Monday, March 19, 2018

नीती आणि नियम

साधारण बोलताना नीतीनियम असा शब्द बऱ्याचदा वापरतात. केवळ नीतीने वागून गोष्टी पूर्ण होत नाहीत आणि केवळ नियमांना बांधूनही. म्हणून नीतीनियम ही जोडी आहे.
रामायणाच्या काळात नियम बनत असावेत आणि नीतिमत्ता निश्चित झाली होती. राम वागणुकीतून नीतीला नियमात बसवत होते. रावण हा नियमापासून दूर होताच नीतीशीही त्याचा संबंध नव्हता. तर राम म्हणजे नीती आणि नियम दोन्ही उत्तमपणाने पाळणारे होते.
महाभारताच्या काळात नियम घट्ट बनलेले होते. आपण दुर्योधनाने केलेली प्रत्येक कृती बघितली तर ती नियमांना धरून आहे. मग लक्षागृह ते द्यूत ते अंतिम लढाई. कुठेही त्याने नियम मोडला नाही. पण नीती, ती मात्र नियमांमध्ये हरवली. तर दुसऱ्या बाजूला कृष्ण. लहानपणी लोण्याची चोरी करण्यापासून ते द्रौपदीस्वयंवरात कर्णाला उतरू न देणे, जारासंधाचा भिमाकरवी वध, जयद्रथाला मारण्यासाठी सूर्यग्रहण, कर्णाला निःशस्त्र असताना मारावयास सांगणे, भीमाला गदायुद्धात दुर्योधनाच्या कमरेखाली वार करायला सांगणे अश्या अनेक गोष्टी ज्या नियमबाह्य होत्या त्या केल्या. पण या सर्वांत नीती सोडली नाही.
नियम हे नीतीला पूर्णत्व देण्यासाठी, सर्वसामान्यांना सहज नीतीवान होता यावे म्हणून असतात. त्यात नीती हरवली नाही पाहिजे.
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण!!!

दि. १५ एप्रिल २०१६

No comments:

Post a Comment