Friday, April 24, 2026
१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू
Tuesday, January 13, 2026
पानिपतचे परिणाम
Friday, December 5, 2025
मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country
भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, त्यामुळे विजयनगरच्या भरभराटीच्या काळात पोर्तुगीजांची भरभराट झाली. पण विजयनगर साम्राज्य बुडाल्यावर पोर्तुगीज सुद्धा मागे पडले. त्याचप्रमाणे अजून एक युरोपीय सत्तेने आधी भरभराट आणि नंतर उतरती कळा पहिली, ती म्हणजे डच! डचांना उतरती कळा लागल्यानेच इंग्रजांना ती पोकळी मिळाली. त्या पोकळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.
आपल्याला सागरी सत्ता म्हणून चोल राजा राजेंद्र माहीत असतात. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आणि कान्होजी आंग्र्यांनी ज्याचा दबदबा निर्माण केला ते मराठा आरमार माहीत असतं. पण ज्या सागरी आणि जमिनीवरील सत्तेने एक परकीय सत्ता केवळ भारतातून नाही तर जगाच्या क्रमवारीत तिला मागे टाकले अश्या त्रावणकोरच्या मार्तंड वर्मांचे नाव क्वचितच माहीत असते...
१८व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या इतिहासात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व उदयास आले – मार्तंड वर्मा, त्रावणकोरचा राजा. त्यांचा जीवनपट भारतीय किनारपट्टीवरील परकीय वर्चस्व मोडून काढणारा आणि राज्याला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ठरला.
मार्तंड वर्मा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला. ते त्रावणकोरच्या राजघराण्यातील होते, पण बालपणातच त्यांना राजकीय संघर्षांचा सामना करावा लागला. स्थानिक सरदार, नायर प्रमुख, आणि परकीय व्यापारी यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र होती. या संघर्षातूनच मार्तंड वर्मा यांनी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लढाऊ वृत्ती विकसित केली.
१७२९ मध्ये ते त्रावणकोरच्या गादीवर बसले. गादीवर बसताच त्यांनी राज्य एकत्र करण्याचे आणि परकीय शक्तींना आव्हान देण्याचे ठरवले.
त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने मलबार किनाऱ्यावर आपली पकड मजबूत केली होती. मसाल्यांच्या व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते आणि स्थानिक राजांना ते आपल्या धाकात ठेवत होते. मार्तंड वर्मा यांनी या परकीय शक्तीला आव्हान दिले.
१७४१ मध्ये कोलाचेलची लढाई झाली – भारतीय तसेच जागतिक इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. मार्तंड वर्मा यांच्या सैन्याने डचांना पूर्ण पराभूत केले. ही लढाई विशेष होती कारण युरोपीय शक्तींना भारतीय भूमीवर स्थानिक राजाने निर्णायक पराभव दिला.
मार्तंड वर्मांच्या या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड मोडली. मसाल्याच्या व्यापारावर असलेला अग्रहक्क मोडला. डच कमांडर डेलनॉय याला कैद केलं. पण मार्तंड वर्मा त्यांची गुणग्राहकता खूप चांगली होती. या कामंडरला मार्तंड वर्मा यांनी आपल्या सैन्यात सामील केले. डेलनॉयने पुढे त्रावणकोरच्या सैन्याला युरोपीय तंत्रज्ञान दिले आणि किल्ले बांधण्यात मदत केली.
मार्तंड वर्मा यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्यांनी नायर सैनिकांना संघटित केले, युरोपीय शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केला, आणि किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधले.
- उदयगिरी किल्ला – युरोपीय तंत्रज्ञानाने बांधलेला, तोफखान्याने सज्ज.
- विझिंजम (विळींझम) बंदर – व्यापार आणि नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र.
- पद्मनाभपुरम किल्ला – राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र.
या किल्ल्यांमुळे त्रावणकोर दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित राज्य बनले.
मार्तंड वर्मा यांचे दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान श्री पद्मनाभस्वामींना अर्पण केले. १७५० मध्ये त्यांनी औपचारिकपणे घोषणा केली की त्रावणकोर हे देवाचे राज्य आहे, आणि ते स्वतः व त्यांच्या पुढील पिढ्या केवळ विश्वस्त (पद्मनाभदास) म्हणून राज्य करतील. यामुळेच केरळला आजही Gods Own Country असं म्हटलं जातं.
ही घटना भारतीय राजकारणात अद्वितीय होती. राजा स्वतःला देवाचा सेवक मानून राज्यकारभार चालवतो, अशी संकल्पना त्रावणकोरमध्ये रुजली. यामुळे राज्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले आणि लोकांमध्ये एकात्मता निर्माण झाली.
मार्तंड वर्मा यांनी करव्यवस्था सुधारली, व्यापाराला चालना दिली, आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केले, भ्रष्ट सरदारांना रोखले, आणि राज्यात स्थैर्य आणले. त्यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर हे दक्षिण भारतातील सर्वात स्थिर आणि समृद्ध राज्य बनले. मसाल्यांचा व्यापार सुरक्षित झाला, आणि परकीय शक्तींना त्रावणकोरशी करार करावा लागला.
१७५८ मध्ये मार्तंड वर्मा यांचे निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत आहे. त्रावणकोरचे वंशज आजही स्वतःला "पद्मनाभदास" म्हणवतात आणि केरळ स्वतःला Gods Own Country म्हणवते.
त्यांच्या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड संपली. त्यांच्या धार्मिक अर्पणामुळे त्रावणकोरला अद्वितीय ओळख मिळाली.
म्हणूनच मार्तंड वर्मा यांना आपण भारतीय इतिहासातील एक अद्वितीय राजा म्हणून स्मरले पाहिजे "कोलाचेलचा विजेता आणि पद्मनाभदास."
(संदर्भ : ब्रेव्हहार्टस ऑफ भारत - विक्रम संपत)
Wednesday, December 3, 2025
भाग्यचंद्र: स भूपति:
मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.
राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.
मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.
राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.
विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.
1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.
- ज्ञानेश
Thursday, March 20, 2025
शिवाजी महाराजांचे मोठेपण
शिवाजी महाराजांचे मोठेपण दिसावे म्हणून औरंग्याचं थडगं असलं पाहिजे असं लॉजिक बरेच जण मांडत आहेत. यात हिंदुत्ववादीही आहेत. मुळात महाराज कळण्यासाठी कोण्या खलनायकाची आवश्यकता नाहीच. कुणाच्या रेषेशी महाराजांची रेष ताडून मग महाराज मोठे आहेत हे दाखवण्याची काही एक गरज नाही. On the absolute terms सुद्धा महाराज महान आहेत.
केवळ त्यांचे लोकोपयोगी कामे बघितली तरी हे सहज लक्षात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले राज्य हे स्वराज्य, न्यायप्रिय राज्य आणि लोकहितवादी प्रशासनाचा उत्तम नमुना होते. त्यांचे लोकोपयोगी कार्य समकालीन संदर्भांवर आधारित बघूया.
न्यायव्यवस्था: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेस प्राधान्य होते. त्यांचे प्रशासन अन्यायाविरुद्ध कठोर आणि पारदर्शक होते. "जेधे शकावली" आणि "शिवभारत" यांमध्ये उल्लेख आहे की महाराजांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाड्यासाठी पंचायत प्रथा सुरू केली. त्यांनी हक्कांचे रक्षण करताना निष्पक्षता कायम ठेवली, यामुळे रयतेला नवा विश्वास व आधार मिळाला.
शेती व सिंचनव्यवस्था: महाराजांनी शेती आणि सिंचनाच्या सुधारणांवर भर दिला. "बुधभूषण" या ग्रंथात शेतीसाठी तयार केलेल्या कालव्यांचा उल्लेख आहे. त्यांनी पाण्याच्या व्यवस्थित व्यवस्थापनासाठी तलाव बांधले व जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले. जमिनीचा उपयोग योग्य प्रकारे व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी जमिनीच्या मोजणीची प्रथा सुरू केली. त्यामुळे शेती उत्पादन वृद्धिंगत होऊन लोकांचे जीवनमान सुधारले.
व्यापाराला प्रोत्साहन: महाराजांनी अंतर्गत आणि परदेशी व्यापाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आरमारी ताफ्याने समुद्रमार्गे व्यापाराच्या संधी निर्माण केल्या. "शिवभारत" ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी व्यापारी बांधवांना संरक्षण दिले आणि व्यापाराच्या अडचणी दूर केल्या. त्यांनी कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून व्यापारी दृष्टिकोनातून राज्याची आर्थिक ताकद वाढवली.
कर नाही तर लोकवर्गणी: "जेधे शकावली" मध्ये असाही उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत लोकवर्गणी महत्त्वाची होती. लोकांना कररूपी बोजा न लादता गरजेनुसार वर्गणी मागितली जायची. यातून उभारलेले सगळे संपत्ती व संसाधने लोकांसाठी वापरण्यात आली. यामुळे प्रजेचा शासनावर विश्वास वाढला.
सुरक्षेचे मजबूत जाळे: महाराजांनी गडकोटांच्या माध्यमातून फक्त संरक्षण नव्हे, तर गावांमधील लोकांना आसरा आणि मदत पुरवली. "शिवभारत" ग्रंथात उल्लेख आहे की त्यांच्या गडांच्या योजनांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नसाठा आणि संकटसमयी संरक्षक उपायांची सोय असायची. गडांवरील प्रबळ व्यवस्थापनामुळे प्रजेचा सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
सांस्कृतिक / धार्मिक वारसा: शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवत ते कायम जपले. "बुधभूषण" मध्ये नमूद आहे की त्यांनी देवस्थानांची काळजी घेतली आणि मुस्लिम वा ख्रिश्चन लोकांकडून होणारे मंदिरांचे विध्वंस थांबले.
केवळ हे कार्य बघितलं तरी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजा कल्याणाच्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला होईल. त्यासाठी कुण्या औरंगजेब वा अफझलखानासोबत तुलना करण्याची गरजच नाहीये.
आपण आता मध्ययुगीन व्यवस्थेत नाही. पण औरंगजेबाला मानणारे अजूनही त्याच मध्ययुगीन मानसिक अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ "कबर नको" एवढं म्हटलं की थेट संघाच्या मुख्यालयाच्या जवळ सुनियोजित हल्ला केला.
म्हणूनच उत्तर आवश्यक आहे आणि तेही आजच्या कायद्यात. त्यामुळे अफझलखानाचं थडगं ज्याप्रमाणे वनकायद्याने हटवलं त्याचप्रमाणे औरंगजेबाचं थडगं ASI च्या कायद्यात घालून मूळ अवस्थेत तरी नेऊन ठेवलं पाहिजे.
- ज्ञानेश
Tuesday, December 24, 2024
।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।
Thursday, July 25, 2024
पुस्तक परिचय - विनाशपर्व
Friday, July 29, 2022
धुरंधर - नानासाहेब पेशवे!
Monday, August 30, 2021
कर्ण
हॅरी - आपण आत्ता कुठे आहोत?
प्रोफ. डम्बलडोर - तुला काय वाटतंय?
हॅरी - मला वाटतंय की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. फक्त इथे गर्दी नाहीये, स्वच्छता जास्त आहे...
प्रोफ. डम्बलडोर - अच्छा...
हॅरी - आता मला परत जावे लागेल ना?
प्रोफ. डम्बलडोर - ते तुझ्या निवडीवर अवलंबून आहे.
हॅरी - म्हणजे मला ठरवता येईल?
प्रोफ. डम्बलडोर - मी तुला खूप आधी सांगितलं होतं की तू किंवा कुणीही जे काही आहात ते निवडीवर अवलंबून आहे. कुणाचीही निवड ही क्षमतेहून अधिक महत्वाची असते. यासाठी तुला एक गोष्ट सांगतो.
तुला महाभारत माहित आहे. तुझ्या अभ्यासक्रमात होतं... त्यात एक पात्र होतं - कर्ण! तो कुंतीचा पुत्र होता. विवाहाच्या आधी झालेला होता. त्यामुळे कुंतीने त्याला त्यागले होते. त्याला वाढवले एका सारथी कुटुंबाने. राधेने त्याचा स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे सांभाळ केला. त्याची दुर्योधनाशी मैत्री झाली. जेव्हा तू, रॉन आणि हर्मायनी यांच्यातील कुणी चूक करत असेल तर अन्य दोघे, किमान एकजण ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? यालाच निवड म्हणतात. मैत्री अशीच असली पाहिजे. पण कर्णाने कधीही दुर्योधनाला वाईट वागण्यापासून थांबवले नाही. दुर्योधनाने जेव्हा भीमाला विष दिले, तेव्हा तर कर्ण आणि अर्जुन यांच्यातील तीव्र स्पर्धा सुरू व्हायची होती. भीमावर केलेल्या विषप्रयोगाला त्याने थांबवले नाही. पांडवांना जाळून मारावे म्हणून लाक्षागृहात पाठवले, चुकीच्या पद्धतीने द्यूत खेळले, द्रौपदीची विटंबना केली, विराट राजाच्या लहानश्या राज्यावर आक्रमण केलं, पांडवांकडून पाच गावांचा प्रस्ताव कृष्णाने आणला तोही नाकारला. युद्धात अभिमन्यूला अनेकांनी मारलं. तो निःशस्त्र झाला होता तरीही कर्णाने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कर्ण, जेव्हा अर्जुन त्याला निःशस्त्र असताना मारत होता तेव्हा नियमांची ग्वाही देत होता. जेव्हा मैत्री करता तेव्हा ती निभावता आली पाहिजे. निभावणे म्हणजे प्रत्येक बाबतीत सोबत असणे नव्हे, तर मित्राला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे मैत्री. हीच ती निवड.
हॅरी - बरोबर. पण किमान तो मैत्री निभावताना दुर्योधनाच्या सोबत तर राहिला ना?
प्रोफ. डम्बलडोर - नाही ना... त्याचा अहंकार मैत्रीच्या वर होता... जेव्हा रॉन जखमी होता तेव्हा त्याला तू आणि हर्मायनी सगळे निर्णय घेत आहात आणि त्याला साईडलाईन केलं जातंय असं वाटलं. त्याचा अहंकार, मैत्री आणि प्रेम दुखावलं गेलं. तो निघून गेला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे. तेव्हा तुमचा काहीही पत्ता नसताना रानोमाळ तो तुम्हाला शोधत फिरला आणि जेव्हा ते लॉकेट फोडायचे होते तेव्हा तो तुझ्यासोबत होता. पण कर्णाने काय केलं... दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई तो पहिले १० दिवस लढलाच नाही. कारण त्याला भीष्म म्हणाले की तू अर्धरथी आहेस. हा त्याला अपमान वाटला. त्यामुळे जोवर भीष्म सेनापती आहेत तोवर त्याने लढाईत भागच घेतला नाही.
हॅरी - पण त्याच्यावर लहानपणापासून अन्याय झाला. त्याला आयुष्याच्या सर्वात मोठ्या लढाईच्या वेळी वाटणारच ना, की त्याला महारथी म्हणावे...
प्रोफ. डम्बलडोर - अन्याय कुणावर झाले नाहीत... माझं आयुष्य तुला आता बरंच कळालं आहे. मी, माझा भाऊ, बहीण, आई... कितीतरी कठीण गोष्टी होत्या. त्या सर्व मागे ठेऊन योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. नियतीने तुझ्यावरही किती अन्याय केलाय. तू वर्षाचा होतास तेव्हा आईबाप गेले. मावशीने सांभाळ केला, तोही नाईलाजाने. शाळेत तुला काही चांगले, प्रेम करणारे शिक्षक भेटले तर काही सदैव भीती घालणारे, तुझा अत्यंत द्वेष करणारे भेटले. मित्र भेटले, सोबतच वैरीही भेटले. माझ्यासारखा तुला निव्वळ एक शस्त्र म्हणून तयार करणारा हेडमास्तर भेटला... हे होऊनही तू आज माझ्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने बोलत आहेस. ज्याने तुझ्याशी सदैव वैर पत्करलं, जो माझ्या मृत्यूला एका अर्थाने कारणीभूत झाला, त्या ड्रेकोला तू काही तासांपूर्वी मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलंस... या सगळ्या तुझ्या निवडी होत्या आणि त्यातूनच तुझं चारित्र्य दिसून येतं. कर्णाला तर उदाहरण म्हणून कृष्ण होता. त्याच्यावरही नियतीने कितीतरी प्रकारे अन्याय केला आणि तरीही तो न्यायाच्या, नीतीच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्यामुळे हॅरी, हे कायम लक्षात ठेव की एखाद्या व्यक्तीची क्षमता तिचं चारित्र्य ठरवत नाही तर त्या व्यक्तीची निवड तिचं चारित्र्य ठरवते. त्यामुळे तुला निवड करायची आहे. तू आता काय करणार?
हॅरी - मला ठरवावे लागेल...?
प्रोफ. डम्बलडोर - हो
हॅरी - माझ्यापुढे पर्याय काय आहेत?
प्रोफ. डम्बलडोर - तू आत्ताच म्हणाला होतास ना की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. त्यामुळे परत जाण्याचं ठरवलंस तर परत जाऊ शकशील, किंवा तू जर ठरवलं इथे थांबायचं तर असं समज की एक ट्रेन येईल आणि तुला घेऊन जाईल
हॅरी - कुठे?
प्रोफ. डम्बलडोर - पुढे...
Monday, August 2, 2021
मेकेलीन - पूर व्यवस्थापन
Wednesday, June 9, 2021
स्वयंभू भीम
महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.
संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...
तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.
असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.
Friday, September 4, 2020
पुस्तक परिचय : या सम हा

Saturday, August 15, 2020
अखंड भारत संकल्प दिन
Saturday, July 25, 2020
पराभूतांचा इतिहास?
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात अलक्षेन्द्राने भारतावर हल्ला केला. त्याने मध्यआशिया पूर्ण जिंकला होता. पुरूराजाशी झालेल्या लढाईत त्याची प्रचंड हानी झाली. तरीही पुढे जाण्याची त्याची इच्छा होती. पण त्याची सेना मगध सेनेची संख्या (दोन लाख पायदळ, ऐंशी हजार घोडदळ, आठ हजार रथ आणि सहा हजार हत्तीदळ) ऐकूनच गर्भगळीत झाली आणि सेनेने पुढे कूच करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला तक्षशिलेच्या पुढे भारतात येता आले नाही. परत जाताना तो मेला. शकांनी ख्रिस्तपूर्व ८० ते इस १५० या सव्वादोनशे वर्षात उत्तरपश्चिम (आजचा पाकिस्तान) भागात राज्य केलं. पण गौतमीपुत्र सातकर्णीने शकांना संपूर्ण हरवले. सोबतच जवळपास संपूर्ण भारत राजकीयदृष्ट्या एका राज्यात आणला. इस चौथ्या शतकापर्यंत जवळपास साडेतीनशे वर्ष कुशाणांनी उत्तर आणि पश्चिम भारतावर राज्य केलं. पण पुढे कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली. गुप्त साम्राज्याने कुशाण साम्राज्य संपवले. पाचव्या शतकाच्या मध्यावर भारतावर हूणांनी हल्ला केला होता. हे मध्य आशियातील लोक होते. यांना काही वर्षातच स्कंदगुप्ताने हरवले. हूणसुद्धा पंजाब पार करू शकले नाहीत. म्हणजे या आक्रमकांपैकी कुणीही पंजाब पार करून भारतात येऊ शकला नाही.
इस्लाम स्थापन झाल्यानंतर भारतावर आक्रमणे वाढली. बाराव्या शतकात पहिल्यांदा कुणा इस्लामी राज्यकर्त्याला भारतात प्रवेश करता आला. तोवर राजस्थान मधील बाप्पा रावळ, सिंध मधील राजा दाहीर, काश्मिरातील ललितादित्य, कन्नौज येथील यशोवर्मन यांनी सातव्या शतकापासून सुरु असलेले हल्ले नुसते थोपवले नाहीत तर पुढे दोन शतके कुणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही असा हग्या मार दिला. पुढे गझनीने हल्ला केला. पण गझनीच्या लागोपाठच्या हल्ल्यानंतर पुन्हा १०० वर्ष भारतावर इस्लामी हल्ला झाला नाही. पुढे घौरीने हल्ला केला. तिथून भारतावर इस्लामी आक्रमण जास्त होत गेलं. बख्तियार खिलजीच्या आक्रमणाने नालंदा विद्यापीठ जाळले गेले. तिथून पुढे भारतीय राजांची सत्ता कमकुवत होत गेली. पण तरीही भारतीयांची परकीय आक्रमकांना विरोध करण्याची वृत्ती कुठेही कमी झाली नाही. चौदाव्या शतकात तैमूरने आक्रमण केलं. रामप्यारी चौहान आणि तिच्या साथीदारांनी गनिमीकाव्याने लढा देऊन तैमूरला आत्यंतिक जखमी करून माघार घ्यायला लावली. अखेरीस त्याच जखमांनी तैमूर मेला.
या इसपूर्व चौथं शतक ते इस बारावं शतक या दीड हजार पेक्षा अधिक वर्षांत भारताने काय काय केलं...राज्यव्यवस्थेत: इस पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत कम्बु, कौंडिण्य, चोल आणि शैलेंद्र राजांनी दक्षिण भारत आणि आग्नेय आशियावर आपले प्रभुत्व गाजवले. पण आग्नेय आशियात राज्य असं केलं की तेथील स्थानिक जनता त्यांना आजही आक्रमक मानत नाही, चंद्रगुप्ताने ग्रीकांना पराभूत केले, समुद्रगुप्ताने हे राज्य वाढवले आणि पुढे अशोकाचे मौर्य साम्राज्य हे संपूर्ण भारतभर होते, मौर्य वंशानंतर शृंग वंशाचे राज्य पुष्यमित्राने स्थापन केले. तेही संपूर्ण भारतभर होते. खारवेल आणि पुष्यमित्र यांनी एकत्र येऊन दिमित्रीस पराभूत केले, शालिवाहनाने सुटे झालेली भारतीय राज्ये पुन्हा एका अमलाखाली आणली, पुढे हर्षवर्धनाने पुन्हा विस्कळीत झालेली राज्ये एकत्र आणून मोठं साम्राज्य उभं केलं, पूर्वांचलातील भास्कर वर्मा यांनी हर्षवर्धनाशी विशेष मैत्री ठेऊन अनेक युद्धे एकत्रित जिंकली, यशोधर्माने हूणांचे राज्य संपवले, कृष्णदेवराय यांनी विजयनगरचे साम्राज्य वाढवले, प्रोलय आणि कप्पय या दोघा मसुनूरी नायकांनी आंध्रातील इस्लामी राज्य संपवले
ही सगळी आक्रमणे आणि त्याला विरोध सुरु असताना कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात: तिरुवल्लुवर यांनी जीवनविषयक तत्वज्ञान स्थानिक भाषेत सहज सांगितले, शंकराचार्यांनी भारत पुन्हा एकदा एका सूत्रात बांधला, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य यांनी वेदान्तावर नवीन भाष्ये करून लोकांना जीवन सुलभ करून सांगितले, सिंध मध्ये झुलेलाल यांनी इस्लामी आक्रमकांना न जुमानता हिंदू धर्म तेवत ठेवला, चैतन्य महाप्रभूंनी भक्तीच्या सीमा प्रचंड विस्तारल्या, नायन्मार या शैव आणि अलवार या वैष्णव संतांनी दक्षिणेत जातीभेद उच्चाटनाचे महत्वाचे कार्य केले, बसवेश्वरांनी वीरशैव पंथ स्थापन केला. यातही जातिभेदाला कोणताही थारा नव्हता, गुरु नानक देव यांनी शीख पंथ स्थापन केला, हरिहर आणि बुक्कराय यांना प्रेरणा देऊन त्यांचे राज्य स्थापन होण्यात सायनाचार्य आणि माधवाचार्य यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि विजयनगरचे हिंदू साम्राज्य उभे राहिले, ज्ञानेश्वरांनी गीतेचे ज्ञान प्राकृतात सांगितले, कालिदासांनी अनेक काव्ये लिहिली, अनेक मंदिरे, लेण्या तयार झाल्या.
विज्ञानात: भास्कराचार्यांनी अनेक गणिती सिद्धांत मांडले, सोबतच गुरुत्वाकर्षणाबद्दलही सांगितले (न्यूटनच्या आधी सुमारे ६०० वर्ष), नागार्जुनाने अनेक रासायनिक प्रयोग करून धातुविज्ञान सिद्ध केले, आर्यभट्टांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत इस ५व्या शतकात सांगितला (आणि त्यांना कुणी शिक्षाही केली नाही!!!)
याचा अर्थ हा की आक्रमणं होत होती परंतु भारतात ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात काम होत राहिलं. म्हणजे ही केवळ आक्रमणे होती. आक्रमणे झाली कारण आपण समृद्ध होतो. आपण आक्रमणे केली नाहीत कारण आपण सुसंकृत होतो. आपण पराभूत नव्हतो आणि आपण पारतंत्र्यातही नव्हतो.
मोगल आल्यानंतर तर आपल्याला अकबर द ग्रेट पासून ते औरंगजेब कशा टोप्या विकायचा तिथवर सांगितलं जातं. पण अकबराने केलेले अत्याचार त्याच्या वलयात सांगितले सुद्धा जात नाहीत. महाराणा प्रतापांनी अकबराने जिंकलेला ८०%पेक्षा अधिक भाग पुन्हा जिंकला होता हे आपल्याला माहीतच नसते. औरंगजेबाने पूर्वांचलावर केलेला हल्ला लाचिद बडफुकन यांनी असा परतवून लावला की पुन्हा औरंगजेबाने पूर्वांचलाकडे स्वारी केलीच नाही. शिवाजी महाराजांनी याच काळात स्वराज्य उभं केलं. औरंगजेबाच्या नाकाखाली बुंदेलखंडात छत्रसालांना स्वराज्य उभं करण्यास प्रवृत्त केलं. महाराज गेल्यावरही संभाजी महाराजांनी लढा सुरू ठेवला. औरंगजेबाने संभाजी राजांना अत्यंत क्रूरपणे मारल्यानंतरही राजाराम महाराज आणि नंतर ताराराणी यांनी त्याला स्वराज्याचा घास घेऊ दिला नाही. उलट औरंगजेब अखेरीस याच मराठी मातीत गाडला गेला.
पुढे शाहू छत्रपती परतून आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांच्यासह त्यांनी स्वराज्याची घडी पुन्हा बसवली. त्यावर कळस चढवला तो थोरल्या बाजीरावांनी. बाजीरावांच्या काळातच भारतात बहुतेक मोठ्या भूभागावर पुन्हा स्वराज्य आलं होतं. कारण नाव जरी मोगलांचं असलं तरी राज्य मराठेच करत होते. पुढे अटकेपार झेंडे आणि नंतर पानिपत झालं. पण पानिपतानंतर केवळ १० वर्षात पुन्हा ते वैभव मराठा साम्रज्याने पाहिले. शिवाय पंजाबात महाराज रणजितसिंहांचे राज्य सुरू झाले. या राज्याने अब्दाली आणि त्याच्या राज्याला मोठा शह दिला आणि पुन्हा त्या बाजूने पंजाबच्या पुढे कोणतेही आक्रमण येऊ शकले नाही. म्हणजे उणेपुरे ३०० वर्ष मोगलांनी भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. पण तेही कधी संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात घेऊ शकले नाहीत. मात्र या वर्षांत ज्ञान-विज्ञानात असलेली भारताची प्रगती थांबली.
इंग्रजांनी भारत हा मराठ्यांकडून ताब्यात घेतला. ही अत्यंत स्पष्ट बाब आपल्याला इतिहासात शिकवलीच जात नाही. १८१८ मध्ये जेव्हा दुसरा बाजीराव हरला तेव्हाही इंग्रजांना भीती मराठ्यांकडूनच होती. त्यामुळेच या कमी घातक असलेल्या बाजीरावाला इंग्रजांनी पार उत्तर हिंदुस्थानात नेऊन ठेवले. तरीही इंग्रजांची भीती खरी ठरली आणि १८५७ च्या युद्धाची सूत्रे मराठ्यांकडे (राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे) आली. तिथून पुढे ९० वर्षे आपण पूर्ण पारतंत्र्यात होतो. असे असले तरी स्वातंत्र्याची आस मात्र कायम होती आणि त्यासाठी प्राणपणाने अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले.
आपली लूट झाली, पण आपण केवळ लुटले गेलो नाहीत तर लुटारूंना आपण पळवून लावलं आहे. आपला इतिहास पराभूतांचा इतिहास नाहीये तर दैदिप्यमान असा स्वातंत्र्येच्छू, पराक्रमी, ज्ञानी आणि सहिष्णू लोकांचा इतिहास आहे.
Friday, March 6, 2020
समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
लेखक - कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक - मोरया प्रकाशन
मूल्य ₹१७०
मागील १ महिन्यात कौस्तुभ कस्तुरेंची ३ पुस्तके वाचली. "प्रतिशोध पानिपतचा"चा परिचय या आधी दिला होता. सदाशिवराव भाऊंवरील "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ" हे दुसरं (याचा परिचय नंतर देईन) आणि समर्थांवरील "समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन" हे तिसरं. अजून एक "पुरंदरे" आता वाचायला घेईन...कौस्तुभ कस्तुरेंचं वैशिष्ट्य हे की, रामदासांनी सांगितलेलं - अभ्यासोनि प्रकटावे - हे ब्रीद ते कसोशीने पाळतात. कुठेही अतिरंजितपणा नाही. इतिहास म्हणजे इति + ह् + आस म्हणजेच - हे असे घडले. जे घडले तेच इतिहासातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच काय घडले यासाठी समकालीन कागदपत्रे हाच सर्वोत्तम पुरावा आहे. समकालीन कागदपत्रांमधून बखरी या हद्दपार होतात कारण यात अतिरंजितपणा आणि ज्याने बखर लिहून घेतली त्याचा अति उदोउदो असतो. त्यामुळे पत्रे, सनदा आणि समकालीन व्यक्तींनी लिहिलेली चरित्रे यावरच ते अवलंबून असतात आणि विश्वास ठेवतात.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर्थ आणि महाराजांची भेट ही स्वराज्य स्थापनेच्या आधी झाली नसून ती बरीच उशिरा झाली हे सांगितलंय. महाराजांचे स्वराज्य हे जिजाऊंच्या प्रेरणेचे आणि महाराजांच्या कष्टानेच उभे राहिले आहे हे स्पष्ट केलंय. पण जेव्हा भेट झाली तेव्हापासून महाराजांचा आणि समर्थांचा स्नेह किती बळकट होता तेही सप्रमाण सिद्ध केलंय.
या पुस्तकासाठी कौस्तुभ कस्तुरे यांनी समर्थ संप्रदायातील कागदपत्रे, भीमस्वामी, गिरीधर स्वामी, दिनकर गोसावी यांनी लिहिलेली समर्थ चरित्रे अभ्यासली. शिवाय रघुनाथ पंडितांनी लिहिलेलं समर्थांचं वर्णनसुद्धा अभ्यासलं. हे सर्व समकालीन आहे. याशिवाय भीमाजी बुवांनी लिहिलेलं समर्थ चरित्रही घेतलंय, जे उत्तरकालीन आहे. या सर्वांवर लिहीत असताना एक बाब कौस्तुभ वारंवार सांगतात ती म्हणजे चमत्कार खरे नाहीत. त्यांना इतिहासात काहीही स्थान नाही. पण ही सर्व चरित्रे आपल्याला थोडक्यात यातून सहज कळतात.या चरित्र आणि वर्णनाशिवाय समर्थांनी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म यावर जो उपदेश केला होता त्याबद्दलही लिहिले आहे.
या पुस्तकात अनेक चित्रेही आहेत. विशेषतः महाराजांचा आणि समर्थांचा संबंध दाखवणारी चाफळची सनद - तिचाही फोटो आहे. या सनदेवरून संकेत कुलकर्णी (लंडन) आणि कौस्तुभ यांनी शोधून, अभ्यासून हा संबंध "पुराव्यानिशी शाबीत" केला आहे!
Tuesday, March 20, 2018
शिवाजी महाराजांचे मुस्लीम सरदार
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील तोफखान्याचा प्रमुख होता.
कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले. संपूर्ण आरमाराचे नाही
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती नेताजी पालकर होते. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.
"मदारी मेहतर"
बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता की नाही यावर मत मतांतरे आहेत. अधिक माहितीसाठी पहा - https://m.facebook.com/dasabodh/posts/446234875521176:0
''काझी हैदर"
बरोबर. पण एकमेव नव्हता.
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
बरोबर. पण वाघनख्या पाठवणारा नाही तर शस्त्र तयार करणारा एक कारागीर होता तो. त्याने केवळ अफझलखानाला मारायचे म्हणून वाघनखं बनवून दिली नव्हती
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका
नाना फडणीस
गेल्या काही दिवसांत पेशवाईवरील बरीच पुस्तके वाचली. नाना फडणीसांना पानिपतला सदाशिवरावांसोबत कारभारी म्हणून पाठवले होते. तिथे रणात अन्य लोक (पाळणाऱ्यात होळकर, विंचूरकर, महादजी शिंदे सुद्धा होते) पळाले, त्यांच्याबरोबर हे सुद्धा पळून आले. पण पळपुटा म्हटले गेले फक्त नाना फडणीसाला. असो, पळाले हे खरं...
पुढे माधवरावांच्या सोबत फड सांभाळला तो यांनीच. पानिपतवरील लढाई एक प्रचंड धक्का होता आणि त्यापाठोपाठ नानासाहेब पेशवे निवर्तले. पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव पानिपतात मारले गेले. इथे राघोबादादाला पेशवे बनण्याची संधी होती पण संपूर्ण जबाबदारी घेणं राघोबाने नेहमीच टाळलं. माधवराव 'पेशवे' झाले. हा तरुण पेशवा मात्र अनेक घरातल्या आणि बाहेरच्या झुंजी देत अतिशय लवकर निवर्तला. पण या अवधीत त्यांनी पानिपत वरील जखमा बुजवल्या आणि नाना फडणीस सारखे लोक पेशवाईच्या आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याच्या कामी लावले. पुढे नारायणराव पेशवे झाले आणि त्यांना राघोबा + आनंदीबाई यांनी मारले. रात्री गुपचूप सगळे विधीही आटोपले. सर्व पुणे झोपलेले असताना नाना फडणीस यांनी अन्य 3 कारभाऱ्यासोबत राघोबाला पेशवेपद मिळू नये अशी शपथ घेतली. तरी राघोबा पेशवे झाले. 5 महिन्यात जेव्हा नारायणरावांची पत्नी बाळांत झाली तेव्हा या कारभाऱ्यांनी राघोबा बाहेर असताना चिमुकल्या सवाई माधवराव च्या नावे पेशवाई घेतली आणि बारभाईची लढाई सुरू झाली. याला कारस्थान का म्हटले? वास्तविक व्यसनी राघोबाला पेशवाई दिली हीच चूक होती ती सुधारणे याला कारस्थान म्हटले गेले.
मग राघोबा इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजांकडून हिंदवी स्वराज्यावर हल्ला करवला. इथे नाना फडणीसांनी अतिशय धूर्तपणे हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. अर्थात या कामी होळकर आणि शिंदे यांची मदत झालीच. पण लढाई सुरू होण्याआधीच वडगावला इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली आणि राघोबाला नानांच्या हवाली करून, मोठी खंडणी देऊन ते चालते झाले. ही प्रचंड हार इंग्रजांना किमान 50 वर्ष मागे घेऊन गेली. स्वराज्याच्या या विजयाचे शिल्पकार होते नाना फडणीस.
सवाई माधवराव वयाच्या 14-15 वर्षी वारले आणि त्याजागी दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचा मुलगा आला. याने आधी नाना फडणीसांना कैदेत टाकलं आणि नंतर जेव्हा कारभार पेलला नाही तेव्हा पुन्हा फडणीस केलं. हे सगळं होऊनही नाना कायम हिंदवी स्वराज्यासाठी झटले आणि ते असेपर्यंत इंग्रजांना आपले हात पाय पसरता आले नाहीत. 13 मार्च 1800 साली नाना फडणीस वारले आणि पुढे केवळ 18 वर्षांत शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला.
मला वाटते की नाना फडणीसांत दोष असतील पण त्याचे विकृतीकरण इंग्रजांनी केले असावे. कारण नाना फडणीसांमुळे त्यांना मराठा साम्राज्य जिंकता आलं नव्हतं. मोर नाचताना इंग्रजांनी मागून फोटो काढला आणि आपल्या साहित्यिकांनी तोच मोराचा फोटो आहे असं मानून लेखन केलं आणि नानावर निव्वळ बाईलवेडा आणि विकृत असा शिक्का मारला. धोरणी आणि मुत्सद्दी नाना त्यात लोप पावले.
दि. १३ मार्च २०१७
प्राचीन भारतीय ज्ञान
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.
दि. ५ मे २०१७









