Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Friday, April 24, 2026

२२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिंदू" अस्मितेपासून दूर नेलं. आणि आता तर बाकी प्रतिज्ञा न आठवता so called डॉ आंबेडकर अनुयायी केवळ ४-५ प्रतिज्ञा लक्षात ठेवतात. या प्रतिज्ञांमधील मानसिक, नैतिक आणि सामाजिक पुनर्जन्म कुणी लक्षात ठेवत नाही आणि लक्षात घेतही नाही.

या प्रतिज्ञांमध्ये, बुद्धांच्या शिकवणीतील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता, यांचा थेट समावेश आहे. 

१. पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम. हे नियम कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाहीत; ते सार्वत्रिक मानवी मूल्ये आहेत. अहिंसा, सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती—ही पाच तत्त्वे व्यक्तीला स्थिर करतात आणि समाजाला सुरक्षित करतात.
- अहिंसा मनातील क्रूरता कमी करते. हिंसा कमी झाली की समाजात भीती कमी होते आणि विश्वास वाढतो.  
- चोरी न करणे म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर. यामुळे परस्परांमध्ये सुरक्षितता निर्माण होते.  
- कामवासनेचा दुरुपयोग न करणे हे कुटुंबव्यवस्थेला स्थिर ठेवते.  
- खोटे न बोलणे समाजातील संवादाला पारदर्शकता देते.  
- मद्य व व्यसनांपासून दूर राहणे व्यक्तीचे आरोग्य, विवेक आणि कुटुंबातील शांतता टिकवते.
पंचशील म्हणजे स्वत:वर नियंत्रण ठेवून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारे जीवन.

२. अष्टांग मार्ग हा बुद्धांनी मानवी जीवनाला दिलेला मार्ग आहे. यात विचार, वाणी, कृती, उपजीविका आणि मनाची शिस्त या सर्वांचा समतोल साधला जातो.
- सम्यक दृष्टि: व्यक्तीला अंधश्रद्धा आणि भीतीपासून मुक्त करते.  
- सम्यक संकल्प: करुणा आणि अहिंसेवर आधारित विचार निर्माण करतो.  
- सम्यक वाणी: कटू, खोटे किंवा हिंसक बोलणे टाळते.  
- सम्यक कर्म: म्हणजे नैतिक आणि समाजहिताचे आचरण.  
- सम्यक उपजीविका: इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा देते.  
- सम्यक प्रयत्न वाईट प्रवृत्ती कमी करून चांगल्या प्रवृत्ती वाढवतो.  
- सम्यक स्मृती: सजगता आणि आत्मपरीक्षण वाढवते.  
- सम्यक समाधी: मनाला स्थिरता आणि शांतता देते.
अष्टांग मार्ग म्हणजे मानसिक आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग.  

३. दहा पारमिता म्हणजे मानवी गुणांचे सर्वोच्च रूप. या गुणांचा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नत करण्याचा मार्ग.
- दान स्वार्थ कमी करते आणि सहकार्य वाढवते.  
- शील नैतिकता आणि विश्वासार्हता वाढवते.  
- नेक्कम्म/नैष्कर्म (त्याग) लोभ कमी करतो.  
- प्रज्ञा विवेक आणि तर्कशक्ती वाढवते.  
- वीर्य सकारात्मक कृती करण्याची ऊर्जा देते.  
- क्षांती/शांती क्षमाशीलता वाढवते.  
- सत्य नातेसंबंधातील विश्वास टिकवते.  
- अधिष्ठान ध्येयपूर्तीची ताकद देते.  
- मेत्ता (मैत्री) सर्व जीवांप्रती मैत्रीभाव निर्माण करते.  
- उपेक्षा (स्थितप्रज्ञता) समत्व आणि मानसिक स्थैर्य देते.
या पारमिता म्हणजे मानवतेचा सर्वोच्च नैतिक आराखडा आहेत.

आज या बौद्ध शिकवणी सोडून विद्रोही प्रतिज्ञांचा वापर केवळ विद्वेषासाठी केला जातोय. त्यामुळे जर कुणी विद्रोही प्रतिज्ञांबद्दल बोलायला लागला की, तिरंगा मधील नाना पाटेकर सारखं म्हणायचं - अगर भगवान बुद्ध की तीन शिक्षाओं का पालन किया हैं तो ही बाकी उन्नीस को हाथ लगाना।

पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता या प्रतिज्ञांतील सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि मानवी मूल्यांचा सार आहेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हावा.

सर्वांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Friday, April 29, 2022

ब्रेनड्रेन की भारतदूत

 शीर्षटीप : आमचा सध्या परदेशात स्थायिक होण्याचा कोणताही विचार नाही!

आम्ही पहिल्यांदा जेव्हा परदेशात राहायला आलो त्याला आता १५ वर्षे होऊन गेली. त्यानंतर कधी भारतात कधी परदेशात असं करत एकूण जवळपास ८ वर्षे भारताबाहेर आहोत. पहिल्यांदा आलो तेव्हा एकूणच मित्रांमध्येही "इकडेच स्थायिक होऊ या" म्हणणारे फार कमी होते. तेव्हा एका भारतीयाने बेल्जियन नागरिकत्व घेतलं तेव्हा फार विचित्र वाटलं होतं. या माणसाला भारतीय नागरिकत्व सोडावंच कसं वाटलं याबद्दल त्याचा थोडा रागही आला होता. त्याला आता बराच काळ लोटला. गेल्या काही वर्षात इकडे स्थायिक होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. आत्ताच्या घडीला दक्षिण अमेरिका सोडली तर उरलेल्या सगळ्या खंडांमध्ये प्रत्यक्ष ओळखीचे लोक स्थायिक झालेले, नागरिकत्व घेतलेले आहेत. त्यांचा आता अजिबात म्हणजे अजिबातच राग येत नाही. उलट ही सगळी मंडळी भारताबाहेर राहून छान काम तर करत आहेतच शिवाय भारतीय संस्कृती तिथे घेऊन जात आहेत याबद्दल आनंदच आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी माझ्या एका भारतीय, नेदरलँड्समध्ये स्थायिक होत असलेल्या सहकाऱ्याने मला विचारलं, बेल्जियन नागरिकत्व केव्हा घेणार? कारण आम्ही येऊन-जाऊन असलो तरी साधारण सहा वर्षे बेल्जियममध्ये होतो. माझ्या तोंडून अगदी सहजपणे निघालं - I would die as an Indian not of any other nationality! यात काही राग नव्हता, पण एक प्रकारची अभिमानाची भावना होती. त्याला वाईट वाटलं की नाही माहित नाही. तो पुढे ही घटना विसरूनही गेला. त्यानंतर साधारण ३-४ महिन्यांनी माझ्या एका जवळच्या मित्राने बेल्जियन नागरिकत्व घेतलं. छान कुटुंब आहे. तिथे जाणाऱ्या भारतीयांना मदत करतात. शेजारच्या बेल्जियन लोकांना त्यांचा आधार वाटतो. सगळे सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम छान करतात. लेकरांना एक दोन भारतीय भाषा येतात. तिथे राहूनही ते भारत आपल्या सोबत घेऊन फिरताहेत. सोबतच आणखी काही मित्रांशी गप्पा झाल्या आणि त्यापैकी काहींना युरोपात स्थायिक व्हायचे होते. एकूणच मी ज्या तोऱ्यात "die as an Indian" म्हणालो त्याबद्दल माझं मलाच वाईट वाटू लागलं. गेल्या महिन्यात त्याला फोन करून दिलखुलास माफी मागितली आणि माफी मागण्याचं कारणही सांगितलं. तो तर विसरला होता, पण त्याला बरं वाटलं.

इकडे स्थायिक होण्यात व्यावहारिक अनेक फायदे असतील पण सोबत काही जोखिमासुद्धा आहेतच. मित्रांसोबत बोलताना त्यातील बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यातील काही मुद्दे - 
- लहानपणापासून आपण काही स्वप्न पाहिलेलं असतं. बहुतेक वेळा ते भारतातील बाबी ध्यानात घेऊन पाहिलेलं असतं. ते स्वप्न परदेशात कितपत साकारता येईल ते सांगता येत नाही. काही Bucket list असेल, कायमस्वरूपी परदेशात राहून त्या list मधील किती गोष्टी सोडण्यासारख्या आहेत, किती बदलण्यासारख्या आणि किती पूर्ण करण्यासारख्या आहेत हे कधी कळतं, कधी नाही. एकूणच बरीच स्वप्नं रीसेट होतात.
- एक मोठा मुद्दा येतो तो म्हणजे किती वर्षे अर्थार्जनाचं काम करत राहायचं. उदा: बेल्जियममध्ये ६७ वर्षांचं होइपर्यंत किंवा एकूण ४४ वर्षे काम केलं तरच पेन्शन मिळते. नाहीतर मिळत नाही. म्हणजे तुम्ही एवढी वर्षं पे-रोलवर पाहिजेत किंवा तुमचा व्यवसाय सुरू असला पाहिजे. भारतात माझ्या वर्तुळातील अनेक जण आज ज्या परिस्थितीत आहेत त्यानुसार पन्नासाव्या वर्षी निव्वळ अर्थार्जनासाठी काम करण्याची कदाचित गरज राहणार नाही. म्हणजे भारतापेक्षा जवळपास १७ वर्षे अधिक काम करावे लागणार आहे.
- कधीच होऊ नये, पण चुकून झालंच तर असा मुद्दा - साथीदाराचा (पती वा पत्नी) अकाल मृत्यू. शुद्ध व्यावहारिक मुद्दा आहे. भारतात सावरायला अनेक जण सोबतीला असू शकतात. इथेही चांगलं सर्कल होऊ शकतं, नाही असं नाही. तरीही काहीवेळा "जवळची नाती" अधिक मदत करू शकतात.
- मुलांच्या मनात भारताबद्दल प्रेम, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर आपोआप जय तोंडावर येणं या गोष्टी तुम्ही भारतात किंवा अन्यत्र, कुठेही असलात तरी होतीलच. पण भारतात इतक्या कमी वेळा जाणं होईल कि भारत म्हणजे केवळ ४ नातेवाईक आणि १० मित्र हा समज मुलांचा व्हायला नको यासाठी वेगळा वेळ काढून भारत त्यांना दाखवावा लागेल.

हे असं असलं तरी परदेशात भारतीय गेल्यामुळे होणारे भारताचे फायदे भरपूरच आहेत. सावरकरांनी ज्या शृंखला सांगितल्या होत्या त्यात एक "समुद्रगमन न करणे" ही होती. इस्लाम वा ख्रिस्ती धर्म हे जगभर पसरले कारण ते बाहेर पडले. युरोपीय लोकांनी जगावर काही काळ राज्य केले कारण ते आपल्या देशातून बाहेर पडले. भारतीय कित्येक वर्षं भारतातून बाहेर न पडल्याने हिंदू धर्म, संस्कृती अडकून पडली ही खरी गोष्ट आहे. जेव्हा भारत समर्थ होता तेव्हा भारतीय संस्कृती जगभर पसरली होती. त्याच्या अनेक खुणा आजही सगळीकडे दिसतात. आज हिंदू स्वयंसेवक संघ - सेवा इंटरनॅशनल, इस्कॉन अशा अनेक संस्था कुठेही आणीबाणीची परिस्थिती आली की मदतीला तत्पर असतात. कारण या संघटनांचं काम करणारे मूळ भारतीय जगभर आहेत. संघाच्या ४० पेक्षा अधिक देशात शाखा आहेत. हजारो कार्यकर्ते आहेत. आज कित्येक कंपन्यांच्या उच्च पदावर, संशोधनात, अगदी CEO सुद्धा मूळचे भारतीय आहेत. या CEOs मध्ये एक माझा भाऊ आहे याचा मला अभिमान आहे. जर भारतातून कुणी बाहेरच गेलं नसतं तर हे शक्य झालं नसतं. 

बऱ्याचदा भारतातील पालक त्यांच्या मुलांनी परदेशी जाऊ नये/स्थायिक होऊ नये या मताची असतात. त्यांना माझा एक "वात्रट" मित्र अशा पालकांना प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः तुमच्या गावातून बाहेर पडलाच ना? पुण्यात, मुंबईत स्थायिक झालातच ना? की तिथेच गावात राहिलात? मग मुलांनी परदेशात जाण्यात काय त्रास आहे? म्हणजे माझे वडील बुलडाण्यातील चांडोळ नावाच्या गावातून शिक्षणासाठी जालना / संभाजीनगरला आहे. नंतर नोकरीच्या निमित्ताने संभाजीनगरलाच राहिले. तेव्हाचा प्रवास गृहीत धरला तर त्यांना चांडोळला जायला किमान ६-७ तास लागायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांनी संभाजीनगरला स्थायिक व्हायला नकार दिला असता तर चाललं असतं का? अर्थातच नाही ! मग माझ्या वडिलांनी मला बाहेर जायला नकार देऊ नये.

मी जेव्हा पहिल्यांदा परदेशी जायला निघालो तेव्हा एक मेडिकल टेस्ट मुंबईतच करावी लागायची. त्या डॉक्टरांनी काहीतरी विचारलं आणि मी "yes/no/हो/नाही" असं उत्तर न देता "हं" म्हणालो. खरंतर छोटी गोष्ट होती. डॉ एकदम "बुड्ढा पारशी"! डॉ म्हणाले की, "तू परदेशात जातोयस हे चांगलं आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू परदेशात 'एक व्यक्ती' नसतोस तर 'भारतीय राजदूत' असतोस. तुझ्याकडे बघून भारतातील लोक कसे असतील याचा परदेशी लोक अंदाज बांधतील. त्यामुळे कधीही एक भारतीय म्हणून चुकीची प्रतिमा तयार होऊ देऊ नकोस!" आजवर ही गोष्ट बऱ्यापैकी पाळत आलोय. 

सांगायचं मुद्दा हा की जर कुणी नव्याने भारतातून बाहेर येणार असेल, आपली संस्कृती घेऊन येणार असेल, भारताचा राजदूत बनून राहणार असेल तर परदेशात जाणे, स्थायिक होणे हे चांगलंच आहे. स्थलांतरं कायमच होत आली आहेत. होत राहणार आहेत. ती चांगल्या दृष्टीने वापरता येणं आवश्यक आहे. त्यातील धोके आणि जबाबदारी याची जाणीव या घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांना करून दिली की त्यांच्यावर विश्वास टाकावा. तो विश्वास ते नक्कीच सार्थ करतील.

Monday, August 2, 2021

मेकेलीन - पूर व्यवस्थापन

आमच्या मेकेलीनची दैलं (Dijle) नदी बेल्जियमच्या वालोनिया या डोंगराळ प्रांतात उगम पावते. तिथून थोडं पुढे आलं की वालोनिया आणि फ्लॅण्डर्सची सीमा होते आणि मग सपाट फ्लॅण्डर्समध्ये सावकाश वाहते. अनेक लहान मोठ्या गावातून, बाहेरून वळणं घेत घेत ल्यूवन या विद्यापीठाच्या गावाबाहेरून मेकेलीनमध्ये येते. एवढ्या सगळ्या प्रवासात सर्वात मोठं गाव मेकेलीन. सगळी मिळून नदी ८०-९० किलोमीटर. बेल्जियम मध्ये सगळ्याच नद्यांच्या काठांना उंच करून दोन्ही तीरांवर सायकल रस्ता केलेला असतो. तसा तो दैलंला पण आहे. साधारण २० मीटर खोल पात्र, दोन्ही सायकल ट्रॅकमध्ये ४०-५० मीटर अंतर, म्हणजे पात्राची जास्तीत जास्त रुंदी ५० मीटर. अशी छोटीशीच नदी. तरीही दोन्ही किनाऱ्यांवर उत्तम शेती, पशुपालन असलेली. नदी छोटी असली, तरी पाणलोट क्षेत्र डोंगरात आहे. पुढेही लहान मोठे ओहोळ या नदीला भेटतात. शिवाय बेल्जियम मध्ये एकदा पाऊस सुरू झाला की पडsssत राहतो. त्यामुळे नदीला पूर येणं फार काही विशेष नाही. पात्राची रुंदी जास्त नसल्यानेही नदीचा वेग जास्त पाऊस झाल्यास बराच वाढतो आणि सखल भागात पूर येतो. मेकेलीन हे गाव या नदीच्या किनाऱ्यावर दुतर्फा आहे.
मेकेलीनमध्ये मोठं बांधकाम आधीही झालेलं होतं. सन १२०० ते १५२० मध्ये संत रॉम्बाऊट्स कॅथेड्रल (आम्ही याला रामभाऊ म्हणतो) बांधलं गेलं. (राजाला याच्या पायऱ्यांवरून चंद्रावर जायचं होतं. पण चंद्र हळूहळू जास्त वर गेला आणि मग बांधकाम थांबवलं). नंतर २०० वर्षांनी ल्यूवन कालवा बांधला (याबद्दल पुढे लिहितो) त्यामुळे छोटासा बायपास बांधणं फार काही अवघड नव्हतं. मेकेलीनच्या थोडं आधी नदीला एका वळणावर बायपास दिला. दोन्हीकडे बंधारे घातले. बायपास चांगला खोल ठेवला. तेव्हाच्या मेकेलीनला चहूबाजूंनी भिंत होती आणि त्यापलीकडे खंदक. याच खंदकाचा उपयोग करून हा बायपास बांधला आणि जिथून अँटवर्प शहरासाठीचा जलमार्ग सुरू होतो तिथे पुन्हा मूळ नदीला जोडला. हे सगळं पूर्ण केलं १८९३ ते १९०४च्या दरम्यान. आधीपासून खंदक असल्याने कदाचित सोपं गेलं असेल. पण खंदक अधिक खोल करताना यात लोहयुगीन वस्तू आणि लाकडी होड्या सापडल्या. त्या अर्थातच जतन करून ठेवल्या आहेत. आता या भिंतीच्या आणि बायपासच्या मध्ये मेकेलीनचा रिंग रोड आहे. त्यामुळे पंधराव्या शतकापासून असलेले नकाशे आणि आत्ता गुगलमॅप वरील नकाशा यात फार फरक जाणवत नाही. हा बायपास झाल्यापासून गेल्या शंभर सव्वाशे वर्षात नदीने कधीच मेकेलीनला वाहून नेलं नाही.

पण निव्वळ बायपासने पूर थांबत नसतात. पाण्याला जशी वाहून जाण्यासाठी जागा हवी, तशी गती कमी करण्यासाठी पण जागा लागते. जर नदीचा जोर प्रचंड वाढला तर मूळ नदी आणि बायपास नदी या दोन्हीवरील बंधारे नदी सहज तोडू शकते. यासाठी इथे पाणथळ आहेत. ते आधीपासून आहेत, की नंतर तयार केले याची माहिती मिळाली नाही. त्यातील एक आहे मेकेलीन शहराच्या आधी, बायपासच्या थोडासा आधी. याचं नाव मेकल्स ब्रूक. इथे दोन तळी आहेत आणि मोठ्या भागात चर आहेत. नदीचे पाणी जास्त झाले तर नदी आणि हे पाणथळ यातील दरवाजे उघडून पाण्याला पसरायला जागा दिली जाते. पाणी पसरलं की वेग कमी होणारच. या दोन तळ्यांपैकी एकाचा पूर्ण कमर्शियल उपयोग करून दि नेकर नावाचे स्पोर्ट्स सेंटर तयार केले आहे. मात्र दुसरे तळे आणि पाणथळ यात माणसांना मज्जाव आहे. थोडेफार रस्ते आहेत, पण केवळ चालत जाता येईल असेच. तेही अत्यंत आतपर्यंत नाहीत. त्यामुळे इथे माणूस नावाच्या प्राण्याचा वावर अत्यंत मर्यादित असतो. अर्थातच अन्य प्राणी-पक्षी सुखाने नांदतात.

असंच दुसरं पाणथळ आहे जिथं झिनं आणि दैलंचा संगम होतो त्याच्या अलीकडे. ही झिनं नदी वालोनिया प्रांतात नास्त नावाच्या गावाजवळ उगम पावते आणि सुमारे १०० किमी प्रवास करून दैलंमध्ये विलीन होते. इथे नदीच्या एका बाजूला तळं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणथळ. तळं नदीला जोडलेलं नाहीये. पाणथळ मात्र ५-६ दरवाजांना जोडलेलं आहे. या पाणथळात तर माणसांना पूर्ण मज्जाव आहे. रस्ताच दिलेला नाही. जायचं असेलच तर चिखलात जावे लागेल अशी पूर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे आत राजहंस, बदकांचे अनेक प्रकार, पाणकोंबड्या, पाणकावळे आणि कितीतरी पक्षी, मासे, बेडकं... खूप असतात. हिवाळ्यात प्रवासी पक्षीही बरेच येतात. याच संगमावरून ल्यूवन कालवा सुरू होतो. इथे पाणथळ असल्यामुळे पाणी कालव्यात वाढत नाही, आणि वाहूनही जात नाही. अतिरिक्त पाणी साठते, गरज असेल तेव्हा तेच नदीत सोडता येते.

आता आमचं जे #पाण्याकाठचंघर होतं, त्या पाण्याबद्दल. दैलं आणि झिनं यांच्या संगमावरून ल्यूवनकडे जाणारा कालवा केला आहे. १७५२ मध्ये हा कालवा पूर्ण केला गेला (१७६०-६१ मध्ये मराठ्यांना यमुना वेळेत ओलांडता आली नव्हती, त्याच्या आधी ८-९ वर्षे हा कालवा तयार झाला...). ५० मीटर्स रुंद आणि भरपूर खोल असलेल्या या कालव्याने अँटवर्प - ल्यूवन - ब्रुसेल्स हा जलमार्ग तयार करून दिला आहे. हा जलमार्ग अजूनही सुरू आहे. २०-३० कंटेनर्स असलेली जहाजं इथून सहज ये-जा करतात. दिवसाला ७-८ जहाजं जात येत असतात. विशेष म्हणजे हा चढ असलेला मार्ग आहे. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर लाकडी दरवाजे आहेत (अजूनही लाकडीच आहेत). हे दरवाजे दुहेरी आहेत. म्हणजे एक दरवाजा, नंतर १०० मीटर्स जागा आणि पुन्हा दुसरा दरवाजा. जेव्हा जहाज येते तेव्हा एक दरवाजा उघडून जहाज दोन्ही दारांच्या मध्ये घेतात मग मागचं दार बंद करतात. पुढचं दार उघडलं की पाणी जहाजाला वर उचलतं. एका पातळीवर आलं कि जहाज बाहेर जातं आणि दार पुन्हा बंद. परतताना याच्या उलट. दर तीन महिन्यांनी पाणबुडे येऊन तळ तपासतात. मग यातून कधी मोडकी सायकल, मोडकी खुर्ची नाहीतर झाडाची तुटलेली फांदी असं कायकाय बाहेर येतं. मात्र ही शोधमोहीम कितीही थंडी असली किंवा कितीही ऊन असलं तरी सुरू असते. त्यामुळे हा मार्ग अजूनही सुरू आहे.

मागच्या शतकाच्या अखेरीस नदी, कालवा यात मासे जवळपास नव्हतेच. पाणी खूप घाण झालं होतं. नंतर मेकेलीनच्या नगरपालिकेने आणि राजाने पैसे खर्च करून एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. पुढील ४ वर्षात नदी आणि कालवा यांच्यात पुन्हा जीव आला. मासे आले, शेवाळ आलं, त्यामागे बदक, पाणकोंबड्या, बगळे, प्रवासी पक्षी असे सगळे आले. पाण्याचा वास गेला. आमचा घरमालक या कंपनीत कामाला होता. त्याची मुलाखत घेण्याचं या कोविडमुळे जमलं नाही ते नाहीच... कधी तीही माहिती मिळाली तर नक्की सांगेन!

दुहेरी दरवाजा 

बायपास 

बायपास आणि मेकेलीन 

दैलं  

ल्यूवन कालवा 

मेकल्स ब्रुक 

मेकल्स ब्रुक पाणथळ 

कालव्याजवळचे पाणथळ 

पशुधन 

दैलं, झिनं आणि कालवा 


शुद्ध वाण (?)

 एकदा एका वयस्क व्यक्तीशी गप्पा सुरू होत्या. आंतरजातीय विवाह आणि वर्णसंकर. त्यातून येणारी नवी पिढी... वगैरे वगैरे... हे बोलताना काका म्हणाले की, अरे तुम्ही लोक गायी, घोडे, कुत्रे यांच्या जाती बघता. त्या बघताना शुद्ध वाण ठेवण्याचा प्रयत्न करता. जेवढे अधिक शुद्ध वाण तेवढा जास्त भाव देऊन तो प्राणी विकत घेता. त्याच तुम्हाला जातीत लग्न करून शुद्ध वाण ही संकल्पना पटत कशी नाही...

काय परफेक्ट आर्ग्युमेण्ट वाटतं नाही...

आता पुढची गम्मत वाचा...

माणूस जेव्हा पृथ्वीवर तयार झाला तेव्हा माणसाचे सात वाण होते. Homo habilis (“handy” man), Homo erectus (“upright man”), Homo neanderthalensis (the Neanderthal), The Denisovans, Homo floresiensis (the “hobbit”), Homo naledi (“star man”) आणि Homo sapiens (“wise man”, or “modern humans”). यातील शेवटचं वाण म्हणजे होमो सेपियन्स, म्हणजे आपण उरलेले माणसं.

आपण होमो सेपियन्सने बाकीच्या सहा जाती - वाण (बहुदा) मारून टाकल्या आणि केवळ आपण एकच वाण (बेणं) पृथ्वीवर शिल्लक राहिलो.

जर कदाचित आपल्यासह हे सहा वाण पृथ्वीवर असले असते तर वरच्या काकांचे म्हणणे खरे ठरले असते. क्रॉस ब्रीड / वर्णसंकर नको रे बाबा. सेपियन्सनी फक्त सेपियन्स सोबतच लग्न वगैरे करावे. त्यांनी होमो इरेक्टस बरोबर संबंध ठेऊन त्यापासून अशुद्ध वाण तयार करू नये. आता एकच वाण शिल्लक असल्याने असला काही प्रकारच अस्तिवात असू शकत नाही ना!

युवान हरारी काकांचा विजय असो!

Tuesday, December 10, 2019

भीती कायद्याची की पोलिसांची

शीर्षटीप - बलात्काऱ्यांना कायद्यात असलेली सर्वात मोठी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. शक्य असेल तर कायद्यात बदल करून गुन्हेगाराला लिंग कापून, चौरंगा करावं असं माझं मत आहे.

हैदराबाद येथील घटनेने मन सुन्न झालं होतं. अशा घटना घडल्या की त्रास होतोच. या केसमध्ये आरोपी लवकर पकडले गेले आणि ते पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना पोलिसांना नाईलाजाने त्यांना मारावं लागलं.

घटना घडल्यानंतर आणि आज एन्काऊंटर ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण सगळे एक समाज म्हणून किती खालच्या इयत्तेत आहोत हे अधोरेखित करतात. सुरुवात आजच्या एन्काऊंटरवरून करूया.

मुद्दा १:
कायदा भारतात नाहीच अशा पद्धतीने कित्येक लोक (ह्यात अनेक मोठे नेते, कलाकार, खेळाडू - एकूण जनमानसावर प्रभाव टाकणारे सुद्धा आहेत) व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा माणसांमुळे आधीच व्यवस्थेवर कमी विश्वास असलेल्या आपल्या समाजाला व्यवस्थेपासून आपण दूर नेत आहोत हे यांच्या लक्षात येत नाहीये. सरकार, GOD FATHER, अब तक छप्पन सारखी समांतर व्यवस्था आपल्याला उभी करायची नसून मूळ व्यवस्थेला सक्षम करायचे आहे. व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नक्षलवादी आहेच. जर असा न्याय आपण स्वीकारत असू तर नक्षलवादही स्वीकारू. आपली निवड सक्षम व्यवस्था असली पाहिजे, सक्षम अधिकारी आपोआप तयार होतील. पण जर व्यवस्थेपेक्षा अधिकारी मोठे ठरत असतील तर व्यवस्था कधीच सक्षम होणार नाही.

या एन्काऊंटरच्या अनेक शक्यता असू शकतात.
१. खरंच आरोपी हल्ला करून पळणार होते, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला.
२. मृतदेह जाळल्यामुळे न्यायवैद्यक चाचणीत बलात्काराचा पुरावा मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले असू शकते.
३. आरोपींमधील बहुदा दोन आरोपी स्वतःला "बाल" म्हणवून घेत असावेत. दिल्लीतील आरोपीप्रमाणे हेही सुटतील असं वाटल्याने पोलिसांनी त्यांना मारलं असावं.
४. कुणीतरी वेगळीच माणसे या केस मध्ये गुंतलेली असावीत. (एका ऐकीव माहितीनुसार पीडित स्वतः पशुवैद्य असल्याने अवैध कत्तलखान्याविरोधात होती. त्यामुळे तिची सुपारी दिलेली असू शकते) अशी नावं बाहेर येतील आणि ते पोलिसांना आणि प्रशासनाला परवडणारे नसेल. यांना मारलं तर सगळी केसच बंद करता येईल.
यापैकी यापुढे केवळ पहिली शक्यता गृहीत धरण्यात येईल आणि फाईल बंद होईल...


 आपल्याला या एन्काऊंटरचा आनंद का होतो -
दिल्लीतील केसमध्ये येत्या काही दिवसात फाशीचा दिवस ठरेल पण तिथे शिक्षा द्यायला जल्लाद उपलब्ध नाही. कठुआ केस अजूनही तपासातच आहे. उन्नाव केस मध्ये आरोपींनी पीडितेसह तिचे कुटुंबच मारून टाकले आहे. कोपर्डी केसमध्ये शिक्षा जाहीर झाली पण अजून त्यापुढील कोणतीच कारवाई नाहीये. केरळमधील ननची तर केस पुढेच गेलेली नाही. तो बिशप सुखेनैव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतोय. या फक्त माहित असलेल्या केसेस आहेत. माहित नसलेल्या हजारो केसेस असतील आणि न नोंदलेल्या तर त्याच्या कित्येक पट...! न्याय देण्यात आणि त्याची अंमलबजावणी होण्यात कित्येक वर्षं निघून जातात. यामुळे अशी एखादी घटना घडली कि त्याचा आनंद होतो.
पण हे लक्षात येत नाही की यातून आपली आधीच कमकुवत असलेली व्यवस्था अधिक कमकुवत होत जाते. गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेची भीती वाटली पाहिजे, पोलिसांची नाही.





मुद्दा २:
आपण एक समाज म्हणून खरंच चांगले आहोत का? कारण हैदराबाद पीडितेवर केवळ याच चार नराधमांनी बलात्कार केला नाही. त्यांच्याशिवाय अजून ८० लाख लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. ८० लाख लोकांनी तिचं नाव पॉर्न साईटवर शोधलं. हे सगळे आपल्याच समाजातील लोक आहेत. अजून किती अधःपतन व्हायचं आहे. जर एन्काऊंटर करणे हाच न्याय असेल तर या ८० लाखांनासुद्धा मारले पाहिजे. एखादीवर बलात्कार होतोय आणि तो पाहावा वाटतो ही कसली विकृती आहे. हे लोक संधी मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष कृती करत नाहीयेत. यांनाही जर संधी मिळाली तर ते नक्कीच बलात्कार करतील.
मुळात बलात्कार हा रोग (disease) नाहीये, ते लक्षण (symptom) आहे. रोग वेगळाच आहे. अजूनही रोग काय आहे ते कळालं नाहीये. काही लोक जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यापासून रोखलं जातं. या गुन्हेगारांना भेटून ही मानसिकता आली कुठून हा शोध घेतला गेला पाहिजे. पण प्रशासन भेटच होऊ देत नाहीत असे अनुभव आहेत.

मुद्दा ३:
सरसकटीकरण आणि धार्मिक/जातीय विभाजन - कठुआ केसच्या वेळी अनेकांनी सरसकट हिंदूंना, देवालयांना आणि देवतांना पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याबद्दल लिहिताना मी लिहिलं होतं ( http://dnyanamhane.blogspot.com/…/i-am-not-ashamed-to-be-hi… )

- लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)
हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

हे टिपिकल फुर्रोगामी लोकांबद्दल होतं. ते असतात सिलेक्टिव्ह. पण त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणारे स्वतःच किती सिलेक्टिव्ह होताहेत हे गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आणि त्याचं वाईट वाटलंय.

Quint सारख्या नाठाळ मीडियावीर त्या पाशाची गरिबी दाखवतात आणि मग विरोधी सूर अधिक भेसूरपणे असा न्याय मागतो.

दिल्ली केस मध्ये मोहम्मद अफरोज "नाबालिक" असल्याने ३ वर्षात सुटला त्याबद्दल हिरीरीने लिहिलं जातं. पण उर्वरित ३ गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही. उन्नाव केसमध्ये कुणी फार बोलत नाही. आत्ताही चार पैकी दोन आरोपी हिंदू आणि दोन मुस्लिम होते. त्यातील फक्त मोहम्मद पाशा बद्दल बोललं जात होतं. पण जे "नाबालिक" म्हणून सुटण्याची शक्यता होती, त्यातील एक हिंदू होता. त्याचं नावही कोणत्या "पोष्टी"त दिसलं नाही. शिवाय "त्यांच्यात" हे "जायज" असतं अशाही पोस्ट्स दिसल्या / whatsapp वर फिरल्या. हा दुतोंडीपणा फुर्रोगाम्यांचा आहे, तो आता या स्वघोषित हिंदुत्ववाद्यांमध्येही येत आहे ही वाईट बाब आहे.

आज संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे व्यक्ती असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. पोलिसांनी खरंच नाईलाज म्हणून गोळीबार केला असेल तरी दुर्दैवाने आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून समाज म्हणून आपण अपयशी होत आहोत हेच अधोरेखित होत आहे.

आपल्या देशाच्या व्यवस्था सक्षम होणं आणि त्यावर सर्व समाजाचा विश्वास असणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.

Thursday, September 19, 2019

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.

Monday, July 8, 2019

मशीन लर्निंग आणि समाजमन

बऱ्याचदा त्र आणि ञ मध्ये खूप लोक गडबड करतात. छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला जातो. यावर बऱ्याचदा गमतीदार टीका होते, विनोद होतात पण एकदा वापर करायला सुरुवात झाली की अनेकांनी त्र च्या जागी "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" लोकांनी छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला. त्याने झालं असं की गूगल इंडिक की-बोर्ड वर जेव्हा आपण छत्रपती हा शब्द लिहितो, तेव्हा छञपती हा शब्द देखील सुचवला जातो. याचं कारण गूगल इंडिक की-बोर्ड हा मशीन लर्निंग इनेबल्ड आहे. म्हणजे जे शब्द टाईप केले जातात ते शब्द तो लक्षात ठेवतो आणि नंतर सुचवतो. अजून तरी जास्त लोक छत्रपती वापरतात. जेव्हा जास्त लोक छञपती वापरतील तेव्हा डिफॉल्ट आपल्याला छञपती शब्द दिसेल.

अगदी असंच समाजमन काम करत असतं. कुणीतरी एखादी चूक करतो. त्याला एकूणच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" या नावाखाली फारसा विरोध होत नाही. मग तीच, तशीच चूक अजून काही लोक "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" करतात. हळूहळू समाजमन त्याला मान्यता द्यायला लागतं. मग मान्यतेनंतर त्याचा गौरव केला जातो, नंतर तेच करणारे श्रेष्ठ असाही प्रचार होतो आणि मग योग्य करणारे लोक हे प्रतिगामी वगैरे होत जातात. त्यामुळे जर चूक असेल तर ती चूक आहे हे दाखवून दिलं पाहिजे आणि ती चूक ग्लोरिफाय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उगाच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" वगैरे नावाखाली मान्यता देणे हे समाजमनाचे मशीन लर्निंग असते हे लक्षात ठेवले पाहिजे!

Tuesday, March 20, 2018

शुगर कोटेड टीका

माधव "आपटे"... डोंबिवली फास्ट मधला एक सामान्य माणूस. व्यवस्थेवर आणि ती राबवणाऱ्यांवर चिडून कायदा हातात घेतो. तेव्हा इन्स्पेक्टर सुभाष अनासपुरे म्हणतो, "माधव 'आपटे' नावाचा कुणीही असं काही करू शकतो का?"
सगळे लोक डोंबिवली फास्ट काय भारी चित्रपट आहे म्हणतात. यात ब्राह्मण सुद्धा आहेत छान चित्रपट म्हणणारे
संदीप खरे एक गाणं लिहितो, त्याला सलील कुलकर्णी चाल लावतो. गाणं आहे, मी मोर्चा नेला नाही. यात या मोर्चा न नेणाऱ्या, संप न करणाऱ्या माणसाला जेव्हा तो दगड होऊनी पडलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायला देखील कुणी उचललेले नसते. हा माणूस कोण, याच्या "टकलावर अजून रुळत असते एक अदृश्य लांबशी शेंडी". म्हणजे कोण ते कळालं असेलच. तर या गाण्याला आणि अल्बमला देखील सर्व लै भारी म्हणतात. यात ब्राह्मणही आले.
मग एक मंत्री असलं शुगर कोटेड न बोलता म्हणतो की घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का... झालं सगळे ब्राह्मण त्याच्यावर चिडून बोलतात. तुझा बाप जो मुख्यमंत्री आहे तो ब्राह्मण आहे याची जाणीव करून देतात. का, कारण तो मंत्री डायरेक्ट बोलला म्हणून?
निशिकांत कामतने डोंबिवली फास्ट मध्ये घेतलेला संवाद, संदीप खरेने घेतलेला कवितेतला भित्रा आणि कांबळे बोलले यात अर्थात्मक काही फरक नाहीये. फरक एकच आहे तो म्हणजे कांबळे थेट बोलले. म्हणजे ब्राह्मणांना शुगर कोटेड काहीही बोललं तरी चालतं पण थेट बोललेलं खपत नाही... बरोबर ना...

दि. १७ मार्च २०१७

जो जे वांछील तो ते 'न' लाभो

महाभारताच्या शांतीपर्वात खलील श्लोक आला आहे.
न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः।
स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥
म्हणजे एका खऱ्या प्रजाराज्याचं हे एक स्वप्न आहे. राजा नाही, राज्य नाही, दंड नाही आणि त्यामुळे दंडव्यवस्थासुद्धा नाही. राज्य आणि दंडव्यवस्था नाही, म्हणून राजकारणीही नाहीत! पण हे केव्हा होऊ शकते? जेव्हा स्वतः प्रजा ही परस्परांचे रक्षण करेल तेव्हा... आज जेव्हा आपण राजकारण आणि राजकारणी नको, किंवा राजकारण हा चिखल आहे वगैरे तेव्हा प्रजा काही परस्परांचे आणि परस्पर हिताचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेली नसताना म्हणतो. जर राजकारणी या देशातून जगातून नष्ट झाले तर प्रजाहितरक्षण कोण करेल? हे नक्की मान्य की राजकारण अत्यंत गढूळ आहे, पण आजवर त्याद्वारेच अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. त्यामुळे जर राजकारण आणि राजकारणी यांना समाजजीवनातून हद्दपार करायचे असेल तर त्याआधी परस्परांचे रक्षण करणारी प्रजा तयार झाली पाहिजे. तोवर राजकारणी हद्दपार होऊ नयेत.
म्हणूनच समर्थांनी हरिकथेनंतर (धर्मानंतर) राजकारणाला महत्व दिले आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे सावधपण । सर्वांविषयी ।
म्हणजे 'आझादी'वाल्यांना सुद्धा हेच तर पाहिजे? नाही...
इथे 'गॉड तुस्सी ग्रेट हो' या चित्रपटाचा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे ज्ञानेश्वरांचा. काय संबंध या दोघांचा??? आहे!

'गॉड तुस्सी ग्रेट हो' मध्ये सलमान देवाच्या भूमिकेत जातो आणि मग एकामागे एक लोकांच्या मागण्या त्याच्याकडे येऊ लागतात. हा काही वेळातच परेशान होतो आणि म्हणतो, ज्याला जे हवे असेल ते मिळू दे. त्यानंतर गोंधळ सुरू होतो. लूटमार, कैदी तुरुंगातून सुटणे आणि बरेच काही... शेवटी तो देवाला म्हणतो बाबारे तू ग्रेट आहेस. आता हे तूच निस्तर.
पसायदानात ज्ञानेश्वरांनी पण ज्याला जे हवे ते मिळो असंच म्हटलंय ना, जो जे वांछील तो ते लाहो... म्हणजे जे सलमानने मागितले तेच... पण
ज्ञानेश्वरांनी अनेक *अटी व शर्ती लागू या प्रमाणे हे मागणे केले आहे
पहिली अट
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला पाहिजे आणि सत्कर्मात त्यांची गोडी वाढली पाहिजे
दुसरी अट
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
सर्व प्राणिमात्रांचे, केवळ मानवांचे नाही, एकमेकांशी मैत्र झाले पाहिजे
तिसरी अट
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
वाईटाची अंधारकाजळी नष्ट होऊन, स्वधर्म सूर्य अखिल विश्वात जागृत झाला पाहिजे. इथे धर्म म्हणजे religion नाही तर धर्म म्हणजे विहित कर्त्यव्य. ते प्रत्येकाने पूर्ण केले पाहिजे.
हे सर्व झालं तरच
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
'आझादी'वाल्यांचे मागणे हे 'गॉड तुस्सी...'च्या मालिकेतील आहे. अविचारी आणि अविवेकी. पण ही चूक 'आझादी'वालेच करतात असं नाही तर आपणापैकी बरेच असे असतात जे संपूर्ण राजकारणच नाकारतात, त्याद्वारे ते राज्यव्यवस्था नाकारत आहेत याचे कदाचित त्यांना भान नसते. यातून ज्ञानेश्वरांचे 'जो जे वांछील...' साध्य होणार नसून 'गॉड तुस्सी...' मधील अराजक येईल हे समजून घेतले पाहिजे.
'रक्षन्ति स्म परस्परम्' चा नेमका अर्थ आणि कृती ही ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. ते देखील अधिक व्यापक करून. तेव्हा जोवर या अटी व शर्ती लागू होत नाहीत तोवर जो जे वांछील तो ते 'न' लाभो!
दि. ४ एप्रिल २०१७

शेतकऱ्याच्या 'अनैतिहासिक' आसूड

इतिहास हे शास्त्र आहे. एखादे 'मत' इतिहास म्हणून मांडणे किंवा इतिहास म्हणून स्वीकारणे हे दोन्ही चूक.
उदाहरण म्हणून महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातील एक परिच्छेद देत आहे. यातील एकूण एक वाक्य अनैतिहासिक आहे.
1. महंमद पैगंबरांच्या जहामर्द शिष्यांनी सोमनाथ शेतकऱ्यांची भट ब्राह्मणापासून सुटका करण्यासाठी फोडले नाही. ते फोडले लूट करण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी. त्यांना येथील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नव्हते
2. ज्ञानोबांनी भागवत बखरीतील कल्पित भाग उचलून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली गीतेवरून. गीतेत इस्लामच्या विरोधी काही असण्याची शक्यता नाही कारण गीता इस्लामच्या हजारो वर्षे आधी लिहिली गेली. गीतेशिवाय अन्य धर्मकारण/राजकारण या कशावरही ज्ञानेश्वरांनी काही लिहिले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांमुळे शेतकरी मुस्लिमांना नीच मानू लागले हे चुकीचे आहे
3. तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांत निर्माण झाला, हे धादांत खोटे वाक्य आहे. तुकाराम शेतकरी नव्हते, सावकार होते. त्यांनी सावकारी सोडल्यावर शेती केली. शिवाजी महाराज देखील 3 पिढ्यांपासून शेतकरी नव्हते तर सरदार होते.
4. पुढील वाक्यात महाराजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे. ज्यांना मराठी, संस्कृत, फार्सी या भाषा व्यवस्थित अवगत होत्या, ज्यांनी आपली राजमुद्रा संस्कृत मधून तयार करवून घेतली अशा शिवाजी राजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे
5. पेशव्यांनी शाहू आणि पुढील राजांना साताऱ्यास कैदेत ठेवले हे म्हणणे इतिहासाचे अज्ञानच दर्शवते. बाळाजी विश्वनाथांपासून, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ते अगदी ज्याला पळपुटा म्हणतात (यावर सुद्धा प्रतिवाद आहेत) त्या दुसऱ्या बाजीरावांपर्यंत सर्वांनी सातारच्या गादीशी इमान राखले आणि पूर्ण मान दिला.

हे सगळं जोतिरावांनी का लिहिलं असावं? कारणं अनेक असू शकतात. उदा:
1. त्यांचं शिक्षण इंग्रजांच्या शाळेत झालं होतं. त्यामुळे आर्य भारतात आले आणि त्यांनी मूलनिवासी लोकांवर अत्याचार केले हे त्यांच्यावर बिंबवले गेले. आर्य म्हणजे केवळ ब्राह्मण आणि इतर सर्व शेतकरी हा शोध असाच लादला असेल. (डॉ आंबेडकरांनी यावर प्रतिवाद करून हे चुकीचे आहे हे सिद्ध केले आहे)
2. जेव्हा गोविंदराव (वडील) यांनी रुढीवाद्यांना घाबरून, किंवा त्यांचं ऐकून जोतिरावांना घरातून काढलं तेव्हा फातिमा आणि उस्मान शेख या बहीण भावांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली. कदाचित त्यामुळे इस्लाम बद्दल प्रेम निर्माण झाले असावे.

कारणं काहीही असली तरी आधी निष्कर्ष आणि मग पुरावे अशा पद्धतीने हे लिखाण झालेले आहे. जोतिरावांचे कार्य महान आहे. ते महात्मा आहेतच. पण त्यामुळे त्यांनी सांगितलेली, लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के बरोबर असलीच पाहिजे असे नाही. चुकून असेल, त्यावेळची गरज असेल किंवा काहीही या महात्म्याकडून दुहीचे बी पेरले गेले. आणि आज त्या वृक्षाला फळं आली आहेत ही खेदाची बाब आहे. असो!

मुद्दा असा की इतिहास हे मत नसते, जे खरोखरीच झाले आहे तो इतिहास असतो. कधी सगळे पुरावे एकत्र मिळतात कधी सुटे सुटे. ते सगळे जोडून इतिहास सिद्ध होतो. त्यात कधी जुने सिद्धांत खोडले जातात तर कधी ते अधिक सिद्ध होतात.




दि. २६ जुलै २०१७

Monday, March 19, 2018

कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो

कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
पुरातन भारत की विश्व में एक पहचान हो
लाज रखे जो दुनिया की वो सबसे बड़ा तुम फूल हो
बुनियादि जरूरतो में अ-व-नि का तुम मध्य हो
हर शरीर की लाज ढके ऐसा तुम वस्त्र हो
इचलकरंजी में तुम, सोलापूर चादर में तुम
बम्बई की मीलो से लेके मैंचेस्टर फैक्ट्रिया हो तुम
बापू की धोती भी तुम, बापू का पंचा भी तुम
बापू के चरखे से निकला, हर एक धागा भी तुम
दादी माँ की साडी हो, दादाजी का जनेवा हो
भगवान के सामने दिए में जलने वाली बाती हो
किसानो से ख़रीदा जाये तो चालीस रुपये किलो हो तुम
मॉल की दुकानो में हजार का सौ ग्राम तुम
विदर्भ को मिली तुमसे सफ़ेद सोने की पहचान
आज की तारीख में हैरान है सारे किसान
धागा जब आड़ा मिले तो उसका कपड़ा बने
धागा जब खड़ा गुंफे तो उसकी ही डोर बने
उसी डोर से बना पेड़ो पर झूला हो तुम और...
उसी डोर से बना किसान का फंदा हो तुम
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो

दि. ३० जानेवारी २०१६