१७६०च्या अखेरीस दक्षिण भारतात एक विचित्र आणि निर्णायक घडामोड आकार घेत होती. मैसूरच्या सत्तेवर प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची हैदर अलीची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस उघड होत होती. दरबारातील राजकारण आणि हैदरची वाढती सत्ता यामुळे मैसूरचे राजे, त्यांची आई आणि खंडेराव हे पूर्णपणे असहाय्य झाले होते. अखेर त्यांनी मराठ्यांकडे धाव घेतली. दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव प्रचंड होता आणि पेशव्यांच्या सरदारांकडे हैदरला रोखण्याची ताकदही होती. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांकडे मदतीची विनंती केली.
पेशव्यांच्या दरबारातून विसाजी पंत बिनीवाले, मुरारराव घोरपडे आणि इतर सरदारांची एक सक्षम मोहीम दक्षिणेकडे निघाली. या मोहिमेचा वेग, शिस्त आणि रणनीती इतकी प्रभावी होती की काही दिवसांतच हैदर अली अक्षरशः एका जागी कोंडला गेला. त्याच्या हालचालींवर पूर्ण बंदी आली. त्याच्याकडे सैन्य होते, पण त्याला वापरण्याची संधीच मिळत नव्हती. मराठ्यांच्या वेढ्यातून सुटण्याचा मार्गच उरला नव्हता. परिस्थिती अशी होती की जास्तीत जास्त एक महिना हैदर टिकू शकला असता. त्यानंतर त्याचा पराभव निश्चित होता.
पण इतिहासाला कधी कोणाची प्रतीक्षा नसते. दक्षिणेत मराठ्यांनी विजयाची दारे उघडली असतानाच, उत्तरेत एक प्रचंड वादळ उठले होते ते अहमदशहा अब्दालीचे. अब्दालीच्या आक्रमणाने संपूर्ण हिंदुस्थान हादरले. त्याचा सामना करण्यासाठी मराठ्यांची सर्वात बलाढ्य सेना उत्तर दिशेला निघाली. भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे… मराठ्यांच्या सामर्थ्याचे हे सर्व आधारस्तंभ उत्तरेत गेले. दक्षिणेतील मोहीम यशाच्या उंबरठ्यावर असताना, उत्तरेतील संकटाने संपूर्ण समीकरण बदलले.
आणि मग उजाडला इतिहासाला मोठी कलाटणी दिवस १४ जानेवारी १७६१. मराठा साम्राज्यावरील संक्रांत. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा दाखवली, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच पान लिहिले होते.
दो मोती गिरे, दस-बीस अशरफ़ी गंवाई, पैसे का तो कोई हिसाब ही नहीं...
भाऊसाहेब, विश्वासराव, समशेर बहाद्दूर असे अनेक थोर योद्धे त्या दिवशी रणांगणावर कोसळले. पराभव हा शब्द त्या दिवशी किती मोठा असू शकतो, याची जाणीव संपूर्ण देशाला झाली.
या भीषण बातमीने नानासाहेब पेशवे हादरून गेले. त्यांनी तातडीने सर्व मराठा सैन्यांना परतण्याचा आदेश दिला. दक्षिणेकडील मोहीमही त्याला अपवाद नव्हती. बिनीवाले आणि इतर सरदारांना हैदरवरील अंतिम टप्प्यातील कारवाई सोडून परत फिरावे लागले. पराजयाच्या दारात उभा असलेला हैदर अली अचानक मुक्त झाला. मराठ्यांच्या परतीने त्याचा जीव वाचला.
हैदर अलीने या संधीचा फायदा घेतला. खंडेरावला त्याने उघड्या तुरुंगात मरण येईपर्यंत खितपत ठेवले. मैसूरच्या वडियार राजाचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. प्रत्यक्ष राजा नसला तरी सत्तेचा संपूर्ण ताबा त्याच्याकडे गेला. पुढे त्याचा मुलगा टिपू सुलतानही याच सत्तेच्या वारशातून पुढे आला. दक्षिण भारताच्या राजकारणात हैदर आणि टिपू यांनी निर्माण केलेली सत्ता, संघर्ष आणि दडपशाही यांची बीजे याच काळात रोवली गेली.
पानिपतची लढाई ही केवळ उत्तर भारतातील पराभव नव्हती. तिचा परिणाम संपूर्ण देशभर उमटला. मराठेशाही काही वर्षे मागे ढकलली गेलीच, पण त्याचबरोबर दक्षिणेत एक हिंदू राज्यही अप्रत्यक्षपणे संपुष्टात आले. जर पानिपतचा पराभव झाला नसता, तर हैदर अलीचा अंत निश्चित होता. मैसूरच्या राजघराण्याला पुन्हा सत्ता मिळाली असती. दक्षिणेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी असती. पण इतिहासाने वेगळा मार्ग निवडला.
या एका लढाईने मराठ्यांच्या सामर्थ्याला तात्पुरती खीळ बसवली, पण त्याहून मोठा परिणाम म्हणजे हैदर अली आणि पुढे टिपू सुलतान यांना मिळालेली संधी. मराठ्यांच्या परतीने वाचलेला हैदर पुढे दक्षिणेतील सर्वात प्रभावी आणि आक्रमक शासकांपैकी एक बनला. आणि हे सर्व घडले एका अशा क्षणी, जेव्हा मराठे विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होते.
इतिहासातील या घटना वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कधी कधी एका रणांगणावरील पराभवाचा परिणाम हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या राजकारणावर होतो. पानिपतच्या संक्रांतीने उत्तर भारतात मराठ्यांचे काही काळ सामर्थ्य कमी केलेच, पण दक्षिणेतही एका हिंदू राज्याचा अंत घडवून आणला.
संदर्भ - Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum (1760–1799) by Vikram Sampath

No comments:
Post a Comment