Showing posts with label शेती. Show all posts
Showing posts with label शेती. Show all posts

Friday, April 29, 2022

वसुबारस २०२१

 सकाळी सहा सव्वासहाला शेतात जायला निघालो. भरपूर पाऊस झाल्याने कार शेतापर्यंत जाणं शक्यच नव्हतं. संतोषच्या मागे बसून मोटारसायकलवर गेलो. गेल्यागेल्या सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणांची पाखरण करत दिसू लागले. मग शेतात एक फेरी मारली. या वर्षी पावसाने मठ, तीळ, भगर आणि राळे यांची मातीच केलीये. पण तूर मात्र दिमाखात उभी होती. पाऊस थांबून केवळ तीन आठवडे झाले आहेत. आमच्या तुरील कोणतेही रासायनिक खत फवारणी नसते. त्यामुळे तुरीने पावसाच्या वेळापत्रकाप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं आणि आता तूर फुलावर येत आहे. अजून जमिनीत ओल आहे. आता उर्वरित शेतात गहू, जवस, हरबरा टाकायचा आहे. कुठे, काय आणि किती लावायचं हे ठरवत शेत फिरून झालं. 

आमच्या जंगलात मुद्दाम सुरुवातीला गेलो नाही. नाहीतर कामं तशीच राहतात आणि जंगलाजवळ बसून राहणं होतं. जंगलाचा एक टप्पा आता स्वयंपूर्ण झालेला आहे. सगळीच मोठी झाडं ३० फुटांपर्यंत गेली आहेत. खाली मोठमोठी खोडं दिसतात. झाडांचं एकूण आपसात छान चालू आहे. दुसरा टप्पा अजून दीड वर्षांचाच आहे. याला स्वयंपूर्ण व्हायला अजून दीड वर्ष लागेल. या टप्प्यात एक दोन प्रयोग केले होते. काही वेली लावल्या होत्या. त्यातील एक होती समुद्रशोक. ही वेल खूप मोठी होऊ शकते. याच्या पानांची भाजी, अळूवड्यांसारख्या वड्या वगैरे करतात. वाढ बघता, ही समुद्रशोक बहुदा या जंगलातील महालता होईल. केळीची गावरान रोपं लावली होती. एकूण ५-६ घड आले. त्यातील जी केळी बाहेरच्या बाजूने होती तिचे घड खायला मिळाले. आतली केळी प्राण्यापक्षांना 🙂

जंगल झाल्यावर आमचा बंधारा बघायला गेलो. पाऊस भरपूर झालेला असल्याने पाणी असणार याची खात्री होती. तीन आठवड्यापूर्वी शेवटचा पाऊस झाला होता त्यामुळे पाणी वाहतं असेल असं वाटलं नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे खळखळ वाहणारं पाणी दिसलं. अगदी स्वित्झर्लंडला असतं तेवढं नितळ नसलं तरी बऱ्यापैकी स्वच्छ पाणी होतं. पाण्याला कोणताही वास नव्हता. तुंबाच्या दुतर्फा छान झाडं आहेत, ती पाण्यावर सावली धरून होती. याचा व्हिडीओ बघताना आवाज नक्की ऐका. मग आठवलं की, विहीर तर बघितलीच नाही. 

आमची विहीर मी तुडुंब पाऊस झालेल्या वर्षीही (२००५) बघितली होती. तेव्हाही पाणी जिथून विहीर बांधलेली आहे त्या दगडी भिंतीला टेकलं नव्हतं. आमची विहीर साधारण ५०-६० फूट खोल असेल. पैकी २०-२५ फूट बांधकाम आणि खाली खडक. आम्ही कायम खडक पाहत आलोय. मात्र या वर्षी पहिल्यांदाच विहीर ३५-४० फूट भरलेली आहे. आमच्या शेजारच्या शेतात १५ वर्षांपूर्वी विहीर केली होती. तिला कधीच पाणी नव्हतं. या वर्षी तुडुंब पाणी आहे. मामांच्या शेतातल्या विहिरीला आम्ही तिसरीत असताना पाणी बघितलं होतं. मागच्या वर्षी तिचा झरा पुन्हा फुटला ते इथे सांगितलं होतं. या वर्षी त्या विहीरीला वरतून १० फुटांवर पाणी आहे. त्याच्या बाजूच्याच शेतावर तर हाताने बादली घालून घेता येईल एवढं पाणी आहे. आमच्या "जलपूजनाला" या वर्षी पावसाने भरभरून दिलं. रब्बी हंगाम आणि कदाचित उन्हाळी पिकंही छान होतील!

मग घरी आलो. आमची गुरं सांभाळणारा एकनाथ तयारच होता. त्याने गोठ्यात गायी वासरं एकत्र केली. मग आई, मी, संतोष, संतोषचा छोटा मुलगा सगळे "वसुबारस" साजरी करण्यासाठी, गोवत्स पूजनासाठी गोठ्यात गेलो. गायींना, वासरांना ओवाळलं. त्यांची पूजा केली. आणि अर्थातच फोटोसेशन सुद्धा केलं. एवढं करून छान भूक लागली होती. मग बाजरीची भाकरी, ठेचा आणि पिठलं असा बेत झाला (भुकेमुळे ताटाचा फोटो नाही काढलाय 😜)

अशी आमची वसुबारस साजरी झाली. आता पुढच्या आठवड्यात अमोहासह शेतावर चक्कर असणार आहे!!!

Saturday, June 13, 2020

पुस्तक परिचय - कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम

सहज किंडलवर पुस्तकं बघत होतो. अचानक विचित्र नावाचं पुस्तक दिसलं. सहज म्हणून वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेलो.

वेंकट अय्यर, एक केरळी पण मुंबईकर तरुण. IBM मध्ये, सन २००४ मध्ये, सहा आकडी पगाराची नोकरी. तिशीत शेती करायची ठरवतो आणि मग सुरू होतो एक विलक्षण प्रवास. त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे "कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम"

वेंकट IBM मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होते. पत्नी मीना, वर्तमान पत्रात काम करणारी. गुजरात व अन्य काही भागातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यावर तिचे काम सुरू असते. यातून वेंकटची सेंद्रीय शेतीशी ओळख होते. मग आपण शेती करावी हा विचार डोक्यात घट्ट होत जातो. नवीन मोठ्या प्रोजेक्टची संधी की शेती हा निर्णय घेणे भाग पडते आणि वेंकट मधला शेतकरी नवा प्रोजेक्ट नाकारतो.

जवळ शेतजमीन नाही, ती कुठे घ्यायची ठरलेलं नाही. अशा अवस्थेत नोकरी सोडलेली. शेत घेताना कुटुंबातील कुणाच्यातरी नावावर शेती असली पाहिजे हा नवा शोध. सोबत शासकीय अधिकाऱ्यांच्या पैसेवाल्या IBM मधल्या मॅनेजर कडून असलेल्या "अपेक्षा". या सगळ्याला पुरून उरत आणि एकही पैची लाच न देता सरळ मार्गाने वेंकट शेतजमीन विकत घेतो.

मीनाला त्याच काळात द हिंदू मध्ये मोठी नोकरी लागते, काही वर्षे मुंबई मग पाकिस्तान आणि अखेरीस दिल्ली अशा बदल्या होत जातात. त्यामुळे मीना एकीकडे आणि वेंकट शेतावर असा प्रवास नऊ वर्षे सुरू राहतो. त्यानंतर मात्र मीनाही शेतावर येते.

शेती करताना रासायनिक शेती करायची नाही यावर वेंकट ठाम असतो. मग सुरू होतं शेतीतील शिक्षण. वेंकटचं शेत निसर्गकृषक भास्कर सावे यांच्या शेताच्या जवळच असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वेंकटचं शिक्षण सुरू होतं. सोबत गावातील लोक, शासकीय अधिकारीही अनेक प्रकारचं "शिक्षण" देत असतातच. स्थानिक वाणांची दुर्दशा आपल्याला कळते जेव्हा वेंकटला तांदूळ लावायचा असतो. तो तांदळाचा शोध आणि त्यातील अपयश बरंच काही सांगून जातं.

वेंकट शहरी असला तरी गावात पूर्ण समरस झालाय. गावातील प्रत्येक प्रसंगात तो जातो. वेळोवेळी मदतही करतो. पण आपली काही तत्त्व सोडत नाही आणि तरीही गावाला तो आपलंसं करतो. हे सगळं करताना शेती रसायनमुक्त, पण अन्य गावकाऱ्यांसारखीच करतो. मग त्यात शासनाकडून बियाणं घेणं, वादळ, अतिवृष्टी वगैरे काळात मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणं हे सगळं करतो. शासकीय यंत्रणा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी असतात पण अधिकारी अनेक प्रकारे शेतकऱ्याला नाडतात. हे सगळे अनुभव स्वतः घेतो आणि त्यावर मातही करतो.

शेतातील घराचे तर असंख्य अनुभव आहेत. घरात आलेला नाग ते शेतातील घोरपडी, बेडूक खाणारे साप, घोणसाचं मैथुननृत्य प्रत्यक्ष पाहणं, घरात कोंबडीपालन, मांजरी, कुत्रा आणि बरंच काही... या सगळ्या गोष्टी बघताना, करताना, वेंकट सतत विद्यार्थी राहून कुतूहल कमी न पडू देता पुढे जात राहतो.

बँक या गोष्टीशी गावातील लोकांचं सख्य कमी असतं. त्यातील अनेक अनुभव त्याला येतात. नोटाबंदीच्या काळात झालेला त्रास कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता वेंकट सांगतो.

गावातील काही लग्ने, अनेकांच्या घरातील भानगडी, एक खून, जवळच्या मित्राची बायको जाणे व काही दिवसांनी तो मित्र जाणे या गोष्टी, दवाखाना ही बाब गावाला किती जड आहे, मुंबईपासून केवळ १०० किमी अंतर असताना, याची खंत... असं बरंच काय यातून कळतं.

सेंद्रीय शेतीचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करण्याचा प्रयत्न. पहिल्या हंगामातील अपयश आणि पुढील यश. तरीही त्यातून घेतलेली माघार. शेतकऱ्याला पैसे मिळायचे असतील तर काय केले पाहिजे याचे वेंकटने केलेले एकोत्तरी नाही तर दीर्घ चिंतन आपल्याला दिसते.

शेवटी वेंकट "मी सुखी आहे ना?" याचा शोध घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर -
आम्हाला सुख वेगळ्याच ठिकाणी भेटलं. मोकळं आकाश‚ निखळ निसर्गसौंदर्य‚ ताजा टवटवीत भाजीपाला‚ झाडावरून नुकतीच खुडलेली फळं आणि आपण पिकवलेलं अन्न खाणं‚ यातून आम्हाला खरा आनंद मिळतो. आपणच जमिनीत पेरलेल्या बियांमधून एक छोटा कोंब उगवतो आणि हळूहळू त्याचं रूपांतर एका महाकाय वृक्षात होतं. हा चमत्कार पाहण्याचं सुख तुम्हाला शहरातील मॉलमध्ये मिळू शकत नाही. तुमच्या समोर बेडूक पकडून फस्त करणारा पिवळसर पट्ट्यांचा नानेटी‚ तुमच्यापासून काही फुटांवर वेटोळं घालून फूत्कारणारा नाग किंवा स्वतःच्याच कैफात डोलत मैथुननृत्य करणारी घोणसाच्या नर-मादीची जोडी पाहताना जो थरारक आनंद तुम्ही अनुभवता‚ त्याची सर नॅशनल जिओग्राफी चॅनलवरून दाखवलेल्या दृश्यांना कधीच येऊ शकणार नाही.

मागे मी माझ्यासह अनेकांच्या मनातील "राजू रस्तोगी" बद्दल लिहिलं होतं. वेंकट एक यशस्वी राजू रस्तोगी आहे. त्याने अनेक राजूंना वाट दाखवावी ही इच्छा!!!

Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Tuesday, July 16, 2019

गंगा माँ मंडल

आपल्याकडे महाराष्ट्रात श्री. अ. दाभोलकर यांनी १० गुंठे शेतीप्रकल्पावर खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांची अनेक पुस्तकेही आहेत. "विपुलाच सृष्टी" हे त्यापैकी एक. याच प्रकारे अन्य राज्यांमध्येही प्रयोगशील लोक आहेत. मालपाणी ट्रस्ट, मध्यप्रदेश यांनी "गंगा माँ मंडल" नावाचा एक गुंठ्यातील प्रयोग केला आहे. त्याची माहिती देत आहे.

या प्रयोगात मुख्यत्वे लक्षात घेतलेली बाब म्हणजे कोणत्याही साधारण कुटुंबात (४ ते ५ व्यक्ती) सामान्यतः जो पोषक आहार हवा असतो तो सहज भाज्या आणि फळांद्वारा मिळू शकतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यातून मिळतील. यासाठी १००० चौरस फूट एवढीच जागा लागेल. "गंगा माँ मंडल"मुळे एक कुटुंब विषमुक्त फळ-भाजी आणि घरगुती औषधे यासाठी स्वयंपूर्ण होईल.

याची रचना गोलाकार आहे. यात जाण्यासाठी ७ रस्ते असतील. जेव्हा मंडल पूर्ण होईल तेव्हा रोज सकाळी एका रस्त्याने केंद्रापर्यंत जात पाणी घालायचे (अर्थात कुणाला ठिबक सिंचन करायचे असेल तरी चालेलच). याची रचना अशी असेल की ते पाणी सगळ्या भागात पोहोचेल. पाणी देत असतानाच आपल्याला आवश्यक त्या भाज्या आणि फळे तोडून आणायची. दुसऱ्या दिवशी दुसरा रास्ता आणि नव्या, ताज्या भाज्या फळे तुमच्या जवळ! असं करत सात दिवस सात भाज्या फळे तुम्हाला मिळतील आणि आठव्या दिवशी पुन्हा पहिल्या रस्त्यावरील भाज्या तोडणीयोग्य झालेल्या असतील. हा क्रम अनेक दिवस चालेल. जेव्हा रोपे जुनी होतील तेव्हा ती काढून पुन्हा नवीन लावायची.

गंगा माँ मंडलाच्या केंद्राकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेल असलेल्या फळभाज्या लावतात. बाहेरील सात वाफ्यांमध्ये कांदा, लसूण, मुळा, रताळी आणि बटाट्यासारखी कंदमुळे तसेच टमाटे, भेंडी अश्या फळभाज्या तसेच विशेष म्हणजे अनेक औषधी वनस्पती सुद्धा लावल्या जातात. आतील सात वाफ्यांमध्ये मेथी, मिरची, कोथिंबीर असे मसाले, मूग, तूर, उडीद असे प्रोटिनयुक्त धान्ये लावली जातात. सर्वात आतील गोलात आर्द्रता जास्त असल्याने केळी, पपई लावता येते.

गंगा माँ मंडल बनवण्याची कृती खालीलप्रमाणे (आराखडा चित्रात दिला आहे)
१. जिथे हे करायचे आहे त्या १०००  चौरस फूट जागेच्या केंद्रबिंदूवर खुंटी ठोका. तिथून १५ फूट त्रिज्येचे गोल आखून घ्या. त्यावर राख/चुना घाला म्हणजे ते दिसत राहील.
२. आता दोरीची लांबी हळूहळू कमी करत क्रमाने एक एक गोल आखून घ्या १०.५, ९, ६, ४.५, ३. याही गोलांवर राख घाला.
३. सर्वात बाहेरील गोलांवर १३.५ फुटांवर खुणा करा, सात समान भाग होतील. त्यावरही राख टाकून खुणा स्पष्ट करा.
४. या खुणांपासून केंद्रबिंदूपर्यंत दोरी लावून ४.५ फुटांच्या गोलापर्यंत रेष आखून घ्या. त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना ९-९ इंच मोजून दीड फुटाची जागा रस्त्यासाठी तयार करा. हा रस्ता बाहेरून आतील ४.५ फूट त्रिज्येच्या गोलापर्यंत जाईल. रस्त्यावर हवे असल्यास दगड/फरशी लावता येईल.
५. असेच सात रस्ते करा.
६. सर्वात आतील ३ फूट गोलात एक दोन फूट खोल खड्डा करा. या खड्ड्यात विघटित व्हायला किमान सहा महिने लागतील (उदा - नारळाच्या काथ्या, तुराट्या, झाडांच्या फांद्या, उसाच्या चिवट्या) असे पदार्थ टाका. त्याच्या वर लवकर विघटित होणारे पदार्थ टाका (उदा: वाळलेली पाने, गवत, कापलेले तण). दर एक दीड महिन्यानंतर यातील खत काढून वाफ्यांमध्ये टाकता येईल.
७. सर्वात आतील खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर एक मोठा दगड ठेवता येईल. अंघोळ, कपडे किंवा भांडे धुणे यासाठी तो वापरता येऊ शकेल. याद्वारे ते पाणी वापरात येईल.
८. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बांबूचा मंडप करून त्यावर काथ्याची जाळी तयार करून, त्यावर वेल सोडा.
९. रस्ते सोडून जी जागा आहे त्यात खड्डे करून, माती, लवकर विघटित होईल असा कचरा, शक्य असल्यास तांदळाचा किंवा डाळींचा भुसा, शेणखत/गांडूळखत वापरून भुसभुशीत वाफे तयार करा. त्यावर जीवामृत टाका ज्याद्वारे जमिनीतील जीवाणू वाढतील. सर्व वाफे एकमेकांना जोडा, म्हणजे पाणी सगळीकडे जाऊ शकेल.

गंगा माँ मंडल तयार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. वेल वर्गीय भाज्यांना खूप जास्त वारं सहन होत नाही. त्यामुळे गंगा माँ मंडल वेगवान वारं नसेल तिथे तयार करावं.
२. इथे जास्तीत जास्त वेळ ऊन असले पाहिजे.
३. प्राण्यांपासून योग्य संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे शक्यतो याच्या भोवती कंपाउंड असावे.
४. घरगुती वापरातील खराब पाणी (अंघोळ, कपडे-भांडी धुणे) सहजपणे यात जाऊ शकले पाहिजे. या पाण्यात शक्यतो रसायने जाऊ नयेत. यासाठी साबण वापरावर जरा बंधन येईल.
५. वेलभाज्या या मंडपावरच वाढवाव्यात. रस्त्यात अथवा वाफ्यात नको. म्हणजे भाजीचा दर्जा चांगला राखला जाईल.
६.  गंगा माँ मंडल स्वयंपाकघराजवळ केल्यास तेथील पाणी, जैविक कचरा सहजपणे गंगा माँ मंडलात टाकणे सोपे जाईल.


चित्रातील आराखड्यात दिल्याप्रमाणे तुम्ही भाज्या आणि अन्य वनस्पती लावू शकता. पण तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार यात बदलही करता येईल. या १००० चौरस फुटात सुमारे ४० ते ५० प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत. या नवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!

ही सर्व माहिती येथून घेतली आहे
तयारीचा फोटो फेसबुकवरील पोस्ट मधून घेतले आहेत

यातील औषधी वनस्पतींची माहिती खालील दुव्यांवर मिळेल -