Tuesday, March 20, 2018

प्रतिवाद - व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो

लोकसत्तामध्ये एक पुस्तक (व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो) परिचय वाचला. त्यावरील माझे मत.
राष्ट्रवादाची मांडणी काय आहे, कशी असावी हे मुद्दे चर्चेचे असू शकतात पण राष्ट्रवादच नाकारणे के चुकीचे आहे. राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी काही प्रतीके लागतात आणि तेव्हाच देश एकत्र राहू शकतो. ही प्रतीके राष्ट्रगीत, ध्वज, महापुरुष अशी असतात, आणखीही असू शकतात.
भारत माता की जय अशा घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी विचारलं होतं की भारत माता म्हणजे काय, कोण? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं की, भारत माता म्हणजे ही जमीन, झाडं, नद्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व भारतात राहणारे. हे सगळं मिळून भारत माता होते. म्हणजे नेहरूंनासुद्धा भारत एक देश ही संकल्पना मान्य होती. इथे सांगण्याचं कारण म्हणजे चौधरींना नेहरू आवडतात.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
ब्रिटिशांपूर्वी जर भारत एक नव्हता तर पानिपतावर लाखो मराठ्यांनी आत्मबालिदान का केलं? महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला अब्दालीला कित्येक वर्षे लागली असती किंवा तो आलाही नसता. मग तरुण भावी पेशवा आणि पेशव्यांचा भाऊ तिथे जाऊन का लढले? कारण अब्दाली परकीय होता. दिल्लीचे तख्त जरी मुस्लिम असले तरी ते भारतीय होते. आणि ते वाचवणे मराठ्यांना कर्तव्य वाटले.
त्याआधी अकबराला संपूर्ण भारतावर एकछत्री अमल असावा असं का वाटलं? संपूर्ण भारत म्हणजे काय? तेव्हा तर ब्रिटिश कुठेच नव्हते. मग त्याला केवळ भूभाग त्याला ताब्यात घ्यायचा होते का? नाही, अकबराला संपूर्ण भारत जी आधीपासूनची संकल्पना होती ती एका अमलाखाली आणायची होती.
त्याही आधी चाणक्याने अलेक्झांडरला पराभूत करण्यासाठी सीमेवरील राज्यांची मोट बांधली आणि चाणक्य त्यात यशस्वी झाले. ही मोट का बांधली गेली? आणि सीमेवरील म्हणजे काय? तर भारतीय सीमेवरील. पण इंग्रजांच्या आधी तर भारत नव्हता ना... मग हे कसे झाले. चाणक्याने नंतर मगध हस्तगत करून चंद्रगुप्ताला राजा बनवले आणि अधिक समर्थ साम्राज्य निर्माण केले.
त्याही आधी, वेदात
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
भारत एक राष्ट्र आहे याचा उच्चार आहे.
अर्थात हे कितीही तर्कशुद्ध पटवण्याचा प्रयत्न केला तरीही विचारवंत केवळ आणि केवळ डावे असतात असं समाजणार्यांना ते कळणार नाही. पण ज्यांना कळेल त्यांनी ते समजून घ्यावं म्हणून हे लेखन.


दि. ४ मार्च २०१७

शिवाजी महाराजांचे मुस्लीम सरदार

सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही. ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले. संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती नेताजी पालकर होते. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.
शिवाजी महाराजांबरोबरआग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता की नाही यावर मत मतांतरे आहेत. अधिक माहितीसाठी पहा - https://m.facebook.com/dasabodh/posts/446234875521176:0
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
''काझी हैदर"
बरोबर. पण एकमेव नव्हता.
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा… "रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
बरोबर. पण वाघनख्या पाठवणारा नाही तर शस्त्र तयार करणारा एक कारागीर होता तो. त्याने केवळ अफझलखानाला मारायचे म्हणून वाघनखं बनवून दिली नव्हती
आता प्रश्न हा आहे की महाराजांच्या नावाने त्यांना बळेच मुस्लिम विरोधक नाही असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो? कारण सोपं आहे, मूळ इतिहासापासून लोकांना दूर नेलं, की स्वत्व विसरायला लावणे सोपे असते. महाराज धर्म निरपेक्ष होते पण त्यांनी मशिदी पडल्या नाहीत असं मुळीच नाही. जी मशीद मंदिर तोडून बांधली गेली ती मशीद महाराजांनी पाडली आहे. हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो.
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका

दि. ७ मार्च २०१७

नाना फडणीस

नाना फडणीस... नाव ऐकलं की आधी प्रतिमा येते ती स्त्रीलंपट, लढाईतून पळून जाणारा वगैरे वगैरे... का?
गेल्या काही दिवसांत पेशवाईवरील बरीच पुस्तके वाचली. नाना फडणीसांना पानिपतला सदाशिवरावांसोबत कारभारी म्हणून पाठवले होते. तिथे रणात अन्य लोक (पाळणाऱ्यात होळकर, विंचूरकर, महादजी शिंदे सुद्धा होते) पळाले, त्यांच्याबरोबर हे सुद्धा पळून आले. पण पळपुटा म्हटले गेले फक्त नाना फडणीसाला. असो, पळाले हे खरं...
पुढे माधवरावांच्या सोबत फड सांभाळला तो यांनीच. पानिपतवरील लढाई एक प्रचंड धक्का होता आणि त्यापाठोपाठ नानासाहेब पेशवे निवर्तले. पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव पानिपतात मारले गेले. इथे राघोबादादाला पेशवे बनण्याची संधी होती पण संपूर्ण जबाबदारी घेणं राघोबाने नेहमीच टाळलं. माधवराव 'पेशवे' झाले. हा तरुण पेशवा मात्र अनेक घरातल्या आणि बाहेरच्या झुंजी देत अतिशय लवकर निवर्तला. पण या अवधीत त्यांनी पानिपत वरील जखमा बुजवल्या आणि नाना फडणीस सारखे लोक पेशवाईच्या आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याच्या कामी लावले. पुढे नारायणराव पेशवे झाले आणि त्यांना राघोबा + आनंदीबाई यांनी मारले. रात्री गुपचूप सगळे विधीही आटोपले. सर्व पुणे झोपलेले असताना नाना फडणीस यांनी अन्य 3 कारभाऱ्यासोबत राघोबाला पेशवेपद मिळू नये अशी शपथ घेतली. तरी राघोबा पेशवे झाले. 5 महिन्यात जेव्हा नारायणरावांची पत्नी बाळांत झाली तेव्हा या कारभाऱ्यांनी राघोबा बाहेर असताना चिमुकल्या सवाई माधवराव च्या नावे पेशवाई घेतली आणि बारभाईची लढाई सुरू झाली. याला कारस्थान का म्हटले? वास्तविक व्यसनी राघोबाला पेशवाई दिली हीच चूक होती ती सुधारणे याला कारस्थान म्हटले गेले.
मग राघोबा इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजांकडून हिंदवी स्वराज्यावर हल्ला करवला. इथे नाना फडणीसांनी अतिशय धूर्तपणे हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. अर्थात या कामी होळकर आणि शिंदे यांची मदत झालीच. पण लढाई सुरू होण्याआधीच वडगावला इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली आणि राघोबाला नानांच्या हवाली करून, मोठी खंडणी देऊन ते चालते झाले. ही प्रचंड हार इंग्रजांना किमान 50 वर्ष मागे घेऊन गेली. स्वराज्याच्या या विजयाचे शिल्पकार होते नाना फडणीस.
सवाई माधवराव वयाच्या 14-15 वर्षी वारले आणि त्याजागी दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचा मुलगा आला. याने आधी नाना फडणीसांना कैदेत टाकलं आणि नंतर जेव्हा कारभार पेलला नाही तेव्हा पुन्हा फडणीस केलं. हे सगळं होऊनही नाना कायम हिंदवी स्वराज्यासाठी झटले आणि ते असेपर्यंत इंग्रजांना आपले हात पाय पसरता आले नाहीत. 13 मार्च 1800 साली नाना फडणीस वारले आणि पुढे केवळ 18 वर्षांत शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला.
मला वाटते की नाना फडणीसांत दोष असतील पण त्याचे विकृतीकरण इंग्रजांनी केले असावे. कारण नाना फडणीसांमुळे त्यांना मराठा साम्राज्य जिंकता आलं नव्हतं. मोर नाचताना इंग्रजांनी मागून फोटो काढला आणि आपल्या साहित्यिकांनी तोच मोराचा फोटो आहे असं मानून लेखन केलं आणि नानावर निव्वळ बाईलवेडा आणि विकृत असा शिक्का मारला. धोरणी आणि मुत्सद्दी नाना त्यात लोप पावले.


दि. १३ मार्च २०१७

शुगर कोटेड टीका

माधव "आपटे"... डोंबिवली फास्ट मधला एक सामान्य माणूस. व्यवस्थेवर आणि ती राबवणाऱ्यांवर चिडून कायदा हातात घेतो. तेव्हा इन्स्पेक्टर सुभाष अनासपुरे म्हणतो, "माधव 'आपटे' नावाचा कुणीही असं काही करू शकतो का?"
सगळे लोक डोंबिवली फास्ट काय भारी चित्रपट आहे म्हणतात. यात ब्राह्मण सुद्धा आहेत छान चित्रपट म्हणणारे
संदीप खरे एक गाणं लिहितो, त्याला सलील कुलकर्णी चाल लावतो. गाणं आहे, मी मोर्चा नेला नाही. यात या मोर्चा न नेणाऱ्या, संप न करणाऱ्या माणसाला जेव्हा तो दगड होऊनी पडलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायला देखील कुणी उचललेले नसते. हा माणूस कोण, याच्या "टकलावर अजून रुळत असते एक अदृश्य लांबशी शेंडी". म्हणजे कोण ते कळालं असेलच. तर या गाण्याला आणि अल्बमला देखील सर्व लै भारी म्हणतात. यात ब्राह्मणही आले.
मग एक मंत्री असलं शुगर कोटेड न बोलता म्हणतो की घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का... झालं सगळे ब्राह्मण त्याच्यावर चिडून बोलतात. तुझा बाप जो मुख्यमंत्री आहे तो ब्राह्मण आहे याची जाणीव करून देतात. का, कारण तो मंत्री डायरेक्ट बोलला म्हणून?
निशिकांत कामतने डोंबिवली फास्ट मध्ये घेतलेला संवाद, संदीप खरेने घेतलेला कवितेतला भित्रा आणि कांबळे बोलले यात अर्थात्मक काही फरक नाहीये. फरक एकच आहे तो म्हणजे कांबळे थेट बोलले. म्हणजे ब्राह्मणांना शुगर कोटेड काहीही बोललं तरी चालतं पण थेट बोललेलं खपत नाही... बरोबर ना...

दि. १७ मार्च २०१७

माझी कथा - भैरवसिंग (चित्रपट - उडान)

मी भैरवसिंग. उडान मधल्या रोहनचा बाप. मला त्यात उगाचच व्हिलन दाखवलं आहे.
माझ्याकडे वडिलोपार्जित काहीच नव्हते. माझा कारखाना मी सुरू केला. त्यात मेहेनतीने पैसा कमावला. माझा भाऊ, जिमी, त्याला शिकवलं. लग्न झाले. रोहन झाला पण त्याची आई लगेच वारली. काही दिवस रोहनला एकटं सांभाळायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही आणि खरं तर बायकोशिवाय मी राहणं मला अवघड होतं. त्याच्यावर सावत्रआईचा त्रास नको आणि त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून त्याला बोर्डिंगला पाठवलं. त्यानंतर लग्न केलं. दुर्दैवाने अर्जुन 5 वर्षांचा असताना त्याची आईही वारली. माझ्या दोन्ही बायका गेल्या पण माझं कुणी ना सांत्वन केलं ना मदत. बायकोच्या माहेरहून कोणी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
रोहनला भेटायला मी काही वेळा बोर्डिंगला गेलो होतो. पण त्याला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आणि तोही त्याच्या मित्रांमध्ये खुश दिसला. फुटबॉल छान खेळत होता. चांगलं वाटलं. परत आलो. म्हटलं मुलगा मोठा होतोय, शिकेल आणि आपल्या मेहेनतीवर कमावेल.
पण अचानक त्याने दारू पिऊन धिंगाणा केला, मास्तरांच्या खोड्या काढल्या आणि बरंच काही होऊन त्याला बोर्डिंग मधून काढून टाकल्याचं कळालं. पण तरीही त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून मी त्याला इथल्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून दिली. कठोर मेहेनत आणि करडी शिस्त त्याला पुन्हा रुळावर आणेल याची खात्री होती मला. कारण मी स्वतः तेच करून इथवर आलोय. पण हा कॉलेज मध्ये न जाता भटकत होता. माझ्या व्यायामाच्या शिस्तीला, अभ्यासाला तो त्याच्यावरचा अन्याय समजत होता. त्याला म्हणे लेखक व्हायचे होते. बेशिस्त, व्यायाम न करणारा, रात्री वडिलांचे पैसे चोरून, गाडी चोरून मित्रांबरोबर दारू पिणारा, सिगारेटी फुंकणारा हा तुम्हा प्रेक्षकांनापण अन्यायग्रस्त वाटला हे माझं दुर्दैव.
माझ्या चुका आहेत, मला मान्यही आहेत. दारू ही प्रमुख चूक. नशा जास्त झाला तर माझा कंट्रोल राहत नाही. अर्जुनला त्या दिवशी चुकून मारलं गेलं. मोठी चूक झाली. दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते. रोहन त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यावर सोपवून गेलो. ते जाणे हे जबाबदारीतून पळणे नव्हतेे तर पुढील जबाबदाऱ्या घेण्यासाठी होते. पण रोहनने ही घटना फारच विचित्र पद्धतीने घेतली. मी पुन्हा एकटा पडू लागलो. जिमीला तर माझी शिस्त कधीच आवडली नव्हती. त्याने रोहनला समजावणे तर दूर पण उलट भडकावले. माझे एकटेपण दूर करण्यासाठी मी तिसऱ्या लग्नाचं ठरवलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोहन खूप दूर गेला. त्याने लेखक बनण्यात मला काही अडचण नव्हती. पण शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पायावर आधी उभं राहावं आणि मग काय वाटेल ते करावं एवढंच माझं म्हणणं होतं.
पण कठोर मेहेनत आणि करडी शिस्त म्हणजे वाईट असं मानणाऱ्या या पिढीला हा भैरवसिंग कळाला नाही.
एका गोष्टीचं बरं वाटलं ते म्हणजे माझ्या व्यायामाच्या बळजबरीमुळे रोहन माझ्यापेक्षा वेगात पळू शकला.
पोलिसात तक्रार केल्याने मला अर्जुन पुन्हा मिळू शकला नाही. I hope both are doing good...
मी दुसरीकडे नेहमी म्हणतो, "अक्सर जो दिखता हैं वो होता नही और जो होता है वो दिखता नही"
कधीतरी अर्जुन आणि रोहनला त्यांचा बाप कळेल या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत

https://g.co/kgs/SSr4Pj

दि. २९ मार्च २०१७

जो जे वांछील तो ते 'न' लाभो

महाभारताच्या शांतीपर्वात खलील श्लोक आला आहे.
न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः।
स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥
म्हणजे एका खऱ्या प्रजाराज्याचं हे एक स्वप्न आहे. राजा नाही, राज्य नाही, दंड नाही आणि त्यामुळे दंडव्यवस्थासुद्धा नाही. राज्य आणि दंडव्यवस्था नाही, म्हणून राजकारणीही नाहीत! पण हे केव्हा होऊ शकते? जेव्हा स्वतः प्रजा ही परस्परांचे रक्षण करेल तेव्हा... आज जेव्हा आपण राजकारण आणि राजकारणी नको, किंवा राजकारण हा चिखल आहे वगैरे तेव्हा प्रजा काही परस्परांचे आणि परस्पर हिताचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेली नसताना म्हणतो. जर राजकारणी या देशातून जगातून नष्ट झाले तर प्रजाहितरक्षण कोण करेल? हे नक्की मान्य की राजकारण अत्यंत गढूळ आहे, पण आजवर त्याद्वारेच अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. त्यामुळे जर राजकारण आणि राजकारणी यांना समाजजीवनातून हद्दपार करायचे असेल तर त्याआधी परस्परांचे रक्षण करणारी प्रजा तयार झाली पाहिजे. तोवर राजकारणी हद्दपार होऊ नयेत.
म्हणूनच समर्थांनी हरिकथेनंतर (धर्मानंतर) राजकारणाला महत्व दिले आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे सावधपण । सर्वांविषयी ।
म्हणजे 'आझादी'वाल्यांना सुद्धा हेच तर पाहिजे? नाही...
इथे 'गॉड तुस्सी ग्रेट हो' या चित्रपटाचा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे ज्ञानेश्वरांचा. काय संबंध या दोघांचा??? आहे!

'गॉड तुस्सी ग्रेट हो' मध्ये सलमान देवाच्या भूमिकेत जातो आणि मग एकामागे एक लोकांच्या मागण्या त्याच्याकडे येऊ लागतात. हा काही वेळातच परेशान होतो आणि म्हणतो, ज्याला जे हवे असेल ते मिळू दे. त्यानंतर गोंधळ सुरू होतो. लूटमार, कैदी तुरुंगातून सुटणे आणि बरेच काही... शेवटी तो देवाला म्हणतो बाबारे तू ग्रेट आहेस. आता हे तूच निस्तर.
पसायदानात ज्ञानेश्वरांनी पण ज्याला जे हवे ते मिळो असंच म्हटलंय ना, जो जे वांछील तो ते लाहो... म्हणजे जे सलमानने मागितले तेच... पण
ज्ञानेश्वरांनी अनेक *अटी व शर्ती लागू या प्रमाणे हे मागणे केले आहे
पहिली अट
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला पाहिजे आणि सत्कर्मात त्यांची गोडी वाढली पाहिजे
दुसरी अट
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
सर्व प्राणिमात्रांचे, केवळ मानवांचे नाही, एकमेकांशी मैत्र झाले पाहिजे
तिसरी अट
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
वाईटाची अंधारकाजळी नष्ट होऊन, स्वधर्म सूर्य अखिल विश्वात जागृत झाला पाहिजे. इथे धर्म म्हणजे religion नाही तर धर्म म्हणजे विहित कर्त्यव्य. ते प्रत्येकाने पूर्ण केले पाहिजे.
हे सर्व झालं तरच
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
'आझादी'वाल्यांचे मागणे हे 'गॉड तुस्सी...'च्या मालिकेतील आहे. अविचारी आणि अविवेकी. पण ही चूक 'आझादी'वालेच करतात असं नाही तर आपणापैकी बरेच असे असतात जे संपूर्ण राजकारणच नाकारतात, त्याद्वारे ते राज्यव्यवस्था नाकारत आहेत याचे कदाचित त्यांना भान नसते. यातून ज्ञानेश्वरांचे 'जो जे वांछील...' साध्य होणार नसून 'गॉड तुस्सी...' मधील अराजक येईल हे समजून घेतले पाहिजे.
'रक्षन्ति स्म परस्परम्' चा नेमका अर्थ आणि कृती ही ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. ते देखील अधिक व्यापक करून. तेव्हा जोवर या अटी व शर्ती लागू होत नाहीत तोवर जो जे वांछील तो ते 'न' लाभो!
दि. ४ एप्रिल २०१७

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतात मारुती शेपटीने उडायचा, नारदाची वीणा म्हणजे रॉकेट होतं, गणपती हा क्लोन आणि प्लास्टिक सर्जरीने डोकं बसवलेला होता ही निव्वळ मिथकं आहेत. पण लोकांनी मिथकाला विज्ञान म्हणायला सुरुवात केल्याने सध्या गोंधळ झालाय आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, कालमापन, गणित हे उच्च स्तरावर होते, त्यातील काही नमुने खाली दिले आहेत.
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही 😉) ग्रंथ वाच. शिवाय पराशर मुनींचे शेतीवरील काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
हे सर्व असताना पुढील वैज्ञानिक प्रगती का होऊ शकली नाही? याचे मानसशास्त्रीय आणि दोन कालखंडात उत्तर देता येईल. पहिला इस्लामी आक्रमणपूर्व आणि इस्लामी आक्रमणापश्चात. मानसशास्त्रीय यामुळे की समाज म्हणूनही एक मन असतं.
भारतात एक विशिष्ट स्तरापर्यंत ज्ञान विज्ञान वाढलं पण ते पुढे थांबलं. असं का घडलं असावं याबद्दल हे माझं मत. एक गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयातील तज्ञ नाही. जे काही थोरांकडून ऐकले, वाचले, त्यावरून हे मांडले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
हा सगळा प्रवास का होतो तर आधीच्या गरजा पूर्ण होत जातात आणि मानवी मन पुढील गोष्टी शोधत राहतं. तसंच समाजमन सुद्धा या प्रवासाला प्रोत्साहन देत राहतं आणि मदत करतं. आहे तिथे संपन्नता मिळाल्याने भारताने दुसऱ्यावर आक्रमण कधीच केले नाही. उलट अनेक निर्वासितांना भारताने आनंदाने आश्रय दिला. यामुळे संहारक शस्त्रे, वेगवान प्रवास याची गरज भासली नाही आणि त्याची निर्मितीही झाली नाही.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
याच दरम्यान युरोपात गरजही वाढत होती आणि शोधासाठी असलेले वातावरण सुद्धा होते. या बळावर तेथे नवीन विज्ञान सिद्ध झाले आणि मग युरोपने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.

दि. ५ मे २०१७

राज्जुभैय्यांची आठवण

आमच्या वर्गात एक चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. आम्ही दहावीला असताना शाळेत एकदा त्यावेळी मा. सरकार्यवाह असलेले रज्जूभैय्या आले होते. बहुदा डिसें'९३ किंवा जाने'९४ असावा. मग चुणचुणीत मुलगा त्यांना भेटला आणि त्याने त्यांची सही घेतली. तेव्हा ते व्यस्त असल्याने मला काही सही मिळाली नाही. पण मी एक शाखेचा गणशिक्षक होतो त्यामुळे त्याच दिवशी निवासी वर्गात माझी रज्जूभैयांशी भेट होणार होती. वर्ग सुरू झाला. मी भोजनानंतर त्यांच्याकडे गेलो आणि मला सही द्या अशी विनंती केली. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, "कभी कोई अपने नानाजी या दादाजी की स्वाक्षरी लेता है भला"
या वाक्यांनी खूप छान वाटलं, पण एक हुरहूर लागून राहिलीच की आपल्याकडे सही नाही. मार्च'९४ मध्ये रज्जूभैय्या प. पू. सरसंघचालक झाले आणि चुणचुणीत मुलाने मला जरा चिडवलेच...
पुढे २ वर्षांनी १२वीची परीक्षा झाल्यावर ३ एप्रिल ९६ ला रज्जूभैयांच्या हस्ते रायगडावर रोप वे चे उद्घाटन होणार होते. आमच्या शहरातील आमच्यासारख्या माकडांचा एक वानरयुथमुख्य होता रवींद्र पूर्णपात्रे. तो घरी आला आणि माझ्या आई वडिलांची या सहलीला जाण्याची परवानगी मिळाली. तेव्हाची अशा सहलींसाठी बेष्ट गाडी म्हणजे ट्रॅक्स. आम्ही ९ स्वयंसेवक आणि एक चालक असे निघालो.
जाताना दुपारी शिवथरघळ येथे गेलो. समर्थांचं दर्शन घेतलं. संध्याकाळपर्यंत थांबून साधारण ७ च्या सुमारास तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती. त्यामुळे वाटेवर लख्ख चंद्रप्रकाश. झाडं अक्षरशः चांदणं पीत आहेत असं वाटत होतं. वळणं घेत गाडी रायगडाकडे निघाली. रात्री १० ला आम्ही पाचाडला पोहोचलो. एका घरी जेवण व निवासाची सोया झाली. भरपेट खाऊन झोपलो.
पहाटे ३:३० ला रवीच्या हाका सुरू झाल्या. आणि त्याने आम्हाला सर्वांना ४ ला गडाच्या वाटेवर आणलं. मग सर्वांचाच उत्साह वाढला. संघाच्या कोणत्याही शिबिरात सकाळी एकात्मता स्तोत्राने सुरुवात होते. मग "ॐ नम: सच्चिदानंद..." ची सुरुवात झाली आणि रवी सोबत मी आणि मागून सर्व असं स्तोत्र म्हणत आम्ही गड चढायला लागलो.
हनुमान जयंती असल्याने पूर्णाकृती चंद्र पश्चिमेला होता आणि रायगडाची चढण सगळी पश्चिमेकडून असल्याने आम्हाला सहजच रस्ता दाखवत होता. आमची वानरसेना पटापट गड चढली आणि पहाटेच्या प्रकाशात गडावरील बाजारापर्यंत आम्ही पोहोचलो. जर लगेच समाधीच्या मागच्या बाजूला गेलो तर सूर्योदय दिसेल याची खात्री असल्याने धावत तिकडे पोहोचलो.
जोर-बैठका आणि तळ्यात पोहून झाले तोवर सूर्यनारायणाने दर्शन द्यायला सुरुवात केली होती. भव्य सह्यकडे, तिथून दिसणारे किल्ले, त्यामागे सृष्टीला जागा करणारा भगवंत आणि गडावरील भारावलेलं वातावरण. आम्ही नि:शब्द होऊन तसेच उभे राहिलो.
मग जाणीवेच्या पातळीवर आल्यावर पहिली जाणीव झाली ती भुकेची. तिथल्या हॉटेलात, "प्लेटचे भाव नाही किलोचे सांगा भाऊ", असं सांगत किलोंनी पोहे खाल्ले. गड फिरलो. आणि कार्यक्रमाच्या जागी येऊन पोहोचलो.
तेवढ्यात कळाले की रज्जूभैय्या अतिथीकक्षात आलेले आहेत. सुरक्षरक्षकाला विनंती करून मी आत गेलो. त्यांना नमस्कार करून परिचय सांगितला. "स्वाक्षरी मांगने वाले तुम ही थे ना?", रज्जूभैय्यांचा प्रश्न! मी अवाक झालो, हो सांगितलं. फोटो काढू का विचारलं आणि त्यांनी हसून होकार दिला. मी फोटो काढून पुन्हा नमस्कार करून बाहेर पडलो.
मग उद्घाटन झालं. एक वारकरी महाराज आले होते. त्यांनी सांगितलं की, शिक्षणासाठी वार लावून जेवणारे, वारीला जाणारे आणि शत्रूवर वार करणारे हे सगळेच वारकरी. एक ज्ञानासाठी, एक देवासाठी आणि एक राष्ट्रासाठी! हे सगळेच वारकरी थोर काम करत असतात.
रज्जूभैया भाषणाला उभे राहिले. "आज रोप वे का उद्घाटन है। हिंदी में रोप वे को रज्जूमार्ग कहेते हैं। ये रज्जूमार्ग खाई एवं शिखर को जोडता हैं। संयोग से मेरा नाम भी रज्जू है। संघ का स्वयंसेवक हूं, और संघ का भी यही काम है की खाई और शिखर जोडनां।" अगदी सहजतेने त्यांनी संघकामाचे फलित सांगितले, कितीही अंतर असते तरी समाज जोडणे.
कार्यक्रम संपला, अन्य जिल्ह्यातील स्वयंसेवकांना भेटून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
डोक्यात विचार घुमत होते...
एका सामान्य स्वयंसेवकाच्या घरातील दादाजी किंवा नानाजी होणं, तो स्वयंसेवक 2 वर्षांनी लक्षात राहणं आणि Physics Gold Medalist राजेंद्र सिंह यांचा रज्जू होणं... सगळंच विलक्षण!!!



दि. ३१ मे २०१७

आनंद

'सुख' आणि 'दुःख' हे विरुद्धार्थी शब्द, भावना आहेत. 'आनंद' या शब्दला, भावनेला विरुद्धार्थी काहीच नाही.

#कुणीसं

दि. २८ जून २०१७

त्याचं तिचं भांडण असं वर्ल्डकपच्या दिवसात

पाऊस, सौमित्र आणि सर्व गारवाप्रेमींची माफी मागून...
तिला क्रिकेट आवडत नाही, त्याला क्रिकेट आवडतं
मॅचच्या दिवशी रिमोट त्याच्या तावडीत सापडतं
मी तुला आवडतो, पण क्रिकेट आवडत नाही
असलं तुझ गणित खरंच मला कळत नाही
क्रिकेट म्हणजे टाईमपास नुसता क्रिकेट अनरोमॅंटिक इव्ह
क्रिकेट म्हणजे चौकार-षटकार क्रिकेट सरळ बॅटचा ड्राईव्ह
क्रिकेट कान किट्ट करतं क्रिकेट आळश्यांना चान्स
क्रिकेट म्हणजे डोळ्यांचं पारणं क्रिकेट हळुवार लेग ग्लान्स
क्रिकेट कामांना हुलकावणी क्रिकेट खेळ नाहीच मुळी
क्रिकेट म्हणजे स्लोअर वन क्रिकेट म्हणजे गुगली
नेहमी वर्ल्डकप येतो नेहमीच असं होतं
नेहमी वर्ल्डकप येतो नेहमीच असं होतं
क्रिकेटवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
क्रिकेट आवडत नसलं तरी तिला तो आवडतो
क्रिकेट आवडत नसलं तरी तिला तो आवडतो
क्रिकेटसकट आवडावा तो म्हणूण तोही झगडतो
रूसून मग तो बघतो मॅच रिमोट ठेऊन हातात
रूसून मग तो बघतो मॅच रिमोट ठेऊन हातात
त्याचं तिचं भांडण असं वर्ल्डकपच्या दिवसात

दि. २८ जून २०१७

बदल आणि सवय

कोणत्याही बदलाचा त्रास सवय होईपर्यंतच होत असतो

#कुणीसं

दि. १ जुलै २०१७

सूर्य हा सूर्यच असतो

पृथ्वीवरून एकाच क्षणी सूर्य कुणाला उगवताना दिसतो, कुणाला तळपताना, कुणाला मावळताना तर कुणाला त्याचे अस्तित्वच दिसत नसते. म्हणजे सूर्य नसतो असं नाही तर बघणाऱ्याची जशी दृष्टी, जसा दृष्टिकोन, जशी वेळ तसा तो बघणाऱ्याला दिसतो. पण या प्रत्येक वेळी सूर्य हा सूर्यच असतो आणि तो जसा आहे तसाच असतो.

#कुणीसं

दि. ३ जुलै २०१७

शेतकऱ्याच्या 'अनैतिहासिक' आसूड

इतिहास हे शास्त्र आहे. एखादे 'मत' इतिहास म्हणून मांडणे किंवा इतिहास म्हणून स्वीकारणे हे दोन्ही चूक.
उदाहरण म्हणून महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातील एक परिच्छेद देत आहे. यातील एकूण एक वाक्य अनैतिहासिक आहे.
1. महंमद पैगंबरांच्या जहामर्द शिष्यांनी सोमनाथ शेतकऱ्यांची भट ब्राह्मणापासून सुटका करण्यासाठी फोडले नाही. ते फोडले लूट करण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी. त्यांना येथील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नव्हते
2. ज्ञानोबांनी भागवत बखरीतील कल्पित भाग उचलून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली गीतेवरून. गीतेत इस्लामच्या विरोधी काही असण्याची शक्यता नाही कारण गीता इस्लामच्या हजारो वर्षे आधी लिहिली गेली. गीतेशिवाय अन्य धर्मकारण/राजकारण या कशावरही ज्ञानेश्वरांनी काही लिहिले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांमुळे शेतकरी मुस्लिमांना नीच मानू लागले हे चुकीचे आहे
3. तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांत निर्माण झाला, हे धादांत खोटे वाक्य आहे. तुकाराम शेतकरी नव्हते, सावकार होते. त्यांनी सावकारी सोडल्यावर शेती केली. शिवाजी महाराज देखील 3 पिढ्यांपासून शेतकरी नव्हते तर सरदार होते.
4. पुढील वाक्यात महाराजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे. ज्यांना मराठी, संस्कृत, फार्सी या भाषा व्यवस्थित अवगत होत्या, ज्यांनी आपली राजमुद्रा संस्कृत मधून तयार करवून घेतली अशा शिवाजी राजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे
5. पेशव्यांनी शाहू आणि पुढील राजांना साताऱ्यास कैदेत ठेवले हे म्हणणे इतिहासाचे अज्ञानच दर्शवते. बाळाजी विश्वनाथांपासून, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ते अगदी ज्याला पळपुटा म्हणतात (यावर सुद्धा प्रतिवाद आहेत) त्या दुसऱ्या बाजीरावांपर्यंत सर्वांनी सातारच्या गादीशी इमान राखले आणि पूर्ण मान दिला.

हे सगळं जोतिरावांनी का लिहिलं असावं? कारणं अनेक असू शकतात. उदा:
1. त्यांचं शिक्षण इंग्रजांच्या शाळेत झालं होतं. त्यामुळे आर्य भारतात आले आणि त्यांनी मूलनिवासी लोकांवर अत्याचार केले हे त्यांच्यावर बिंबवले गेले. आर्य म्हणजे केवळ ब्राह्मण आणि इतर सर्व शेतकरी हा शोध असाच लादला असेल. (डॉ आंबेडकरांनी यावर प्रतिवाद करून हे चुकीचे आहे हे सिद्ध केले आहे)
2. जेव्हा गोविंदराव (वडील) यांनी रुढीवाद्यांना घाबरून, किंवा त्यांचं ऐकून जोतिरावांना घरातून काढलं तेव्हा फातिमा आणि उस्मान शेख या बहीण भावांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली. कदाचित त्यामुळे इस्लाम बद्दल प्रेम निर्माण झाले असावे.

कारणं काहीही असली तरी आधी निष्कर्ष आणि मग पुरावे अशा पद्धतीने हे लिखाण झालेले आहे. जोतिरावांचे कार्य महान आहे. ते महात्मा आहेतच. पण त्यामुळे त्यांनी सांगितलेली, लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के बरोबर असलीच पाहिजे असे नाही. चुकून असेल, त्यावेळची गरज असेल किंवा काहीही या महात्म्याकडून दुहीचे बी पेरले गेले. आणि आज त्या वृक्षाला फळं आली आहेत ही खेदाची बाब आहे. असो!

मुद्दा असा की इतिहास हे मत नसते, जे खरोखरीच झाले आहे तो इतिहास असतो. कधी सगळे पुरावे एकत्र मिळतात कधी सुटे सुटे. ते सगळे जोडून इतिहास सिद्ध होतो. त्यात कधी जुने सिद्धांत खोडले जातात तर कधी ते अधिक सिद्ध होतात.




दि. २६ जुलै २०१७

मैत्री आणि प्रेम

प्रेम एकतर्फी असू शकतं, मैत्री नाही. मैत्रीत सादाला प्रतिसाद देणं आवश्यक असतं. तसं नसतानादेखील जर मैत्री कायम असेल तर ती प्रेम, गरज किंवा स्वार्थ यात मोडते

#कुणीसं

दि. १ ऑगस्ट २०१७

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो

लहानपणी मला अरे अरे ज्ञाना झालासी पागल... असं चिडवायचे. मग मुद्दाम हा अभंग लक्ष देऊन ऐकला - 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले'. स्वतः कोण आहोत हे कळले की माणूस पावन होतो. मग या आशयाच्या अभंग, गाणी यांच्याकडे लक्ष जाऊ लागले ते अगदी 'होता है आदमी को अपना ग्यान, कहेलाए वो शक्तिमान' सुद्धा याच अर्थाने ऐकलं.
मग पुढे बायकोमुळे मोस्लॉचा त्रिकोण कळाला. त्यातील self actualization आणि 'तुझे तुज ध्यान कळो आले' यातील समानता कळू लागली ती डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकांमुळे.
त्यातच आधी वाचलेली काही पुस्तके परत वाचली गेली. त्यातील एक गोनीदांचे मृण्मयी. तिचा संघर्ष, कोकणात रमणं आणि शेवटी 'जे व्हायचे ते या झाडावेलींच्या साक्षीने होऊ दे' असं म्हणणं... हा सगळा तिचा 'स्व'च्या शोधाचा प्रवास वाटला. ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसि, अकुपार मधील नायकांचाही शोध हा 'स्व'चा शोध होता. त्यांचा संघर्ष सुंदर होता, तितकाच त्या त्या व्यक्तीला आतून उन्मळून टाकून पुन्हा उभा करणारा होता.
संतांचाही असा प्रवास अनेक अभंगांमधून दिसतो. ज्ञानेश्वरांची 'दिन तैसी रजनी' ही विरहिणी ही कदाचित पहिली पायरी, मग 'कानडा ओ विठ्ठलू' मधील पाया पडू गेले, तर पाऊल दिसत नाही. सामोरा की पाठमोरा ते कळत नाही. क्षेम (आलिंगन) देऊ गेले तर मी ची मी एकली हा अनुभव. हे सगळं त्यांच्यासाठी किती त्रासाचं असेल. पण या सोबत त्यांना जी जाणीव झाली ती एकत्वाची, अद्वैताची. मग यातून 'ध्यान कळो आले'. अद्वैतात परमेश्वर आणि भक्त हे एकरूप झाले म्हणतात पण ज्ञानेश्वरांनी त्याही पुढे 'तुझा तूचि देव, तुझा तूचि भाव' हे सांगितलंय आणि देवाच्या एकत्वासोबत भावाचेही एकत्व सांगितले.
हा प्रवास सगळ्याच संतांच्या वाट्याला आला असणार. त्याचे अत्यंत भिडणारे शब्दरूप तुकोबांनी उभे केले आहे.
'चुकलिया माये बाळ हुरुहुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी'. किती अनिवार इच्छा प्रकट केलीये. पुढे वृक्षवल्लींच्या सानिध्यात 'अपुलाची वाद आपणासी' झाला असेल. स्वतः कसे आहोत हेही अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले ते 'मन माझे चपळ, न राहे निश्चळ' या अभंगात. आणि अखेरीस 'आनंदाचे डोही आनंद तरंग'. पण या साखळीत कुठेतरी आपण हुकतोय असं वाटायचं. कारण स्व सापडतानाची जी वेदना असेल ती असलेला अभंग ऐकण्यात आला नव्हता (माझी कमतरता)
अशात एक चित्रपट पाहिला, वाय झेड. नाव ऐकून आधी बघितलाच नाही. नंतर सहज म्हणून पहिला आणि त्यात गजानन कुलकर्णी जो बदलत गेला ते भारी वाटलं. जेव्हा सगळं सोडून गजानन सुटतो तेव्हा backgroundला अभंग सुरू होतो
सावलीची आस ना, कोवळसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी
यात एक ओळ आली
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो
हे ऐकून ती साखळी पूर्ण झाली. स्वतःच स्वतःला व्यालो यापेक्षा कोणती वेदना मोठी असेल? आणि जन्मल्यावरच्या आनंदापेक्षा कोणता आनंद मोठा असेल? Just amazing!!!
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो


दि. २६ ऑगस्ट २०१७

अतरापी - पुस्तक परिचय

अतरापी: ध्रुव भट्टांच्या कल्पनाशक्तीतून आलेलं अजून एक अप्रतिम पुस्तक
आपण मराठीत ज्याला अत्राब म्हणतो तेच गुजराथी मध्ये अतरापी. शेतकरी मराठी बोलीत जित्राब आणि अत्राब हे शब्द येतात. शेतीसाठी उपयुक्त जनावरे म्हणजे जित्राब आणि उपयोगी नसलेले अत्राब. सरधोपट पाहिलं तर दोन कुत्र्यांची ही कथा. ते जन्मतात तिथपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. दोघे भाऊ स्वतंत्र आणि वेगवेगळ्या विचारांचे. एक, याचं नाव कौलेयक, शिकून सवरून साधक बनतो तर दुसरा, याचं नाव सारमेय, न शिकता, पण समजावून घेऊन मोक्षाप्रत जातो.
मालक आणि पृथा या दाम्पत्याकडे सद्भाविनी नावाची एक कुत्री असते तिला ही दोन मुले होतात. कौलेयक शिकवू ते शिकणारा, मोठं होऊन कुणीतरी थोर 'बनायचं' असं ध्येय असलेला बनतो तर सारमेय त्याच्या नैसर्गिक भावनांना अधिक प्रगल्भ करत सभोवताल समजावून घेत राहतो.
सारमेय घरातून पळून जातो आणि त्याला अनेक लोक भेटतात. त्यांच्यासोबत जीवनानुभव घेत तो मोठा होत जातो. यात त्याचे अनेक संवाद/प्रसंग निव्वळ अप्रतिम आहेत.
घरी पृथा व माळी, हे दोघेच त्याला काही शिकवायला जात नाहीत. फक्त भवताल समजून घेण्यासाठी मदत करतात.
घराबाहेर पडल्यावर प्रथम त्याला एक घरंदाज कुत्रा भेटतो. तो सारमेयला हाकलतो आणि हा माझा इलाखा आहे असं म्हणतो. त्यावर सारमेय म्हणतो, "जो सोडून बाहेर जाणं असुरक्षित वाटतं त्याला तुम्ही 'इलाखा' म्हणता. असंच ना?" सहजपणे आपल्याला comfort zone कसा असतो हे सांगतो.
एका नदीकिनाऱ्यावर 'नदी कुठे आहे?' हा प्रश्न नदीचं सतत प्रवाही असणं अधोरेखित करतो.
शकू नावाच्या एका छोट्या मुलीकडे काही दिवस राहतो. तिथे त्याचा सत्कार होणार असतो पण त्यात गुंतायचं नसल्याने तिथून निघतो. त्यावर शकू पृथाला सांगते की तो अजून 'बंधनाच्या भीतीपासून मुक्त' झालेला नाहीये. बंधनात न राहणे हे बंधनाच्या भीतीचे बंधन असू शकते!
एका महादेव मंदिराच्या पुजाऱ्याकडे तो काही दिवस राहतो. तिथे अकस्मात मंदिरात सुवर्णपात्रे प्रकट होतात तशीच ती चोरीलाही जातात. चोरी झाल्यावर पोलिसात रीतसर तक्रार होते. एका मुसलमानावर चोरीचा आरोप होतो, पोलीस त्याला घेऊन जातात, त्याचा कोठडीत मृत्यू होतो. तेव्हा सारमेय पुजाऱ्याला विचारतो, "एका सकाळी भांडी प्रकट झाली, एक सकाळी अदृश्य झाली. या दोन सकाळींमध्ये तुम्हाला तक्रार नोंदविण्याजोगा मोठा फरक कोणता वाटला?" आणि पुजारी ते मंदिर सोडून निघून जातो. सारमेय आपल्या प्रवासाला लागतो.
सारमेय एका श्रीमंत पण एकट्या माणसाकडे राहतो. त्याच्या मुलाचे आणि त्याचे काही वाद असतात. ते सारमेयामुळे मिटतात. तेव्हा मुलगा सारमेयाला म्हणतो, "मी शिकलो नाही, मला समजलं आहे. शिकण्यापेक्षा समजणं अधिक उचित आहे, हे मी मान्य करतो."
हे आणि असं बरंच काही या पुस्तकात आहे. ते वाचणे हे मी लिहून सांगण्यापेक्षा अधिक उचित आहे

प्रयत्नवादी - दैववादी

आयुष्यात "दुसरी संधी" असं काही नसतं. प्रयत्नवादी लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थिती स्वीकारतात, अथक परिश्रम करतात, त्यानंतर त्यांना जे मिळतं त्याला दैववादी लोक "दुसरी संधी" असं म्हणतात.

एका प्रयत्नवाद्याचे अपयश दुसऱ्या प्रयत्नवाद्यासाठी मार्गदर्शक ठरते तर दैववाद्यासाठी निराशाजनक

#कुणीसं

दि. २४ नोव्हेंबर २०१७

गंगाजमनी तहजीब

एक फुर्रोगामी मेसेज फिरतोय... त्याचे उत्तर
ताजमहाल कि तेजोमहाल हे माहित नसलेल्या लोकांसाठी ,
== ताज महाल की तेजोमहालय हे स्कॅनिंग आणि सगळे ताज मध्ये असलेले दरवाजे उघडून स्पष्ट होईल. ते काम संशोधकांचे आहे. मी त्यात पडणार नाही. आणि योगी आदित्यनाथ यांनी एक मुद्दा स्पष्ट केलाय तो म्हणजे ताज भारतीयांनी बांधला आहे. भारतीय वास्तुकलेचा (मुस्लिम प्रभाव असलेला) तो एक उत्तम नमुना आहे. एवढं कारण ताज ला आपलं मानण्यासाठी more than sufficient आहे.
पण त्याखाली शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात ते चुकीचे आहे. एका बाईच्या नवऱ्याला मारून तिच्याशी निकाह करायचा, तिला १७ वर्षांत १४ वेळा प्रसूती सहन करायला लावायची, त्यात १४व्या वेळी ती मरते, नंतर तिच्या बहिणीशी निकाह करायचा... यात मुमताज वर असलेलं प्रेम कुठे आहे? पण हे विचारणं इतिहास असला तरी सोयीचं नाही.
---
तक्रार , फिर्याद ,गुन्हा शब्द माहितेय का ? ह्या शब्दांचा वापर मराठीत सरकारी भाषेत सहजपणे केला जातो त्याच मूळ माहितेय का ? किंवा त्याचा मराठी प्रतिशब्द माहितेय का ?
== नाही माहीत. भाषा ही अन्य भाषांमधून नवे शब्द घेऊन समृद्ध होत असते. जी भाषा हे नाकारते ती मृत होते.
---
आंब्याच मूळ माहितेय का ?
गुलाबाच मूळ माहितेय का ?
== आंबा पूर्व भारत आणि म्यानमार
== गुलाब मेक्सिको आणि उत्तर आफ्रिका
याचा ताजशी काय संबंध आहे ते माहीत नाही. उगा प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून सांगितले
---
ज्या मुघल खानदानीच्या नावाने कडाकडा बोट मोडली जातात त्या अकबराच्या सेनापतीच नाव राजा मानसिंग होत हे माहितेय का ?
== माहितीये ना. म्हणून मानसिंगला आम्ही महाराणा म्हणत नाही तर केवळ प्रतापांना महाराणा म्हणतो. जे परकीय अकबराच्या विरोधात लढले होते.
---
अकबराच्या दरबारातली नवरत्न माहितेय का ? तानसेन माहितेय का ?
लहानपणी ज्याच्या गोष्टी वाचून मोठे झालोय तो बिरबल कुणाच्या पदरी काम करायचा माहितेय का ?
== अकबराच्या दरबारात होते. जेव्हा अकबराला लक्षात आले की आपण केवळ मुस्लिम म्हणून भारतात राज्य करू शकत नाही तेव्हा दीने इलाही ची सुरुवात त्याने केली. पहिल्या ६० वर्षातला अकबर आणि नंतरचा अकबर यात खूप अंतर आहे. पाहिले ६० वर्ष दडवून ठेवले जातात करण ते पुरोगाम्यांना सोयीचे नाहीत.
---
हळदीघाटी च्या लढाईत जेव्हा मानसिंग अकबराचा सेनापती होता तेव्हा राणा प्रतापाचा सेनापती कोण होता ?
हाकिम खान सुरी हा पश्तून लढवय्या राणा प्रतापाचा सेनापती होता हे माहितेय का ?
== So what?
---
हिंदू व्यापारी सुरक्षितपणे व्यापार करावेत आणि प्रवास करावेत म्हणून त्यांना संरक्षण देणारा आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावून, पाण्याची व्यवस्था करून सराया बांधणारा शेरशहा सुरी माहितेय का ?
== Good. पण हे केवळ हिंदू व्यापाऱ्यांसाठी नव्हतं तर सगळ्याच व्यापाऱ्यांसाठी होतं. आणि त्याच बरोबर केवळ हिंदूंवर औरंगजेबाने लावलेले जिझिया सारखे कर सुद्धा माहीत आहेत.
---
मुघलांच्या कबिल्यात सगळ्यात जास्त विवाहसंबंध करणाऱ्या राजपुतांचा इतिहास माहितेय का ?
== राजपुतांनी महाराणा प्रतापांनंतर मुघलांना विरोध केलाच नाही. त्यांनी मुघली पद्धत आत्मसात केली आणि विवाहसंबंध वाढवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलाही आदर बाळगण्याची गरज वाटत नाही.
---
खापरी नळाने खडकी गावाला आणि अहमदनगर शहराला पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणारा हबशी मलिक अंबर माहितेय का ?
शेतसारा , जमीन मोजणी ह्या प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून राज्यकारभार करणारा मलिक अंबर माहितेय का ?
== मलिक अंबर चांगला होता. त्याने शहाजी राजांना बरीच मदत केली होती. त्याचे अनुकरण नानासाहेब पेशव्यांनी करून कात्रज तलावातून पुण्यात पाणी व्यवस्था केली.
---
शिवाजी महाराजांना पराभूत करून तह करून आग्र्याला यायला लावणारा मिर्झा राजे जयसिंग माहितेय का ?
== माहीत आहे. पण मग शिवाजी महाराजांनी गंगा जमनी तहेजीब म्हणून औरंगजेबापुढे मान नाही झुकवली. परत येऊन २३ किल्ले परत घेतले आणि त्यापुढे पहिल्या बाजीरावाने दिल्लीला धडक दिली.
---
दिल्लीच्या बादशहाच्या बरोबर केलेल्या कराराच पालन करायला पानिपतावर प्राण देणारे सव्वा लाख मराठे माहितेय का ?
पानिपतावर खंडण्या भरून मराठा सरदारांची प्रेत ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारा सुजा माहितेय का ?
== याच सुजाला सदाशिवराव भाऊंनी अब्दाली बाहेरचा आहे आणि तू भारतीय आहे. त्यामुळे अब्दालीला मदत न करता तू आम्हला मदत अशी विनंती केली. पण नजीब खानाच्या नादी लागून सुजाने अब्दालीला केवळ मुस्लिम आहे म्हणून मदत केली आणि त्याचे सैन्य मराठ्यांच्या विरोधात लढलं, मराठ्यांना मारलं आणि मग अंत्यसंस्कार केले. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे.
---
१८५७ ला इंग्रजांच्या विरोधात लढलेली लढाई ज्याच्या नेतृत्वाखाली लढली तो बहादूरशहा माहितेय का ?
== कारण दिल्ली दरबाराशी झालेले करार मराठे १८५७ मध्ये पण पाळत होते. म्हणून दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी बहादूरशहाचे नेतृत्व पुढे ठेऊन सगळी तयारी केली.
---
आजही ग्रामीण महाराष्ट्रात गावच्या पिराला पहिली चादर आणि शेरणीचा मान हिंदू कुटुंबाला असतोय हे माहितेय का ?
== मुळात पीर ही संकल्पना मुस्लिम विरोधी आहे कारण ते प्रतीक पूजन आहे. पण काही सुफी संत आणि हिंदू संत यांनी तो केलेला एक ऐक्याचा प्रयत्न आहे. म्हणून कट्टर सुन्नी कधीही पिराला जात नाही. मुहर्रम मध्ये ताबूत नाचवत नाही. त्यामुळे प्रतीक पूजेला हिंदू असणं हे सामान्य आणि सहजमान्य आहे.
---
हि यादी लांबवत नेली तर पाच पन्नास नाही तर शेकडो पान कमी पडतील.
इतिहास कधीही सोयीचा नसतोय. इतिहासाची थडगी उकरायला गेल कि आपल्याला सोयीचे असणारे सांगाडे जसे सापडतात तसेच गैरसोयीचे सांगाडे हातात हात घालून उकरून वर येतात.
== Exactly. म्हणूनच
१. शिवाजी महाराजांनी मंदिर पाडून उभी केलेली मशीद जमीनदोस्त केली व पुन्हा मंदिर उभारले हे सांगितले जात नाही
२. हैदर अलीला नानासाहेब, माधवराव पेशव्यांनी किती वेळा हरवले हे सांगितले जात नाही
३. टिपू सुलतान किती क्रूर होता आणि त्याने हिंदूंना संपवण्याचे काय प्रयत्न केले हे समोर येत नाही. समोर येते ते त्याने आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांना विरोध केला ते, आणि त्यालाच भारतमातेसाठीचे स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते.
४. पण टिपूच्या न्यायाने दुसऱ्या बाजीरावाने त्र्यंबक डेंगळे यांच्यासोबत इंग्रजांना दिलेली लढत दाखवली जात नाही. इथे इंग्रजी सैन्याच्या महार रेजिमेंटचा पेशव्यांवरील विजय आजही साजरा होतो.
५. औरंगजेबाने काशीचे मंदिर पाडले आणि तिथे ज्ञानवापी मशीद बांधली ये ऐतिहासिक सत्य बोलायचेही नसते
६. संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना हाल हाल करून मारले हे कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात नसतं. आपल्याकडील काही मुस्लिम अजूनही औरंगजेबाला सुफी संत म्हणतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही.
हे आणि असे अनेक सांगाडे गंगा जमनी तेहजीब म्हणून गाडलेले आहेत आणि ते खरे इतिहास जाणणारे, संघ आणि हिंदुत्ववादी लोक उकरून काढत आहेत. यात सोयीचे सांगाडे असावेत म्हणून हा उद्योग सुरू नाहीये तर खरा इतिहास लोकांना माहीत असावा म्हणून सुरू आहे.
------
हि गंगा जमनी तेहजीब भारताची खरी संस्कृती आहे.
हे धागे एवढे घट्ट विणलेले आहेत कि जे उसवायला गेलात तर तुमची बोटच काय तुम्हीही उखडून पडाल.
== वर दिल्याप्रमाणे खरा इतिहास जेव्हा जनतेसमोर येईल तेव्हा जनताच खोटा इतिहास पसरवणाऱ्यांची बोटं उखडायची की त्यांना आख्खं उखडायचं ते ठरवेल. एखाद्या गोष्टीची शांतपणे वाट पाहणे यात संघवाल्यांपेक्षा अजून केवळ शास्त्रज्ञच पुढे आहेत. त्यामुळे वाट बघू.

दि. ३१ ऑक्टोबर २०१७

'ए'ग्रेडी आणि 'बी'ग्रेडी



जेव्हा सगळे भारतीय नि:संदिग्धपणे A गट निवडतील तो दिवस सोन्याचा


दि. २२ नोव्हेंबर २०१७

मराठी/हिंदू/भारतीय कालगणनेची थोडी माहिती

१. महिन्यांची नावे - आपल्या महिन्यांची नावे नक्षत्रांवरून दिलेली आहेत. जेव्हा चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात (किंवा जवळ) असतो त्या नक्षत्राच्या नावावरून महिन्याचे नाव असते.
उदा: चित्रा - चैत्र, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ, मृग - मार्गशीर्ष
२. अधिक मास - आपले महिने हे चंद्रकलेवर अवलंबून असतात. सौर आणि चांद्र मासात साधारण ०.९ दिवसाचे अंतर एका महिन्यात पडते. त्यामुळे दर ३ वर्षांनी हे अंतर match करण्यासाठी अधिक मास असतो. अधिक मास केवळ पहिल्या सात महिन्यातच असतो, म्हणजे चैत्र ते अश्विन हे महिने अधिक मास म्हणून येतात त्यापुढील नाही.
हिजरी कालगणना (मो. पैगंबरांनी जेव्हा मक्केतून मदिनेत पलायन - हिजरात केलं त्या दिवसापासूनची कालगणना) ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पण त्यात अधिक मास नसतो. म्हणून दर ३ वर्षांनी एकत्र येणारे हिंदू व मुस्लिम सण बदलतात. मात्र चिनी कालगणना चांद्र असूनही त्यात अधिक मासासारखी व्यवस्था असल्याने ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते पुन्हा जुळते.
३. तिथी निश्चिती - आपले काही सण हे चंद्र उगवताना त्याची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात तर काही सूर्य उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात. जसे संकष्टी चतुर्थी ही चंद्र उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे सकाळी तृतीया आणि त्याच दिवशी संकष्टी असं बऱ्याचदा होतं. कोजागिरी पौर्णिमा ही रात्री चंद्राची कला कोणती आहे यावर अवलंबून असते तर ज्येष्ठ पुत्र/पुत्रीला ओवळण्याची अश्विन पौर्णिमा ही सकाळी कोणती चंद्रकला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे आपण दूध एका रात्री पितो तर ओवाळण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होतो.
४. तिथी क्षय - काही वेळा एका तिथी नंतर एक skip करून त्या पुढची तिथी येते. त्याला तिथी क्षय म्हणतात. सूर्य उगवताना चंद्राची कला जी असेल ती त्या दिवशीची तिथी असते. पृथ्वीची परिवलन गती आणि चंद्राची परिभ्रमण गती वेगवेगळी असल्याने हे होते.
उदा: द्वितीयेनंतर चतुर्थी आली. या वेळी द्वितीया ही अगदीच सूर्य उगवण्याच्या नंतर संपली, तृतीया सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधी संपली आणि सूर्योदयाला चतुर्थी लागलेली होती. या उदाहरणात तृतीयेचा क्षय झाला.
५. सौर सण - भारतीय सणांमध्ये एकमेव संक्रांत हा सण आहे जो सौर स्थितीवर अवलंबून असतो. संक्रांत ही १४ जानेवारीला येत नाही तर ती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते. शिवकाळात संक्रांत १२ जानेवारीला यायची. आता १४ किंवा १५ जानेवारीला येते. याचे कारण गेल्या ३०० वर्षात पृथ्वीच्या गतीत झालेला बदल हे आहे. लोकमान्यांच्या अभ्यासानुसार मकर संक्रांत महाभारत काळात नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये येत असे.
दैनंदिन व्यावहारिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

दि. १ जानेवारी २०१८

रंग दे बसंती

उडत्या चाली त्या गाण्याला योग्य असल्या तरी काही वेळा अर्थ झाकून टाकतात. पण कधीतरी तो गीतकार त्या गाण्याबद्दल, त्या गाण्याच्या जन्माबद्दल बोलतो आणि ते गाणं पुन्हा ऐकलं की शब्दरचना संगीतापेक्षा जास्त आवडायला लागते. असंच एक गाणं “रंग दे बसंती” चित्रपटाचं शीर्षक गीत.
राकेश मेहरा प्रसून जोशीकडे रंग दे बसंतीचे शीर्षक गीत मागण्यासाठी आला. प्रसून जोशीने काही दिवस घेतले आणि राकेश मेहराला फोन केला. त्यात सांगितले की मी देशप्रेमाची रेसिपी लिहिणार आहे, चालेल का? राकेशचा प्रसूनवर विश्वास होता. आणि सुरू झाला एका सुंदर गाण्याच्या निर्मितीचा प्रवास. त्या शब्दांना अस्सल पंजाबी मातीची चाल संगीताच्या जादूगाराने लावली... ए आर रेहमान. त्यावर चित्रा आणि होम पीच वर खेळत असलेल्या दलेर मेहंदीने कहर केला आणि अप्रतिम गाणं बनलं!!!
या देशाची थोडी धूळ माती, थोडा सुगंधित, मुक्त, मनस्वी - मोकाट वारा, तो श्वास आणि ज्यात जुनून (प्रेमासाठी हौतात्म्य पत्करायला तयार) आहे असं रक्त. हे सगळं एकत्र कर. यातून जो रंग प्रकट होईल त्या बसंती रंगाने मला रंगवून टाक!
थोडीसी धूल मेरी धरती की मेरे वतन की
थोडीसी खुशबु बौराई से मस्त पवन की
थोडीसी ढूंढने वाली धक् धक् धक् धक् धक् धक् साँसें
जिन में हो जूनून जूनून वो बूंदे लाल लहू की
यह सब तू मिला मिला ले फिर रंग तू खिला खिला ले
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
या रंगाने माझी स्वप्ने, माझा आनंद, माझी शेते आणि माझ्या सगळ्या पिढ्या, माझी गाणी आणि मनाचा ठाव रंगव.
सपनें रंग दे अपने रंग दे खुशियाँ रंग दे गम भी रंग दे
नस्लें रंग दे फ़सलें रंग दे रंग दे धड़कन रंग दे सरगम
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
आता पुन्हा रेसिपी...
मध्यम आचेवर थोडं प्रेम ठेव, त्यात थोडे ओढे, नद्या, समुद्र घे आणि हे सगळं एका घड्यात एकत्र करून हलव. ('गागर में सागर' अशी म्हण सुद्धा इथे वापरली आहे, साठा उत्तराची कहाणी सारखी. हे सगळं प्रचंड आहे पण ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय.) त्यातून एक बसंती रंग तयार होईल, त्याने मला रंगवून टाक!
धीमी आंच पे तू ज़रा इश्क़ चढ़ा
थोड़े झरने ला थोड़ी नदी मिला थोड़े सागर ला थोड़ी गागर ला
थोड़ा छिडक छिड़क थोड़ा हिला हिला फिर एक रंग तू खिला खिला
मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
या रंगाने माझं गाव, माझी वस्ती, माझी ओळख – माझं स्वत्व, माझ्या शरीराची एकून एक नस, माझं बालपण – तारुण्य सगळं सगळं रंगवून टाक. आज आत्ता ताबडतोप रंगव... आता उशीर नको.
बस्ती रंग दे हस्ति रंग दे हंस हंस रंग दे नस नस रंग दे
बचपन रंग दे जोबन रंग दे अब देर न कर सचमुच रंग दे
रंग रेज़ मेरे सब कुछ रंग दे मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दि. २६ जानेवारी २०१८

अब तक छप्पन (मंदिरांना भेटी)

शिवजी: मेरा पूरा लाईफ ही चेंज हो गया रे.. 
राहुलजी: लाईफ चेंज होता है तो होने दो। मैंने हमेशा ऐसाहीच किया। लाईफ के साथ कभी इंटरफियर नहीं।
शिवजी: दूसरों के लाईफ के साथ इंटरफियर करता है वो चलता है? 
राहुलजी: क्या करें? अपना कामही ऐसा है। लेकिन मैंने अपने लाईफ के साथ कभी दखलअंदाजी नहीं किया। जो हुआ, होने दिया। कसम से... अभी आप ही सोचो, जो आदमी कुछ भी नहीं था, ज्यादा पढ़ा नहीं, आज उसके पास... ये....
शिवजी: क्या, ये क्या?
राहुलजी: स्ट्रेंथ
शिवजी: इसको स्ट्रेंथ नहीं, न्यूसन्स व्हॅल्यू बोलते है।
राहुलजी: बोले तो?
शिवजी: देख, स्ट्रेंथ का मतलब है, ताकत। मैंने कभी पॉलिटिक्स किया नहीं। हिमालय से लेकर रामेश्वरम् तक भारतीय मुझे पूजते है। लेकिन तू ने और तेरी पार्टी ने हमेशा मुझे इग्नोअर किया। जिन्होने मेरी मूर्तीयो को मंदिरो को तोडा उनसे तुम्हारी पार्टी के कई लोगों को हमदर्दी है। शायद तुझे भी होगी। फिर भी तू मेरा नाम लेता है। मेरे मंदिर मे आकर मेरी पूजा करता है। खुद को जनेऊ धारी हिंदू कहेलाता है। तेरे पार्टीवाले भी आपस में मेरी बजाते है लेकिन सबके सामने मेरे आगे झुकते है। इसको बोलते है स्ट्रेंथ। तू गुजरात मे हिंदू बोल के मेरी पूजा करता है और उसी दौरान कर्नाटक मे मेरे नाम से लिंगायत/वीरशैव का प्रयोग कर के हिंदुओ मे अलगाव फैलाता है। अब तू ने मेरी पूजा शुरू की। अब तेरे दिमाग में चल रहा है की इसका फायदा कैसे उठाऊँ? इसको ऐसे इस्तेमाल करूँ की वैसे इस्तेमाल करूँ... भाजपा को गुजरात मे छोटा झटका दिया। अब आगे इसको कैसे वापरू मैं? कहा हिंदू बना के पेश करू, कहा अलग धर्म की मग करके वोटो को बटेरू? ये सब जो सोच रहा है ना, उसको बोलते है न्यूसन्स व्हॅल्यू। क्या हँस रहा है, मै तो कब से यही हू। इतिहास जानता है की तेरे परनाना ने मेरा मंदिर बनाने को सरदार पटेल को विरोध किया था। वो तो सोमनाथ मे राजेंद्र बाबू आने से भी परेशान थे। फिर भी मंदिर बना और तू यहा आया मुझे प्रणाम करने.....स्ट्रेंथ।
(मूळ संवाद - संदीप श्रीवास्तव. चित्रपट - अब तक छप्पन. मूळ विडंबन (गांधीजी/मोदीजी) Utpal VB. हलकेच घेणे ही विनंती. राहुल गांधींचा मानभंग हा हेतू नाही. तरी मानभंग वाटल्यास क्षमस्व.)

दि. ३० जानेवारी २०१८

अलिप्त आणि निर्लिप्त

दोन दिवसांपूर्वी लिहिताना सहजच दोन शब्द लिहिले गेले. एक नेहरूंच्या परराष्ट्रनीतीसाठी होता - अलिप्ततावादी आणि दुसरा मोदींच्या परराष्ट्रनीतीसाठी होता निर्लिप्ततावादी. गेले दोन दिवस डोक्यात एक धागा या दोन शब्दांभोवती फिरतोय. त्यात जो काही विचार मनात आला तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.
आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की नेहरूंनी त्यांच्या परराष्ट्रनीतीबद्दल शद्ब इंग्रजी वापरला होता - non aligned. त्याचं भाषांतर करताना कदाचित वेगळा शब्द योजता आला असता.
अलिप्तता/निर्लिप्तता यावर पुन्हा परत येतोय. यासाठी सर्वात आधी एक उदाहरण देतो. अर्थात महाभारतातील. बलरामाला युद्ध व्हावे असं वाटत नव्हतं. केवळ राज्यासाठी होणारं प्रचंड मोठं युद्ध त्याला नकोसं वाटत होतं. त्यामुळे बलराम युद्धाआधी वनवासात गेला आणि युद्धाच्या शेवटच्या दिवशी परतला. कृष्णालाही युद्ध व्हावं असं वाटत नव्हतं. पण त्याने शिष्टाई केली. जेव्हा युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडणार याची खात्री झाली तेव्हा जो पक्ष खरा वाटला, त्याच्या बाजूने युद्धात नि:शस्त्र गेला. पांडवांना नैतिक मदत आणि मार्गदर्शन दिले.
माझ्या मते या उदाहरणात बलराम अलिप्त राहिला तर कृष्ण निर्लिप्त!
तुकारामांच्या एका अभंगात ते म्हणतात,
अणूरेणूया थोडका। तुका आकाशाएवढा।
गिळुनि सांडिले कळीवर। भवभ्रमाचा आकार।।
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।
यात तुकाराम ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास सांगत नाहीत, तर कोणत्याही अपेक्षेशिवाय उपकार करायचे सांगतात. म्हणजेच निर्लिप्तपणे काम करायचे सांगतात. अलिप्तपणे कर्मसंन्यास घेण्याचे सांगत नाहीत. भगवद्गीतेची हीच शिकवण लोकमान्यांनी गीतारहस्यात सांगितली आहे.
कदाचित अलिप्त व निर्लिप्त या शब्दांच्या अर्थामध्ये कुणाला फरक आहे असे वाटणार नाही. पण मला जो वाटला तो मी सांगितला.
निर्लिप्तता काय असते हे सांगणारी सुरेश भटांची कविता देऊन थांबतो.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सांगती ’तातपर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

दि. १३ फेब्रुवारी २०१८

सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक

मागील काही दिवसांत प. पू. सरसंघाचालकांच्या सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक भारतीय यावर बरीच चर्चा झाली. काहींनी प्रश्न विचारले, काहींनी विनोद तयार केले, तर ज्यांनी तयार संघटना मोडून आपली संघटना उभी केली, पण ती धड नऊ वर्षे सांभाळता आली नाही त्यांनी नव्वद वर्षांहून अधिक वय असलेल्या संघटनेवर व्यंगचित्र काढून आपली भडास काढली. या सगळ्यातून विरोध न दिसता द्वेष दिसून आला.
संघ तीन दिवसांत युद्धजन्य परिस्थितीत स्वयंसेवकांना युद्धसज्ज कसे करू शकतो? हा यातील मुख्य प्रश्न. युद्धसज्ज असणे म्हणजे बंदुका घेऊन थेट सीमेवर जाणे असे नसते. सैन्याची अनेक अन्य कामे असतात. ती हलकी केली तरी सैन्याला प्रचंड मदत होऊ शकते. सैन्यासाठी जेवण बनवण्यापासून ते सैनिक रुग्णसेवा करेपर्यंत. पण त्यात आत्मीयता आणि शिस्त असावी लागते जी स्वयंसेवकांमध्ये असते, याची मोहनजींना खात्री आहे.
अनेकांनी स्वयंसेवकांनी युद्धजन्य परिस्थितीत कुठे, कसं आणि काय काम केलं याचे अनेक दाखले दिले. पण युद्धजन्य परिस्थिती नसताना तयारी कशी होते याचं मी अनुभवलेलं उदाहरण देतो. सुमारे वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पहाटे सव्वा चार वाजता दार वाजलं. "साडेपाचला शहरसंघचालकांच्या घराजवळील संघस्थानावर अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांचे एकत्रीकरण आहे" हा निरोप मिळाला. मी एका शाखेचा कार्यवाह होतो. सर्व तरुण गटनायकांना निरोप दिला. त्यांनी आपापल्या गटात निरोप दिले आणि साडेपाचला पाचशेहून अधिक तरूण संघस्थानावर आले. शाखा लागली. संघचालकांनी आपण केवळ दीड तासात पाचशे+ स्वयंसेवक एकत्र येऊ शकलो त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कधीही जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर आपण असेच लवकर एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करू असे सांगितले. प्रार्थना झाली आणि सर्व घरी पोहोचले.
वीस वर्षांपूर्वी मोबाईल काय, प्रत्येकाकडे घरी फोन सुद्धा नव्हते. पण खालील गोष्टी स्वयंसेवकांत होत्या
१. निरोप कसा पोहोचवायचा याची शिस्त. संघचालक - दोन भाग कार्यवाह - प्रत्येकी पाच नगर कार्यवाह - प्रत्येकी सुमारे ३, ४ तरूण शाखांचे कार्यवाह - प्रत्येकी ५, ६ तरूण गटनायक - प्रत्येकी ८, १० तरूण स्वयंसेवक. या प्रकारे एका तासात निरोप प्रत्यक्ष भेटून दिला गेला.
२. नेतृत्वावर विश्वास - कुणीही, का बोलावले, ही काय वेळ आहे का... विचारले नाही. संघचालकांनी बोलावले ते काहीतरी काम असेल म्हणून बोलावले असेल. तिथे गेलं की कळेलच. घरच्यांनाही सहज जाऊ दिले कारण त्यांनी संघ पेपरातून, टीव्हीवरून समजावून घेतला नव्हता तर अनुभवला होता.
३. निरोप नेमका पोहोचवणे - या एकत्रीकरणात कुणीही बाल किंवा ४५+ स्वयंसेवक आले नव्हते.
हे स्वयंसेवकांत का असते याचे उत्तर देणे खूप अवघड आहे. ती प्रत्यक्ष संघस्थानावर जाऊन अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे शाखामे आओ, सब जान जाओ।
माझे जे मित्र संघद्वेषी आहेत त्यांना माझे एकच सांगणे आहे. तुम्ही द्वेषी होऊ नका. तुम्हाला संघ आवडत नाही तर विरोधी रहा. तुमच्या मते संघ द्वेष पसरवतो, मग तुम्ही प्रेम पसरवा. कारण तुम्ही स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणवता. द्वेष केल्याने द्वेषच वाढेल. एवढं केलंत तरी आनंद होईल. स्वयंसेवक तुमचा द्वेष नक्की करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही निश्चितच एक भावी स्वयंसेवक आहात

दि. १७ फेब्रुवारी २०१८

कायद्याचा टोला

पूर्वपीठिका - अभिजीत आणि हर्षवर्धन हे दोघे मित्र 2005 मध्ये जीवाची मुंबई करायला जात असताना एका प्रकरणात अडकतात. त्यात त्यांना अभिजीतचा वकील मामा केशव सोडवतो. या दरम्यान केशवला त्याची कॉलेज मधील मैत्रीण नेहा भेटते, मदत करते.
पुढे
केशव आणि नेहाचं 2006 मध्ये धुमधडाक्यात लग्न होतं. नेहाच्या वडिलांची अट केशवने पूर्ण केल्यामुळे ते कोणतीही नवी अट न लादता लग्न लावून देतात. लग्नात अभिजीत आणि हर्षवर्धन मात्र सहभागी होऊ शकत नाही कारण त्यांची शेवटच्या वर्षाची परीक्षा. केशव आणि नेहा गावी येतात आणि केशवचे शेतीमधील प्रयोग सुरू होतात. बीडमधील दुष्काळी भागात केशव शेती फुलवतो आणि सोबत गावातील अन्य शेतकऱ्यांनाही खूप मदत करतो. 2008 मध्ये त्यांना गोड मुलगा होतो.
2007 मध्ये अभिजीत आणि हर्षवर्धन इंजिनियर होतात. हर्षवर्धन त्याच्या बाबांच्या सोबत तालुक्याच्या राजकारणात जातो. त्याची दिशा मात्र अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळी असते. त्यांच्यावर 3 वर्षांपूर्वी आलेल्या प्रसंगामुळे तो बदलून जातो आणि लोकोपयोगी कामे हीच दिशा ठेऊन राजकारणात उतरतो.
अभिजीतवरही पोलीस कोठडीचा परिणाम झाला. इंजिनिअर झाल्यावर नोकरी शोधण्याऐवजी तो IPSची तयारी करतो आणि 2008 मध्ये मुंबईत ACP अभिजीत वैद्य कामाला सुरुवात करतो.
मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तो ड्युटीवर असतो आणि कामा हॉस्पिटल मधील अनेकांना वाचवतो. या वेळी त्याने दाखवलेले प्रसंगावधान त्याला महाराष्ट्र ATS मध्ये घेऊन जाते. तिथे अनेक केसेस वर काम करत अभिजीत आपले वेगळेपण सिद्ध करतो. (या दरम्यान त्याला एक मैत्रीण द्यायची असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी द्यावी. मला तरी कथेची गरज वाटत नाही)
पुण्यात अचानकच 1 ऑगस्ट 2012 मध्ये 5 साखळी स्फोट झाले. अभिजीतची या केसवर नियुक्ती झाली आणि तो त्याच्या पद्धतीने काम करत होता. हर्षवर्धनच्या चांगल्या कामांमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे त्याला अनेक सुगावेही तरुणांकडून कळायचे. या प्रकारणाचाही सुगावा त्याला लागला आणि तो खूप मोठा होता. तेव्हाच त्याला हेही कळते की अतिरेक्यांना मुंबई लोकलमध्ये 2005 मध्ये स्फोट करायचे होते. पण नेमका 'तो' प्रसंग घडला आणि त्यांचा सगळा प्लॅन बारगळला. शिवाय केशवच्या हुशारीने आणि कोर्टाच्या दट्ट्याने ते पकडले गेले. पण पुरेश्या पुराव्यांशिवाय ते बेल वर सोडले गेले. त्यांनीच पुढे 11 जुलै 2006 ला लोकल मध्ये स्फोट घडवले आणि 26/11च्या हल्ल्यात कसाबच्या टोळीला मदत केली. हे सर्व अभिजीतला प्रत्यक्ष सांगणं आवश्यक होतं, फोनवर बातमी लीक होण्याची शक्यता होती. पण बातमी कुठूनतरी लीक झालीच आणि पुणे मुंबई प्रवासात हर्षवर्धनवर हल्ला झाला. त्यात 24 डिसेंबर 2012 ला हर्षवर्धन मारला गेला. हा हल्ला अपघात दाखवून हल्लेखोर फरार झाले.
सर्वांना हा अपघातच वाटला पण हर्षवर्धन च्या वडिलांना यात घातपात असावे असे वाटले आणि त्यांनी अभिजीतचा बोलावून घेतले. त्यांचे सगळे अंदाज त्यांनी अभिजीतला सांगितले. अभिजीत आता हात धुवून अतिरेक्यांच्या मागे लागला.
त्याच दरम्यान नेहा माहेरपणाला आपल्या 4 वर्षांच्या रोहनला घेऊन पुण्यात आली. एका मॉलमध्ये असताना कुतूहलापोटी रोहन दोन व्यक्तींच्या मागे जातो. ते तेच अतिरेकी असतात आणि त्या धावपळीत अतिरेकी रोहनला घेऊन पसार होतात. त्यांना जेव्हा रोहन हा केशवचा मुलगा आहे हे कळतं तेव्हा ते त्याला त्यांच्या अड्डयावर ओलीस ठेवतात.
सबइन्स्पेक्टर अंबिलढगेला 2005 मध्ये केलेल्या चुकीमुळे गडचिरोलीत बदली मिळालेली असते. तेथे मात्र ते आपली चमक दाखवतात आणि आपल्या शौर्याच्या बळावर लवकरच सिनियर इन्स्पेक्टर बनतात. पुढे पुण्यात त्यांची बदली होते आणि अभिजीतला मदत करायला ते पुढे येतात. अभिजीतही मागील गोष्टी विसरून या केसवर लक्ष केंद्रित करतो.
केशव पुण्यात येतो. पोलिसी पद्धतीने अभिजीत शोध घेत असतो पण आणखी काहीतरी करायला पाहिजे म्हणून केशव भाईला मुंबईत भेटतो. भाई त्याला पुण्यातील उस्मानला भेटायला सुचवतो.
एकीकडून अभिजीत आणि अंबिलढगे तर दुसऱ्या बाजूने केशव, नेहा आणि उस्मान गुन्हेगाराचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात. (इथे अजित दळवी यांनी प्रसंग लिहावेत) अखेरीस सर्व पुराव्यांसह अतिरेकी पकडले जातात आणि रोहनचीही सुटका होते.
कोर्टात केस उभी राहते आणि पहिल्याच हिअरिंग मध्ये फडणवीस अशी काही सुरुवात करतात की न्यायाधीश म्हणतात हा आहे कायद्याचा टोला
कलाकार
अभिजीत - उमेश कामत
हर्षवर्धन - अक्षय पेंडसे
(हर्षवर्धनची भूमिका करणारा अक्षय पेंडसे अपघातात वारला. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असलेला एकही प्रसंग यात नाही. सर्व प्रसंगात तो फोनवर बोलतोय आणि दुसऱ्या बाजूने बोलणारा काय बोलतो त्यावरून हर्षवर्धन काय करतोय ते कळाले पाहिजे)
केशव - मकरंद अनासपुरे
नेहा - शर्वरी जमेनिस
हर्षवर्धनचे वडील - अरुण नलावडे
अंबिलढगे - गणेश यादव
भाई - संजय मोने
उस्मान - सिद्धार्थ जाधव
फडणवीस - सचिन खेडेकर
न्यायामीश - मोहन आगाशे
रोहन - कुणीही 4 वर्षांचे गुणी बाळ
अतिरेकी - बिना चेहऱ्याची 2 पात्रे
दि. १८ फेब्रुवारी २०१८

Monday, March 19, 2018

बुद्ध, शंकरचार्य, वैदिक धर्म वगैरे


बुद्ध, शंकरचार्य, वैदिक धर्म वगैरे

बुद्ध धर्म, उदय आणि पूर्व आशियात पूर्ण प्रभाव.

बुद्धांनी त्या काळातील वैदिक धर्मातील चालीरीती
१.      यज्ञ, यज्ञातील प्राणिहिंसा, त्यामुळे येणार्‍या अंधश्रद्धा
२.      चातुर्वर्ण्य
३.      देवाचे अनावश्यक महत्व, त्यामुळे येणार्‍या अंधश्रद्धा
या सर्वांना नाकारले. आणि धर्म सोपा केला.

सामान्य जनांसाठी त्यांनी पंचशील संगितले.

पाणाति पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि - अहिंसा
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि - चोरी न करणे
कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि - व्याभिचार न करणे
मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि - सत्य

सुरा मेरयमज्जपमादठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि - नशा न करणे

एवढे करा, बाकी काही केले नाही तरी चालेल. तुम्हाला मोक्ष मिळेल.

ज्यांना यापुढे, पारमार्थिक ज्ञान हवे आहे त्यांच्यासाठी त्यांनी विपश्यना मार्ग आणि त्यातून निर्वाणप्राप्ती सांगितली. अर्थात प्रपंचात राहून सुद्धा विपश्यना करता येते. पण सर्वात आधी पंचशील अनुसरणे महत्वाचे.

बुद्ध चार्वाकाप्रमाणे देवाला, मोक्षाला direct नाकारू शकले नाहीत. कदाचित चांगले वागून काय मिळणार? याचे सोपे आणि भारतीय परंपरेला शोभेल असे उत्तर मोक्षअसल्याने त्यांनी ते दिले असावे.

बुद्धांनी कधीही कोणते चमत्कार केले नाहीत आणि त्यांच्या अनुयायांनीसुद्धा खोट्या गोष्टी (भिंत चालवणे, मेलेल्या माणसाला जिवंत करणे, विमानातून वैकुंठला जाणे) पसरवल्या नाहीत.

बुद्धांच्या या सोप्या धर्मामुळे केवळ चांगले वागणे आणि कौशल्याधारीत पोटापाण्याची व्यवस्था करणे हेच महत्वाचे ठरले. शिवाय बुद्धाने धर्म हा प्रचलित भाषेतून सांगितला आणि संस्कृत, जी केवळ अभिजनांची भाषा झाली होती, तिला बाजूला ठेवले व धर्मज्ञान सामान्य माणसांसाठी खुले केले. त्यामुळे यज्ञ करणारे, पूजा घालणारे, पोथ्या-पुरणांचा चुकीचा अर्थ लावून सामान्यांना गंडवणारे, कर्मकांडत देवत्व शोधणारे यांचे अच्छे दिनगायब झाले.

कृष्णाने कर्मयोग सांगितला. बुद्धाने तेच, चांगले वागाया पद्धतीने संगितले. कृष्णाने या जन्मात आत्म्यावर कर्मसंस्कार न होऊ देता कसे जगावे हे संगितले, बुद्धाने मागील जन्मातील कर्मसंस्कार सुद्धा कसे दूर करावे ते सांगितले. माझ्या मते, बुद्धाने हिंदू धर्म हा कर्मकांडातून काढून खर्‍या कर्मयोगाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही झाले.

बुद्धांचा कालखंड हा ई.पू. ५०० च्या सुमारास आहे. त्यानंतर चाणक्य आणि मौर्य यांचा कालखंड आहे ई.पू. ३५० च्या सुमारास. नंतर सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला तो ई.पू. २७० च्या आसपास. इथून पुढे बुद्ध धर्म हा पूर्व आशियात पसरत गेला तो जपान पर्यंत. तेव्हापासून ते आदिशंकराचार्य यांचा उदय होईपर्यंत, म्हणजे ई.नं. ८०० पर्यंत, सुमारे १००० वर्ष बुद्ध धर्म हा अफगाणिस्तान पासून जपान पर्यंत सर्वत्र पोहोचला होता.

पण कोणताही संप्रदाय असो, त्यात चांगले वाईट लोक येतातच. शिवाय शिकवणुकीचा अर्थ काढणारेही खूप लोक असतात आणि ते आपल्या बुद्धिप्रमाणे किंवा स्वत:च्या फायद्याचे अर्थ काढतात. असेच अर्थ बुद्ध धर्मात देखील काढले गेले.
१.      चीन व जपान मध्ये बुद्ध धर्माचे विकृत रूप तेथील राज्यकर्त्यांनी तयार केले. ज्यात शत्रूचे किती लोक मारले यावरून ती व्यक्ती निर्वाणपदाच्या किती जवळ गेली ते ठरवले जात असे. यावर एक सविस्तर पुस्तक आहे. इच्छुकांनी शोधून वाचावे.
२.      भारतात, जे लोक संसार सोडून धर्मकार्यात, साधनेत वेळ व्यतीत करतात ते महान, त्यांनाच मोक्ष मिळणार, इतर लोक जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटणार नाहीतवगैरे गोष्टी पुढे आल्या आणि जास्त लोक सान्यासी आणि कमी लोक गृहस्थाश्रमी असा असंतुलित समाज निर्माण होईल की काय असे वाटू लागले.

हिंदू धर्मातील दर्शने

बुद्धांनी इतकी वर्षे मूर्तिपूजा आणि कर्मकांडांना विरोध केला. पण आज जगात सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि सर्व धार्मिक विधी हे बुद्ध भिख्खू करतात. म्हणजे पुन्हा बुद्ध धर्मात मूर्तिपूजा व कर्मकांड आलेच. This is irony! असो.

शंकराचार्याँनी पुनरुज्जीवित केलेला हिंदू धर्म बघण्याआधी एकूण हिंदू दर्शने कोणती आणि ती काय सांगतात ते बघणे सयुक्तिक राहील. हिंदू धर्मांतर्गत ६ आस्तिक आणि ३ नास्तिक दर्शने मनाली गेली आहेत.
आस्तिक दर्शने:
१.      सांख्य
२.      योग
३.      न्याय
४.      वैशेषिक
५.      मीमांसा
६.      वेदान्त

नास्तिक दर्शने:
१.      बुद्ध
२.      जैन
३.      चार्वाक (यात आजीवक हे आणखी एक उपदर्शन आहे)

आस्तिक दर्शने
सांख्य:
सांख्य दर्शन कपिल मुनींनी मांडले. यात द्वैत तत्वज्ञान संगीतलेले आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष* हे वेगवेगळे आहेत. गीतेच्या अध्याय २ मध्ये सांख्य दर्शन विस्ताराने सांगितलेले आहे. प्रकृती तीन गुणांनी बनलेली आहे. सत्व, रज तम जोवर यांचे प्रमाण बरोबर आहे, तोवर no issues – balance गेला की गडबड. सांख्यांच्या मते, अविद्या हे सर्व दु:खांचे कारण आहे. विद्या, म्हणजेच विवेकबुद्धी ही मोक्षाप्रत घेऊन जाते. हा विवेक तीन गुणांना प्रमाणात ठेवतो. अविद्येमुळे अहंकार निर्माण होतो. अहंकारातून दु:ख निर्माण होतात.
विवेकबुद्धीने प्रकृती आणि पुरुष यातील द्वैत कळते. आणि ते कळले की कैवल्यस्थिती येते. ही कैवल्यस्थिती म्हणजे मोक्ष!
इथे कुठेही typical देवांचा उल्लेख नाही. तरीही हे दर्शन आस्तिक मानतात कारण आत्म्याचे अस्तित्व यांनी मान्य केले आहे. तसेच पुरुष हा केवळ चैतन्य स्वरुपात मानला गेला आहे.

योग:
योग दर्शन पतंजलि मुनींनी मांडले. यात आठ पायर्‍या सांगितल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. योगसूत्रात पुरुषाला देव मानले आहे. समाधी म्हणजे मोक्ष.
योग म्हणजे चित्तवृत्तींना स्थिर ठेवणारे mechanism. योगांमध्ये या आठ पायर्‍यांचा राजयोग हा उत्तम मनाला गेला आहे.
इथेही typical देवांचा उल्लेख नाही.

गमतीची गोष्ट: ११ व्या शतकात एक पर्शियन विद्यार्थी अल बिरुनी भारतात आला होता. त्याने योगाचा खूप अभ्यास केला. पतंजलींचे योगसूत्र त्याने पर्शियन आणि अरबी भाषेत नेले. भारतीय साधूंशिवाय सूफी संत योग करायचे. सूफी संत देवाला प्रियकर अथवा प्रेयसीच्या रूपात बघतात. कदाचित त्यामुळेच इश्क के सात मुकाम दिलकशी, उंस, मोहोब्बत, अकीदत, ईबादत, जुनून, मौत त्यांनी मांडले असावेत... This is only my theory. There is no evidence of it.

*पुरुष म्हणजे स्त्री पुरुष मधला नाही!!! पुरात (नगरात) वास्तव्य करतो (किंवा खरे तर झोपतो) तो पुरुष. नगर म्हणजे ५ ज्ञानेंद्रीये, ५ कर्मेन्द्रीये आणि १ मन. अशा ११ गोष्टींचे नगर.

सांख्य आणि योग ही दर्शंनांची पहिली जोडी आहे. दुसरी जोडी न्याय आणि वैशेषिक. न्याय दर्शन हे अधिभौतिक आणि तर्कबुद्धीचे दर्शन आहे तर वैशेषिक दर्शन हे पदार्थ विज्ञानाचे दर्शन आहे.

न्याय:
तर्कबुद्धी वापरुन देवाचे अस्तित्व सिद्ध करणारे दर्शन. हे दर्शन कोणी मांडले हे स्पष्ट नाही. तुम्हाला भारत एक खोजमालिकेतील शीर्षकगीत आठवत असेल
सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अतल जल भी कहां था
हे शब्द ऋग्वेदातील ऋचा आहेत. आणि यापासूनच न्याय दर्शन सुरू होते.
हेतुविद्या, अन्वेक्षण, प्रमाणशास्त्र, तत्त्वशास्त्र, तर्कशास्त्र, वादार्थ, फक्किकशास्त्र या सहा विद्या/शस्त्रांद्वारे न्याय दर्शन या जगाचा कुणीतरी अज्ञात कर्ता आहे हे दाखवून देते. पण हा कर्ता म्हणजेच चैतन्यतत्व आहे आणि त्याद्वारेच सर्व जगाचे व्यवहार चालत असतात. हा देव इंद्र, वरुण, ई., किंवा ब्रह्मा-विष्णु-महेश या रूपात नाही.

वैशेषिक:
न्याय दर्शनापासून पुढे अधिक प्रगल्भ होत वैशेषिक दर्शन बनले. कणाद मुनी या दर्शनाचे कर्ते आहेत. या दर्शनात जगत पहिल्यांदा अणू हे concept मांडली गेली. जगातील सर्व पदार्थ हे परमाणु पासून बनले आहेत हे कणादांनी सांगितले. प्रत्येक पदार्थ हा द्रव्यापासून बनला असून त्यात अणू हा लघुत्तम भाग आहे. प्रत्येक पदार्थाचे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय असे गुणधर्म असतात.
वैशेषिक हे तर पूर्णपणे पदार्थविज्ञान आहे. Again, इथेही typical देवांचा उल्लेख नाही

वरील चारही दर्शनांनी देव ही concept मान्य केलेली आहे. त्यांनी देवाचे आणि वेदांचे अस्तित्व मान्य केलेले आहे. वेदांतील ऋचांचा अभ्यास करून त्यावर अधिक संशोधन करून ही दर्शने सिद्ध झालेली आहेत. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यातील योग आणि वैशेषिक दर्शनांची formal निर्मिती म्हणजे योगसूत्रे आणि वैशेषिक सूत्रे हे बुद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर मांडले गेले आहेत. त्यामुळे हिंदू आणि बुद्ध धर्मात भांडणे होती वगैरे या गोष्टी केवळ बुद्धिभेद करण्यासाठी इंग्रजांनी मांडल्या असाव्यात.

मीमांसा किंवा पूर्वमीमांसा:
या दर्शंनांमध्ये वेदांमध्ये असलेले यज्ञविधी कसे करावेत, कोणत्या पूजा असाव्यात basically मीमांसा हे दर्शन कर्म-कांड आहे. तर वेदान्त किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन ज्ञान-कांड आहे. हे दर्शन जैमिनी या ऋषींनी लिहिले. मीमांसा मधील सूत्रे ई. पू. ३ र्‍या ते ई. पू. १ ल्या शतकापर्यन्त लिहिली गेली. पुढे त्याचा विस्तार कुमारिला भट्ट आणि प्रभाकर यांनी ई.स. ७ व्या शतकात केला. त्याहीपुढे अनेक ऋषींनी मीमांसेवर काम केले. हे सर्व काम सुद्धा बुद्ध धर्माच्या प्रभाव काळातीलच आहे.

वेदान्त किंवा उत्तरमीमांसा:
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, अरण्यके आणि भगवद्गीता यापासून वेदान्त किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन बनले. उपनिषदांमध्ये जीवनाचे ध्येय, कार्य, साधन, साध्य यावर विविध गोष्टींमधून प्रकाश टाकला आहे. भगवद्गीता सुद्धा एक उपनिषदच आहे.
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांना शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयी म्हटले आहे. आणि या प्रस्थानत्रयी वेदान्ताच्या basic foundation आहेत. केवळ वेद हे प्रमाण न मानता त्याशिवाय ज्या नवीन गोष्टी पुढील काळात मांडण्यात आल्या आहेत, जसे, सांख्य, योग आणि पुढील काळातील उपनिषदे आणि गीता या सर्व गोष्टींना एकत्र करून वेदान्त मांडला गेला.
वेदांताचे अनेक उप-प्रकार आहेत. ते खलील प्रमाणे
१.      अद्वैत वेदान्त गौडपाद
२.      विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य
३.      द्वैत मध्वाचार्य
४.      द्वैताद्वैत निंबार्काचार्य
५.      अचिन्त्यभेदाभेद चैतन्य महाप्रभू
६.      भेदाभेद
यातील गौडपाद हे शंकराचार्यांचे गुरु होते.

चार्वाक:
चार्वाक दर्शन हे आधी लोकायत किंवा बृहस्पत्य म्हणून ओळखले जायचे. बृहस्पत्य सूत्रे हे ई. पू. ६०० वर्षांपूर्वी लिहिले गेले पण ते आता मूळ स्वरुपात उपलब्ध नाही. चार्वाक दर्शनाचे मूळ हे ऋग्वेदापर्यंत जाते. चार्वाक दर्शन असे मानते की जे प्रत्यक्ष दिसते, अनुभवता येते तेच सत्य आहे. जैन व बुद्ध वाङ्मयात लोकायतामधील सूत्रांचा वापर केलेला आहे. चार्वाकांच्या मते स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म या निव्वळ कल्पना आहेत. त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. जे जग पृथ्वीवर आहे तेच सत्य आहे कारण ते शोध घेत राहिला तर त्यातील गुंतागुंत ही स्पष्ट होईल. पण कोणत्याच गोष्टी दैवावर ढकलू नयेत. चार्वाकांनी स्वर्ग, नर्क या संकल्पना खूप सोप्या करून सांगितल्या होत्या स्वर्ग म्हणजे असे ठिकाण जे मनुष्य स्वत: निवडतो आणि स्वतंत्रपणे जगतो, तर नर्क म्हणजे पारतंत्र्य. पण चार्वाकांना केवळ ऋणम् कृत्वा घृतम् पिबेतएवढेच मानून अत्यंत त्याज्य ठरविण्यात आले.

शंकराचार्यांनी जे काम केले आहे त्याचे ढोबळमानाने खलील भाग होतात
१.      लेखन:
शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, धर्मसूत्रे, योगसूत्रे आणि गीतेवर भाष्य (विवरण) केले. त्याचे अर्थ त्यांनी नव्याने तर्काधारित संगितले.
२.      अद्वैत वेदान्ताला देशभरात मान्यता:
शंकराचार्य अद्वैत वेदान्त सांगत आणि कित्येक लोकांशी चर्चा वादविवाद करून सर्वांना पटवून देत देशभर फिरले. त्यांचा मंडणमिश्र यांच्याशी असलेला वादविवाद प्रसिद्ध आहे.
३.      चार धामांची उभारणी:
या धामांची उभारणी करताना वेदांचे महत्व देशभरात कायम राहील याची काळजी घेतली. सर्व देशाला एका विचारधारेत बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशभरातील लोक हे एकमेकांशी जोडलेले राहू लागले.
४.      पंचक, वैष्णव आणि शैव यातील दुरावा कमी करणे:
देशभरात अनेक लोक विविध देवांचे भक्त होते. बौद्ध धर्माचा प्रभाव असूनही देव ही संकल्पना लोकांनी त्यागलेली नव्हती. पण एका देवाचे उपासक दुसर्‍याला कनिष्ठ मानीत. हे थांबवण्यासाठी पंचक ही संकल्पना पुढे आली. देवी, शंकर, विष्णू, सूर्य, गणेश यांना पूजणारे लोक विभक्त होते. पण शंकराचार्यांनी सर्व देवांना एका देवघरात आणले. उदा. जर मी देवीचा पूजक असेल तर मध्यभागी देवी आणि चार दिशांना अन्य देव अशी पंचकाची मांडणी केली.
५.      आश्रमाधारित समाजरचना:
बुद्ध धर्माच्या प्रभावामुळे आश्रम व्यवस्था मागे पडत होती. तिची पुनर्स्थापना करून गृहस्थाश्रमाचे महत्व अधोरेखित केले.

हे सगळे त्यांनी केवळ ३२ वर्षे (काही लोक ३९ वर्षे म्हणतात) एवढ्याच आयुष्यात केले. Great! Simply great!!!

शंकराचार्यांच्या काही गोष्टी मला पटत नाहीत. (मी खूप क्षूद्र मनुष्यप्राणी आहे, हे मला माहीत आहे)
१.      भगवद्गीता ही निवृत्तीपर आहे असे सांगणे:
कृष्णाने गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे हे संगितले आहे की अर्जुना युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. त्यामुळे तू त्यापासून दूर जाऊ नको. ऊठ आणि युद्ध कर.म्हणजेच तू कर्मापसून निवृत्त होऊ नकोस, तर कर्म करत रहा. कर्मफलापासून निवृत्त हो. पण म्हणजे फळ घेऊ नको असे नाही, तर त्याच्या लोभात राहू नको. कर्म करण्याच्या आधीच फळाचा विचार करू नको. यात कुठेच निवृत्ती सांगितलेली नाही. शिवाय ज्ञान हे कर्माशिवाय पंगू आणि कर्म हे ज्ञानाशिवाय आंधळे आहेअसे संगितले आहे. आणि म्हणून ज्ञानवान होणे अत्यंत आवश्यक आहेच. पण ज्ञानवान झाल्यावर कार्य थांबवणे म्हणजे पांगळे होणे, असेही सांगितले आहे. असे असूनही शंकराचार्यांनी निवृत्ती* ही ज्ञानाची पहिली पायरी सांगितली...
हे मत २०व्या शतकात लोकमान्यांनी बदलले आणि गीतारहस्य लिहून गीता ही प्रवृत्तीपर आहे असे ठाम प्रतिपादन केले. पण मधल्या १० शतकात, आणि त्याही आधी बुद्धधर्माच्या प्रभावकाळात निवृत्ती शिवाय मुक्ती नाही असे असल्याने भारतावर इस्लामी आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी ७०० वर्षे राज्य केले. कारण लोक निवृत्तीला अधिक प्राधान्य देत होते.

२.      बुद्धाला देवत्व देऊन त्यांना अवलंबणे टाळणे
पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे बुद्धांनी हिंदू धर्म हा कृष्णाच्या एक पाऊल पुढे नेला होता. पण कालपरत्वे त्यात चुकीच्या गोष्टी शिरल्या. या गोष्टी दूर करून बुद्ध शिकवण योग्य रीतीने पुढे आणता आली असती. (कदाचित त्यावेळची सामाजिक, राजकीय गरज वेगळी असेल, पण माझे मत हे आहे.) त्याऐवजी बुद्धांना विष्णूचा अवतार ठरविले. एकदा एखाद्या माणसाला देव ठरविले की त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्या शिकवणी प्रमाणे वागण्याची गरज उरत नाही. इथून पुढे बुद्धमार्ग मागे पडत गेला व भक्ती, निवृत्ती, कर्मकांड, पूजा-अर्चना, यज्ञ** यांना पुन्हा महत्व मिळत गेले.

३.      जगन्मिथ्या म्हणणे
जे धडधडीत समोर दिसते आहे त्याला मिथ्या म्हणून सांगितले. जेव्हा लोकांनी अनेक सभांमध्ये विरोधी मुद्दे मांडले त्यांना ज्ञान नाही असे सांगून हरवले. योग्य ज्ञान मिळाले तर हे पटेल असे सांगितले. जग हे परब्रहमावरचे आवरण आहे आणि ते खोटे आहे, त्यापलिकडे जाऊन तोच बघू शकतो जो ज्ञानवान आहे असे सांगितले. प्रभावी व्यक्तिमत्व, तारुण्य, वक्तृत्व या जोरावर अनेक logical गोष्टींना illogical ठरवून त्यांनी जगन्मिथ्याला भारतभर मान्यता मिळवून दिली. ती आजतागायत आहे.

न पटणार्‍या गोष्टी असूनही मला शंकराचार्यांनी केलेल्या कार्याचा आदर आहे आणि माझ्यामते हेच हिंदुधर्माचे वैशिष्ट्य आहे.

* विठ्ठलपंत कुलकर्णींनी मुलांची नावे निवृत्ती, ज्ञानदेव (ज्ञान मिळवणे), सोपान (मोक्ष मार्ग), मुक्ता (मुक्त होणे, मोक्ष प्राप्ती) अशी ठेवली आहेत.
** कृष्णाने सुद्धा यज्ञाने पाऊस पडत नाही तर पाऊस हा डोंगर आणि झाडे आहेत म्हणून पडतो हे सांगितले होते. त्यामुळे त्याने इंद्राला यज्ञ करून प्रसन्न करण्याची गरज नाही तर गोवर्धन पर्वताची पूजा करा असे सांगितले. अवृष्टी, अल्पवृष्टी वा अतिवृष्टी यापैकी केव्हाही पर्वतच मदत करेल असेही सांगितले. पण त्या गोष्टीला आपण चमत्कार करून टाकले आणि लहानग्या कृष्णाला अख्खा पर्वत उचलायला लावला. विज्ञानावर मात करण्यासाठी माणसाला देवत्व दिले.

पुन्हा एकदा सांगतो की या विषयाचा मी काही अभ्यासक नाही. पण जे काही आजवर वाचन केले आहे त्यावरून जे माझे निष्कर्ष आहेत ते सर्वांसमोर मांडावे वाटले. म्हणून थोडेथोडे वेळ मिळेल तसे लिहीत गेलो.

धन्यवाद!!!