Tuesday, March 20, 2018

कायद्याचा टोला

पूर्वपीठिका - अभिजीत आणि हर्षवर्धन हे दोघे मित्र 2005 मध्ये जीवाची मुंबई करायला जात असताना एका प्रकरणात अडकतात. त्यात त्यांना अभिजीतचा वकील मामा केशव सोडवतो. या दरम्यान केशवला त्याची कॉलेज मधील मैत्रीण नेहा भेटते, मदत करते.
पुढे
केशव आणि नेहाचं 2006 मध्ये धुमधडाक्यात लग्न होतं. नेहाच्या वडिलांची अट केशवने पूर्ण केल्यामुळे ते कोणतीही नवी अट न लादता लग्न लावून देतात. लग्नात अभिजीत आणि हर्षवर्धन मात्र सहभागी होऊ शकत नाही कारण त्यांची शेवटच्या वर्षाची परीक्षा. केशव आणि नेहा गावी येतात आणि केशवचे शेतीमधील प्रयोग सुरू होतात. बीडमधील दुष्काळी भागात केशव शेती फुलवतो आणि सोबत गावातील अन्य शेतकऱ्यांनाही खूप मदत करतो. 2008 मध्ये त्यांना गोड मुलगा होतो.
2007 मध्ये अभिजीत आणि हर्षवर्धन इंजिनियर होतात. हर्षवर्धन त्याच्या बाबांच्या सोबत तालुक्याच्या राजकारणात जातो. त्याची दिशा मात्र अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळी असते. त्यांच्यावर 3 वर्षांपूर्वी आलेल्या प्रसंगामुळे तो बदलून जातो आणि लोकोपयोगी कामे हीच दिशा ठेऊन राजकारणात उतरतो.
अभिजीतवरही पोलीस कोठडीचा परिणाम झाला. इंजिनिअर झाल्यावर नोकरी शोधण्याऐवजी तो IPSची तयारी करतो आणि 2008 मध्ये मुंबईत ACP अभिजीत वैद्य कामाला सुरुवात करतो.
मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तो ड्युटीवर असतो आणि कामा हॉस्पिटल मधील अनेकांना वाचवतो. या वेळी त्याने दाखवलेले प्रसंगावधान त्याला महाराष्ट्र ATS मध्ये घेऊन जाते. तिथे अनेक केसेस वर काम करत अभिजीत आपले वेगळेपण सिद्ध करतो. (या दरम्यान त्याला एक मैत्रीण द्यायची असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी द्यावी. मला तरी कथेची गरज वाटत नाही)
पुण्यात अचानकच 1 ऑगस्ट 2012 मध्ये 5 साखळी स्फोट झाले. अभिजीतची या केसवर नियुक्ती झाली आणि तो त्याच्या पद्धतीने काम करत होता. हर्षवर्धनच्या चांगल्या कामांमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे त्याला अनेक सुगावेही तरुणांकडून कळायचे. या प्रकारणाचाही सुगावा त्याला लागला आणि तो खूप मोठा होता. तेव्हाच त्याला हेही कळते की अतिरेक्यांना मुंबई लोकलमध्ये 2005 मध्ये स्फोट करायचे होते. पण नेमका 'तो' प्रसंग घडला आणि त्यांचा सगळा प्लॅन बारगळला. शिवाय केशवच्या हुशारीने आणि कोर्टाच्या दट्ट्याने ते पकडले गेले. पण पुरेश्या पुराव्यांशिवाय ते बेल वर सोडले गेले. त्यांनीच पुढे 11 जुलै 2006 ला लोकल मध्ये स्फोट घडवले आणि 26/11च्या हल्ल्यात कसाबच्या टोळीला मदत केली. हे सर्व अभिजीतला प्रत्यक्ष सांगणं आवश्यक होतं, फोनवर बातमी लीक होण्याची शक्यता होती. पण बातमी कुठूनतरी लीक झालीच आणि पुणे मुंबई प्रवासात हर्षवर्धनवर हल्ला झाला. त्यात 24 डिसेंबर 2012 ला हर्षवर्धन मारला गेला. हा हल्ला अपघात दाखवून हल्लेखोर फरार झाले.
सर्वांना हा अपघातच वाटला पण हर्षवर्धन च्या वडिलांना यात घातपात असावे असे वाटले आणि त्यांनी अभिजीतचा बोलावून घेतले. त्यांचे सगळे अंदाज त्यांनी अभिजीतला सांगितले. अभिजीत आता हात धुवून अतिरेक्यांच्या मागे लागला.
त्याच दरम्यान नेहा माहेरपणाला आपल्या 4 वर्षांच्या रोहनला घेऊन पुण्यात आली. एका मॉलमध्ये असताना कुतूहलापोटी रोहन दोन व्यक्तींच्या मागे जातो. ते तेच अतिरेकी असतात आणि त्या धावपळीत अतिरेकी रोहनला घेऊन पसार होतात. त्यांना जेव्हा रोहन हा केशवचा मुलगा आहे हे कळतं तेव्हा ते त्याला त्यांच्या अड्डयावर ओलीस ठेवतात.
सबइन्स्पेक्टर अंबिलढगेला 2005 मध्ये केलेल्या चुकीमुळे गडचिरोलीत बदली मिळालेली असते. तेथे मात्र ते आपली चमक दाखवतात आणि आपल्या शौर्याच्या बळावर लवकरच सिनियर इन्स्पेक्टर बनतात. पुढे पुण्यात त्यांची बदली होते आणि अभिजीतला मदत करायला ते पुढे येतात. अभिजीतही मागील गोष्टी विसरून या केसवर लक्ष केंद्रित करतो.
केशव पुण्यात येतो. पोलिसी पद्धतीने अभिजीत शोध घेत असतो पण आणखी काहीतरी करायला पाहिजे म्हणून केशव भाईला मुंबईत भेटतो. भाई त्याला पुण्यातील उस्मानला भेटायला सुचवतो.
एकीकडून अभिजीत आणि अंबिलढगे तर दुसऱ्या बाजूने केशव, नेहा आणि उस्मान गुन्हेगाराचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात. (इथे अजित दळवी यांनी प्रसंग लिहावेत) अखेरीस सर्व पुराव्यांसह अतिरेकी पकडले जातात आणि रोहनचीही सुटका होते.
कोर्टात केस उभी राहते आणि पहिल्याच हिअरिंग मध्ये फडणवीस अशी काही सुरुवात करतात की न्यायाधीश म्हणतात हा आहे कायद्याचा टोला
कलाकार
अभिजीत - उमेश कामत
हर्षवर्धन - अक्षय पेंडसे
(हर्षवर्धनची भूमिका करणारा अक्षय पेंडसे अपघातात वारला. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असलेला एकही प्रसंग यात नाही. सर्व प्रसंगात तो फोनवर बोलतोय आणि दुसऱ्या बाजूने बोलणारा काय बोलतो त्यावरून हर्षवर्धन काय करतोय ते कळाले पाहिजे)
केशव - मकरंद अनासपुरे
नेहा - शर्वरी जमेनिस
हर्षवर्धनचे वडील - अरुण नलावडे
अंबिलढगे - गणेश यादव
भाई - संजय मोने
उस्मान - सिद्धार्थ जाधव
फडणवीस - सचिन खेडेकर
न्यायामीश - मोहन आगाशे
रोहन - कुणीही 4 वर्षांचे गुणी बाळ
अतिरेकी - बिना चेहऱ्याची 2 पात्रे
दि. १८ फेब्रुवारी २०१८

No comments:

Post a Comment