्याच दिवशी निवासी वर्गात माझी रज्जूभैयांशी भेट होणार होती. वर्ग सुरू झाला. मी भोजनानंतर त्यांच्याकडे गेलो आणि मला सही द्या अशी विनंती केली. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, "कभी कोई अपने नानाजी या दादाजी की स्वाक्षरी लेता है भला"
या वाक्यांनी खूप छान वाटलं, पण एक हुरहूर लागून राहिलीच की आपल्याकडे सही नाही. मार्च'९४ मध्ये रज्जूभैय्या प. पू. सरसंघचालक झाले आणि चुणचुणीत मुलाने मला जरा चिडवलेच...
पुढे २ वर्षांनी १२वीची परीक्षा झाल्यावर ३ एप्रिल ९६ ला रज्जूभैयांच्या हस्ते रायगडावर रोप वे चे उद्घाटन होणार होते. आमच्या शहरातील आमच्यासारख्या माकडांचा एक वानरयुथमुख्य होता रवींद्र पूर्णपात्रे. तो घरी आला आणि माझ्या आई वडिलांची या सहलीला जाण्याची परवानगी मिळाली. तेव्हाची अशा सहलींसाठी बेष्ट गाडी म्हणजे ट्रॅक्स. आम्ही ९ स्वयंसेवक आणि एक चालक असे निघालो.
जाताना दुपारी शिवथरघळ येथे गेलो. समर्थांचं दर्शन घेतलं. संध्याकाळपर्यंत थांबून साधारण ७ च्या सुमारास तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती. त्यामुळे वाटेवर लख्ख चंद्रप्रकाश. झाडं अक्षरशः चांदणं पीत आहेत असं वाटत होतं. वळणं घेत गाडी रायगडाकडे निघाली. रात्री १० ला आम्ही पाचाडला पोहोचलो. एका घरी जेवण व निवासाची सोया झाली. भरपेट खाऊन झोपलो.
पहाटे ३:३० ला रवीच्या हाका सुरू झाल्या. आणि त्याने आम्हाला सर्वांना ४ ला गडाच्या वाटेवर आणलं. मग सर्वांचाच उत्साह वाढला. संघाच्या कोणत्याही शिबिरात सकाळी एकात्मता स्तोत्राने सुरुवात होते. मग "ॐ नम: सच्चिदानंद..." ची सुरुवात झाली आणि रवी सोबत मी आणि मागून सर्व असं स्तोत्र म्हणत आम्ही गड चढायला लागलो.
हनुमान जयंती असल्याने पूर्णाकृती चंद्र पश्चिमेला होता आणि रायगडाची चढण सगळी पश्चिमेकडून असल्याने आम्हाला सहजच रस्ता दाखवत होता. आमची वानरसेना पटापट गड चढली आणि पहाटेच्या प्रकाशात गडावरील बाजारापर्यंत आम्ही पोहोचलो. जर लगेच समाधीच्या मागच्या बाजूला गेलो तर सूर्योदय दिसेल याची खात्री असल्याने धावत तिकडे पोहोचलो.
जोर-बैठका आणि तळ्यात पोहून झाले तोवर सूर्यनारायणाने दर्शन द्यायला सुरुवात केली होती. भव्य सह्यकडे, तिथून दिसणारे किल्ले, त्यामागे सृष्टीला जागा करणारा भगवंत आणि गडावरील भारावलेलं वातावरण. आम्ही नि:शब्द होऊन तसेच उभे राहिलो.
मग जाणीवेच्या पातळीवर आल्यावर पहिली जाणीव झाली ती भुकेची. तिथल्या हॉटेलात, "प्लेटचे भाव नाही किलोचे सांगा भाऊ", असं सांगत किलोंनी पोहे खाल्ले. गड फिरलो. आणि कार्यक्रमाच्या जागी येऊन पोहोचलो.
तेवढ्यात कळाले की रज्जूभैय्या अतिथीकक्षात आलेले आहेत. सुरक्षरक्षकाला विनंती करून मी आत गेलो. त्यांना नमस्कार करून परिचय सांगितला. "स्वाक्षरी मांगने वाले तुम ही थे ना?", रज्जूभैय्यांचा प्रश्न! मी अवाक झालो, हो सांगितलं. फोटो काढू का विचारलं आणि त्यांनी हसून होकार दिला. मी फोटो काढून पुन्हा नमस्कार करून बाहेर पडलो.
मग उद्घाटन झालं. एक वारकरी महाराज आले होते. त्यांनी सांगितलं की, शिक्षणासाठी वार लावून जेवणारे, वारीला जाणारे आणि शत्रूवर वार करणारे हे सगळेच वारकरी. एक ज्ञानासाठी, एक देवासाठी आणि एक राष्ट्रासाठी! हे सगळेच वारकरी थोर काम करत असतात.
रज्जूभैया भाषणाला उभे राहिले. "आज रोप वे का उद्घाटन है। हिंदी में रोप वे को रज्जूमार्ग कहेते हैं। ये रज्जूमार्ग खाई एवं शिखर को जोडता हैं। संयोग से मेरा नाम भी रज्जू है। संघ का स्वयंसेवक हूं, और संघ का भी यही काम है की खाई और शिखर जोडनां।" अगदी सहजतेने त्यांनी संघकामाचे फलित सांगितले, कितीही अंतर असते तरी समाज जोडणे.
कार्यक्रम संपला, अन्य जिल्ह्यातील स्वयंसेवकांना भेटून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
डोक्यात विचार घुमत होते...
एका सामान्य स्वयंसेवकाच्या घरातील दादाजी किंवा नानाजी होणं, तो स्वयंसेवक 2 वर्षांनी लक्षात राहणं आणि Physics Gold Medalist राजेंद्र सिंह यांचा रज्जू होणं... सगळंच विलक्षण!!!



दि. ३१ मे २०१७

No comments:

Post a Comment