Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Friday, April 24, 2026

१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारताचे राजकारण तापले होते. एकीकडे मराठा साम्राज्याने पानिपतच्या जखमा भरून काढत पुन्हा उभारी घेतली होती, तर दुसरीकडे मैसूरचा हैदर अली आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर दक्षिणेत झपाट्याने विस्तार करत होता. यात ६ मार्च १७७१ रोजी झालेली चिंकुर्लीची लढाई हा एक निर्णायक टप्पा ठरला. इतिहासात फारसा चर्चिला न जाणारा, पण मराठा सामर्थ्याची खरी ओळख दाखवणारा.

माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीने मराठा साम्राज्याला नवजीवन दिले होते. त्यांच्या नेतृत्वात सैन्य पुन्हा संघटित झाले, सरदारांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि मराठा साम्राज्याचा आत्मविश्वास परत आला. हैदर अलीने मराठ्यांशी केलेल्या करारांचे उल्लंघन करून उत्तरेकडील प्रदेशात घुसखोरी सुरू केली तेव्हा माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले. दक्षिणेकडे मोर्चा वळवताना त्यांचा उद्देश फक्त बदला नव्हता; तो होता मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करणे.

मैसूरच्या सीमेजवळील चिंकुर्ली हे गाव त्या काळी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. आसपासचा प्रदेश सपाट, पण काही ठिकाणी दगडी टेकड्यांनी भरलेला होता. जिथे सैन्य लपवता येऊ शकत होते, अचानक हल्ले करता येऊ शकत होते. हैदर अलीने याच भौगोलिक फायद्याचा उपयोग करून मराठ्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत टिपूही होता. यावेळी टिपू २० वर्षांचा होता.

मराठा सैन्य चिंकुर्लीच्या दिशेने सरकत असताना हैदर अलीने आपल्या फौजा रचल्या, पण त्याला मराठ्यांच्या वेगाचा आणि शिस्तीचा अंदाज आला नव्हता. माधवरावांनी सैन्याची मांडणी इतक्या अचूकतेने केली होती की मैसूरच्या फौजांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. मराठ्यांच्या घोडदळाने केलेल्या झंझावाती हल्ल्याने हैदरची पहिली फळी अक्षरशः उडून गेली. तोल सावरायच्या आत दुसरी फळीही ढासळली. लढाई काही तासांतच निर्णायक वळणावर पोहोचली.

हैदर अलीला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. टिपू त्याच्यासोबत होता. दोघांनीही रणांगण सोडून अक्षरशः पळ काढला. ही माघार नियोजनबद्ध नव्हती, तर जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड होती. मराठा सैन्याच्या वेगवान धडाक्यामुळे मैसूरच्या छावणीत गोंधळ माजला. अनेक सैनिक पळाले, काहींनी शस्त्रे टाकली, तर काहींना मराठ्यांनी बंदी बनवले.

याच गोंधळात हैदर कसा वाचला तेही मजेदार आहे. हैदर अलीच्या सैन्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मराठ्यांनी पकडले. त्याचे रूप, पोशाख आणि त्याच्या आसपास असलेली गडबड पाहून मराठ्यांना क्षणभर वाटले की हा माणूसच हैदर अली असावा. या चुकीच्या ओळखीमुळे मराठ्यांचा पाठलाग काही काळ थांबला. आणि हा काही मिनिटांचा विलंबच हैदर अलीसाठी वरदान ठरला. तो आणि टिपू या दोघांना श्रीरंगपट्टणपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळाला.

लढाई संपली तेव्हा रणांगणावर मराठ्यांचा संपूर्ण विजय उभा होता. हैदर अलीची फौज तुटली होती, त्याचे मनोबल खच्ची झाले होते आणि त्याच्या खजिन्यावर प्रचंड ताण आला होता. मराठ्यांनी त्याला शांतता करारासाठी भाग पाडले. या करारात हैदर अलीला तुंगभद्रेच्या उत्तरेतील सर्व प्रदेश परत करावे लागले, तसेच मोठी खंडणी भरावी लागली. इतकी की त्याचा खजिना जवळजवळ रिकामा झाला. हा पराभव हैदरसाठी अत्यंत अपमानास्पद होता.

चिंकुर्लीची लढाई फक्त एक सैनिकी विजय नव्हता; तो मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा अजून एक निर्णायक पुरावा होता. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची शक्ती संपली असे अनेकांना वाटत होते, पण माधवराव पेशव्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वगुणांनी हे सिद्ध केले की मराठा साम्राज्य अजूनही भारतीय उपखंडातील सर्वात प्रभावी शक्ती आहे. हैदरला राघोबादादाने चूक करून जी थोडी मोकळीक दिली होती ती माधवरावांनी दुरुस्त केली. चिंकुर्लीच्या विजयाने दक्षिणेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आणि हैदर अलीसारख्या महत्त्वाकांक्षी शासकाला मर्यादा ओलांडण्याची किंमत काय असते हे दाखवून दिले.

आज या लढाईचा उल्लेख इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारसा आढळत नाही. पण ज्यांनी त्या काळातील मराठा–मैसूर संघर्षाचा अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की चिंकुर्ली हा एक टर्निंग पॉइंट होता. एक अशी लढाई ज्याने मराठ्यांच्या सामर्थ्याला नवा आत्मविश्वास दिला आणि दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. या लढाईत रणांगणावर उभा राहून माधवरावांनी दाखवलेली रणनीती, मराठा घोडदळाचा वेग अप्रतिम होता. चिंकुर्लीची लढाई मराठा इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे.

संदर्भ : Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum by Vikram Sampath

Tuesday, January 13, 2026

पानिपतचे परिणाम

१७६०च्या अखेरीस दक्षिण भारतात एक विचित्र आणि निर्णायक घडामोड आकार घेत होती. मैसूरच्या सत्तेवर प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची हैदर अलीची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस उघड होत होती. दरबारातील राजकारण आणि हैदरची वाढती सत्ता यामुळे मैसूरचे राजे, त्यांची आई आणि खंडेराव हे पूर्णपणे असहाय्य झाले होते. अखेर त्यांनी मराठ्यांकडे धाव घेतली. दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव प्रचंड होता आणि पेशव्यांच्या सरदारांकडे हैदरला रोखण्याची ताकदही होती. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांकडे मदतीची विनंती केली.

पेशव्यांच्या दरबारातून विसाजी पंत बिनीवाले, मुरारराव घोरपडे आणि इतर सरदारांची एक सक्षम मोहीम दक्षिणेकडे निघाली. या मोहिमेचा वेग, शिस्त आणि रणनीती इतकी प्रभावी होती की काही दिवसांतच हैदर अली अक्षरशः एका जागी कोंडला गेला. त्याच्या हालचालींवर पूर्ण बंदी आली. त्याच्याकडे सैन्य होते, पण त्याला वापरण्याची संधीच मिळत नव्हती. मराठ्यांच्या वेढ्यातून सुटण्याचा मार्गच उरला नव्हता. परिस्थिती अशी होती की जास्तीत जास्त एक महिना हैदर टिकू शकला असता. त्यानंतर त्याचा पराभव निश्चित होता.

पण इतिहासाला कधी कोणाची प्रतीक्षा नसते. दक्षिणेत मराठ्यांनी विजयाची दारे उघडली असतानाच, उत्तरेत एक प्रचंड वादळ उठले होते ते अहमदशहा अब्दालीचे. अब्दालीच्या आक्रमणाने संपूर्ण हिंदुस्थान हादरले. त्याचा सामना करण्यासाठी मराठ्यांची सर्वात बलाढ्य सेना उत्तर दिशेला निघाली. भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे… मराठ्यांच्या सामर्थ्याचे हे सर्व आधारस्तंभ उत्तरेत गेले. दक्षिणेतील मोहीम यशाच्या उंबरठ्यावर असताना, उत्तरेतील संकटाने संपूर्ण समीकरण बदलले.

आणि मग उजाडला इतिहासाला मोठी कलाटणी दिवस १४ जानेवारी १७६१. मराठा साम्राज्यावरील संक्रांत. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा दाखवली, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच पान लिहिले होते.
दो मोती गिरे, दस-बीस अशरफ़ी गंवाई, पैसे का तो कोई हिसाब ही नहीं...
भाऊसाहेब, विश्वासराव, समशेर बहाद्दूर असे अनेक थोर योद्धे त्या दिवशी रणांगणावर कोसळले. पराभव हा शब्द त्या दिवशी किती मोठा असू शकतो, याची जाणीव संपूर्ण देशाला झाली.

या भीषण बातमीने नानासाहेब पेशवे हादरून गेले. त्यांनी तातडीने सर्व मराठा सैन्यांना परतण्याचा आदेश दिला. दक्षिणेकडील मोहीमही त्याला अपवाद नव्हती. बिनीवाले आणि इतर सरदारांना हैदरवरील अंतिम टप्प्यातील कारवाई सोडून परत फिरावे लागले. पराजयाच्या दारात उभा असलेला हैदर अली अचानक मुक्त झाला. मराठ्यांच्या परतीने त्याचा जीव वाचला.

हैदर अलीने या संधीचा फायदा घेतला. खंडेरावला त्याने उघड्या तुरुंगात मरण येईपर्यंत खितपत ठेवले. मैसूरच्या वडियार राजाचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. प्रत्यक्ष राजा नसला तरी सत्तेचा संपूर्ण ताबा त्याच्याकडे गेला. पुढे त्याचा मुलगा टिपू सुलतानही याच सत्तेच्या वारशातून पुढे आला. दक्षिण भारताच्या राजकारणात हैदर आणि टिपू यांनी निर्माण केलेली सत्ता, संघर्ष आणि दडपशाही यांची बीजे याच काळात रोवली गेली.

पानिपतची लढाई ही केवळ उत्तर भारतातील पराभव नव्हती. तिचा परिणाम संपूर्ण देशभर उमटला. मराठेशाही काही वर्षे मागे ढकलली गेलीच, पण त्याचबरोबर दक्षिणेत एक हिंदू राज्यही अप्रत्यक्षपणे संपुष्टात आले. जर पानिपतचा पराभव झाला नसता, तर हैदर अलीचा अंत निश्चित होता. मैसूरच्या राजघराण्याला पुन्हा सत्ता मिळाली असती. दक्षिणेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी असती. पण इतिहासाने वेगळा मार्ग निवडला.

या एका लढाईने मराठ्यांच्या सामर्थ्याला तात्पुरती खीळ बसवली, पण त्याहून मोठा परिणाम म्हणजे हैदर अली आणि पुढे टिपू सुलतान यांना मिळालेली संधी. मराठ्यांच्या परतीने वाचलेला हैदर पुढे दक्षिणेतील सर्वात प्रभावी आणि आक्रमक शासकांपैकी एक बनला. आणि हे सर्व घडले एका अशा क्षणी, जेव्हा मराठे विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होते.

इतिहासातील या घटना वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कधी कधी एका रणांगणावरील पराभवाचा परिणाम हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या राजकारणावर होतो. पानिपतच्या संक्रांतीने उत्तर भारतात मराठ्यांचे काही काळ सामर्थ्य कमी केलेच, पण दक्षिणेतही एका हिंदू राज्याचा अंत घडवून आणला.

संदर्भ - Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum (1760–1799) by Vikram Sampath


Friday, December 5, 2025

मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country

भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, त्यामुळे विजयनगरच्या भरभराटीच्या काळात पोर्तुगीजांची भरभराट झाली. पण विजयनगर साम्राज्य बुडाल्यावर पोर्तुगीज सुद्धा मागे पडले. त्याचप्रमाणे अजून एक युरोपीय सत्तेने आधी भरभराट आणि नंतर उतरती कळा पहिली, ती म्हणजे डच! डचांना उतरती कळा लागल्यानेच इंग्रजांना ती पोकळी मिळाली. त्या पोकळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

आपल्याला सागरी सत्ता म्हणून चोल राजा राजेंद्र माहीत असतात. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आणि कान्होजी आंग्र्यांनी ज्याचा दबदबा निर्माण केला ते मराठा आरमार माहीत असतं. पण ज्या सागरी आणि जमिनीवरील सत्तेने एक परकीय सत्ता केवळ भारतातून नाही तर जगाच्या क्रमवारीत तिला मागे टाकले अश्या त्रावणकोरच्या मार्तंड वर्मांचे नाव क्वचितच माहीत असते...

१८व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या इतिहासात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व उदयास आले – मार्तंड वर्मा, त्रावणकोरचा राजा. त्यांचा जीवनपट भारतीय किनारपट्टीवरील परकीय वर्चस्व मोडून काढणारा आणि राज्याला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ठरला.  

मार्तंड वर्मा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला. ते त्रावणकोरच्या राजघराण्यातील होते, पण बालपणातच त्यांना राजकीय संघर्षांचा सामना करावा लागला. स्थानिक सरदार, नायर प्रमुख, आणि परकीय व्यापारी यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र होती. या संघर्षातूनच मार्तंड वर्मा यांनी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लढाऊ वृत्ती विकसित केली.  

१७२९ मध्ये ते त्रावणकोरच्या गादीवर बसले. गादीवर बसताच त्यांनी राज्य एकत्र करण्याचे आणि परकीय शक्तींना आव्हान देण्याचे ठरवले. 

त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने मलबार किनाऱ्यावर आपली पकड मजबूत केली होती. मसाल्यांच्या व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते आणि स्थानिक राजांना ते आपल्या धाकात ठेवत होते. मार्तंड वर्मा यांनी या परकीय शक्तीला आव्हान दिले.  

१७४१ मध्ये कोलाचेलची लढाई झाली – भारतीय तसेच जागतिक इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. मार्तंड वर्मा यांच्या सैन्याने डचांना पूर्ण पराभूत केले. ही लढाई विशेष होती कारण युरोपीय शक्तींना भारतीय भूमीवर स्थानिक राजाने निर्णायक पराभव दिला.  

मार्तंड वर्मांच्या या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड मोडली. मसाल्याच्या व्यापारावर असलेला अग्रहक्क मोडला. डच कमांडर डेलनॉय याला कैद केलं. पण मार्तंड वर्मा त्यांची गुणग्राहकता खूप चांगली होती. या कामंडरला मार्तंड वर्मा यांनी आपल्या सैन्यात सामील केले. डेलनॉयने पुढे त्रावणकोरच्या सैन्याला युरोपीय तंत्रज्ञान दिले आणि किल्ले बांधण्यात मदत केली.  

मार्तंड वर्मा यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्यांनी नायर सैनिकांना संघटित केले, युरोपीय शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केला, आणि किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधले.  

- उदयगिरी किल्ला – युरोपीय तंत्रज्ञानाने बांधलेला, तोफखान्याने सज्ज.  

- विझिंजम (विळींझम) बंदर – व्यापार आणि नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र.  

- पद्मनाभपुरम किल्ला – राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र.  

या किल्ल्यांमुळे त्रावणकोर दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित राज्य बनले.  

मार्तंड वर्मा यांचे दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान श्री पद्मनाभस्वामींना अर्पण केले. १७५० मध्ये त्यांनी औपचारिकपणे घोषणा केली की त्रावणकोर हे देवाचे राज्य आहे, आणि ते स्वतः व त्यांच्या पुढील पिढ्या केवळ विश्वस्त (पद्मनाभदास) म्हणून राज्य करतील.  यामुळेच केरळला आजही Gods Own Country असं म्हटलं जातं.

ही घटना भारतीय राजकारणात अद्वितीय होती. राजा स्वतःला देवाचा सेवक मानून राज्यकारभार चालवतो, अशी संकल्पना त्रावणकोरमध्ये रुजली. यामुळे राज्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले आणि लोकांमध्ये एकात्मता निर्माण झाली.  

मार्तंड वर्मा यांनी करव्यवस्था सुधारली, व्यापाराला चालना दिली, आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केले, भ्रष्ट सरदारांना रोखले, आणि राज्यात स्थैर्य आणले. त्यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर हे दक्षिण भारतातील सर्वात स्थिर आणि समृद्ध राज्य बनले. मसाल्यांचा व्यापार सुरक्षित झाला, आणि परकीय शक्तींना त्रावणकोरशी करार करावा लागला.  

१७५८ मध्ये मार्तंड वर्मा यांचे निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत आहे. त्रावणकोरचे वंशज आजही स्वतःला "पद्मनाभदास" म्हणवतात आणि केरळ स्वतःला Gods Own Country म्हणवते.

त्यांच्या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड संपली. त्यांच्या धार्मिक अर्पणामुळे त्रावणकोरला अद्वितीय ओळख मिळाली. 

म्हणूनच मार्तंड वर्मा यांना आपण भारतीय इतिहासातील एक अद्वितीय राजा म्हणून स्मरले पाहिजे "कोलाचेलचा विजेता आणि पद्मनाभदास."

(संदर्भ : ब्रेव्हहार्टस ऑफ भारत - विक्रम संपत)

Wednesday, December 3, 2025

भाग्यचंद्र: स भूपति:

मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.  

राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.

मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.  

राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.  

विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.  

1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.  

- ज्ञानेश

Thursday, March 20, 2025

शिवाजी महाराजांचे मोठेपण

शिवाजी महाराजांचे मोठेपण दिसावे म्हणून औरंग्याचं थडगं असलं पाहिजे असं लॉजिक बरेच जण मांडत आहेत. यात हिंदुत्ववादीही आहेत. मुळात महाराज कळण्यासाठी कोण्या खलनायकाची आवश्यकता नाहीच. कुणाच्या रेषेशी महाराजांची रेष ताडून मग महाराज मोठे आहेत हे दाखवण्याची काही एक गरज नाही. On the absolute terms सुद्धा महाराज महान आहेत.

केवळ त्यांचे लोकोपयोगी कामे बघितली तरी हे सहज लक्षात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले राज्य हे स्वराज्य, न्यायप्रिय राज्य आणि लोकहितवादी प्रशासनाचा उत्तम नमुना होते. त्यांचे लोकोपयोगी कार्य समकालीन संदर्भांवर आधारित बघूया.

न्यायव्यवस्था: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेस प्राधान्य होते. त्यांचे प्रशासन अन्यायाविरुद्ध कठोर आणि पारदर्शक होते. "जेधे शकावली" आणि "शिवभारत" यांमध्ये उल्लेख आहे की महाराजांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाड्यासाठी पंचायत प्रथा सुरू केली. त्यांनी हक्कांचे रक्षण करताना निष्पक्षता कायम ठेवली, यामुळे रयतेला नवा विश्वास व आधार मिळाला.

शेती व सिंचनव्यवस्था: महाराजांनी शेती आणि सिंचनाच्या सुधारणांवर भर दिला. "बुधभूषण" या ग्रंथात शेतीसाठी तयार केलेल्या कालव्यांचा उल्लेख आहे. त्यांनी पाण्याच्या व्यवस्थित व्यवस्थापनासाठी तलाव बांधले व जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले. जमिनीचा उपयोग योग्य प्रकारे व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी जमिनीच्या मोजणीची प्रथा सुरू केली. त्यामुळे शेती उत्पादन वृद्धिंगत होऊन लोकांचे जीवनमान सुधारले.

व्यापाराला प्रोत्साहन: महाराजांनी अंतर्गत आणि परदेशी व्यापाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आरमारी ताफ्याने समुद्रमार्गे व्यापाराच्या संधी निर्माण केल्या. "शिवभारत" ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी व्यापारी बांधवांना संरक्षण दिले आणि व्यापाराच्या अडचणी दूर केल्या. त्यांनी कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून व्यापारी दृष्टिकोनातून राज्याची आर्थिक ताकद वाढवली.

कर नाही तर लोकवर्गणी: "जेधे शकावली" मध्ये असाही उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत लोकवर्गणी महत्त्वाची होती. लोकांना कररूपी बोजा न लादता गरजेनुसार वर्गणी मागितली जायची. यातून उभारलेले सगळे संपत्ती व संसाधने लोकांसाठी वापरण्यात आली. यामुळे प्रजेचा शासनावर विश्वास वाढला.

सुरक्षेचे मजबूत जाळे: महाराजांनी गडकोटांच्या माध्यमातून फक्त संरक्षण नव्हे, तर गावांमधील लोकांना आसरा आणि मदत पुरवली. "शिवभारत" ग्रंथात उल्लेख आहे की त्यांच्या गडांच्या योजनांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नसाठा आणि संकटसमयी संरक्षक उपायांची सोय असायची. गडांवरील प्रबळ व्यवस्थापनामुळे प्रजेचा सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

सांस्कृतिक / धार्मिक वारसा: शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवत ते कायम जपले. "बुधभूषण" मध्ये नमूद आहे की त्यांनी देवस्थानांची काळजी घेतली आणि मुस्लिम वा ख्रिश्चन लोकांकडून होणारे मंदिरांचे विध्वंस थांबले.

केवळ हे कार्य बघितलं तरी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजा कल्याणाच्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला होईल. त्यासाठी कुण्या औरंगजेब वा अफझलखानासोबत तुलना करण्याची गरजच नाहीये.

आपण आता मध्ययुगीन व्यवस्थेत नाही. पण औरंगजेबाला मानणारे अजूनही त्याच मध्ययुगीन मानसिक अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ "कबर नको" एवढं म्हटलं की थेट संघाच्या मुख्यालयाच्या जवळ सुनियोजित हल्ला केला.

म्हणूनच उत्तर आवश्यक आहे आणि तेही आजच्या कायद्यात. त्यामुळे अफझलखानाचं थडगं ज्याप्रमाणे वनकायद्याने हटवलं त्याचप्रमाणे औरंगजेबाचं थडगं ASI च्या कायद्यात घालून मूळ अवस्थेत तरी नेऊन ठेवलं पाहिजे.

- ज्ञानेश

Tuesday, December 24, 2024

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

नोव्हेंबर महिन्यात आम्ही अयोध्येत गेलो होतो. प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले. तिथे कारसेवक पुरम मध्ये योजना चमू (managment team) कडून मंदिराची अचंबित करणारी माहिती मिळाली. ती माहिती आपणा सर्वांसाठी देत आहे 
- ज्ञानेश

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

थोडक्यात पूर्वइतिहास
राम मंदिरासाठी हिंदू समाज गेली ५०० वर्षे लढत होता. पण निर्णायक चळवळ १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाली. १९९०च्या दशका मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बैठकी झाल्या, ज्यामध्ये चळवळ ही केवळ राजकीय नसून सामाजिक असावी असे ठरविण्यात आले. कारण ही जनसामान्यांना आपली चळवळ वाटली पाहिजे. त्यानुसार विश्व हिंदू परिषदेला चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी निवडले गेले.

यात १९८७ ला गंगा यात्रा आयोजित करण्यात आली, त्यानंतर १९८९ ला रामशिला पूजन झाले. लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपापल्या गावांतून राममंदिरासाठी भक्तिभावाने विटा पाठवल्या. १९९० ची अडवाणींची रथ यात्रा एक गेमचेंजर म्हणावी अशी घटना होती. त्याची परिणिती १९९२ ला बाबरी ढाचा पाडण्यात झाली. एक मोठा कलंक हिंदू समाजाने मिटवला. ढाचा पडल्यानंतर, त्याच ढिगावर पूजेसाठी एक तात्पुरता मंच,कापडी तंबू तयार करण्यात आला.

अलाहाबाद न्यायालय २०१० व नंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हिंदू समाजासाठी जमीन निश्चित केली. श्री रामजन्मभूमी न्यास निर्माण केला गेला (फेब्रू २०२०). मंदिराच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात झाली ती ५ ऑगस्ट २०२० रोजी. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं.

अभियांत्रिकी
इथून पुढे श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि त्यातील रोचक अभियांत्रिकी गोष्टी आहेत...

अशोकजी सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची रचना दोन मजली केली होती. पण आता जागा पुरेशी मिळाली. २०२१ जानेवारी ते मार्च, रामभक्तांनी भरभरून निधीही जमा केला. त्यामुळे मूळ २ मजली ऐवजी मंदिर ३ मजली, त्यावर शिखर करावे असा प्रस्ताव आला. तो मान्यही झाला.

मंदिराच्या भरभक्कम पायासाठी भारतातील अनेक अभियांत्रिकी संस्था, आयआयटी, NGRI  ह्यांनी मदत केली आहे. बांधकामासाठी तज्ञ संस्था L&T, TCE, Architects आहेत.

मंदिर नागर शैलीतील आर्किटेक्चरमध्ये डिझाइन केले आहे. यात परकोटा महाद्वार, मंदिर सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप, प्रार्थना मंडप आणि गर्भगृह यांसारख्या अनेक मंडपांचा समावेश आहे. प्रत्येक मंडपातील स्तंभांवर दशावतार, शिवपुराण, भागवत पुराण इ कथांतील मूर्ती चितारल्या आहेत.

तळमजला आणि श्रीरामाची मूर्ती २२ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण झाली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली. त्यानंतर पहिला मजला गेल्या दिवाळी २४ मध्ये पूर्ण झाला. दुसऱ्या मजल्याचं काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजित आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत कधीही प्रोजेक्ट प्लॅनमध्ये कमी अधिक बदल अथवा उशीर झालेला नाहीये !!! 

सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष
श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायासाठी सुमारे ५५-६० फूट खोल खोदकाम केले. या खोदकामात प्राचीन काळातील अनेक मंदिरांचे अवशेष सापडले, ज्यांचा इतिहास इसवी सन पूर्व १३०० पर्यंतचा आहे. याचं कार्बन डेटिंग केलेलं आहे आणि मंदिर कार्यालयात त्याचे सर्व पुरावेही उपलब्ध आहेत. खोदकामादरम्यान, विविध काळातील मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभाग व रामजन्मभूमी न्यास यांना सापडले आहेत. यामध्ये बाराव्या, सातव्या शतकातील व तत्पूर्वी विक्रमादित्य, तसेच मौर्याच्या काळातील मंदिराचा समावेश आहे. तसेच, याबद्दलचे विविध शिलालेख आणि पुरावे सापडले, ज्यामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख होते.

या शिलालेखांमध्ये त्या काळातील राजे आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे एक पुरातत्त्वीय महत्त्व आहे. या शोधामुळे अयोध्येत आजपासून सुमारे ३४०० वर्षांपासून श्रीरामाची पूजा होत होती. अतिशय नीटनेटकी मंदिरेही होती. म्हणजे पुरुषोत्तम श्रीराम आणि त्यांचा इतिहास, म्हणजेच भारतवर्षाचा इतिहास हा किती पुरातन आहे याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच हे अवशेष भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत.

अर्थात हे पुरावे जगासमोर येतीलच. त्यासाठी जरा वाट बघावी लागेल. कारण आधी मंदिर पूर्ण व्हायचे आहे. या प्राचीन अवशेषांचे जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी संग्रहालयाची योजना आहे. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शिक्षणाचे साधन ठरतील.

श्रीराम मंदिराचे तंत्रज्ञान
५५-६० फूट खोल खोदल्यानंतर हा सगळा खड्डा भरला. त्यावर ३ मजली दगडी मंदिर (३७०' लांब, २७०' रुंद, १६१' उंच) उभं राहणार, ते किमान १००० वर्षे टिकलं पाहिजे. त्यामुळे पायाभरणीमध्ये ग्रॅनाइट आणि विशेष काँक्रीटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मंदिराच्या दीर्घायुष्यासाठी दगडांना इंटरलॉक करण्यासारख्या विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला. त्यावर ग्रॅनाइटचे दगड ठेवले आहेत. पायाभरणीसाठी एकूण १७,५०० ग्रॅनाइट दगड वापरण्यात आले. यावरून पायाच्या वजनाचा आणि मजबुतीचा अंदाज येऊ शकेल. 

तांबडे दगड स्थिर राहावेत आणि अनेक वर्षे टिकावेत म्हणून तांब्याच्या क्लिप्सचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. त्यानंतर काँक्रीटचे ४८ थर आहेत. प्रत्येकी १ फूट जाड, त्यांना २० टन रोलरने कॉम्पॅक्ट केले गेले. यानंतर १० फूट जाड विशेष काँक्रीटचा दुसरा थर टाकण्यात आला. यावर ३५ फूट जाड काँक्रीटचा तिसरा थर टाकण्यात आला. ग्रॅनाइट दगड पिन-लॉक प्रणालीचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलं. बांधकामात वापरलेल्या प्रत्येक दगडाला टॅग केले जाते. यामुळे दगडांचे अचूक ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन शक्य होते, ज्यामुळे प्रत्येक तुकडा योग्यरित्या ठेवला जातो.

पुरातन नागर शैली, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अनोखा संगम या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो ❤️

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर यापुढील काळात श्री वाल्मिकी रामायणातील प्रसंग व मूर्ती, तसेच ब्राँझ म्युरल्स होतील.

हे मंदिर आपला सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. हे लाखो भक्त आणि पर्यटक आजही इथे येतात. रोज जवळपास १ लाख भक्त मंदिराला भेट देतात. दैनंदिन सुगम दर्शन पास आणि आरतीचे पास वेबसाईट वर उपलब्ध आहेत. फक्त वेळेत बुकिंग केलं गेलं पाहिजे. 

आपण आश्चर्यचकित व्हावं अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत. श्रीरामाची कृपा आपणा सर्वांवर व्हावी आणि लवकरात लवकर सर्वांना दर्शन व्हावे अशी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🙏

।। जय श्रीराम ।।

Thursday, July 25, 2024

पुस्तक परिचय - विनाशपर्व

 इंग्रज अतिशय म्हणजे अतिशय कायदेप्रिय होते. त्यांनी एकूणएक गोष्ट कायद्याच्या चौकटीत केली.
- भारतीय नौका उत्तम दर्जाच्या असल्याने त्यांनी भारतीय नौकांच्या वापराच्या विरोधात कायदा करून नौकानयन उद्योग बंद पाडला.
- भारतीय विणकारांचे अंगठे छाटणे ही सामान्य आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी बाब असल्याने ती अमलात आणून विणकर उद्योगाला बंद केलं.
- जनसामान्य आरोग्य, सहज हाती असलेले उपाय करणारी मंडळी, वैदू, लसीकरण करणारे ब्राह्मण-माळी यांना तर सरळ सरळ कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगार घोषित केलं. मग इंग्रजी औषधे आणि लसीकरण यांना मोकळं रान उपलब्ध करून दिलं.
- भारतातील अनेक भागात ८०% हून अधिक असलेली साक्षरता ही गावातील शाळांमुळे होती. ब्राह्मण विद्यार्थीसंख्या ११% ते ३०% असायची. म्हणजे बाकी ७०%-८९% ब्राह्मण नसलेले विद्यार्थी होते. ही सगळी आकडेवारी इंग्रजांच्याच सर्वेक्षणात आहे. शाळेला गावातील जमीन उपलब्ध होती आणि त्यातून शाळेचा खर्च भागत असे. या जमिनी कायद्याने सरकारने घेतल्या. स्थानिक भाषांमधून शिक्षण घेतलेले लोक हे अशिक्षित आहेत हेही घोषित केलं. केवळ इंग्रजी शिक्षण म्हणजेच शिक्षण हे लोकांवर ठसवलं. मग शाळा आपोआप बंद पडल्या. इंग्रज जाताना साक्षरता होती ३%. 
- दुष्काळ असो वा नसो महसूल हा कायद्याने मिळालाच पाहिजे. त्यातून कोट्यवधी लोक मेले तरी पर्वा नाही. कायदा महत्वाचा. इंग्रजांच्या राज्यात ३ कोटी सामान्यजन अशा दुष्काळात मेले. पण ते मरण्यात कोणताही कायदा आड येत नव्हता.
- इंग्रजांनी केलेल्या लूटीतून तर त्यांची कायद्याप्रती असलेली निष्ठा दिसते. जिथे लूट करायची असेल आणि जी लूट करायची असेल त्यासाठी योग्य असेच कायदे निवडले जायचे. नसतील तर तयार केले जायचे आणि मग लूट सुरू व्हायची. अगदी कायद्याने!
असं सगळं काही कायद्याने सुरू होतं. पण वायुसेना, नौसेना आणि थलसेना यांना सुभाषचंद्र बोस आपले (मृत घोषित असले तरीही) नेते वाटायला लागले. आझाद हिंद सेना ही आपली सेना वाटू लागली. त्यामुळे ज्या जीवावर आपण शासन करू शकतो ती सेनाच हाताबाहेर जाईल याची इंग्रजांना खात्री पटली आणि इंग्रजांनी जवळपास एक वर्ष आधीच भारताला अजून एक कायदा करून स्वातंत्र्य दिलं.
असं हे सगळं कायद्याच्या चौकटीत असलेलं इंग्रजांचं शासन संपलं!!!

हे कुठे वाचायचंय - प्रशांत पोळ काकांच्या "विनाशपर्व" या पुस्तकात! नक्की आवर्जून वाचावं असं पुस्तक 🙏

- ज्ञानेश

Friday, July 29, 2022

धुरंधर - नानासाहेब पेशवे!

 आपल्या पाठ्यपुस्तकांनी मोगल इतिहास भरभरून सांगितला. शिवरायांचा इतिहास मोडून सांगितला. पुढे संभाजी महाराज ते दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे हार मानली हा कालखंड पूर्ण वगळला. मग हा इतिहास आपल्यापुढे अनेक इतिहासकारांनी तर मांडलाच पण कादंबरी रूपात लेखकांनी तो सोपा करून आपल्यापुढे आणला. त्यात छावा, राऊ, पानिपत आणि स्वामी ही पुस्तके विशेष गाजली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अंगार चेतवला, त्याचा वणवा केला बाजीरावांनी. त्यात मोगल पूर्ण भरडले गेले. पण दुर्दैवाने बाजीराव वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवर्तले. नंतर नानासाहेबांनी पेशवाई सांभाळली, पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात पानिपत झालं. तरीही पुढे माधवरावांच्या कारकिर्दीत केवळ दहा वर्षांत संबंध भारतभर मराठेशाही नांदू लागली. आजोबा बाजीराव आणि नातू माधवराव यांचं कार्य अतुलनीय होतं. त्या कार्याला सामान्यांच्या मनात पोहोचवलं राऊ आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांनी. पण या दोघांच्या मधला वीस वर्षांचा कालखंड कुणी कादंबरी रूपात कधी मांडला नव्हता. ते काम तरूण इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे याने केलं आहे.
कौस्तुभचं हे पुस्तक जाहीर झालं आणि लगेच मागवलं. पण माझ्या हाती येऊन वाचून पूर्ण व्हायला जरा वेळ लागला.
अगदी खरं सांगतो - मला नानासाहेब हे याआधी केवळ पानिपत पुरते ठाऊक होते. त्यातही त्यांनी पानिपतच्या धामधुमीत केवळ ९ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आणि गोविंदपंत बुंदेल्यांना नाटकशाळा पाठवा म्हणून पत्र पाठवलं (दोन्ही गोष्टी पानिपत कादंबरीत वाचल्या) एवढं माहित होतं. याशिवाय त्यांनी कसं मराठा आरमार बुडवलं वगैरे गोष्टी ऐकीव माहित होत्या. पण त्यांच्यावर खूपच कमी लेखन झालं आहे आणि जे झालंय ते त्यांच्यावर अन्याय करणारं आहे... वाईट गोष्ट अशी की ज्या राघोबाने पानिपतची जबाबदारी टाळली, कोवळ्या माधवरावांना पेशवाई मिळाल्यापासून त्रासच दिला, नारायणरावांना मारेकरी घालून मारलं, अश्या माणसावर "राघोभरारी" ही ऐतिहासिक कादंबरी अनेक वर्षांपूर्वीच निघाली. पण नानासाहेबांवर एकही कादंबरी निघू नये हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता. 
मागच्या वर्षी नानासाहेबांच्या कार्यावर श्री उदय कुलकर्णी यांचा इंग्रजीतून शोधग्रंथ आला आहे, त्याचं मराठी भाषांतरही अशात आलं आहे. खाली मध्ये दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स आहेत.
असं असलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा कादंबरीतून लवकर कळतं. हे काम कौस्तुभने केलं आहे. 

नानासाहेबांना पेशवे म्हणून काम करताना सुरुवातीपासून अनेक प्रकारची संकटे/आव्हाने आली. त्यांनी ती आपल्या अतुल्य राजकीय आणि सामरिक बुद्धीने लीलया पेलली आणि परतवली. सुरुवातीला बाजीरावांना पेशवाई मिळताना जी राजकारणं झाली ती नानासाहेबांनाही चुकली नाहीत. उत्तरेत मोठी स्वारी झाली. ज्या माळव्याच्या सनदा बाजीरावांच्या वेळेपासून मिळायच्या बाकी होत्या त्या नानासाहेबांनी मिळवल्या. त्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मुलुखगिरी केली. त्यातही रघुजींच्या विरोधात सेना उतरवली म्हणून अनेक प्रवाद निर्माण झाले. ते सगळे छत्रपती शाहूंच्या समोर खासगीत संपुष्टातही आणले. पुढे राजपुतांच्या गादीवरून शिंदे आणि होळकर यांच्यात सुद्धा काही काळ वितुष्ट आले. तेही राजपूत आणि शिंदे-होळकर यांना समजुतीत घेऊन संपवले. शाहू महाराजांनी अचानक पेशवाई काढून घेतली तेव्हा काही महिने नानासाहेब सातारच्या बाहेर राहुट्यांमध्ये राहिले. जोवर महाराजांचा पूर्ण विश्वास पूर्ववत होत नाही तोवर शांतपणे वाट पहिली आणि शाहूंनी घेतलेली परीक्षा उत्तीर्ण झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या न राहता एकच गादी असावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कोल्हापूरचे संभाजी राजे बाजीरावांच्या काळात निजामाला जाऊन मिळाले होते. तरीही तो राग न धरता या दोन गाद्या एकत्र होऊन एक मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी दत्तक विधान करताना संभाजी महाराजांना दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पण ते झालं नाही. नंतर सदाशिवरावांना कोल्हापूरची पेशवाई देऊन किमान या दोन गाद्यांमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही ही तजवीज करून ठेवली. आपण छत्रपतींचे सेवक आहोत आणि थोरल्या शिवप्रभूंचे अनुयायी आहोत हे सतत दाखवून दिलं. त्यासाठी काशी, मथुरा आणि अयोध्या ही क्षेत्रे सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही प्रयत्न आपल्याच लोकांच्या घाबरण्यामुळे मागे पडले तर काही वेळा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र "काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधू मुक्त करा" हे महाराजांचे शब्द कधीच विसरले नाहीत. 
राज्यकारभारात आणि एकूण महसूल, मोजणी या सगळ्यात सुसूत्रता आणली. जे करायला बाजीरावांना कधी वेळ मिळाला नाही अश्या अनेक गोष्टी केल्या. शनिवारवाडा बिना तटबंदीचा होता. त्याची तटबंदी पूर्ण केली. दरवाजा मुद्दाम उत्तरेला ठेऊन दिल्लीवर आमची नजर आणि सत्ता दोन्ही आहे हे दाखवून दिले. कात्रजच्या तलावातून पुण्यात सर्व मोठ्या घरांमध्ये पाणी फिरतं ठेवलं. आजही तो नळ सुरु आहे.
कुटुंबात सदाशिवरावभाऊंना राज्यशिक्षणासाठी सातारला ठेवलं. गुरूंना सतत सन्मान दिला. बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेबांचा मुलगा कृष्णा - समशेर बहाद्दर - याला कधीच अंतर दिलं नाही. त्याची वाढ आणि शिक्षण याकडेही लक्ष पुरवलं. विक्षिप्त राघोबांना सांभाळलं. विश्वासराव आणि माधवरावांवरही सतत लक्ष ठेऊन त्यांचंही शिक्षण सुरू राहील हे बघितलं. 

एक ना अनेक कित्येक गोष्टींनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. अब्दाली पहिल्यांदा आला तेव्हा मराठा सैन्य तिथे पोहोचण्याच्या आधीच तो परत फिरला होता. दुसऱ्यांदा आल्यावर मात्र तो पुन्हा जिवंत जाऊ नये यासाठी पेशव्यांच्या घरातून कुणी जबाबदारी घ्यावी यावर ते ठाम राहिले. त्यांची स्वतःची तब्येत साथ देती तर तेच रणांगणावर असते. परंतु ते व्हायचे नव्हते. त्यांच्या जागी राघोबा जावेत म्हणून प्रयत्न झाला. मात्र राघोबा गेले नाहीत. ती जबाबदारी घेतली त्याच्या लाडक्या सदोबाने. पानिपत हारूनही अब्दालीने हिंदुस्थान मराठ्यांच्या हवाली केला. ही मराठ्यांची ताकद होती. ती कमावली बाजीरावांनी तर वाढवली नानासाहेबांनी. भाऊ आणि नाना ही जोडी अगदी चिमाजी आणि बाजीरावांचीच असावी अशी होती. त्यामुळे विश्वासराव गेले त्याहूनही अधिक दुःख त्यांना भाऊ गेल्याचं झालं. स्वतः विश्वासरावसुद्धा पत्रात म्हणाले होते की, "आमच्या सारखे पुत्र तुम्हाला पुन्हा मिळतील पण भाऊंसारखा भाऊ मिळणार नाही" भाऊ गेल्याने नानासाहेब खचले आणि त्यातच त्याची अखेर झाली.

कादंबरी रसाळ आहे. भाषा ओघवती आहे. त्यात सनावळ्या नाहीयेत. मात्र कौस्तुभ "पुराव्यानिशी शाबीत" करण्याजोगे नसेल तर लिहीत नाही. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. कित्येक ऐतिहासिक कागदपत्रे वाचून, समजून घेऊन, त्यांची संगती लावून ही कादंबरी लिहिली गेली आहे. केवळ तिशीत असताना कौस्तुभ ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. त्याच्या अनेक कादंबऱ्या याव्यात, पुस्तके यावीत आणि आम्हाला वाचायला मिळावीत ही प्रार्थना. 

आज बाबासाहेब पुरंदरेंची जयंती! कौस्तुभला त्यांचे आशीर्वाद सतत मिळाले आहेत. बाबासाहेबांचं बोट धरून तो त्यांच्या वाटेवरून चालतोय. खूप शुभेच्छा!

- ज्ञानेश 

धुरंधर - पेशवा नानासाहेब
लेखक - कौस्तुभ कस्तुरे 
प्रकाशक - कौस्तुभ कस्तुरे बुक्स 
पाने - ४४०
किंमत - र ४५०

धुरंधर: https://www.amazon.in/Dhurandhar-Peshwa-Nanasaheb-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/dp/9355932235/ref=sr_1_4?qid=1659104818&refinements=p_27%3AKaustubh+Kasture&s=books&sr=1-4

The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa - https://www.amazon.com/Extraordinary-Epoch-Nanasaheb-Peshwa/dp/8192108058
भाषांतर - https://www.amazon.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-Nanasaheb/dp/8192076911/ref=sr_1_1?qid=1659097948&refinements=p_27%3AUday+S.+Kulkarni&s=books&sr=1-1

Monday, August 30, 2021

कर्ण

हॅरी - आपण आत्ता कुठे आहोत?

प्रोफ. डम्बलडोर - तुला काय वाटतंय?

हॅरी - मला वाटतंय की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. फक्त इथे गर्दी नाहीये, स्वच्छता जास्त आहे...

प्रोफ. डम्बलडोर - अच्छा...

हॅरी - आता मला परत जावे लागेल ना?

प्रोफ. डम्बलडोर - ते तुझ्या निवडीवर अवलंबून आहे.

हॅरी - म्हणजे मला ठरवता येईल?

प्रोफ. डम्बलडोर - मी तुला खूप आधी सांगितलं होतं की तू किंवा कुणीही जे काही आहात ते निवडीवर अवलंबून आहे. कुणाचीही निवड ही क्षमतेहून अधिक महत्वाची असते. यासाठी तुला एक गोष्ट सांगतो.

तुला महाभारत माहित आहे. तुझ्या अभ्यासक्रमात होतं... त्यात एक पात्र होतं - कर्ण! तो कुंतीचा पुत्र होता. विवाहाच्या आधी झालेला होता. त्यामुळे कुंतीने त्याला त्यागले होते. त्याला वाढवले एका सारथी कुटुंबाने. राधेने त्याचा स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे सांभाळ केला. त्याची दुर्योधनाशी मैत्री झाली. जेव्हा तू, रॉन आणि हर्मायनी यांच्यातील कुणी चूक करत असेल तर अन्य दोघे, किमान एकजण ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? यालाच निवड म्हणतात. मैत्री अशीच असली पाहिजे. पण कर्णाने कधीही दुर्योधनाला वाईट वागण्यापासून थांबवले नाही. दुर्योधनाने जेव्हा भीमाला विष दिले, तेव्हा तर कर्ण आणि अर्जुन यांच्यातील तीव्र स्पर्धा सुरू व्हायची होती. भीमावर केलेल्या विषप्रयोगाला त्याने थांबवले नाही. पांडवांना जाळून मारावे म्हणून लाक्षागृहात पाठवले, चुकीच्या पद्धतीने द्यूत खेळले, द्रौपदीची विटंबना केली, विराट राजाच्या लहानश्या राज्यावर आक्रमण केलं, पांडवांकडून पाच गावांचा प्रस्ताव कृष्णाने आणला तोही नाकारला. युद्धात अभिमन्यूला अनेकांनी मारलं. तो निःशस्त्र झाला होता तरीही कर्णाने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कर्ण, जेव्हा अर्जुन त्याला निःशस्त्र असताना मारत होता तेव्हा नियमांची ग्वाही देत होता. जेव्हा मैत्री करता तेव्हा ती निभावता आली पाहिजे. निभावणे म्हणजे प्रत्येक बाबतीत सोबत असणे नव्हे, तर मित्राला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे मैत्री. हीच ती निवड.

हॅरी - बरोबर. पण किमान तो मैत्री निभावताना दुर्योधनाच्या सोबत तर राहिला ना?

प्रोफ. डम्बलडोर - नाही ना... त्याचा अहंकार मैत्रीच्या वर होता... जेव्हा रॉन जखमी होता तेव्हा त्याला तू आणि हर्मायनी सगळे निर्णय घेत आहात आणि त्याला साईडलाईन केलं जातंय असं वाटलं. त्याचा अहंकार, मैत्री आणि प्रेम दुखावलं गेलं. तो निघून गेला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे. तेव्हा तुमचा काहीही पत्ता नसताना रानोमाळ तो तुम्हाला शोधत फिरला आणि जेव्हा ते लॉकेट फोडायचे होते तेव्हा तो तुझ्यासोबत होता. पण कर्णाने काय केलं... दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई तो पहिले १० दिवस लढलाच नाही. कारण त्याला भीष्म म्हणाले की तू अर्धरथी आहेस. हा त्याला अपमान वाटला. त्यामुळे जोवर भीष्म सेनापती आहेत तोवर त्याने लढाईत भागच घेतला नाही.

हॅरी - पण त्याच्यावर लहानपणापासून अन्याय झाला. त्याला आयुष्याच्या सर्वात मोठ्या लढाईच्या वेळी वाटणारच ना, की त्याला महारथी म्हणावे...

प्रोफ. डम्बलडोर - अन्याय कुणावर झाले नाहीत... माझं आयुष्य तुला आता बरंच कळालं आहे. मी, माझा भाऊ, बहीण, आई... कितीतरी कठीण गोष्टी होत्या. त्या सर्व मागे ठेऊन योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. नियतीने तुझ्यावरही किती अन्याय केलाय. तू वर्षाचा होतास तेव्हा आईबाप गेले. मावशीने सांभाळ केला, तोही नाईलाजाने. शाळेत तुला काही चांगले, प्रेम करणारे शिक्षक भेटले तर काही सदैव भीती घालणारे, तुझा अत्यंत द्वेष करणारे भेटले. मित्र भेटले, सोबतच वैरीही भेटले. माझ्यासारखा तुला निव्वळ एक शस्त्र म्हणून तयार करणारा हेडमास्तर भेटला... हे होऊनही तू आज माझ्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने बोलत आहेस. ज्याने तुझ्याशी सदैव वैर पत्करलं, जो माझ्या मृत्यूला एका अर्थाने कारणीभूत झाला, त्या ड्रेकोला तू काही तासांपूर्वी मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलंस... या सगळ्या तुझ्या निवडी होत्या आणि त्यातूनच तुझं चारित्र्य दिसून येतं. कर्णाला तर उदाहरण म्हणून कृष्ण होता. त्याच्यावरही नियतीने कितीतरी प्रकारे अन्याय केला आणि तरीही तो न्यायाच्या, नीतीच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्यामुळे हॅरी, हे कायम लक्षात ठेव की एखाद्या व्यक्तीची क्षमता तिचं चारित्र्य ठरवत नाही तर त्या व्यक्तीची निवड तिचं चारित्र्य ठरवते. त्यामुळे तुला निवड करायची आहे. तू आता काय करणार?

हॅरी - मला ठरवावे लागेल...?

प्रोफ. डम्बलडोर - हो

हॅरी - माझ्यापुढे पर्याय काय आहेत?

प्रोफ. डम्बलडोर - तू आत्ताच म्हणाला होतास ना की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. त्यामुळे परत जाण्याचं ठरवलंस तर परत जाऊ शकशील, किंवा तू जर ठरवलं इथे थांबायचं तर असं समज की एक ट्रेन येईल आणि तुला घेऊन जाईल

हॅरी - कुठे?

प्रोफ. डम्बलडोर - पुढे...




Monday, August 2, 2021

मेकेलीन - पूर व्यवस्थापन

आमच्या मेकेलीनची दैलं (Dijle) नदी बेल्जियमच्या वालोनिया या डोंगराळ प्रांतात उगम पावते. तिथून थोडं पुढे आलं की वालोनिया आणि फ्लॅण्डर्सची सीमा होते आणि मग सपाट फ्लॅण्डर्समध्ये सावकाश वाहते. अनेक लहान मोठ्या गावातून, बाहेरून वळणं घेत घेत ल्यूवन या विद्यापीठाच्या गावाबाहेरून मेकेलीनमध्ये येते. एवढ्या सगळ्या प्रवासात सर्वात मोठं गाव मेकेलीन. सगळी मिळून नदी ८०-९० किलोमीटर. बेल्जियम मध्ये सगळ्याच नद्यांच्या काठांना उंच करून दोन्ही तीरांवर सायकल रस्ता केलेला असतो. तसा तो दैलंला पण आहे. साधारण २० मीटर खोल पात्र, दोन्ही सायकल ट्रॅकमध्ये ४०-५० मीटर अंतर, म्हणजे पात्राची जास्तीत जास्त रुंदी ५० मीटर. अशी छोटीशीच नदी. तरीही दोन्ही किनाऱ्यांवर उत्तम शेती, पशुपालन असलेली. नदी छोटी असली, तरी पाणलोट क्षेत्र डोंगरात आहे. पुढेही लहान मोठे ओहोळ या नदीला भेटतात. शिवाय बेल्जियम मध्ये एकदा पाऊस सुरू झाला की पडsssत राहतो. त्यामुळे नदीला पूर येणं फार काही विशेष नाही. पात्राची रुंदी जास्त नसल्यानेही नदीचा वेग जास्त पाऊस झाल्यास बराच वाढतो आणि सखल भागात पूर येतो. मेकेलीन हे गाव या नदीच्या किनाऱ्यावर दुतर्फा आहे.
मेकेलीनमध्ये मोठं बांधकाम आधीही झालेलं होतं. सन १२०० ते १५२० मध्ये संत रॉम्बाऊट्स कॅथेड्रल (आम्ही याला रामभाऊ म्हणतो) बांधलं गेलं. (राजाला याच्या पायऱ्यांवरून चंद्रावर जायचं होतं. पण चंद्र हळूहळू जास्त वर गेला आणि मग बांधकाम थांबवलं). नंतर २०० वर्षांनी ल्यूवन कालवा बांधला (याबद्दल पुढे लिहितो) त्यामुळे छोटासा बायपास बांधणं फार काही अवघड नव्हतं. मेकेलीनच्या थोडं आधी नदीला एका वळणावर बायपास दिला. दोन्हीकडे बंधारे घातले. बायपास चांगला खोल ठेवला. तेव्हाच्या मेकेलीनला चहूबाजूंनी भिंत होती आणि त्यापलीकडे खंदक. याच खंदकाचा उपयोग करून हा बायपास बांधला आणि जिथून अँटवर्प शहरासाठीचा जलमार्ग सुरू होतो तिथे पुन्हा मूळ नदीला जोडला. हे सगळं पूर्ण केलं १८९३ ते १९०४च्या दरम्यान. आधीपासून खंदक असल्याने कदाचित सोपं गेलं असेल. पण खंदक अधिक खोल करताना यात लोहयुगीन वस्तू आणि लाकडी होड्या सापडल्या. त्या अर्थातच जतन करून ठेवल्या आहेत. आता या भिंतीच्या आणि बायपासच्या मध्ये मेकेलीनचा रिंग रोड आहे. त्यामुळे पंधराव्या शतकापासून असलेले नकाशे आणि आत्ता गुगलमॅप वरील नकाशा यात फार फरक जाणवत नाही. हा बायपास झाल्यापासून गेल्या शंभर सव्वाशे वर्षात नदीने कधीच मेकेलीनला वाहून नेलं नाही.

पण निव्वळ बायपासने पूर थांबत नसतात. पाण्याला जशी वाहून जाण्यासाठी जागा हवी, तशी गती कमी करण्यासाठी पण जागा लागते. जर नदीचा जोर प्रचंड वाढला तर मूळ नदी आणि बायपास नदी या दोन्हीवरील बंधारे नदी सहज तोडू शकते. यासाठी इथे पाणथळ आहेत. ते आधीपासून आहेत, की नंतर तयार केले याची माहिती मिळाली नाही. त्यातील एक आहे मेकेलीन शहराच्या आधी, बायपासच्या थोडासा आधी. याचं नाव मेकल्स ब्रूक. इथे दोन तळी आहेत आणि मोठ्या भागात चर आहेत. नदीचे पाणी जास्त झाले तर नदी आणि हे पाणथळ यातील दरवाजे उघडून पाण्याला पसरायला जागा दिली जाते. पाणी पसरलं की वेग कमी होणारच. या दोन तळ्यांपैकी एकाचा पूर्ण कमर्शियल उपयोग करून दि नेकर नावाचे स्पोर्ट्स सेंटर तयार केले आहे. मात्र दुसरे तळे आणि पाणथळ यात माणसांना मज्जाव आहे. थोडेफार रस्ते आहेत, पण केवळ चालत जाता येईल असेच. तेही अत्यंत आतपर्यंत नाहीत. त्यामुळे इथे माणूस नावाच्या प्राण्याचा वावर अत्यंत मर्यादित असतो. अर्थातच अन्य प्राणी-पक्षी सुखाने नांदतात.

असंच दुसरं पाणथळ आहे जिथं झिनं आणि दैलंचा संगम होतो त्याच्या अलीकडे. ही झिनं नदी वालोनिया प्रांतात नास्त नावाच्या गावाजवळ उगम पावते आणि सुमारे १०० किमी प्रवास करून दैलंमध्ये विलीन होते. इथे नदीच्या एका बाजूला तळं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणथळ. तळं नदीला जोडलेलं नाहीये. पाणथळ मात्र ५-६ दरवाजांना जोडलेलं आहे. या पाणथळात तर माणसांना पूर्ण मज्जाव आहे. रस्ताच दिलेला नाही. जायचं असेलच तर चिखलात जावे लागेल अशी पूर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे आत राजहंस, बदकांचे अनेक प्रकार, पाणकोंबड्या, पाणकावळे आणि कितीतरी पक्षी, मासे, बेडकं... खूप असतात. हिवाळ्यात प्रवासी पक्षीही बरेच येतात. याच संगमावरून ल्यूवन कालवा सुरू होतो. इथे पाणथळ असल्यामुळे पाणी कालव्यात वाढत नाही, आणि वाहूनही जात नाही. अतिरिक्त पाणी साठते, गरज असेल तेव्हा तेच नदीत सोडता येते.

आता आमचं जे #पाण्याकाठचंघर होतं, त्या पाण्याबद्दल. दैलं आणि झिनं यांच्या संगमावरून ल्यूवनकडे जाणारा कालवा केला आहे. १७५२ मध्ये हा कालवा पूर्ण केला गेला (१७६०-६१ मध्ये मराठ्यांना यमुना वेळेत ओलांडता आली नव्हती, त्याच्या आधी ८-९ वर्षे हा कालवा तयार झाला...). ५० मीटर्स रुंद आणि भरपूर खोल असलेल्या या कालव्याने अँटवर्प - ल्यूवन - ब्रुसेल्स हा जलमार्ग तयार करून दिला आहे. हा जलमार्ग अजूनही सुरू आहे. २०-३० कंटेनर्स असलेली जहाजं इथून सहज ये-जा करतात. दिवसाला ७-८ जहाजं जात येत असतात. विशेष म्हणजे हा चढ असलेला मार्ग आहे. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर लाकडी दरवाजे आहेत (अजूनही लाकडीच आहेत). हे दरवाजे दुहेरी आहेत. म्हणजे एक दरवाजा, नंतर १०० मीटर्स जागा आणि पुन्हा दुसरा दरवाजा. जेव्हा जहाज येते तेव्हा एक दरवाजा उघडून जहाज दोन्ही दारांच्या मध्ये घेतात मग मागचं दार बंद करतात. पुढचं दार उघडलं की पाणी जहाजाला वर उचलतं. एका पातळीवर आलं कि जहाज बाहेर जातं आणि दार पुन्हा बंद. परतताना याच्या उलट. दर तीन महिन्यांनी पाणबुडे येऊन तळ तपासतात. मग यातून कधी मोडकी सायकल, मोडकी खुर्ची नाहीतर झाडाची तुटलेली फांदी असं कायकाय बाहेर येतं. मात्र ही शोधमोहीम कितीही थंडी असली किंवा कितीही ऊन असलं तरी सुरू असते. त्यामुळे हा मार्ग अजूनही सुरू आहे.

मागच्या शतकाच्या अखेरीस नदी, कालवा यात मासे जवळपास नव्हतेच. पाणी खूप घाण झालं होतं. नंतर मेकेलीनच्या नगरपालिकेने आणि राजाने पैसे खर्च करून एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. पुढील ४ वर्षात नदी आणि कालवा यांच्यात पुन्हा जीव आला. मासे आले, शेवाळ आलं, त्यामागे बदक, पाणकोंबड्या, बगळे, प्रवासी पक्षी असे सगळे आले. पाण्याचा वास गेला. आमचा घरमालक या कंपनीत कामाला होता. त्याची मुलाखत घेण्याचं या कोविडमुळे जमलं नाही ते नाहीच... कधी तीही माहिती मिळाली तर नक्की सांगेन!

दुहेरी दरवाजा 

बायपास 

बायपास आणि मेकेलीन 

दैलं  

ल्यूवन कालवा 

मेकल्स ब्रुक 

मेकल्स ब्रुक पाणथळ 

कालव्याजवळचे पाणथळ 

पशुधन 

दैलं, झिनं आणि कालवा 


Wednesday, June 9, 2021

स्वयंभू भीम


महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.

संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...

तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.

पहिल्या संकटापासून सुरुवात करू या 
* लाक्षागृह - हवापालट म्हणून कुंती आणि पांडव यांना दुर्योधन आणि शकुनी नवीन महालात पाठवतात. तिथे काहीतरी दगाफटका होणार याची कुणकुण लागते. भीम विदुराच्या मदतीने अंदाज घेतो. तिथून जवळच्या गावात कुठे जाता येईल ते पाहतो. संपूर्ण भुयार एकहाती खोदतो. कौरवांनी आग लावण्याआधीच आई आणि भावंडांना सुखरूप बाहेर काढतो.
* हिडिंब - लाक्षागृहातून बाहेर पडल्यावर ते अरण्यात येतात. त्या अरण्यावर राज्य असतं हिडिंब राक्षसाचं. आपल्या भावंडांना संरक्षण म्हणून भीम प्रत्येक रात्र जागून काढतो आणि हिडिंब जेव्हा हल्ला करतो तेव्हा त्याचा वध करतो. त्याची बहीण जेव्हा मागणी घालते तेव्हा आईच्या संमतीने मोठ्या भावाच्या आधी लग्न करतो. पुढील प्रवास सुखकर करून घेतो.
* बकासूर - संपूर्ण गाव बकासुराचा दहशतीखाली असतं. कुंती विश्वासाने पाठवते केवळ भीमाला. भीम बकासुराला कोणत्याही शस्त्राविना मारतो आणि केवळ आपलं कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव सुरक्षित करतो 
* द्रौपदी स्वयंवर - अर्जुन पण जिंकतो पण त्याचवेळी अनेक राजे विरोधात उभे राहतात. भीम लढण्यासाठी त्याच सभागृहाचा खांब तोडून हातात घेतो आणि युद्ध सुरू होण्याआधीच संपतं 
* द्यूत - जेव्हा द्रौपदीची विटंबना होत असते त्यावेळी भीष्म, द्रोण, कृप आणि सगळे पांडव खाली मान घालून बसलेले असतात. तेव्हा भीम प्रतिज्ञा करतो की, दु:शासनाची छाती फोडून ते रक्त पिईन आणि त्या रक्ताने द्रौपदीला स्नान घालेन आणि दुर्योधनाची मांडी फोडून त्यास ठार करेन. या प्रतिज्ञांनी ज्येष्ठांना जाग येते आणि सुरू असलेली विटंबना थांबते, युधिष्ठिराला गेलेलं राज्य मिळतं 
* वनवास - हे होऊनही पुन्हा युधिष्ठिर द्यूत खेळतो आणि राज्य घालवतो. १२ वर्षांच्या वनवासात जयद्रथ द्रौपदीची पुन्हा विटंबना करू पाहतो. त्यावेळी त्याला पराजित करून आणि अपमानित करूनच भीम थांबतो.
* कीचकवध - अज्ञातवासात कीचक अनेकदा द्रौपदीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. हे युधिष्ठिराच्या समोर घडत असताना केवळ आपण ओळखले जाऊ आणि पुन्हा वनवास नशिबी येईल, म्हणून तो काहीच करत नाही. अखेरीस द्रौपदी भीमाला सांगते. विराट राजाचा साला आणि राज्याचा सेनापती असलेल्या महाशक्तिशाली कीचकाचा भीम केवळ हातांनी वध करतो. तोही असा की कुठेही आवाज जाणार आणि. त्याच्या शरीराचा कणिक मळल्याप्रमाणे गोळा करून भीम त्याला संपवतो. 
* विराट राजासाठी युद्ध - विराट राजाकडे पांडव असल्याची कुणकुण दुर्योधनाला लागते आणि त्याच्या गायी पळवून तो युद्धाची कुरापत काढतो. तेव्हा सर्वच पांडव पराक्रमाने विराटाच्या लहान राज्याला वाचवतात. इथे भीमाने एकट्याने कोणताही पराक्रम केलेला नाही. तरी हा प्रसंग मुद्दाम घेतला. लक्षात घ्या या युद्धाच्या वेळी कर्णाकडे कवच कुंडले होती. त्याचा रथ कुठे जमिनीत अडकला नव्हता. त्याने कुंतीला कोणतेही वचन दिलेले नव्हते. त्याचा सारथी शल्य नव्हता. भीष्म त्याला वाईट बोलले नव्हते. तरीही कर्ण असलेली बाजू हरली! एवढं लक्षात घेतलं तरी "मृत्युंजय"चं भूत मानेवरून उतरेल.
* जरासंध वध - राजसूय यज्ञ आणि त्यानंतर वाढवलेलं राज्य हा सर्वच पांडवांनी केलेला पराक्रम होता. पण याच दरम्यान ज्या जरासंधामुळे कृष्णाला मथुरा सोडून द्वारका वसवावी लागली होती (आणि त्यामुळे कृष्णाचे एक नाव रणछोड आहे) त्या जरासंधाला द्वंद्वयुद्धात भीमाने हरवलं. नुसतं हरवलं नाही तर त्याचे हातांनी दोन तुकडे केले.
* महाभारत युद्ध - 
- सुरू होताना भीमाला कोणतेही प्रश्न पडले नाहीत (अर्थात अर्जुनाला पडले त्यामुळे आपला फायदा झाला :-))
- भीम आणि हिडिंबेचा मुलगा घटोत्कच जेव्हा मारला गेला तेव्हा भीमाने कोणतीही आततायी प्रतिज्ञा घेतली नाही (अर्जुनाने अभिमन्यू मारला गेल्यावर जयद्रथाला सुर्यास्ताच्या आधी मारेन अथवा अग्निप्रवेश करेन अशी प्रतिज्ञा केली होती)
- सर्वच्या सर्व धृतराष्ट्र पुत्रांना भीमाने मारलं. हे करताना कोणतीही बाह्य मदत त्याने घेतली नाही (उदा - शिखंडी, "नरो वा कुंजरो वा", सुदर्शन चक्राने सूर्य झाकोळने...)
- युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा अश्वथाम्याने द्रौपदीच्या पाचही पुत्रांना झोपेत मारलं तेव्हा द्रौपदीचं सांत्वन करणारा पहिला आणि एकमेव भीमच होता.
- दुःशासनाची छाती फोडून त्याचे रक्त प्याला आणि त्याच रक्ताने द्रौपदीला अंघोळ घातली (त्यानंतर द्रौपदीने आपले केस पुन्हा बांधले). दुर्योधनाची मांडी फोडून त्याला मारलं. इथे नियम मोडू कि नको या विवंचनेत तो अडकला नाही. द्रौपदीचे सगळे सूड भीमाने पूर्ण केले.

असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.

Friday, September 4, 2020

पुस्तक परिचय : या सम हा

बाजीराव पेशवे म्हटलं की सोबतच मस्तानी म्हणणं हे कर्तव्य असल्यासारखे लोक बाजीरावांना केवळ मस्तानीसोबत जोडतात. हे आजचं आहे असं नाही. नव्वदच्या दशकात राऊ कादंबरीवर आधारित राऊ याच नावाची मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू झाली होती. त्यात बाजीराव मनोज जोशी होते आणि मस्तानी अश्विनी भावे! साहजिकच अश्विनी भाव्यांना भाव देण्यासाठी असेल पण त्याही मालिकेत मस्तानीचा प्रभाव वाढला होता आणि पराक्रमी बाजीराव झाकोळले गेले होते. संजय भन्साळीच्या सिनेमामुळे "मस्तानीचे प्रेमी" बाजीराव हे "पराक्रमी" बाजीरावापेक्षा मोठे ठरले. बाजीरावांवरील एका कार्यक्रमात मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे सर गेले होते. त्यात पराक्रमी बाजीराव कुठेच न दिसल्याने ते अस्वस्थ झाले. शांतपणे कार्यक्रम सोडून बाहेर आले. पण याच अस्वस्थतेतून "या सम हा" हे प्रचंड अभ्यासपूर्ण पुस्तक तयार झाले.

विसाव्या शतकाच्या आरंभी म्हणजे बाजीरावांनंतर सुमारे २०० वर्षांनी, युद्धतत्त्वांची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली. या युद्धतत्त्वांवर आणि युद्धशात्र शिकवताना जे महान जागतिक युद्धविषयक तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या युद्धनीतीवर बाजीरावांची प्रमुख युद्धे पित्रे सरांनी तोलून दाखवली आहेत. या सर्व युद्धात ज्याला जागतिक मापदंड म्हणता येतील अशा पद्धतीने बाजीरावांनी सर्व युद्धे लढली आणि जिंकली आहेत. या युद्धांमध्ये खांडवा - बाळापूरची लढाई, गुजरात आणि कर्नाटक मधील मोहिमा या सुरुवातीला आहेत. या पुस्तकात सर्वाधिक चर्चा असलेली पालखेडची लढाई आहे. नंतर अमझेरा आणि बुंदेलखंड या लढाया आहेत. स्वराज्यातील आपसातील कलहाचे पर्यावसान म्हणजे दाभाड्यांच्या विरुद्ध केलेली डभईची लढाई आहे. शिवाजी महाराजांपासून सर्वांनी प्रयत्न करूनही हाती न आलेल्या जंजिऱ्याची मोहीम आहे. बाजीरावांनाही जंजिरा जिंकता आला नाहीच पण किमान सिद्दीने मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. ही आर्धी जिंकलेली लढाई सुद्धा आहे. त्यांनंतर बाजीराव दिल्लीच्या दारात जाऊन परत आले त्याची संपूर्ण व्यूहात्मक चर्चा आहे. निजामाला भोपाळच्या किल्ल्यात वेढून पुन्हा गुडघ्यावर आणलं ते आहे. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी केलेली शर्थ आहे आणि शेवटची लढाईत निजामाच्या मुलाला - नासिरजंगला - हरवले ते आहे. या सर्व लढाया/युद्धे याबद्दल लिहिताना पित्रे सर कुठेही बाजीरावांना "आपल्या कादंबरीचा हीरो" म्हणून कोणतीही सवलत देत नाहीत. जी आधुनिक युद्धतत्त्वे मानली गेली आहेत, त्या प्रत्येक कसोटीवर घासून बघतात आणि अखेरीस एक अजिंक्य सेनापती म्हणून बाजीरावांचं सोनं झळाळून उठतं.

ज्या १० आधुनिक युद्धतत्त्वांवर बाजीरावांच्या लढाया तोलून बघितल्या ती तत्त्वे आहेत -
१. उद्दिष्टाची निवड आणि पाठपुरावा
२. सुरक्षितता
३. गतिक्षमता
४. आक्रमक चाल
५. बळाचा मितव्यय
६. बळाचे केंद्रीकरण
७. विस्मयकारकता
८. मनोधैर्य
९. सहकार्य
१०. युद्धव्यवस्थापन
पालखेडच्या लढाईवर या पुस्तकात ३ प्रकरणे आहेत. वरील प्रत्येक पैलू त्यात तोलून बघितला आहे. उदा: निजामाला पूर्ण मात हे उद्दिष्ट होतं, त्याचाच पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी शाहूंनी माघारी बोलावल्यावरही त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करून, बाजीराव माघारी आले नव्हते. सहा महिने बाजीराव निजामाला आपल्या मागे लागण्यासाठी उद्युक्त करत होते. निजाम त्यांना गाठण्याआधीच पुढील टप्प्यावर पोहोचत होते. जेव्हा निजामाने बाजीराव आपल्या पकडण्याच्या बाहेर गेले आहेत असं वाटून माघारीची वाट धरली तेव्हाच बाजीरावांनी औरंगाबादवर चढाई केली आणि निजामाला पुन्हा बाजीरावांच्या मागे जावं लागलं. बाजीरावांकडे मुख्यतः घोडदळ असायचे. त्यामुळे गती, कमीत कमी बळाचा वापर आणि व्यवस्थापनात बुणग्यांची कोणतीही सोय करावी लागत नसे. पालखेडच्याच लढाईत निजामाचा तोफखाना हा युद्धक्षेत्रापासून काही किलोमीटर दूर अडवून ठेवला आणि बिना दात/पंजे असल्याप्रमाणे निजामाचे मनोधैर्य खच्ची केले. बाजीराव हे बारगिरांचे सेनापती होते. ते कायम आपल्या सैन्यात एका सैनिकासारखे वावरत. यामुळे त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य कायम उच्च असे. अनेक लढायांमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांचे निर्णय हे शिंदे, होळकर, पवार, चिमाजी आणि अन्य सरदार घेत. मात्र मूळ आराखडा बाजीरावांचा असे. त्यामुळे सैन्य विखुरलेले असताना केव्हा एकत्र करायचे आणि एकत्रित हल्ला करायचा याचे गणित पक्के असायचे.

या युद्धतत्त्वांशिवाय सुन्त्झू या चिनी युद्ध तत्त्वज्ञाने अडीच हजार वर्षांपूर्वी "द आर्ट ऑफ वॉर" नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील तत्त्वे आजही जगन्मान्य आहेत. याही कसोटीवर बाजीरावांची युद्धे तपासून पाहिली आहेत. यातील मुख्य बाबी -
१. न लढताच जिंकणे सर्वात उत्तम - निजामाची सगळीकडून कोंडी केली, त्याचा तोफखाना त्याच्याजवळ येऊ शकला नाही आणि पालखेडला प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाई न होता निजाम शरण आला
२. जे अवघड आहे त्याची योजना ते सहज असतानाच आखावी, जे प्रचंड आहे, ते लहान असतानाच हाताळावे - निजामाने साताऱ्यावर चढाईचा विचार करताच बाजीराव वेगाने त्याच्या भागात घुसले आणि निजामाला त्याचा बेत बदलावा लागला. इथे जर निजाम साताऱ्यावर चालून गेला असता तर एकूण युद्ध खूप मोठं झालं असतं.
३. विजयाचा उन्माद साजरा करू नये, जे करतात ते रक्ततृषार्त असतात - बाजीरावांनी कधीही विजय साजरा केला नाही. दाभाड्यांना डभईला हरवल्यावर तर त्यांच्या आईंना भेटायला स्वतः गेले होते.
४. तुम्ही स्वतःला अजेय बनवा आणि शत्रू जेव्हा असुरक्षित असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करा. आपण हरणार नाही अशाच ठिकाणी मुरब्बी लढवैये मोर्चेबंदी करतात आणि पराभवाला कारणीभूत ठरेल अशा कोणत्याही निमित्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत - डभईच्या लढाईत बाजीरावांनी आधी दाभाड्यांना बाकी सैन्यापासून दूर नेले आणि नंतर नदीच्या चंद्रकोरीत अडकवले. इथे बाजीराव हरण्याच्या सगळ्याच शक्यता दूर झाल्या.
याच तत्त्वज्ञानातील दुसरा एक तत्त्वज्ञ, चुंग हो ची, म्हणतो की - गोंधळ होण्यापूर्वी गोंधळाची जाणीव असणे, संकट येण्यापूर्वी संकटाची जाणीव असणे, विध्वंसापूर्वी विध्वंसाची जाणीव असणे आणि आपदेपूर्वी आपदेची कल्पना असणे हे गहन ज्ञान आहे... या आणि अशा सर्व बाबी या बाजीरावांच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात.

कार्ल फॉन क्लाऊजवित्स हा बाजीरावांनंतर ८० वर्षांनी जन्मला. त्याने "ऑन वॉर" या ग्रंथात हालचालप्रधान युद्धांबद्दल लिहिले आहे. त्याने खालील मुद्दे मांडले होते -
१. शत्रूचा अन्नपुरवठा तोडणे/कमी करणे - भोपाळच्या किल्ल्यात निजामाला जेवण मिळणे मुश्किल झाले होते 
२. शत्रूच्या तुकड्या विलग राखणे - पालखेड आणि डभई या दोन्ही ठिकाणी मुख्य तुकडीला विलग केले गेले होते
३. शत्रूला माघार अधिक धोकादायक करणे - प्रत्येक लढाईतच शत्रूला परतीच्या वाटा पूर्ण बंद केल्या होत्या 
४. शत्रूची स्वतंत्र ठाणी मोडणे - दिल्लीच्या चढाईच्या आधी बाजीरावांनी आपल्या लहान लहान तुकड्यांच्या मार्फत अनेक ठिकाणी शत्रूला मात दिली होती (अपवाद - होळकरांचा पराभव)
५. शारीरिक आणि नैतिक परिश्रमाची तयारी - जे अंतर सामान्य घोडदळ ५ दिवसात पूर्ण करे, तेच अंतर बाजीरावांचे सैन्य २ दिवसात पूर्ण करत असे. घोड्यावर बसल्याबसल्याच शेतातील दोन कणसं घेऊन जेवण पूर्ण होत असे.
६. नेमकेपणा आणि शिस्त - बाजीरावांच्या सैन्याने कधीही लुटालूट केली नाही, कधीही कोणत्याही स्त्रीवर हात टाकला नाही 
याही प्रत्येक मुद्यांमध्ये बाजीरावांचे युद्धकौशल्य वादातीतपणे सिद्ध होते.

बेसिल हेन्री लिडेल हार्ट हा हालचालप्रधान युद्धावरील मोठा भाष्यकार आहे. त्याच्या मांडणीत
- उद्दिष्ट आणि क्षमता या जुळल्या पाहिजेत - बाजीराव दिल्लीच्या दारी जाऊन हल्ला न करता परतले
- बदलत्या परिस्थितीत लवचिकता असली पाहिजे - होळकरांची तुकडी पराभूत झाल्यावर आग्र्याला शत्रुसैन्याची पार्टी सुरू होती. ते बघून बाजीरावांनी आग्र्याला वळसा घालून थेट दिल्ली गाठली
- शत्रूला अनपेक्षित बाजूने हल्ला केला पाहिजे - बंगश जेव्हा बुंदेलखंडात होता तेव्हा ५ दिवसांचे अंतर २ दिवसात कापून त्याच्यावर अनपेक्षित हल्ला केला होता
- शत्रूच्या क्षमता ओळखून, घाई न करता निर्णय घेतले पाहिजेत - निजामाला पालखेड आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी त्याचा तोफखाना वापरता आला नाही
- शत्रू सावध असताना हल्ला न करणे - बाजीरावांनी आग्र्याला हल्ला न करता थेट दिल्लीला धडक मारली
- जिथे विजय झाला तिथेच पुन्हा हल्ला न करणे आणि जिथे पराजय होतोय तिथेच अधिक वेळ न घालवणे - थोडक्यात लवचिकता असली पाहिजे - प्लॅन बी कायम तयार असले पाहिजेत

अशा विविध युद्धतत्वज्ञांच्या मुद्द्यांवर बाजीराव हे अद्वितीय योद्धे ठरतात.

अर्थात काही चुकीच्या म्हणता येतील अशा बाबीही होत्याच. त्याही पित्रे सरांनी व्यवस्थित मांडल्या आहेत.
१. त्यातील पहिली म्हणजे अति सौजन्यशीलता - सद्गुणविकृती. चाणक्यनीतीतील
अग्नि: शेषं ऋण: शेषं, शत्रु: शेषं तथैव च ।
पुन: पुन: प्रवर्धेत, तस्मात् शेषं न कारयेत् ।।
ही बाब बाजीरावांनी अमलात आणली नाही आणि निजामाला दोन वेळा मारता येत असतानाही सोडलं. वसईला सगळ्या धर्मांध पोर्तुगीजांना जिवंत जाऊ दिलं...
२. वसुलीच्या पद्धतीत कोणत्याही सुधारणा त्यांनी केल्या नाहीत. त्यात त्यांना स्वारस्य नव्हते, किंवा तेवढा वेळ मिळाला नाही
३. आधुनिक शस्त्रे, तोफा या आपल्या सैन्यात असाव्यात असा प्रयत्न केला नाही. त्यांचा भर वेगावर असल्याने दुर्लक्ष केले असेल, पण दुर्लक्ष केले हे खरे...
४. समुद्र केवळ आंग्ऱ्यांवर सोडला, त्यात कोणतेही नवीन प्रयोग केले नाहीत.
या उणिवा या गालावर लावलेल्या तीटासारख्या आहेत. 

बाजीरावांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हयातीत मोगल साम्राज्य नावापुरते शिल्लक राहिले. हिंदूपदपातशाही निर्माण होऊ शकेल हा विश्वास आला. मराठा सरदार हे गुजरात, माळवा आणि उत्तरेत स्थायिक झाले. या भागात सतत सुलतानी कराच्या ओझ्याखाली पिचलेल्या जनतेने मराठ्यांना मनापासून स्वीकारले आणि मराठ्यांनीही त्यांना सांभाळले. छोट्या स्वराज्याचे रूपांतर बाजीरावांनी आपल्या शौर्याने मराठा साम्राज्यात केले. छत्रपतींच्या या सेवकाला शतशः नमन 🙏🙏

पुस्तकाचे नाव - या सम हा
लेखक - मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन 
पृष्ठे - ३३५
किंमत - ₹४००

Saturday, August 15, 2020

अखंड भारत संकल्प दिन

काल अनेकांनी अखंड भारत संकल्प दिनाच्या पोस्ट टाकल्या, लेख लिहिले. तर काही पक्क्या हिंदुत्ववाद्यांनी अखंड भारत ही संकल्पना १९४७ला आणि आताही कशी अव्यवहार्य आहे यावर लिहिलं. दोन्ही बाजू वाचल्यावर मला काय वाटतंय ते लिहिण्याचा हा प्रयत्न.

"गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?" या शेषराव मोरेंच्या पुस्तकात अखंड भारत असणं किती त्रासदायक झालं असतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. तेव्हाही आणि आताही एकूण मुस्लिम लोकसंख्या ही ४०% च्या आसपास असली असती. सावरकरांनी जे सुचवलं होतं, त्यानुसार तर तेवढं प्रतिनिधित्व मुस्लिमांना मिळालं असतं. ते नाही तरी एकूण मुस्लिमबहुल मतदारसंघ हे ३०%-३५% नक्कीच राहिले असते. आज खंडित भारतात जिथे २०% मुस्लिम लोकसंख्या आहे, तिथेही कट्टरतावादी सामान्य मुस्लिमाला फितवतात आणि जिहादी कारवाया, अशांत काश्मीर, अन्य भारतात बॉम्बस्फोट ते आझाद मैदान, बेंगळुरू मधील झुंडशाही हे घडत आहे. जर हीच लोकसंख्या ४०% असती तर किती नुकसान होऊ शकतं. या तर्कावर पुन्हा अखंड भारत होणं हे अव्यवहार्य आहे हे या मंडळींचं म्हणणं आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य उद्धृत केलं जातं, "आज भारताला लागलेला मोठा रोग संपला". हे सगळं तर्कनिष्ठ आहे यात वाद नाहीच. पण तर्काच्या पुढे गेलं तरच इतिहास घडत असतो.

भारतीयांनी रामजन्मभूमीचं स्वप्न गेली ५०० वर्षे पाहिलं. दोन पिढ्यांनंतर जर ते स्वप्न हे अव्यवहार्य आहे या तर्कावर सोडून दिलं असतं तर आज ते पूर्ण झालं नसतं.
बलाढ्य मोगल आणि अनेक शाह्या आजूबाजूला असताना, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहणं हे अतार्किकच होतं.
प्रचंड तोफखाना असलेल्या निजामाला केवळ घोडदळाच्या जोरावर बाजीरावांनी पालखेडला गुढग्यावर आणलं, अडीच लाखांच्या मोगल सैन्याला पंचवीस हजारांच्या मराठ्यांच्या सैन्याने शिंदे होळकर पवार यांच्या नेतृत्वात पाणी पाजलं आणि त्यामागोमाग बाजीराव थेट दिल्लीच्या दारात जाऊन आले हे सगळंच अतार्किक आणि अव्यवहार्य होतं.
गांधीजींनी मीठ उचलणं, अनेक क्रांतिकारकांनी जीवनाची आहुती देणं, सावरकरांनी जहाजातून उडी मारणं आणि नेताजींनी भारताबाहेर सैन्य उभारून भारत स्वतंत्र करण्यासाठी युद्ध करणं हे सगळंच अतार्किक होतं
हजार वर्षांहून अधिक काळ आपल्या मायभूमीपासून दूर राहून ज्यू लोक स्वतंत्र इस्राएलचं स्वप्न पाहत राहिले. ते अतार्किक, अव्यवहार्य आणि अशक्यप्राय होतं.
दोन शहरं पूर्ण बेचिराख झालेली असताना जपानने केलेली प्रगती तर्काच्या कुठल्याही कसोटीवर बसत नाही, पण ते झालंय.
प्रत्येक वेळी तर्क, व्यवहार यावरच मदार ठेवली असती तर वरील कुठलाच इतिहास घडला नसता. 

ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसीमध्ये नायक पुजाऱ्यांना विचारतो की, "या सगळ्या पूजा, व्रत यामागील तर्क, ज्ञान तुम्हाला माहीत आहे का?" 
पुजारी सांगतात, "नाही"
नायक पुन्हा विचारतो, "जर हे सगळं का करायचं माहीत नाही, तर का करता?"
पुजारी सांगतात, "मला कळालं नाही म्हणजे पुढील पिढ्यांनाही कळणार नाही असं नाही. पण जर मी हे थांबवलं तर पुढील पिढ्यांना "हे असतं" हेच माहीत असणार नाही. त्यामुळे यामागील तर्क कळण्याची शक्यताच मावळून जाईल. ते व्हायचं नसेल तर मला कळो अथवा न कळो, या गोष्टी मला पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे."

अखंड भारत हे असंच एक १९४७ला अव्यवहार्य असणारं, आज कदाचित अतार्किक असणारं स्वप्न किंवा व्रत आहे. ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आपल्या पिढीचं काम आहे. ते पोहोचवत राहिलं तर कदाचित १००, २००, ५०० वर्षांनी ते साकार होईल. पण जर त्याला अव्यवहार्य ठरवून सोडून दिलं तर पुढील पिढी यावर काम करणारच नाही.

कोणतंही मोठं काम एकाच टप्प्यात होत नसतं. त्याप्रमाणे अखंड भारत हा काही पाकिस्तानशी एक युद्ध करून सगळा पाकिस्तान भारतात विलीन करून घेणं असं असू शकत नाही. मग हे टप्पे कोणते असू शकतात -
०. भारत मजबूत बनवणं
१. गिलगिट बाल्टिस्तान, अक्षय चीन भारतात विलीन करणे
२. पाकिस्तानची अजून शकले होऊन सिंधदेश, पंजाब, पश्तुनीस्तान, बलुचिस्तान हे नवीन देश तयार होणे
३. तिबेट स्वतंत्र होणे
४. युरोपियन युनियनच्या धर्तीवर अफगाणिस्तान पासून ते इंडोनेशिया पर्यंत आर्थिक एकता साधणे
५. इथून पुढे कदाचित एक राष्ट्र ही संकल्पना मांडता येईल...

हे सगळं घडणं सहजसाध्य असणार नाहीच. हे असंच घडेल असंही नाही. पण स्वप्न अतार्किक, अव्यवहार्य आहे म्हणून सोडून देणं अयोग्य होईल. कारण त्यामुळे स्वप्नाचे अस्तित्वच संपून जाईल.

त्यामुळे दर वर्षी १४ ऑगस्ट रोजी "अखंड भारत संकल्प दिन" हा झालाच पाहिजे.

🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Saturday, July 25, 2020

पराभूतांचा इतिहास?

साध्वी ऋतुंभरा यांच्या भाषणात "सोमनाथ का मंदिर टूटा फिर भी तुम खामोश रहे, जिसने चाहा तुम को लूटा फिर भी तुम खामोश रहे..." अशा ओळी यायच्या. त्याचा शेवट "कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्थान हमारा है|" ने होत होता. त्या काळात (वय वर्ष १५-१६) भयंकर जोश यायचा. पण नंतर आपण खरंच खामोश राहिलो का? आपल्याला कुणीही लुटले आणि आपण काहीच करू शकलो नाही का? आपला इतिहास हा पराभूतांचाच आहे का? असे प्रश्न पडले. त्याचं उत्तर आहे - नाही! आपल्यावरील ज्ञात हल्ले अलक्षेन्द्रापासून सुरू झाले आणि इंग्रजांपर्यंत येऊन संपले. या कालखंडात काय काय झालं हे थोडक्यात बघितलं तर "नाही!"चा अर्थ कळेल.

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात अलक्षेन्द्राने भारतावर हल्ला केला. त्याने मध्यआशिया पूर्ण जिंकला होता. पुरूराजाशी झालेल्या लढाईत त्याची प्रचंड हानी झाली. तरीही पुढे जाण्याची त्याची इच्छा होती. पण त्याची सेना मगध सेनेची संख्या (दोन लाख पायदळ, ऐंशी हजार घोडदळ, आठ हजार रथ आणि सहा हजार हत्तीदळ) ऐकूनच गर्भगळीत झाली आणि सेनेने पुढे कूच करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला तक्षशिलेच्या पुढे भारतात येता आले नाही. परत जाताना तो मेला. शकांनी ख्रिस्तपूर्व ८० ते इस १५० या सव्वादोनशे वर्षात उत्तरपश्चिम (आजचा पाकिस्तान) भागात राज्य केलं. पण गौतमीपुत्र सातकर्णीने शकांना संपूर्ण हरवले. सोबतच जवळपास संपूर्ण भारत राजकीयदृष्ट्या एका राज्यात आणला. इस चौथ्या शतकापर्यंत जवळपास साडेतीनशे वर्ष कुशाणांनी उत्तर आणि पश्चिम भारतावर राज्य केलं. पण पुढे कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली. गुप्त साम्राज्याने कुशाण साम्राज्य संपवले. पाचव्या शतकाच्या मध्यावर भारतावर हूणांनी हल्ला केला होता. हे मध्य आशियातील लोक होते. यांना काही वर्षातच स्कंदगुप्ताने हरवले. हूणसुद्धा पंजाब पार करू शकले नाहीत. म्हणजे या आक्रमकांपैकी कुणीही पंजाब पार करून भारतात येऊ शकला नाही.

इस्लाम स्थापन झाल्यानंतर भारतावर आक्रमणे वाढली. बाराव्या शतकात पहिल्यांदा कुणा इस्लामी राज्यकर्त्याला भारतात प्रवेश करता आला. तोवर राजस्थान मधील बाप्पा रावळ, सिंध मधील राजा दाहीर, काश्मिरातील ललितादित्य, कन्नौज येथील यशोवर्मन यांनी सातव्या शतकापासून सुरु असलेले हल्ले नुसते थोपवले नाहीत तर पुढे दोन शतके कुणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही असा हग्या मार दिला. पुढे गझनीने हल्ला केला. पण गझनीच्या लागोपाठच्या हल्ल्यानंतर पुन्हा १०० वर्ष भारतावर इस्लामी हल्ला झाला नाही. पुढे घौरीने हल्ला केला. तिथून भारतावर इस्लामी आक्रमण जास्त होत गेलं. बख्तियार खिलजीच्या आक्रमणाने नालंदा विद्यापीठ जाळले गेले. तिथून पुढे भारतीय राजांची सत्ता कमकुवत होत गेली. पण तरीही भारतीयांची परकीय आक्रमकांना विरोध करण्याची वृत्ती कुठेही कमी झाली नाही. चौदाव्या शतकात तैमूरने आक्रमण केलं. रामप्यारी चौहान आणि तिच्या साथीदारांनी गनिमीकाव्याने लढा देऊन तैमूरला आत्यंतिक जखमी करून माघार घ्यायला लावली. अखेरीस त्याच जखमांनी तैमूर मेला.

या इसपूर्व चौथं शतक ते इस बारावं शतक या दीड हजार पेक्षा अधिक वर्षांत भारताने काय काय केलं...राज्यव्यवस्थेत: इस पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत कम्बु, कौंडिण्य, चोल आणि शैलेंद्र राजांनी दक्षिण भारत आणि आग्नेय आशियावर आपले प्रभुत्व गाजवले. पण आग्नेय आशियात राज्य असं केलं की तेथील स्थानिक जनता त्यांना आजही आक्रमक मानत नाही, चंद्रगुप्ताने ग्रीकांना पराभूत केले, समुद्रगुप्ताने हे राज्य वाढवले आणि पुढे अशोकाचे मौर्य साम्राज्य हे संपूर्ण भारतभर होते, मौर्य वंशानंतर शृंग वंशाचे राज्य पुष्यमित्राने स्थापन केले. तेही संपूर्ण भारतभर होते. खारवेल आणि पुष्यमित्र यांनी एकत्र येऊन दिमित्रीस पराभूत केले, शालिवाहनाने सुटे झालेली भारतीय राज्ये पुन्हा एका अमलाखाली आणली, पुढे हर्षवर्धनाने पुन्हा विस्कळीत झालेली राज्ये एकत्र आणून मोठं साम्राज्य उभं केलं, पूर्वांचलातील भास्कर वर्मा यांनी हर्षवर्धनाशी विशेष मैत्री ठेऊन अनेक युद्धे एकत्रित जिंकली, यशोधर्माने हूणांचे राज्य संपवले, कृष्णदेवराय यांनी विजयनगरचे साम्राज्य वाढवले, प्रोलय आणि कप्पय या दोघा मसुनूरी नायकांनी आंध्रातील इस्लामी राज्य संपवले

ही सगळी आक्रमणे आणि त्याला विरोध सुरु असताना कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात: तिरुवल्लुवर यांनी जीवनविषयक तत्वज्ञान स्थानिक भाषेत सहज सांगितले, शंकराचार्यांनी भारत पुन्हा एकदा एका सूत्रात बांधला, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य यांनी वेदान्तावर नवीन भाष्ये करून लोकांना जीवन सुलभ करून सांगितले, सिंध मध्ये झुलेलाल यांनी इस्लामी आक्रमकांना न जुमानता हिंदू धर्म तेवत ठेवला, चैतन्य महाप्रभूंनी भक्तीच्या सीमा प्रचंड विस्तारल्या, नायन्मार या शैव आणि अलवार या वैष्णव संतांनी दक्षिणेत जातीभेद उच्चाटनाचे महत्वाचे कार्य केले, बसवेश्वरांनी वीरशैव पंथ स्थापन केला. यातही जातिभेदाला कोणताही थारा नव्हता, गुरु नानक देव यांनी शीख पंथ स्थापन केला, हरिहर आणि बुक्कराय यांना प्रेरणा देऊन त्यांचे राज्य स्थापन होण्यात सायनाचार्य आणि माधवाचार्य यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि विजयनगरचे हिंदू साम्राज्य उभे राहिले, ज्ञानेश्वरांनी गीतेचे ज्ञान प्राकृतात सांगितले, कालिदासांनी अनेक काव्ये लिहिली, अनेक मंदिरे, लेण्या तयार झाल्या.

विज्ञानात: भास्कराचार्यांनी अनेक गणिती सिद्धांत मांडले, सोबतच गुरुत्वाकर्षणाबद्दलही सांगितले (न्यूटनच्या आधी सुमारे ६०० वर्ष), नागार्जुनाने अनेक रासायनिक प्रयोग करून धातुविज्ञान सिद्ध केले, आर्यभट्टांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत इस ५व्या शतकात सांगितला (आणि त्यांना कुणी शिक्षाही केली नाही!!!)

याचा अर्थ हा की आक्रमणं होत होती परंतु भारतात ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात काम होत राहिलं. म्हणजे ही केवळ आक्रमणे होती. आक्रमणे झाली कारण आपण समृद्ध होतो. आपण आक्रमणे केली नाहीत कारण आपण सुसंकृत होतो. आपण पराभूत नव्हतो आणि आपण पारतंत्र्यातही नव्हतो.

मोगल आल्यानंतर तर आपल्याला अकबर द ग्रेट पासून ते औरंगजेब कशा टोप्या विकायचा तिथवर सांगितलं जातं. पण अकबराने केलेले अत्याचार त्याच्या वलयात सांगितले सुद्धा जात नाहीत. महाराणा प्रतापांनी अकबराने जिंकलेला ८०%पेक्षा अधिक भाग पुन्हा जिंकला होता हे आपल्याला माहीतच नसते. औरंगजेबाने पूर्वांचलावर केलेला हल्ला लाचिद बडफुकन यांनी असा परतवून लावला की पुन्हा औरंगजेबाने पूर्वांचलाकडे स्वारी केलीच नाही. शिवाजी महाराजांनी याच काळात स्वराज्य उभं केलं. औरंगजेबाच्या नाकाखाली बुंदेलखंडात छत्रसालांना स्वराज्य उभं करण्यास प्रवृत्त केलं. महाराज गेल्यावरही संभाजी महाराजांनी लढा सुरू ठेवला. औरंगजेबाने संभाजी राजांना अत्यंत क्रूरपणे मारल्यानंतरही राजाराम महाराज आणि नंतर ताराराणी यांनी त्याला स्वराज्याचा घास घेऊ दिला नाही. उलट औरंगजेब अखेरीस याच मराठी मातीत गाडला गेला.

पुढे शाहू छत्रपती परतून आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांच्यासह त्यांनी स्वराज्याची घडी पुन्हा बसवली. त्यावर कळस चढवला तो थोरल्या बाजीरावांनी. बाजीरावांच्या काळातच भारतात बहुतेक मोठ्या भूभागावर पुन्हा स्वराज्य आलं होतं. कारण नाव जरी मोगलांचं असलं तरी राज्य मराठेच करत होते. पुढे अटकेपार झेंडे आणि नंतर पानिपत झालं. पण पानिपतानंतर केवळ १० वर्षात पुन्हा ते वैभव मराठा साम्रज्याने पाहिले. शिवाय पंजाबात महाराज रणजितसिंहांचे राज्य सुरू झाले. या राज्याने अब्दाली आणि त्याच्या राज्याला मोठा शह दिला आणि पुन्हा त्या बाजूने पंजाबच्या पुढे कोणतेही आक्रमण येऊ शकले नाही. म्हणजे उणेपुरे ३०० वर्ष मोगलांनी भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. पण तेही कधी संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात घेऊ शकले नाहीत. मात्र या वर्षांत ज्ञान-विज्ञानात असलेली भारताची प्रगती थांबली.

इंग्रजांनी भारत हा मराठ्यांकडून ताब्यात घेतला. ही अत्यंत स्पष्ट बाब आपल्याला इतिहासात शिकवलीच जात नाही. १८१८ मध्ये जेव्हा दुसरा बाजीराव हरला तेव्हाही इंग्रजांना भीती मराठ्यांकडूनच होती. त्यामुळेच या कमी घातक असलेल्या बाजीरावाला इंग्रजांनी पार उत्तर हिंदुस्थानात नेऊन ठेवले. तरीही इंग्रजांची भीती खरी ठरली आणि १८५७ च्या युद्धाची सूत्रे मराठ्यांकडे (राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे) आली. तिथून पुढे ९० वर्षे आपण पूर्ण पारतंत्र्यात होतो. असे असले तरी स्वातंत्र्याची आस मात्र कायम होती आणि त्यासाठी प्राणपणाने अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले.

आपली लूट झाली, पण आपण केवळ लुटले गेलो नाहीत तर लुटारूंना आपण पळवून लावलं आहे. आपला इतिहास पराभूतांचा इतिहास नाहीये तर दैदिप्यमान असा स्वातंत्र्येच्छू, पराक्रमी, ज्ञानी आणि सहिष्णू लोकांचा इतिहास आहे.

Friday, March 6, 2020

समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन

पुस्तक परिचय -  समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
लेखक - कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक - मोरया प्रकाशन
मूल्य ₹१७०

मागील १ महिन्यात कौस्तुभ कस्तुरेंची ३ पुस्तके वाचली. "प्रतिशोध पानिपतचा"चा परिचय या आधी दिला होता. सदाशिवराव भाऊंवरील "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ" हे दुसरं (याचा परिचय नंतर देईन) आणि समर्थांवरील "समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन" हे तिसरं. अजून एक "पुरंदरे" आता वाचायला घेईन...

कौस्तुभ कस्तुरेंचं वैशिष्ट्य हे की, रामदासांनी सांगितलेलं - अभ्यासोनि प्रकटावे - हे ब्रीद ते कसोशीने पाळतात. कुठेही अतिरंजितपणा नाही. इतिहास म्हणजे इति + ह् + आस म्हणजेच - हे असे घडले. जे घडले तेच इतिहासातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच काय घडले यासाठी समकालीन कागदपत्रे हाच सर्वोत्तम पुरावा आहे. समकालीन कागदपत्रांमधून बखरी या हद्दपार होतात कारण यात अतिरंजितपणा आणि ज्याने बखर लिहून घेतली त्याचा अति उदोउदो असतो. त्यामुळे पत्रे,  सनदा आणि समकालीन व्यक्तींनी लिहिलेली चरित्रे यावरच ते अवलंबून असतात आणि विश्वास ठेवतात.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर्थ आणि महाराजांची भेट ही स्वराज्य स्थापनेच्या आधी झाली नसून ती बरीच उशिरा झाली हे सांगितलंय. महाराजांचे स्वराज्य हे जिजाऊंच्या प्रेरणेचे आणि महाराजांच्या कष्टानेच उभे राहिले आहे हे स्पष्ट केलंय. पण जेव्हा भेट झाली तेव्हापासून महाराजांचा आणि समर्थांचा स्नेह किती बळकट होता तेही सप्रमाण सिद्ध केलंय.

या पुस्तकासाठी कौस्तुभ कस्तुरे यांनी समर्थ संप्रदायातील कागदपत्रे, भीमस्वामी, गिरीधर स्वामी, दिनकर गोसावी यांनी लिहिलेली समर्थ चरित्रे अभ्यासली. शिवाय रघुनाथ पंडितांनी लिहिलेलं समर्थांचं वर्णनसुद्धा अभ्यासलं. हे सर्व समकालीन आहे. याशिवाय भीमाजी बुवांनी लिहिलेलं समर्थ चरित्रही घेतलंय, जे उत्तरकालीन आहे. या सर्वांवर लिहीत असताना एक बाब कौस्तुभ वारंवार सांगतात ती म्हणजे चमत्कार खरे नाहीत. त्यांना इतिहासात काहीही स्थान नाही. पण ही सर्व चरित्रे आपल्याला थोडक्यात यातून सहज कळतात.

या चरित्र आणि वर्णनाशिवाय समर्थांनी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म यावर जो उपदेश केला होता त्याबद्दलही लिहिले आहे.

या पुस्तकात अनेक चित्रेही आहेत. विशेषतः महाराजांचा आणि समर्थांचा संबंध दाखवणारी चाफळची सनद - तिचाही फोटो आहे. या सनदेवरून संकेत कुलकर्णी (लंडन) आणि कौस्तुभ यांनी शोधून, अभ्यासून हा संबंध "पुराव्यानिशी शाबीत" केला आहे!

Tuesday, March 20, 2018

शिवाजी महाराजांचे मुस्लीम सरदार

सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही. ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले. संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती नेताजी पालकर होते. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.
शिवाजी महाराजांबरोबरआग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता की नाही यावर मत मतांतरे आहेत. अधिक माहितीसाठी पहा - https://m.facebook.com/dasabodh/posts/446234875521176:0
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
''काझी हैदर"
बरोबर. पण एकमेव नव्हता.
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा… "रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
बरोबर. पण वाघनख्या पाठवणारा नाही तर शस्त्र तयार करणारा एक कारागीर होता तो. त्याने केवळ अफझलखानाला मारायचे म्हणून वाघनखं बनवून दिली नव्हती
आता प्रश्न हा आहे की महाराजांच्या नावाने त्यांना बळेच मुस्लिम विरोधक नाही असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो? कारण सोपं आहे, मूळ इतिहासापासून लोकांना दूर नेलं, की स्वत्व विसरायला लावणे सोपे असते. महाराज धर्म निरपेक्ष होते पण त्यांनी मशिदी पडल्या नाहीत असं मुळीच नाही. जी मशीद मंदिर तोडून बांधली गेली ती मशीद महाराजांनी पाडली आहे. हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो.
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका

दि. ७ मार्च २०१७

नाना फडणीस

नाना फडणीस... नाव ऐकलं की आधी प्रतिमा येते ती स्त्रीलंपट, लढाईतून पळून जाणारा वगैरे वगैरे... का?
गेल्या काही दिवसांत पेशवाईवरील बरीच पुस्तके वाचली. नाना फडणीसांना पानिपतला सदाशिवरावांसोबत कारभारी म्हणून पाठवले होते. तिथे रणात अन्य लोक (पाळणाऱ्यात होळकर, विंचूरकर, महादजी शिंदे सुद्धा होते) पळाले, त्यांच्याबरोबर हे सुद्धा पळून आले. पण पळपुटा म्हटले गेले फक्त नाना फडणीसाला. असो, पळाले हे खरं...
पुढे माधवरावांच्या सोबत फड सांभाळला तो यांनीच. पानिपतवरील लढाई एक प्रचंड धक्का होता आणि त्यापाठोपाठ नानासाहेब पेशवे निवर्तले. पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव पानिपतात मारले गेले. इथे राघोबादादाला पेशवे बनण्याची संधी होती पण संपूर्ण जबाबदारी घेणं राघोबाने नेहमीच टाळलं. माधवराव 'पेशवे' झाले. हा तरुण पेशवा मात्र अनेक घरातल्या आणि बाहेरच्या झुंजी देत अतिशय लवकर निवर्तला. पण या अवधीत त्यांनी पानिपत वरील जखमा बुजवल्या आणि नाना फडणीस सारखे लोक पेशवाईच्या आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याच्या कामी लावले. पुढे नारायणराव पेशवे झाले आणि त्यांना राघोबा + आनंदीबाई यांनी मारले. रात्री गुपचूप सगळे विधीही आटोपले. सर्व पुणे झोपलेले असताना नाना फडणीस यांनी अन्य 3 कारभाऱ्यासोबत राघोबाला पेशवेपद मिळू नये अशी शपथ घेतली. तरी राघोबा पेशवे झाले. 5 महिन्यात जेव्हा नारायणरावांची पत्नी बाळांत झाली तेव्हा या कारभाऱ्यांनी राघोबा बाहेर असताना चिमुकल्या सवाई माधवराव च्या नावे पेशवाई घेतली आणि बारभाईची लढाई सुरू झाली. याला कारस्थान का म्हटले? वास्तविक व्यसनी राघोबाला पेशवाई दिली हीच चूक होती ती सुधारणे याला कारस्थान म्हटले गेले.
मग राघोबा इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजांकडून हिंदवी स्वराज्यावर हल्ला करवला. इथे नाना फडणीसांनी अतिशय धूर्तपणे हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. अर्थात या कामी होळकर आणि शिंदे यांची मदत झालीच. पण लढाई सुरू होण्याआधीच वडगावला इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली आणि राघोबाला नानांच्या हवाली करून, मोठी खंडणी देऊन ते चालते झाले. ही प्रचंड हार इंग्रजांना किमान 50 वर्ष मागे घेऊन गेली. स्वराज्याच्या या विजयाचे शिल्पकार होते नाना फडणीस.
सवाई माधवराव वयाच्या 14-15 वर्षी वारले आणि त्याजागी दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचा मुलगा आला. याने आधी नाना फडणीसांना कैदेत टाकलं आणि नंतर जेव्हा कारभार पेलला नाही तेव्हा पुन्हा फडणीस केलं. हे सगळं होऊनही नाना कायम हिंदवी स्वराज्यासाठी झटले आणि ते असेपर्यंत इंग्रजांना आपले हात पाय पसरता आले नाहीत. 13 मार्च 1800 साली नाना फडणीस वारले आणि पुढे केवळ 18 वर्षांत शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला.
मला वाटते की नाना फडणीसांत दोष असतील पण त्याचे विकृतीकरण इंग्रजांनी केले असावे. कारण नाना फडणीसांमुळे त्यांना मराठा साम्राज्य जिंकता आलं नव्हतं. मोर नाचताना इंग्रजांनी मागून फोटो काढला आणि आपल्या साहित्यिकांनी तोच मोराचा फोटो आहे असं मानून लेखन केलं आणि नानावर निव्वळ बाईलवेडा आणि विकृत असा शिक्का मारला. धोरणी आणि मुत्सद्दी नाना त्यात लोप पावले.


दि. १३ मार्च २०१७

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतात मारुती शेपटीने उडायचा, नारदाची वीणा म्हणजे रॉकेट होतं, गणपती हा क्लोन आणि प्लास्टिक सर्जरीने डोकं बसवलेला होता ही निव्वळ मिथकं आहेत. पण लोकांनी मिथकाला विज्ञान म्हणायला सुरुवात केल्याने सध्या गोंधळ झालाय आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, कालमापन, गणित हे उच्च स्तरावर होते, त्यातील काही नमुने खाली दिले आहेत.
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही 😉) ग्रंथ वाच. शिवाय पराशर मुनींचे शेतीवरील काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
हे सर्व असताना पुढील वैज्ञानिक प्रगती का होऊ शकली नाही? याचे मानसशास्त्रीय आणि दोन कालखंडात उत्तर देता येईल. पहिला इस्लामी आक्रमणपूर्व आणि इस्लामी आक्रमणापश्चात. मानसशास्त्रीय यामुळे की समाज म्हणूनही एक मन असतं.
भारतात एक विशिष्ट स्तरापर्यंत ज्ञान विज्ञान वाढलं पण ते पुढे थांबलं. असं का घडलं असावं याबद्दल हे माझं मत. एक गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयातील तज्ञ नाही. जे काही थोरांकडून ऐकले, वाचले, त्यावरून हे मांडले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
हा सगळा प्रवास का होतो तर आधीच्या गरजा पूर्ण होत जातात आणि मानवी मन पुढील गोष्टी शोधत राहतं. तसंच समाजमन सुद्धा या प्रवासाला प्रोत्साहन देत राहतं आणि मदत करतं. आहे तिथे संपन्नता मिळाल्याने भारताने दुसऱ्यावर आक्रमण कधीच केले नाही. उलट अनेक निर्वासितांना भारताने आनंदाने आश्रय दिला. यामुळे संहारक शस्त्रे, वेगवान प्रवास याची गरज भासली नाही आणि त्याची निर्मितीही झाली नाही.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
याच दरम्यान युरोपात गरजही वाढत होती आणि शोधासाठी असलेले वातावरण सुद्धा होते. या बळावर तेथे नवीन विज्ञान सिद्ध झाले आणि मग युरोपने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.

दि. ५ मे २०१७