Friday, November 22, 2019

अस्पर्शित निसर्ग

क्वेरीन नावाची माझी बेल्जियम मध्ये सहकारी आहे. नेदरलँड्सची नागरिक. ती भारतात, विशेषतः दक्षिण भारतात कामानिमित्त काही वेळा जाऊन आलेली आहे. शिवाय भारतीय कंपनीत काम करते म्हटल्यावर तिने भारताची बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिच्याशी गप्पा चालल्या होत्या. त्यात ती म्हणाली की, "दक्षिणेत प्रचंड मोठी मंदिरं आहेत, भारतात इथल्या ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम सारखी मोठी शहरं आहेत आणि शिवाय हत्ती, वाघ, सिंह सुद्धा आहेत. या बहुविधतेचं मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं."

खरंच या भागात कोणतेच वन्यजीव अस्तित्वात नाहीत. मुळात वनेच अस्तित्वात नाहीत. नेदरलँड्स, बेल्जियम आणि कदाचित अजून अनेक देश असे असतील जिथे नैसर्गिक वनराई शिल्लकच नसेल आणि अर्थातच वन्यजीव सुद्धा.

इथे जवळच मोठं प्राणी संग्रहालय आहे. त्यात हत्ती, वाघ, सिंह, गेंडे, जिराफ... खूप प्राणी आहेत. त्यांची प्रचंड काळजी घेण्यात येते. एखाद्या हत्तीणीला बाळ झालं की टीव्हीवर कौतुकाच्या बातम्या येतात. पण हे सगळं होतं मानवाच्या देखरेखीत, नियंत्रणात!

आमची टीना नावाची वयस्क मैत्रीण आहे. तिलाही भारताबद्दल कोण कौतुक. तिच्याशी एकदा अशाच गप्पा चालू होत्या. जवळच एक खूप मोठं उद्यान आहे - व्रैब्रूक पार्क. छान रांगेत लावलेली झाडं, मध्ये तयार केलेलं तळं, लहान मोठी खेळण्यासाठीची मैदानं, पळायला मातीचा उत्तम रस्ता, फक्त गुलाबाचं उद्यान आणि भरपूर गर्दीवाली झाडं. असं सगळं काही त्या उद्यानात आहे. मला तिथे फिरायला, सायकल चालवायला आवडतं. मी त्याचं कौतुक करत होतो. त्यावर टीनाने एका वाक्यात बोळा फिरवला. ती म्हणाली, "कितीही सुंदर असलं ना तरी ते मानवनिर्मित आहे." पुढे म्हणाली, "भारतात जशी जंगलं मानवी हस्तक्षेपाशिवाय आहेत तशी इथे नाहीतच. एकूणच आम्हा युरोपियनांना आहे ते नष्ट करून, मग आमच्या देखरेखीत, नियंत्रणात निसर्ग असलेला आवडतो."


खूप वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंचं "दुस्तर हा घाट" वाचलं होतं. युरोपात पहिल्यांदा येण्याआधी. त्यात नमू आणि वनमाळी लग्न होऊन आम्सटरडॅमला येतात आणि तिथला वनमाळीचा मित्र अलिस्टरशी नमूचीही छान मैत्री होते. वनमाळी पुढे कुठे कुठे फिरत राहतो पण नमू भारतात परतते. तिला भेटायला अलिस्टर येतो. मग ते शेताजवळच्या एका टेकडीवर जातात. तिथे एका दगडावर बसून अलिस्टर भोवताली बघत नमूला म्हणतो, "तुमच्या भारतात मानवी स्पर्शाशिवाय असलेला निसर्ग आहे. आमच्याकडे नाही." जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा, या वाक्यातील भावना १००% कळाली नव्हती. आज कळतीये.

पण भारतात खरोखरीच असा निसर्ग मानव नावाच्या अत्यंत हीन, स्वार्थी, जैवसाखळीत कुठेच नसलेल्या प्राण्याकडून अस्पर्शित राहील? आपला स्वार्थ, आपल्याला जंगलं, नद्या, वन्यजीव यांना आहे तसे - किमान काही भागात राहू द्यायला तयार होईल. याचे उत्तर आत्तातरी नकारार्थी आहे. काही वर्षांनी भारतातला एखादा अलिस्टर, टीना, क्वेरीन परग्रहावरच्या एखाद्याला सांगेल की, "तुमच्याकडे जसा अस्पर्शीत निसर्ग आहे तसा आमच्या पृथ्वीवर नाही..."

असं होऊ नये ही प्रार्थना 🙏🏼

Tuesday, November 12, 2019

परिशोध - एस् एल् भैरप्पा

भैरप्पांच्या ज्या कादंबऱ्या वाचल्या त्यात त्यांना काहीतरी ऐतिहासिक सामाजिक संदेश द्यायचा आहे असं नेहमीच वाटलं. परिशोध ही कादंबरी मात्र याला अपवाद आहे. एका अनाथ मुलाची, विश्वनाथची, वय वर्ष ९-१० पासून ते २७-२८ पर्यंतची गोष्ट यात येते. काळ साधारण १९४८ ते १९६४ आहे.

विश्वनाथ अरसीकेरे हा ९-१० वर्षांचा असताना त्याची आई आणि बहीण प्लेगने मरण पावतात. त्याची आजी (आईची आई) सुद्धा त्याच साथीत मरण पावते. वडील दुसरं लग्न करतात आणि विश्वनाथ "अनाथ" बनतो. त्याला जवळच्या गावातील एक जंगम सांभाळतो. त्याला त्या गावात समदुःखी मित्रही मिळतो. शाळा चांगली सुरू असते, पण विश्वनाथ टुरिंग टॉकीजकडे ओढला जातो आणि त्या गावातून बाहेर पडतो. त्याचे आजोबा (आईचे वडील) त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना तो सापडत नाही.

पुढे विश्वनाथ जीव देण्याचा प्रयत्न करतो पण एका अपघाताने त्यातून वाचतो. मग पुन्हा भिक्षा मागून आणि वाराने जेऊन शिक्षण सुरू होतं. पुन्हा त्यात अडचण येऊन तो एका हॉटेलात काम सुरू करतो. तिथे मिळणारी वागणूक आणि तुटपुंजा पगार याविरुद्ध आवाज उठवण्याच्या प्रयत्न करतो. हॉटेल चालक पोलिसांच्या मदतीने त्याला थर्ड डिग्री देतात पण एका नावाजलेल्या देशपांडे वकिलांची अनपेक्षित मदत मिळते आणि तो सुटतो. पुढे वकिलांकडे काही काळ काम करतो पण तिथेही एक प्रसंग असा घडतो की तो कुणालाही न सांगता तिथून बाहेर पडतो.

त्यानंतर एका संगीत नाटक कंपनीत डेप्युटी मॅनेजरचे काम सुरू करतो. अचानकच त्याला अभिनयाची संधी मिळते आणि ती तो साधतो. चांगला गायक नट म्हणून नावाजला जाऊ लागतो. तेथील अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. ती वयाने याच्यापेक्षा बरीच मोठी असल्याने ती लग्नाला नकार देते आणि त्याच रागात तो नाटक कंपनी सोडून देतो आणि मुंबईला निघतो.

मुंबईत आधी हमाल म्हणून, नंतर व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत राहतो. हे करताना अनेक बरेवाईट अनुभव येतात. शेवटी केवळ पोटापुरतं कमवायचं असं ठरवून आचाऱ्याचं काम करतो आणि उरलेल्या वेळात एका वाचनालयात पुस्तकं वाचतो. त्या वाचनात अनेक प्रश्न पडतात. विशेषतः तत्त्वज्ञान आणि अध्यात्मात त्याला गोडी आहे असं वाचनालयाच्या मालकाला वाटतं. त्यातून त्याची ओळख रंगनाथ स्वामींशी होते आणि तो चिकमंगळूर जवळच्या त्यांच्या आश्रमात येतो. तिथेही त्याला सर्वांचे पाय मातीचे हा अनुभव येतो आणि ती जागा सोडून तो पुन्हा त्याच्या बालमित्राच्या गावी पोहोचतो.

मित्र त्याला मदत करतो. शिक्षण पुन्हा सुरू होतं. लग्नही होतं पण शिक्षणाला सासरे मदत करतील या बोलीवर. सासऱ्यांच्या स्वतःचाच संसार नीट सुरू नसतो. त्यामुळे महिन्याभरात विश्वनाथ बायकोला सोडून मैसूरला जातो. याच दरम्यान त्याची बायको गरोदर राहिलेली असते. बाळाचा जन्म होतो. तरीही विश्वनाथ परतून येत नाही. संध्याकाळी काम आणि दिवसा शिक्षण सुरू ठेवतो. बायको अखेरीस जीव देण्याचा प्रयत्न करते पण त्यात ती वाचते आणि बाळ दगावतं. याचा तिच्यावर आणि जेव्हा विश्वनाथला बातमी कळते तेव्हा त्याच्यावरही खूप खोल परिणाम होतो आणि विश्वनाथ तिला भेटायला येतो. बायको भेट नाकारते आणि आयुष्य पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून जगायचं ठरवते.

विश्वनाथला शिक्षणासाठी मदत करणारे मुख्याध्यापकांना विश्वनाथचा मित्र मध्यस्ती करायला सांगतो. विश्वनाथ देशपांडे वकिलांकडून निघाल्यावर त्यांच्यासारखी डायरी लिहायला सुरूवात करतो. ती डायरी विश्वनाथ बायकोला देतो आणि तीच पुढे मुख्याध्यापकांकडे येते. त्यातून ते विश्वनाथची पूर्ण कथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्यालाच भेटून मग पुढे मध्यस्ती करायचं ठरवतात.

इथे कथा संपते. पुढे काय होतं ते भैरप्पा वाचकावर सोडून देतात.

सगळी कथा ही एक एक पात्र विश्वनाथला शोधत आहेत अशी सांगितलेली आहे. सुरूवातीला कंठीजोईस (विश्वनाथाचे आजोबा) शोध घेतात. मग देशपांडे वकील, नाटकाचे दिग्दर्शक मास्टर, रंगनाथ स्वामी आणि शेवटी मित्र गंगण्णा या पात्रांमधून कथा पुढे सरकते. या शोधामुळे किंवा विश्वनाथला स्वतःला काय करायचं आहे याच्या शोधामुळे कादंबरीचं नाव "परिशोध" असावं...

विश्वनाथ लिहीत असलेल्या डायरीतील एका विचाराचा सारांश - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." हे बहुदा या पुस्तकाचा सार असावं...

Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Monday, October 21, 2019

अहंकार

अहंकार ही अशी गोष्ट आहे जी, ज्याला शोभून दिसू शकते तो बाळगत नाही, ज्याची कुवत नसते तो सगळीकडे घेऊन फिरतो

Tuesday, October 8, 2019

सहज संवाद

श्यामचे वडील घरी येतात. आई पाट मांडते आणि सगळे जेवायला बसतात. आज आई भाजीत मीठ टाकायला विसरते. वडील काहीच न बोलता सगळं जेवण करतात. वडील तसंच खातात म्हटल्यावर मुलंही काहीच न बोलता जेवण करतात. सर्वांची जेवणं झाल्यावर जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे लक्षात येतं. मग तीही बिना मिठाची भाजी खाते...

ही गोष्ट लहानपणी "श्यामची आई" पुस्तकात वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला होता की, भाजीत मीठ नाहीये हे सांगायला श्यामच्या वडिलांना अडचण काय होती. सर्वांच्या ताटात एक एक चिमूट मीठ पडलं असतं आणि सर्वांना सहज चवीचं खायला मिळालं असतं. पण एकूणच यात अनावश्यक त्यागाचे उदात्तीकरण केलंय.

याचे आईवर होणारे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचारच केलेला नाहीये. जर आई निगरगट्ट असेल तर काही अडचण नाही. पण ती तशी नाहीये कारण तिनेसुद्धा भाजी बिना मिठाची खाल्ली. आपण जर चूक केली तर तिची शिक्षा असणार नाही पण कुणी काही न बोलता ते सहन करेल आणि चूक सुधारायला आपल्याला जागाच नसेल ही भावना किती भयंकर आहे. मी आपल्या घरात आपल्याच माणसात एक छोटीही चूक करू शकत नाही हे दडपण तिच्यावर पुढे जन्मभर असेल.

आपल्या माणसांत असताना आपण सहज असलो पाहिजे. आपल्यावर "माझ्याकडून एखादी चूक तर होत नाहीये ना" याचं दडपण असू नये. यासाठी सर्वांनी सहज संवाद ठेवला पाहिजे. कुणी एखादी छोटी-मोठी चूक केली तर त्यावर सोपा उपाय शोधला पाहिजे. न बोलता सहन करणंही नको आणि फाडफाड बोलून शिक्षा करणंही नको.

आजच्या दसऱ्याला अबोलतेकडून सहज संवादाकडे आपल्या सर्वांचे सीमोल्लंघन व्हावे या शुभेच्छा!!!

Thursday, September 19, 2019

सूर्यास्त

जेव्हा एखादा सूर्य भर मध्यान्ही
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.