डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिंदू" अस्मितेपासून दूर नेलं. आणि आता तर बाकी प्रतिज्ञा न आठवता so called डॉ आंबेडकर अनुयायी केवळ ४-५ प्रतिज्ञा लक्षात ठेवतात. या प्रतिज्ञांमधील मानसिक, नैतिक आणि सामाजिक पुनर्जन्म कुणी लक्षात ठेवत नाही आणि लक्षात घेतही नाही.
या प्रतिज्ञांमध्ये, बुद्धांच्या शिकवणीतील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता, यांचा थेट समावेश आहे.
१. पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम. हे नियम कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाहीत; ते सार्वत्रिक मानवी मूल्ये आहेत. अहिंसा, सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती—ही पाच तत्त्वे व्यक्तीला स्थिर करतात आणि समाजाला सुरक्षित करतात.
- अहिंसा मनातील क्रूरता कमी करते. हिंसा कमी झाली की समाजात भीती कमी होते आणि विश्वास वाढतो.
- चोरी न करणे म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर. यामुळे परस्परांमध्ये सुरक्षितता निर्माण होते.
- कामवासनेचा दुरुपयोग न करणे हे कुटुंबव्यवस्थेला स्थिर ठेवते.
- खोटे न बोलणे समाजातील संवादाला पारदर्शकता देते.
- मद्य व व्यसनांपासून दूर राहणे व्यक्तीचे आरोग्य, विवेक आणि कुटुंबातील शांतता टिकवते.
पंचशील म्हणजे स्वत:वर नियंत्रण ठेवून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारे जीवन.
२. अष्टांग मार्ग हा बुद्धांनी मानवी जीवनाला दिलेला मार्ग आहे. यात विचार, वाणी, कृती, उपजीविका आणि मनाची शिस्त या सर्वांचा समतोल साधला जातो.
- सम्यक दृष्टि: व्यक्तीला अंधश्रद्धा आणि भीतीपासून मुक्त करते.
- सम्यक संकल्प: करुणा आणि अहिंसेवर आधारित विचार निर्माण करतो.
- सम्यक वाणी: कटू, खोटे किंवा हिंसक बोलणे टाळते.
- सम्यक कर्म: म्हणजे नैतिक आणि समाजहिताचे आचरण.
- सम्यक उपजीविका: इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा देते.
- सम्यक प्रयत्न वाईट प्रवृत्ती कमी करून चांगल्या प्रवृत्ती वाढवतो.
- सम्यक स्मृती: सजगता आणि आत्मपरीक्षण वाढवते.
- सम्यक समाधी: मनाला स्थिरता आणि शांतता देते.
अष्टांग मार्ग म्हणजे मानसिक आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग.
३. दहा पारमिता म्हणजे मानवी गुणांचे सर्वोच्च रूप. या गुणांचा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नत करण्याचा मार्ग.
- दान स्वार्थ कमी करते आणि सहकार्य वाढवते.
- शील नैतिकता आणि विश्वासार्हता वाढवते.
- नेक्कम्म/नैष्कर्म (त्याग) लोभ कमी करतो.
- प्रज्ञा विवेक आणि तर्कशक्ती वाढवते.
- वीर्य सकारात्मक कृती करण्याची ऊर्जा देते.
- क्षांती/शांती क्षमाशीलता वाढवते.
- सत्य नातेसंबंधातील विश्वास टिकवते.
- अधिष्ठान ध्येयपूर्तीची ताकद देते.
- मेत्ता (मैत्री) सर्व जीवांप्रती मैत्रीभाव निर्माण करते.
- उपेक्षा (स्थितप्रज्ञता) समत्व आणि मानसिक स्थैर्य देते.
या पारमिता म्हणजे मानवतेचा सर्वोच्च नैतिक आराखडा आहेत.
आज या बौद्ध शिकवणी सोडून विद्रोही प्रतिज्ञांचा वापर केवळ विद्वेषासाठी केला जातोय. त्यामुळे जर कुणी विद्रोही प्रतिज्ञांबद्दल बोलायला लागला की, तिरंगा मधील नाना पाटेकर सारखं म्हणायचं - अगर भगवान बुद्ध की तीन शिक्षाओं का पालन किया हैं तो ही बाकी उन्नीस को हाथ लगाना।
पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता या प्रतिज्ञांतील सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि मानवी मूल्यांचा सार आहेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हावा.
सर्वांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
No comments:
Post a Comment