Thursday, March 20, 2025

शिवाजी महाराजांचे मोठेपण

शिवाजी महाराजांचे मोठेपण दिसावे म्हणून औरंग्याचं थडगं असलं पाहिजे असं लॉजिक बरेच जण मांडत आहेत. यात हिंदुत्ववादीही आहेत. मुळात महाराज कळण्यासाठी कोण्या खलनायकाची आवश्यकता नाहीच. कुणाच्या रेषेशी महाराजांची रेष ताडून मग महाराज मोठे आहेत हे दाखवण्याची काही एक गरज नाही. On the absolute terms सुद्धा महाराज महान आहेत.

केवळ त्यांचे लोकोपयोगी कामे बघितली तरी हे सहज लक्षात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले राज्य हे स्वराज्य, न्यायप्रिय राज्य आणि लोकहितवादी प्रशासनाचा उत्तम नमुना होते. त्यांचे लोकोपयोगी कार्य समकालीन संदर्भांवर आधारित बघूया.

न्यायव्यवस्था: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेस प्राधान्य होते. त्यांचे प्रशासन अन्यायाविरुद्ध कठोर आणि पारदर्शक होते. "जेधे शकावली" आणि "शिवभारत" यांमध्ये उल्लेख आहे की महाराजांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाड्यासाठी पंचायत प्रथा सुरू केली. त्यांनी हक्कांचे रक्षण करताना निष्पक्षता कायम ठेवली, यामुळे रयतेला नवा विश्वास व आधार मिळाला.

शेती व सिंचनव्यवस्था: महाराजांनी शेती आणि सिंचनाच्या सुधारणांवर भर दिला. "बुधभूषण" या ग्रंथात शेतीसाठी तयार केलेल्या कालव्यांचा उल्लेख आहे. त्यांनी पाण्याच्या व्यवस्थित व्यवस्थापनासाठी तलाव बांधले व जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले. जमिनीचा उपयोग योग्य प्रकारे व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी जमिनीच्या मोजणीची प्रथा सुरू केली. त्यामुळे शेती उत्पादन वृद्धिंगत होऊन लोकांचे जीवनमान सुधारले.

व्यापाराला प्रोत्साहन: महाराजांनी अंतर्गत आणि परदेशी व्यापाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आरमारी ताफ्याने समुद्रमार्गे व्यापाराच्या संधी निर्माण केल्या. "शिवभारत" ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी व्यापारी बांधवांना संरक्षण दिले आणि व्यापाराच्या अडचणी दूर केल्या. त्यांनी कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून व्यापारी दृष्टिकोनातून राज्याची आर्थिक ताकद वाढवली.

कर नाही तर लोकवर्गणी: "जेधे शकावली" मध्ये असाही उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत लोकवर्गणी महत्त्वाची होती. लोकांना कररूपी बोजा न लादता गरजेनुसार वर्गणी मागितली जायची. यातून उभारलेले सगळे संपत्ती व संसाधने लोकांसाठी वापरण्यात आली. यामुळे प्रजेचा शासनावर विश्वास वाढला.

सुरक्षेचे मजबूत जाळे: महाराजांनी गडकोटांच्या माध्यमातून फक्त संरक्षण नव्हे, तर गावांमधील लोकांना आसरा आणि मदत पुरवली. "शिवभारत" ग्रंथात उल्लेख आहे की त्यांच्या गडांच्या योजनांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नसाठा आणि संकटसमयी संरक्षक उपायांची सोय असायची. गडांवरील प्रबळ व्यवस्थापनामुळे प्रजेचा सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

सांस्कृतिक / धार्मिक वारसा: शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवत ते कायम जपले. "बुधभूषण" मध्ये नमूद आहे की त्यांनी देवस्थानांची काळजी घेतली आणि मुस्लिम वा ख्रिश्चन लोकांकडून होणारे मंदिरांचे विध्वंस थांबले.

केवळ हे कार्य बघितलं तरी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजा कल्याणाच्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला होईल. त्यासाठी कुण्या औरंगजेब वा अफझलखानासोबत तुलना करण्याची गरजच नाहीये.

आपण आता मध्ययुगीन व्यवस्थेत नाही. पण औरंगजेबाला मानणारे अजूनही त्याच मध्ययुगीन मानसिक अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ "कबर नको" एवढं म्हटलं की थेट संघाच्या मुख्यालयाच्या जवळ सुनियोजित हल्ला केला.

म्हणूनच उत्तर आवश्यक आहे आणि तेही आजच्या कायद्यात. त्यामुळे अफझलखानाचं थडगं ज्याप्रमाणे वनकायद्याने हटवलं त्याचप्रमाणे औरंगजेबाचं थडगं ASI च्या कायद्यात घालून मूळ अवस्थेत तरी नेऊन ठेवलं पाहिजे.

- ज्ञानेश

Tuesday, March 18, 2025

चंद्रहार आणि पीटर व फास्टर फेणे

"आसब्लीफ" vfs च्या बेल्जियम खिडकीतून डॉक्युमेंट्स देताना बनेश उर्फ फास्टर फेणे म्हणाला.

"अरे, खिडकी बेल्जियमची असली तरी हे ऑफिस पुण्यातच आहे!" तो कागदांचा गठ्ठा आपल्या ताब्यात घेत तेथील ऑफिसर म्हणाली.

"ट्टॉक!"

"हा! आता बरं वाटलं बघ"

तर झालं असं की बन्याच्या मामाला बेल्जियममध्ये वर्षभर जायला मिळणार होतं. प्रवास दिवाळीच्या आधीच होता. मालीची सहामाही परीक्षा व्हायची असल्याने माली आणि बन्याने परीक्षा संपल्यावर जायचं असं ठरलं होतं. मग दिवाळी ते नाताळ तिकडेच राहायचं. नाताळच्या सुट्या संपायच्या आत परत यायचं.

यामुळे बन्या आणि माली मामासोबत vfs पुणे ऑफिसात आलेले होते.

"मामा, आपण अर्ध्या वाटेत जातोय. अर्ध्या वाटेत त्याला बोलावू या का?" बन्या म्हणाला.

(वाचा "सिक्रेट सेव्हनच्या सूरपारंब्या आणि फास्टर फेणे")

"पीटर!", माली उद्गारली, "मलाही त्याला आणि जेनेटला भेटायचंय"

"चालेल, तू कळव त्याला" मामाने अनुमती दिली.

घरी पोहोचल्यावर लगेचच बन्याने पीटरला इमेल लिहिला. रात्री उशिरापर्यंत प्लॅन फायनल झालासुद्धा. फक्त जेनेटला यायला जमणार नव्हतं. पीटरसुद्धा नाताळच्या काही दिवस आधी येणार होता आणि नंतर दोन आठवडे राहणार होता.

मामा आणि मामीचा व्हिसा आल्यावर ते दोघे निघाले. पाठोपाठ तीन आठवड्यांनी माली आणि बन्याही. मामाला बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपासून ३५ किमी अंतरावरील मेकेलीन नावाच्या छोट्या टुमदार गावात काम मिळालं होतं. मेकेलीन कधीकाळी राजधानी राहिलेलं गाव. गावाभोवती तटबंदी. गावातून छोटी दैलं नावाची नदीही गेलेली. त्या नदीच्या पुराने गावाला त्रास होऊ नये म्हणून नदीला एक छानसा बायपाससुद्धा दिलेला होता. या नदीचा पुढच्या मोठ्या नदीसोबत संगम आहे. त्या संगमापासून ब्रुसेल्सकडे एक कालवा काढलेला आहे. त्याच कालव्याच्या काठावर मामाचं घर होतं.

आता थंडी सुरू झाली होती. पण एखादा दिवस मस्त ऊन पडायचं. मामाने बन्या आणि मालीला छान गियरच्या सायकली घेऊन दिल्या. बाहेर ऊन असलं की नदीच्या किंवा कालव्याच्या काठाने भटकणे हा यांचा उद्योग. शिवाय जवळच मोठं पार्क होतं. त्यामुळे भटकंती आणि भटकंती चालू होती.

मामा आणि मामीला तिथे एक मावशी भेटली. म्हणजे ती होती बेल्जियन पण यांची एवढी छान मैत्री झाली की दोघे तिला मावशीच म्हणू लागले. तिचं घर दैलं नदीच्या वरच्या अंगाला रैमनम नावाच्या गावात होतं. एकदा सगळे बसने तिच्या घरी जाऊन आहे. मग तिने नकाशावर सायकलने येण्याचा नदीकाठचा रस्ता दाखवला. तो वळणावळणाचा रस्ता पाहून बन्या फार खुश झाला.

नाताळाच्या आधी आठवडाभर पीटर पोहोचला. आता तिघांची भटकंती सुरू झाली. मामाच्या मित्राने त्यांना एक सायकल काही दिवसांसाठी दिली. तिघे नदीच्या काठाने बऱ्याचदा रैमनम पर्यंत जाऊन आले. आता बन्या, माली आणि पीटरला मेकेलीनच्या २० किमी परिघातले सगळे सायकलचे रस्ते पाठ झाले होते.

मेकेलीनमध्ये एक भलं मोठं कॅथेड्रल आहे. म्हणजे चर्चच, पण खूप मोठं असलेलं. त्यांच्या राजाला त्या चर्चवरून म्हणे चंद्रावर जायचं होतं. त्यामुळे मोठा पाया घेऊन बांधत गेले. शेवटी साडेपाचशे पायऱ्या झाल्यावर राजाने नाद सोडला. त्यामुळे शिखर पूर्ण नसलेलं हे सेंट रॅम्बोस कॅथेड्रल आहे. पण राजाच्या वेडामुळे चंद्र आणि या कॅथेड्रलचा संबंध आला तो अजूनही टिकून आहे.

नाताळच्या एक दिवस आधी, म्हणजे ख्रिसमस इव्हला, कॅथेड्रलमध्ये मोठ्ठा चंद्र लावणार होते. त्याचं वैशिष्ट्य असं की अगदी खऱ्या चंद्रासारखे त्यावर खड्डे, डोंगर असं सगळं असणार होतं. जणूकाही चंद्राचं छोटं रूपच. आणि त्या चंद्राच्या बरोब्बर खाली हिऱ्यांनी सजवलेला चंद्रहार!

हे बघायला अख्खा गाव तिथे पोहोचला. चंद्रामुळे चंद्रहार चमकतोय की चंद्रहारामुळे वरील चंद्र हे कळू नये इतकी ती रचना सुरेख होती. कॅथेड्रलच्या मागच्या गल्लीत सायकली लावून बन्या, पीटर आणि माली कॅथेड्रलमध्ये आले. रात्र झालेली होती. बाहेर थंडीही चांगलीच पडली होती. बन्या नेहमीप्रमाणे इकडेतिकडे बघत होता. अचानक त्याला काळ्या कोटवाला एक माणूस दिसला. त्याने पीटरला खुणेनंच दाखवलं. पीटरलाही काहीतरी गडबड वाटली. माली मात्र चंद्र आणि हाराकडे अनिमिष नेत्रांनी बघत होती.

त्या मोठ्या हॉलमध्ये सुमारे ५०० लोक होते. एका बाजूने आत जाऊन, चंद्राला आणि हाराला गोल चक्कर मारून दुसऱ्या दरवाजाने बाहेर जात होते. बन्या, पीटर आणि माली त्या काळ्या कोटवाल्याच्या जरासे मागे होते. काळ्या कोटाच्या हातात काहीतरी छोटं यंत्र दिसत होतं. बन्याची आता खात्री पटली होती हा नक्की काहीतरी घफलेबाज माणूस आहे. काळ्या कोटाने बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ आल्यावर त्या यंत्राचे बटन दाबले. अचानक सगळीकडे अंधार झाला. इतरांना काय झालंय ते कळायच्या आत दरवाज्याजवळ बन्याला काळ्या कोटाची आकृती पळताना दिसली. बन्याने पीटर आणि मालीचा हात धरला आणि तो दरवाज्याकडे पळाला.

तेवढ्यात दिवे परत लागले आणि एकच गोंधळ ऐकू आला. चंद्रहार गायब झाला होता!

एवढ्या वेळात बन्या, पीटर आणि माली त्यांच्या सायकलजवळ पोहोचले होते. काळा कोट त्याच्या इलेक्ट्रिक सायकलवर स्वार होऊन गल्लीतून बाहेर पडत होता. तिघांनीही सायकली काढल्या आणि पाठलाग करायला सुरुवात केली. काळ्या कोटाने त्याची इलेक्ट्रिक सायकल नदीच्या काठाने पळवायला सुरुवात केली. पाठोपाठ बन्या आणि पीटर निघाले होते. हा रस्ता दगडी असल्याने इलेक्ट्रिक सायकलचा वेग फार जास्त नव्हता. पण लवकरच चांगला डांबरी रस्ता सुरू होणार होता. बन्याने जोरात ओरडला, "माले, मामाला सांग की मावशीच्या गावाकडे या" 

मालीला बरोबर कळाले, पण काळ्या कोटाला नेमकं हा काय ओरडला ते कळालं नाही. अजून त्याला आपला पाठलाग सुरू आहे हे ही नीट कळालं नव्हतं.

माली परत फिरली आणि मामाला गाठून सगळं सांगितलं. आता तिथे पोलीस आणि दुभाष्या शोधून त्यांना सांगेपर्यंत १५-२० मिनिटं गेलीच. पोलिसांनी आपल्या सायकली आणि गाड्या भरदाव काढल्या. मामाच्या मित्राच्या गाडीतून मामा, माली निघाले. मामीला आपल्या पराक्रमी भाच्याला घरी आल्यावर घोड्याएवढी भूक लागेल हे माहीत होतं, त्यामुळे ती घरी निघाली.

आता डांबरी रस्ता सुरू झाला होता. काळ्या कोटाचा वेग भन्नाट वाढला. त्याच्या आता पाठलाग लक्षात आला होता. त्यामुळे त्याचा वेग अजूनच वाढला. पण बन्याला पुण्यातल्या गर्दीत बिना गिअरच्या सायकलीला पळवायची सवय होती. इथे गर्दीही नव्हती आणि सायकलला गिअरसुद्धा होते. त्यामुळे तोही फार मागे नव्हताच. तरी फुटाफुटाने काळा कोट आणि बन्यामधील अंतर वाढत चाललं होतं.

आता ते अशा ठिकाणी आले होते की इथून मोठ्या डांबरी रस्त्याकडेही जाता येत होतं आणि नदीकाठचा डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता सुरू होत होता. बन्याने मनोमन प्रार्थना केली की काळा कोट सरळ नदीच्याच रस्त्यावर जाऊ दे.

आता त्यांच्यातील अंतर वाढत गेलं होतं. थंडीने बन्याचे हात काकडले होते. पीटरला थंडीची सवय असली तरी ती हातमोजे घालून होती. तोही काकडला होता. डावीकडे असलेल्या डांबरी रस्त्याकडून पोलीसांच्या सायरनचा आवाज आला. बन्याने हुश्श केलं. कारण आता काळ्या कोटाकडे एकच पर्याय होता तो म्हणजे नदीकाठच्या कच्च्या रस्त्याने सायकल पळवणे. आता बन्यालाही जोर चढला. त्याने जोरात सायकल दामटली. एका पुलाजवळ आल्यावर त्याने पीटरला नदीच्या दुसऱ्या बाजूने जायची खूण केली. आता काळा कोट आणि बन्या नदीच्या एका बाजूला आणि पीटर नदीच्या दुसऱ्या बाजूला होते. 

"ट्टॉक"

मावशी आजीच्या घरी चांगल्या चार चकरा सायकलने झालेल्या असल्याने हा रस्ता बन्याला तोंडपाठ झाला होता. इथून पुढे नदीच्या वळणामुळे रस्ताही नागमोडी होता. त्यामुळे इलेक्ट्रिक सायकल काय पार रेसिंगची मोटारसायकल आणली तरी बन्या तिला गाठेल याची त्याला खात्री होती.

अपेक्षेप्रमाणे काळा कोट आणि बन्यामधील अंतर कमी होत होतं. दुसऱ्या बाजूला पीटर अगदी सोबत सायकल चालवत होता. आता ती वेळ आली होती. बन्याने काळ्या कोटाच्या डावीकडे सायकल घातली आणि एक जोरदार मुसंडी मारून त्याने सायकलवरून उडीच मारली. त्याच्या पाठीवरची बॅग धरून बन्या नदीच्या उतारावर घसरला. काळा कोटसुद्धा सायकलसह त्याच्या मागे फरफटत आला. दोघेही नदीत पडले. पीटरने चपळाईने उतारावर झेप घेतली. नदीचं पाणी गोठलेलं नव्हतं पण बर्फापेक्षा जास्त थंड होतं. बन्याने बॅग पीटरकडे फेकली. त्याने ती वर सायकलकडे फेकली आणि बन्याला गार पाण्यातून ओढलं. काळा कोट मागून बन्याला ओढण्याचा प्रयत्न करत होता पण पीटरने जोर लावून एक गुद्दा त्याच्या नाकावर मारला. आधीच थंडी, त्यात पाण्यात भिजलेला असल्याने त्याला तो मार सहन झाला नाही आणि तो कळवळला. पीटर आणि बन्या रस्त्यावर पोहोचले. बन्या पीटरच्या मागे बसला. ते परत फिरले. काळ्या कोटाने पाठलाग सुरू केला, पण तो भिजलेला होता आणि पळत होता. तो मागे पडला.

एव्हाना पोलीससुद्धा तिथवर पोहोचले होते. बन्याने बॅग त्यांच्या स्वाधीन केली. काळ्या कोटाला पोलिसांनी धरलं. पोलिसांच्या गाडीमागे सगळ्या सायकली लावून पीटर व बन्या गाडीत बसले. 

सगळे सोपस्कार होईपर्यंत मामा आणि मालीसुद्धा स्टेशनवर पोहोचले. पोलिसांनी बन्या, पीटर आणि मालीला धन्यवाद दिले. 

घरी जाईपर्यंत बन्या कुडकुडत होता. घरी मामीने मावशी आजीने नव्याने सांगितलेल्या रेसिपीने केलेलं लाल भोपळ्याचं सूप तयार होतं. ते सूप, भाजी, पोळी पोटभर खाऊन सगळे झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बेल वाजली. मामाने दार उघडलं तर समोर पोलीस. ते म्हणाले, "मेरी ख्रिसमस!"

"ट्टॉक"

त्यांनी सोबत आपल्या तीन वीरांसाठी तीन इलेक्ट्रिक सायकली आणल्या होत्या!!!

Tuesday, December 24, 2024

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

नोव्हेंबर महिन्यात आम्ही अयोध्येत गेलो होतो. प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले. तिथे कारसेवक पुरम मध्ये योजना चमू (managment team) कडून मंदिराची अचंबित करणारी माहिती मिळाली. ती माहिती आपणा सर्वांसाठी देत आहे 
- ज्ञानेश

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

थोडक्यात पूर्वइतिहास
राम मंदिरासाठी हिंदू समाज गेली ५०० वर्षे लढत होता. पण निर्णायक चळवळ १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाली. १९९०च्या दशका मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बैठकी झाल्या, ज्यामध्ये चळवळ ही केवळ राजकीय नसून सामाजिक असावी असे ठरविण्यात आले. कारण ही जनसामान्यांना आपली चळवळ वाटली पाहिजे. त्यानुसार विश्व हिंदू परिषदेला चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी निवडले गेले.

यात १९८७ ला गंगा यात्रा आयोजित करण्यात आली, त्यानंतर १९८९ ला रामशिला पूजन झाले. लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपापल्या गावांतून राममंदिरासाठी भक्तिभावाने विटा पाठवल्या. १९९० ची अडवाणींची रथ यात्रा एक गेमचेंजर म्हणावी अशी घटना होती. त्याची परिणिती १९९२ ला बाबरी ढाचा पाडण्यात झाली. एक मोठा कलंक हिंदू समाजाने मिटवला. ढाचा पडल्यानंतर, त्याच ढिगावर पूजेसाठी एक तात्पुरता मंच,कापडी तंबू तयार करण्यात आला.

अलाहाबाद न्यायालय २०१० व नंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हिंदू समाजासाठी जमीन निश्चित केली. श्री रामजन्मभूमी न्यास निर्माण केला गेला (फेब्रू २०२०). मंदिराच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात झाली ती ५ ऑगस्ट २०२० रोजी. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं.

अभियांत्रिकी
इथून पुढे श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि त्यातील रोचक अभियांत्रिकी गोष्टी आहेत...

अशोकजी सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची रचना दोन मजली केली होती. पण आता जागा पुरेशी मिळाली. २०२१ जानेवारी ते मार्च, रामभक्तांनी भरभरून निधीही जमा केला. त्यामुळे मूळ २ मजली ऐवजी मंदिर ३ मजली, त्यावर शिखर करावे असा प्रस्ताव आला. तो मान्यही झाला.

मंदिराच्या भरभक्कम पायासाठी भारतातील अनेक अभियांत्रिकी संस्था, आयआयटी, NGRI  ह्यांनी मदत केली आहे. बांधकामासाठी तज्ञ संस्था L&T, TCE, Architects आहेत.

मंदिर नागर शैलीतील आर्किटेक्चरमध्ये डिझाइन केले आहे. यात परकोटा महाद्वार, मंदिर सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप, प्रार्थना मंडप आणि गर्भगृह यांसारख्या अनेक मंडपांचा समावेश आहे. प्रत्येक मंडपातील स्तंभांवर दशावतार, शिवपुराण, भागवत पुराण इ कथांतील मूर्ती चितारल्या आहेत.

तळमजला आणि श्रीरामाची मूर्ती २२ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण झाली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली. त्यानंतर पहिला मजला गेल्या दिवाळी २४ मध्ये पूर्ण झाला. दुसऱ्या मजल्याचं काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजित आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत कधीही प्रोजेक्ट प्लॅनमध्ये कमी अधिक बदल अथवा उशीर झालेला नाहीये !!! 

सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष
श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायासाठी सुमारे ५५-६० फूट खोल खोदकाम केले. या खोदकामात प्राचीन काळातील अनेक मंदिरांचे अवशेष सापडले, ज्यांचा इतिहास इसवी सन पूर्व १३०० पर्यंतचा आहे. याचं कार्बन डेटिंग केलेलं आहे आणि मंदिर कार्यालयात त्याचे सर्व पुरावेही उपलब्ध आहेत. खोदकामादरम्यान, विविध काळातील मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभाग व रामजन्मभूमी न्यास यांना सापडले आहेत. यामध्ये बाराव्या, सातव्या शतकातील व तत्पूर्वी विक्रमादित्य, तसेच मौर्याच्या काळातील मंदिराचा समावेश आहे. तसेच, याबद्दलचे विविध शिलालेख आणि पुरावे सापडले, ज्यामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख होते.

या शिलालेखांमध्ये त्या काळातील राजे आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे एक पुरातत्त्वीय महत्त्व आहे. या शोधामुळे अयोध्येत आजपासून सुमारे ३४०० वर्षांपासून श्रीरामाची पूजा होत होती. अतिशय नीटनेटकी मंदिरेही होती. म्हणजे पुरुषोत्तम श्रीराम आणि त्यांचा इतिहास, म्हणजेच भारतवर्षाचा इतिहास हा किती पुरातन आहे याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच हे अवशेष भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत.

अर्थात हे पुरावे जगासमोर येतीलच. त्यासाठी जरा वाट बघावी लागेल. कारण आधी मंदिर पूर्ण व्हायचे आहे. या प्राचीन अवशेषांचे जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी संग्रहालयाची योजना आहे. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शिक्षणाचे साधन ठरतील.

श्रीराम मंदिराचे तंत्रज्ञान
५५-६० फूट खोल खोदल्यानंतर हा सगळा खड्डा भरला. त्यावर ३ मजली दगडी मंदिर (३७०' लांब, २७०' रुंद, १६१' उंच) उभं राहणार, ते किमान १००० वर्षे टिकलं पाहिजे. त्यामुळे पायाभरणीमध्ये ग्रॅनाइट आणि विशेष काँक्रीटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मंदिराच्या दीर्घायुष्यासाठी दगडांना इंटरलॉक करण्यासारख्या विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला. त्यावर ग्रॅनाइटचे दगड ठेवले आहेत. पायाभरणीसाठी एकूण १७,५०० ग्रॅनाइट दगड वापरण्यात आले. यावरून पायाच्या वजनाचा आणि मजबुतीचा अंदाज येऊ शकेल. 

तांबडे दगड स्थिर राहावेत आणि अनेक वर्षे टिकावेत म्हणून तांब्याच्या क्लिप्सचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. त्यानंतर काँक्रीटचे ४८ थर आहेत. प्रत्येकी १ फूट जाड, त्यांना २० टन रोलरने कॉम्पॅक्ट केले गेले. यानंतर १० फूट जाड विशेष काँक्रीटचा दुसरा थर टाकण्यात आला. यावर ३५ फूट जाड काँक्रीटचा तिसरा थर टाकण्यात आला. ग्रॅनाइट दगड पिन-लॉक प्रणालीचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलं. बांधकामात वापरलेल्या प्रत्येक दगडाला टॅग केले जाते. यामुळे दगडांचे अचूक ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन शक्य होते, ज्यामुळे प्रत्येक तुकडा योग्यरित्या ठेवला जातो.

पुरातन नागर शैली, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अनोखा संगम या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो ❤️

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर यापुढील काळात श्री वाल्मिकी रामायणातील प्रसंग व मूर्ती, तसेच ब्राँझ म्युरल्स होतील.

हे मंदिर आपला सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. हे लाखो भक्त आणि पर्यटक आजही इथे येतात. रोज जवळपास १ लाख भक्त मंदिराला भेट देतात. दैनंदिन सुगम दर्शन पास आणि आरतीचे पास वेबसाईट वर उपलब्ध आहेत. फक्त वेळेत बुकिंग केलं गेलं पाहिजे. 

आपण आश्चर्यचकित व्हावं अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत. श्रीरामाची कृपा आपणा सर्वांवर व्हावी आणि लवकरात लवकर सर्वांना दर्शन व्हावे अशी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🙏

।। जय श्रीराम ।।

Monday, December 9, 2024

संविधान आणि सावरकर

भारताच्या संविधानातील सावरकरांच्या विचारांचे प्रतिबिंब स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर ते प्रखर सामाज सुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या विचारांनी आधुनिक भारतावर सखोल परिणाम केले आहेत. सावरकरांचे जातिवादाच्या संदर्भात आणि समाजातील विज्ञान आणि विवेकवादाच्या भूमिकेच्या संदर्भात, सामाजिक सुधारणांचे लेखन आणि कार्यसुद्धा सर्वश्रुत आहे. या समस्यांवरील त्यांचे प्रगत विचार त्यांच्या लेखन आणि भाषणांपुरते मर्यादित नाहीत तर त्यांच्या स्वतःच्या आचरणात होते. तेच विचार भारतीय संविधानामध्येही प्रतिबिंबित होतात. 

 १. जातिसंस्थेच्या निर्मूलनाबाबत सावरकरांचे विचार (जात्युच्छेदक विचार): सावरकर जातिसंस्थेचे प्रखर टीकाकार होते. जातिव्यवस्थेला ते सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी मोठा अडथळा मानत होते. जातीभेद विरहित समाजाचे त्यांनी स्वप्न पाहिले होते. व्यक्तींना त्यांच्या जन्माऐवजी त्यांच्या गुणांनी आणि कृतीने बघितले पाहिजे. हा दृष्टिकोन भारतीय संविधानाच्या सामाजिक न्याय आणि समानतेच्या वचनबद्धतेमध्ये येतो. संविधानाच्या कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करण्याला स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे. या तरतुदीचे उद्दिष्ट असे आहे की प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिली जावी आणि त्यांच्या जातीचा विचार न करता समान संधी दिली जावी. याशिवाय, कलम 17 अस्पृश्यता नष्ट करते, जो जातिनिहाय भेदभावाचा थेट परिणाम होता. अस्पृश्यता हा एक शिक्षेने दंडनीय अपराध बनवून, संविधान जातिव्यवस्थेच्या सर्वात घातक पैलूंपैकी एकावर ठाम भूमिका घेतं. सावरकरांच्या जातीभेद निर्मूलनाची पूर्तता संविधानामध्ये अन्य विशेष तरतुदींमध्ये देखील आढळते. कलम 15(4) आणि 16(4) राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याची शक्ती देते. या तरतुदी जातिव्यवस्थेमुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना संधी उपलब्ध करून देतात.
 
२. विज्ञान आणि विवेकवादावर भर: सावरकर हे वैज्ञानिक विचार आणि विवेकवादाचे समर्थक होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अंधविश्वासावर मात करून वैज्ञानिक तत्त्वे स्वीकारूनच प्रगती साध्य होऊ शकते असे प्रतिपादिले आहे. यावर त्यांचे अनेक निबंध आहेत. विज्ञान आणि विवेकवादाच्या भूमिकेवर भर देणारे विचार संविधानाच्या प्रस्तावनेत आणि विविध तरतुदींमध्ये दिसून येतात. भारतीय संविधानाची प्रस्तावना भारताला "सार्वभौम लोकशाही गणराज्य" म्हणून घोषित करते आणि सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची हमी देते. संविधानानुसार राज्यकारभार हा धर्माधारित नसून पूर्णपणे तर्कसंगत आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्याची असणं अपेक्षित आहे. कलम 51a(8) मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे वर्णन करताना, स्पष्टपणे नमूद केले आहे की प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे "वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे." ही तरतूद सावरकरांच्या सामाजिक दृष्टिकोनाला परिपूर्ण करते. संविधान वैज्ञानिक वृत्तीस मूलभूत कर्तव्य म्हणून प्रोत्साहन देते. नागरिकांना समस्यांचे समाधान करण्याच्या आणि कोणतेही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करते, यामुळे प्रगतीशील आणि प्रबुद्ध समाजाची निर्मिती होते.

३. शिक्षण आणि सामाजिक सुधारणा: सावरकरांचे मत होते की शिक्षण हे सामाजिक सुधारणा आणि जातीआधारित पूर्वग्रह निर्मूलनाचे एक प्रमुख साधन आहे. शैक्षणिक संधी सर्वांसाठी उपलब्ध केल्या पाहिजेत, जनतेची जात किंवा सामाजिक पार्श्वभूमी विचारात न घेता सर्वांना शिक्षण उपलब्ध असलं पाहिजे. भारतीय संविधान हे मत शैक्षणिक अधिकारांच्या तरतुदींमध्ये प्रतिबिंबित करते. कलम 21A सर्व मुलांना सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार देतो. या तरतुदीचे उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक मूल, त्यांच्या सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी विचारात न घेता, शिक्षण घेऊ शकते. यामुळे एक सुशिक्षित समाज तयार होईल. याशिवाय, कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांचे संरक्षण करते. या तरतुदी सुनिश्चित करतात की अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि व्यवस्थापनाचा अधिकार आहे. ही समावेशकता सावरकरांच्या शिक्षणाची आणि विवेकवादाची संस्कृती बाळगणाऱ्या समाजाची दृष्टिकोनाची पूर्तता करते. अर्थात यात आधुनिक शिक्षणही दिले जावे ही सावरकरांची अपेक्षा होतीच.

४. सामाजिक न्याय आणि आर्थिक सुधारणा: सावरकरांचे सामाजिक न्याय आणि आर्थिक सुधारणा यावरचे विचार संविधानाच्या तरतुदींमध्ये देखील प्रतिबिंबित होतात जे मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी बनवण्यात आलेल्या आहेत. कलम 38 राज्याला लोककल्याणासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचे निर्देश देते. ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय न्याय सर्व समाजघटकांना मिळावा हे अपेक्षित आहे. हे राज्य धोरणाचे निदेशक तत्व सावरकरांच्या न्याय आणि समानतेच्या समाजाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. कलम 46 राज्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि इतर मागास वर्गांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांचा प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांचे सामाजिक अन्याय आणि शोषणापासून संरक्षण करण्याचे निर्देश देते. प्रत्येक व्यक्तीला, व्यक्तीची जात किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता, प्रगती करण्याची संधी आहे.

५. प्रशासनामध्ये धर्मनिरपेक्षता आणि विवेकवाद: सावरकरांचे प्रशासनामध्ये धर्मनिरपेक्षता आणि विवेकवादाचे महत्व संविधानाच्या धार्मिक आणि राज्यामध्ये वेगळेपणा दाखवण्याच्या दृष्टिकोनामध्ये स्पष्ट दिसते. संविधानानुसार सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे अनुसरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 25 विवेकाचा स्वातंत्र्य आणि धर्माचे स्वतंत्रपणे अनुसरण, प्रचार, आणि प्रचार करण्याचा अधिकार सुनिश्चित करतो. तथापि, हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आणि आरोग्य यांच्या अधीन आहे. हे संतुलन धार्मिक आचरण इतरांच्या अधिकारांना बाधा आणत नाही किंवा सामाजिक समरसतेला व्यत्यय आणत नाही हेही बघते. कलम 26 प्रत्येक धार्मिक समुदायाला धार्मिक बाबींच्या व्यवस्थापनाचा अधिकार देतो. ही तरतूद धार्मिक समुदायांच्या स्वायत्ततेचा आदर करते, तसेच राज्याला धर्मनिरपेक्ष बनवते. धर्माचे स्वातंत्र्य आणि राज्यामध्ये धर्मापासून वेगळेपण हे स्पष्ट करून, संविधान सावरकरांच्या तर्कसंगत आणि धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदक आणि विज्ञानावर, विवेकवादावर भर देणारे विचार भारतीय संविधानाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर आहेत. समता, सामाजिक न्याय, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि धर्मनिरपेक्षता यांच्या विविध तरतुदींमधून संविधान सावरकरांच्या प्रगतीशील आणि सर्वसमावेशी समाजाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. भेदभाव निर्मूलन आणि तर्कसंगत विचारांना प्रोत्साहन देऊन, संविधान न्यायाधिष्ठित आणि समानताधारित समाजाच्या निर्मितीचे प्रयत्न करते. 

आता पुढील काही कोणता मुद्दा नाही, त्यामुळे क्रमांक देत नाहीये. सावरकरांनी संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांना दिलेली वागणूक, दिलेला मान, अनेक लेखांमध्ये त्यांचा आदराने केलेला उल्लेख, जातीभेदविरहित समाज निर्मितीसाठी केलेले प्रयत्न एका बाजूला आणि डॉ आंबेडकर निवडणूक हरावेत म्हणून नेहरूंनी केलेले प्रयत्न, वर्णव्यवस्था कायम असावी यासाठी गांधीजींनी लिहिलेले अनेक लेख दुसऱ्या बाजूला. पण एवढं वाचेल कोण. त्यापेक्षा कोरं संविधान फडकवत सावरकरांना शिव्या देणं खूप सोप्पंय!

Thursday, July 25, 2024

पुस्तक परिचय - विनाशपर्व

 इंग्रज अतिशय म्हणजे अतिशय कायदेप्रिय होते. त्यांनी एकूणएक गोष्ट कायद्याच्या चौकटीत केली.
- भारतीय नौका उत्तम दर्जाच्या असल्याने त्यांनी भारतीय नौकांच्या वापराच्या विरोधात कायदा करून नौकानयन उद्योग बंद पाडला.
- भारतीय विणकारांचे अंगठे छाटणे ही सामान्य आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी बाब असल्याने ती अमलात आणून विणकर उद्योगाला बंद केलं.
- जनसामान्य आरोग्य, सहज हाती असलेले उपाय करणारी मंडळी, वैदू, लसीकरण करणारे ब्राह्मण-माळी यांना तर सरळ सरळ कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगार घोषित केलं. मग इंग्रजी औषधे आणि लसीकरण यांना मोकळं रान उपलब्ध करून दिलं.
- भारतातील अनेक भागात ८०% हून अधिक असलेली साक्षरता ही गावातील शाळांमुळे होती. ब्राह्मण विद्यार्थीसंख्या ११% ते ३०% असायची. म्हणजे बाकी ७०%-८९% ब्राह्मण नसलेले विद्यार्थी होते. ही सगळी आकडेवारी इंग्रजांच्याच सर्वेक्षणात आहे. शाळेला गावातील जमीन उपलब्ध होती आणि त्यातून शाळेचा खर्च भागत असे. या जमिनी कायद्याने सरकारने घेतल्या. स्थानिक भाषांमधून शिक्षण घेतलेले लोक हे अशिक्षित आहेत हेही घोषित केलं. केवळ इंग्रजी शिक्षण म्हणजेच शिक्षण हे लोकांवर ठसवलं. मग शाळा आपोआप बंद पडल्या. इंग्रज जाताना साक्षरता होती ३%. 
- दुष्काळ असो वा नसो महसूल हा कायद्याने मिळालाच पाहिजे. त्यातून कोट्यवधी लोक मेले तरी पर्वा नाही. कायदा महत्वाचा. इंग्रजांच्या राज्यात ३ कोटी सामान्यजन अशा दुष्काळात मेले. पण ते मरण्यात कोणताही कायदा आड येत नव्हता.
- इंग्रजांनी केलेल्या लूटीतून तर त्यांची कायद्याप्रती असलेली निष्ठा दिसते. जिथे लूट करायची असेल आणि जी लूट करायची असेल त्यासाठी योग्य असेच कायदे निवडले जायचे. नसतील तर तयार केले जायचे आणि मग लूट सुरू व्हायची. अगदी कायद्याने!
असं सगळं काही कायद्याने सुरू होतं. पण वायुसेना, नौसेना आणि थलसेना यांना सुभाषचंद्र बोस आपले (मृत घोषित असले तरीही) नेते वाटायला लागले. आझाद हिंद सेना ही आपली सेना वाटू लागली. त्यामुळे ज्या जीवावर आपण शासन करू शकतो ती सेनाच हाताबाहेर जाईल याची इंग्रजांना खात्री पटली आणि इंग्रजांनी जवळपास एक वर्ष आधीच भारताला अजून एक कायदा करून स्वातंत्र्य दिलं.
असं हे सगळं कायद्याच्या चौकटीत असलेलं इंग्रजांचं शासन संपलं!!!

हे कुठे वाचायचंय - प्रशांत पोळ काकांच्या "विनाशपर्व" या पुस्तकात! नक्की आवर्जून वाचावं असं पुस्तक 🙏

- ज्ञानेश

Friday, June 30, 2023

राजी २

बॉलिवूड उत्तम कथा सादर करताना माती खातात. अशीच एक उत्तम कथा, तीही सत्य घटना - सेहमत खान! त्यावरील पुस्तक Calling Sehmat आणि चित्रपट राज़ी.

जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा मला तो खूप आवडला होता (त्यावर मी लिहिलंही होतं, http://dnyanamhane.blogspot.com/2018/06/blog-post.html?m=1) रजित कपूर, जयदीप अहलावत, विकी कौशल आणि अर्थातच आलिया भट. सर्वांनी उत्तम कामे केली होती. पण अशात Calling Sehmat वाचलं. त्यानंतर मेघना गुलजारने नेमकी कुठं माती खाल्ली ते ठळक दिसून आलं. कथा जवळपास जशीच्या तशी दाखवली होती. सेहमतच्या आयुष्यातील पाहिलं प्रेम गाळलं होतं. ते एकूण वेळ कमी असल्याने गाळलं असेल असं वाटलं. त्याबद्दल फार काही चुकीचं आहे असंही वाटलं नाही. तिच्या हिंदू आई आणि वडिलांचं प्रेमप्रकरण सुद्धा महत्वाचं वाटलं नाही.

पुढे ती लग्न होऊन पाकिस्तानात जाते आणि तिथे जी हेरगिरी करते ते मात्र अगदी जसंच्या तसं सिनेमात पण दाखवलं आहे. एकच बाब जरा बदलली ती म्हणजे सेहमतचा नवरा इकबाल हा मूळ कथेत फार काही हुशार नाहीये, इथे तो मूळ कथेपेक्षा जास्त हुशार दाखवला आहे. पण तेवढंच. 

सगळ्यात जास्त कथेला धक्का दिला तो शेवटच्या सीन मध्ये (ज्यावर बरेच मीम सुद्धा तयार झाले). सेहमत शेवटी मीर (जयदीप) आणि अन्य भारतीय हेर ज्या घरात आहेत तिथे जाते. मूळ कथेत सेहमत इथे अजिबात कोसळत नाही. तिला स्वतःच्या कामगिरीचा अभिमान वाटत असतो. या सगळ्यात तिला अब्दुल आणि तिच्या दिराला मारावं लागलं आणि शेवटी इकबालसुद्धा मेला याचं तिला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं, मात्र देशहितासाठी ते आवश्यक होतं हे तिला अगदी पटलेलं असतं. मात्र घरी परत आल्यावर तिला ते दुःख छळू लागतं. त्यानंतर ती अब्दुलच्या मूळ गावी घर घेऊन तिथे राहू लागते. तिला मूल होतं. पण तरीही ती त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही. ते मूल तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सांभाळतो. नंतर अचानक एक फकीर त्या गावात येतो. तिचं दुःख समजावून घेतो. तिला कृष्णभक्तीमध्ये रममाण करतो. तिची आई मूळ हिंदू आणि कृष्णभक्त असल्याने या सगळ्यात सहजपणे सोबत असतेच. तो फकीर तिला उपनिषदांवर प्रवचने देतो. त्यांच्या घरात कृष्णभक्ती नांदू लागते. घर जवळपास मंदिरच होतं. नंतर हळूहळू सेहमत त्या दुःखातून बाहेर येते.

आता हा कथाभाग मोठा आहे. सव्वादोन तासात किती आणि काय दाखवणार... अगदी बरोबर. हे दाखवणं शक्य नव्हतं तर ज्या क्षणी सेहमत कोसळली नाही त्या क्षणी तिला कोसळलेली दाखवणं हे तिच्यावर अन्यायकारक होतं. तिला ज्यावेळी स्वतःच्या कामगिरीवर अभिमान वाटत होता तिथे मेघना गुलजारने तिला कोसळलेली दाखवून देशहिताला essential evil करून टाकलं. अब्दुल, सेहमतचा दीर आणि नवरा यांना बिचारं केलं. भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुन्हेगार बनवलं. एकूणच सिनेमात आलिया भट्टने अप्रतिम काम केलंय आणि हा सीन तर तिने जबरदस्त दिलाय. त्याचा impact खोल रुतून बसतो. ज्यामुळे देशहित essential evil असतं हे मनावर बिंबवलं जातं. आणि इथेच मेघना गुलजारने भयंकर माती खाल्ली आहे!

Friday, July 29, 2022

धुरंधर - नानासाहेब पेशवे!

 आपल्या पाठ्यपुस्तकांनी मोगल इतिहास भरभरून सांगितला. शिवरायांचा इतिहास मोडून सांगितला. पुढे संभाजी महाराज ते दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे हार मानली हा कालखंड पूर्ण वगळला. मग हा इतिहास आपल्यापुढे अनेक इतिहासकारांनी तर मांडलाच पण कादंबरी रूपात लेखकांनी तो सोपा करून आपल्यापुढे आणला. त्यात छावा, राऊ, पानिपत आणि स्वामी ही पुस्तके विशेष गाजली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अंगार चेतवला, त्याचा वणवा केला बाजीरावांनी. त्यात मोगल पूर्ण भरडले गेले. पण दुर्दैवाने बाजीराव वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवर्तले. नंतर नानासाहेबांनी पेशवाई सांभाळली, पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात पानिपत झालं. तरीही पुढे माधवरावांच्या कारकिर्दीत केवळ दहा वर्षांत संबंध भारतभर मराठेशाही नांदू लागली. आजोबा बाजीराव आणि नातू माधवराव यांचं कार्य अतुलनीय होतं. त्या कार्याला सामान्यांच्या मनात पोहोचवलं राऊ आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांनी. पण या दोघांच्या मधला वीस वर्षांचा कालखंड कुणी कादंबरी रूपात कधी मांडला नव्हता. ते काम तरूण इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे याने केलं आहे.
कौस्तुभचं हे पुस्तक जाहीर झालं आणि लगेच मागवलं. पण माझ्या हाती येऊन वाचून पूर्ण व्हायला जरा वेळ लागला.
अगदी खरं सांगतो - मला नानासाहेब हे याआधी केवळ पानिपत पुरते ठाऊक होते. त्यातही त्यांनी पानिपतच्या धामधुमीत केवळ ९ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आणि गोविंदपंत बुंदेल्यांना नाटकशाळा पाठवा म्हणून पत्र पाठवलं (दोन्ही गोष्टी पानिपत कादंबरीत वाचल्या) एवढं माहित होतं. याशिवाय त्यांनी कसं मराठा आरमार बुडवलं वगैरे गोष्टी ऐकीव माहित होत्या. पण त्यांच्यावर खूपच कमी लेखन झालं आहे आणि जे झालंय ते त्यांच्यावर अन्याय करणारं आहे... वाईट गोष्ट अशी की ज्या राघोबाने पानिपतची जबाबदारी टाळली, कोवळ्या माधवरावांना पेशवाई मिळाल्यापासून त्रासच दिला, नारायणरावांना मारेकरी घालून मारलं, अश्या माणसावर "राघोभरारी" ही ऐतिहासिक कादंबरी अनेक वर्षांपूर्वीच निघाली. पण नानासाहेबांवर एकही कादंबरी निघू नये हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता. 
मागच्या वर्षी नानासाहेबांच्या कार्यावर श्री उदय कुलकर्णी यांचा इंग्रजीतून शोधग्रंथ आला आहे, त्याचं मराठी भाषांतरही अशात आलं आहे. खाली मध्ये दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स आहेत.
असं असलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा कादंबरीतून लवकर कळतं. हे काम कौस्तुभने केलं आहे. 

नानासाहेबांना पेशवे म्हणून काम करताना सुरुवातीपासून अनेक प्रकारची संकटे/आव्हाने आली. त्यांनी ती आपल्या अतुल्य राजकीय आणि सामरिक बुद्धीने लीलया पेलली आणि परतवली. सुरुवातीला बाजीरावांना पेशवाई मिळताना जी राजकारणं झाली ती नानासाहेबांनाही चुकली नाहीत. उत्तरेत मोठी स्वारी झाली. ज्या माळव्याच्या सनदा बाजीरावांच्या वेळेपासून मिळायच्या बाकी होत्या त्या नानासाहेबांनी मिळवल्या. त्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मुलुखगिरी केली. त्यातही रघुजींच्या विरोधात सेना उतरवली म्हणून अनेक प्रवाद निर्माण झाले. ते सगळे छत्रपती शाहूंच्या समोर खासगीत संपुष्टातही आणले. पुढे राजपुतांच्या गादीवरून शिंदे आणि होळकर यांच्यात सुद्धा काही काळ वितुष्ट आले. तेही राजपूत आणि शिंदे-होळकर यांना समजुतीत घेऊन संपवले. शाहू महाराजांनी अचानक पेशवाई काढून घेतली तेव्हा काही महिने नानासाहेब सातारच्या बाहेर राहुट्यांमध्ये राहिले. जोवर महाराजांचा पूर्ण विश्वास पूर्ववत होत नाही तोवर शांतपणे वाट पहिली आणि शाहूंनी घेतलेली परीक्षा उत्तीर्ण झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या न राहता एकच गादी असावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कोल्हापूरचे संभाजी राजे बाजीरावांच्या काळात निजामाला जाऊन मिळाले होते. तरीही तो राग न धरता या दोन गाद्या एकत्र होऊन एक मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी दत्तक विधान करताना संभाजी महाराजांना दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पण ते झालं नाही. नंतर सदाशिवरावांना कोल्हापूरची पेशवाई देऊन किमान या दोन गाद्यांमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही ही तजवीज करून ठेवली. आपण छत्रपतींचे सेवक आहोत आणि थोरल्या शिवप्रभूंचे अनुयायी आहोत हे सतत दाखवून दिलं. त्यासाठी काशी, मथुरा आणि अयोध्या ही क्षेत्रे सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही प्रयत्न आपल्याच लोकांच्या घाबरण्यामुळे मागे पडले तर काही वेळा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र "काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधू मुक्त करा" हे महाराजांचे शब्द कधीच विसरले नाहीत. 
राज्यकारभारात आणि एकूण महसूल, मोजणी या सगळ्यात सुसूत्रता आणली. जे करायला बाजीरावांना कधी वेळ मिळाला नाही अश्या अनेक गोष्टी केल्या. शनिवारवाडा बिना तटबंदीचा होता. त्याची तटबंदी पूर्ण केली. दरवाजा मुद्दाम उत्तरेला ठेऊन दिल्लीवर आमची नजर आणि सत्ता दोन्ही आहे हे दाखवून दिले. कात्रजच्या तलावातून पुण्यात सर्व मोठ्या घरांमध्ये पाणी फिरतं ठेवलं. आजही तो नळ सुरु आहे.
कुटुंबात सदाशिवरावभाऊंना राज्यशिक्षणासाठी सातारला ठेवलं. गुरूंना सतत सन्मान दिला. बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेबांचा मुलगा कृष्णा - समशेर बहाद्दर - याला कधीच अंतर दिलं नाही. त्याची वाढ आणि शिक्षण याकडेही लक्ष पुरवलं. विक्षिप्त राघोबांना सांभाळलं. विश्वासराव आणि माधवरावांवरही सतत लक्ष ठेऊन त्यांचंही शिक्षण सुरू राहील हे बघितलं. 

एक ना अनेक कित्येक गोष्टींनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. अब्दाली पहिल्यांदा आला तेव्हा मराठा सैन्य तिथे पोहोचण्याच्या आधीच तो परत फिरला होता. दुसऱ्यांदा आल्यावर मात्र तो पुन्हा जिवंत जाऊ नये यासाठी पेशव्यांच्या घरातून कुणी जबाबदारी घ्यावी यावर ते ठाम राहिले. त्यांची स्वतःची तब्येत साथ देती तर तेच रणांगणावर असते. परंतु ते व्हायचे नव्हते. त्यांच्या जागी राघोबा जावेत म्हणून प्रयत्न झाला. मात्र राघोबा गेले नाहीत. ती जबाबदारी घेतली त्याच्या लाडक्या सदोबाने. पानिपत हारूनही अब्दालीने हिंदुस्थान मराठ्यांच्या हवाली केला. ही मराठ्यांची ताकद होती. ती कमावली बाजीरावांनी तर वाढवली नानासाहेबांनी. भाऊ आणि नाना ही जोडी अगदी चिमाजी आणि बाजीरावांचीच असावी अशी होती. त्यामुळे विश्वासराव गेले त्याहूनही अधिक दुःख त्यांना भाऊ गेल्याचं झालं. स्वतः विश्वासरावसुद्धा पत्रात म्हणाले होते की, "आमच्या सारखे पुत्र तुम्हाला पुन्हा मिळतील पण भाऊंसारखा भाऊ मिळणार नाही" भाऊ गेल्याने नानासाहेब खचले आणि त्यातच त्याची अखेर झाली.

कादंबरी रसाळ आहे. भाषा ओघवती आहे. त्यात सनावळ्या नाहीयेत. मात्र कौस्तुभ "पुराव्यानिशी शाबीत" करण्याजोगे नसेल तर लिहीत नाही. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. कित्येक ऐतिहासिक कागदपत्रे वाचून, समजून घेऊन, त्यांची संगती लावून ही कादंबरी लिहिली गेली आहे. केवळ तिशीत असताना कौस्तुभ ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. त्याच्या अनेक कादंबऱ्या याव्यात, पुस्तके यावीत आणि आम्हाला वाचायला मिळावीत ही प्रार्थना. 

आज बाबासाहेब पुरंदरेंची जयंती! कौस्तुभला त्यांचे आशीर्वाद सतत मिळाले आहेत. बाबासाहेबांचं बोट धरून तो त्यांच्या वाटेवरून चालतोय. खूप शुभेच्छा!

- ज्ञानेश 

धुरंधर - पेशवा नानासाहेब
लेखक - कौस्तुभ कस्तुरे 
प्रकाशक - कौस्तुभ कस्तुरे बुक्स 
पाने - ४४०
किंमत - र ४५०

धुरंधर: https://www.amazon.in/Dhurandhar-Peshwa-Nanasaheb-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/dp/9355932235/ref=sr_1_4?qid=1659104818&refinements=p_27%3AKaustubh+Kasture&s=books&sr=1-4

The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa - https://www.amazon.com/Extraordinary-Epoch-Nanasaheb-Peshwa/dp/8192108058
भाषांतर - https://www.amazon.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-Nanasaheb/dp/8192076911/ref=sr_1_1?qid=1659097948&refinements=p_27%3AUday+S.+Kulkarni&s=books&sr=1-1