Friday, December 20, 2019

संघाचं हिंदुत्व (माझ्या आकलनानुसार)

संघाच्या हिंदुत्वात कुणी त्याज्य नाहीये. त्यात व्यापकता आहे, सर्वसमावेशकता आहे. संघाची विचारसरणी अनेक पद्यांमधून सहज व्यक्त होत असते. त्यामुळे यावर लिहिण्याचा विचार करताना आपोआप एक पद्य मनात उमटलं.

विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं।
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं।।धृ।।

राम कृष्ण गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहां
वाणी खंडन मंडन करती, शंकर चारों धाम यहां
जितने दर्शन राहें उतनी, चिंतन का चैतन्य भरा
पंथ खालसा गुरू पुत्रों की बलिदानी यह पुण्य धरा
अक्षय वट अगणित शखाऐं, जड में जीवन हिंदु हैं ।।१।।

कोटी हृदय हैं भाव एक हैं, इसी भूमि पर जन्म लिए
मातृभूमि यह कर्मभूमि यह, पुण्यभूमि हित मरे जिये
हारे - जीते संघर्षों में, साथ लढे बलिदान हुए
कालचक्र की मजबूरी में रिश्ते नाते बिखर गये
एक बडा परिवार हमारा, पुरखे सब के हिंदु हैं ।।२।।

सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें
वर्ण - भेद मत - भेद मिटा कर नव रचना निर्माण करें
धर्म हमारा जग में अभिनव, अक्षय है अविनाशी हैं
इसी कडी से जुडे हुए, युग युग से भारतवासी हैं
थाय अथाह जहां की महिमा, गहरा जैसे सिंधु हैं ।।३।।

हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है ।।४।।

यात कुठेही भारतीय भूमीत जन्मलेल्या उपसनापद्धतीबद्दल अनादर, आक्षेप नाही तर जेवढी दर्शने आहेत तेवढे रस्ते आहेत हा भारतीयत्वाचा आत्मा अधोरेखित केलाय. या वटवृक्षाच्या कित्येक फांद्या आहेत, पण मूळ जीवनरस हिंदू (म्हणजेच भारतीय) आहे हे अधोरेखित केलंय. या भारतभूमीला मातृभू, पुण्यभू मानणारे सगळेच आपले आहेत. संघर्षाच्या काळात हार जित झाली आणि नाते तुटले (धर्मांतरे झाली) तरीही सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे आपण सर्व भारतीय एक परिवार आहोत हीच संघाची धारणा आहे. मतभेद आणि वर्णभेद मिटवून नवरचना निर्माण करताना जुन्या गैर गोष्टी अर्थातच टाकाव्या लागणार याची सार्थ कल्पना संघाला आहे. शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा विविध जाती, पंथ, निवास यामुळे भिन्न असलेल्या हिंदूंमध्ये कोणताही भेद असू नये हे सांगितलंय. त्याचं वर्णन करताना वनात जसे अनेक फुलं असतात तसेच हेही, परंतु पुन्हा या विविध रंगात जीवनरस एकच आहे हे सांगितलंय. संघाचं हिंदुत्व हे असं सर्वसमावेशक आहे.

याच आशयाची संघाची अनेक पद्ये आहेत. ज्या सर्वांत कायम सामाजिक समरसतेबद्दल सांगितले आहे. कुठेच कुणी भारतीय आपला शत्रू आहे आणि त्याला मारले पाहिजे हे संघ शिकवत नाही.
१ - हिन्दु जगे तो विश्व जगेगा
२ - जनसेवा ही ईश्वरभक्ति
३ - हिन्दु हिन्दु एक रहे
४ - हिंदू सारा एक मंत्र हा

आता प्रश्न येतो अभारतीय उपासना पद्धतीचं काय? त्याचं उत्तर भारतीय पद्धतीनेच देता येईल. ज्याला जी उपासनापद्धत योग्य वाटते त्याने ती अनुसरावी. पण ते करताना इस्लाम वा ख्रिश्चन धर्मात जसं सांगितलं जातं की "हाच एकमेव मार्ग आहे" हे असू नये. "हाही एक मार्ग आहे" या तत्वानुसार भारतात तर चार्वाकासारखे शतप्रतिशत नास्तिक सुद्धा आहेत आणि त्यांची गणना हिंदू दर्शनातच होते. त्यामुळे केवळ अभारतीय उपासना पद्धत आहे म्हणून इस्लाम किंवा ख्रिश्चनांचा संघ विरोध करत नाही. विरोध सुरू होतो फसवणुकीतून किंवा जबरदस्तीने धर्मांतर आणि "हाच एकमेव मार्ग" या मानसिकतेमुळे. तेहतीस कोटी देवांमध्ये अल्ला आणि येशू सामावून घेणं भारतीयांना कठीण नाही. "केवळ तेच" हा मुद्दा मात्र नक्कीच विरोधाचा आहे.

हिंदू धर्म हा एक पुस्तक, एक प्रेषित, एक मार्ग असा बनलेला नाही. अनेक मार्ग, अनेक विद्वान, अनेक पुस्तकं या मंथनातून बनलेला आहे. शिवाय आज सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने समजून घेऊन, त्यापैकी एकानुसार आचरण कुणी करत नाही. कारण याच्या पुढे पुराणं आली, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आली, नवीन देवता आल्या. शीख पंथ उदयास आला आणि तेही सर्व इथे गुण्यागोविंदाने नांदू लागले. अजूनही नवे पंथ, संप्रदाय तयार होऊ शकतात - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशी उदाहरणे आहेतच. या सर्वांना सामावून घेणारं हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व आहे.

आज बरेच पुरोगामी विद्वान असं म्हणतात की इतकी विविधता असलेल्या प्रदेशांचा देश होऊ शकतो, पण हे एक राष्ट्र आधी कधीच अस्तित्वात नव्हते. त्यांना असं वाटतं कारण या राष्ट्राचा आत्मा - हिंदुत्व - त्यांना मान्यच नसतं. जेव्हा सरदार पटेलांनी सर्व संस्थानांना भारतात सामावून घेतलं तेव्हा त्यांनी "एक संस्कृती" यावरच भर दिला होता. केवळ त्या आवाहनावर पाचशेच्या वर संस्थाने भारतात विलीन झाली. भारतात राज्ये अनेक होती पण त्यातील संस्कृती एक होती आणि आहे. अन्यथा दाक्षिणात्य माणसाचे नाव शिवरामकृष्ण का असतं? एका केरळी माणसाने भारताच्या चार भागात मठ का स्थापन केले? मूर्तिपूजक, निसर्गपूजक, विविध दैवतांना मानणारे, वेद नाकारणारे आणि देव/मोक्ष या सगळ्याच संकल्पना नाकारणारे भारतात सुखेनैव राहत होते आणि राहताहेत, त्याचं कारण हिंदुत्वच आहे. या विविधतेत जी एकता आहे ते हिंदुत्व आहे. किंवा मी असं म्हणेन की संघ याच एकतेला हिंदुत्व मानतो. यावर अधिक वाचायचं असेल तर संघाचं एकात्मता स्तोत्र बघावं.

संघ कधीही पुन्हा सतीप्रथा सुरू करा म्हणणार नाही, धर्मातील योग्य सुधारणांना संघाचा कायमच सक्रीय पाठिंबा राहिला आहे (उदा - देवदासी प्रथेविरुद्ध संघाचं/संघ स्वयंसेवकांचं काम बघावं). शबरीमला सारख्या गोष्टी या "धर्म सुधारणा"पेक्षा "पुरातन वारसा" या अशयातून बघव्यात असं संघाचं मत आहे. पण जर बहुसंख्य महिलांनी शबरीमला येथे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली तर संघ त्याला विरोध करणार नाही.

जशी पूर्वी अनेक विद्वानांकडून अनेक पुस्तके, नीती नियम लिहिले गेले आणि भारतात ते सामाजिक धार्मिक नियम म्हणून पळाले गेले, तसेच स्वतंत्र भारतात अनेक विद्वानांच्या विचारमंथनातून नवीन पुस्तक उदयाला आलं - संविधान. त्यामुळे संविधान (बहुमताने नित्य नूतन होणारं) जे सांगतं ते सामाजिक नीती-नियम हा आजचा धर्म आहे. उपसनापद्धती वेगळी असू शकते आणि ती वैयक्तिक/घरापुरती मर्यादित असावी. संविधानापुढे कोणताही धर्मग्रंथ अधिक प्रधान्याचा असणार नाही. हिंदूंमध्येच "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्" हे गीत प्रसिद्ध होऊ शकलं आहे. हेच हिंदुत्व आहे. ज्यात काळाबरोबर बदलण्याची क्षमता आहे.

संघाचं हिंदुत्व हे
- सर्वसमावेशक, सर्वव्यापी
- सुधारणेला कायम वाव असलेलं
- नित्य नूतन (काळाबरोबर, काळानुसार नवीन बाबी मान्य करणारं)
- भारतीय वारसा जपणारं
- आक्रमकांशी झुंज देणारं
- राष्ट्रप्रथम मानणारं
असं आहे!

१.
हिन्दु जगे तो विश्व जगेगा मानव का विश्वास जगेगा
भेद भावना तमस हटेगा समरसता अमृत बरसेगा
हिन्दु जगेगा विश्व जगेगा ।।धृ।।

हिन्दु सदा से विश्व बन्धु है जड चेतन अपना माना है
मानव पशु तरु गीरी सरीता में एक ब्रम्ह को पहचाना है
जो चाहे जिस पथ से आये साधक केन्द्र बिंदु पहुचेगा ॥१॥

इसी सत्य को विविध पक्ष से वेदों में हमने गाया था
निकट बिठा कर इसी तत्व को उपनिषदो में समझाया था
मन्दिर मठ गुरुद्वारे जाकर यही ज्ञान सत्संग मिलेगा ॥२॥

हिन्दु धर्म वह सिंधु अटल है जिसमें सब धारा मिलती है
धर्म अर्थ ओर काम मोक्ष की किरणे लहर लहर खिलती है
इसी पूर्ण में पूर्ण जगत का जीवन मधु संपूर्ण फलेगा ॥३॥

इस पावन हिन्दुत्व सुधा की रक्षा प्राणों से करनी है
जग को आर्यशील की शिक्षा निज जीवन से सिखलानी है
द्वेष त्वेष भय सभी हटाने पाञ्चजन्य फिर से गूंजेगा ॥४॥

२.
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥

कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाडुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥

ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥

कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥

३.
हिन्दु हिन्दु एक रहे भेद भाव को नही सहे
संघर्षो से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे ॥धृ॥

एक ब्रह्म कुछ और नही हरिहर दुर्गा मात वही
देव देविया रूप उसीका देश काल अनुसार सही
सब पन्थों का मान करे सब ग्रंथो से ग्यान गहे
सद्गुरूओं की सीख समझकर जीवन को जीना सीखे ॥१॥

जो भाई भटके बिछडे हाथ पकड ले साथ चले
भोजन कपडा घर की सुविधा शिक्षा सबको सुलभ रहे
उंच-नीच लवलेश न हो छुवा-छूत अवशेष न हो
एक लहू सब की नस-नस मे अपनेपन की रीत गहे ॥२॥

धर्म प्रेम अमृत पीये गीता गंगा गौ पूजे
वेद विहीत जीवन रचना हो राम कृष्ण शिव भक्ति करे
धर्म सनातन अनुगामी बुद्धम्-शरणम्-गच्छामि
अर्हंतोंको नमन करे नित वाहे गुरु अकाल कहे ॥३॥

४.
हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या
धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ॥धृ॥

उच्चनीचता तण जाळावे धगधगत्या कर्तृत्वाने
समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने
खचलेला अभिमान जागवू पिचली हृदये सांधूया ॥१॥

कोणी नाही शत्रू आपूला प्रेमाने अवकाश भरु
चारित्र्याच्या आधारावर हिंदूराष्ट्र हे नव उभवू
समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥

सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा
अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा लाभावा
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥

निज सत्वाची जाणिव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे
परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे
कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥

समाजभक्ति हीच प्रेरणा राष्ट्रभक्ति हे रुप तिचे
देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे
विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥

आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची
माय भूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची
अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥

Tuesday, December 10, 2019

भीती कायद्याची की पोलिसांची

शीर्षटीप - बलात्काऱ्यांना कायद्यात असलेली सर्वात मोठी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. शक्य असेल तर कायद्यात बदल करून गुन्हेगाराला लिंग कापून, चौरंगा करावं असं माझं मत आहे.

हैदराबाद येथील घटनेने मन सुन्न झालं होतं. अशा घटना घडल्या की त्रास होतोच. या केसमध्ये आरोपी लवकर पकडले गेले आणि ते पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना पोलिसांना नाईलाजाने त्यांना मारावं लागलं.

घटना घडल्यानंतर आणि आज एन्काऊंटर ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण सगळे एक समाज म्हणून किती खालच्या इयत्तेत आहोत हे अधोरेखित करतात. सुरुवात आजच्या एन्काऊंटरवरून करूया.

मुद्दा १:
कायदा भारतात नाहीच अशा पद्धतीने कित्येक लोक (ह्यात अनेक मोठे नेते, कलाकार, खेळाडू - एकूण जनमानसावर प्रभाव टाकणारे सुद्धा आहेत) व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा माणसांमुळे आधीच व्यवस्थेवर कमी विश्वास असलेल्या आपल्या समाजाला व्यवस्थेपासून आपण दूर नेत आहोत हे यांच्या लक्षात येत नाहीये. सरकार, GOD FATHER, अब तक छप्पन सारखी समांतर व्यवस्था आपल्याला उभी करायची नसून मूळ व्यवस्थेला सक्षम करायचे आहे. व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नक्षलवादी आहेच. जर असा न्याय आपण स्वीकारत असू तर नक्षलवादही स्वीकारू. आपली निवड सक्षम व्यवस्था असली पाहिजे, सक्षम अधिकारी आपोआप तयार होतील. पण जर व्यवस्थेपेक्षा अधिकारी मोठे ठरत असतील तर व्यवस्था कधीच सक्षम होणार नाही.

या एन्काऊंटरच्या अनेक शक्यता असू शकतात.
१. खरंच आरोपी हल्ला करून पळणार होते, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला.
२. मृतदेह जाळल्यामुळे न्यायवैद्यक चाचणीत बलात्काराचा पुरावा मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले असू शकते.
३. आरोपींमधील बहुदा दोन आरोपी स्वतःला "बाल" म्हणवून घेत असावेत. दिल्लीतील आरोपीप्रमाणे हेही सुटतील असं वाटल्याने पोलिसांनी त्यांना मारलं असावं.
४. कुणीतरी वेगळीच माणसे या केस मध्ये गुंतलेली असावीत. (एका ऐकीव माहितीनुसार पीडित स्वतः पशुवैद्य असल्याने अवैध कत्तलखान्याविरोधात होती. त्यामुळे तिची सुपारी दिलेली असू शकते) अशी नावं बाहेर येतील आणि ते पोलिसांना आणि प्रशासनाला परवडणारे नसेल. यांना मारलं तर सगळी केसच बंद करता येईल.
यापैकी यापुढे केवळ पहिली शक्यता गृहीत धरण्यात येईल आणि फाईल बंद होईल...


 आपल्याला या एन्काऊंटरचा आनंद का होतो -
दिल्लीतील केसमध्ये येत्या काही दिवसात फाशीचा दिवस ठरेल पण तिथे शिक्षा द्यायला जल्लाद उपलब्ध नाही. कठुआ केस अजूनही तपासातच आहे. उन्नाव केस मध्ये आरोपींनी पीडितेसह तिचे कुटुंबच मारून टाकले आहे. कोपर्डी केसमध्ये शिक्षा जाहीर झाली पण अजून त्यापुढील कोणतीच कारवाई नाहीये. केरळमधील ननची तर केस पुढेच गेलेली नाही. तो बिशप सुखेनैव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतोय. या फक्त माहित असलेल्या केसेस आहेत. माहित नसलेल्या हजारो केसेस असतील आणि न नोंदलेल्या तर त्याच्या कित्येक पट...! न्याय देण्यात आणि त्याची अंमलबजावणी होण्यात कित्येक वर्षं निघून जातात. यामुळे अशी एखादी घटना घडली कि त्याचा आनंद होतो.
पण हे लक्षात येत नाही की यातून आपली आधीच कमकुवत असलेली व्यवस्था अधिक कमकुवत होत जाते. गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेची भीती वाटली पाहिजे, पोलिसांची नाही.





मुद्दा २:
आपण एक समाज म्हणून खरंच चांगले आहोत का? कारण हैदराबाद पीडितेवर केवळ याच चार नराधमांनी बलात्कार केला नाही. त्यांच्याशिवाय अजून ८० लाख लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. ८० लाख लोकांनी तिचं नाव पॉर्न साईटवर शोधलं. हे सगळे आपल्याच समाजातील लोक आहेत. अजून किती अधःपतन व्हायचं आहे. जर एन्काऊंटर करणे हाच न्याय असेल तर या ८० लाखांनासुद्धा मारले पाहिजे. एखादीवर बलात्कार होतोय आणि तो पाहावा वाटतो ही कसली विकृती आहे. हे लोक संधी मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष कृती करत नाहीयेत. यांनाही जर संधी मिळाली तर ते नक्कीच बलात्कार करतील.
मुळात बलात्कार हा रोग (disease) नाहीये, ते लक्षण (symptom) आहे. रोग वेगळाच आहे. अजूनही रोग काय आहे ते कळालं नाहीये. काही लोक जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यापासून रोखलं जातं. या गुन्हेगारांना भेटून ही मानसिकता आली कुठून हा शोध घेतला गेला पाहिजे. पण प्रशासन भेटच होऊ देत नाहीत असे अनुभव आहेत.

मुद्दा ३:
सरसकटीकरण आणि धार्मिक/जातीय विभाजन - कठुआ केसच्या वेळी अनेकांनी सरसकट हिंदूंना, देवालयांना आणि देवतांना पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याबद्दल लिहिताना मी लिहिलं होतं ( http://dnyanamhane.blogspot.com/…/i-am-not-ashamed-to-be-hi… )

- लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)
हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

हे टिपिकल फुर्रोगामी लोकांबद्दल होतं. ते असतात सिलेक्टिव्ह. पण त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणारे स्वतःच किती सिलेक्टिव्ह होताहेत हे गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आणि त्याचं वाईट वाटलंय.

Quint सारख्या नाठाळ मीडियावीर त्या पाशाची गरिबी दाखवतात आणि मग विरोधी सूर अधिक भेसूरपणे असा न्याय मागतो.

दिल्ली केस मध्ये मोहम्मद अफरोज "नाबालिक" असल्याने ३ वर्षात सुटला त्याबद्दल हिरीरीने लिहिलं जातं. पण उर्वरित ३ गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही. उन्नाव केसमध्ये कुणी फार बोलत नाही. आत्ताही चार पैकी दोन आरोपी हिंदू आणि दोन मुस्लिम होते. त्यातील फक्त मोहम्मद पाशा बद्दल बोललं जात होतं. पण जे "नाबालिक" म्हणून सुटण्याची शक्यता होती, त्यातील एक हिंदू होता. त्याचं नावही कोणत्या "पोष्टी"त दिसलं नाही. शिवाय "त्यांच्यात" हे "जायज" असतं अशाही पोस्ट्स दिसल्या / whatsapp वर फिरल्या. हा दुतोंडीपणा फुर्रोगाम्यांचा आहे, तो आता या स्वघोषित हिंदुत्ववाद्यांमध्येही येत आहे ही वाईट बाब आहे.

आज संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे व्यक्ती असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. पोलिसांनी खरंच नाईलाज म्हणून गोळीबार केला असेल तरी दुर्दैवाने आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून समाज म्हणून आपण अपयशी होत आहोत हेच अधोरेखित होत आहे.

आपल्या देशाच्या व्यवस्था सक्षम होणं आणि त्यावर सर्व समाजाचा विश्वास असणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.

Friday, November 22, 2019

अस्पर्शित निसर्ग

क्वेरीन नावाची माझी बेल्जियम मध्ये सहकारी आहे. नेदरलँड्सची नागरिक. ती भारतात, विशेषतः दक्षिण भारतात कामानिमित्त काही वेळा जाऊन आलेली आहे. शिवाय भारतीय कंपनीत काम करते म्हटल्यावर तिने भारताची बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिच्याशी गप्पा चालल्या होत्या. त्यात ती म्हणाली की, "दक्षिणेत प्रचंड मोठी मंदिरं आहेत, भारतात इथल्या ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम सारखी मोठी शहरं आहेत आणि शिवाय हत्ती, वाघ, सिंह सुद्धा आहेत. या बहुविधतेचं मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं."

खरंच या भागात कोणतेच वन्यजीव अस्तित्वात नाहीत. मुळात वनेच अस्तित्वात नाहीत. नेदरलँड्स, बेल्जियम आणि कदाचित अजून अनेक देश असे असतील जिथे नैसर्गिक वनराई शिल्लकच नसेल आणि अर्थातच वन्यजीव सुद्धा.

इथे जवळच मोठं प्राणी संग्रहालय आहे. त्यात हत्ती, वाघ, सिंह, गेंडे, जिराफ... खूप प्राणी आहेत. त्यांची प्रचंड काळजी घेण्यात येते. एखाद्या हत्तीणीला बाळ झालं की टीव्हीवर कौतुकाच्या बातम्या येतात. पण हे सगळं होतं मानवाच्या देखरेखीत, नियंत्रणात!

आमची टीना नावाची वयस्क मैत्रीण आहे. तिलाही भारताबद्दल कोण कौतुक. तिच्याशी एकदा अशाच गप्पा चालू होत्या. जवळच एक खूप मोठं उद्यान आहे - व्रैब्रूक पार्क. छान रांगेत लावलेली झाडं, मध्ये तयार केलेलं तळं, लहान मोठी खेळण्यासाठीची मैदानं, पळायला मातीचा उत्तम रस्ता, फक्त गुलाबाचं उद्यान आणि भरपूर गर्दीवाली झाडं. असं सगळं काही त्या उद्यानात आहे. मला तिथे फिरायला, सायकल चालवायला आवडतं. मी त्याचं कौतुक करत होतो. त्यावर टीनाने एका वाक्यात बोळा फिरवला. ती म्हणाली, "कितीही सुंदर असलं ना तरी ते मानवनिर्मित आहे." पुढे म्हणाली, "भारतात जशी जंगलं मानवी हस्तक्षेपाशिवाय आहेत तशी इथे नाहीतच. एकूणच आम्हा युरोपियनांना आहे ते नष्ट करून, मग आमच्या देखरेखीत, नियंत्रणात निसर्ग असलेला आवडतो."


खूप वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंचं "दुस्तर हा घाट" वाचलं होतं. युरोपात पहिल्यांदा येण्याआधी. त्यात नमू आणि वनमाळी लग्न होऊन आम्सटरडॅमला येतात आणि तिथला वनमाळीचा मित्र अलिस्टरशी नमूचीही छान मैत्री होते. वनमाळी पुढे कुठे कुठे फिरत राहतो पण नमू भारतात परतते. तिला भेटायला अलिस्टर येतो. मग ते शेताजवळच्या एका टेकडीवर जातात. तिथे एका दगडावर बसून अलिस्टर भोवताली बघत नमूला म्हणतो, "तुमच्या भारतात मानवी स्पर्शाशिवाय असलेला निसर्ग आहे. आमच्याकडे नाही." जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा, या वाक्यातील भावना १००% कळाली नव्हती. आज कळतीये.

पण भारतात खरोखरीच असा निसर्ग मानव नावाच्या अत्यंत हीन, स्वार्थी, जैवसाखळीत कुठेच नसलेल्या प्राण्याकडून अस्पर्शित राहील? आपला स्वार्थ, आपल्याला जंगलं, नद्या, वन्यजीव यांना आहे तसे - किमान काही भागात राहू द्यायला तयार होईल. याचे उत्तर आत्तातरी नकारार्थी आहे. काही वर्षांनी भारतातला एखादा अलिस्टर, टीना, क्वेरीन परग्रहावरच्या एखाद्याला सांगेल की, "तुमच्याकडे जसा अस्पर्शीत निसर्ग आहे तसा आमच्या पृथ्वीवर नाही..."

असं होऊ नये ही प्रार्थना 🙏🏼

Tuesday, November 12, 2019

परिशोध - एस् एल् भैरप्पा

भैरप्पांच्या ज्या कादंबऱ्या वाचल्या त्यात त्यांना काहीतरी ऐतिहासिक सामाजिक संदेश द्यायचा आहे असं नेहमीच वाटलं. परिशोध ही कादंबरी मात्र याला अपवाद आहे. एका अनाथ मुलाची, विश्वनाथची, वय वर्ष ९-१० पासून ते २७-२८ पर्यंतची गोष्ट यात येते. काळ साधारण १९४८ ते १९६४ आहे.

विश्वनाथ अरसीकेरे हा ९-१० वर्षांचा असताना त्याची आई आणि बहीण प्लेगने मरण पावतात. त्याची आजी (आईची आई) सुद्धा त्याच साथीत मरण पावते. वडील दुसरं लग्न करतात आणि विश्वनाथ "अनाथ" बनतो. त्याला जवळच्या गावातील एक जंगम सांभाळतो. त्याला त्या गावात समदुःखी मित्रही मिळतो. शाळा चांगली सुरू असते, पण विश्वनाथ टुरिंग टॉकीजकडे ओढला जातो आणि त्या गावातून बाहेर पडतो. त्याचे आजोबा (आईचे वडील) त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना तो सापडत नाही.

पुढे विश्वनाथ जीव देण्याचा प्रयत्न करतो पण एका अपघाताने त्यातून वाचतो. मग पुन्हा भिक्षा मागून आणि वाराने जेऊन शिक्षण सुरू होतं. पुन्हा त्यात अडचण येऊन तो एका हॉटेलात काम सुरू करतो. तिथे मिळणारी वागणूक आणि तुटपुंजा पगार याविरुद्ध आवाज उठवण्याच्या प्रयत्न करतो. हॉटेल चालक पोलिसांच्या मदतीने त्याला थर्ड डिग्री देतात पण एका नावाजलेल्या देशपांडे वकिलांची अनपेक्षित मदत मिळते आणि तो सुटतो. पुढे वकिलांकडे काही काळ काम करतो पण तिथेही एक प्रसंग असा घडतो की तो कुणालाही न सांगता तिथून बाहेर पडतो.

त्यानंतर एका संगीत नाटक कंपनीत डेप्युटी मॅनेजरचे काम सुरू करतो. अचानकच त्याला अभिनयाची संधी मिळते आणि ती तो साधतो. चांगला गायक नट म्हणून नावाजला जाऊ लागतो. तेथील अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. ती वयाने याच्यापेक्षा बरीच मोठी असल्याने ती लग्नाला नकार देते आणि त्याच रागात तो नाटक कंपनी सोडून देतो आणि मुंबईला निघतो.

मुंबईत आधी हमाल म्हणून, नंतर व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत राहतो. हे करताना अनेक बरेवाईट अनुभव येतात. शेवटी केवळ पोटापुरतं कमवायचं असं ठरवून आचाऱ्याचं काम करतो आणि उरलेल्या वेळात एका वाचनालयात पुस्तकं वाचतो. त्या वाचनात अनेक प्रश्न पडतात. विशेषतः तत्त्वज्ञान आणि अध्यात्मात त्याला गोडी आहे असं वाचनालयाच्या मालकाला वाटतं. त्यातून त्याची ओळख रंगनाथ स्वामींशी होते आणि तो चिकमंगळूर जवळच्या त्यांच्या आश्रमात येतो. तिथेही त्याला सर्वांचे पाय मातीचे हा अनुभव येतो आणि ती जागा सोडून तो पुन्हा त्याच्या बालमित्राच्या गावी पोहोचतो.

मित्र त्याला मदत करतो. शिक्षण पुन्हा सुरू होतं. लग्नही होतं पण शिक्षणाला सासरे मदत करतील या बोलीवर. सासऱ्यांच्या स्वतःचाच संसार नीट सुरू नसतो. त्यामुळे महिन्याभरात विश्वनाथ बायकोला सोडून मैसूरला जातो. याच दरम्यान त्याची बायको गरोदर राहिलेली असते. बाळाचा जन्म होतो. तरीही विश्वनाथ परतून येत नाही. संध्याकाळी काम आणि दिवसा शिक्षण सुरू ठेवतो. बायको अखेरीस जीव देण्याचा प्रयत्न करते पण त्यात ती वाचते आणि बाळ दगावतं. याचा तिच्यावर आणि जेव्हा विश्वनाथला बातमी कळते तेव्हा त्याच्यावरही खूप खोल परिणाम होतो आणि विश्वनाथ तिला भेटायला येतो. बायको भेट नाकारते आणि आयुष्य पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून जगायचं ठरवते.

विश्वनाथला शिक्षणासाठी मदत करणारे मुख्याध्यापकांना विश्वनाथचा मित्र मध्यस्ती करायला सांगतो. विश्वनाथ देशपांडे वकिलांकडून निघाल्यावर त्यांच्यासारखी डायरी लिहायला सुरूवात करतो. ती डायरी विश्वनाथ बायकोला देतो आणि तीच पुढे मुख्याध्यापकांकडे येते. त्यातून ते विश्वनाथची पूर्ण कथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्यालाच भेटून मग पुढे मध्यस्ती करायचं ठरवतात.

इथे कथा संपते. पुढे काय होतं ते भैरप्पा वाचकावर सोडून देतात.

सगळी कथा ही एक एक पात्र विश्वनाथला शोधत आहेत अशी सांगितलेली आहे. सुरूवातीला कंठीजोईस (विश्वनाथाचे आजोबा) शोध घेतात. मग देशपांडे वकील, नाटकाचे दिग्दर्शक मास्टर, रंगनाथ स्वामी आणि शेवटी मित्र गंगण्णा या पात्रांमधून कथा पुढे सरकते. या शोधामुळे किंवा विश्वनाथला स्वतःला काय करायचं आहे याच्या शोधामुळे कादंबरीचं नाव "परिशोध" असावं...

विश्वनाथ लिहीत असलेल्या डायरीतील एका विचाराचा सारांश - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." हे बहुदा या पुस्तकाचा सार असावं...

Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Monday, October 21, 2019

अहंकार

अहंकार ही अशी गोष्ट आहे जी, ज्याला शोभून दिसू शकते तो बाळगत नाही, ज्याची कुवत नसते तो सगळीकडे घेऊन फिरतो

Tuesday, October 8, 2019

सहज संवाद

श्यामचे वडील घरी येतात. आई पाट मांडते आणि सगळे जेवायला बसतात. आज आई भाजीत मीठ टाकायला विसरते. वडील काहीच न बोलता सगळं जेवण करतात. वडील तसंच खातात म्हटल्यावर मुलंही काहीच न बोलता जेवण करतात. सर्वांची जेवणं झाल्यावर जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे लक्षात येतं. मग तीही बिना मिठाची भाजी खाते...

ही गोष्ट लहानपणी "श्यामची आई" पुस्तकात वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला होता की, भाजीत मीठ नाहीये हे सांगायला श्यामच्या वडिलांना अडचण काय होती. सर्वांच्या ताटात एक एक चिमूट मीठ पडलं असतं आणि सर्वांना सहज चवीचं खायला मिळालं असतं. पण एकूणच यात अनावश्यक त्यागाचे उदात्तीकरण केलंय.

याचे आईवर होणारे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचारच केलेला नाहीये. जर आई निगरगट्ट असेल तर काही अडचण नाही. पण ती तशी नाहीये कारण तिनेसुद्धा भाजी बिना मिठाची खाल्ली. आपण जर चूक केली तर तिची शिक्षा असणार नाही पण कुणी काही न बोलता ते सहन करेल आणि चूक सुधारायला आपल्याला जागाच नसेल ही भावना किती भयंकर आहे. मी आपल्या घरात आपल्याच माणसात एक छोटीही चूक करू शकत नाही हे दडपण तिच्यावर पुढे जन्मभर असेल.

आपल्या माणसांत असताना आपण सहज असलो पाहिजे. आपल्यावर "माझ्याकडून एखादी चूक तर होत नाहीये ना" याचं दडपण असू नये. यासाठी सर्वांनी सहज संवाद ठेवला पाहिजे. कुणी एखादी छोटी-मोठी चूक केली तर त्यावर सोपा उपाय शोधला पाहिजे. न बोलता सहन करणंही नको आणि फाडफाड बोलून शिक्षा करणंही नको.

आजच्या दसऱ्याला अबोलतेकडून सहज संवादाकडे आपल्या सर्वांचे सीमोल्लंघन व्हावे या शुभेच्छा!!!

Thursday, September 19, 2019

सूर्यास्त

जेव्हा एखादा सूर्य भर मध्यान्ही
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.

Tuesday, July 16, 2019

गंगा माँ मंडल

आपल्याकडे महाराष्ट्रात श्री. अ. दाभोलकर यांनी १० गुंठे शेतीप्रकल्पावर खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांची अनेक पुस्तकेही आहेत. "विपुलाच सृष्टी" हे त्यापैकी एक. याच प्रकारे अन्य राज्यांमध्येही प्रयोगशील लोक आहेत. मालपाणी ट्रस्ट, मध्यप्रदेश यांनी "गंगा माँ मंडल" नावाचा एक गुंठ्यातील प्रयोग केला आहे. त्याची माहिती देत आहे.

या प्रयोगात मुख्यत्वे लक्षात घेतलेली बाब म्हणजे कोणत्याही साधारण कुटुंबात (४ ते ५ व्यक्ती) सामान्यतः जो पोषक आहार हवा असतो तो सहज भाज्या आणि फळांद्वारा मिळू शकतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यातून मिळतील. यासाठी १००० चौरस फूट एवढीच जागा लागेल. "गंगा माँ मंडल"मुळे एक कुटुंब विषमुक्त फळ-भाजी आणि घरगुती औषधे यासाठी स्वयंपूर्ण होईल.

याची रचना गोलाकार आहे. यात जाण्यासाठी ७ रस्ते असतील. जेव्हा मंडल पूर्ण होईल तेव्हा रोज सकाळी एका रस्त्याने केंद्रापर्यंत जात पाणी घालायचे (अर्थात कुणाला ठिबक सिंचन करायचे असेल तरी चालेलच). याची रचना अशी असेल की ते पाणी सगळ्या भागात पोहोचेल. पाणी देत असतानाच आपल्याला आवश्यक त्या भाज्या आणि फळे तोडून आणायची. दुसऱ्या दिवशी दुसरा रास्ता आणि नव्या, ताज्या भाज्या फळे तुमच्या जवळ! असं करत सात दिवस सात भाज्या फळे तुम्हाला मिळतील आणि आठव्या दिवशी पुन्हा पहिल्या रस्त्यावरील भाज्या तोडणीयोग्य झालेल्या असतील. हा क्रम अनेक दिवस चालेल. जेव्हा रोपे जुनी होतील तेव्हा ती काढून पुन्हा नवीन लावायची.

गंगा माँ मंडलाच्या केंद्राकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेल असलेल्या फळभाज्या लावतात. बाहेरील सात वाफ्यांमध्ये कांदा, लसूण, मुळा, रताळी आणि बटाट्यासारखी कंदमुळे तसेच टमाटे, भेंडी अश्या फळभाज्या तसेच विशेष म्हणजे अनेक औषधी वनस्पती सुद्धा लावल्या जातात. आतील सात वाफ्यांमध्ये मेथी, मिरची, कोथिंबीर असे मसाले, मूग, तूर, उडीद असे प्रोटिनयुक्त धान्ये लावली जातात. सर्वात आतील गोलात आर्द्रता जास्त असल्याने केळी, पपई लावता येते.

गंगा माँ मंडल बनवण्याची कृती खालीलप्रमाणे (आराखडा चित्रात दिला आहे)
१. जिथे हे करायचे आहे त्या १०००  चौरस फूट जागेच्या केंद्रबिंदूवर खुंटी ठोका. तिथून १५ फूट त्रिज्येचे गोल आखून घ्या. त्यावर राख/चुना घाला म्हणजे ते दिसत राहील.
२. आता दोरीची लांबी हळूहळू कमी करत क्रमाने एक एक गोल आखून घ्या १०.५, ९, ६, ४.५, ३. याही गोलांवर राख घाला.
३. सर्वात बाहेरील गोलांवर १३.५ फुटांवर खुणा करा, सात समान भाग होतील. त्यावरही राख टाकून खुणा स्पष्ट करा.
४. या खुणांपासून केंद्रबिंदूपर्यंत दोरी लावून ४.५ फुटांच्या गोलापर्यंत रेष आखून घ्या. त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना ९-९ इंच मोजून दीड फुटाची जागा रस्त्यासाठी तयार करा. हा रस्ता बाहेरून आतील ४.५ फूट त्रिज्येच्या गोलापर्यंत जाईल. रस्त्यावर हवे असल्यास दगड/फरशी लावता येईल.
५. असेच सात रस्ते करा.
६. सर्वात आतील ३ फूट गोलात एक दोन फूट खोल खड्डा करा. या खड्ड्यात विघटित व्हायला किमान सहा महिने लागतील (उदा - नारळाच्या काथ्या, तुराट्या, झाडांच्या फांद्या, उसाच्या चिवट्या) असे पदार्थ टाका. त्याच्या वर लवकर विघटित होणारे पदार्थ टाका (उदा: वाळलेली पाने, गवत, कापलेले तण). दर एक दीड महिन्यानंतर यातील खत काढून वाफ्यांमध्ये टाकता येईल.
७. सर्वात आतील खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर एक मोठा दगड ठेवता येईल. अंघोळ, कपडे किंवा भांडे धुणे यासाठी तो वापरता येऊ शकेल. याद्वारे ते पाणी वापरात येईल.
८. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बांबूचा मंडप करून त्यावर काथ्याची जाळी तयार करून, त्यावर वेल सोडा.
९. रस्ते सोडून जी जागा आहे त्यात खड्डे करून, माती, लवकर विघटित होईल असा कचरा, शक्य असल्यास तांदळाचा किंवा डाळींचा भुसा, शेणखत/गांडूळखत वापरून भुसभुशीत वाफे तयार करा. त्यावर जीवामृत टाका ज्याद्वारे जमिनीतील जीवाणू वाढतील. सर्व वाफे एकमेकांना जोडा, म्हणजे पाणी सगळीकडे जाऊ शकेल.

गंगा माँ मंडल तयार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. वेल वर्गीय भाज्यांना खूप जास्त वारं सहन होत नाही. त्यामुळे गंगा माँ मंडल वेगवान वारं नसेल तिथे तयार करावं.
२. इथे जास्तीत जास्त वेळ ऊन असले पाहिजे.
३. प्राण्यांपासून योग्य संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे शक्यतो याच्या भोवती कंपाउंड असावे.
४. घरगुती वापरातील खराब पाणी (अंघोळ, कपडे-भांडी धुणे) सहजपणे यात जाऊ शकले पाहिजे. या पाण्यात शक्यतो रसायने जाऊ नयेत. यासाठी साबण वापरावर जरा बंधन येईल.
५. वेलभाज्या या मंडपावरच वाढवाव्यात. रस्त्यात अथवा वाफ्यात नको. म्हणजे भाजीचा दर्जा चांगला राखला जाईल.
६.  गंगा माँ मंडल स्वयंपाकघराजवळ केल्यास तेथील पाणी, जैविक कचरा सहजपणे गंगा माँ मंडलात टाकणे सोपे जाईल.


चित्रातील आराखड्यात दिल्याप्रमाणे तुम्ही भाज्या आणि अन्य वनस्पती लावू शकता. पण तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार यात बदलही करता येईल. या १००० चौरस फुटात सुमारे ४० ते ५० प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत. या नवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!

ही सर्व माहिती येथून घेतली आहे
तयारीचा फोटो फेसबुकवरील पोस्ट मधून घेतले आहेत

यातील औषधी वनस्पतींची माहिती खालील दुव्यांवर मिळेल -

Monday, July 8, 2019

मशीन लर्निंग आणि समाजमन

बऱ्याचदा त्र आणि ञ मध्ये खूप लोक गडबड करतात. छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला जातो. यावर बऱ्याचदा गमतीदार टीका होते, विनोद होतात पण एकदा वापर करायला सुरुवात झाली की अनेकांनी त्र च्या जागी "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" लोकांनी छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला. त्याने झालं असं की गूगल इंडिक की-बोर्ड वर जेव्हा आपण छत्रपती हा शब्द लिहितो, तेव्हा छञपती हा शब्द देखील सुचवला जातो. याचं कारण गूगल इंडिक की-बोर्ड हा मशीन लर्निंग इनेबल्ड आहे. म्हणजे जे शब्द टाईप केले जातात ते शब्द तो लक्षात ठेवतो आणि नंतर सुचवतो. अजून तरी जास्त लोक छत्रपती वापरतात. जेव्हा जास्त लोक छञपती वापरतील तेव्हा डिफॉल्ट आपल्याला छञपती शब्द दिसेल.

अगदी असंच समाजमन काम करत असतं. कुणीतरी एखादी चूक करतो. त्याला एकूणच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" या नावाखाली फारसा विरोध होत नाही. मग तीच, तशीच चूक अजून काही लोक "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" करतात. हळूहळू समाजमन त्याला मान्यता द्यायला लागतं. मग मान्यतेनंतर त्याचा गौरव केला जातो, नंतर तेच करणारे श्रेष्ठ असाही प्रचार होतो आणि मग योग्य करणारे लोक हे प्रतिगामी वगैरे होत जातात. त्यामुळे जर चूक असेल तर ती चूक आहे हे दाखवून दिलं पाहिजे आणि ती चूक ग्लोरिफाय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उगाच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" वगैरे नावाखाली मान्यता देणे हे समाजमनाचे मशीन लर्निंग असते हे लक्षात ठेवले पाहिजे!

Tuesday, June 25, 2019

भारतीय जल वन संवर्धन ६ - समारोप

काही वर्षांपूर्वी व्हिएतनामला गेलो होतो. तिथे एका शेतकऱ्याच्या कृषी पर्यटन केंद्रावर राहिलो होतो. मग साहजिक त्या शेतकऱ्याशी गप्पा झाल्या. तेथील पाऊस हा आपल्यासारखाच ४ महिने पडतो. त्यातही जुलै ऑगस्ट मध्ये जास्त असतो. बाकी वर्षभर पाऊस पडत नाही. तरीही ते लोक वर्षभर झऱ्याचं पाणी पितात. सोबत त्या गावाच्या जवळ असलेल्या धबधब्याचा मे महिन्यातला फोटो दिलेला आहे. कारण त्या धबधब्यांच्या आणि झऱ्यांच्या भोवताली दाट जंगल टिकून आहे.



मागच्या वर्षी मे महिन्यात आमचे मित्र विशाल आणि मीनाक्षी व्यास यांच्या शेतावर गेलो होतो. शेत साताऱ्याच्या जवळ आहे. तिथे असलेल्या पांदीजवळ एक झरा भर उन्हाळ्यात वाहता होता. स्वच्छ पाण्याचा खळखळ आवाज सुखावत होता. तेथील पांदीचा (झऱ्याचा मिळाला नाही) फोटो सोबत आहे. त्यात सहज दिसेल कि भोवताली छान झाडं आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात, खुलताबादहून म्हैसमाळकडे जायला निघालो कि घाट सुरु होण्याआधी उजवीकडे लंबेश्वर नावाचे शंकराचे मंदिर (गुहा) आहे. त्या गुहेच्या बाजूला साधारण २० वर्षांपूर्वी वर्षभर वाहणारा झरा/धबधबा होता. आज दिवाळीच्या आधीच तो कोरडा असतो. कारण त्या डोंगरावर आता जे पावसाळी गवत यायचं ते आता येत नाही आणि मोठी झाडं केव्हाच तोडली गेली आहेत.

आमच्या गावाची नदी/ओढा पावसाळ्यात एवढा जोरदार वाहायचा की माझी मावशी तिच्या लहानपणी त्यात वाहून जाणार होती. नंतर मार्च/एप्रिल पर्यंत त्यातून पाणी वाहत असायचं. नंतरही वाळूत एखाद्या फुटाचा खड्डा केला तर पिण्यायोग्य पाणीसहज मिळायचे. मे महिन्यात असा खड्डा करून पाणी पिल्याचे मलाही आठवते. आईच्या लहानपणी या ओढ्याच्या आजूबाजूला एवढी झाडी होती कि तिथे दिवसाही लोक सोबत असेल तरच जायचे. बिबट्या सहजच दर्शन देऊन जायचा. आता तुकड्या तुकड्यात झाडं आहेत पण सलग झाडी कुठेच नाही. त्यामुळे आज सप्टेंबर मध्येच कोरड्या झालेल्या ओढ्यातून एखादा लहान गुराखी गुरं घेऊन फिरतो...

दुष्काळ निवारणासाठी आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. आज युरोपात सगळीकडे नद्या जोडलेल्या आहेत आणि तरीही मागील काही वर्षांत इथे सतत दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षीपासून आम्ही बेल्जियम मध्ये आहोत. इथे उन्हाळ्यात पाणी वापरावर निर्बंध असतात. पूर्वीची इथे जी जंगले होती ती तोडून फायद्यासाठी वेगात वाढणारे सूचिपर्णी वृक्ष इथे लावले गेले. त्यातून उत्पन्नही मिळायचं. पण त्याचा दुष्परिणाम मोठा झाला. या भागात मोठ्या प्रमाणात पानगळीचे वृक्ष असायचे. ती पाने जमिनीवर लवकर कुजायची आणि त्यात पाणी थांबून थांबून वाहायचं आणि जमिनीत मुरायचं. सूचिपर्णी वृक्षांची पाने जमिनीवर पडली तर ती लवकर कुजत नाहीत आणि पाणी त्यावरून वाहून जातं. इथल्या जमिनीला ते नकोय... आता येथील सरकारने नवीन वृक्ष लावताना केवळ स्थानिक पानगळीचे वृक्ष लावण्याची सक्ती केली आहे.

सोबत चित्रलेखा वैद्य यांची आकाशवाणीवरील मुलाखत आणि माहितीचा व्हिडीओ दिला आहे. त्यात त्यांनी सांगितलेली चिंताजनक बाब ही आहे की भारत हा सर्वाधिक भूजल उपसा करणारा देश आहे. इस्रायल मध्ये भूजलावर सरकारचा हक्क असतो. कुणीही विहिरीतून/बोअर मधून हवे तेवढे पाणी उपसू शकत नाही. युरोपात माझ्या एका मित्राला गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या प्लॉटवर बोअर करायचा आहे. त्याला ती परवानगी मिळत नाहीये. भारतात भूजल उपशावर नियंत्रण तर नाहीच, पण जमिनीला भोकं पाडण्यावर सुद्धा कोणते बंधन नाही. एका सोसायटीत आपण १० बोअर केलेले असतात. आपल्याकडे विहिरी ५० ते ७० फुटाच्या असतात. तेथील भूजल हे दर वर्षी पुन्हा भरते. बोअर २००-२५० फुटापेक्षा जास्त खोल असतात आणि काही भागात तर ३००-४०० फूट खोल असतात. ते पाणी गेल्या ५००-१००० वर्षात जमा झालेले आहे. ते आपण उपसून निसर्गाची नेमकी काय हानी करत आहोत हे अजून कळायचे आहे. त्या पाण्यामुळे कदाचित भूकंप होत नसतील... किंवा काहीही असू शकतं. पण आपण एवढे करंटे आहोत की याचा कोणताही विचार न करता जो बोअर वाला ५०० फूट खोल जाईल त्याला काम देतो. शिवाय बऱ्याच कंपन्या बोअर करून त्यांचे दूषित पाणी सरळ बोअरमधून टाकून देतात आणि भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात.

भारतात किंवा महाराष्ट्रात नेमकं झालंय काय... पाऊस फार कमी नाही, पण अनियमित झाला हे नक्की. जेवढा पाऊस ४ महिन्यात पडायचा तो आता दोन महिन्यात, त्यातही काही दिवसांत पडतो. म्हणजे पावसाचे प्रमाण तेवढेच आहे, पण तरीही नदी/झरा/ओढ्यातील पाणी दिवाळीच्या आधीच संपून जाते. त्याचं साधं कारण म्हणजे आपण पाण्याला वेगात जाऊ देऊन मोठ्या जलाशयात अडवत बसलो. पाणी थांबवायचं नसतं तर त्याची केवळ गती कमी करायची असते. हा साधा निसर्गनियम आपण विसरून गेलो. पाणी सावकाश वाहिलं तर ते जमिनीची तहान भागवून पुढे जातं. पाण्याची गती कमी करण्यासाठी आणि त्याचं बाष्पीभवन होऊ नये, म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. फक्त खड्डे करून काहीच होणार नाही. एकूण वृक्षतोड इतकी प्रचंड आहे की यावर आता मोठी जन चळवळ करूनच मोठी वृक्षलागवड करावी लागेल. सरकारी पातळीवरून काही होईल याची वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाहीये.

मग करायचं काय...
१. आपल्या आजूबाजूला जी नदी, ओढा, झरा किंवा पाणंद असेल तिच्या भोवती स्थानिक झाडे लावली टिकवली गेली पाहिजेत.
२. जे काही बंधाऱ्याचे कामं झाले असतील त्या बंधाऱ्याजवळ झाडं आणि अगदी पाण्याजवळ गवतवर्गीय वनस्पती लावल्या पाहिजेत. परिणिता दांडेकर यांची पोस्ट बघा.
३. आपल्या गावात, शेतात, कॉलनीत जिथे जागा मिळेल तिथे, अगदी काही गुंठे असेल तरीही, सोप्या पद्धतीने निसर्गबेट निर्माण केले पाहिजे.


काय आहे निसर्गबेट?
सध्या शब्दात - वटवृक्ष, फळझाडे, संरक्षक झाडे, फुलझाडे आणि गवतवर्ग असे पाच वनस्पती प्रकारांचे आदर्श मिश्रण. यात एकरी प्रमाण: वटवृक्ष (५), फळझाडे (२००), संरक्षक झाडे (१००), फुलझाडे (१० गुंठे) आणि गवतवर्गीय (५ गुंठे). प्रमाण एकरी दिलं असलं तरी १० गुंठ्यांपासून निसर्गबेट बनवता येतं. पाण्याची उपलब्धता आणि निसर्गबेटाच्या आकारानुसार पाणी-गरजेचा ताळेबंद ठरवून उपाययोजना जसे की, तलाव/कुंड, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, समतल चर आणि बांधबंदिस्तीने जलसंधारण. हे निसर्गबेट वैयक्तिक, सामूहिक/सहकारी, भांडवली अथवा सरकारी स्तरावर सहज करता येऊ शकेल. निसर्गबेटाचे थेट आणि अप्रत्यक्ष अनेक फायदे आहेत. थेट फायद्यांमध्ये फळे, फुले भाजीपाला व्यवसाय करता येईल. अप्रत्यक्ष फायद्यांमध्ये कीड नियंत्रण, उंदीर/घूस नियंत्रण, मित्र कीटक वाढणे, जमिनीतील ह्युमस वाढणे, जमिनीची जलधारण क्षमता वाढणे असे अनेक फायदे आहेत. निसर्गबेटाचा ढोबळ आराखडा सोबत दिला आहे. त्यात आपापल्या गरजा आणि परिसर अभ्यास करून बदल करता येऊ शकतात. तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपेंद्र दादा, डॉ उमेश मुंडल्ये किंवा अशा अभ्यासू मंडळींशी संपर्क साधावा.

हा पावसाळा खूप उशीरा सुरू होत आहे. पुढचा अजून किती वाईट असेल सांगता येत नाही. त्यामुळे ही सगळी कामे आजच सुरू केली पाहिजेत. "पुढच्या पावसाळ्यात करू" असा विचार हा अविचारच असेल.

या लेखमालेचा शेवट नलेश पाटलांच्या कवितेने करतोय... विचार तर कराच पण कृतीही लवकर करा... धन्यवाद!

माझ्या झाडांची हिरवी किती सांगू मी थोरवी
तुम्हा देऊन सावली ऊन माथ्यास मिरवी

असा निमूट सोसला ताप दिसभर जरी
सांज होताच मायेने घेती पाखरांना उरी

पाय मातीचेच तरी आकाशाला गवसणी
झाडांमुळेच ह्या माझ्या मिळे पावसाचे पाणी

ऊन पाऊस वादळ धरी भोवताली फेर
फक्त झाडांनाच नाही त्यांचे स्वतःचे घर

नाही स्वतःहून कधी त्यांनी मागितले पाणी
कधी कळलीच नाही त्यांची सळसळ वाणी

वर्षभरात एकदा फक्त ढाळतात पाने
त्या पिवळ्या आसवाने तेव्हा जळतात राने

दुःख गिळोनिया पुन्हा फुलतात फळतात
घाव कुऱ्हाडीचे तरी जन्मभर छळतात

त्यांची करुनी कत्तल तुम्ही थाटली शहरे
सुकुमार भुईवरी त्यांचे बकाल शहारे

काय पाप त्यांनी केले तुम्हा सावली देउनी 
अर्धी लाकडे त्यांचीही गेली सरण होऊनी

पुढे लागणार नाही एक थेंबसुद्धा ओठी
खेळ सरतेशेवटी मांडा वाळवंटी काठी... 

Monday, June 24, 2019

भारतीय जल वन संवर्धन ५ - बारव

समाजभान, धार्मिकता, तंत्रशुद्धता, जलव्यवस्थापन आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र याचा सर्वोत्तम मिलाफ म्हणजे बारव. बारव बांधून देणे हे सामाजिक - धार्मिक काम असायचे. ती बांधताना भूजल किती आणि कुठे असेल याचा अचूक अंदाज बांधला जायचा. ते भूजल कसे टिकून राहील यासाठी नियम असायचे आणि स्थापत्यशात्राने ती बारव नयनरम्य, शांत आणि भर उन्हात प्रसन्न थंडावा असायच्या.

परमार राजा भोजाने ‘समरांगण सूत्रधार’ या इ.स. १००० मधील ग्रंथात बारवांची उपयुक्तता, त्यातील पाण्याची शाश्वतता आणि बारव-रचना याबाबत नियम लिहून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत बारवांना कायमस्वरूपी पाणी राहण्यासाठी भूजलस्रोतांचे संशोधन आणि पुनर्भरण कसे करावे याबाबत चांगले मार्गदशर्न केले आहे. त्यावर काटेकोर अंमलबजावणी केल्याने बारवा या अखंड-जल-सौभाग्यवती राहत होत्या. महाराष्ट्रातील बारवांची निर्मिती ही मुख्यत्वे यादवकाळात झाली होती.





मराठवाड्यात अत्यंत जुन्या आणि सुंदर बारवा या कंधार (राष्ट्रकूट राजांची उपराजधानी), येरगी, धर्मपुरी, गणेशवाडी (चालुक्य सामंतांनी विकसित केलेली नगरे) अंबाजोगाई, चारठाणा, अंबड यांसारखी यादवकालीन जुन्या गावांमधून दिसतात.

त्या आजही वापरण्यायोग्य आहेत. यादव काळानंतर महाराष्ट्राला एका नवीन सांस्कृतिक आक्रमणाला तोंड द्यावे लागले. येथे संपूर्ण विध्वंसाची लाट आली. तेव्हा अशा स्थानांचे महत्त्व लोप पावले. मंदिरे, मूर्ती नष्ट केल्या गेल्या, पण उपयुक्ततेचे शाश्वत मूल्य असलेल्या बारवा मात्र काहीशा उपेक्षेने का होईना जतन केल्या गेल्या. त्यांचे पावित्र्य संपवले गेले, पण बारवनिर्मितीचा मूळ हेतू व नगररचनेतील त्यांचे स्थान कायम राहिले. बारवेजवळ किंवा आत मातृदेवता असतात - उदा: आसरा, चौसष्ट योगिनी. संस्कृतीच्या संदर्भात बारव स्थापत्याचे विशेष महत्त्व आहे. या बारवांच्या जवळ कुठेतरी ओढा असतो, कधी फार जुना तलाव असतो, एखादा डोंगर आणि त्यातून वाहणारा झरा असतो. हे स्रोत बारवेला जलसंपन्न करतात.

इस्लामी राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्यानंतर पुन्हा बारवांचे महत्त्व राज्यकर्त्यांना उमगले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करताना त्यासोबत बारव बनवली. शिवाय अनेक गावांमध्ये बारव उभ्या केल्या. महाराष्ट्रातून काशीकडे जाणाऱ्या रस्त्यात प्रत्येक गावात लोकांना राहता येईल अशी मंदिरे/धर्मशाळा आणि सोबत पाणीव्यवस्था म्हणून बारव बनविण्यात आली. आजही या बारवा आपल्याला उत्तमरित्या पाणी पुरवठा करू शकतात. पण आपण त्यांना केवळ उपेक्षा देत आहोत.

बहुतेक सगळ्या गावांमधून आता नळाने पाणी घरापर्यंत येते. ते टाकीत जाते कोणत्यातरी धरणातून किंवा जवळच्या तलावातून. मग उन्हाळ्यात शहराची तहान भागवायची असल्याने पाणी शहराकडे जाते आणि गावांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ज्या जुन्या बारवा आहेत त्या आपण गावकऱ्यांनी कचराकुंडीसारख्या वापरायला सुरुवात केली आहे. जी बारव कुप्रसिद्ध ७२च्या दुष्काळात सुद्धा आटली नाही ती आज कचरा, प्लास्टिक आणि माती/दगड ढासळून वापरण्यासारखी राहिली नाही. ज्या ज्या गावांमध्ये बारव आहेत, त्यांनी ठरवले आणि ती बारव पुन्हा स्वच्छ केली तर निश्चित तेथील पाणी प्रश्न संपुष्टात येईल.

आम्ही पूर्वी औरंगाबाद मध्ये सिडको एन ६ मध्ये राहत असू. तेथे सिद्धार्थ चौकातून महाराणा प्रताप चौकाकडे जाताना एक बारव होती उजव्या हाताला. तिची कचराकुंडी झालेली होती. आमच्या गावात देखील जुनी बारव आणि खोल आड आहे. पण आज दोन्ही वापरात नाहीत आणि बारवेची पडझड झालेली आहे. सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर बारव आणि आड दोन्ही नीट करता येतील.

औरंगाबाद येथे श्री किशोर शितोळे यांची जलदूत नावाची संस्था आहे. त्यांनी तेथील सातारा आणि मुकुंदवाडी येथील बारवांचे पुनरुज्जीवन घडवून आणले (खाली लिंक्स दिल्या आहेत). आज त्या बारवा भर दुष्काळात पाणी देत आहेत. गरज आहे केवळ प्रेमाने आपल्या भारतीय परंपरेला सांभाळण्याची. गरज म्हणून तरी याकडे आपण बघितले पाहिजे.

बारवांवर लोकप्रभामध्ये उत्तम लेख आले होते. त्याच्या लिंक्स
१. पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
२. बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
३. आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव

औरंगाबाद येथील जलदूतच्या काही बातम्या
१. ऐतिहासिक बारव पाण्याने ओसंडणार
२. साताऱ्यातील बारवेचे पाणी पिण्यायोग्य

Tuesday, June 18, 2019

राजांच्या सभेला जाऊ या

झुकूझुकू झुकूझुकू आगीनगाडी
तोंडाच्या वाफा हवेत सोडी
पडती काँग्रेस पाहूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।धृ।।

राजांच्या सभा मोठ्या
'लाव रे व्हिडीओ'चा खाक्या
भाषण एन्जॉय करू या
राजांच्या सभेला जाऊ या ।।१।।

राजांचे इंजिन धुरकट
वास येतो जळकट
चिकन सूप पिऊया
राजांच्या सभेला जाऊ या ।।२।।

सभांना नुसतीच गर्दी
नाही मतांची वर्दी
कार्यकर्ते शोधूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।३।।

काका होता तालेवार
त्याचा नुसताच मिजास फार
बारामतीत नाचूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।४।।

- ज्ञानेश

Monday, June 17, 2019

भारतीय जल वन संवर्धन ३ - पंचवटी

पंचवटी हे नाव ऐकल्यावर सर्वप्रथम कुणाही भारतीयाला सहज रामायण आठवेल. राम, सीता आणि लक्ष्मण जिथे राहिले, जिथून रावणाने सीतेचे हरण केले, जिथे बलशाली गिधाड जटायूची रामाशी ओळख व मैत्री झाली... ती पंचवटी!

पंचवटी म्हणजे - पंचानां वटानां समाहार इति पंचवटी  - पाच वृक्षांना सामावून घेणारी.

पाच हा अंक एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी दिसतो.
पाच तत्त्व - पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
पाच ज्ञानेंद्रीय - डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा
पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष
पंचप्राण - प्राण, व्यान, समान, उदान, अपान
पंचशील - अहिंसा, अचौर्य, अव्याभिचार, सत्य, नशा न करणे
कोणत्याही बाबीची परिपूर्णता पाच या अंकाने होते. तसेच मोठ्या जंगलाचे परिपूर्ण लघुरूप म्हणजे - पंचवटी.

वड, पिंपळ, बेल, सीता अशोक आणि आवळा ही झाडे विशिष्ट पद्धतीने लावून पंचवटी वन तयार करता येते. या पाचही वनस्पतींचे औषधी गुण आहेत, या वनस्पती वातावरण शुद्ध ठेवतात, मोठ्या प्रमाणात सावली देतात, सीता अशोक हा सदा हरित असतो. या झाडांचे धार्मिक महत्त्वही आहे. बेलपत्र महादेवाचे तर पिंपळ विष्णूचे आवडते झाड आहे. अशोक म्हटले की रावणाच्या कैदेत असून मुक्त असलेल्या सीतेची आठवण होतेच. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही ही झाडे उपयुक्त आहेत. कृमी, कीटक, मुंगळे/मुंग्या, पक्षी आणि अन्य लहान मोठे प्राणी या झाडांच्या आधारे राहतात वाढतात. कारण बेलफळ उन्हाळ्यात मिळते, तर आवळा पावसाळ्याच्या शेवटापासून पूर्ण हिवाळ्यात मिळतो. त्यामुळे पंचवटीच्या भोवताली कायम पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच असतो.

पंचवटीचेही दोन प्रकार आहेत
१. पंचवटी - यात पाचही झाडे एक एक लावावीत. केंद्र स्थान निश्चित करून १० मीटरचे वर्तुळ करावे. उत्तरेला बेल, पूर्वेला पिंपळ, आग्नेयेला अशोक, दक्षिणेला आवळा तर पश्चिमेला वड लावावे.

२. बृहद् पंचवटी - यात ४ पिंपळ, २ आवळे, २५ अशोक, ४ वड आणि ४ बेल असे ३९ झाडे  लावावीत. यातही केंद्रस्थान निश्चित करून ५, १०, २०, २५ आणि ३० मीटर त्रिज्येचे वर्तुळ आखून घ्यावे. सर्वात बाहेरच्या गोलावर चार दिशांना चार पिंपळ, त्या आत दक्षिणेला दोन आवळे, त्याच्या आत सामान अंतरावर गोलाकार २५ अशोक, चार उपदिशांना (ईशान्य, आग्नेय, नैऋत्य व वायव्य) वड आणि सर्वात आतील गोलात मुख्य दिशांना चार बेलाची झाडे लावावीत.

साधारण ५ वर्षात ही झाडे स्वावलंबी होतात (पुन्हा पाणी घालण्याची वा अन्य काळजी घेण्याची गरज उरत नाही). त्यानंतर मध्यभागी आपण आपल्याला ज्यात रुची असेल ते करू शकतो - उदा: ध्यानकक्ष, मंदीर, निवांत बसायला ओटा किंवा अजून काही.

पुण्यात गोखले नगर येथे वन उद्यानात पंचवटी वनासह अनेक प्रकारचे जैववैविध्य असलेले उद्यान विकसित केलेले आहे.

Thursday, June 13, 2019

भारतीय जल वन संवर्धन २ - नक्षत्रवन

सत्तावीस मधून नऊ वजा केले तर नेहमीच्या गणितात अठरा उरतात. परंतु बिरबलाने याचं उत्तर शून्य दिलं आणि ज्याने आव्हान दिलं त्याला हरवलं. कारण सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ नक्षत्रात पाऊस पडतो. जर पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य असणार आहे.

मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत पाऊस असतो. गेल्या काही वर्षात आणि याही वर्षी मृग नक्षत्र कमी पावसाचे जात आहे. महाराष्ट्रात रोहिणी नक्षत्रात (२२ मे ते ६ जून) पूर्वमौसमी पाऊस पडायचा. तेव्हा वर्तमानपत्रात "रोहिण्या बरसल्या" अशी हमखास बातमी असायची. तो आता मृग नक्षत्रात पडतो. म्हणजे सत्तावीस मधून एक वजा झालेला आहे, शून्य बाकी राहायला अजून आठच राहिलेत!

भारतीय संस्कृतीत पर्यावरणाचा विचार केलाय. राशी आणि नक्षत्र यांना वृक्षांची जोड दिली आहे. माणूस जन्मतो तेव्हा त्याची जन्मकुंडली तयार करण्याची प्रथा आहे. त्यात रास व नक्षत्र कळते. त्या व्यक्तीने त्या नक्षत्राचे जे झाड आहे ते लावावे आणि वाढवावे अशी व्यवस्था नक्षत्रवन संकल्पनेत केली आहे. यात व्यक्तिगत आपण काही झाडे लावू शकतो, किंवा संपूर्ण गाव मिळून नक्षत्रवन तयार करू शकते. नक्षत्रवनाचा संपूर्ण अभ्यास सुभाष बडवे यांनी केला आहे. त्यांच्या अभ्यासातून सिद्ध झालेले पुस्तक म्हणजे नक्षत्रवन. या पोस्टसोबत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ देत आहे.









त्याशिवाय राशी/नक्षत्रानुसार झाडे आणि पर्यायी झाडांचीही यादी आहे. इच्छूकांनी पुस्तक मिळवून वाचा.


निगडी प्राधिकरण पुणे येथे सेक्टर २८ मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. त्यात नक्षत्रवनाच्या आधारे झाडे लावली आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या उद्यानाला नक्की भेट द्या.

नक्षत्रवनाप्रमाणेच नवग्रह वाटिका सुद्धा पूजेसाठी तयार करता येते.

सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आपल्या राशीची/नक्षत्राची झाडे लावा आणि वाढवा. चांद्र आणि सौर राशी आणि जन्म नक्षत्र यावर आधारित झाडे लावायची ठरवली तर किमान पाच झाडे लावून होतील. शक्य असेल तर गावाने/कॉलनीने एकत्र येऊन त्या पुस्तकातील आराखड्यानुसार संपूर्ण नक्षत्रवन तयार करा.

पुढील भागात पंचवटीवनाबद्दल थोडी माहिती.

भारतीय जल वन संवर्धन १

आमचं गाव औरंगाबाद जिल्ह्यातील. बिडकीन DMIC जवळ. दुष्काळ नेहमीचा म्हणावा असा झालेला. गेल्या वर्षी आमचा बंधारा पूर्ण झाला. पण एकच मोठा पाऊस पडल्याने बंधाऱ्यात साठलेलं पाणी महिनाभरात जिरून, वाहून, वाफ होऊन संपलं. सध्या विहिरी कोरड्याच आहेत. एखाद्याच विहिरीला पाणी आहे.

जिल्ह्यात आणि एकूण मराठवाड्यात पाणी फाऊंडेशनचे काम खूप झाले. सगळीकडे CCT चर केलेले असतात. पावसाळ्यात त्यात पाणी साठलेले दिसते आणि उन्हाळ्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती. कारण पाणी जमिनीत जिरण्यापेक्षा त्याचे बाष्पीभवन जास्त होते. Awareness वाढणं आणि एकत्र येऊन श्रमदान करणं याशिवाय पाणी फाऊंडेशनच्या कामातून फार काही हाती लागलेलं दिसत नाही.

पण एकूण सेलिब्रिटी काम असल्याने शासनावर या कामाचा खूप परिणाम झालेला आहे. या वर्षी आमच्या गावात शासनाने JCB पाठवले आणि सगळ्या शिवारांच्या बांधाजवळ मोठे चर खोदले. त्यात बांधाजवळ जी मोठी झाडे आहेत त्यांची मुळं उघडी पडली/तुटली. ती झाडं आता किती टिकतील हे माहीत नाही. एकूण या कामामुळे दुष्काळ कमी होण्याऐवजी वाढेल हीच शक्यता दिसते.

फेसबुकवर उपेंद्रदादा Upendra Dada, डॉ उमेश मुंडल्ये DrUmesh Mundlye यांचे लेख / दिलेली माहिती आणि त्यांचं बरंच साहित्य वाचत असतो. शिवाय नक्षत्रवन सारखी पुस्तके वाचलीत. उपेंद्र दादांशी पाणी फाउंडेशनचं काम, मियावाकी, देवराई यावर वादविवाद पण झाले. यातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एकूण सामान्य जनतेची भारतीय वनपरंपरा, जलपरंपरा यात असलेली माहिती तर कमी आहेच, शिवाय श्रद्धाही कमी होत चालली आहे.

मी पूर्वी मियावाकी वननिर्मितीची माहिती दिली होती. त्याला प्रतिसाद सुद्धा छान मिळाला होता. तो प्रयोग आम्ही आमच्या शेतावर करतोय त्यामुळे ते सांगणं सोपं होतं. आता उपेंद्रदादांच्या माहितीवर आणि माझं जे वाचन झालं आहे त्यावर आधारित भारतीय वन/जल परंपरांच्या बाबतीत लिहावं असा विचार आहे. या गोष्टी बघितलेल्या, वाचलेल्या आहेत - केलेल्या नाहीत. त्यामुळे लिहिणं अवघड असेल.



यात पंचवटीवन, देवराई, पाणंद (पांदी), नक्षत्रवन, बारव, तलाव यावर लिहिण्याची इच्छा आहे. या पावसाळ्यात यातील काही बाबी जर कुणाला प्रत्यक्षात आणता आल्या तर लिहिल्याचे सार्थक होईल.

Sunday, May 12, 2019

मातृदिन

बारा तेरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा युरोपात आलो. येथील काही स्थानिक लोकांशी मैत्री झाली आणि ऑफिसमध्येही स्थानिकांशी ओळखी झाल्या. मग एक एक करत भारतीय आणि युरोपियन सांस्कृतिक जवळीक दिसू लागली. भाषा ही एक गोष्ट तर आहेच पण त्याशिवाय सण आणि त्यातील साम्यस्थळे सहज दिसू लागली.

उदाहरण द्यायचे झाले तर इथे गुड फ्रायडे पेक्षा अधिक महत्व ईस्टर मंडेचे असते. हा वसंतातला पहिला सण. पक्षी अंडी देतात आणि पिले बाहेर पडतात तो काळ. त्यामुळे इथे एकमेकांना अंडी/चॉकलेटची अंडी देण्याची परंपरा आहे. ती अजूनही सुरू आहे. शाळेच्या सुट्ट्या या सणांशी आणि सण शेतीशी निगडीत आहेत, म्हणजे पेरण्यांच्या सुट्ट्या, सुगीच्या सुट्ट्या. आपलेही सण हे शेतीशी जोडलेले आहेत. ईस्टर मंडेच्या आगे मागे आपला नववर्षाचा काळ असतो.

इथे हॅलोविन साजरा होत नाही, नीट पितृपक्ष असतो आणि शेवटचा दिवस, १ नोव्हेंबर, all saint day सर्वपित्री (पितृ) अमावस्या... १५ ते ३१ ऑक्टोबरच्या पंधरवड्यात लोक आपल्या सुहृदांना घरी जेवायला बोलावतात. आपल्या पूर्वजांच्या थडग्याला भेट देतात. आपला पक्ष पंधरवडा आणि हे दिवस साधारण सोबत येतात. पण काही मोठ्या शहरात हॅलोविन साजरा होतो त्याला स्थानिक लोक संस्कृतीवर होणारे पाश्चिमात्य आक्रमण म्हणतात.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कालचा मातृदिन. इथे १५ ऑगस्टला युरोपियन मातृदिनाची सुट्टी असते. इथला एक कलीग, क्रिस, त्याच्यासोबत गप्पा मारताना भारतात पण सुट्टी आणि इथे पण... मग त्याला स्वातंत्र्यदिन सांगितला. नंतर त्याला आपल्या भारतीय मातृदिनाबद्दल सांगितलं. खुश झाला गडी. युरोपियन आणि भारतीय साम्यस्थळे त्यालाही आवडतात. आपला मातृदिन सुद्धा याच दरम्यान, साधारण ऑगस्टमध्ये येतो - श्रावण अमावस्या!

कालचा मातृदिन साजरा करायला काहीच हरकत नाही. फक्त व्हॅलेंटाईन डे किंवा १ जानेवारीला विरोध आणि कालचा मातृदिन साजरा करायचा असं व्हायला नको. आपला मातृदिन सुद्धा साजरा झाला पाहिजे. आई लोकांनी पण फक्त मुलाला "सर्वातीत कोण?" न विचारता मुलीला पण विचारले पाहिजे.

इथे युरोपियन लोक त्यांचा मातृदिन उत्साहात साजरा करतात. आपण करतोय की विसरलो?

Sunday, March 17, 2019

नेहरू, चीन आणि सुरक्षा परिषद

सध्याच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहरू, चीन आणि सुरक्षा परिषद यावरून जुंपली आहे. भाजपवाले म्हणताहेत की नेहरूंनी सुरक्षा परिषदेतील स्थान नाकारले तर काँग्रेसवासी म्हणताहेत की, जर सुरक्षा परिषद १९४५ ला बनली आणि चीन तेव्हाच त्यात सामील झाला होता तर नेहरूंनी भारताची संधी गमावली असं म्हणता येत नाही. कारण भारत तेव्हा स्वतंत्र नव्हता आणि नेहरू प्रधानमंत्री नव्हते.

माझ्या मते, एकूणच हे प्रकरण सरळ साधे नाही.

भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व १९४५ नाही, तर १९५५ साली मिळण्याची शक्यता होती. २ ऑगस्ट १९५५ रोजी मुख्यमंत्रांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे खूप स्पष्टपणे लिहिलं होतं. नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑनलाइन वाचनालयात उपलब्ध आहे (ही माहिती दिल्याबद्दल ओंकार डंकेचे आभार) सुरक्षा परिषदेच्या बाबतीतला उल्लेख पान क्र २३७ वर आहे. (पात्रांची लिंक https://ia801606.us.archive.org/20/items/in.ernet.dli.2015.54646/2015.54646.Letters-To-Chief-Ministers-1947-1964-Vol-4_text.pdf. पानांचा क्रम जरा हललेला आहे, त्यामुळे ज्या पानावर २३७ हा क्रमांक आहे ते पान बघावे. त्याचा फोटो या पोस्ट सोबत जोडला आहे.)

त्या पत्रातील जशीच्या तशी वाक्ये -
Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Council, and that India should take her place in the Security Council. We cannot of course accept this as it means falling out with Chına and it would be very unfair for a great country like China not to be in the Securıty Council. We have, therefore, made it clear to those who suggested this that we cannot agree to this suggestion. We have even gone a little further and said that India is not anxious to enter the Security Counal at this stage, even though as a great country she ought to be there. The first step to be taken is for China to take her rightful place and then the question of India might be considered separately.

त्याचा साधारण अनुवाद -
अमेरिकेतर्फे अनौपचारिकरित्या हे सुचवण्यात आले की, चीनला संयुक्त राष्ट्राचे सदस्य कायम करू, परंतु सुरक्षा परिषदेत चीन असण्याची गरज नाही. त्याऐवजी भारताला सुरक्षा परिषदेत स्थान पाहिजे. मला वाटते की, चीनसारख्या महान देशाला सुरक्षा परिषदेत निश्चित स्थान असले पाहिजे म्हणून, हे आम्ही निश्चितपणे स्वीकारू शकत नाही. आम्ही त्यांना स्पष्ट केले आहे की आम्ही या कल्पनेशी सहमत होऊ शकत नाही. आम्ही अजून थोडं पुढे जाऊन असेही म्हटले आहे की, चीनला सुरक्षा परिषदेत असावं असं वाटत नसलं, तरीही त्या देशाला तेथे असलं पाहिजे. चीनने आपली योग्य जागा घेण्याची ही पहिली पायरी आहे आणि मग भारताच्या जागेचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो.

पण जेव्हा नेहरूंना या बाबतीत डॉ. जे. एन. पारेख यांनी संसदेत प्रश्न विचारला, तेव्हा ते २६ किंवा २७ सप्टेंबर १९५५ रोजी म्हणाले (The Hindu च्या बातमीचा फोटो सोबत आहे)

मूळ वाक्ये -
There has been no offer formal or informal, of this kind. Some vague references have appeared in the press about it which have no foundation infact. The composition of the Security Council is prescribed by the UN Charter, according to which certain specified nations have permanent seats. No change or addition can be made to this without an amendment of the Charter. There is, therefore, no question of a seat being offered and India declining it. Our declared policy is to support the admission of all nations qualified for UN membership.

अनुवाद -
अशा प्रकारचा कोणताही औपचारिक किंवा अनौपचारिक प्रस्ताव केला गेला नाही. त्याबद्दल काही अस्पष्ट संदर्भ प्रकाशित झाले आहेत ज्याचा कोणताही आधार नाही. सुरक्षा परिषदेची रचना संयुक्त राष्ट्राच्या घोषणपत्रात आधीच ठरविली आहे, त्यानुसार विशिष्ट राष्ट्रांच्या कायम जागा आहेत. घोषणपत्राच्या दुरुस्तीशिवाय त्यात कोणतेही बदल किंवा जोडणी केली जाऊ शकत नाही. म्हणून, सुरक्षा परिषदेत भारताला नवी जागा देऊ केली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे भारताने ती नाकारण्याचा प्रश्नच नाही. आमचे घोषित धोरण संयुक्त राष्ट्राच्या सदस्यतेसाठी पात्र असलेल्या सर्व राष्ट्रांच्या प्रवेशास समर्थन देणे आहे.

कालानुक्रमे शेवटचे नेहरूंनी जे सांगितलं ते म्हणजे असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मग ते गृहीत धरावे लागेल. "माझ्या मतात काही विसंगती आढळल्यास कालानुक्रमे शेवटचे मत ग्राह्य धरावे" असं गांधीजी मताच्या बाबतीत म्हटले होते. नेहरूंनी ते घटनेबद्दल वापरलं. आता हे गृहीत धरू की असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मग त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना असं का लिहिलं की प्रस्ताव होता. २ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर १९५५ मध्ये असं काय घडलं की अमेरिकेने दिलेला अनौपचारिक प्रस्ताव आधी भारताने नाकारला आणि मग प्रस्ताव असल्याचेच नाकारले. या सगळ्या घटना कुठेतरी अधिक गुढतेकडे नेणाऱ्या आहेत.

पण सर्व प्रकाशित दस्तऐवजावरून आपण असा तर्क काढू शकतो की सुरक्षा परिषदेत भारत यावा असा अनौपचारिक प्रस्ताव होता, पण काही कारणास्तव तो नेहरूंना नाकारावा लागला, किंवा त्यांनी नाकारला. नेहरूंच्या या "नकाराधिकारा"मागे काय कारणं होती, ते आता कधीच कळू शकणार नाही.

Tuesday, March 12, 2019

मियावाकी वननिर्मिती पद्धत





माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती विकसित केली आणि अलगदपणे जैविक साखळीच्या बाहेर पडला. मग शेतीसाठी सुरू झाली जमीन आणि पाण्याची वाढीव गरज. जैविक साखळीतून बाहेर पडल्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा संख्या वेगाने वाढत गेली. पुढे अमर्याद गरजा वाढत गेल्या. माणूस जसजसा पृथ्वीवर वाढत गेला तसतसे वनाच्छादित जमीन कमी होत गेली. माणूस जैविक साखळीतून बाहेर पडण्याआधी ९०%हून अधिक असलेलं जंगल आता केवळ ३१% राहिलं आहे.

या सगळ्याचे दुष्परिणाम आपण अवर्षण, अतिवृष्टी, तापमानवाढ, असमान पर्जन्यमान असं बघत आहोत. यावर जो काही एकमेव उपाय आहे तो म्हणजे पुन्हा एकदा झाडांची संख्या वाढली पाहिजे. ती नुसती वाढून चालणार नाही तर ती त्या त्या प्रदेशातील जे देशी वृक्ष आहेत ते वाढले पाहिजेत. त्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती प्रयत्न करत आहेत. त्यातून महाराष्ट्र सरकार सारखे एका वर्षी तेरा कोटी झाडं लावणं असेल, कर्नाटकातील झाडांची आई थिम्मक्का असेल, आसामातील जादव पयेंग असेल. हे सर्व आपापल्या क्षमतेला ताणून वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.

असाच एक प्रयत्न अकिरा मियावाकी यांनीही केला आहे. १९९३ मध्ये त्यांनी नैसर्गिक वननिर्मिती पद्धत विकसित केली. त्यातून प्रभावित होऊन भारतातील एक अभियंता शुभेन्दू शर्मा याने टोयोटामधील नोकरी सोडून afforestt नावाची कंपनी सुरू केली आणि त्याद्वारे तो मोकळ्या जागेत जुन्या जंगलांप्रमाणे जंगल बनवून देतो. हेही एक प्रकारे निसर्ग संवर्धनच आहे. शुभेन्दू ते स्वतः करताना कमर्शियली करतो एवढेच. पण मियावाकी अथवा शुभेन्दूने ही पद्धत लपवलेली नाही. कुणालाही सहजपणे कमीतकमी एक गुंठा जागेत या पद्धतीने जंगल तयार करता येईल.

आपल्याकडे साधारण ८०-९० च्या दशकात सामाजिक वनीकरण राबवल्या गेलं. त्यात सरसकट सगळीकडे सुबाभूळ हा परदेशी वृक्ष आणून लावला गेला. वेगात वाढ असल्याने ते वनीकरण छान असा सर्वांचा समज झाला. त्यापाठोपाठ अनेक विदेशी वृक्ष भारतात आले आणि येथील मूळ देशी झाडांवर त्यांचे अतिक्रमण झाले. निलगिरीमुळे तर कित्येक भाग ओसाड बनत गेले. औरंगाबाद येथील जेएनइसीच्या मागे निलगिरी लावल्यानंतर १० वर्षात तेथील नैसर्गिक तलाव कामातून गेल्याचं मी पाहिलंय.

दुसऱ्या बाजूला फळबाग लागवड सुद्धा बरीच झाली. यात देशी झाडेही लावली गेली. मुळात फळबाग लागवड ही वृक्षारोपण या सदरात धरायला नको. कारण एकाच प्रकारचे वृक्ष सलग लावले तर ते वन होत नाही. यात सेल्फ हीलिंग हा प्रकार नसतो. फळबागेला सतत पाणी देणे, झाडांची छाटणी, फवारणी - भलेही मग ती गोमूत्राची असेल - करावी लागते, खत द्यावं लागतं.

आपण कधी ट्रेकला जंगलात गेलो तर तिथे कुणी खत-फवारणी-छाटणी करत नसतं. तरीही तिथल्या झाडांना कीड लागली तर आपोआप जाते, फळं जास्त चवीची असतात, वाढ छान झालेली असते. हे कसं होतं? याचं शास्त्र - शोधलं नाही म्हणणार - पण वाचलं, समजून घेतलं ते मियावाकी यांनी. जंगलात वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात. वृक्ष, वेली, पसरट-उंच, मध्यम आकाराचे, झुडूप, फक्त पावसाळी, परोपजीवी असे अनेक प्रकारचे. ते एकमेकांच्या बाजूला, जवळ वाढतात आणि एकमेकांना मदत करतात. त्यावर प्राणी पक्षी येतात - ते सुद्धा झाडांना मदत करतात. उदाहरणार्थ - तांबट आणि सुतार पक्षी हे झाडाला जर खोड अळी लागली असेल तर बरोब्बर ते ठिकाण शोधून, तिथे भोक पाडून त्यातून अळी अक्षरशः ओढून काढतात आणि खाऊन टाकतात. जंगलात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पूर्ण पोहोचत नाही तिथे जिवाणू पडलेल्या पानांचं खत करतात, जर मोठ्या काटक्या पडल्या असतील तर त्यांना जिवाणू खाऊ शकत नाही त्यावर बुरशी म्हणजे अळंबी (मशरूम) वाढतं आणि त्याचं विघटन होतं. लहान कृमी कीटक गांडूळ यात सहज वाढतात आणि झाडांना खत मिळतं. वडासारखी मोठी झाडे आपल्या पारंब्यातून जैविक उत्प्रेरक (एंझाइम) सोडतात आणि वडाखालची माती आपोआप पोषक बनते. हे परस्परावलंबन जंगलात बिनबोभाट सुरू असतं.

आता मियावाकी यांनी हीच झाडे जपान मध्ये बघितली नसतील. पण त्यांच्या निरीक्षणाचा बिंदू हाच की जंगलात - no management is best management. मग याच तत्वावर त्यांनी जंगलात झाडे जेवढी जवळ असतात तेवढीच जवळ लावली. सुरुवातीला त्यांना पाणी दिलं आणि तीन वर्षात - self sustainable - स्वसंधारणीय जंगल विकसित झालं. त्यानंतर ना तिथे पाणी घालावं लागलं ना त्याला खत फवारणी करावी लागली.

अर्थात या जंगलात जाऊन फळ तोडणं अवघड कारण एका गुंठ्यांत ३२० झाडे असतात, म्हणजे दोन झाडातील अंतर हे फूट अथवा मीटर एवढं कमी ठेवलं जातं. याची कारणं
. ती झाडे सोबत वाढली पाहिजेत.
. वाढताना ती स्पर्धा करत वाढली पाहिजेत म्हणजे वेगात उंची आणि मुळांची खोली वाढते.
. जंगल लवकर स्वावलंबी बनते.

आम्ही शुभेन्दू शर्माशी काही वेळा बोललो. शुभेन्दूचा विद्यार्थी आणि औरंगाबाद येथील सर्वात जुन्या नर्सरीचा - साकला नर्सरीचा संचालक - सागर साकलाशी सुद्धा चर्चा झाली. सागरला आम्ही एकदा प्रश्न विचारला की अशी स्पर्धा करत तर लहान झाडे पण उंच वाढतील. ती स्पर्धा थांबणार कशी? त्यावर त्याने खूप छान उत्तर दिलं - झाडांना कळतं कुठे थांबायचंय ते!

मियावाकी पद्ध्तीने जंगल लावायचं असेल तर पुढील पायऱ्या अवलंबव्यात
. त्यातून काही उत्पन्न मिळेल ही आशा सोडून द्यावी. या जंगलातून उत्पन्न आर्थिक नाही पण शाश्वत स्वरूपाचे मिळू शकते. म्हणजे
. त्या भागात प्राणवायूचे प्रमाण तिप्पट होते
. तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी होते
. पाऊस वाढू शकतो
. जमिनीची धूप शून्यावर येते
. पडलेला पाऊस जास्तीत जास्त जमिनीत मुरतो - कमी पावसाच्या ठिकाणी आपण १००% मुरतो असेही बघू शकतो
. स्थानिक प्राण्यांना पक्ष्यांना निवारा मिळतो - ते शेतावर कीड पडू देत नाहीत आणि उंदरांसारख्या त्रासदायक प्राण्यांवर नियंत्रण मिळवता येते
. मधमाश्यांसारखे कीटक वाढतात - ते परागीभवनाला मदत करतात शेतीचे उत्पादन वाढते
. यातील माती ही जैविक विरजण (culture) म्हणून वापरता येते - एक एकरात एखादा पोतं माती युरियासारखी फेकली तर उत्पन्न हमखास वाढतं...

. कमीतकमी एक गुंठा जागा यासाठी ठरवायची. या जागेची रुंदी कमीतकमी १० फूट असावी. जर चौरस म्हणजे ३३ X ३३ करू शकला तर उत्तम.

. वृक्ष निवड करणे ही मोठी पायरी आहे. एका गुंठ्यांत ३२० झाडे लावताना ती स्थानिकच असावीत. किमान ४० प्रजातींची झाडे असावीत. झाडांचे चार ढोबळ प्रकार आहेत - पसरट वृक्ष, उंच वृक्ष, मध्यम वृक्ष आणि झुडूप. प्रत्येक प्रकारातील साधारण ६० ते १०० झाडे असावीत. हे करताना आपल्या भागातील साठीच्या वरच्या ज्येष्ठांची मदत घेतली तर खूप उपयोगी पडते कारण त्यांनी त्यांच्या लहानपणी ही सगळी झाडे बघितलेली असतात. महाराष्ट्रातील कमी ते मध्यम पावसाच्या भागात येणारी झाडांची यादी उद्या देईन.

. लावणीची जागा तयार करताना आधी या एक गुंठ्यांत एक मीटर खोल खड्डा करावा. नंतर त्या मातीत ४० विटा कोकोपीट, १००० किलो तांदळाचा भुसा, ट्रॉली शेणखत, ट्रॉली गांडूळखत असं मिसळून खड्डा पुन्हा भरून घ्यावा. त्यानंतर तो किमान - दिवस तसाच पडू द्यावा. यात कोकोपीट ऐवजी गहू-ज्वारीचे धांडे बारीक करून घातले तरी चालेल. तांदळाच्या भूशाच्या ऐवजी डाळीचा भुसा वापरला तरी चालेल. जे स्थानिक उपलब्ध असेल ते वापरावे. कोणतेही रासायनिक खत घालायची आवश्यकता नाही आणि घालूही नाही.

. निवडलेली झाडे साधारण एक ते दोन फूट उंचीची असावीत, म्हणजे सहा महिने ते एक वर्ष वयाची असावीत. झाडे लावताना एका प्रकारचे झाड त्याच प्रकारच्या झाडाजवळ लावू नये. म्हणजे पसरट झाडाजवळ दुसरे पसरट झाड नसावे, एका झुडपाच्या जवळ दुसरे झुडूप नसावे. ही झाडे एकमेकांपासून फूट म्हणजे जास्तीत जास्त एक मीटर अंतरावर लावावीत.

. लावणी झाल्यावर झाडांना आधाराला किमान फूट उंच आणि सेंमी व्यासाचा बांबू द्यावा.

. त्यानंतर संपूर्ण जमिनीवर ज्वारी, बाजरी, गहू - जे उपलब्ध असेल - त्या धांडाचे आच्छादन (mulching) करावे.

यानंतर आपण केवळ पाणी देत राहायचे. सुरुवातीला रोज १००० लिटर पाणी लागते. एकदा झाडे सहा महिन्यांची झाली की महिन्याला १५००० लिटर पाणी पुरते. म्हणजे १० दिवसातून एकदा ५००० लिटर. एक वर्षानंतर ही गरज अजून कमी होते आणि तीन वर्षांनंतर काहीच करावे लागत नाही. जंगल स्वतः स्वतःची काळजी घेतं आणि आपलीही!

आमचं शेत औरंगाबादपासून २५ किमी अंतरावर, बिडकीन या मोठ्या गावापासून किमी अंतरावर गिधाडा शिवारात आहे. सामान्यपणे कमी ते मध्यम पाऊस पडतो.

जेव्हा आम्ही शेतात जंगल लावायचं ठरवलं तेव्हा सुरुवातीला जागा नक्की केली.  शेतात सुमारे १५ गुंठे जंगल करायचं ठरवलं. पहिला टप्पा आणि प्रयोग म्हणून मागच्या वर्षी एक गुंठा जागेत जंगल लावलं.

नंतर झाडं ठरवताना आई आणि मामा यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या लहानपणी सहज दिसणारी आणि आता दिसणारी झाडं आठवून आठवून त्यांनी सांगितली. नंतर पुण्यातील प्रांजल नर्सरीच्या जोग काकूंनी अजून झाडं सांगितली. यादी निश्चित झाली ती साकला नर्सरीच्या सागर साकलाशी बोलल्यानंतर. कारण पुढील सर्व कामं त्याच्या मार्गदर्शनाखाली होणार होती.

जंगल लावताना आधी सांगितल्या त्या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्या. त्याशिवाय काही टिपिकल भारतीय गोष्टी त्यात वाढवल्या. माझ्या वडिलांच्या दोन आत्या आहेत. दोघीही जंगल लावताना उपस्थित होत्या. त्यांच्या हातून वड लावले. मामांनी विष्णूचा अवतार म्हणजे पिंपळ, त्याची पूजा करून पिंपळ लावलं. नंतर आम्ही सर्व मित्रांनी, सागरच्या मार्गदर्शनाखाली उरलेली झाडं लावली. आच्छादन झाल्यावर झाडांना श्री सुभाष पाळेकर गुरुजींच्या पद्धतीचे अमृतपाणी दिले आणि पुढे तीन महिने, महिन्यातून एकदा अमृतपाणी देत राहिलो.

नंतर पावसाळा संपल्यापासून १५ दिवसातून एकदा आणि या महिन्यापासून १० दिवसातून एकदा ५००० लीटर पाणी देत आहोत. याशिवाय कोणतीही मशागत केली नाही. आज नऊ महिन्यानंतर सर्व झुडूप - फूट, बाकी झाडं किमान फूट आणि कमाल १७ फूट एवढी झाली आहेत.

या जंगलात पक्ष्यांची संख्या वाढलीये. आमच्या भागातील वेडा राघू, पोपट, सातभाई, चिमण्या, टिटवी हे तर आहेच आणि वाढत आहेत. आता शिकारी पक्षी - ससाणा, घुबड येतील आणि कदाचित नामशेष होत आलेले गिधाडेही... आता मुंगूस सहज दिसताहेत. घोरपडी बऱ्याच प्रकारच्या या भागात आहेत, त्याही येतील कदाचित, माझ्या आजोबांनी या भागात साळिंदर पाहिलंय जे आम्हाला कधी बघायला मिळेल माहीत नाही, कदाचित या जंगलात ते येईलही... १५ गुंठ्यांत ४५०० ते ५००० झाडं लाऊन जंगल पूर्ण झालं की यातील काही गोष्टी तर नक्की होतील.

जपान मधील शेतीविषयक तत्त्वज्ञान हे भारतीय तत्त्वज्ञानाशी खूप मिळते जुळते आहे. जर फुकुओका यांचं "एका कडातून क्रांती" आणि मोहन देशपांडे यांचं "ऋषी कृषी" वाचलं तर फरक आणि साम्य दोन्हीही सहजच कळेल. बुद्ध या समान दुव्यामुळे आणि एकूणच पौर्वात्य संकृतीमुळे हे झालं असू शकतं. त्यामुळे मियावाकी पद्धतीला जराशी भारतीय फोडणी घालून आपल्यात घेऊन टाकावी.

मियावाकी यांची जशी जपानी पद्धत आहे तशाच वनीकरणाच्या काही भारतीय पद्धतीही आहेत. पंचवटी वन, देवराई आणि नक्षत्रवन. ज्यांना गावात एकत्रीकरण करण्यासाठी जागा करायची त्यांनी पंचवटी वन (पाच वृक्ष) तयार करावं, ज्यांना मुलांना खेळ, पांथस्थांना जागा, जरा फळबाग किंवा कृषी पर्यटनासाठी झाडं लावायची त्यांनी देवराई (साधारण दहा गुंठ्यांत ३०० ते ५०० झाडं) लावावी, ज्यांना भारतीय ज्योतिषशास्त्राची आवड असेल अशांनी नक्षत्रवन (नक्षत्र आणि राशीनुसार वृक्ष) लावावं आणि त्यांना जंगल उभं करावं वाटतं त्यांनी मियावाकी पद्धतीने जंगल उभं करावं. पण नवीन वननिर्मिती आणि संवर्धन नक्की करावं!





परिशिष्ट
जीवामृत (अमृतपाणी)
पद्मश्री श्री सुभाष पाळेकर यांच्या संशोधनातून...

परसबागेकरिता जीवामृत बनविण्याची पद्धती -
1) 20
लीटर पाणी
2) 1
किलो देशी गार्इचे शेण
3) 250
मिली देशी गाईचे गोमूत्र
4)  250
ग्रॅम गूळ
5) 250
ग्रॅम बेसन
6)
झाडाखालील मूठभर माती

हे मिश्रण काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घ्या ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवा कपड्याने तोंड घट्ट बांधून ठेवा. दिवसातून दोनदा सकाळ  संध्याकाळ काठीने ढवळा.
48
ते 72 तासांनी जीवामृत तयार होते.
हे तयार झालेले जीवामृत साधारणपणे 1 कप ते 1 ग्लास पर्यंत दर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी द्यावे.
जीवामृत 5 दिवसांमध्ये संपवून टाकावे. उरलेले जीवामृत माती मध्ये मिसळून टाका. कंपोस्ट करण्यासाठी किंवा झाडावर फवारणी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.




परिशिष्ट २ - महाराष्ट्रात कमी ते माध्यम पावसात लावता येण्यासारखी झाडे
अनुक्रमांक
प्रकार
Botanical name
मराठी नाव
1
पसरट
Acacia catechu
खैर
2
छोटे वृक्ष
Acacia leucophloea
हिवर
3
वृक्ष
Acacia nilotica
बाभूळ
4
पसरट
Aegle marmelos
बेल
5
पसरट
Ailanthus excelsa
महारुख
6
पसरट
Alangium salvifolium
अंकोळ
7
वृक्ष
Albizia lebbeck
काळा शिरीष
8
पसरट
Albizia procera
किन्हई
9
छोटे वृक्ष
Anogeissus latifolia
धावडा
10
वृक्ष
Azadirachta indica
कडूनिंब
11
वृक्ष
Bauhinia purpurea
कांचन
12
छोटे वृक्ष
Bauhinia racemosa
आपटा
13
वृक्ष
Boswellia serrata
सालई
14
छोटे वृक्ष
Bridelia retusa
आसणा
15
छोटे वृक्ष
Buchanania cochinchinensis
चारोळी
16
छोटे वृक्ष
Butea monosperma
पळस
17
वृक्ष
Cassia fistula
बहावा
18
छोटे वृक्ष
Cochlospermum religiosum
सोनसावर
19
छोटे वृक्ष
Cordia dichotoma
भोकर
20
छोटे वृक्ष
Dalbergia lanceolaria
फाशी
21
वृक्ष
Dalbergia latifolia
शिसम
22
वृक्ष
Dalbergia sisoo
शिसू
23
छोटे वृक्ष
Diospyros melanoxylon
तेंदू
24
छोटे वृक्ष
Dolichandrone falcata
मेडशिंगी
25
वृक्ष
Emblica officinalis
आवळा
26
वृक्ष
Erythrina suberosa
पांगारा
27
छोटे वृक्ष
Ficus amplissima
पिपर, पिपरी
28
छोटे वृक्ष
Thespesia populnea
भेंड
29
छोटे वृक्ष
Ficus microcarpa
नांद्रूक
30
पसरट
Ficus racemosa
उंबर
31
छोटे वृक्ष
Gardenia latifolia
घोगरा
32
झुडूप
Gardenia resinifera
डिकेमाली
33
छोटे वृक्ष
Garuga pinnata
काकड
34
वृक्ष
Gmelina arborea
शिवण
35
छोटे वृक्ष
Grewia tiliifolia
धामण
36
पसरट
Hardwickia binata
अंजन
37
छोटे वृक्ष
Heterophragma roxburghii
वारस
38
छोटे वृक्ष
Holarrhena pubescence
कुडा
39
वृक्ष
Holoptelea integrifolia
वावळ
40
झुडूप
Ixora parviflora
रायकुडा
41
वृक्ष
Lannea coromandelica
मोई
42
छोटे वृक्ष
Limonia acidissima
कवठ
43
पसरट
Madhuca latifolia
मोह
44
पसरट
Mangifera indica
आंबा
45
छोटे वृक्ष
Manilkara hexandra
खिरणी
46
पसरट
Mitragyna parvifolia
कळम
47
झुडूप
Morinda pubescens
बारतोंडी
48
छोटे वृक्ष
Nyctanthes arbor- tristis
पारिजातक
49
छोटे वृक्ष
Phoenix sylvestris
शिंदी
50
वृक्ष
Pongamia pinnata
करंज
51
वृक्ष
Prosopis cineraria
शमी
52
वृक्ष
Pterocarpus marsupium
बिजा
53
छोटे वृक्ष
Pterocarpus santalinus
रक्तचंदन
54
छोटे वृक्ष
Salix tetrasperma
वाळूंज
55
झुडूप
Salvadora persica
पीलू
56
पसरट
Sapindus laurifolius
रिठा
57
पसरट
Schleichera oleosa
कुसुंब
58
छोटे वृक्ष
Semecarpus anacardium
बिब्बा
59
पसरट
Soymida febrifuga
रोहन, रोहिला
60
छोटे वृक्ष
Sterculia urens
करू
61
वृक्ष
Stereospermum chelonoides
पाटल
62
वृक्ष
Syzygium cumini
जांभूळ
63
पसरट
Tamarindus indica
चिंच
64
वृक्ष
Tectona grandis
साग
65
वृक्ष
Terminalia arjuna
अर्जुन
66
पसरट
Terminalia bellirica
बेहेडा
67
पसरट
Terminalia tomentosa
ऐन
68
झुडूप
Trema orientalis
खरळ
69
छोटे वृक्ष
Wrightia tinctoria
काळा कुडा
70
छोटे वृक्ष
Ziziphus mauritiana
बोर
71
झुडूप
Capparis grandis
पाचुंदा
72
झुडूप
Carissa congesta
करवंद
73
झुडूप
Cassia auriculata
तरवड
74
झुडूप
Clerodendrum serratum
भारंगी
75
झुडूप
flueggea microcarpa
पांढरफळी
76
झुडूप
Helicteres isora
मुरूडशेंग
77
छोटे वृक्ष
Murraya koenigii
कढीपत्ता
78
झुडूप
Plumbago zeylanica
चित्रक
79
झुडूप
Vitex negundo
निर्गुडी
80
झुडूप
Woodfordia fructicosa
धायटी
81
वेल
Abrus precatorius
गुंज
82
वेल
Argyreia nervosa
समुद्रशोक
83
वेल
Asparagus racemosus
शतावरी
84
वेल
Caesalpinia bonducella
सागरगोटा
85
झुडूप
Combretum albidum
पिळूकी
86
झुडूप
Cryptolepis dubia
कावळी, सुपर्णिका
87
झुडूप
Gymnema sylvestre
मधुनाशिनी, बेडकी
88
वेल
Hemidesmus indicus var. Indicus
अनंतमुळ
89
बांबू
Bambusa arundinacea
कळक बांबू
90
बांबू
Dendrocalamus strictus
मेस बांबू
91
पसरट
Alstonia scholaris
सप्तपर्णी
92
पसरट
Anthocephalus cadamba, Anthocephalus indicus
कदंब
93
पसरट
Ficus benghalensis
वड
94
पसरट
Ficus religiosa
पिंपळ
95
पसरट
milingtonia hortensis
गगनमोगरा
96
झुडूप
Jasminum sambac
मोगरा
97
झुडूप
Nerium oleander
कण्हेर
98
झुडूप
Calotropis Gigantea
रुई
99
छोटे वृक्ष
Sesbania grandiflora
हादगा
100
छोटे वृक्ष
Commiphora wightii
गुग्गुळ
101
झुडूप
Justicia adhatoda
अडुळसा
102
झुडूप
Lawsonia inermis
मेंदी
103
छोटे वृक्ष
Balanites roxburghii
हिंगणबेट
104
झुडूप
thevatia
बिट्टी
105
झुडूप
Tabernaemontana divaricata
तगर
106
छोटे वृक्ष
Artabotrys hexapetalus
हिरवा चाफा
107
छोटे वृक्ष
Michelia champaka
सोनचाफा
108
छोटे वृक्ष
Mimusops elengi
बकुळ
109
छोटे वृक्ष
Ficus carica
अंजीर
110
छोटे वृक्ष
Annona squamosa
सीताफळ
111
छोटे वृक्ष
Psidium guajava
पेरू
112
छोटे वृक्ष
Punica granatum
डाळिंब
113
छोटे वृक्ष
Putranjiva roxburghii
पुत्रवंती
114
छोटे वृक्ष
Saraca indica, Saraca asoca
सीताअशोक
115
छोटे वृक्ष
Thespesia populnea
पारस पिंपळ
116
छोटे वृक्ष
Moringa oleifera
शेवगा
117
वृक्ष
Cassia fistula
अमलताश
118
वृक्ष
Lagerstroemia Indica
तामण
119
वृक्ष
Albizia procera
पांढरा शिरीष
120
पसरट
Adansonia digitata
गोरख चिंच
121
पसरट
Bombax ceiba
काटेसावर
122
छोटे वृक्ष
Garcinia indica
कोकम
123
वृक्ष
Millingtonia hortensis
गगनमोगरा
124
छोटे वृक्ष
Manilkara zapota
चिकू
125
वृक्ष
Artocarpus heterophyllus
फणस
126
पसरट
Sterculia foetida
भारतीय बदाम
127
छोटे वृक्ष
Citrus limetta
मोसंबी
128
पसरट
Terminalia chebula
हिरडा
129
वृक्ष
Bauhinia racemosa
हिरवा आपटा
130
छोटे वृक्ष
Myristica fragrans
जायफळ
131
छोटे वृक्ष
Garcinia Indica
आमसूल
132
वृक्ष
Citrus × sinensis
संत्री
133
वृक्ष
Annona reticulata
रामफळ
134
वृक्ष
Annona atemoya
हनुमानफळ
135
वेल
Jasminum officinale
जाई
136
वेल
Jasminum auriculatum
जुई
137
वेल

सायली
139
झुडूप

सोनकेळ
140
वेल
Acacia concinna
शिकेकाई
141
वेल
Piper betle
पानवेल
142
वेल
Piper nigrum
मिरी
143
झुडूप
Pandanus amaryllifolius
केकताड
144
झुडूप
lantana camara
घाणेरी
145
पसरट
Haldina cordifolia
हळदु
146
झुडूप
Agave americana
घायपात
147
झुडूप
Cestrum diurnum
कुंती / कामिनी
148
झुडूप

आंबटी
149
छोटे वृक्ष
Tabebuia rosea
वसंत राणी
150
झुडूप

शेम्बडी
151
झुडूप
Ocimum sanctum
तुळस




परिशिष्ट - आमच्या वनाची वाढ