Thursday, July 25, 2024
पुस्तक परिचय - विनाशपर्व
Friday, June 30, 2023
राजी २
Friday, July 29, 2022
धुरंधर - नानासाहेब पेशवे!
Wednesday, June 9, 2021
स्वयंभू भीम
महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.
संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...
तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.
असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.
Monday, October 5, 2020
पुस्तक परिचय - उत्तरकांड

Friday, September 4, 2020
पुस्तक परिचय : या सम हा

Saturday, June 13, 2020
पुस्तक परिचय - कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम
वेंकट अय्यर, एक केरळी पण मुंबईकर तरुण. IBM मध्ये, सन २००४ मध्ये, सहा आकडी पगाराची नोकरी. तिशीत शेती करायची ठरवतो आणि मग सुरू होतो एक विलक्षण प्रवास. त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे "कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम"
वेंकट IBM मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होते. पत्नी मीना, वर्तमान पत्रात काम करणारी. गुजरात व अन्य काही भागातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यावर तिचे काम सुरू असते. यातून वेंकटची सेंद्रीय शेतीशी ओळख होते. मग आपण शेती करावी हा विचार डोक्यात घट्ट होत जातो. नवीन मोठ्या प्रोजेक्टची संधी की शेती हा निर्णय घेणे भाग पडते आणि वेंकट मधला शेतकरी नवा प्रोजेक्ट नाकारतो.
जवळ शेतजमीन नाही, ती कुठे घ्यायची ठरलेलं नाही. अशा अवस्थेत नोकरी सोडलेली. शेत घेताना कुटुंबातील कुणाच्यातरी नावावर शेती असली पाहिजे हा नवा शोध. सोबत शासकीय अधिकाऱ्यांच्या पैसेवाल्या IBM मधल्या मॅनेजर कडून असलेल्या "अपेक्षा". या सगळ्याला पुरून उरत आणि एकही पैची लाच न देता सरळ मार्गाने वेंकट शेतजमीन विकत घेतो.
मीनाला त्याच काळात द हिंदू मध्ये मोठी नोकरी लागते, काही वर्षे मुंबई मग पाकिस्तान आणि अखेरीस दिल्ली अशा बदल्या होत जातात. त्यामुळे मीना एकीकडे आणि वेंकट शेतावर असा प्रवास नऊ वर्षे सुरू राहतो. त्यानंतर मात्र मीनाही शेतावर येते.
शेती करताना रासायनिक शेती करायची नाही यावर वेंकट ठाम असतो. मग सुरू होतं शेतीतील शिक्षण. वेंकटचं शेत निसर्गकृषक भास्कर सावे यांच्या शेताच्या जवळच असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वेंकटचं शिक्षण सुरू होतं. सोबत गावातील लोक, शासकीय अधिकारीही अनेक प्रकारचं "शिक्षण" देत असतातच. स्थानिक वाणांची दुर्दशा आपल्याला कळते जेव्हा वेंकटला तांदूळ लावायचा असतो. तो तांदळाचा शोध आणि त्यातील अपयश बरंच काही सांगून जातं.
वेंकट शहरी असला तरी गावात पूर्ण समरस झालाय. गावातील प्रत्येक प्रसंगात तो जातो. वेळोवेळी मदतही करतो. पण आपली काही तत्त्व सोडत नाही आणि तरीही गावाला तो आपलंसं करतो. हे सगळं करताना शेती रसायनमुक्त, पण अन्य गावकाऱ्यांसारखीच करतो. मग त्यात शासनाकडून बियाणं घेणं, वादळ, अतिवृष्टी वगैरे काळात मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणं हे सगळं करतो. शासकीय यंत्रणा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी असतात पण अधिकारी अनेक प्रकारे शेतकऱ्याला नाडतात. हे सगळे अनुभव स्वतः घेतो आणि त्यावर मातही करतो.
शेतातील घराचे तर असंख्य अनुभव आहेत. घरात आलेला नाग ते शेतातील घोरपडी, बेडूक खाणारे साप, घोणसाचं मैथुननृत्य प्रत्यक्ष पाहणं, घरात कोंबडीपालन, मांजरी, कुत्रा आणि बरंच काही... या सगळ्या गोष्टी बघताना, करताना, वेंकट सतत विद्यार्थी राहून कुतूहल कमी न पडू देता पुढे जात राहतो.
बँक या गोष्टीशी गावातील लोकांचं सख्य कमी असतं. त्यातील अनेक अनुभव त्याला येतात. नोटाबंदीच्या काळात झालेला त्रास कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता वेंकट सांगतो.
गावातील काही लग्ने, अनेकांच्या घरातील भानगडी, एक खून, जवळच्या मित्राची बायको जाणे व काही दिवसांनी तो मित्र जाणे या गोष्टी, दवाखाना ही बाब गावाला किती जड आहे, मुंबईपासून केवळ १०० किमी अंतर असताना, याची खंत... असं बरंच काय यातून कळतं.
सेंद्रीय शेतीचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करण्याचा प्रयत्न. पहिल्या हंगामातील अपयश आणि पुढील यश. तरीही त्यातून घेतलेली माघार. शेतकऱ्याला पैसे मिळायचे असतील तर काय केले पाहिजे याचे वेंकटने केलेले एकोत्तरी नाही तर दीर्घ चिंतन आपल्याला दिसते.
शेवटी वेंकट "मी सुखी आहे ना?" याचा शोध घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर -
आम्हाला सुख वेगळ्याच ठिकाणी भेटलं. मोकळं आकाश‚ निखळ निसर्गसौंदर्य‚ ताजा टवटवीत भाजीपाला‚ झाडावरून नुकतीच खुडलेली फळं आणि आपण पिकवलेलं अन्न खाणं‚ यातून आम्हाला खरा आनंद मिळतो. आपणच जमिनीत पेरलेल्या बियांमधून एक छोटा कोंब उगवतो आणि हळूहळू त्याचं रूपांतर एका महाकाय वृक्षात होतं. हा चमत्कार पाहण्याचं सुख तुम्हाला शहरातील मॉलमध्ये मिळू शकत नाही. तुमच्या समोर बेडूक पकडून फस्त करणारा पिवळसर पट्ट्यांचा नानेटी‚ तुमच्यापासून काही फुटांवर वेटोळं घालून फूत्कारणारा नाग किंवा स्वतःच्याच कैफात डोलत मैथुननृत्य करणारी घोणसाच्या नर-मादीची जोडी पाहताना जो थरारक आनंद तुम्ही अनुभवता‚ त्याची सर नॅशनल जिओग्राफी चॅनलवरून दाखवलेल्या दृश्यांना कधीच येऊ शकणार नाही.
मागे मी माझ्यासह अनेकांच्या मनातील "राजू रस्तोगी" बद्दल लिहिलं होतं. वेंकट एक यशस्वी राजू रस्तोगी आहे. त्याने अनेक राजूंना वाट दाखवावी ही इच्छा!!!
Thursday, March 12, 2020
देवराई
प्रकाशक हिंदुस्थान प्रकाशन संस्था
मूल्य ₹१७५
डॉ उमेश मुंडल्येंचा परिचय फेसबुकवरचा. त्यांची कामं, त्यातून होणारं जल, मृद संवर्धन, त्यांच्या कामामुळे सुखावणारे अनेक लोक, गावं हे वाचनात येत होतंच. त्यांच्या अभ्यासाचा, डॉक्टरीचा, मूळ विषय देवराई. त्यावर त्यांचं पुस्तक येत आहे कळाल्यावर लगेच बुक केलं, पण हाती पडायला बरेच महिने गेले.उमेशजींचा मूळ अभ्यासाचा विषय देवराई असल्याने, त्यांनी या पुस्तकात देवराई आणि त्यांची ओळख कशी झाली इथपासून ते देवराई कशी असते, तिचे संवर्धन धार्मिक आधारावर लोक कसे करतात, देवराईतील जैववैविध्य, काही प्रजाती केवळ देवराईतच का सापडतात, देवरायांपुढील समस्या आणि आव्हाने तसेच ही आव्हाने आपण परतवून कसे लावू शकतो या सर्वांबाबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे विषय अभ्यासाचा असला तरी अजिबात कंटाळवाणा न होता सहजपणे समजावून सांगितला आहे.
पुस्तकाची सुरुवात होते ती देवराईच्या अभ्यास कसा सुरु झाला इथपासून. जेव्हा हा अभ्यास सुरु झाला तेव्हा महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या देवरायांची संख्या होती साधारण ४५०. पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा केवळ सावंतवाडी या एका तालुक्यात ४०० पेक्षा अधिक देवराया आहेत हे कळालं. त्यानंतर उमेशजींनी १६०० पेक्षा अधिक देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि ३७६८ देवरायांची नोंद त्यांच्या PhDच्या अभ्यासात आहे.
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ही संकल्पना भारतभर सगळीकडे आहेच, शिवाय भारताबाहेरही अनेक देवराया आहेत. संकल्पना तीच - हे वन देवाचं आहे. इथून कोणताही आर्थिक लाभ मिळवायचा नाही. इतकंच काय कित्येक ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायलाही बंदी आहे. या देवराया केवळ आदिवासी भागात आहेत असं नाही. आदिवासी भागात, खेड्यात, गावाच्या अगदी जवळ ते गावापासून दूर अंतरावर अशा सगळीकडे देवराया आजही उभ्या आहेत आणि आपल्या या परंपरेची साक्ष देत आहेत. या देवरायांमुळे अनेक गोष्टी साधल्या जातात - पर्यावरण समतोल, जैवविविधतेचे संरक्षण, गावाचं मिळून एक सांस्कृतिक केंद्र, औषधी आणि पर्यटनातून होणारा आर्थिक विकास. पण यासाठी देवराया वाचल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत.
या देवराईत विविध दैवतं असतात. ती कोपिष्टही असतात. त्या श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या भीतीने सुद्धा देवराया सुरक्षित राहतात. या देवरायांचे वय मोजण्याच्याही अनेक पद्धती असतात. नगर जिल्ह्यातील एका देवराईत दर ३० वर्षांनी एक वाघ्या देवाचा दगड बसवतात. तिथे असे १७ दगड दिसून आले, म्हणजे ती देवराई सुमारे ५०० वर्षे जुनी असावी. एका देवराईत एक प्राचीन मंदिर आहे, एका साधूने बनवून घेतलेलं. ते ४०० वर्षे जुनं आहे, म्हणजे देवराई त्याहून जुनी असणार. इतकं हे जुनं वैभव आपल्याकडे आहे. त्याची पुसटशीही ओळख आपल्यापैकी अनेकांना नसते. या पुस्तकातून ही ओळख करून दिली आहे.देवराई जर गावाजवळील डोंगरावर किंवा उंच भागात असेल तर गावाच्या पाण्याचा प्रश्न ती सोडवते. दापोलीतील कुडावळे गावातील देवराईतून वर्षभर गावाला पाणीपुरवठा होतो. त्या पाण्याला जर नळाने बंद केलं तर पाईप/नळ फुटतात इतका त्या पाण्याला प्रवाह असतो. देवराईच्या अशा पाण्यावर आजूबाजूच्या गावात बागाईत फुलली आहे. यामुळेही लोक देवराई जपतात.
देवराईतील जैववैविध्य प्रचंड असते. अगदी छोट्या देवराईत शंभर सव्वाशे प्रकारची झाडे दिसून येतात. एका देवराईतील आंब्याच्या झाडाची पहिली फांदी चाळीस फुटांवर आहे. ते झाड आंब्याचं आहे हे लवकर ओळखूही येत नाही. देवराईतील जुने वेल इतके मोठे असतात की वेलीच्या खोडाचा व्यास एक मीटर एवढा असू शकतो. शिवाय अनेक पक्षी, दुर्मिळ होत चाललेले प्राणी (साळींदर, खवले मांजर) यात सुरक्षित वास करतात.
हे पुस्तक वाचताना वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या मराठवाड्यात एकही देवराई नाही... :-( मराठवाड्याशिवाय दुष्काळी जिल्हे सोलापूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर - यातही एकाही देवराईची नोंद नाही. पाऊस कमी असल्याने देवराई नाही की देवराई नाही म्हणून पाऊस नाही... काहीही असले तरी देवराई ही असलीच पाहिजे हे नक्की.
या सगळ्या आणि याहूनही खूप जास्त गोष्टी हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतात.

आम्ही आमच्या शेतात (जिल्हा औरंगाबाद) मियावाकी घनवन पद्धतीने देवराई तयार करत आहोत. एकूण अर्धा एकर करायचा विचार आहे. आतापर्यंत एक गुंठ्याचे दोन टप्पे लावून झाले आहेत. यात १५० स्थानिक प्रजातींची ६३० पेक्षा अधिक रोपे लावलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील झाडं आता जास्तीत जास्त २० फूट तर सरासरी ८ फूट आहेत. यात आता मुंगूस येऊन राहू लागले आहेत, अनेक पक्षी येत आहेत, घोरपडी येत आहेत. उन्हाळ्यात हरणांचे कळप सहजच वस्तीला येतात. आमच्या भागातून १० वर्षांपूर्वी गायब झालेले मोर अधून मधून इथे हजेरी लावून जातात. हे सगळं केवळ दीड वर्षांच्या जंगलात होतंय. सोबत लागवडीच्या आधीचा आणि नंतरचा गुगल मॅप वरील फोटोही आहे.
आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, देवराई समजावून घ्यावी आणि झाडं लावावीत, जगवावीत.
या परिचयावर प्रत्यक्ष लेखकाने प्रतिक्रिया दिली होती -
पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Dnyaneshजी.
देवराई ही एक समृद्ध परंपरा आहे. यामधे माणसाचा हस्तक्षेप नसतो किंवा नसेल याची काळजी घेऊन ठेवली गेली आहे. चांगल्या जंगलात जसे जमिनीवर असणाऱ्या गवतापासून लहान झुडूपं, मोठी झुडुपं, लहान वृक्ष, मध्यम वृक्ष, मोठे वृक्ष आणि या सर्वांवर असलेल्या विविध आकाराच्या वेली यांचं उत्तम सहजीवन असतं, त्याची लहान प्रतिकृती म्हणजे देवराई असते. नवीन देवराई तयार करणं हे एका पिढीचं काम नाही. सुरूवात आपण करावी आणि दोन पिढ्यांनी ते हस्तक्षेप न करता जपावं तेव्हा देवराई काही आकाराला येईल.
मियावाकी आणि देवराई यात मात्र काहीच साम्य नाही. मुंबईच्या संदर्भात उपमा द्यायची तर मियावाकी म्हणजे सकाळच्या गर्दीच्या वेळातील मुंबईकडे जाणारी आणि डोंबिवलीला आलेली जलद लोकल आहे. प्रचंड संख्येने लावलेली झाडं म्हणजे देवराई नाही. झाडं लावताना आपण आपला हेतू साध्य करण्यासाठीच लावतो बरेचदा. त्याचे इतर परिणाम लक्षात घेत नाही आणि नंतर ते परिणाम निस्तरण्यासाठी परिश्रम करावे लागतात पुढच्या पिढ्यांना. हरितक्रांती हे एक उत्तम उदाहरण आहे याचं.
देवराई ही लोकसहभागातून चालवली जाणारी जैवविविधता, पाणी, मृदा यांचं संरक्षण आणि संवर्धन करणारी परंपरा आहे. यात माणसाचा सहभाग फक्त जपण्यासाठी आहे. मियावाकीचं तसं नाहीये. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त झाडं ही केवळ गर्दी झाली. त्यासाठी येणारा खर्च याबद्दल मी बोलत नाही. तो स्वतंत्र विषय होईल.
त्यामुळे कृपया मियावाकी म्हणजे देवराईचं एक वेगळं रूप असलेयासारखं आहे असा गैरसमज ठेवू नका ही विनंती.
या प्रतिक्रियेला मी दिलेले उत्तर -
उमेशजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला देवराई विषयातील अभ्यास आहे. मी कोणत्याही प्रकारे प्रतिवाद करत नाहीये, कारण माझा अभ्यास अथवा अनुभव तुमच्यासारखा अजिबातच नाहीये. मी देवराईची तुलना मियावाकी घनवनाशी करत नाहीये. माझ्या पोस्टमधील वाक्यांमधून तसा अर्थ निघत असेल तर ती माझी चूक आहे.
मला देवराई म्हणजे काय हे कळलंय ते खालीलप्रमाणे -
१. देवराई हे मिश्रवन असलं पाहिजे
२. त्यात माणसांचा वावर शून्य ते मर्यादित असावा
३. ते परंपरेने आणि समाजाने जपलेलं जंगल असावं
४. हे संवर्धन, संगोपन श्रद्धेने केलेलं असावं
दुर्दैवाने आमचं शेत जिथे आहे त्याच्या आजूबाजूला कुठेही अशी देवराई नाहीये. संपूर्ण गावाला सोबत घेऊन गायरानावर वा कोणत्या सामायिक जमिनीवर देवराई तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि संयम आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आमच्याच शेतात (एकूण साडेतीन एकर) मध्ये साधारण अर्धा एकर आपणच देवराई करावी असा विचार केला. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा विचार करता सर्वात आधी मियावाकी पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यावर आतापर्यंत दोन गुंठे लागवड केली आहे. पहिला टप्पा साधारण दीड वर्षांपूर्वी केला, दुसरा टप्पा मागील महिन्यात केला
मागे उपेंद्र दादांशी यावर बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलेला देवराईचा किंवा निसर्गबेटाचा आराखडा बघितला. त्यात उणीव काहीच नाहीये, पण एक अडचण आहे - ती म्हणजे त्यात मानवी वावर शून्य होणार नाही. त्यामुळे घनवन करणे सुरु ठेवले. आजच्या घडीला यात आतमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मानवी वावर हा शून्य होईल आणि आज नाही पण कदाचित शंभर वर्षांनी ही जागा जंगल म्हणून असेल.
आम्ही हे तयार करताना मिश्रवन असावे याचे भान ठेवतोय - १५० प्रजातींमध्ये झुडूप, छोटे वृक्ष, स्थानिक बांबू/वेत, मोठे वृक्ष, वड/पिंपळ/नांद्रुक सारखे पसरट वृक्ष लावत आहोत. बाकी परोपजीवी (आर्किड सारखी) यात आणण्याचं काम इथे येणारे प्राणी/पक्षी करतील अशी आमची अपेक्षा आहे. श्रद्धा तर आमची यावर आहेच. हा सामाजिक उपक्रम मात्र होत नाहीये.
असलेल्या जंगलाच्या जागी, असलेल्या देवराईला पर्याय म्हणून अथवा आहेत ती वृक्षराजी तोडून मियावकीने जंगल लावणे अयोग्य आहे. किंवा हजारो वर्षांच्या जंगलाची तुलना मियावाकीशी होऊच शकत नाही. पण जिथे झाडं, जंगल, देवराई नाही अशा ठिकाणी वन उभारणी आम्ही करत आहोत. हे वन लगेच देवराई होणार नाही. कदाचित १०० वर्षांनी तिला देवराई म्हणता येईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठीची ही पहिली पायरी असू शकेल.
काही चुकीचं बोललो असल्यास क्षमस्व...
🙏🏼🙏🏼
या उत्तरावर उमेशजींनी दिलेले उत्तर आणि सल्ला -
चूक किंवा बरोबर असं नाही. देवराई मधे नैसर्गिक जंगल असतं. प्रत्येक जीव त्याची जागा घेत असतो. आपण मियावाकीच नव्हे तर इतर कोणत्याही पद्धतीने संवर्धन करताना हे विसरतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे (खरंतर आवडीप्रमाणे) प्रजातींची निवड करतो. स्थानिक प्रजाती असतील तर हेही ठीक. पण दोन वृक्षांमधील अंतर किती असावं आणि ते तेव्हढेच का असावं, त्यामुळे नैसर्गिक वाढीवर काही परिणाम होणार का, अशा गच्च लावलेल्या (नैसर्गिकरित्या झालेल्या नव्हे) वनस्पतींमुळे त्यातल्याच काही प्रजातींवर काय परिणाम होणार, इतर जैवविविधतेबद्दल आपण काही विचार करतोय का, जर हे मानवी वस्तीजवळ असेल तर एवढ्या गर्दीने लावलेल्या जंगलामुळे सुरक्षिततेचे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय, असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
एक करता येईल तुम्हाला. जर तुम्ही आधीच झाडं लावली असतील तर जी झाडं स्पर्धेत नाहीशी होतील त्याजागी लगेच नवीन लावू नका. म्हणजे नैसर्गिक जंगल तयार व्हायला मदत होईल.
Friday, March 6, 2020
समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
लेखक - कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक - मोरया प्रकाशन
मूल्य ₹१७०
मागील १ महिन्यात कौस्तुभ कस्तुरेंची ३ पुस्तके वाचली. "प्रतिशोध पानिपतचा"चा परिचय या आधी दिला होता. सदाशिवराव भाऊंवरील "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ" हे दुसरं (याचा परिचय नंतर देईन) आणि समर्थांवरील "समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन" हे तिसरं. अजून एक "पुरंदरे" आता वाचायला घेईन...कौस्तुभ कस्तुरेंचं वैशिष्ट्य हे की, रामदासांनी सांगितलेलं - अभ्यासोनि प्रकटावे - हे ब्रीद ते कसोशीने पाळतात. कुठेही अतिरंजितपणा नाही. इतिहास म्हणजे इति + ह् + आस म्हणजेच - हे असे घडले. जे घडले तेच इतिहासातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच काय घडले यासाठी समकालीन कागदपत्रे हाच सर्वोत्तम पुरावा आहे. समकालीन कागदपत्रांमधून बखरी या हद्दपार होतात कारण यात अतिरंजितपणा आणि ज्याने बखर लिहून घेतली त्याचा अति उदोउदो असतो. त्यामुळे पत्रे, सनदा आणि समकालीन व्यक्तींनी लिहिलेली चरित्रे यावरच ते अवलंबून असतात आणि विश्वास ठेवतात.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर्थ आणि महाराजांची भेट ही स्वराज्य स्थापनेच्या आधी झाली नसून ती बरीच उशिरा झाली हे सांगितलंय. महाराजांचे स्वराज्य हे जिजाऊंच्या प्रेरणेचे आणि महाराजांच्या कष्टानेच उभे राहिले आहे हे स्पष्ट केलंय. पण जेव्हा भेट झाली तेव्हापासून महाराजांचा आणि समर्थांचा स्नेह किती बळकट होता तेही सप्रमाण सिद्ध केलंय.
या पुस्तकासाठी कौस्तुभ कस्तुरे यांनी समर्थ संप्रदायातील कागदपत्रे, भीमस्वामी, गिरीधर स्वामी, दिनकर गोसावी यांनी लिहिलेली समर्थ चरित्रे अभ्यासली. शिवाय रघुनाथ पंडितांनी लिहिलेलं समर्थांचं वर्णनसुद्धा अभ्यासलं. हे सर्व समकालीन आहे. याशिवाय भीमाजी बुवांनी लिहिलेलं समर्थ चरित्रही घेतलंय, जे उत्तरकालीन आहे. या सर्वांवर लिहीत असताना एक बाब कौस्तुभ वारंवार सांगतात ती म्हणजे चमत्कार खरे नाहीत. त्यांना इतिहासात काहीही स्थान नाही. पण ही सर्व चरित्रे आपल्याला थोडक्यात यातून सहज कळतात.या चरित्र आणि वर्णनाशिवाय समर्थांनी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म यावर जो उपदेश केला होता त्याबद्दलही लिहिले आहे.
या पुस्तकात अनेक चित्रेही आहेत. विशेषतः महाराजांचा आणि समर्थांचा संबंध दाखवणारी चाफळची सनद - तिचाही फोटो आहे. या सनदेवरून संकेत कुलकर्णी (लंडन) आणि कौस्तुभ यांनी शोधून, अभ्यासून हा संबंध "पुराव्यानिशी शाबीत" केला आहे!
Friday, February 7, 2020
प्रतिशोध पानिपतचा
याआधी हा कालखंड स्वामी या कादंबरीत वाचलाय. पण स्वामी केवळ माधवरावांच्या पुण्यातील/थेऊर मधील वास्तव्याभोवती फिरते. त्याच काळात दिल्लीवर फडकलेला भगवा, नजीबाचा मृत्यू, त्याच्या मुलाची केलेली लांडगेतोड आणि नजीबाची फोडलेली कबर हा भाग त्यात येतच नाही. बाकी पाठ्यपुस्तकात हे कधीच येणार नाही. इंग्रजांनी भारत मोगलांकडून ताब्यात घेतला असं शिकवायचं असल्याने मोगल मराठ्यांच्या ताब्यात होते हे कसं शिकवता येईल. पण कौस्तुभने हा सगळा कालखंड पानिपतचा मराठ्यांनी कसा प्रतिशोध घेतला या परिप्रेक्षात मांडला आहे.
नारबा ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा यात आहे. हा नारबा एक सामान्य मराठी माणूस आहे. याचा भाऊ आणि वडील पानिपतात कामी येतात. हा फडावर काम सुरू करतो आणि अखेरीस उत्तरहिंदच्या स्वारीवर युद्ध जिंकून येतो. असे अनेक नारबा माधवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आणि उत्तरहिंद पुन्हा ताब्यात घेतला. हा नारबा त्या सगळ्यांचं प्रतीक आहे.
आपण कायम एक म्हण ऐकत आलो आहोत - मराठी माणसाचा विश्वास पानिपतात गेला. पण ही वस्तुस्थिती नाहीये. मराठी माणसाचा विश्वास गेला नाही. तो कायम राहिला आणि एकामागोमाग एक उत्तरेतील राज्ये मराठ्यांच्या ताब्यात आली. तीही केवळ १० वर्षात.हे सर्व घडले ते महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांच्या हातांनी आणि त्यामागे खंबीर नेतृत्व होते माधवरावांचे. माधवरावांना रमाबाईंची साथ होती आणि नाना फडणवीसांचे आणि रामशास्त्र्यांचे सल्ले होते. अर्थातच पाय खेचणारे लोकही होतेच. राघोबासारखा घरभेदीही होता. सदाशिवरावांचा तोतया हेही एक प्रकरण होते. पण या सर्व लोकांना साम-दाम-दंड-भेदाने माधवरावांनी सरळ केलं.
हा सगळा तपशील या पुस्तकात आहे. तोही अतिशय सहज भाषेत. अस्सल ऐतिहासिक पुरावे वापरून अत्यंत सुंदर, रसाळ कादंबरी कौस्तुभने लीलया तयार केलीये.
मला खटकलेल्या काही गोष्टी आहेत. विशेषतः, रमाबाईंनी सती जावं ही इच्छा माधवराव जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्याचं कारण रमाबाईंना राघोबा वापरून राजकारण करतील हे सांगितलं आहे. वास्तविक विश्वासरावांच्या पत्नीमार्फत सुद्धा राघोबांना ते करता आलं असतं, पण ते झालं नाही. त्यामुळे हा तर्क योग्य वाटत नाही. पण याकडे कानाडोळा करून हा कालखंड सर्वांनी अनुभवावा असाच आहे.
या पुस्तकातील काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. ते दुःखाचे अश्रू नाहीत तर ते आहेत आनंदाचे, प्रतिशोधाच्या कल्पनेचे आणि प्रतिशोधाच्या पूर्णत्वाचे. त्यातील तीन विशेष उल्लेखनीय
- नारबा दिल्लीस्वारीला जाताना आईला पत्र लिहितो, ते पत्र आणि पुढचा काही भाग
- दिल्लीवर भगवा फडकतो
- नजीबाच्या थडग्याला महादजी फोडतात
कौस्तुभ, या कादंबरीसाठी खूप धन्यवाद. तुझ्याकडून अजूनही खूप काम होवो या शुभेच्छा!
Tuesday, November 12, 2019
परिशोध - एस् एल् भैरप्पा
Tuesday, February 26, 2019
वंशवृक्ष - एस् एल् भैरप्पा
यांचे एक विद्यार्थी असतात - सदाशिवराव. विद्वान! सदाशिवरावांना भारतीय इतिहासावर मोठा ग्रंथ लिहायचा आहे. त्यासाठी ते श्रोत्रींचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांची एक पत्नी आहे - नागलक्ष्मी, मुलगा पृथ्वी आणि भाऊ राज.
नागलक्ष्मी साधी गृहिणी आहे. पतीवर प्रेम, निष्ठा आहे पण त्याच्या व्यासंगापासून ती खूप दूर आहे. सदाशिवरावांना अजिंठ्याला एक सिंहली मुलगी भेटते - करुणा रत्ने. करुणा हुशार असते आणि सदाशिवरावांचा विषय - इतिहासाची - विद्यार्थिनी असते. ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करायला मैसूरला येते. PhD करताना सदाशिवरावांच्या खंडप्राय ग्रंथाच्या पहिल्या खंडासाठी त्यांना मदत करते. त्यानंतर ती परत जाते पण ते दोघेही एकमेकांशिवाय आपण अपूर्ण आहोत. त्यानंतर करुणा पुन्हा मैसूरला येते. पण यावेळी सदाशिवराव तिला लग्नाची मागणी घालतात. दोघे लग्न करतात पण नागलक्ष्मी आणि करुणा एका घरात राहत नाहीत. सदाशिवरावांची दोन बिऱ्हाडे होतात.
राज इंग्रजीचा प्राध्यापक आणि नाट्यकलेवर प्रेम करणारा आहे. कात्यायनी पतीची ग्रॅज्युएशनची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते. राजला ती आवडते आणि कात्यायनीही राजला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न होते. कात्यायनीला श्रोत्री विरोध करत नाहीत पण एक गोष्ट सांगतात की उन्नतीची एक पायरी चढल्यावर पुन्हा त्याच पायरीवर येणे ही अवनती आहे. लग्न करून मातृत्व मिळाल्यावर पुन्हा लग्न करणे त्यांच्या दृष्टीने एक पायरी खाली येणे आहे. ती जेव्हा तिच्या मुलाला न्यायला येते तेव्हा त्याला न्यायचे की नाही ही गोष्ट ते तिच्या न्यायबुद्धीवर सोडतात आणि कोणतीही बळजबरी करत नाहीत. पण कात्यायनी मुलाला श्रोत्रींंकडेच राहू देते आणि नवा संसार सुरू करते.
श्रोत्री-भागीरथी-लक्ष्मी-चिनी, सदाशिवराव-नागलक्ष्मी-करुणा, राज-कात्यायनी-पृथ्वी यांचा प्रवास सुरु राहतो. सुमारे वीस वर्षांचा प्रवास दाखवलाय. त्यात अनेक वळणे येतात. प्रत्येक परीक्षेच्या प्रसंगी सदाशिवराव-करुणा बुद्धीला, राज-कात्यायनी प्राकृतिक स्वभावाला आणि श्रोत्री धर्माला (कर्तव्याला) प्रमाण मानून निर्णय घेतात.
पुढील कथा तुम्ही प्रत्यक्षच वाचावी!
यातील प्रत्येक परीक्षा ही प्रत्येकासाठी अवघडच असते आणि प्रत्येकजण आपापल्या समजुतीने पुढे जातो. भैरप्पांचे वैशिष्ट्य हे की आपल्याला कुणीच "खल" वाटत नाही. पण सर्वात उठून दिसतात श्रोत्री. ते कधीच कुणावर रागावत नाहीत, त्यांच्या धर्म-कर्तव्याच्या कसोटीवर घासून निर्णय घेतात आणि कात्यायनीला सांगितलं वाक्य - एकदा उन्नतीच्या वरच्या पायरीवर आल्यावर पुन्हा खालच्या पायरीवर कधीच जात नाहीत. त्यांच्या काही गोष्टी आजच्या युगात आपल्याला पटत नाहीत पण काळ आणि धार्मिक बाजू लक्षात घेतली तर निश्चितच आपण श्रोत्रींंपुढे नतमस्तक होतो.
Monday, December 3, 2018
सार्थ - एस् एल् भैरप्पा
एका वेदशास्त्र शिकलेल्या ब्राह्मणाला, नागभट्टला, तारावती नगरीचा राजा सार्थाचा, म्हणजे व्यापारी तांड्यांचा, अभ्यास करण्यासाठी एका तांड्यांसोबत पाठवतो. पण मूळ हेतू नागभट्टच्या बायकोला मिळवणे हा असतो. नागभट्ट जेव्हा घरापासून दूर असतो तेव्हा त्याला हे कळतं आणि पुढे त्याचा शांती मिळवण्याचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला तो एका नाटक कंपनीत काम करतो, त्यातील नटी चंद्रिका उत्तम अभिनेत्री, गायिका असते. ती योगिनी असते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडतो पण चंद्रिका योगिनी असल्याने यम नियमांत बांधलेली असते आणि ती संबंध नाकारते. तिथून पुढे नागभट्ट सुद्धा बाहेर पडतो आणि प्रथम योगी बनण्याचा प्रयत्न करतो. त्यात बायको आणि मित्र राजा यांवरील राग कमी होत नाही. मग पुढे तो वाममार्गी-तांत्रिक होतो, योनीपूजेच्या विधीसाठी चंद्रिकेला तयार करतो. मात्र पूजेनंतर ती त्याला स्वतःच्या घरी ठेऊन घेते आणि त्यातून तो पुन्हा बाहेर पडतो. मग नालंदा विद्यापीठात बौद्ध तत्त्वज्ञान शिकायला जातो, तिथे त्रिपिटक व अन्य बौद्ध पुस्तकांसोबत त्याला बौद्ध तांत्रिक मार्गही दिसतो. पुढे बोधगयेला जातो. पण तरीही आंतरिक शांती मिळत नाही.
नालंदेत जाऊन, तिथे सांगून पुन्हा नवीन शोधण्यासाठी तो तिथे पोहोचतो पण तेव्हा त्याला कळतं की सर्वात वयोवृद्ध विद्यार्थी हे कुमारील भट्ट होते, त्याचे गुरू माहिष्मतीचे मंडनमिश्र यांचे गुरू व गुरुपत्नी भारतीदेवीचे वडीलबंधू. तो त्यांच्या मागे त्यांच्या गावी पोहोचतो. तिथे त्याला प्रथम शंकराचार्यांचे दर्शन होते. शंकराचार्य तिथे वादविवाद करण्यासाठी आलेले असतात. पण कुमारील भट्ट गुरूला फसवले आणि काही दिवस तरी वेद नाकारले म्हणून भाताच्या काड्यात स्वतःला जाळून घेणार असतात. त्यामुळे ते वादविवाद नाकारतात आणि गुर्जर प्रतिहार राजाच्या अश्वमेध यज्ञाचे प्रमुखपदही नाकारतात. दोन्हीसाठी ते मंडन मिश्र यांच्याकडे पाठवतात.
इथून पुढे ऐतिहासिक वादविवाद आणि मंडन मिश्र यांचे संन्यस्त होणे हा भाग येतो.
नागभट्ट यानंतर गुर्जर प्रतिहार राजाच्या स्नेही असलेल्या जयसिंहांच्या सोबत परत मथुरेला येतो. तिथे बातमी येते की मुस्लिम आक्रमकांनी मूलस्थानवर (मुलतान) कब्जा केला असून तिथून पुढे भारतीय व्यापाऱ्यांना माल ते सांगतील तसा व त्या भावात अरबांनी विकावा लागतोय. गुर्जर राजे मूलस्थान पुन्हा मिळवावे यासाठी कृष्ण नाटक तिथे करायचे आणि जनतेला उठाव करण्यास प्रवृत्त करायचे असा बेत आखातात आणि नाटकात नागभट्ट आणि चंद्रिका यांची प्रमुख भूमिका ठरते. आता नाटक केवळ नाटक राहिलेले नसते तर देशाप्रती कर्तव्य झालेले असते. जीवाचा धोका असूनही सगळे उत्तम नाटक करतात. पण तरीही राष्ट्रकूटांनी दक्षिणेकडून केलेला हल्ला आणि स्थानिकांकडून न मिळालेली मदत यामुळे योजना पूर्ण होत नाही. चंद्रिका आणि नागभट्ट मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात जातात. चंद्रिकेवर बलात्कार होतात आणि नागभट्टावर अमानुष अत्याचार. शेवटी ते सुटतात आणि चंद्रिकेच्या गुरूंना भेटायला जातात. नागभट्ट चंद्रिकेला पुनःपुन्हा लग्नाची मागणी घालत असतो पण यम नियम आणि आता बलात्कारामुळे असलेला गर्भ यामुळे ती नाकारत राहते. गुरू त्यांच्या मृत्यूपश्चात विवाहाचा आदेश देतात. नागभट्ट आणि चंद्रिका विवाह करतात आणि कथा संपते.
यात नागभट्ट आणि मुस्लिम सरदार यांच्यात काही संवाद आहेत. ते जसेच्या तसे इथे देत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये असलेली धर्म (Religion या अर्थी) ही संकल्पना यातून खूप छान अधोरेखित होते. काहींना जी समृद्ध अडगळ वाटते तीच व्यवस्था कशी होती हे यातून समजते.
‘‘कोणता उपाय?’’ मी विचारलं.
‘‘क्षमेची याचना करायची. पश्चात्ताप झाल्याची खूण म्हणून आमच्या धर्मात प्रवेश करायचा. संपूर्ण क्षमा कदाचित त्यानंतरही मिळणार नाही, पण मृत्युदंड खचित चुकेल. चार-दोन वर्षं कारागृहात काढायची. त्यानंतर तुझी वागणूक बघून उरलेली शिक्षाही रद्द होर्इल. बऱ्यापैकी जगण्यासाठी एखादं कामही मिळेल. तू आमचाच होऊन जाशील ना!’’ त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.
‘‘धर्म बदलायचा? एवढ्या क्षुल्लक कारणासाठी?’’
‘‘जीव वाचतोय, ही क्षुल्लक गोष्ट आहे?’’
‘‘जीव जातो की राहतो, हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. आमच्याकडेही धर्मपरिवर्तन होत असतं. दोन जिज्ञासू विद्वान शेकडो विद्धानांसमोर एकमेकांसमोर बसून तात्त्विक वादविवाद करतात. जो हरेल, त्यानं जिंकलेल्याचा धर्म स्वीकारणं बंधनकारक असतं. तुमच्यापैकी एखाद्या जिज्ञासू विद्वानाला सर्वांसमोर माझ्याशी वादविवाद घालण्यासाठी बसवा, दोघंही तर्कशुद्ध पद्धतीनं वाद घालू. मी हरलो, तर तुमच्या धर्मात येर्इल आणि जिंकलो, तर त्यानं माझ्या धर्मात यावं.’’
‘‘धर्मालाच पणाला लावून चर्चा करायची?’’ त्यानं भुवया उंचावल्या.
‘‘आमच्याकडे सगळे असंच करतात. केवळ यासाठी विद्वान मंडळी गावोगाव फिरत असतात. एखाद्याची वाद-भिक्षा नाकारणं अत्यंत अपमानास्पद मानलं जातं.’’
‘‘आम्ही धर्माला वादामध्ये ओढत नाही.’’
‘‘पण तुम्ही धर्माला तलवारीच्या पात्यावर पेलता. खरंय हे?’’
‘‘नि:संशय! ते जाऊ दे. तुमच्यामध्ये किती जाती-पंथ आहेत?’’
‘‘ते कसं सांगता येर्इल? एकेका धर्म-पंथाच्या अनेक शाखा-उपशाखा आहेत. मुख्य वैदिक धर्मच घ्या. त्यात पूर्व मीमांसक, उत्तर मीमांसक, नैयायिक, वैशेषिक, सांख्य, योगी! बौद्धांमध्ये हीनयान, महायान, हीनयानामध्ये वैभाषिक, सौतांत्रिक; महायानींमध्ये योगाचार्य, माध्यमिक; जैनांमध्ये दिगंबर-श्वेतांबर, यांशिवाय प्रत्येक जातींमध्ये तांत्रिक, पाशुपत्य –’’
त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. ‘‘असं असेल, तर तुमचा एक देश नाहीच.’’
‘‘का?’’
‘‘एवढे मत-धर्म आहेत म्हणतोस, कुठला राजा स्वत:च्या धर्मापेक्षा इतर धर्माला वाव देर्इल?’’
‘‘आमच्याकडे सगळे राजे सगळ्या मत-पंथांना वाव देतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा तो प्रश्न आहे. मी म्हणजे बुद्धी. बुद्धीचं गृहीत म्हणजे मत. जगात जितकी माणसं आहेत, तितकी गृहीतं आहेत. तेवढी मतं असतात.’’
‘‘शुद्ध अव्यवस्था ही!’’ तो गोंधळून म्हणाला.
‘‘अंहं – तीच व्यवस्था आहे! पाहिजे, तर याविषयी मी वाद घालू शकेन.’’
‘‘मला वाटतं, तू तुझ्या देशातल्या सगळ्या धर्म-पंथांचा अर्क प्यायलेला विद्वान आहेस. बरं, ते जाऊ दे. तुमच्या सगळ्या धर्म-पंथातला समान अंश कोणता?’’
‘‘धर्म!’’
‘‘धर्म म्हणजे काय? देव ना?’’
‘‘देवाला धर्माची गरज नाही. देव ही माणसाची गरज आहे. शिवाय आमच्याकडचे सगळे पंथ देवाला मानत नाहीत. जैन, बौद्ध आणि सांख्य हे तर देवाचा तिरस्कार करतात. पूर्व-मीमांसक देवाचा पुरस्कार करत असले, तरी त्यांनी देवाला मर्यादित अधिकार दिले आहेत. माणसाच्या धर्माचरणासाठी देवाची गरजही नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचीही गरज नाही, असं बरेच धर्म-पंथ सांगतात.’’
- ज्ञानेश
Thursday, April 19, 2018
पुस्तक परिचय - फिडेल, चे आणि क्रांती
अमेरिकेशी असलेले हे वैर गेल्या काही दिवसात संपले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी मार्च 2016 मध्ये क्युबाला भेट दिली. क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये फिडेल कॅस्ट्रो वारले आणि त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो क्युबाचा अध्यक्ष झाला. क्युबाची दारे आता भांडवलशाही साठी थोडी किलकिली झाली आहेत. पुढे काय होईल ते कळेलच.
पुस्तकाविषयी:
२६ जुलै ही दिनांक आपल्यासाठी मुंबईमध्ये झालेली ढगफुटी याच्याशी निगडीत आहे. पण सुदूर, दक्षिण अमेरिकेत, २६ जुलै एक प्रचंड शक्ती आहे. जी शक्ती सामान्य भारतीयांना १९४२ या अंकातून मिळते त्याहून अधिक शक्ती २६ जुलै मधून क्यूबन लोकांना मिळते.
२६ जुलै १९५३… या दिवशी फिडेल कॅस्ट्रो या ध्येयवेड्या तरुणाने बाटिस्टा या क्युबाच्या अत्यंत भ्रष्टाचारी अध्यक्षाविरोधात सशस्त्र क्रांतीची पहिली लढाई लढली होती. क्युबाच्या अध्यक्षांच्या सैन्यापुढे काही शे तरुणांचा सहज पराभव झाला. पण सुदैवाने फिडेल त्यातून वाचला. त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि "इन्कलांब झिंदाबाद", "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा" च्या सारखे वाक्य त्या खटल्यातून फिडेलने म्हटले, "मला दोषी ठरवून ठार करा. त्याने काहीही बिघडणार नाही. इतिहास मला दोषमुक्त करील!" यातूनच History will absolve me किंवा इतिहास मला दोषमुक्त करील या ऐतिहासिक पुस्तिकेचा जन्म झाला!
१९५५ मध्ये पुन्हा अध्यक्षीय (खोट्या) निवडणुकीत बाटिस्टा पुन्हा जिंकला आणि त्याने मोठी चूक केली. लोकांच्या आणि संसदेच्या मागणीसमोर त्याने मान तुकवली आणि फिडेल तुरुंगातून सुटला. त्याने एक निःशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश येण्याची १००% खात्री झाल्यावर तो आणि त्याचे अनुयायी मेक्सिकोत गेले. तिथे २६ जुलै या संघटनेची व्याप्ती वाढवली आणि सशस्त्र क्रांतीची ज्योत पुन्हा पेटवली.
अर्नेस्ट गव्हेरा हा अर्जेन्टिनामधील एक तरूण डॉक्टर. दक्षिण अमेरिका बघण्यासाठी बाईकवरून निघाला आणि बाईक खराब झाल्याने पायी, सायकल, ट्रक मधून फिरून त्याने दक्षिण अमेरिका पहिली. त्याला दुःख दारिद्र्य दिसले आणि सहजपणे तो क्रांतिकरकांमध्ये सामील झाला. तो बोलताना मध्ये "चे" हा शब्द खूप वेळा वापरायचा. म्हणून त्याला चे हे टोपणनाव पडले. चे आणि फिडेलची भेट मेक्सिकोत झाली आणि पुढे दोघांनी क्रांती केली. चे खरेतर क्युबात क्रमांक दोनचा नेता होता पण सत्तेत न राहता त्याने उर्वरित दक्षिण अमेरिकेत क्रांती करण्यासाठी क्युबा सोडला आणि अशाच एका युद्धात तो मारला गेला. तो उत्तम लेखक आणि कवी होता. त्याची एक कविता -
उषेच्या जहाल भविष्यवेत्त्या,
चल, निघू या,
काटेरी नागमोडी वळणांच्या गुप्त रस्त्याने
तू ज्या हिरव्या भूमीवर प्रेम करतोस तिला मुक्त करण्यास.
चाल, निघू या,
अनंत अन्याय पुसून काढण्यास,
आपल्या मस्तकात फुटतात बंडखोर तारे,
मृत्यू वा विजय-शपथ घेऊन निघू या.
आणि जेव्हा पहिल्या गोळीच्या आवाजाने,
झोपेतून दचकून जागे झालेल्या तरुणीप्रमाणे,
ती भूमी खडबडून उठेल,
तेव्हा आम्ही तुझ्या साथीला असू,
निश्चयाने, हाती बंदुका घेऊन.
(ही कविता वाचल्यावर मुक्त चित्रपटातील "रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो" आठवली...)
पुढील फिडेल आणि चे यांची गाथा तुम्ही स्वतः वाचा!
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5459360203247863073?BookName=Fidel,-Che-Ani-Kranti
Tuesday, March 20, 2018
अतरापी - पुस्तक परिचय
आपण मराठीत ज्याला अत्राब म्हणतो तेच गुजराथी मध्ये अतरापी. शेतकरी मराठी बोलीत जित्राब आणि अत्राब हे शब्द येतात. शेतीसाठी उपयुक्त जनावरे म्हणजे जित्राब आणि उपयोगी नसलेले अत्राब. सरधोपट पाहिलं तर दोन कुत्र्यांची ही कथा. ते जन्मतात तिथपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. दोघे भाऊ स्वतंत्र आणि वेगवेगळ्या विचारांचे. एक, याचं नाव कौलेयक, शिकून सवरून साधक बनतो तर दुसरा, याचं नाव सारमेय, न शिकता, पण समजावून घेऊन मोक्षाप्रत जातो.
मालक आणि पृथा या दाम्पत्याकडे सद्भाविनी नावाची एक कुत्री असते तिला ही दोन मुले होतात. कौलेयक शिकवू ते शिकणारा, मोठं होऊन कुणीतरी थोर 'बनायचं' असं ध्येय असलेला बनतो तर सारमेय त्याच्या नैसर्गिक भावनांना अधिक प्रगल्भ करत सभोवताल समजावून घेत राहतो.
सारमेय घरातून पळून जातो आणि त्याला अनेक लोक भेटतात. त्यांच्यासोबत जीवनानुभव घेत तो मोठा होत जातो. यात त्याचे अनेक संवाद/प्रसंग निव्वळ अप्रतिम आहेत.
घरी पृथा व माळी, हे दोघेच त्याला काही शिकवायला जात नाहीत. फक्त भवताल समजून घेण्यासाठी मदत करतात.
घराबाहेर पडल्यावर प्रथम त्याला एक घरंदाज कुत्रा भेटतो. तो सारमेयला हाकलतो आणि हा माझा इलाखा आहे असं म्हणतो. त्यावर सारमेय म्हणतो, "जो सोडून बाहेर जाणं असुरक्षित वाटतं त्याला तुम्ही 'इलाखा' म्हणता. असंच ना?" सहजपणे आपल्याला comfort zone कसा असतो हे सांगतो.
एका नदीकिनाऱ्यावर 'नदी कुठे आहे?' हा प्रश्न नदीचं सतत प्रवाही असणं अधोरेखित करतो.
शकू नावाच्या एका छोट्या मुलीकडे काही दिवस राहतो. तिथे त्याचा सत्कार होणार असतो पण त्यात गुंतायचं नसल्याने तिथून निघतो. त्यावर शकू पृथाला सांगते की तो अजून 'बंधनाच्या भीतीपासून मुक्त' झालेला नाहीये. बंधनात न राहणे हे बंधनाच्या भीतीचे बंधन असू शकते!
एका महादेव मंदिराच्या पुजाऱ्याकडे तो काही दिवस राहतो. तिथे अकस्मात मंदिरात सुवर्णपात्रे प्रकट होतात तशीच ती चोरीलाही जातात. चोरी झाल्यावर पोलिसात रीतसर तक्रार होते. एका मुसलमानावर चोरीचा आरोप होतो, पोलीस त्याला घेऊन जातात, त्याचा कोठडीत मृत्यू होतो. तेव्हा सारमेय पुजाऱ्याला विचारतो, "एका सकाळी भांडी प्रकट झाली, एक सकाळी अदृश्य झाली. या दोन सकाळींमध्ये तुम्हाला तक्रार नोंदविण्याजोगा मोठा फरक कोणता वाटला?" आणि पुजारी ते मंदिर सोडून निघून जातो. सारमेय आपल्या प्रवासाला लागतो.
सारमेय एका श्रीमंत पण एकट्या माणसाकडे राहतो. त्याच्या मुलाचे आणि त्याचे काही वाद असतात. ते सारमेयामुळे मिटतात. तेव्हा मुलगा सारमेयाला म्हणतो, "मी शिकलो नाही, मला समजलं आहे. शिकण्यापेक्षा समजणं अधिक उचित आहे, हे मी मान्य करतो."
हे आणि असं बरंच काही या पुस्तकात आहे. ते वाचणे हे मी लिहून सांगण्यापेक्षा अधिक उचित आहे

