Tuesday, October 8, 2019

सहज संवाद

श्यामचे वडील घरी येतात. आई पाट मांडते आणि सगळे जेवायला बसतात. आज आई भाजीत मीठ टाकायला विसरते. वडील काहीच न बोलता सगळं जेवण करतात. वडील तसंच खातात म्हटल्यावर मुलंही काहीच न बोलता जेवण करतात. सर्वांची जेवणं झाल्यावर जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे लक्षात येतं. मग तीही बिना मिठाची भाजी खाते...

ही गोष्ट लहानपणी "श्यामची आई" पुस्तकात वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला होता की, भाजीत मीठ नाहीये हे सांगायला श्यामच्या वडिलांना अडचण काय होती. सर्वांच्या ताटात एक एक चिमूट मीठ पडलं असतं आणि सर्वांना सहज चवीचं खायला मिळालं असतं. पण एकूणच यात अनावश्यक त्यागाचे उदात्तीकरण केलंय.

याचे आईवर होणारे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचारच केलेला नाहीये. जर आई निगरगट्ट असेल तर काही अडचण नाही. पण ती तशी नाहीये कारण तिनेसुद्धा भाजी बिना मिठाची खाल्ली. आपण जर चूक केली तर तिची शिक्षा असणार नाही पण कुणी काही न बोलता ते सहन करेल आणि चूक सुधारायला आपल्याला जागाच नसेल ही भावना किती भयंकर आहे. मी आपल्या घरात आपल्याच माणसात एक छोटीही चूक करू शकत नाही हे दडपण तिच्यावर पुढे जन्मभर असेल.

आपल्या माणसांत असताना आपण सहज असलो पाहिजे. आपल्यावर "माझ्याकडून एखादी चूक तर होत नाहीये ना" याचं दडपण असू नये. यासाठी सर्वांनी सहज संवाद ठेवला पाहिजे. कुणी एखादी छोटी-मोठी चूक केली तर त्यावर सोपा उपाय शोधला पाहिजे. न बोलता सहन करणंही नको आणि फाडफाड बोलून शिक्षा करणंही नको.

आजच्या दसऱ्याला अबोलतेकडून सहज संवादाकडे आपल्या सर्वांचे सीमोल्लंघन व्हावे या शुभेच्छा!!!

No comments:

Post a Comment